पालकांची भूमिका कठीण आहे (2)

Submitted by मंगला मराठे on 27 October, 2018 - 21:53

लग्नाचा क्लास - ५
पालकांची भूमिका कठीण आहे.(२) ले. मंगला मराठे
लग्न ठरवताना प्रत्येक बाबतीत मुलांशी बोलावे, अगदी स्थळ बघायच्या सुरवातीपासून हे पालकांना पटले तरी ती गोष्ट त्यांच्यासाठी तितकी सोपी नसते. कारण साधारण पणे हा संवाद असा असतो --
“आई हे कसले रुमाल आणलेस ग ?” अजय आईवर वैतागला.
“काय झाल; चांगल्या क्वालिटीचे तर आहेत.”
“चांगल्या क्वालिटीचे आहेत ग. पण नॉट ऑफ माय स्टाइल. मला नकोत हे. हयांच तू काहीतरी करून टाक. नाहीतर बाबांना देऊन टाक.”
“रूमलांचे सोडा. छोटी गोष्ट आहे ती. काल फॉर्म आणलाय तो आधी भरूया.” अजयच्या बाबांनी बोलणे मायक्रो लेवलवरून मॅक्रो लेवलवर नेली.
“ए आई असली झेंगटं माझ्या मागे लावू नका. ते तुमचं तुम्ही बघून घ्या.”
“अरे पण लग्न तुला करायचं आहे. तुला कशी मुलगी पाहिजे याचा काही विचार करशील की नाही?”
“मी काही विचार केलेला नाही हो बाबा. आधी तुम्ही काय ते बघा. मग मी बघेन.”
असाच काहीसा संवाद एखाद्या मुलीच्या घरातही एकू येतो.
“ पूजा तो विवाह मंडळाचा फॉर्म आणलाय तो भरायचा आहे न?”
“ ए आई मला इतक्यात लग्न करायचे नाही. तू आताच कसले फॉर्म भरायला लागलीस?”
“अग नाव घातल म्हणजे लगेच उद्या लग्न होणार आहे काय? तुझ्या अपेक्षा काय आहेत? “
“मी इतका विचार केला नाही ग. पण मला इथलाच पाहिजे आणि कसली कटकट नाही पाहिजे. बाकी तू आणि बाबा काय ते बघा.”
जवळ जवळ प्रत्येक घरात असा संवाद होतो. लग्नाच्या बोलण्याची खरी सुरवात हीच आहे आहे. रूढ अर्थाने ‘लग्नाची बोलणी’ म्हणजे लग्नाची बैठक. दोन्हीकडची वडीलधारी मंडळी बसतात; देणे-घेणे, मानपान, जेवणाचा मेनू,खर्च वगैरे तपशील ठरवितात. हा लग्न सोहळ्यातला व्यवहार झाला. नियोजन म्हणूया. एकेकाळी हा व्यवहारच महत्वाचा होता. वधूवरांच्या पसंतीला आणि मतांना तिथे जागा नव्हती. काळाबरोबर मुलामुलींच्या पसंतीला महत्व आले. त्यांच्या अपेक्षा विचारात घ्याव्यात असे पालकांना वाटू लागले.
मुलांची अपेक्षा पूर्ण करणारे स्थळ शोधायचे असे पालकांना वाटते आणि आपल्या मनासारखा जोडीदार मिळावा असे मुलांना वाटते. अडचण एकच आहे. या अपेक्षा ठरवायच्या कशा? पडताळून कशा पहायच्या? त्यातल्या वास्तव किती? स्वप्नातल्या किती? या प्रश्नांची उत्तरे माहीत नसतात. कारण घरात यावर संवाद चर्चा होत नाही. आपल्याकडे घरातली माणसे एकमेकांशी जरा कमीच बोलतात,
प्रत्येकजण आपापली कामे आटपण्याच्या मागे असतो. त्यातून जे बोलणे होते ते क्रिकेटवर होते, राजकरणावर होते, इतर माणसांबद्दल होते. लग्न हा विषय बोलण्यात नसतो. मुलांनी गांभिर्याने विचार केलेला नसतो. पालकांना वाटते मुल उडवाउडवीची उत्तरे देतात. संवादाला सुरवात कुठून कशी करायची हा एक प्रश्न असतो. या प्रश्नाचे उत्तर आहे वधूवर मंडळाचा फॉर्म. वधूवर मंडळाचा फॉर्म भरणे ही या बोलण्याची छान सुरवात होऊ शकते. हा फॉर्म पालकांनी आणि मुलांनी एकत्र बसून भरावा.
अजयच्या बाबांनी बरोबर तेच केले.
“ चला तो फॉर्म भरूया.” बाबांच्या आवाजातला ठामपणा अजयला जाणवला. तो खरच फॉर्म भरायला बसला. पहिली प्राथमिक माहिती म्हणजे नाव, पत्ता, शिक्षण,पगार,ऊंची रकाने भरले आणि “झाला भरून!” म्हणून उठला.
बाबा म्हणाले, “ अरे हे तुला ओळखणारे कोणीही लिहील. महत्वाचे तर पुढेच आहे. वधुबद्दलच्या अपेक्षा. कशी बायको हवी तुला?”
