चंद्रिका (लघुकथा)

Submitted by किल्ली on 27 July, 2018 - 09:57

राधिका भाजी आणण्यासाठी घरातून निघाली होती. गल्लीच्या बाहेर मंडईकडे जाणाऱ्या रस्त्यावर ती वळली. रस्ता ओलांडत असताना एक कार तिच्या बाजूला येऊन थांबली. त्या आलिशान कार मधून अति उच्चभ्रू महिला खाली उतरली. उंची कपडे, गॉगल अशा पेहरावात ती एखाद्या राणीसारखी शोभत होती. राधिकाला पाहून तिने ओळखीचे स्मित केले आणि हलकेच तिच्या पाठीवर थाप मारली. राधिकाने वळून पाहिले. ती तिची शाळेतली मैत्रीण नीता होती.
"कित्ती बदलली ही, श्रीमंतीची झाक तेव्हाही तिच्या वावरण्यात दिसायची. किंचित गर्वही होता तिला. पण आजचं हिचं रूप जरा सुखावह आहे."मनात विचार भर्रकन येतात ना, तसंच झालं राधिकाला!
खूप दिवसांनी भेटल्यामुळे किती बोलू अन किती नको असं झालं होतं दोघीनाही! त्यांनी तिथेच थांबून खूप गप्पा मारल्या. आपण भाजी आणण्यासाठी बाहेर पडलो ह्याची आठवण झाली तशी राधिका भानावर आली. दोघींनी एकमेकींचा निरोप घेतला तोच घरी येण्याचे आग्रहयुक्त आमंत्रण देऊनच! असंही त्यांना आता तरी ह्या क्षणी आपआपल्या दिनक्रमाची गोळाबेरीज करायची होतीच. तिथे शाळेतल्या बेरजेच्या आठवणींना उजाळा देण्यास वेळ नव्हता.
ठरल्याप्रमाणे एके दिवशी नीताच्या घरी जाण्यास राधिका छान जांभळी साडी नेसून तयार झाली. नाही म्हटलं तरी तिच्या श्रीमंतीला पाहून तिचं साधं मध्यमवर्गीय मन थोडंसं बुजलं होतंच. म्हणून त्यातल्या त्यात भारीची साडी नेसून, मोजकेच अलंकार लेऊन ती नीताने पाठवलेल्या कारमध्ये जाऊन बसली. त्या वातानुकूलित रथामध्ये तिला कससंच होत होतं. गाडी एका मोठ्या बंगल्यासमोर थांबली. राधिका आत जाताच नीताने तिला मायेने आत नेले. तिची अगत्याने चौकशी केली. गप्पा सुरु झाल्या. पण राधिकाला नीताच्या बोलण्यात 'मी' पणा खूपच जाणवत होता.
तिने विचार केला, "खरं तर आहे हिचं सगळं, ही सांगतेय ती सगळी कौतुकं खरीच आहेत. आपण मुकाट ऐकावं." राधीकालाही बरंच काही बोलायचं होतं पण तिच्या ह्या grand आनंदापुढे आपले अनुभव काहीच नाहीत असे वाटून ती गप्प बसली. थोड्या वेळाने नीताचा नवरा, नीता आणि राधिका असे तिघे जेवायला बसले. मोजकंच बोलून जेवण झाल्यावर तो त्याच्या खोलीत गेला. जेवण बाहेरून मागवलं होतं. चमचमीत, मसालेदार पंजाबी जेवण होतं. एरवी ह्या अशा restaurant style जेवणाचं राधीकाला खूप अप्रूप होतं! पण आज ते आवडत नव्हतं तिला! कसेबसे ४ घास तिने पोटात ढकलले. काय बोचतंय नीताच्या घरात हेच तिला कळत नव्हतं. मैत्रिणीला भेटून घरी परतत असताना खुश होण्याऐवजी राधिका सैरभैर झाली होती. ह्या अस्वस्थतेची कारणं स्वतःशीच धुंडाळत ती घरी पोचली. विचारचक्रात हरवलेल्या तिला नवरा आलेला देखील समजलं नाही. तोही शांतपणे त्याचं काम करत राहिला. पण थोड्या वेळाने तिची काळजी वाटून शामने (राधिकाचा नवरा) विचारले , "काय झालं? गप्प का? कशी झाली तुमची भेट?"
राधिका: "छान झाली, गप्पा झाल्या. भारी आहे नीताच घर. "
एरवी भरभरुन बोलणाऱ्या राधिकेला संक्षिप्त उत्तर देताना पाहून शामने विचारले,
"काय गं, बरीयेस ना. चहा घेणार का, मी बनवत आहे?"
राधिका:"अर्धा कप"
श्यामने आल्याचा चहा बनवला, तो वाफाळता कप तिच्या हातात दिला. तिने न बोलता कप हातात घेतला. चहाचा पहिला घुटका घेताच "वा!" अशी दाद आपसूकच उमटली. फॉर्मुला कामी आला, म्हणून शाम मनात हसला. आता मॅडम बोलणार म्हणून सावरून बसला. पण राधिका विचार करतच होती. अचानक तिला काहीतरी क्लिक झालं आणि ती बोलू लागली:
"अरे आपण अस्वस्थ झालो, कारण आपण असं समजलो की नीताच्या आयुष्यात खूप आनंद आहे आणि आपल्या नाही. उलट कितीतरी आनंदाचे क्षण असेच चालत बोलता वेचतो आपण आपल्या आयुष्यात. तिच्याकडे असणारे श्रीमंती तिची सांपत्तिक स्थिती दर्शवते, पण त्याने आनंद आणि दुःख ह्या भावनांवर काय फरक पडतो ? काहीच नाही. आपण प्रगती जरूर करावी. पण पैसे असो किंवा नसो, आपली सांपत्तिक स्थिती कशीही असो, मन प्रसन्न ठेवावं म्हणजे विश्वात जो आनंद व्यापून राहिला आहे तो अनुभवता येतो. माझं आयुष्य तर किती छान आहे, कसली फिकीर नाही, प्रेमळ माणसांचा सहवास आहे. आयुष्यातल्या प्रत्येक कठीण प्रसंगावर मात करण्यासाठी कणखर मन करण्याची ताकद आहे. आज मी तिच्याकडे गेले म्हणून भरकटायला नको होतं. मनाला लगाम घालायला हवा होता."
"लगाम तर तू घातलास राधिका, आत्ताच!! रात्रीच्या अंधारातही चांदणं वेचणारा तुझा स्वभाव आहे. कधीतरी अंधारात चाचपडायला होणारच ना! शेवटी महत्वाचं हे आहे की तू चांदणं शोधलस! "
श्यामचे हे बोल ऐकताच राधिका मनमोकळं प्रसन्न हसली. नेहमीप्रमाणे आजही त्या दोघांची सायंकाळ चहाबरोबर ताजीतवानी होऊ पाहत होती.

