वलय - प्रकरण ३४ ते ५२ (समाप्त)

Submitted by निमिष_सोनार on 9 March, 2018 - 02:01

प्रकरण २९ ते ३३ ची लिंक: https://www.maayboli.com/node/65520

प्रकरण 34

शेवटी राजेश मोहिनीला सोबत स्वतःच्या गाडीत घेऊन निघाला. ती अर्धवट धुंदीत राजेशच्या बाजूला बसली होती. मोहिनीने "यंग गर्ल" हा परफ्यूम लावला होता. त्याचा सुवास अगदी छान, मस्त आणि मादक होता. अगदी फक्त लेडीजला शोभेल असा!

थोडी कमी शुद्धीत असल्याने ती त्याला जास्त चिकटून बसली होती आणि त्यामुळे तिच्या शरीराचा गंध राजेशच्या शरिराला हळूहळू लागत होता. घरी जायला आधीच उशीर झाला होता त्यात अजून आता मोहिनीला सोडून आल्यानंतर आणखी वेळ होणार होता.

त्याने आतापर्यंत अनेक कथांमधून असे प्रसंग चितारले होते की रात्री कारमध्ये एक सुंदर तरुणी असतांना कार खराब होते, मग ते दोघेजण रात्र एका अज्ञात बंगल्यात घालवतात, मग पाऊस येतो, विजांचा कडकडाट होतो, मग ती तरुणी तरुणाला बिलगते आणि मग "ते" घडते किंवा मग रात्री तरुणी तरुणाच्या फ्लॅट वर थांबते आणि मग "ते" घडते अशा प्रकारचे अनेक प्रसंग लिहिले होते. मनातल्या मनात तो ते प्रसंग आठवून हसत होता. खऱ्या जीवनात असे घडत नाही! विशेषत: एक चांगली मैत्रीण सोबत असतांना??

मग एका लेखकाच्या दृष्टीकोनातून तो विचार करू लागला: तरुण तरुणी योगायोगाने कारमध्ये एकत्र आल्यावर खऱ्या जीवनात नेमके काय घडते किंवा घडू शकते? असा विचार करत असतांनाच त्याने एका शॉर्टकट मार्गाने गाडी वळवली कारण शॉर्टकट मारूनसुद्धा अजून अर्धा तास मोहिनीच्या फ्लॅटवर जायला लागणार होता आणि मग तेथून निघून अंदाजे रात्री अडीच वाजेपर्यंत तो घरी पोहोचणार होता...

बराच वेळ गाडी चालवत चालवत आता एक निर्जन रस्ता लागला होता. उद्या रत्नाकरचा माग काढायचा आणि काय काय करायचे याचा तो गाडी चालवतांना विचार करत होता.

रत्नाकारला त्याने जाब विचारायचे ठरवले की "मित्रा माझी कथा का चोरलीस? चोरलीस ते एका दृष्टीने चांगले केले की मला माझ्या लेखनाची पत कळली की माझ्या लेखनावर चित्रपट सुद्धा बनू शकतो! पण मित्रा, चोरी ती शेवटी चोरीच! अशा अनेक लेखकांच्या कथांची चोरी तू केली असशील! माझ्या प्रयत्नांनी मी येथपर्यंत पोहोचलो पण ते सगळे लेखक ज्यांच्या कथा तू चोरल्या असशील त्यांनी काय केले असेल? त्यांचे किती नुकसान झाले असेल?"

स्ट्रीट लाईटच्या प्रकाशात समोरच्या काचेतून चार माणसं काठ्या घेऊन अगदी रस्त्याच्या मधोमध उभी असलेली त्याला दिसली. त्याने गाडीचा वेग कमी केला पण तरीही ती माणसे रस्त्यातून बाजूला होईनात. ती सगळी माणसं दारू पिलेली दिसत होती असे एकंदरीत त्यांच्या अडखळत चालण्यावरून दिसत होते. राजेशने हॉर्न वाजवला पण ते रस्त्याच्या मधून तसूभरही बाजूला झाले नाहीत. शेवटी राजेशला गाडी थांबवावीच लागली कारण उलट्या बाजूने पटकन वळून परत जाण्याऐवढा रस्ता काही रुंद नव्हता.