“ते अस कस सांगणार? पाहिल्यावर आवडेल न कोणीतरी.”
“सोन्या अरे अस कुणाशीतरी लग्न करायचे नसते. फॉर्म मधल्या प्रत्येक कॉलमचा नीट विचार कर. हे बघ. वधूबाबत अपेक्षा – सांग रंग कसा हवा? गोरा,काळा की सावळा?”
“गोरी हवी.”
“ठीक! ऊंची?”
“पाच एक, पाच दोन, पाच तीन काहीही चालेल. पण बाबा तिला गाण्याची आवड असली पाहिजे. औरंगजेबी निघाली तर मी मेलो.’’
“बरोबर, आता तू खरा विचार करायला लागलास. आता अस बघ एक मुलगी आहे गोरी आहे उंच आहे. पण संगीतातले काही गम्य नाही, दुसरी आहे ती काळीसावळी आहे किंवा बुटकी आहे पण संगीताचे मर्म जाणणारी आहे. दोघींपैकी कोणाची निवड करशील? तुझी प्रायोरिटी कशाला राहील?” बाबांच्या बोलण्याने अजय गंभीर झाला.
घरोघरी असे अजय आणि अशा पुजा दिसतात. पण अजयच्या पालकांसारखे पालक मात्र अगदी क्वचित दिसतात. मुलाचे / मुलीचे लग्नाचे वय झाले की पालक उत्साहाने मंडळांमधे, संकेत स्थळांवर मुलांची नावे नोंदवितात. मंडळात पालक एकटेच येतात; तिथल्या तिथेच फॉर्म भरून टाकतात. फॉर्मवरचे प्राथमिक रकाने पटापट भरून टाकतात. अपेक्षा लिहिताना क्षणभर अडखळतात. तशा काही फार अपेक्षा नाहीत. असे म्हणतात. मुलांचे पालक लिहितात ‘मनमिळाऊ, समंजस, कुटुंबात रमणारी हवी.’ मुलींचे पालक लिहितात ‘निर्व्यसनी, समजून घेणारा,मनमिळावू असावा.’ ही विधाने म्हटले तर बिनबुडाची म्हटले तर सर्वसमावेषक अशी आहेत. मात्र त्यातून निश्चित काही बोधही होत नाही. आता तुम्ही विचाराल स्थळ म्हणजे काय फर्निचर आहे का डायमेंशन्स मोजून घ्यायला? नक्कीच नाही. पण प्रत्येक व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला काही कंगोरे असतात. ते आपल्याला खटकणारे आपल्या परस्पर विरोधी नाहीत हे तर बघायला हवे. दोघांच्या प्राथमिकता परस्पर विरोधी असून चालणार नाही. त्यांचा मेळ बसतो की नाही हे पडताळून बघायला हवे. आवडी निवडी, छंद, श्रद्धा, विचारसरणी असे अनेक कंगोरे असतात. जे तपासून पाहिले नाही तर टोचत राहतात. त्यासाठी आपल्या प्राथमिकता स्वत:ला माहीत हव्या. म्हणून हे बोलणे व्हायला हवे. लग्नाची बोलणी इथपासूनच सुरुं होतात.
ही बोलणी होत नाहीत कारण दोन वचनांवर आपण पूर्ण भिस्त टाकतो. एक म्हणजे पाण्यात पडले की पोहता येते. आणि दुसरे जमवून घ्यायचे मनात असले तर काहीही जमवून घेता येते. पाण्यात पडल्यावर पोहता येत असते तर माणसे बुडून मेली नसती. पाण्यात उतरण्यापूर्वी पाण्याचा अंदाज घ्यावा लागतो. पाण्याची खोली, ओढ आणि आपली पोहण्याची क्षमता याचा मेळ घालावा लागतो. दुसरी गोष्ट जमवून घेण्याची. काहीही जमवून घ्यायचे म्हणजे एकाने कुणीतरी आपल्या काही गोष्टी नाईलाजाने, जबरदस्तीने आपल्या आयुष्यातून काढून टाकायच्या. जे आहे ते मान्य करून त्यातच समाधान मानून रहायचे. हे काही सहजीवन नव्हे. सहजीवनासाठी सूर जुळायला हवेत. अटी घालून, ‘ लग्नाआधीच हे स्पष्ट सांगितले होते.’ असा सूर लावून सहजीवन होत नाही, त्याने फक्त लग्न टिकते. भविष्यातल्या सुसंवादासाठी आज हा संवाद गरजेचा आहे. फक्त आपल्या मुलांशीच नाही तर दोन्ही कुटुंबाचा एकमेकांशी संवाद होणे गरजेचे आहे. हीच तर लग्नाची खरी बोलणी आहेत.
हा स्वत: स्वत:साठी चालवलेला लग्नाचा क्लास आहे.
==================================================================================

