महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर- कळसुबाई

Submitted by राजेश्री on 24 June, 2018 - 10:54

कळसुबाई
एव्हाना मी आणि निर्मला एकाच जाती,कुळीतील आहे याचा मला शोध लागला.आधी ठरवलं मग गेलो या पेक्ष्या भटकत भटकत ठरवतं जातो. अश्यातऱ्हेनें मी आणि निर्मला भटक्या आणि विमुक्त जगण्याचं प्रतिनिधित्व करतो यात शंकाच नाही..अश्या मुक्त भटकेपणाची आवड दोघीना हि सारखीच आहे याचा आम्हा दोघीना सारखाचं आनंद झाला होता.कळसूबाई शिखर चढायला जायचं याची सूचक आणि अनुमोदक दोन्ही निर्मलाच होती मी केवळ मम अस म्हंटल होत .तिचा फोन आला म्हणाली राजश्री आज शुक्रवार परवा आपण कळसूबाईच्या शिखरावर असणार आहे .मला ती असंभव अस काही बोलते अस वाटलं .तरी विचारलं कोण कोण जायचं ?आणि कसं जायचं ? आपल्या बरोबर अनुभवी कोण आहे का? अस विचारल्यावर आपण दोघीच जायचं आणि तू आली नाहीस तर मी एकटीच जाणार हे तीच एका ओळीच उत्तर (!) होत. जा तिकडं मग एकटीच असं अगदी माझ्या तोंडात आलं होतं पण मी म्हणाले दोघीच जाऊया पण कसं जायचं?तर ती म्हणाली ठाण्याहून इगतपुरी सकाळी 6 वाजता ट्रेन आहे मग तिथे उतरून बारी गावाला मिळेल त्या वहानाने जाऊ आणि तिथून कळसुबाई ला जाऊ हे ऐकून माझ्या डोळ्या समोर काजवे चमकले, आज रात्री सांगते अस म्हणून फोन ठेऊन घरी घोषणा केली की या रविवारी मी कळसुबाई ला जाणार आहे निर्मालाशी बोलताना डोळ्यात चमकलेले काजवे मम्मी ला आत्मविश्वासाची चमक वाटली हा भाग वेगळा . तिचा संभाव्य विरोध लक्ष्यात घेता मी म्हणाले अग असंही मी बदलीच्या कामासाठी मुंबईला जाणारच आहे एक दिवस आधी मुंबईला जावं लागेल इतकंच . कळसूबाई च्या पायथ्याशी गेले आणि लगेच चढायला लागले असं कशाला करेन?खूप पाऊस,निसरडी वाट असेल तर चढणार पण नाही .तिने लगेच मला थोपवन्याच्या हालचाली म्हणून माझ्या घोषणेची तायडीला कल्पना दिली,उलटपावली तिचा फोन. प्रश्न पहिला का जायचंय कळसुबाईला? उत्तर जायचंय. हो पण जायचं का आहे?अग का जायचं वैगेरे काही उत्तर नाहीत महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाणी जायचंय आम्हाला.इति मी. मग हरभऱ्याच्या झाडावर चढून बस.इति तायडी.काही मार्ग न निघणाऱ्या संभाषणानंतर तिने रागाने फोन ठेऊन दिला . तयारीसाठी तोच दिवस होता.काय तयारी करावी न सुचल्याने काहीच तयारी करता आली नाही .शुक्रवारी रात्रीची 10.45 ला गाडी होती मुंबई मध्ये धुवांधार पाऊस पडत असल्याच्या T.V.वर बातम्या होत्या . ठाण्यात सकाळपासून वाहतूक ठप्प होती एवढ्या भर पावसात जाऊ नकोस असा निर्वाणीचा काळ्जीयुक्त सल्ला मम्मी देत होती . पाऊस एक सारखा पडून रहात नाही थांबेल तू काळजी करू नकोस म्हणत मी गाडीसाठी रवाना झाले .पहाटे 5.45 ला ठाण्यात पोहचले .