जागीर

Submitted by पायस on 20 July, 2018 - 02:28

१९८१ साली इंडियाना जोन्स अ‍ॅन्ड रेडर्स ऑफ द लॉस्ट आर्क आला आणि अचानक खजिना-शोध या जॉनरला नवचैतन्य प्राप्त जाहले. त्याला फॉलो अप म्हणून स्पीलबर्गने १९८४ साली टेंपल ऑफ डूम रिलीज केला. एवढे होत असताना बॉलिवूडने मागे राहणे हे बॉलिवूडच्या शान के खिलाफ असल्याने कोणीतरी हे फेकलेले गाँटलेट उचलणे गरजेचे होते. त्यात प्रश्न आंतरराष्ट्रीय दर्जाचा असल्याने आंतरराष्ट्रीय प्रेक्षकाला रुचेल असा सिनेमा बनवण्याचा अनुभव असणेही गरजेचे होते. म्हणून "लव्ह इन टोकियो" मधून जपानी लोकांना आशा पारेख जपानी आहे हे पटवून देण्याचे महान कार्य करणार्‍या प्रमोद चक्रवर्तीने त्याच वर्षी जागीर नामे चित्रकलाकृती निर्मिली. या महान कार्याचा आढावा घेण्याकरता हा चिरफाड, आपलं रिव्ह्यू प्रपंच!

१) रम्य ही स्वर्गाहून जागीर

मांगा इन थिअरी अ‍ॅन्ड प्रॅक्टिस या अप्रतिम पुस्तकामध्ये प्रसिद्ध लेखक हिरोहिको अराकी सांगतो की तुमच्या कथेचा मुख्य मुद्दा कथा सुरू झाल्या झाल्या स्पष्ट झाला पाहिजे. जेव्हा अराकी त्याची उमेदवारी करत होता तेव्हाच्या काळात सुद्धा आमच्या चक्रवर्तीकाकांच्या डोक्यात हा मुद्दा पक्का होता. त्यामुळे अजिबात वेळ न दवडता ते आपल्याला खजिना दाखवून मोकळे होतात. कारण खजिना किती आहे हे महत्त्वाचे नाही. तिथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास महत्त्वाचा आहे. मग खजिन्याबद्दल रहस्य निर्माण करून काय फायदा?

तर कमल कपूर (अमिताभच्या डॉनमधला नारंग) शूरवीर सिंह म्हणून अंजानगढचा राजा दाखवला आहे. ज्याला इंग्रजीत प्लूम्ड टर्बन म्हणतात आणि ज्याला आपण पीस खोवलेला फेटा म्हणतो असा फेटा, जोधपुरी सूट आणि गळ्यात मोत्यांच्या माळा असल्याने त्याच्या राजेपदावर शिक्कामोर्तब होते. राजा असूनही बिचार्‍याकडे एक जागीरच काय ती असते. त्याचे राज्य नक्की कुठे असते असे भौगोलिक प्रश्न व्यर्थ आहेत. कारण तो कोणत्या तरी मोठ्या शहराच्या जवळ राहत असतो ज्याच्यापासून थोड्याच अंतरावर नदी, जंगल, माळरान, डोंगर, दर्‍या सर्व काही असते यापेक्षा जास्त माहिती चक्रवर्तीकाका आपल्याला देत नाहीत. याच डोंगर दर्‍यांमध्ये कुठेतरी त्याचा राजवाडा असतो. तिथेच कुठेतरी एक पहाडी असते. त्या पहाडीच्या खाली शाही खजिना असतो.

सिनेमा सुरु होतो तो कमल कपूर खजिन्याच्या खोलीत उभा राहून शंकराच्या मूर्तीशी गप्पा मारत असतो. टेंपल ऑफ डूम ला उत्तर द्यायचे असल्याने खजिन्याच्या खोलीला मंदिराचे स्वरुप दिलेले आहे. त्याच्या दरवाज्यावर सात घंटा टांगलेल्या आहेत. खजिना म्हणून जेवढं मध्यम वर्गीय बंगाल्याला सुचू शकतं तेवढं दाखवलेलं आहे. इथे वाचकांनी नोंद घ्यावी की याच व्यक्तीने धर्मेंद्राचा अलिबाबा और चालीस चोर बनवला होता. असो, तर कमल कपूर सांगत असतो की त्याला हार्ट अ‍ॅटॅक येऊन गेलेला असल्यामुळे तो आता खजिन्याची जबाबदारी राजकुमारावर सोपवण्याच्या विचारात आहे (इथे मूर्तीच्या चेहर्‍यावर बरी ब्याद टळली असे भाव). तर त्याला आशीर्वाद दे इ. इ. मूर्तीच्या मनातही बहुधा प्रेक्षकाच्या मनात चमकून जातो तोच प्रश्न येतो - ते आशीर्वाद देतो मी पण ज्याला द्यायचा तो राजकुमार कुठे आहे? याला उत्तर म्हणून कमल कपूर घंटा वाजवतो आणि कुठून तरी एक गरुड पैदा करून बाहेर पडतो.

हिंदी सिनेमात प्राणी-पक्षी अमर्यादित प्रमाणात चतुर असल्याने कमल कपूर सारासार विचार करून राजकुमार खजिन्याची जबाबदारी घेईपर्यंत त्याच्या रक्षणाची जबाबदारी बाजबहादूर शमशेर असे भरभक्कम नाव असलेल्या त्या गरुडावर टाकतो. त्याला हे माहित नसते की आपल्या गरुडावर कोणीतरी नजर ठेवून आहे. तो असतो डाकू लाखन सिंह अर्थात अमरीश पुरी. अमरीश पुरीला या खजिन्यात रस असतो पण अंजानगढचा भूगोल समजायला फारच क्लिष्ट असल्याने त्याला दुर्बिणीतून ती पहाडी दिसत असूनही तिथपर्यंत पोहोचण्यासाठी नकाशाची गरज असते. शूरवीर सिंगचा भाऊ दिगंबर सिंग (सुब्रतो महापात्रा, सत्यम शिवम सुंदरम मधला शास्त्री) हा अमरीश पुरीला जाऊन मिळालेला असतो. तो खजिन्याच्या अर्ध्या हिश्श्याच्या बदल्यात नकाशा कुठे आहे हे सांगायला तयार होतो. नकाशा एका लॉकेटमध्ये असतो जे कमल कपूर घालून फिरत असतो. अमरीश पुरी लगेच ते लॉकेट ताब्यात घेण्यासाठी अंजानगडाच्या हवेलीकडे कूच करतो.