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अतिशय मार्मिक लिहिलेय.
आधीच्या भागाची लिंक लेखाच्या सुरुवातीस देता आली तर बरे होईल.

चांगली चालली आहे लेखमाला.

मागे एकदा इथे विद्या भुतकरांची एक चांगली कथा आली होती. एक प्रियकर-प्रेयसी घरून परवानगी मिळावी म्हणून ' अॅरेंज मॅरेज' चं नाटक रचतात, लग्न ठरतंही, पण त्या मानपानांमधे आणि औपचारिकतेच्या सोपस्कारांमधे त्यांच्या प्रेमाचं भजं होतं आणि तेच लग्न मोडतात Happy
प्रेम वेगळं आणि लग्न वेगळं. हेच वरचे अजय आणि पूजा, जर प्रेमात पडले तर विचार करतातच ना, की काळ्या-गोऱ्या रंगापेक्षा स्वभाव आणि आवडनिवड महत्त्वाची. पण अॅरेंज मॅरेज हा जवळजवळ व्यवहारच असल्याने तो पालकांना जास्त चांगला जमेल असं त्यांना वाटत असेल.

वावे +123456
अनेक मित्रमैत्रिणी उदाहरण देतात की आम्ही कसं केलं पण ते हे विसरतात की ते प्रेमात पडले होते आणि त्यांना ती एकच व्यक्ती दिसत होती. जेव्हा हजारो प्रोफाईल समोर असतात तेव्हा फायद्याचा आणि बाह्यरूपाचा विचार जास्त केला जातो. नव्वद टक्के पालकच मुलांचे प्रोफाईल हाताळतात आणि समजूतदार, नीट व्यवस्थित बोलणारे, समोरच्याला आदर देणारे अगदी कमी असतात. मुलीवर चांगले संस्कार आहेत का, तिचं वजन किती, उंचीच्या मानाने वजन जास्त वाटते, पगार ईतकाच का, शिक्षणाचा फायदा काय जर पगार ईतका कमी आहे असे कैच्याकैै तारे फोनवर तोडणारे महान पालक बरेच असतात.

पण मॅडम तुम्ही सर्व मुलामुलींचे लग्ने लावाय चा अट्टहास का घेतला आहे? एकदा शिक्षण दिले पीजी झाले नोकरी मिळाली की स्पेस शटलचे मोठे फ्युएल टँक्स जसे आपण हून गळून पडतात तसे पालकांनी मुलांच्या डिसिज् न मेकिन्ग प्रोसेस मधून बाहेर व्हावे. ज्याला नोकरी पे स्लिप वगैरे संभाळता येते त्या मुला/ मुलीला जीवनातले इतर सर्व व वि शेषतः लग्न करायचे/ रिलेशन शिप वगैरे चे निर्णय स्वतः घ्यायला मोकळे सोडावे.
डबा देणे आधी बंद करा. अगदीच मदत मागितली तरच पुढे व्हा. अतिरेकी हस्तक्षेप गरजेचा नाही. आर्थिक स्टॅबिलिटी, शिक्षण पूर्ण असणे
मानसिक आरोग्य हया महत्वाच्या बाबी आहेत. बाकी मुलांना घेउन्दे त्यांचे अनुभव. एखादी चुकीची रिलेशन / सम लैंगिकता- एक्स्प्लोरे शन/ मस्त एकटे राहणे हे सर्व त्यांचे त्यांने केले पाहिजे. गिव देम स्पेस. आपल्याला नातवंड देणे हे त्यांचे महत्वाचे काम नव्हे. नव्हे नव्हे.

अमा +१ Lol
सकाळपासून अगदी हेच लिहायचा विचार करत होते पण जाऊदेत म्हणलं... काय तिज्यायला २७-२८ वर्षाच्या पोरांना मुलीचा रंग कि मुलीचा कान? यातल नक्की काय, किती तिव्रतेने हवं-नको? याबद्दल पेरेंटींग टिपा द्यायलेत! (eye roll च्या भावलीची सोय करा ब्वा. फारच गरज पडू लागलीय ;))
हे असलं करायची तुम्हाला आणि तुमच्या मुलांना गरज पडत असेल तर तुम्ही पालक म्हणून फेल्युअर आहात. आणि तुमची मुलंपण तुमच्यासारखीच $%@# आहेत!

लेखिकेनं पहिल्या भागात पार्श्वभुमी मांडली आहे. ह्या केसेस मुळातच अशा आहेत जिथे ही मुलं / मुली लहानपणापासून आइ-वडिलांच्या 'hyper-care package' मधे वाढली आहेत. त्यामुळे आता २६-२७ व्या वर्षी, तुम्ही तुमचे निर्णय घ्या असं दोन्ही कडून घडत नाही. तसं तर पोस्ट ग्रॅज्युएशन लेव्हल चं शिक्षण वगैरे सुद्धा पालकांची जवाबदारी असता कामा नये. मुळात आपल्याकडे मुलं लवकर स्वतंत्रच होत नाहीत. अगदी तिशीतल्या किंवा त्याही पुढच्या मुलांना रहातं घर किंवा तद-अनुशंगानं येणार्या बाकीच्या जवाबदार्या 'घेतल्याच पाहीजेत' असं कुठलंही social structure नाही. Courting culture (ते योग्य / अयतोटे, त्याचे फायदे-तोटे हा वेगळा विषय आहे.) नाही. त्यामुळे पालकांचा हस्तक्षेप / सहभाग लग्न प्रक्रियेत असणं हे कॉमन आहे.

मराठे ताई, बहुतेकर्‍ हा लेख २० वर्षे जूना आहे..
हल्ली च्या उच्च शिक्षीत पीढीला ह्या गोष्टी सान्गाव्या लागत असतील तर कठीण आहे..

"मराठे ताई, बहुतेकर्‍ हा लेख २० वर्षे जूना आहे.." - सिरीयसली?? विवाहमंडळांचं, मॅट्रिमोनियल वेबसाईट्स चं आणी वधू-वर मेळाव्यांचं पेव वाढतच चाललय. विवाहमंडळं तर टीव्ही वरचे कार्यक्रम स्पॉन्सर करण्याइतका पैसा मिळवताहेत.

माध्यमं बदलली आहेत, मानसिकता नाही. किंबहूना अधिकाधिक प्रतिगामी होण्यात हल्ली 'संस्कृती जपण्याचा' भास असतो.

छान लिहीले आहे.

फेरफटका यांच्याशी सहमत.

अमा - त्यांचे ते प्रोफेशन आहे असे दिसते मॅचमेकिंगचे. त्यांनी लोकांना सांगितलेले नाही की तुमच्या मुलामुलींच्या लग्नात हस्तक्षेप करा Happy जे पालक त्यांच्या मुलामुलींच्या लग्नाकरता ऑलरेडी प्रयत्न करत आहेत, त्यांचे त्याबद्दलचे कौटुंबिक निर्णय त्यांनी- बहुतांश केस मधे मुलांच्या संमतीने- घेतलेले आहेत त्यांनी काय करावे याच्या टिप्स आहेत त्या.