आता काय करायचे या विचारात असतांनाच त्यातला एक माणूस मोहिनीच्या बाजूच्या खिडकीजवळ येऊन म्हणाला, "खोलो दरवाजा. इस लडकी को बाहर निकालो, बाहेर काढ तिला साल्या! पळवून नेतोस काय मुलींना रात्री? आमच्या हवाली कर तिला! अशा सेक्सी मुलींवर आमचा हक्क आहे!"

ते लोकल गुंड आहेत हे ओळखून राजेश गाडीचे काच खाली सरकवून आवाजात उसने अवसान आणि हिम्मत आणून खोटे खोटे म्हणाला, "माझ्याकडे बंदूक आहे, चुपचाप बाजूला हो आणि जाऊदे आम्हाला! नाहीतर मी गोळी घालेन एकेकाला! मी घाबरत नाही कुणाला! खून करून टाकीन मी तुमचा!"

तो आणि इतर गुंड हसायला लागले.

राजेशला न जुमानता त्या गुंडाने मध्ये हात घालून दरवाजा उघडला आणि मोहिनीला गाडीबाहेर खेचले. गुंडांजवळ काठ्या आणि चाकू होते. हे अगदीच अनपेक्षित आणि अचानक झाल्यामुळे राजेशपण पटकन दरवाजा ढकलून गाडीबाहेर आला. इतर तिघांनी मिळून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला पण तो चपळाईने गाडीच्या मागच्या बाजूला गेला आणि डिक्की उघडून त्यातील कॅमेराच्या स्टिक बाहेर काढून तो त्या चौघांकडे पळाला.

मोहिनी अर्धवट शुद्धीत असल्याने तिचा प्रतिकार कमी पडत होता. गुंडांपैकी दोघांनी तिला पकडून ठेवले आणि एका गुंडाने डोक्यातून आपण बनियन काढून टाकतो तसा तिचा टिशर्ट ओढून काढला. ओढतांना तिने विरोध केल्याने तो फाटला. आता फक्त मोहिनीच्या छातीवर एक छोटीशी ब्रा होती. ते तिच्याशी लगट करायला लागणार तोपर्यंत राजेश स्टिक घेऊन तिथे वेगाने आला आणि त्याने गुंडांना आव्हान दिले.

राजेश - "सोड तिला!"

गुंड1- "तूच सोडून दे तिला आमच्याकडे आणि चुपचाप गाडीत बसून घरी जा. नाहीतर तुझा मुडदा घरी जाईल!"

गुंड2- "अशे मस्त मस्त मस्त कपडे घालून ही गाडीतून रात्री बेरात्री तुझ्याबरोबर फिरते आहे आणि तू रे? मूर्खां! जंटलमन सारखा तिच्या शेजारी नुसता बसून राहिलास आणि निमूटपणे गाडी चालवत होतास?"

गुंड3- "तुझ्या जागी आम्ही असतो तर तिला केव्हाचा...जाऊ दे! तुझ्यासारख्याला सांगून काय उपयोग रे नामर्द माणसा! आता तिला आता आम्हीच सगळे मर्द गडी मिळून...!!!"

गुंड2- "या रस्त्याने जी पण मुलगी रात्री जाते ना ती आमच्या तडाख्यातून सुटत नाही! एकटी असो की दुकटी!"

राजेश स्टिकने प्रहार करायची योग्य संधी शोधत होता.

तो मिस्कीलपणे म्हणाला, "तिची हरकत नसेल तर ती येईल तुमच्याबरोबर! काय गं मोहिनी जायचं आहे का तुला त्यांचेबरोबर? ते म्हणतात की ते खूप तगडे मर्द गडी आहेत! तुझी हरकत नसेल तर जा तू त्यांचे सोबत! मला काहीच प्रॉब्लेम नाही"

त्यांना अनपेक्षित बोलण्यात अडकवून तो काठीचा झटका त्यांना मारण्याची संधी शोधत होता. हे मोहिनीलाही कळत होते. पण ती अर्धवट शुद्धीत होती.

मोहिनी नशेत हेलकावे खात म्हणाली, "नाही राजेश! मला या चार नामर्दांबरोबर कुठेच जायचे नाही आहे! पण मला यांना सगळ्यांना कुठेतरी पाठवायचे नक्की आहे! काय रे नामर्दांनो? जाणार का? "

राजेश, "कुठं गं? कुठं पाठवायचं म्हणतेस यांना?"