2) प्राणिमात्रांचे ऋण

2.1) शाही उपसर्गाची संकल्पना

दिगंबरच्या दगाबाजीची कल्पना नसलेला कमल कपूर निवांतपणे प्राणशी गप्पा मारत असतो. प्रत्येक शाही खानदानाचा नोकर असलाच पाहिजे या नियमानुसार प्राण मंगलसिंग नावाने शाही नोकर दाखवला आहे. राजकुमार मोठा होईपर्यंत शाही खजिन्याचे रहस्य आणि नकाशावाल्या ‘लाकट’ ची जबाबदारी कमल कपूर प्राणवर सोपवतो.
याची नोंद घेणे अत्यावश्यक आहे की अशा सिनेमात जर शाही हा उपसर्ग नावामागे लावला असला तर तो/ती बाय डिफॉल्ट भारी आणि मरणार नाही हे फिक्स असते. म्हणून राजकुमार कधी मरत नसतात कारण उनके रगों में शाही खून दौडत असते. दुसरं म्हणजे जोवर उघड उघड शाही हा उपसर्ग प्रयुक्त होत नाही तोवर शाही उपसर्गाची सुरक्षा प्राप्त होत नाही. तिसरं म्हणजे या उपसर्गाची प्रयुक्तता तुम्ही स्वतःकरिता करून उपयोग नाही. अन्यथा आत्मप्रौढीचा नियम या उपसर्गाच्या सुरक्षाचक्राचा भेद करतो. चौथे म्हणजे जर तुमच्याकडे एखाद्या शाही वस्तूची जबाबदारी असली तर तुम्ही शाही राजदार बनून तुम्हाला हा नियम लागू होतो. कमल कपूर शाही राजा नसल्याने तो मरणार, दिगंबरमध्ये शाही खून असले तरी त्याचा प्रत्यक्ष उल्लेख न झाल्याने तो मरणार आणि प्राणकडे शाही खजिन्याचा नकाशाचे शाही रहस्य सोपवले असल्याने तो जगणार हे नक्की झाले.

2.2) मूर्ख राजाकडे नोकरी करू नये

कमल कपूर अशक्यप्राय मूर्ख दाखवला आहे. अमरीश पुरी राजवाड्यात येतो. त्याला ते लाकट हवे असते. कमल कपूर विचारतो की तुला कोणी सांगितलं, लगेच मागून दिगंबर सिंग म्हणतो की मी. त्या दिवशी तू मला ५००० रुपये द्यायला नकार दिलेला आता मला अमरीश पुरी 5 कोटी देणार आहे. थोडं गणित करूयात. सिनेमा १९८४ चा. यानंतर तरी पंचवीस तीस वर्षे निघून जातात (ही कमीच आहेत. प्रत्यक्षात धर्मेंद्र पन्नाशीचा दिसतो). दिगंबरला खजिन्याचा अर्धा हिस्सा मिळणार म्हणजे खजिन्याची तेव्हाची किंमत १० कोटी रुपये. सध्याच्या भावाने तरी ५०० कोटी रुपये. हा आकडा नंतर कामी येईल.

५००० हजार देऊन जे टाळता आले असते ते न टाळल्याचा मूर्खपणा लपवण्याकरिता कमल कपूर विषय दगाबाजीकडे वळवतो. त्यावर अमरीश पुरी म्हणतो "आज के जमाने में वफादारी की उम्मीद तो आजकल सिर्फ कुत्ते से की जा सकती हैं. फिर ये तो इन्सान हैं."

इथे मौका देख के संकलक चौका मारतो. कट टू वफादार प्राण. प्राण तिकडे राजकुमारच्या गळ्यात ते लाकट टाकून त्याला चेतक नावाच्या घोड्यावर बसवून जायला सांगतो. इथे राजकुमारचे नाव प्रताप ठेवून पोएटिक जस्टिस साधण्याची संधी दिग्दर्शक दवडतो. चेतकला एस पी साबचे घर ठाऊक असल्याने प्राण सर्वकाही समजावणारी चिठ्ठी देण्याचे काम घोड्याला सांगतो. घोडासुद्धा समजूतदारपणे मान हलवतो. मग राजकुमार आणि घोडा एस पी इफ्तेकारच्या घराच्या दिशेने पळतात. इथे प्राणच्या मुलाकडे घोड्याइतका समजूतदारपणा नसल्याने तो फक्त चड्डी घालून हिंडत असतो. मग प्राण त्याला राजकुमारचे भरजरी कपडे घालायला देतो.

इकडे लॉकेट देत नसल्याने लाखन आणि दिगंबर राजावर बंदूक ताणून उभे असतात. तेवढ्यात प्राण मध्ये पडतो. प्रजा का सबसे बडा खजाना कमल कपूर असल्याचे सांगून तो तसेच गरुडाच्या आकाराचे नकली लॉकेट देतो. कधीतरी महाराज आपल्याला त्यांच्या गळ्यातले लॉकेट देतील आणि ते शत्रूला हवे असू शकते म्हणून नकली लॉकेट बनवून ठेवावे एवढा अंतर्यामी प्राण असतो. म्हणून दिगंबर आपण राजा शूरवीर सिंगचेच बंधुराज असल्याचा पुरावा देत केवळ ते गरुडाच्या आकाराचे आहे म्हणून खरे लॉकेट असल्याचे छातीठोकपणे सांगतो. लाखन मात्र अधिक हुशार असल्यामुळे तो आधी नकाशा चेक करायचे ठरवतो. तेव्हा प्राण थातुर मातुर कारण देऊन ते टाळतो.