बाकी उच्च शिक्षित वगैरे चा परिणाम फक्त अ‍ॅकेडेमिकच असतो. त्याचा सिव्हिक्स, राजकीय, सामाजिक समज वगैरेंशी काडीचा संबंध नसतो हे नेहमी दिसतेच.

बाकी उच्च शिक्षित वगैरे चा परिणाम फक्त अ‍ॅकेडेमिकच असतो. त्याचा सिव्हिक्स, राजकीय, सामाजिक समज वगैरेंशी काडीचा संबंध नसतो हे नेहमी दिसतेच.>>>
हे फक्त आणि फक्त भारतातल्या शैक्षनिक संस्थांसाठी (एका IIT phd ला स्पुन फिडिंग करुन आलेल्या अनुभवानंतरच मत)

Arranged marriages are efficient.

डबा देणं कशाला बंद करा? घरचं, कमी तेलाचं, व्यक्तिगत आवडनिवड जपलेली, (बहुतेक) ताजे म्हणून प्रकृतीला चांगले असे जेवण का बंद करायचे? त्यापेक्षा मुलांची मदत घ्या ते सकाळी-सकाळी उठून तयार करायला, त्यांना पण कळू दे किती परिश्रम असतात ते. भरायचे डबे पुसणे,भरणे, पाण्याची बाटली सगळं करायला लावायचं. भाजी चिरून देणे, फोडणीला टाकणे, कणिक भिजवणे, कुकर ही सगळी कामं तसेच मेनू प्लॅनिंग चे मुख्य काम, करायला लावायची. सगळ्यांनाच घरात छान जेवायला नाही का मिळणार !

राजसी एकदम ऍग्री. डबे भरणे, डब्यात न्यायचे सॅलड कापणे,लहान मुलांचे तिसऱ्या रिसेस चे खाऊ डबे भरणे इथपासून सुरुवात केली तरी चालेल.
मुळात झाडू पोछा भांडी याला बाया असल्या तरी बाकी घर चालवायला पण मेहनत वेळ आणि सततचे अटेंशन लागते इतके कळून अक्नॉलेज झाले तरी भरपूर.(याबद्दल 'आज किती ठिकाणी मला सोडून ड्राईव्ह करून दमलास रे सोन्या, हा घे पेपर, हा घे टीव्ही, हा घे पाय ठेवायला स्टूल' (किंवा काही समांतर कामाचा भार एकटा उचलत असल्यास )ही रिव्हर्स अक्नॉलेजमेंटही तितकीच गरजेची ☺️☺️)

मी अनु, राजसी>>+++११११११११११११ अश्या बायका /आया /आज्या / वाहिन्या /काक्वा घरोघरी निर्माण होवोत(म्हणजे हे सर्व करायला शिकवणाऱ्या / करवून घेणाऱ्या ) आणि पर्यायाने ते सर्व मुलग्यांच्यात उतरो Happy Wink
इन्कलुडींग माझा नवरा ही Wink

फा / फे + १११११११.

मला जाम आवडली सायली परांजपेंची पोस्ट.
गांधी बाईंनी कुठल्या तरी प्रसंगानंतर अत्यंत चिडून ठसक्यात पोस्ट लिहिली आहे असं जाणवतं. थोड्या शांतपणे मधले पंचेस टाळून लिहिले असते तर व्हॉटसप बरोबर फेसबुकवरही जास्त वाहवा मिळाली असती.(माझ्या डोक्यात गांधी बाईंची पूर्ण पोस्ट वाचून फक्त एक जोराचे हाआआआड!!!' आले आणि पोस्ट मेमरीतुन पुसली गेली. ☺️☺️)

फेरफटका / फा, अनु, राजसी + ११११११

मुलंपण तुमच्यासारखीच $%@# आहेत!
>>
अ‍ॅमी, काय सुंदर प्रतिसाद आहे __/\__

छान लेख. आवडला.

भारतात एक मोठा समाज आहे, जिथे आजही पालक व मुलांची इच्छा आपल्याच समाजातले जोडीदार हवेत ही असते. स्वतःच जोडीदार शोधला तरी चालेल अशा घरची मुलेही जोडीदार मिळवण्यात अयशस्वी होतात. अशांना विवाहमंडळे आधार देतात. तो तर पूर्ण व्यवहार. मग तिथे अपेक्षा स्पष्ट असणे जास्त महत्वाचे.

विवाहमंडळात गेले म्हणजे मुले व पालक @#$%^ असतात असे दरवेळी नाही. हे कुठेही भेटू शकतात.

वर ज्यांनी हे सगळे मुलांवरच सोडा म्हटलेय त्यांच्याशीही सहमत. ज्यांनी मुलांना तसे वाढवलंय किंवा मुलेच स्वतः स्वतंत्र वृत्तीची आहेत, स्वतःचे पार्टनर शोधू शकले/शकतात त्यांनी विवाहमंडळात जायची गरज नसली तरी आपल्याला काय वृत्तीचा पार्टनर हवा आहे हे त्यांच्या डोक्यात क्लिअर असायला हवे. ट्रायल व एरर पद्धतीने जोडीदार निवडता येतात पण त्यामुळे भावनिक गुंता गळ्यात पडतो. मुलांनी जोडीदार निवडले म्हणजे ते योग्यच निवडणार हे गृहितकही कुठे खरे ठरते?. ब्रेकअप झालेच नसते मग.

