पूर्णब्रह्म

Submitted by अज्ञातवासी on 9 November, 2018 - 00:07

फार वर्षांपूर्वी मिसळपाववर चंडोल नामक आय डीने ही कथा लिहिली होती. लेखकांशी संपर्क होऊ शकला नाही. पण माझी सर्वात आवडीची कथा असल्याने इथे लिहीत आहे. कथेचं सर्व क्रेडिट चंडोल यांनाच आहे. जर धागा नियमात बसत नसेल तर उडवून टाकावा.
******
उत्तरपेशवाइतील ऐन वैभवशाली दिवसांमध्ये मराठी मुलुखात विविध देवीदेवतांच्या व्रत-अनुष्ठानांचे पेव फुटले होते. आड गावातील अडीच गुंठा बखळीत, एखादा बुद्रुक मनसबदार देखील शेपाचशे पान सहज उठवून देवून आशीर्वाद पदरात पाडून घेत होता. नाशिक, सातारा, रत्नांगिरी, श्रीवर्धन, वाई, कोल्हापूर अशा खाशा शहरांमध्ये पूजा-अर्चा, यज्ञ, होम-हवन ह्यांची रेलचेल होती. यजमान विविध प्रांतातील रुचकर खाद्यपदार्थ आपल्या पंगतींत समाविष्ट करून विप्रवारांचे आशीर्वाद घेत होते.

जेंव्हा पूर्ण दौलतीत अशी पुण्य मिळवण्याची चढाओढ चालू होती, तर खुद्द श्रीमंत पेशव्यांच्या गादीचे स्थान असलेल्या पुण्याचे रूप तर काय वर्णावे? उत्तरेतील कान्यकुब्ज, मैथिली पासून ते रामेश्वरवासी नाम्बूदिरीनपर्यंत दशग्रंथी ब्राम्हण मराठेशाहीचे वैभव आणि येथील यजमानांच्या आग्रहानैपुण्याच्या कथा ऐकून येथे येत आणि साक्षात रामराज्य 'याची देही याची डोळा' पाहिल्याचे समाधान मानून स्वगृही परतत. मातब्बर सरदारांच्या भटारखाण्यातील सर्व पात्रे मासातून एकदातरी पाण्याचा स्पर्श अनुभवत होती.

अश्या ह्या पुण्याश्लोकी वातावरणात, विप्रगणामध्ये मात्र काहीतरी आक्रीतच चालू होते आणि त्याला कारण होत्या ह्या नित्यनेमाने चाललेल्या जेवणावळी. मणाचे ब्राम्हण हा मान मिळवण्यासाठी मराठेशाहीतील झाडून सर्व द्विज पंगतीमागून पंगतीत आपले रुचीनैपुण्य दाखवायची चढओढ करीत होते. त्यातच देशावरचे आणि कोकणातले असे दोन गट पडले आणि अक्षरशः रणकंदन सुरु झाले. ह्या स्पर्धेमुळे यजमानांची चांगलीच पंचाईत झाली आणि आमंत्रणांचा ओघ अटू लागला.

काही अनुभवी द्वीजेषांना हा आचरटपणा मुळीच रुचला नाही. भोजनपटुत्वा सारखी भूषणवाह योग्यता अशी आखाड्या सारखी चार चौघांत मांडण्याचा प्रकार त्यांना असह्य झाला आणि त्यांनी ह्या स्पर्धेचा सोक्षमोक्ष लावण्याचा निर्णय केला. देशावरील गटाकडून सातारकर महादेवभट आणि कोकणातील गटाकडून चिपळूणचे बगंभट ह्यांची निवाड्या साठी नियुक्ती झाली.