इथे कमल कपूर मूर्खपणा नंबर दोन करतो. अमरीश पुरीचे समाधान झालेले असल्याने तो घरी जायला निघालेला असतो तर विनाकारण कमल कपूर त्याच्या सोबत असलेल्या सुब्रतो महापात्रावर गोळी चालवतो. दिगंबर जरी शाही खानदानाचा असला तरी उपरोक्त नियमानुसार त्याच्यासाठी शाही उपसर्ग थेट प्रयुक्त झाला नसल्याने त्याला संरक्षण मिळत नाही आणि तो मरतो. इंटरेस्टिंगली कमल कपूरच्या दुनळी बंदूकीत दोन गोळ्यांची जागा असताना त्याने एकच गोळी भरलेली असते कारण तो एकच चाप ओढतो आणि एकाच गोळीचा आवाज होतो. जर दोन गोळ्या असत्या तर त्याला अमरीश पुरीला मारायचा चान्स होता. या सिनेमात अमरीश पुरी जरा उसुलों वाला व्हिलन असल्याने तो दिगंबरची शेवटची इच्छा (मेरे बेटे रणजीत को अपने बेटे की तरह पालें) तो पार पाडतो तसेच त्याने सांगितल्याप्रमाणे तो राजा आणि राजकुमारला मारायला तयार होतो. चाणाक्ष वाचकांनी ओळखले असेलच की नाव रणजीत असल्यावर मोठा होऊन तो रणजीत खेरीज इतर कोणी होऊच शकत नाही.

"मिळाल्या मालकासी व्हावे प्रोटेक्टर" मंत्र असलेला प्राण एवढे सगळे होऊनही मध्ये पडतो. चाहो तो मेरी जान लेलो पर महाराज को छोड दो चा धोशा तो लावतो. तेवढ्यात प्राणच्या मुलाला राजकुमार समजून अमरीश पुरीच्या गँगमधला एक चिल्लर डाकू घेऊन येतो. महाराज ऐवजी राजकुमारचा बळी जाणार असे ठरते. प्राणही हे बलिदान द्यायला तयार होतो. अजूनही कमल कपूरला गप्प बसण्याचे सुचत नाही. तो म्हणतो की हा राजकुमार नसून प्राणचा मुलगा आहे. सुदैवाने अमरीश पुरीला त्या मुलाला "बाळा तुझे बाबा कोण ते सांगतोस का?" विचारायचे सुचत नाही. तो त्या मुलाला तलवारींवर नाचवून फेकण्याचा आदेश देतो. वफादार नोकराचा मुलगा असल्या कारणाने त्याचे जिस्म फौलादी असावे. कारण एकही तलवार त्याच्या पाठीत घुसत नाही. त्याला कॅच कॅच खेळल्यासारखे करून खिडकीतून खाली फेकतात. "आज जरा आडरस्त्याने जाऊयात" असा विचार करून चाललेल्या एका भटक्या दांपत्याच्या घोडागाडीत जाऊन नेमका तो पडतो. इथून तिथून, न जाणे कुठून आलेल्या घोडागाडीत पडलेला तो मुलगा पुढे जाऊन मिथुन होणार हे नक्की होते.

एवढे होऊनही कमल कपूरचे समाधान होत नाही. तो एक सुरा फेकून अमरीश पुरीला मारतो. त्याने खांद्याला किरकोळ जखम होण्यापलीकडे काही होत नाही. मग मात्र बिचार्‍याचा निरुपाय होतो आणि तो एकदाचा कमल कपूरला गोळी घालतो. कमल कपूर हार्ट अ‍ॅटॅक आल्याचा अभिनय करून मरतो. इकडे भर उन्हात बिन चार्‍याचे पळवल्याबद्दल चेतक राजकुमारला नदीत पाडतो. शेवटी वफादारी की उम्मीद फक्त कुत्तोंसे की जा सकती हैं घोडोंसे नही. सर्वकाही लक्षात आल्यानंतर अमरीश पुरी प्राणला बांधून फटके देत असतो. प्राणची जुबान काटण्याची धमकी दिल्यानंतर प्राण म्हणतो की मेरी जुबान के दो टुकडे करोंगे तो आवाज दुगुनी होगी, चार टुकडे चौगुनी. प्राणच्या हे लक्षात येत नाही की तुकडे जीभेचे होणार आहेत, स्वरयंत्राचे नाहीत. फार फार तर तो दुप्पट बोबडा किंवा चौपट बोबडा होऊ शकतो. अमरीश पुरीला मात्र एव्हाना या लोकांचा मूर्खपणा असह्य झालेला असतो. त्यात राजकुमार आणि लॉकेट निसटल्यामुळे तो आधीच त्रासलेला असतो. इतके होऊन सुद्धा तो फक्त प्राणचा उजवा हात कापून त्याला सोडून देतो. मूर्ख मित्रापेक्षा शहाणा शत्रू परवडला याचे यापेक्षा अधिक चांगले उदाहरण ते काय?

२.३) घोड्याने पाडले, ससाण्याने तारले

इफ्तेकार प्राणची चौकशी करायला राजवाड्यावर येतो. कधीतरी कमल कपूरने व्यक्त केलेल्या इच्छेनुसार आपल्या मुलीचे, सीमाचे लग्न मोठे झाल्यावर राजकुमारशी लावून द्यायचे मान्य करतो. तेव्हा कळते की राजकुमार इफ्तेकारकडे पोचलाच नाही. मग तो गेला कुठे? बाकी सर्वांनी हलगर्जीपणा केला असला तरी शमशेरने केलेला नसतो. इतका वेळ ठिपकेदार गरुड असलेला शमशेर अचानक बहिरी ससाणा बनतो आणि आजूबाजूला कुठेही मंदिर नसताना पूजेची थाळी घेऊन फिरत असलेल्या आशालताचे लक्ष वेधून घेतो. नदीत वाहत आलेला राजकुमार आशालताला सापडतो आणि ती त्याचा सांभाळ करण्याचे मान्य करते. सहसा कंटिन्यूटी मिस्टेक्स कपड्यांमध्ये होतात. इथे पक्ष्यांमध्ये झाली आहे.