म्हणून जिथे आयुष्याचा प्रश्न आहे तिथे सर्व बाबी नीट बघून मगच पुढे गेलेले बरे. मग भले मुलेच स्वतःचे स्वतः ठरवो किंवा पालकांनी हस्तक्षेप करणे होवो. अतीमहत्त्वाच्या, महत्वाच्या व फारश्या महत्वाच्या नसलेल्या बाबी कोणत्या हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न/चॉईस आहे. पण जोडीदार हवा या वयात माणूस आला की कोणाशी आपले जुळेल हे डोक्यात स्पष्ट असलेले बरे.

आले का रडायला 'त्या' गटातले बालकपालक! एवढ्या भावना दुखऊन घेऊ नका. जगात सगळयाप्रकारच्या लोकांसाठी जागा आहे.

संपादन (3 hours left)
आले का रडायला 'त्या' गटातले बालकपालक! एवढ्या भावना दुखऊन घेऊ नका. जगात सगळयाप्रकारच्या लोकांसाठी जागा आहे.>>>>>

Happy Happy मला म्हटलेत का?

मी लेखात लिहिलेल्या मतावर मत व्यक्त केले. व्यक्तिगत कुणावर काही नाही. इथे कुणी रडावे व कुणी हसावे हा प्रत्येकाचा प्रश्न आहे. फक्त पर्सनल होऊ नका.

लोक इतरांवर लेबल्स का लावत फिरतात कळत नाही. Happy Happy

अ‍ॅमी, त्या लिंकवर पेज नॉट फाऊंड येतेय. चेक करणार का? किंवा कुठल्या तारखेची फेबुगिरी आहे ते सांगणार का?

नीधप,
हो पेज नॉट फाउंड येतंय Sad फेबुगिरी 31/10 ची असणार.

मी प्राजक्ता आणि सायली दोघींच्या स्टेटस इथेच कॉपीपेस्ट करायचा प्रयत्न करते थांब.

===
Prajakta Gandhi
...मुलींनो,
१.तुम्ही तुमच्या आईबापाच्या काळजाचा तुकडा असता तसा तुमचा नवराही खूप लाडाकोडात वाढलेला असतो. त्यालाही कळा देऊनच आईने जन्माला घातलेला असतो. तुम्हाला वाटतं तसं गटाराच्या बाजूने उचलून आणलेला नसतो.
२. लग्नापर्यंत तो ही शिक्षण, करिअर, मित्रपरिवार यात छान बिझी असतो. तेव्हा संसार करायचं त्याचा अनुभव तुमच्यासोबतच सुरु होतो.
३. आईबापाच्या संसारात तुमचा जितका नॉमिनल रोल असतो तितकाच त्याचाही असतो. त्याला सगळंच समजायला हवं हि अपेक्षा आणि त्याला काहीच समजत नाही हा तर्क दोन्ही अतिरेकी आहेत.
४. तुमची पाळी आल्यावर लगालगा तो तुमच्या उशापायथ्याशी बसेल, डोकं हातपाय चेपून देईल अशी अपेक्षा करु नका. लाखो मुलांना असा काही त्रास असतो हे माहित नसतं. कारण त्यांच्या आईला तो त्रास नसतो. तेव्हा गेट व्होकल. तोंड उचकटून सांगायचं, अमुक कर किंवा तमुक कर. सांगायचंही नाही आणि केलं नाही म्हणून तोंड पाडून बसायचं हे जमणार नाही.
५. नव-याची आर्थिक लायकी काढताना, आपल्या बापाने आपल्याला काय लाईफस्टाईल दिलीय ते बघावं. आपण आपल्या हिमतीवर काय करु शकतो ते आजमावावं आणि मग विषय काढावा.
६. तुम्ही जसं उंची, अनुरुपता, पगार, स्थावर जंगम इस्टेट, घरातलं स्थान बघून लग्न करता तसं तो रुप, रंग, फिगर वगैरे बघून करतो. व्यवहार आहे तो. इमोशनल व्हायची गरज नाही. तुम्ही ठोकून वाजवून लग्न करणार आणि त्याने बघताक्षणी हो म्हणावं असं होत नसतं.
७. तुम्हाला तुमची प्रिय आहे तशी त्यालाही त्याची आई प्रिय आहे. तुमच्या आईला जसा लेकीच्या संसारात इंटरेस्ट असतो तसा त्याच्या आईलाही असतो. मुलगा म्हणजे काही देवीला सोडलेलं कोकरु नव्हे, विसरुन जायला. तो मजेत आहे न, त्याला काही त्रास नाही न हे वेळोवेळी त्याचे आईबाप चेक करणारच.
८. सासूसासरे नक्कोच असतील तर अनाथ मुलाशी लग्न करावं.
९. तुम्ही तासनतास आईशी बोलणार आणि तो दहा मिनीटं बोलला कि तुमचा जळफळाट होणार हे चालणार नाही. तुम्ही यायच्या खूप आधीपासून आई आहे त्याच्या आयुष्यात. तेव्हा शांत रहा. या मुद्द्यावरुन फालतू ब्लॕकमेंलिंग नकोच.
१०. आईबरोबरच मित्र, मैत्रिणी ही त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग असणार. त्या बाबतीत अडवणूक नको.
११. दळण, लाँड्री, स्वयंपाक, आला गेला, स्वच्छता, आर्थिक बाबी, प्रवासाचं नियोजन इ.इ. बाबींत परफेक्ट नॉलेज असणाराच नवरा हवा असेल तर विधुराशी किंवा घटस्फोटीत मुलाशी लग्न करावं. त्यांना नक्कीच जास्त अनुभव असतो.
१२. आणि परत एकदा, आपलं काय म्हणणं असेल ते समोरुन सांगावं. मुलांना आईने ' मनातलं ओळखून दाखव बरं ' सारखे फालतू गेम्स शिकवलेले नसतात. आणि हो, तुमच्या आईला त्याच्याकडून मान हवा असेल तर तुम्हीही त्याच्या आईशी नीट वागा.
निवेदन संपलं.
October 24 at 8:15 AM · Public

