दगडूबाई

Submitted by मनवेली on 31 March, 2018 - 13:52

दगडूबाई...अगदी कथेत शोभेल असं नाव आणि व्यक्तिमत्त्व ही तसंच. कपाळावर ठसठशीत कुंकू, सावळा रंग, नऊवारी साडी, खणाचं पोलकं, टापटीप राहणी, काटक शरीर आणि अंगात कमालीचा उरका. प्रत्येक काम मनापासून आणि उत्साहानं करण्याची वृत्ती, अशी होती आमची दगडूबाई. आमची मदतनीस, मोलकरीण नव्हे तर घरातलीच एक. ती, तिचं वागणं, काम करणंच असं होतं की ती घरातली कामवाली नं राहता घरातलीच एक केंव्हा होऊन गेली ते आम्हाला कळलं ही नाही. अंगात चिकाटी, पडेल ते काम करण्याची तयारी असलेली आणि सतत आनंदाने सळसळणारी अशी दगडूबाई. आळस, कंटाळा हे शब्दं जणू ठाऊकच नव्हते तिला. आमच्या घरी अवघी तीस वर्षं काम केलं तिनं आणि माझ्या मनातल्या ’मोलकरीण’ ह्या संकल्पनेला एक नवीन परिभाषा दिली. अशी ही दगडूबाई मला आजही आठवते.

दगडूबाई आठवली की मन थेट वीस वर्षं मागे जातं आणि डोळे आपोआपच भरुन येतात, आजही. तिचे ते कष्टं, तिची ती जिद्द, परिस्थितीशी दिलेला लढा, एकहाती ओढलेला संसार आणि प्रतिकूल परिस्थितीतही चेहरयावरचं हसू नं हरवू देता तिनं मांडलेला आयुष्याचा डाव...हे सारं आठवलं की आभिमान वाटतो तिचा आणि जगण्याची नवी उमेद मिळते जणू. दगडूबाईचा नवरा परागंदा होता पण तो कधी न कधी येईल ह्या आशेवर ती जगत होती. एक कधीही नं संपणारी प्रतीक्षा तिच्या वाटयाला आली होती. पण हे सगळं तिनं आनंदानं स्वीकारलं होतं. ती अधेमधे आईला म्हणायची, "माझे मालक आज मझ्या बरोबर नाहीत. पन ते कुटंतरी हाएत. आज न उद्या येतीलच की; त्यांना बि माझी आठवन येतच असंल. तुमी बघा वहिनी एक न एक दिवस ते येनार, नक्की येनार!" मी पण ऐकलं होतं तिचं हे वाक्य एक-दोनदा. पण तिच्या ह्या ’दारुण’ आशेची मला कधी कीव नाही आली. अगदी लहान वयात फ़ारसं काही कळत नव्हतं, मधल्या वयात मला तिचा आभिमान वटायला लागला. ती होतीच तशी. सहानुभूती मिळवण्याची तिची धडपड कधीच नव्हती. आणि तिची मुद्रा सदैव हसरी. त्यामुळे आम्हाला सगळ्यांनाच तिचं कौतुक वाटायचं आणि आदरही.

माझ्या जन्माच्या ही आधीपासून दगडूबाई आमच्याकडे कामाला होती. मी अगदी लहान असल्यापासून तिला पाहत होते. तेंव्हा आमचा मोठा बंगला होता. एकत्र कुटुंबं, घरात खूप माणसं, सततचा १२-१५ माणसांचा राबता. दगदूबाई न चुकता रोज सकाळी ८-८.३० च्या सुमारास घरी येत असे. मग पडतील ती कामं अगदी मनोभावे करायची ती, जणू काही ती स्वत:च्याच घरातली आसावीत. घरातल्यांनीही तिला कधीच नोकरासारखं वागवलं नाही. तिचा सकाळचा चहा आमच्या बरोबरच असायचा. अधे-मधे ती आमच्याचकडे जेवायची सुद्धा. आई, काकू, आजी कधी तिला घालून पाडून बोलल्याचं मला आठवत नाही. आजी तिच्यासाठीही कधी लुगडं, कधी बांगड्या असं काही ना काही आणत असे.