चालू असलेला प्रकार हा समाजाच्या हिताचा नाही ही गोष्ट ह्या पोक्त मंडळींनी मान्य केली. परंतु त्याच बरोबर भोजनाच्या पंगतीचा मान हा एक भावनिक प्रश्न असल्याचेही त्यांच्या लक्षात आले, आणि म्हणून त्यांनी ह्या प्रकरणाचा निवडा करण्यासाठी एक स्पर्धा आयोजित करायचे ठरवले. स्पर्धा तशी सोपीच शिवाय कुळातील लोकांच्या विशेष जिव्हाळ्याची. मुळात विषय भोजनपटुत्वाशी निगडीत असल्याने याच गोष्टीच्या प्राबल्याच्या जोरावर कोणत्याही एका गटास विजयी घोषित करावे असे ठरले. याचबरोबर नुसत्या अन्नपदार्थांच्या संख्येस किंवा वजनास प्राधान्य न देता रुचीप्रीयतेच्या दृष्टीकोनातून स्पर्धा व्हावी असही ठरलं (हो, नाहीतर एखादा कोंकण्या खंडीच्या पायली भात चरून विजयाचा विडा उचलायचा, इति महादेवभट). आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ह्या गोष्टीचा बोभाटा होऊ नये म्हणून स्पर्धा एखाद्या सधन विप्राच्या घरी आणि ती देखिल कुठल्या तरी अनुष्ठानाच्या सबबीखाली करावी असं मान्य झालं (न जाणो कोण्या पाप्याची शिंची द्रिष्ट लागायची, इति बगंभट)

अशा आगळ्या वेगळ्या स्पर्धेचं यजमानपद स्वीकारण्याचं शिवधनुष्य कराडच्या आगाशे खोतांनी आनंदाने स्वीकारलं. कोणालाही ह्या बाबतीत कसलीच महिती लागू न देण्याच्या अटीवर गणेश जयंतीच्या मुहूर्तावर वाड्यावर जेवणावळ आयोजित केली गेली आणि आपापल्या गटाचे प्रतिनिधित्व कोणी करायचे ह्यावर दोन्ही बाजूस चर्चा सुरु झाली.
स्पधेचे एकूण स्वरूप आणि नियम पाहून कोंकणी गोटामध्ये उत्साहाचे वातावरण होते. ह्यावेळी घाटावरच्यांची खोड नक्की मोडणार ह्याच्या बद्दल त्यांना खात्रीच पटली. याचं कारणही तसंच होतं. वसिष्ठाकुलोत्पन्न नरहरी भट्ट मुळचे राजापूरचे, तरीही भोजन महर्षी म्हणून ते पूर्ण कोंकण मुलुखात प्रसिद्ध होते गुजरातेतील बडोद्या पासून ते फिरंग्याच्या आधिपत्याखालील मंगेशिपर्यंत त्यांच्या भोजनपटुत्वाचा दरारा होता. फुललेल्या तळणीच्या कुरडई प्रमाणे भासणारा त्यांचा गोरापान वर्ण. मुळची काळीभोर पण वयोमानाप्रमाणे शेवया प्रमाणे पांढरी पडलेली त्यांची शीखा. गुळाच्या पिवळ्या रंगाशी स्पर्धा करणारे त्यांचे याद्नोपवीत, कुण्या दानशूर यजमानाने बहाल केलेलं मोरपंखी रंगाचं सोवळं, ह्या सगळ्या भरभक्कम ऐश्वर्यावर कोणाची नजरही पडणार नाही अशी त्यांची शरीर संपदा होती. हनुवटीच्या खाली मानेचे जेमतेम अस्तित्व जाणवते ना जाणवते तोच तेथून सुरु झालेले त्यांचे दोंद पार नाभीच्या खाली पोचूनही वर दशांगुळे उरत असे. वर अजस्त्र मुद्गालाप्रमाणे भासणारे त्याचे स्थूल हात-पाय आणि या सर्व पसाऱ्यात रुतलेलं त्यांचं तांबड्या भोपळ्या प्रमाणे भासणारं शीर, हा सगळा अवतारच सदावर्तवाल्यांच्या उरात धडकी भरवत असे. अनेक लहान मोठ्या मनसबदारांच्या भटाराखान्यातील रिकाम्या पात्रांचा केविलवाणा किणकिणाट त्या अळूच्या पानाप्रमाणे विशाल भासणाऱ्या कानांनी ऐकला होता. एका बैठकीत पंचवीस मोठे द्रोण बासुंदी, परातीच्या आकाराच्या बत्तीस पुरणपोळ्या आणि बुंदीचे सव्वीस लाडू हे एकदा त्यांनी मूळ पंगत संपल्यानंतर मुखशुद्धी म्हणून खाल्ले होते. मुख्य पन्गातीचा तपशील बाहेर पडू द्यायचा नाही आशी नरहरी भट्टांची सख्त ताकीद होती. परंतु जाणकार यजमानांच्या चेहऱ्यावरील काकूळतिचे भाव पाहून जिन्नस बरोब्बर हेरत असत. नरहरी भट्टांनी ताक माग्वेपर्यंत काही यजमानांना धीर नसायचा. एकदा का ते भाताचे तीन ढीग संपले की मग भट्टांच्या हातावर पाणी पडायचं आणि यजमान निश्वास टाकायचे. असे हे नरहरी भट्ट एकमताने कोकणपक्षाचे प्रतिनिधी ठरले आणि निकालाबद्दल त्या गोटात खात्री पसरली.