३) वेस्टर्न सिनेमा बनवण्यासाठी दिलवाले नायक हवेत

३.१) धनाच्या पेटीपाशी चावरे विषारी नाग असलेच पाहिजेत.

असा हा राजकुमार मोठा होऊन धर्मेंद्र बनतो. गळ्यात असलेल्या लॉकेटमुळे लगेच त्याची ओळख पटते. तिथल्याच कुठल्यातरी जंगलात तो खड्डा खणत बसलेला असतो. कुठून तरी त्याला कळलेले असते की इथे खजिन्याची पेटी गाडलेली आहे. इथे आपल्याला कळून चुकते का हा सिनेमा वेस्टर्नच्या अंगाने जातो. वेस्टर्नमध्ये सर्वजण एक्स्प्लोरर्स असतात. त्यांना घोडेस्वारी करणे, गाडलेले खजिने शोधणे आणि गाणी म्हणणे याशिवाय काही उद्योग नसतात. तसेच प्रत्येकजण बंदूक चालवण्यात वाकबगार असावाच लागतो. इथे रॉय रॉजर्स, जीन ऑट्री वगैरेंच्या जागी धर्मेंद्र असणार हे निश्चित होते. वेस्टर्नला साजेशी हॅट आणि गळ्याला रुमालही असतो. पेटी घेऊन धर्मेंद्र निघणार इतक्यात तिथून चाललेला मिथुन ती पेटी ताब्यात घेण्याचा प्रयत्न करतो. चेक्सचा शर्ट, मळकट रंगाची हॅट बघून वेस्टर्न्स मधली दुय्यम हिरोची भूमिका याच्या वाटेला आली आहे हे निश्चित होते. थोडी मारामारी झाल्यावर लाक्षणिक रित्या मिथुनला धर्मेंद्र खड्ड्यात जा म्हणतो. म्हणजे लाथ मारून वेगळ्याच एका मोठाल्या खड्ड्यात पाडतो. हमरस्त्याने जायचे सोडून त्याला दोन दगडांमधल्या चिंचोळ्या वाटेतून जाण्याची हुक्की येते. आपल्या निवासस्थानापाशी झालेल्या आवाजामुळे एक नाग (खराखुरा) वैतागून बिळातून बाहेर येतो. त्रासलेला तो बिचारा जीव धर्मेंद्राला डसण्याचा प्रयत्न करतो तर मिथुन मध्ये येऊन त्याचा (धर्मेंद्राचा, नागाचा नव्हे) जीव वाचवतो.

मिथुन गारुड्यांमध्ये वाढलेला असल्याने निवांतपणे स्वतःच्याच जखमेतून विष चोखून थुंकून टाकतो. तो हे इतक्या निवांतपणे करतो की त्या नागालाही "काय ते दिवस होते, एका फूत्कारात माणसे मरायची. नाहीतर आता च्युईंग गम प्रमाणे चघळून विष थुंकणारी माणसे यायला लागली आहेत" वाटल्याखेरीज राहिले नसावे. इथे धर्मेंद्राचे नाव शंकर आणि मिथुनचे नाव सांगा असल्याचे स्पष्ट होते. मिथुन मोठ्या अभिमानाने त्याला आपल्या पाठीवरच्या तलवारीच्या खुणा दाखवतो आणि आपण प्राणचा मुलगा असल्याचे प्रेक्षकांना कळवतो. प्रत्यक्षात गंज लागलेल्या तलवारींमुळे रॅश आल्यासारख्या त्या जखमा दिसतात. याने धर्मेंद्राला भलतेच वाईट वाटते आणि तो सापडलेल्या धनाचा अर्धा हिस्सा मिथुनला देऊ करतो.

अशा सिनेमांत एक तिसरे पात्र सुद्धा लागते. सहसा हे नेटिव्ह अमेरिकन किंवा मेक्सिकन, म्हणजे हिरोपेक्षा ड्रॅस्टिकली वेगळे दिसणारे लागते. इथे डॅनीची वर्णी लागली आहे. डॅनीचे नाव डॅनीच असते. त्या पात्रांच्या नियमांनुसार डॅनी सुरेफेक करण्यात आणि कुलुपे तोडण्यात निष्णात असतो. डॅनी येऊन तीन हिश्श्यात वाटणी करण्याचा सल्ला देतो. तो सल्ला धुडकावून ते दोघे आधी दगड मारून, नंतर बाँबच्या मदती ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करतात. अखेर हार मानून ते डॅनीची ऑफर स्वीकारतात. डॅनी अत्यंत सहजतेने ती पेटी उघडतो. त्यात शंभरच्या नोटा, सोन्याची बिस्किटे आणि दागिने पाहून हा खजिना नसून स्मगलिंगचा माल असल्याचे आपल्याला कळते. हा माल ज्यांचा असतो ते लोक हा माल घ्यायला येतात. मग धर्मेंद्राला युक्ती सुचते आणि तो डॅनीला ती पेटी बंद करायला सांगतो.