===
Sayalee Paranjape
काही दिवसांपूर्वी माझ्या शाळेतल्या मैत्रिणींच्या व्हॉट्सअप ग्रुपवर एक पोस्ट वाचनात आली. नवऱ्यांची बाजू मांडणारं आणि मुलींना (म्हणजे त्यांच्या बायकांना) सल्ला देणारं 'निवेदन’ म्हणून. मजा आली वाचताना. अरे, हीपण दुसरी बाजू आहे तर, असं मनात येऊन गेलं. तो ग्रुप सगळा मुलींचा असल्याने एक-दोन उंचावलेले अंगठे, हसरे चेहरे यांच्या व्यतिरिक्त फारशा कमेंट्स वगैरे आल्या नाहीत. मीही तितक्याच लाइटली वाचली. मात्र, पुढच्या दोन दिवसात वेगवेगळ्या ग्रुप्सवर ती पोस्ट फिरू लागली, फेसबुकवरही कोणीतरी शेअर केलेली दिसली आणि त्यावर पुरुषांच्या गहिवरून केलेल्या कमेंट्स (अनेक बायांनाही मनापासून पटलेली वाटली) … अरेच्चा.. पुरुषांचं दु:ख जाणून घेणारी एका बाईची पोस्ट वगैरे.. वगैरे.. आपल्याला 'ईनोदी' वाटलेली पोस्ट लोक चांगलीच सिरीयसली घेताहेत असं लक्षात आल्यावर पुन्हा वाचली. लेखिकेने कदाचित विनोदानेच लिहिली असेल पण लोक ज्या सिरियसली घेताहेत ना ती ते बघून भंजाळल्यासारखं झालं. पुन्हा पोस्ट वाचताना जाणवलं की ही पोस्ट म्हणजे पुरुषमंडळींना वाटतंय तसं एका पत्नीने केलेलं आत्मपरीक्षण वगैरे अजिबात नाही. हे एका सासूने आपल्या राजकुमाराच्या दु:खाने व्याकूळ होऊन दिलेले सल्ले आहेत की काय असा प्रश्न पडतो. ‘मुलींनो’ अशी सुरुवात असली, तरी त्याचा गर्भितार्थ 'सुनांनो’ आहे की काय असा प्रश्न पडला. नाही, होत असावं असं. बायकोच्या, सुनेच्या भूमिकेत असतानाचे विचार मुलगा बोहल्यावर चढला की यू टर्न घेत असावेत. कारण, यामध्ये जे मुद्दे दिले आहेत ते काही विशिष्ट केसेसमध्ये लागू पडतही असतील पण याच्या बरोबर उलट परिस्थितीही मी अनेकदा बघितली आहे. त्यामुळे केवळ मुलींना (की सुनांना) सल्ले देताना थोडं आत्मपरीक्षण मुलांनी (आणि सासवांनीही) करावं की. जरा मुद्देवारच बघू. प्रथम या बहुप्रसृत पोस्टमधले मुद्दे आहेत आणि मग, त्याची दुसरी बाजू म्हणू हवंतर, ती आहे.
१.तुम्ही तुमच्या आईबापाच्या काळजाचा तुकडा असता तसा तुमचा नवराही खूप लाडाकोडात वाढलेला असतो. त्यालाही कळा देऊनच आईने जन्माला घातलेला असतो. तुम्हाला वाटतं तसं गटाराच्या बाजूने उचलून आणलेला नसतो.
- अगदी मान्य. पण याचा व्यत्यासही होऊ शकतो. कळा देऊन जन्माला घातलेल्या मुलीला आई परक्या घरात राहायला पाठवते, आता तेच तुझं घर वगैरे सल्लेही देते. (ते किती चूक बरोबर हा मुद्दा वेगळा). मुलगा लग्नानंतर वेगळं राहतो म्हणाला तरी इमोशनल ड्रामा होतो. तो बायकोच्या माहेरी राहायला गेला तर विचारायलाच नको. दोघांनाही आपालल्या आईवडिलांनी लाडाकोडात, खस्ता खाऊन वाढवलेलं असतं. तेव्हा दोघांनीही याची जाण ठेवावी हे उत्तम.
२. लग्नापर्यंत तोही शिक्षण, करिअर, मित्रपरिवार यात छान बिझी असतो. तेव्हा संसार करायचं त्याचा अनुभव तुमच्यासोबतच सुरू होतो.
- हाही मुद्दा उलटादेखील लागू पडणारा आहे. मुलीने करिअर वगैरे कितीही केलं तरी घरात लक्ष दिलंच पाहिजे, नवऱ्याच्या आवडीनिवडी सांभाळल्या तर कित्ती छान अशा अपेक्षा असतातच ना. मुलांनी लग्नानंतर घराची जबाबदारी बरोबरीने उचलावी अशी अपेक्षा आत्ता कुठे थोडी व्यक्त व्हायला लागली आहे, तर लगेच त्यांच्या रक्षणासाठी ढाल घेऊन धावायची मुळीच गरज नाही. मुळात मुलींच्या आया जशा मुलींना थोडंफार तयार करतात घरकांमासाठी तशी मुलांच्या आई-वडिलांनीही थोडी पूर्वतयारी करून घ्यायला हरकत नाही. म्हणजे त्याला बायकोचा खऱ्या अर्थाने पार्टनर होणं जड जाणार नाही. आपल्यापेक्षा घरकामाचा थोडासाच जास्त अनुभव असलेल्या आणि वयाने आपल्याच एवढ्या, बरेचदा लहान असलेल्या बायकोकडून हे धडे घ्यावे लागण्यापेक्षा आईने दिलेले कधीही उत्तम. विचार करून बघा.