ही परिस्थिती देशावरील विप्रवारांना माहित होती, अशी स्पर्धा मान्य केली म्हणून अनेकांनी महादेव भटांना खाजगीत आपली नापसंतीही कळवली होती. नरहरीला सामोरं जायचं म्हणाल्यावरच अनेकांना घाम फुटला . तरीही महादेवराव निश्चिंत होते. त्याचा नजरेत असेक एक मातब्बर रुचीवर्य होते. मुळचे त्रीयम्बकातले श्रीधरपंत हे विशेष मोठा प्रस्थ नव्हतं सिंहस्थातील सदावर्त सोडली तर ते विशेष कुठे प्रवास करत नसत. त्यांच्या येण्याने यजमानांच्या कपाळावर आठ्याही पडत नसत. मुळातच दोन मोठे मुसळ सलग ठेवल्यावर होईल तेवढी त्यांची उंची, काहीसा गव्हाळ परंतु तेजस्वी वर्ण , रामादासिप्रमाणे राखलेली त्याची दाढी आणि रोखलेली नजर अशी त्यांची मूर्ती चेहऱ्यावर विल्सणाऱ्या हास्यामुळे फारच मैत्रीपूर्ण वाटत असे. त्यांचं एका पंगतीतील जेवणही बेताचंच नसलं तरी कोणाच्या नजरेस न येणारं. असं असूनही महादेवरावांना त्यांच्या बद्दल खात्री होती कारण अशा ८-९ पंगती श्रीधरपंत एका दिवसात आटोपित असत!! कुठे ३४ ओघरळी श्रीखंड पचवतील तर कुठे तीसेक मांड्यांचा फडशा पडतील. ३-४ वेळा मसालेभाताची परात रिकामी करूनही साधारण तासाभरात तेव्हडाच वरण भातही संपवतील. अशी चौफेर भोजनाची फैर झडली की त्यांच्या चेहऱ्या वरील हसू अजूनच तेजस्वी दिसत असे. मुळातच प्रवासाचा कंटाळा असूनही केवळ महादेवारावांच्या मर्जी खातर ते कराड पर्यंतचा प्रवास करण्यास सज्ज झाले. एवढ्या लांबच्या प्रवासात काही त्रास होऊ नये म्हणून अगाश्यांनी खास पालखीची व्यवस्था आणि वाटेतील गावांत उत्तम सोय करून दिली होती.

हा सर्व खटाटोप चालू असताना कराडला भोजनाची व्यवस्था हि जोरात चालू होती. मूळ स्पर्धे बरोबरच दानशूर यजमानांनी विजेत्यास चांदीची पोह्ची देण्याचीही तयारी केली होती. पंगतीच्या दिवस आला आणि संपूर्ण वाडा सांडगे कुरडयांच्या तळणीच्या सुवासाने भरून गेला. गणेश जयंतीचे औचित्य साधून मोदकांचा मुख्य बेत होता. ह्याबरोबर मसालेभात, अंबाडीची ओली, कारल्याची कोरडी अशा भाज्या ह्याच बरोबर अनेक अनवट कोशिंबिरी, लोणची आणि खुसखुशीत भजे अशा सात्विक पदार्थांची रेलचेल होती. दोन अजस्त्र रांजणात ताकावर आले आणि कोकमची रुचकर चव चढवायची तयारी चालू होती. सोनापिवळं वरण, जून आंबेमोहर भात, नारळ व गुळाचं वाफावणार सारण आणि सर्व भाजांचा मिळून एक आत्यंतिक आल्हादायक असा सुवास आसमंतात भरून राहिला होता. आधी ठरवलेल्या गुप्तते मुळे खाशांना सोडून फारच कमी लोकांना आमंत्रण होतं. सर्व मंडळी जमली. नवीन सरावलेल्या ओसरी वर सुंदर रांगोळी काढून आणि पाट मांडून पंगतीची सिद्धता झाली. नरहरी आणि श्रीधर पंता बरोबर सर्व ब्राम्हणांनी हातात आपोष्णी घेऊन मंत्र पुटपुटायला सुरुवात केली.
पंगतीला सुरुवात झाली. त्रिसुपर्ण संपवून लोकांनी पहिला घास घेई पर्यंत अगश्यांच्या वाड्यातील नुकतीच मुंज झालेल्या लहान मुलांनी श्लोकांचा धडाका लावला. वेद पुराणातील श्लोकांपासून वामन पंडितांच्या सुमधुर रचनापर्यंत श्लोकांचे तार स्वरात गायन झाले. अगशांचा नातू शांताराम याने गायनात पुढाकार घेऊन घरातील संस्कारांचे प्रात्यक्षिक दाखवले.