३.२) मुलांची फाजील कौतुके केल्यास त्यांच्याच्याने एक काम धड होत नाही

पुढच्या सीनमध्ये कळते की तो माल अमरीश पुरीचा होता. इतक्या वर्षांमध्ये त्याचे डाकू मधून स्मगलरमध्ये प्रमोशन झाले आहे. रणजीतही मोठा होऊन रणजीत झाला आहे. रणजीत ती उपरोक्त पेटी घेऊन परत आलेला असतो. मिळालेली वस्तु योग्य आहे का नाही हे चेक न करण्याची सवय वडलांकडून रणजीतला मिळालेली असते. त्यामुळे तो पेटी न उघडताच घेऊन आलेला असतो. सोबत सुजितकुमार आणि मॅकमोहन पण असतात. या तिघांना हॅट दिलेल्या आहेत. आणखी पण एक कोणी फरकॅपवाला असतो ज्याच्या हातात काही कारणाने बिगुल दिलेले आहे. याला फक्त "बाप का बेटा, सिपाही का घोडा, बहुत नही तो थोडा थोडा" हा डायलॉग मारण्यासाठी ठेवलेलं आहे. अमरीश पुरी उगाचच रणजीतचे कौतुक करतो. रणजीतही अंजानगढ चा खजिना शोधून काढण्याच्या वल्गना करतो. ती पेटी डॅनीने बंद केलेली असल्यामुळे ती काही उघडत नाही. मग रणजीत ब्लोटॉर्चने तिचे झाकण तोडतो. झाकण उघडण्यापूर्वी शँपेन उघडली जाते आणि झाकणावर ग्लास भरले जातात. शँपेन आवडत असल्याने आत बंद केलेला नाग "घोटभर शँपेन मलाही द्या की" करून बाहेर येतो आणि फालतू कामाचा दर्जा अमरीश पुरीला कळून चुकतो.

३.३) घोड्यावरून प्रवास करताना गाणे व्हायलाच पाहिजे

१९४०-१९५० च्या वेस्टर्नचे बलस्थान होते त्यांच्या रेंजर हिरोंनी म्हटलेली गाणी. एका जीन ऑट्री एपिसोडमध्ये तर अर्ध्या तासाच्या एपिसोडमध्ये १० मिनिटाचे गाणेच होते. इथे तर बॉलिवूड वेस्टर्न आहे. हिरोंना यशश्री प्राप्त झालेली आहे. मग गाणे झाले नसते तरच नवल! तिघेही आपले घोडेस्वारीचे कसब दाखवत गाणे म्हणू लागतात "हम दिलवाले, सारी दुनिया से निराले, हम जैसा कौन हैं?" गाणे संपल्यावर धर्मेंद्राच्या घोड्याने "ओझे वाहायला मी गाढव वाटलो का रे?" हा प्रश्न प्रमोद चक्रवर्तीला नक्की विचारला असावा. डॅनीवर क्लोजअप मारून त्याचे त्रिकालदेवलाही खुश करू शकणारे हास्य बघण्याची संधी आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे. गाण्याच्या कडव्याच्या ओळी मोठ्या मनोरंजक आहेत "हम दोस्त नही हम भाई हैं, इस दौर के हातिमताई हैं" (मागून जितेंद्र कुजबुजतो, हातिमताई मी तू धरम) सतत "हम जैसा कौन हैं" विचारल्यामुळे सूर्याला सुद्धा कंटाळा येतो आणि तो अस्ताला जातो. रात्रीची विश्रांती घ्यावी म्हणून माळरानात घोडे पळवत असणारे ते तिघे थांबतात आणि गाणे संपते.

इथे माझा अल्पविराम. उरलेली चिरफाड प्रतिसादांत.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

वावावा.. फारच भारी सिनेमा! फक्त ससाण्याला खजिन्याचा पत्ता सांगणारा राजा.. खलनायकाला उचकवून त्याच्याकडून आपला हात तोडून घेणारा वफादार प्राण.. तलवारींवर नाचवून फेकून दिल्याने पाठीवर अर्धचंद्राकृती वण बाळगणारा मिथुन.. आणि सगळ्यांत इंटरेस्टिंग त्या तिघांच्या वेगवेगळ्या टोप्या... कॅपजेमिनी कंपनीने या चित्रपटातील मिथुनवरून आपल्या कंपनीचे नाव ठेवले.

काय भयंकर आहे...
असे महान पिक्चर कसे बघता तुम्ही सगळे ☺️☺️☺️☺️☺️

मी अजून शेरू वाला धरमवीर पण पूर्ण पाहिला नाही.लेदर बॉडीकॉन मिड थाय ड्रेस घातलेला धर्मेंद्र पाहून पुढे मुलीने बघू नाही दिला आणि हॉरीड हेन्री बघायला लावले ☺️

धन्यवाद धन्यवाद! ही नुसती अ‍ॅक्नॉलेजमेण्ट. लेख वाचतो सावकाश आज.

जागीर मधल्या केवळ टोप्यांवरच एक लेख होईल असे मागे एकमत झाले होते. होपफुली उल्लेख असेल टोप्यांचा.

शँपेन आवडत असल्याने आत बंद केलेला नाग "घोटभर शँपेन मलाही द्या की" करून बाहेर येतो<<<<
Rofl
तुफान लिहितो आहेस पायस..

Lol
एवढी चिरफाड केल्यानंतर अजून लक्तरं करण्यासारखं काही उरलं नसावं समजून सोडून देतो Proud
बायदवे जितेंद्र अचानक कसा टपकला ?

पायसा... खुप दिवसांनी काहीतरी खुसखुशीत वाचायला मिळाल रे..हाहाहा ..

कॅपजेमिनी कंपनीने या चित्रपटातील मिथुनवरून आपल्या कंपनीचे नाव ठेवले.>> लोल..

प्रतिसादांच्या प्रतिक्षेत..

काय अभ्यास !
काय अभ्यास !
इथून तिथून मिथुन Biggrin

शी! काय बेक्कार हसलीये हे वाचून.

आणखी पण एक कोणी फरकॅपवाला असतो ज्याच्या हातात काही कारणाने बिगुल दिलेले आहे >>>> महान आहे.

सर्व टोप्यांचा एक कोलाज करून टाका ना.