३. आईबापाच्या संसारात तुमचा जितका नॉमिनल रोल असतो तितकाच त्याचाही असतो. त्याला सगळंच समजायला हवं ही अपेक्षा आणि त्याला काहीच समजत नाही हा तर्क दोन्ही अतिरेकी आहेत.
- पुन्हा तेच. या अपेक्षा आणि तर्क दुसऱ्या बाजूने सतत होतच आले आहेत. याचा अर्थ मुलींना ते करायचं लायसन्स आहे असं अजिबात नाही पण या अपेक्षेच्या आणि तर्काच्या बळी मुलीच अधिक वेळा असतात. नवा नवरा तरी फक्त बायकोच्या सो कॉल्ड अतिरेकी अपेक्षा आणि तर्कांना बळी पडत असेल (तरी तो किती किती बिच्चारा नाही) पण मुलीकडून अपेक्षा करण्यासाठी नवरा, सासू-सासरे वगैरे फौज तयार असते.
४. तुमची पाळी आल्यावर लगालगा तो तुमच्या उशापायथ्याशी बसेल, डोकं हातपाय चेपून देईल अशी अपेक्षा करु नका. लाखो मुलांना असा काही त्रास असतो हे माहित नसतं. कारण त्यांच्या आईला तो त्रास नसतो. तेव्हा गेट व्होकल. तोंड उचकटून सांगायचं, अमुक कर किंवा तमुक कर. सांगायचंही नाही आणि केलं नाही म्हणून तोंड पाडून बसायचं हे जमणार नाही.
- हे मुलाला सांगू द्या की. म्हणू द्या त्याला, बाई गं, मला पाळी येत नाही. त्यात काय त्रास होतो ते माझ्या आईने मला समजावलंच नाही. तेव्हा प्लीज तुला काय त्रास होतोय ते मला सांग. मग मी लागेल ते सग्गळं करतो. लेट हिम बी व्होकल. आणि त्याला जरा संवेदनशील करण्यासाठीही करावेत त्याच्या आईने प्रयत्न. बाकी सगळं समजतं तर हे कसं समजत नाही. पाळी नाही आली तरी पोट-पाय वेगळ्या कारणाने दुखलंच नाही का कधी त्याचं? त्यावेळची मानसिक स्थिती वगैरे त्याला माहीत नसते हा दोष फक्त बायकोचा का? त्याला फक्त 'मुलगा' म्हणूनच वाढवण्याचे परिणाम आहेत हे. ते मुलींनीच भोगायचे का?
५. नवऱ्याची आर्थिक लायकी काढताना, आपल्या बापाने आपल्याला काय लाईफस्टाईल दिलीय ते बघावं. आपण आपल्या हिमतीवर काय करु शकतो ते आजमावावं आणि मग विषय काढावा.
- एकतर कोणतीही मॅच्युअर, समंजस मुलगी नवऱ्याची आर्थिक लायकी वगैरे काढत नाही. हे उदाहरण एखाद्या विशिष्ट केसमधलं वाटतंय. म्हणजे तिने त्याची आर्थिक लायकी काढणं, त्यावरून तिचा 'बाप' काढला जाणं वगैरे. सुसंस्कृत लोक नाही वागत असं. पुढचा मुद्दा स्वत:च्या हिमतीवर आजमावून बघणं वगैरे, तर तेही मुली करताहेत आज सर्रास आणि स्वत:ला साधा कुकर लावता येत नसून बायकोच्या स्वयंपाकातल्या खोडी काढणारे नवरेही दिसतात ना आजूबाजूला. हा मुद्दा त्यांना लागू नाही पडत?
६. तुम्ही जसं उंची, अनुरुपता, पगार, स्थावर जंगम इस्टेट, घरातलं स्थान बघून लग्न करता तसं तो रुप, रंग, फिगर वगैरे बघून करतो. व्यवहार आहे तो. इमोशनल व्हायची गरज नाही. तुम्ही ठोकून वाजवून लग्न करणार आणि त्याने बघताक्षणी हो म्हणावं असं होत नसतं.
- अशी अपेक्षा नसते, वर म्हटलं तशा नॉर्मल, मॅच्युअर मुलींची. हाही मुद्दा एखाद्या विशिष्ट केसला लागू पडणारा वाटतो.
७. तुम्हाला तुमची प्रिय आहे तशी त्यालाही त्याची आई प्रिय आहे. तुमच्या आईला जसा लेकीच्या संसारात इंटरेस्ट असतो तसा त्याच्या आईलाही असतो. मुलगा म्हणजे काही देवीला सोडलेलं कोकरु नव्हे, विसरुन जायला. तो मजेत आहे न, त्याला काही त्रास नाही न हे वेळोवेळी त्याचे आईबाप चेक करणारच.
- याचा व्यत्यास जास्त कॉमन आहे. मुलीच्या आईने तिच्या संसारात रस घेतला तर ती ढवळाढवळ आणि मुलाच्या आईचा तो हक्कच, कारण ती त्या घरचीच ना, अशा तोऱ्यात वावरणारेच खूप असतात. तात्पर्य, दोन्ही आईवडिलांनी मुलांच्या संसारात डोकं घालू नये. आपला मुलगा आणि आपली मुलगी सुखात आहे हे थोड्या सट्ल मार्गाने बघत राहायला (चेक करू नका हो, तुम्ही डॉक्टर, शिक्षक, पोलिस नाही आहात, तसे झालात तर मुलांच्या संसारांचे बॅण्ड वाजण्याची शक्यता जास्त) काहीच हरकत नाही.