पंगतीच्या सुरुवातीलाच, मल्लांनी हाप - हूप करून दंड बैठका काढाव्यात त्या प्रमाणे सर्वांनी आपापल्या घशाला ओलावा यावा म्हणून पोळ्या आणि प्रसादच्या म्हणून केलेल्या खिरीवर ताव मारण्यास सुरुवात केली. सौभाग्यवती गोदावरी बाईंनी जातीने लक्ष घालून अत्यंत सुग्रास जेवणाचा बेत केला होता. कित्येकांची क्षुधा वासावारच चेकाळत होती. नरहरी भट्ट सुरुवातीपासूनच आघाडी घ्याच्या मिषाने चपचप करून खिरचे सात आठ द्रोण संपवले पोळ्या वाढणारा सेवक परात मोकळी झाल्याने वेगाने भटार खान्याच्या दिशेने पळाला. तो परत येई पर्यंत नरहरीने भाताचे ५-६ मुटके लीलया मटकावले. अगश्यांनी बाका प्रसंग लक्षात घेऊन आणखी २-३ वाढपी कामाला लावले. पोळ्यांचा राबता सुरळीत झाल्यावर नरहरीने आपला मोर्चा कार्ल्याच्या भाजी कडे वळवला. अनेक जाणकारांनी याला रुचीनैपुण्याचे एक अजोड उदाहरण मानून त्यांची स्तुती करावयास सुरुवात केली. नरहरीचा धडाका पाहून बगंभटांच्या तोंडावर स्मित विलसू लागले.

श्रीधर पंत मात्र अत्यंत संयमाने जेवत होते खिरीचे ४-५ द्रोण संपवून त्यांनी सरळ मसाले भाताला हात घातला त्यावर भरपूर तूप वाढून घेऊन त्यांनी स्वयंपाक्याच्या प्रत्येक खेपेस एक प्रमाणे तीनदा पातेलं भर भात संपवला. वर शुभ्र भात घेऊन त्यावर साग्रसंगीत अंबाडीची भाजी ओतून घेली आणि झकास भुर्के मारत तो ढीग संपवला. नैवेद्याचे ४-५ मोदकही तुपाच्या धारेखाली धरून घशाखाली उतरवले. एकूणच स्पर्धेचं निकाल काय लागेल याबद्दल अंदाज येणं कठीण होऊन बसलं होतं.

हळू हळू एक एक विप्रवर 'अन्नदाता सुखी भव' म्हणत आपापल्या पानावरून उठू लागले. या आगळ्या वेगळ्या स्पर्धेत आपणही थोडी कीर्ती मिळवावी या हेतूने आलेले सर्व ब्राम्हण निराश झाले. कारण अन्न घशाशी येऊन ढेकर देऊन बाजूला पाहतात तो दोनही द्विजोत्तामांच अगदी तालात जेवण चालू होतं. उठणाऱ्या एकेक मनुष्याकडे पाहताना नरहरीच्या डोळ्यातील छद्मी भाव सर्वांना दिसत होते. अखेर ८-९ घटीकांनंतर केवळ दोनच भोजन पटू शिल्लक राहिले आणि ते म्हणजे नरहरी आणि श्रीधर!