पाऊस पूर्ण उघडला होता.निर्मला म्हणाली सुद्धा चार दिवस सलग पाऊस पडतोय आज सूर्य उगवला बग तुझ्या पाठोपाठ मी लगेच हरभऱ्याच्या झाडावर चढून तायडीला फोन करून सांगितलं पाऊस उघडलाय. इथे अक्षरशः ऊन पडलंय,मम्मी ला पण सांग पोहोचले मुंबईत म्हणून. त्यादिवशी मी माझी मैत्रिण सुदर्शना ला भेटायला कोकण भवन ला गेले . आम्ही वाशी ला मॉल मध्ये फिरायला जाऊन धमाल मज्जा केली तिने colour आवडला म्हणून जो T shirt घेतला त्यावर लिहिलं होतं follow your dreams मी कळसुबाई ला हाच ,T Shirt घालून Dream follow करायचं ठरवलं. त्या संध्याकाळी आमचा तिसरा शिलेदार शितल हि आमच्या कंपूत येऊन सामील झाली. निर्मला ऑफिस मधून आल्यावर सांगितलं त्यांच्या ऑफिस मधील 9 सहकारी भीमाशंकर ला जाणार होते मी त्यांना आपले पन्हाळा पावनखिंड मोहिमेचे फोटो दाखवून कळसू बाई साठी तयार केलंय, शिवाय एक सहकारी नाशिक Toll नाक्यावर येऊन मिळतील आणि सर्वात बंपर news म्हणजे आपला psi Tranning चे batch mate यादव सर गाडी घेऊन येणार आहेत .तेंव्हा कळसुबाई च्या पायथ्यापर्यंत आपण कार नी जातोय.हे ऎकल्यावर मम्मी ला लगेच फोन करून कळवलं ती म्हणाली राजे,"तुम्ही कोणतं काम ठरवलं आणि झालं नाही असं होईल का ...सांभाळून जावा"
सकाळी ६ वाजता रवाना व्हायचंय म्हणून ४.३० चा गजर लावला सर्वांसाठी चपाती भाजी बनवायचा घाट निर्मला आणि शितल ने घातला होता .पहाटे ५ ला मला शितल ने उठवायचा प्रयत्न केला पण मी कूस बदलून झोपी गेले.शेवटी ५.४५ ला उठले तर त्या दोघीनी चपाती भाजी करून डबा तयार केला होता.निर्मालाने मला अंघोळीला पाणी दिलं. चहा ठेवला मी मुकाट्याने पटकन आवरून तयार झाले. बरोबर ६ ला गाडी दारात हजर .तरी आम्ही 6.45 वाजता गाडीत स्थानापन्न झालो. आता कोणताही प्रवासाचा ताण न येता आम्ही कळसुबाई च्या पायथ्याशी अलगद अस पोहोचणार होतो .वाटेत आठ च्या दरम्यान नाष्टा केला. आणि प्रसन्न मनाने कळसुबाई साठी मार्गस्थ झालो . तिथेच इतर ९जण आम्हाला येऊन मिळाले .त्यांच्याकडे मोठी गाडी होती.प्रवासादरम्यान खूप निसर्गरम्य वातावरण आहे. ढग धरेला भेटण्यासाठी खाली आल्यासारखं वाटत. वाटेत नाशिक च्या टोलनाक्यावर निर्मलाचे सहकारी PSI आम्हाला येऊन मिळाले .३ तासांनी इगतपुरी मार्गावरील घोटी या गावापासून घोटी भंडारदरा रस्त्याने बारी गावात पोहचलो . कळसुबाई शिखराच्या अगदी ३km अलीकडे पुढे वाट नाही गाडी इथे पार्क करा असा अनाहूत सल्ला आम्हाला काहीजण देत होते.परंतु पुढून गाड्या येताना दिसतायत म्हंटल्यावर यादव सरांनी गाडी पुढे घेतली तर अगदी पायथ्याला लागूनच पार्किंग ची सोय दिसली. अनोळख्या गावात आपल्याला खूप अनाहूत सल्ले देणारे भेटतात कोणतीही चाचपणी केल्याशिवाय विश्वास ठेवायचा नाही ही गोष्ट मी शिकले.