इतका वेळ ठिपकेदार गरुड असलेला शमशेर अचानक बहिरी ससाणा बनतो आणि आजूबाजूला कुठेही मंदिर नसताना पूजेची थाळी घेऊन फिरत असलेल्या आशालताचे लक्ष वेधून घेतो. >>>
अमरीश पुरीला मात्र एव्हाना या लोकांचा मूर्खपणा असह्य झालेला असतो. >>>
"काय ते दिवस होते, एका फूत्कारात माणसे मरायची. नाहीतर आता च्युईंग गम प्रमाणे चघळून विष थुंकणारी माणसे यायला लागली आहेत" >>> Lol

अजून येउ दे पायस

आत्ताच तो ती व्हिलनच्या गटातील तरूणी व जँगो आणि हे तिघे यांच्यातील खंडाळा घाटातील पूर्वीच्या साठे बिस्कीट चॉकोलेट साइन जवळच्या फाइट चा सीन पाहिला. अ. एक बर्‍यापैकी दिसणारी तरूणी व ब. चांदी वगैरेंचे दात लावलेला व्हिलन यांच्यात नॉर्मली अ. कोठे आहे हे ब. ला दरडावून विचारण्यात येते. या चित्रपटाने हे नेमके उलटे केले आहे. त्याबद्दल एखाद्या आर्टी क्रिटिक ने Turning the hostage rescue genre on its head वगैरे तारीफोंके फूल वाहायला हवे होते!

या तिघांना बेहोशी की हालत मे रेल्वे रूळांवर बांधतात त्या सीनची ब्लूपरी काय वर्णावी! अरे लेको तुम्ही कितीही स्वतःला सोडवायची खटपट केली आणि ती ट्रेन कितीही जोरात असली, तिला कितीही वॅगन्स असल्या, तरी यात नाट्य निर्माण होउ शकत नाही. तेव्हा तसेच पडून राहा. घाबरायचे कारण नाही - असे म्हणावेसे वाटत होते. कारण ती ट्रेन चालली आहे एका इलेक्ट्रिफाइड ट्रॅक वर आणि यांना बांधले आहे तशी काही सोय नसलेल्या रूळावर. तेव्हा ती कितीही जोरात आली तरी इकडे येउ शकत नाही. काळजी नसावी Happy

पायस...हा लेख मी वाचून खूप चूक केली. (म्हणजे ऑफिसात वाचून). डोळ्यात पाणी येई पर्यंत हसलो. जागिर विचित्रपट लहानपणी पाहीला होता आता हा लेख बाजूला ठेवून परत बघेन.. Happy

फारएण्ड यांचा वारसा तुम्ही चांगलाच चालवला आहे. अभिनंदन..

धन्यवाद लोक्स Happy

कॅपजेमिनी >> Rofl

पशुपक्ष्यांमुळे मला आवडलेला हा सिनेमा >> सिनेमा खरंच एंजॉयेबल आहे, आर डी ची गाणी जरा रुटीन असली तरी चांगली आहेत.

शेरुवाला धरम वीर >> अगदी अगदी. ससाणे लोकांनी हिंदी चित्रपटसृष्टीच्या राजपुत्रांवर अनंत उपकार करून ठेवलेले आहेत. आय थिंक यातला शमशेर आणि त्यातला शेरू हा एकच शेरू द वंडर बाज नावाने प्रसिद्ध पावलेला पक्षी आहे.

एवढी चिरफाड केल्यानंतर अजून लक्तरं करण्यासारखं काही उरलं नसावं समजून सोडून देतो >> अरे श्री ये तो शोरूम में इतना तो गोडाऊन में कितना टाईप झलक आहे फक्त! पावणे तीन तासांमधली फक्त वीस मिनिटे कव्हर केली आहेत Proud

सर्व टोप्यांचा एक कोलाज करून टाका ना. >> कोणाला जमलं नाहीच तर मी टाकतो नंतर.

ती व्हिलनच्या गटातील तरूणी व जँगो >> अरे ती तरुणी म्हणजे प्रीति सप्रू. त्या दोघांविषयी वेळ आली की लिहितोच.
Turning the hostage rescue genre on its head >> परफेक्ट या सिनेमामध्ये अनेकदा ट्रोप सबव्हर्जन आहे. तो अख्खा सीन पाहून मी विचार केलाच होता की हा सीन तुझ्या रेल्वे ब्लूपर्ससाठी खास बनवला गेला असावा Lol

४) हिरोच्या जीवनध्येयाचा संबंध त्याच्या पालनपोषण करणार्‍या आईशी नसेल तर तो जोडा

४.१) तांबड्या-पांढर्‍या रश्श्याशिवाय जीवन व्यर्थ आहे

रात्री शेकोटी करून आपले तीन हिरो झोपलेले असतात. टू बी प्रिसाईज, धर्मेंद्र आणि डॅनी झोपलेले असतात आणि मिथुन झोपण्याचा प्रयत्न करत असतो. भुकेने कासावीस झालेला असल्याने त्याला झोप येत नसते. त्यात त्याच्या बिस्किटांच्या पुड्यावर या दोघांनी ताव मारल्यामुळे त्याच्याकडे खायला काहीच शिल्लक नसते. एवढ्यात रातकिड्यांना सोबत म्हणून किर्रर्र रात्रीचा कोंबडा आरवतो. त्या आवाजाचा क्यू घेऊन मिथुनला डॅनीच्या जागी कोंबडी आणी धर्मेंद्राच्या जागी कोंबडा दिसायला लागतो पण डायलॉगमध्ये दोहोंना कोंबडी असेच संबोधले आहे. असे सटल आणि काळाच्या पलीकडचे संदेश नको तिथे देण्यासाठी जाणून बुजून हलगर्जीपणा करणार्‍या सेटवरच्या लोकांना माझा सलाम!
कमिंग बॅक टू ओरिजिनल जोक. मिथुन कोल्हापुरचा असल्यामुळे त्याला एक कोंबडी तांबडी आणि एक कोंबडी पांढरी दिसते. आता एवढ्या रात्री जर शेकोटी आहे, कोंबड्या आहेत तर बिचार्‍या मिथुनला भाजलेली कोंबडी खाण्याचा मोह होणे स्वाभाविक आहे. आधी तो पांढर्‍या कोंबडीकडे मोर्चा वळवतो. तेवढ्यात तांबडी कोंबडी कलकलते. बहुधा धर्मेंद्र घोरला असावा. मिथुन पांढरी कोंबडी कापणार इतक्यात डॅनीला जाग येते आणि डॅनी मिथुनची धुलाई करतो आहे हे दुर्मिळ दृश्य आपल्याला बघायला मिळते. स्टोरी डार्क करायची नसल्यामुळे पाच सेकंदांत सर्व गैरसमज क्लिअर होतात आणि ऑफिशिअली विनोदी दृश्यांचा कोटा सुरु झालेला असल्याची वॉर्निंग प्रेक्षकाला मिळते. मिथुनने उठवल्यानंतर डॅनी व धर्मेंद्रालाही जाणीव होते की आपल्यालाही भूक लागली आहे. धर्मेंद्र म्हणतो व्हाय फिकर व्हेन आय अ‍ॅम हिअर. समोर एक गूढ डाकबंगला दिसतो आणि त्याच्या चिमणीतून धूर येत असल्यामुळे प्रेक्षक काय समजायचे ते समजतो. त्यात मागून "ओ ओ ओ ओ ओ" असे पुकारल्यासारखे बॅकग्राऊंड म्युझिक वाजल्याने इथे धरमपाजींना हिरवीण भेटणार हेही नक्की होते.