निर्णायक वेळ पाहून नरहरीने आग्यावेताळाप्रमाणे खाण्यास सुरुवात केली दोन वाढपी सतत त्यांच्या आजूबाजूला दिसत होते. अनेक मोदक फस्त करूनही तो तेवढ्याच धडाक्यात भाताच्या उन्ड्याही संपवत होता. एखाद्या सराईत गोलंदाजाप्रमाणे तो अत्यंत लायीत भाताचे भुर्के मारत होता. आता हा कुंभकर्ण अगशांचे घरच फस्त करील अशी शंका येऊ लागली. श्रीधारपंत मात्र अत्यंत शांत चित्ताने आणि रुची प्रीयतेने भोजन करीत होते. ताक भाताबरोबर लिंबाचे लोणचे आणि पानातील उरलेले पदार्थ कालवून ते खात असताना त्यांचे भोजन संपले अशी शंका अनेकांना आली, पण पान स्वत्च्छ करून ते पुन्हा एकदा नवीन पानावर बसावं त्याप्रमाणे जेऊ लागले. त्यांचे हे भोजन पटुत्व पाहून सर्वांच्या चेहऱ्यावर समाधानाची मुद्रा प्रकटली.

इकडे नरहरी एका घासत आता समोरची पत्रावळ ही संपवतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली. अत्यंत अधाशी पणाने आणि विशेष चावाण्याचेही कष्ट न घेता केलेल्या भोजनाने आपला प्रताप नरहरीवर दाखवावयास सुरुवात केली. त्याला अन्न जाईना तरी जिंकायच्या ईर्षेने तो अन्न रिचवत राहिला आणि शेवटी व्हायचे तेच झाले. हातात एकाच वेळी घेतलेले चार चार भाजे त्याने तोडत कोंबले आणि ते घशाखाली ढकलताच 'ख्ख्खः' असा आवाज झाला नरहरीचे डोळे उर्ध्व लागल्या प्रमाणे वरती गेले आणि त्यच्या तोंडातील ऐवज बाहेर उडाला. त्याने शुद्धी वर येऊन पाण्याचा पेला उचले पर्यंत त्याला भयंकर उचकी लागली. अशात पुढे खाण्याचा प्रश्नच उरला नव्हता. त्राण गाळलेल्या वीरा प्रमाणे तो उठायचा प्रयत्न करू लागला पण त्याला उठायचे ही बळ उरले नव्हते. शेवटी २-३ रखवालदरांनी त्याला काखे खाली हात घालून वर उचलला आणि आत घेऊन गेले.