हर हर महादेव म्हणत प्रत्यक्ष चढाईस सुरवात केली . आणीबाणी मध्ये मदतीसाठी आपण लगेच 100 हा नंबर डायल करून पोलिसांना पाचारण करतो माझ्याबरोबर तीन API एक PSI व निर्मलाच्या ऑफिस मधील नऊ सहकारी असा फौज फाटा होता त्यामुळे मी अगदीच निश्चीन्त होते.
अगदी सुरवातीलाच कळसुबाई च मंदिर लागत पावसाळा होता तरी पावसाची काही चिन्ह दिसत न्हवती..आम्ही जवळपास १२ च्या दरम्यान चढाईस सुरवात केली . कोणत्याही गडावर शिखरावर चढण्याची ती आदर्श वेळ न्हवती महाराष्ट्रातील उंच शिखर कसे असेल असे मनात काही आखाडे बांधले होते.पण गेलो की चढ लागले अस होत नाही . खर तर त्या शिखराच्या चढणीचे चार टप्पे पडतात पहिला टप्पा शिखराचा पाया म्हणून लगेच चढ लागत नाहीत पावसाने छोटे छोटे ओढे,ओहोळ तयार झाले आहेत ते पार करीत जायचं.अगदी पावनखिंडीतल्या वाटेसारखी काही ठिकाणी वाट लागते.पहिला टप्पा पार केला की पठार लागते ज्यांना वर जाऊन कळसुबाई च दर्शन घेणं श्यक्य नाही त्यांच्या साठी खाली देऊळ आहे.
या पहिल्या टप्यात मी व शितल सोबत होतो निर्मला निवांत मागून येत होती. दुसरा टप्पा दमवणारा आहे जरा पावलं विश्रांती ला थांबली कि पुन्हा चढाई करायला जीवावर येत होत आम्ही न थांबता हळू हळू तरी चालत राहायचं ठरवलं. शिखरावरून परत येणाऱ्या लोकांचा मला हेवा वाटत होता अजून वर किती राहिलय असं विचारत आम्ही शिखर जवळ करीत होतो.शरीरातून येणाऱ्या अखंड घामाच्या धारा टप टप जमिनीवर पडत होत्या. थोडं थोडं पाणी पीत आम्ही मार्गक्रमण करीत होतो. कधी कधी एखादी कठीण मोहीम पार पाडली कि माझ्या अंगावर मूठभर मांस चढत आणि मी मम्मी ला त्याच वर्णन करताना अस काही त्यात add करून सांगते की तिला वाटावं आपली पोरगी रजनीकांत पेक्ष्या धाडशी आहे. तिसऱ्या टप्प्या पासून चढायला लोखंडी शिड्या आहेत.थोडा अवघड चढ आहे पण काळजीपूर्वक एक एक पायरी चढत जाताना दोन्ही हात शिड्यांना घट्ट पकडून तो टप्पा पार करू शकतो अश्या चार ठिकाणी लोखंडी शिड्या आहेत.त्या शिड्यांवरचे काढलेले फ़ोटो दाखवताना काही अचाट पराक्रम केल्यासारखं मी मम्मी ला म्हणाले मम्मी त्या लोखंडी शिड्यांखाली दरी होती हात सुटला कि direct दरीच .तिच्या चेहऱ्यावर सुन्न भाव होते नंतर म्हणाले अग नाही त्या शिड्या मोठया मोठया दगडांच्या आधाराने बसवल्या होत्या दरी वैगेरे काही न्हवतं. परंतु बोला फुलाची गाठ असं काहीसं म्हणतात ना तसा साक्ष्यात अनुभव तोरणा किल्ल्याची झुंझारमाची सर करताना आला तिथल्या अजस्त्र कातळांवरून थोडासा पाय घसरला तर साक्ष्यात दरीच होती खाली.तेंव्हापासून मी मम्मीला असं काही गंमत म्हणून पण सांगायचं नाही असं ठरवलं.