४.२) हिरोईन की एंट्री

जॉनर बदलला असल्यामुळे धर्मेंद्र जरा सोबर कपडे आणि मुख्य म्हणजे हॅट ऐवजी बेसबॉल कॅप घालून बंगल्यात प्रवेश करतो. इथे धरमपाजींचे इंग्रजी ऐकण्याची संधी आपल्याला आहे. बंगल्याच्या दिवाणखान्यात टेबलावर सुग्रास जेवण मांडलेले असते. घोटभर पाणी प्यावे म्हणून धर्मेंद्र एक ग्लास उचलायला जातो तर गोळी झाडून कोणी तरी तो ग्लास फोडतं. तो शॉट ज्या अँगलमधून येतो ते बघता यातर गोळी मारणारी व्यक्ती धर्मेंद्राच्या बरोब्बर मागे असली पाहिजे, म्हणजे एव्हाना धर्मेंद्र मेलेला असला पाहिजे, किंवा ती धर्मेंद्राला दिसली पाहिजे. पण दोन्हीही होत नसल्यामुळे त्या गोळ्या डायमेंशन बेंडिंग असल्याचे आणि गोळी झाडणार्‍या व्यक्तीकडे पिस्तुल चालवण्याचे जगावेगळे कसब असल्याचे सिद्ध होते. आता अशी व्यक्ती हिरवीण नसली तरच नवल!

ग्लास नाही तर नाही, जग तर आहे म्हणून धर्मेंद्र थेट पाण्याचा जग तोंडाला लावतो आणि मागून झीनत अमान प्रकट होते. तीन वर्षांनंतर येणार असलेल्या डाकू हसीनाची तयारी म्हणून तिने आत्ताच तशी झिपरी केशभूषा केली असावी. त्यात संपूर्ण वेळ कपाळावर पट्टी बांधून फिरायचे असल्याने इथेही कपाळावर रिंग घातली आहे. बिबळ्याच्या कातडीच्या डिझाईनचा टॉप आणि अंगावरून झूल (केप) घेतला असल्याकारणाने ती इथे शिकार करायला आली असल्याचे चाणाक्ष प्रेक्षक लगेच ओळखू शकतो. तिच्या "हॅंड्स अप" कडे धर्मेंद्र साफ दुर्लक्ष करतो आणि ती अजूनच चिडते.
झीनत: "कौन हो तुम? यहां कैसे आ गये?"
धर्मेंद्रः "आप की खूबसूरती की जागीर हमें यहा ले आई हैं" - जागीर, रोल क्रेडिट्स.

सिनेमाचे नाव सिनेमात एकदातरी घेतलेच पाहिजे या नियमाचे पालन झाल्यानंतर ते दोघे काही सेकंद कॅज्युअल फ्लर्टिंग करतात. एव्हाना चाणाक्ष प्रेक्षकांना हेही लक्षात आले असेलच की झीनत अमान इफ्तेकारची मुलगी सीमा असलीच पाहिजे. याचे कन्फर्मेशन आत्ता मिळत नाही पण ती शिकार करायला आली आहे हे ती सांगते. ती धर्मेंद्राला बांधायला तिच्या मैत्रिणीला एक दोरी घेऊन यायला सांगते. धर्मेंद्र तिचे लक्ष तिचे कपडे, तिची दुनळी बंदूक (पक्षी: तिचे डोळे, दुल्हेराजाने आंखियों से गोली मारे ची प्रेरणा इथून घेतली असेल काय?) वगैरे फडतूस विनोद मारून विचलित करतो आणि तिचे पिस्तुल हिसकावतो. आता तिला इंप्रेस करण्यासाठी तो आपल्या बंदूकीचे कसब दाखवतो आणि गोळ्या झाडून बंदुकांच्या कपाटाचे स्लाइडिंग डोअर बंद करतो. प्रत्यक्षात झीनत ते उघडू शकत असते कारण ती लॉक झालेली नसतात पण तरी ती तिच्या मैत्रिणींना बोलवते. त्यांचे सुद्धा सरकते दार असेच बंद होते आणि त्याही ते उघडण्याच्या फंदात पडत नाही. मग ती बहादूर (बीरबल, मैदान-ए-जंग मध्ये अक्षय कुमार आणि करिश्मा कपूरला भांग देण्याचे महान कार्य करणारा माणूस. याचा अकबराशी काहीही संबंध आढळल्यास तो केवळ योगायोग समजावा), म्हणजे बंगल्याच्या चौकीदाराला बोलवते. इथे त्याच्या बंदूकीत गोळ्या न दाखवून सरकार कसे कामचुकार आहे यावर भाष्य केले आहे. पण येण्याआधी तो झोपलेला दाखवल्यामुळे धर्मेंद्राला कोणी अडवले कसे नाही याचे उत्तर मिळते.