झाल्या प्रकाराने सर्व लोक चकित झाले आणि काही वेळ कोणीच काही हालचाल केली नाही. तेवढ्यात 'पंतsss, कोशिंबीर पाहू जराsss' अशी हाक आली आणि सर्व जण भानावर आले. श्रीधरपंतांचे भोजन अजून उरकले नव्हते. ही गोष्ट लक्षात येताच देशावरील गोटात उत्साह पसरला. आता पंतांनी पंगतीचा ताबा घेतला एका वाढप्यास कारल्याची भाजी आणि दुसरयास पोळ्या आणायची सूचना करून ते पानातील नुकत्याच वाढलेल्या कोशिम्बिरीवर तुटून पडले. शांतारामाने 'हरीच्या ss घरी ss' सुरु केले आणि पाठोपाठ भाजीचे पातेले घेऊन वाढपी आला. श्रीधर पंतांनी आपल्याच हाताने भाजी निपटून तिचे शेवटचे शीतही पानात घेतले आणि तुपाने माखलेल्या पोळी समवेत संपवून टाकले. दिग्विजयी राजाने मुलुख काबीज करावा, त्या प्रमाणे त्यांनी एकेक पदर्थ काबीज करण्याचा सपाटा लावला. कारल्याची भाजी संपली, खिरीच्या पत्राचा तळ दिसू लागला, मसाले भातात खर्पुडीचे प्रमाण उत्तरोत्तर वाढू लागले, भाजांचा रंग अधिकाधिक गडद होऊ लागला. इतकेच काय तर तुपातही बेरीचे तरंगणारे कण जास्त दिसू लागले. रिकाम्या पात्रांचा आवाज ऐकून आगाशे मुदपाकखान्याकडे वळले. आणि केलेल्या निरीक्षणात स्वयंपाक्यांनी स्वतः साठी काढून ठेवलेली मोदकाची एक रास त्यान त्यांच्या नजरेस पडली. रागाने लालबूंद होऊन त्यांनी तो ढीग उचलून तसाच बैठकीच्या दिशेने नेला आणि सोवळं सरसावून जातीने श्रीधर पंताच्या पानात मोदक वाढू लागले. तो ढीग ही पंतानी सहजपणे संपवला एवढंच काय तर आर्ध्या मुर्ध्या उरलेल्या मोदकांचा चुरा आणि सारणही त्यांनी संपवलं. द्रोणातील ताकाचा शेवटचा घोट घेऊन .पानावर मधला बोट ठेऊन त्यांनी वर बघितलं. पलीकडील झोपाळ्यावर बसलेल्या बगं भट यांच्या कडे एक नजर टाकली. ते आ वासून पंतांचा चमत्कार पाहत होते. नजर अगशांकडे वळवली तर ते हातात पोह्ची घेऊन हात जोडून उभे होते. 'विप्रवरा, द्विजेषा !! नारायणाने जसा नारादमुनींचा आणि हनुमंताने जसा भीमाचा गर्व हरला तशीच कृपा आपणही माझ्यावर केलीत, या उप्पर आपले भोजन पूर्ण करण्यासाठी माझ्या कडे काही नाही तेव्हा आम्हास क्षमा करावी' असे म्हणून त्यांनी पंतांपुढे सपशेल दंडवत घातले. 'उठा ss, आगाशे उठा, इतके सुग्रास जेवण आणि इतक्या मोठ्या प्रमाणावर अन्नदान करणारे सावकार जोवर या मुलुखात आहेत तोवर इथे पुण्याची कधीच कमतरता भासणार नाही. आमचे भोजन उरकले आहे.. अन्नदाता सुखीभव' शेवटचा आशीर्वाद देताना त्यांनी आपले हात पालथे पसरले.

देशावरील विप्रांच्या गोटात आनंदी आनंद पसरला. पंगतीचा मान हा देशावरील ब्राह्मणानपाशीच राहिला. परंतु मुलुखाची विभागणी झाली आणि सर्व विप्रवार्गात आनंद पसरला. भोजन महर्षी अशी पदवी मिरवणाऱ्या नरहरीची सद्दी संपली. परंतु पूर्ण मुलुखात प्रसिद्ध होऊनही श्रीधरपंत परत त्रयम्बाकास निघून गेले आणि आमरण तेथेच राहिले.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

Omg !

एकुणात पेशवाई भोजनाआवळीमुळे (अनेकवचनासाठी ळ वर अनुस्वार द्यायचा आहे, पण जमत नाहीए) लयास गेली म्हणतात ते खरंच असावं. मला फार खाणं पाहिलं तरी खाण्याची इच्छा कमी होते किंवा फार चवीचवीने खाण्याच्या गप्पा मारणारी व्यक्ती अगदी मनातून उतरते. इथे तर इतकं खाण्याचं वर्णन, ते अगदी disgusting वाटलं. शेवटी उलटी येण्याइतकं खायचं म्हणजे किती जंगली वागणं.

असा दुसर्याचा लेख परवानगी न घेता कॉपीपेस्ट केला तर चालते का?

लेख वाचला नाही पण
> मला फार खाणं पाहिलं तरी खाण्याची इच्छा कमी होते किंवा फार चवीचवीने खाण्याच्या गप्पा मारणारी व्यक्ती अगदी मनातून उतरते. इ > +१

प्रेमचन्द यान्ची एक कथा पण अशीच आहे आता नाव नाही आठवत. त्याच्यात पण दोन पन्डीतान्ची कथा आहे... छान वर्णन केलय...

असा दुसर्याचा लेख परवानगी न घेता कॉपीपेस्ट केला तर चालते का?
>>>
+111111

लेख वाचला नाही पण
> मला फार खाणं पाहिलं तरी खाण्याची इच्छा कमी होते किंवा फार चवीचवीने खाण्याच्या गप्पा मारणारी व्यक्ती अगदी मनातून उतरते.
>>>+1111111

अतिशय सुंदर वर्णन केलेय.

पण वाचताना सतत कसे काय इतके खाऊ शकतात व का इतके खावे हा प्रश्न मनात येत राहतो.