चौथी लोखंडी शिडी पार केली की कळसुबाई च्या शिखराच्या अगदी जवळ येऊन पोहचलेलो असतो आपण.आजू बाजूला वेगवेगळ्या रंगाची लाल फुले बघायला मिळतात.ता.ना.पी.हि.नि.पा. जा. या सप्तरंगी फुलांची उधळण तर आहेच पण त्यांचे आकार हि खूप वेगळे आणि आश्चर्यचकित करणारे आहेत. वर वर जाऊ तसे शिखरावरची वाट ढगात लुप्त होते असे वाटत. पुढचं काही दिसतच नाही. अंदाजाने पावले टाकत मी वर वर जात होते. चढाईच्या शेवटच्या अर्ध्या तासात आता शिखर आलं मग आलं अस वाटत राहतं. मधेच थांबून आम्ही दाट लोणी असलेल्या ताकाचा आस्वाद घेतला.आता सगळे सोबती मागे पुढे विखुरले होते.मी एकटीच माझ्या तालात चालत होते .खूप विलक्षण आणि व्यक्त न करता येणार वातावरण आहे तिथे शेवटचा अर्धा तास चालण्याचा थकवा येत नाही जो मजा सफर में है ...वो मंज़िल मे कहा अगदी अस वाटत राहतं .लहानपणी प्रत्येकाला वाटत राहतं कि ढगापर्यंत पोहोचायच तर किती शिड्या लावाव्या लागतील आज मी प्रत्यक्ष शिड्या चढून ढगात पोहचले होते . तिथे सुटलेलं गार वार आल्हाददायक या शब्दाची खरी अनुभूती देत होत.या अनुभूतीच्या गुंगीतच शिखराच्या सर्वोच्च टोकाला पोहचले.शितल व इतर सहकारी तिथे आधीच पोहचले होते . तिथे १६४६ महाराष्ट्रातील सर्वोच्च शिखर अस मोठया दगडावर खडून लिहिलं आहे . टोकावर कळसुबाई च छोट मंदिर आहे. खरं तर कळसुबाई ची एक लोककथा अशी वाचली होती की कळसू नावाची एक कोळ्याची मुलगी पाटलाच्या घरी कामाला होती .तिची एक अट होती की ती केर काढणे व भांडी घासणे हि कामे सोडून ती इतर कामे करील. पण एक दिवस पाटलाच्या घरी खूप पाहुणे आल्यामुळे अटीत असणारी कामे करायला तिला सांगितले जाते मग ती रागाने त्या उंच डोंगरावर चढून तिथेच झोपडी बांधून राहू लागते.मला आपल्याला लहानपणी सांगितलेल्या ध्रुव ताऱ्याच्या गोष्टीशी साम्य असणारी ही गोष्ट वाटली.तिथे जाऊन नमस्कार केला. निसर्गाचा अत्युच्च आविष्कार पहिला कि मला देवत्वाची प्रचिती येते. मी तिथे नतमस्तक झाले.शिखराच्या उत्तरेला रामसेन, अचला, अरिहंत, सप्तशृंगी इ. डोंगररांगा दृष्टीस पडतात तर पूर्वेस विश्रामगड,अलंग,मदन,कुलंग,हरिश्चंद्रगड लक्ष्य वेधून घेतात. वेगवेगळ्या रंगाच्या फुलांच्या एकसलग अश्या पखरणी गालिचे पसरल्यासारखे दिसतात.दोन्ही बाजूला दऱ्या आहेत तिथेही फुलांनी नाना रंगांची अक्षरशः उधळण केली आहे त्यामुळे त्या दरीत डोकावताना भीती वर आनंदाची भावना मात करते. इथलं वातावरण मस्त,सुंदर,अप्रतिम या कोणत्याच शब्दांच्या व्यक्ततेत मावत नाहीत . स्वतः बघून त्याच स्वर्गीय सौंदर्य अनुभवायला इथे प्रत्येकाने एकदा तरी यावं.ऑक्टोम्बर हा इथे येण्यासाठी आदर्श महिना आहे. अगदी ४ वर्षांच्या लहानगी पासून ७५ वर्षाचे आजोबा हि तेवढ्याच हिरीरीने शिखर सर करत होते एव्हाना एक एक करत शिखरावर पोहचत आम्ही १४ जणांनी सोबत आणलेली चपाती उसळ वाटून खाल्ली .एक चपाती त्यावर थोडी उसळ आणि लोणचं असं पटापट मीच वाटून दिल तर सर्वांना मीच चपात्या केल्या आहेत असं वाटलं त्यांचा तो गैरसमज तसाच राहुदे अशी निर्मालाला लांबूनच डोळ्याने खुण केली. मी तिला सोडून पुढं निघून आले म्हणून तिचा माझ्यावर राग होता.पण photo session , Selfie मध्ये तो पळून गेला . आम्ही दोघी महाराष्ट्रातील सर्वात उंच ठिकाणी फुलपाखरासारखे बागडत होतो.त्याक्षणी आम्ही त्या ठिकाणाचे कळसू किंवा ध्रुव होतो.