झीनत आता भलतीच चिडते आणि थेट इंग्रजी झाडते. यावर धर्मेंद्र गोळी झाडतो आणि उगाचच दिवे फोडतो. इतका वेळ धर्मेंद्र हे सगळे खाणं मिथुन आणि डॅनीसाठी कसे घेऊन जाणार हा प्रश्न तुम्हाला पडला नसला तरी चक्रवर्तीकाकांना पडला होता. म्हणून ते हवेतून भला मोठा डब्यांचा स्टॅक टेबलावर अवतरित करतात. इथे आपल्याला न भूतो न भविष्यति असे दृश्य बघावयास मिळते. श्वास रोखून वाचा. झीनत अमान स्वतःच्या हातांनी जेवणाचा डबा भरते. इथे कोणतीही कंजूषी न करता डबा भरण्याची संपूर्ण प्रोसेस विदाऊट कट दाखवली आहे. एवढेच नव्हे तर फणकार्‍याने का होईना, धर्मेंद्राला दरवाज्यापर्यंत सोडून पण येते. "तकरार के बाद ही प्यार हैं" हे सर्वांना ठाऊक असल्यामुळे शंकर-सीमा जोडी जुळली असल्याचे आपल्याला कळून चुकते.

४.३) जर ऑक्सिजन गॅस आहे तर ऑक्सिजन सिलिंडर आणि गॅस सिलिंडर मध्ये फरक तो काय?

हिरोचा भूतकाळ दाखवणे हे अशा सिनेमांमध्ये अतिशय महत्त्वाचे असते. तो कोणाकडे वाढला, त्याचे लहानपणी छंद अशा बारीक सारीक गोष्टींमधून त्याचे कॅरेक्टर डेव्हलप करता येते. ते जर केले नाही तर पुढे त्याच्या बदला घेण्याच्या प्रोसेसला वैचारिक बैठक प्राप्त होत नाही. धर्मेंद्र झीनतला टाटा करून कुठे गेला याचे उत्तर आपल्याला लगेच मिळते - बागची क्लिनिक अ‍ॅन्ड हॉस्पिटल. आज हॉस्पिटलचे डोनेशन बॉक्स नोटांनी भरभरून वाहत असतात. लाखो रुपयांचे डोनेशन दिलेले असते. ज्याची आजच्या रेटने किंमत होईल कोट्यावधी रुपये. आता जरा सेक्शन २.२ मधल्या गणिताचा आधार घेऊयात. हे डोनेशन आले अमरीश पुरीच्या पैशातून. असे अनेक स्मगलिंग रॅकेट्स आणि इतर धंदे तो चालवत असणार. म्हणजे तो खजिना जेमतेम त्याचे काही महिन्यांचे इनकम असावे. असे असतानाही, इतक्या वर्षांनंतर त्याला तो खजिना हवा असतो. अशा सटल पद्धतीने तो व्हिलन म्हणून किती हावरा आहे हे सूचित होते.

बॅक टू डॉक्टर बागची. दुर्मुखलेल्या चेहर्‍याचा भारत भूषण डॉक्टर बागची दाखवला आहे. धर्मेंद्राने त्याच्यासाठी एक चिठ्ठी सोडलेली असते जिच्यानुसार हे आशियातील टॉपचे हॉस्पिटल असते. प्रत्यक्षात ती बिल्डिंग बाहेरून कॉलेज ते पोस्ट ऑफिस पैकी काहीही म्हणून खपू शकते. भारत भूषणला हे पैसे पाहून धर्मेंद्राची आठवण येते. कट टू फ्लॅशबॅक. आशालता काही कारणाने मृत्युशय्येवर असते. तिच्यावर उपचार करायला धर्मेंद्र तिला या दवाखान्यात घेऊन आलेला असतो. तिचे डोळे आणि नस बघून भाभू लगेच ठरवतो की हिला ऑक्सिजन आणि रक्तदानाची गरज आहे. त्याच्या हॉस्पिटलात एकच सिलिंडर असल्याने तो दुसर्‍या हॉस्पिटलमधून सिलिंडर मागवतो. इथे धर्मेंद्र गॅसचा सिलिंडर असल्याप्रमाणे मी सिलिंडर आणतो, कुठे मिळतो ते सांगा असे म्हणतो. रक्त म्हणून तो फक्त "ओ ग्रुप" इतकेच सांगतो पॉझिटिव्ह-नेगेटिव्ह वगैरे काही नाही. हे सर्व होईपर्यंत खूप उशीर झालेला असतो. आशालता स्वर्गवासी होते. मग भाभू लंबाचौडा डायलॉग मारतो ज्याचे सार असते की सोयी-सुविधा नसल्यामुळे त्याला पेशंट्सवर व्यवस्थित उपचार करता येत नाहीत आणि ते दगावतात. प्रत्यक्षात त्याचा आंबट चेहरा पाहून पेशंटचा आपण नरकाच्या दारावर आलो आहोत असा समज होऊन तो दगावत असावा. धर्मेंद्र मात्र भोळा (आठवा त्याचे सिनेमातले नाव शंकर आहे) असल्याने तो भाभूच्या बोलण्याने फारच प्रभावित होतो आणि प्रतिज्ञा करतो की परत अशी कोणतीही आई उपचारांअभावी मरणार नाही. फ्लॅशबॅक संपला.

प्रत्यक्षात त्याचा आंबट चेहरा पाहून पेशंटचा आपण नरकाच्या दारावर आलो आहोत असा समज होऊन तो दगावत असावा. <<<<<< Rofl
तो कोंबड्यांचा सीन खरंच कहर आहे.

मिथुनला डॅनीच्या जागी कोंबडी आणी धर्मेंद्राच्या जागी कोंबडा दिसायला लागतो >>> ही चार्ली चॅप्लीनच्या गोल्ड रश सिनेमातून उचलेली संकल्पना दिसते. Lol

https://www.youtube.com/watch?v=lAop4Su5Uag

Pages