८. सासूसासरे नक्कोच असतील तर अनाथ मुलाशी लग्न करावं.
- सासूसासरे आता आपल्या कुटुंबाचा भाग आहेत हे लग्नानंतर मुलींनी आणि मुलांनी दोघांनी स्वीकारलं पाहिजे. मुळात मुली ते जास्त प्रमाणात स्वीकारतात, कारण, आपली कुटुंबव्यवस्था तशीच आहे. त्याचप्रमाणे या व्यवस्थेत कालानुरूप होणारे बदल सासूसासऱ्यांनीह
ी स्वीकारले पाहिजेत. मुळात आपण इतके 'नक्को’ का आहोत याचाही करावा ना कधीतरी विचार.
९. तुम्ही तासनतास आईशी बोलणार आणि तो दहा मिनीटं बोलला की तुमचा जळफळाट होणार हे चालणार नाही. तुम्ही यायच्या खूप आधीपासून आई आहे त्याच्या आयुष्यात. तेव्हा शांत रहा. या मुद्द्यावरुन फालतू ब्लॅकमेंलिंग नकोच.
- यातही दोन्ही बाजू आहेत. आपल्याला आपली आई जशी प्रिय तशी त्यालाही असणार हे मुलींनी समजून घ्यावं पण मी तुझ्याआधीपासून त्याच्या आयुष्यात आहे असा तोरा मिरवायचं काम नाही. नाहीतर, 'मी तुमच्यानंतर खूप काळ राहणार आहे त्याच्या आयुष्यात' असं उत्तर ऐकण्याची तयारी ठेवा आणि ते सत्यही आहेच ना. इमोशनल अत्याचार दोन्ही बाजूंनी कमी झाले तर बरंच आहे.
१०. आईबरोबरच मित्र, मैत्रिणी ही त्याच्या जगण्याचा अविभाज्य भाग असणार. त्या बाबतीत अडवणूक नको.
- अगदी बरोबर पण हे मुलींनाही लागू आहे. लग्न-मुलं-घर या चक्रात मुलींना मित्रमैत्रिणींचा जेवढा त्याग करावा लागतो, तेवढा मुलांना करावा लागत नाही. त्यामुळे कधीतरी फ्रस्ट्रेशनमधून मुलींनी नवऱ्याला मित्रांसोबत जाण्यापासून अडवलं तर ते समजून घ्या. तिला नवरा हवा आहे असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे त्यात नाक खुपसू नका.
११. दळण, लाँड्री, स्वयंपाक, आला गेला, स्वच्छता, आर्थिक बाबी, प्रवासाचं नियोजन इ.इ. बाबींत परफेक्ट नॉलेज असणाराच नवरा हवा असेल तर विधुराशी किंवा घटस्फोटीत मुलाशी लग्न करावं. त्यांना नक्कीच जास्त अनुभव असतो.
- लग्नाच्या पहिल्या दिवसापासून स्वयंपाक, सगळी घरीच कामं यावी असं वाटत असेल तर त्यानेही (आणि त्याच्या घरच्यांनीही) हाच मार्ग पत्करावा मग. पुन्हा तोच सल्ला. लग्न नावाच्या गोष्टीची पूर्वतयारी दोन्ही बाजूंनी झाली पाहिजे. त्यात कोणाला तरी जास्त गती असेल, कोणाला कमी समजत असेल. त्यावेळी तू मला कोण सांगणारी किंवा तू मला कशाला शिकवतोस असा अॅटिट्यूड न ठेवता नवरा-बायकोंनी एकमेकांतल्या उणिवा भरून काढण्याकडे कल ठेवावा. यात डोकं घालून आजूबाजूच्या लोकांनी परिस्थिती बिघडवू नये. आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या मदतीला सारखं धावून जाऊन त्यांच्या नजरेत हिरोईन होण्याच्या नादात आपण त्यांना पंगू करतोय हे कृपया लक्षात घ्या.
१२. आणि परत एकदा, आपलं काय म्हणणं असेल ते समोरुन सांगावं. मुलांना आईने ' मनातलं ओळखून दाखव बरं ' सारखे फालतू गेम्स शिकवलेले नसतात. आणि हो, तुमच्या आईला त्याच्याकडून मान हवा असेल तर तुम्हीही त्याच्या आईशी नीट वागा.
- बहुतेक मुलांना आईने साध्या-साध्या गोष्टी शिकवलेल्या नसतात, तर हे गेम्स शिकवणं दूरची गोष्ट. आणि या सगळ्या त्या त्या वयातल्या गमती असतात. आपण मनातलं ओळखू शकलो नाही म्हणून बायको रुसली तर नवऱ्यालाही त्यात मजा वाटत असेल. आपले हे दिवस मागे पडले असले तरी त्यातला रोमॅण्टिसिझम समजून घेण्याचा प्रयत्न करावा किंवा मुळात त्यात इतकं लक्षच घालू नये हे उत्तम. त्यापेक्षा काहीतरी चांगला विरंगुळा शोधावा.
प्रतिनिवेदन संपलं.
- सायली परांजपे
October 31 at 12:01 PM · Public

ओह हा.. प्राजक्ता गांधींची पोस्ट वाचली होती. शुद्ध बिंडोक पोस्ट आहे.
सायली परांजपेंची पोस्ट उत्तम.
थँक्स अ‍ॅमी.