जा ढगात अस कुणी म्हंटल कि आपण इथे येऊ अस ठरवुन आम्ही कळसुबाई वरून खाली उतरू लागलो. उतरताना त्रीव्र उतारामुळे सावध पावले टाकावी लागतात. खाली उतरताना त्या छोट्या छोट्या पायऱ्यावरून उतरताना दुडक्या चालीने खाली यावे लागत होते, हात थोडे वर करायचे,मान थोडी तिरकी आणि अश्या दुडक्या चालीने तिरक्या तिरक्या पायऱ्या उतर ना अगदी देवानंद सारखं वाटतंय अस मी निर्मलाला दाखवत पायऱ्या उतरत होते. बाकीचे खाली उतरणारे ते बघून खळखळून हसत होते. आम्हाला चढायला 3 तास लागले पण खाली मात्र एक ते दीड तासात आलो. कळसूबाई शिखराच्या पायथ्याशी पांढऱ्या शुभ्र पाण्याचा ओढा खळाळत वाहणारा ओढा आहे, भातशेतीच्या बांधावरून चिखलात पाय गेल्यावर पायातले बूट काढून पाय धुतले,पाय धुणे हे निम्मितच होते निर्मला आणि मी एकमेकींच्या अंगावर पाणी उडवून चिंब भिजून गेलो. पाण्यात मनसोक्त डुंबून सहाच्या दरम्यान भंडारदरा धरण पहायला गेलो पण तिथले रस्ते बंद असल्याने मागे फिरावे लागले.मग परतीच्या प्रवासास सुरवात केली. १६४६ मीटर चढून उतरून आमचा गाडीतील पाच जणांचा कंपू उत्साहीच होता आठच्या दरम्यान हॉटेल मध्ये जेवायला थांबलो प्रत्येकाच्या फोन वरील फोटोंची देवाणघेवाण केली ,पुन्हा फोटो बघता बघता मनाने कळसुबाई च्या शिखरापर्यन्त पोहोचलो.... आज मैं उपर ...आसमा नीचे.... आज मै आगे जमाना है पिछे सारखी गाणी गुणगुणत कधी ठाण्यात पोहोचलो हे कळलेच नाही...
©राजश्री

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान अनुभव.....
मी जातो प्रत्येक वर्षी कळसुबाई न चुकता....
आता इगतपुरी - आंबेवाडी - बारी/ कळसुबाई या नविन रोड ने गेला तर अंतर कमी आहे आणि रस्ता पण खुप छान आहे...

शिखराच्या उत्तरेला रामसेन, अचला, अरिहंत, सप्तशृंगी इ. डोंगररांगा दृष्टीस पडतात तर पूर्वेस विश्रामगड,अलंग,मदन,कुलंग,हरिश्चंद्रगड लक्ष्य वेधून घेतात >>>>> हे सर्व माथ्यावरून नक्की दिसले तुम्हाला ?

शिखराच्या उत्तरेला रामसेन, अचला, अरिहंत, सप्तशृंगी इ. डोंगररांगा दृष्टीस पडतात तर पूर्वेस विश्रामगड,अलंग,मदन,कुलंग,हरिश्चंद्रगड लक्ष्य वेधून घेतात >>>>> हे सर्व माथ्यावरून नक्की दिसले तुम्हाला ?<<<<<<<@योगेश सर हो कारण अलंग मलंग कुलंग तर स्पष्ट दिसतात.उत्तरेकडील डोंगररांगा दाखवताना अंदाजे क्रमाने दाखविल्या होत्या