आकाशात एकीकडे सूर्य मावळत असला तरी दुसरीकडे चंद्र आणि चांदण्या शीतल प्रकाशाची उधळण करण्यास सज्ज झाल्या होत्या.
-----------------------------------------------------------------------------------------------------------
काय लिहावं हे न ठरवता विचारांच्या ओघात जसं सुचेल तशी ही कथा लिहीत गेले. त्रुटी असू शकतात. विषय भावला तर कृपया आपले ही विचार जरूर मांडावेत.
--------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
---------------------------------------------------------------------------------------------------------

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

ताई तुझी कथा आवडली, नावाप्रमाणे तू सुखाची गुरुकिल्ली दाखवलीस

छान लिहिले आहे.

असमाधान, असंतुष्टता तुलनेतून येते. आपण गप आपले आयुष्य जगावे आणि एंजॉय करावे.

कथा छान आहे पण अजून खुलली असती. राधिकेने नवर्‍याशी काय शेअर केले होते, ते कुठेच आलेले नाही.

मन:पूर्वक आभार सस्मित, विनिता.झक्कास,ऋन्मेऽऽष,उमानु ,च्रप्स ,सातारी जर्दा , अदिति,प्रिया येवले ,आसा, अन्जली, द्वादशांगुला ,मी चिन्मयी ,आनंद.,अक्षय दुधाळ ,आदीसिद्धी Happy

@सस्मित,आनंद: बदल केला आहे..:)

किल्ली खूप मस्त लिहिलंय... पण अजून थोडं लिहिशील का/?? तू राधिका चं मनोगत लिहिलं पण नीता च ही ऍड कर ना, वाचायला मज्जा येईल अजून...