धुणं-भांडी, केर-फ़रशी ही तर तिची रोजची कामं असायची. आणि कधी घरी पाहुणे असतील तर भाजी निवडणं, घर आवरणं अशा कामांमधे दगडूबाईची मदत होत असे. जागा मोठी होती. घरासमोर छोटं आंगण आणि मागे लहानशी बाग होती. त्या बागेतल्या झाडांची निगा, अंगणाची साफ़सफ़ाई ही तर कोणीही नं ठरवताच दगडूबाईची कामं होऊन गेली हो्ती. घराला जेंव्हा-जेंव्हा तिची गरज भासे, तेंव्हा-तेंव्हा दगडूबाई तत्परतेने येत असे. भरवशाची, एका हाकेला धावत येणारी अशीच होती. हे काम माझं नाही, किंवा ह्या कामाची बोली झाली नव्हती असलं काही ती कधीच म्हणत नसे. एकदा मी तिला आजीशी बोलताना ऐकलं होत. ती म्हणाली होती, "तुमच्या घरातली समदी माणसं मला माझीच वाटतात. पैशाचं म्हनाल तर मला असा किती पैका लागनारे, अनि पैसा घेऊन तरी कुटं जानारे मी? मला ह्या घरानं भरभरुन प्रेम दिलंय. अशी माया करनारी मानसं मिळनं लै भाग्याचं हाय. हातपाय चालतयत तोवर मी हितंच काम करनार."

Loyalty, dedication म्हणजे तरी वेगळं काय असतं? दगडूबाई कोणत्याही contract मधे बांधलेली नसतानाही, कोणत्याही appraisal किंवा promotion ची अपेक्षा नं करता self-motivatedly काम करत होती. तिने कुठे घेतले होते management science किंवा employee ethics चे धडे? पण दगडूबाई स्वत:च्या जगण्यातून खूप काही शिकवून गेली मला. तिचा आशावाद, तिची उमेद, जीवनाकडे पाहण्याचा तिचा दृष्टिकोन, तिचा सच्चेपणा...ह्या सगळ्यातून किती शिकण्यासारखं होतं.

अशा दगडूबाई आता दुर्मिळ झाल्या आहेत. तेंव्हाचं सगळंच वेगळं होतं. बराच काळ लोटला त्या गोष्टीला. पुढे दगडूबाई थकली. तिच्या नशीबात एकटेपणाच लिहिला होता. ती ज्याची वाट पाहत जगत होती तो, तिचा नवरा कधीच परत अला नाही. हात-पाय थकले होते, चेहरा सुरकुतला होता. पण तिच्या चेहरयावरची ती तरतरी, तिचं वाढतं वयंही पुसू शकलं नव्हतं. मन तरतरीत असलं तरी शरीर थकत चाललं होतं. पुढे पुढे दगडूबाईचं आमच्याकडे येणं कमी झालं. घरातले सगळेही आपापल्या मार्गाने गेले, पूर्वी १२-१५ माणसांचा राबता असलेला, सतत गजबजणारा बंगला आता ओस पडत चालला होता, घरातली माणसं कमी होत गेली तसं ते मोठं घर खूप ’मोठं’ पडायला लागलं. मग आम्ही बंगला विकण्याचा निर्णय घेतला आणि flat मधे राहायला आलो. ती जागा सुटली, आणि दगडूबाई ही. नंतर ती कधी भेटली नाही आणि तिच्याबद्दल काही कळलं ही नाही. आज दगडूबाई असेल...नसेलही पण तिची आठवण आमच्या बरोबर आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकंदर तो काळ आता राहिला नाही. ना राहिली दगडूबाई. त्या बंगल्याप्रमाणे काळाच्या ओघात दगडूबाईसुद्धा एकाकी पडली असेल. पण त्या सुनसान भिंतीना कधीकाळचा तो गजबजाट आणि दगडूबाई अजूनही आठवत असतील.

काळाचे चटके खावून घडलेल्या ज्या साध्याभोळ्या माणसांकडून खूप काही शिकण्यासारखं असतं अशी माणसंच अनेकदा एकाकी व दुर्लक्षित आयुष्य जगत असतात. आजकाल "अशा दगडूबाई आता दुर्मिळ झाल्या आहेत" हे सुद्धा तितकच खरं आहे. जुन्या आठवणी जागवल्या तुमच्या या लेखाने!

मस्त लिहिलंय. अशी आठवण आली की त्या काळाच्या ओघात हरवलेल्या माणसांना शोधायची इच्छा उफाळून येते, नाही का?>>>>>>> +१.

मस्त लिहिलय
काळाच्या ओघात हरवलेल्या माणसांना शोधायची इच्छा उफाळून येते, नाही का?>>>>>>> +११११

फारच सुंदर....

लेखनशैलीही सुरेखच....