आत्ता पर्यंत तुम्ही लिहिलेल्या कथांपैकी ही सर्वात जास्त आवडली स्टोरी! ... Happy
खूपच छान लिहिलंय ताई.. Happy
पु.ले.शु. Happy

मन:पूर्वक आभार अनिश्का. ,मेघा. Happy
अनिश्का. : तू राधिका चं मनोगत लिहिलं पण नीता च ही ऍड कर ना, वाचायला मज्जा येईल अजून...>>>>>>>चांगली कल्पना, विचार करते त्या दृष्टीने, धन्स Happy

ईतकं सगळं असुन निता सुखी नाही आणि जास्त काही नसुन राधिका कशी सुखी आहे हे न दाखवल्यामुळे आवडलं...>>+1

छानच लिहिलय!
शाम-राधीकाचे संवाद अजुन खुलवता आले असते.

खूप छान. ही राधिकाची गोष्ट केवळ तुम्ही सांगताय असं न वाटता तिचे विचार, तिचं realization आपण direct तिच्या मनातून वाचतोय असं वाटलं. म्हणजे कित्येकदा आपल्या मनात अनेक गोष्टींबद्दल अनेक विचार येत असतात. पण ते exactly शब्दबद्ध करता येत नाहीत. ते तुम्ही केलंय.

अगदी खरं सांगायचं झालं तर, विचारांच्या ओघात लिहिली ही कथा, ठरवून काही लिहिलं नाही. लिहून झाल्यांनतर वाचली सुद्धा नाही. त्यामुळे टंकचुका सुद्धा होत्या. निदर्शनास आणून दिल्याबद्दल धन्स. त्यामुळे तुमच्या सूचनांचे मी स्वागत करते.
आपणा सर्वाना चंद्रिका आवडली ह्याबद्दल मी आपले विशेष आभार मानते.

शाम-राधीकाचे संवाद अजुन खुलवता आले असते.>>>>
कथा छान आहे पण अजून खुलली असती. राधिकेने नवर्‍याशी काय शेअर केले होते, ते कुठेच आलेले नाही.>>>>>
राधिका आणि शाम हे जोडपं एकमेकांवर खूप प्रेम करणार आहे, राधिकाचा मूड ऑफ शामला तिने काहीही न सांगता समजला आहे.
तिला चहा आवडतो, म्हणून तो तिला आयता चहा आणून देतो , त्यामुळे तिची कळी खुलते, प्रिय व्यक्तीच्या सहवासात तिचेच मन समस्येचे समाधान देते.
शेवटी सत्य हेच असते की, स्त्रियांना समस्येचं उत्तर देणारा नाही तर तिचे बोलणे ऐकून घेणारा, समजून घेणारा कोणी असेल तर आपोआप त्या स्वतःच स्वतःला सावरतात. आपलं जवळच कोणी आहे हा मानसिक आधार पुरेसा असतो.
कथेतील जोडपे एक सामान्य कुटुंबातील मध्यमवयीन आहे.
म्हणून मी फक्त राधिकेला बोलताना दाखवलं आहे. Happy Happy

राधिकाचा मूड ऑफ शामला तिने काहीही न सांगता समजला आहे. >>> मग हे खालचे वाक्य त्याला सुसंगत नाही. ती आपण कशाला म्हणेल? ती मला म्हणेल फार तर!
"अरे आपण अस्वस्थ झालो, कारण आपण असं समजलो की नीताच्या आयुष्यात खूप आनंद आहे आणि आपल्या नाही.

झोपडपट्टीतली उघडी नागडी मुलं गटाराच्या काठावर हसतमुखाने हुंदडतात . बाजूने जाणारा उच्चभ्रू ते हसू विकत घेउ शकत नाही कितीही पैश्यात .

मन करारे प्रसन्न सर्व सिध्दीचे कारण ....

Pages