"यमाच्या रेड्यावर बसवून नरकात पाठवायचं आहे यांना! तिथे उकळत्या तेलाच्या कढईत चौघांना नंगे करून तळतील!" असे म्हणून तिने लहान मुली सारख्या टाळ्या वाजवल्या.

गुंड त्यामुळे भयंकर चिडले.

राजेश, "ठिक आहे! तू कशाला घेऊन जातेस? मीच पाठवतो त्यांना तेथे! साधारण अर्धा तास बेदम मारले की हे नक्की मरून जातील! मग डायरेक्ट नरकात!"

असे म्हणून त्याने संधी साधून चपळाईने अचानक हमला करून त्याच्या हातातली स्टिक जोरारोराने फिरवली आणि गुंडांच्या हातातील चाकू आणि काठ्या खाली पाडल्या.

ते चारही जण चवताळले. एकाने मोहिनीला घट्ट धरून ठेवले आणि इतर तिघांनी राजेशवर लाथा बुक्क्यांचा प्रहार करायला सुरुवात केली. राजेशनेपण प्रत्येकावर प्रत्युत्तर म्हणून लाथा बुक्क्यांनी जोरजोरात प्रहार करून त्यांना खाली पाडले. एकेक जण पुन्हा पुन्हा आला पण राजेशने चपळाईने त्यांना बेदम मारले.

असे म्हणतात की अशा अटीतटीच्या प्रसंगी सामान्य माणसात सुद्धा असामान्य ताकद येते! तशीच काहीशी ताकद राजेशच्या अंगात संचारली होती. चार गुंडांपैकी एकाच्या जबड्यावर राजेशची लाथ बसली आणि तो ओरडत खाली पडला. तोपर्यंत चौथ्याने मोहिनीला सोडले आणि इतर तिघांच्या मदतीला धावला. राजेश तिघांवर सतत प्रहार करत होता.

इतर तिघे सावरत असतानाच त्या चौथ्याने एक काठी उचलली आणि राजेशकडे जोरात भिरकावली. राजेशने उडी मारून काठी पकडली आणि चपळाईने कारच्या छतावर चढला आणि काठीसहित त्याने त्या चौथ्या गुंडावर उडी मारली आणि त्या चौथ्या गुंडासहित राजेश इतर तिघांच्या अंगावर पडला. मग चपळाईने उठून राजेशने आजूबाजूला जेही सापडेल जसे की दगड, धोंडे, काच त्या सगळ्यांचा उपयोग केला आणि एकेकावर हल्ला केला.

राजेशला या सगळ्या प्रकरणात बरेच खरचटले.

गुंड मार खाऊन कण्हत पडले असतांना राजेश म्हणाला, "हे तर फार लेचेपेचे गरीब गुंड निघाले मोहिनी! गुंडानो, तुम्हीही काय याद राखाल की एका लेखकाच्या हातून मार खाल्ला! पेन ने लिहून लिहून, कॉम्प्युटरवर टाईप करून करून आम्हा लेखकांचा जरा हातांचा व्यायाम जास्तच होतो मग हात अशे स्ट्रॉंग बनतात! तुम्हाला आता सोडून देतो! तुमच्या नरकात जायची वेळ आता अजून आलेली नाही! पण लवकरच येईल!"

ते गुंड पुन्हा सावरेपर्यंत तेथून निघणे सोयीस्कर होते कारण जास्त प्रकरण वाढवले तर सहाही जणांपैकी कुणाच्याही जीवावर बेतू शकले असते म्हणून राजेश आणि मोहिनी पटकन गाडीत जाऊन बसले. राजेशने जवळपास मोहिनीला खेचूनच पटकन गाडीत बसवले आणि त्याने गाडी जवळच्या एका मोकळ्या मैदानातून विरुद्ध दिशेने वळवली आणि मार्ग बदलला.

ते गुंड पुन्हा उठून उभे राहिले आणि कारवर दगडफेक करू लागले पण तोपर्यंत कार बरीच पुढे निघून गेली होती.

मोहिनीने राजेशनचे मनापासून आभार मानले आणि नंतर कारमध्ये या प्रसंगाबद्दल दोघेही एकमेकांशी फारसे बोलले नाहीत. गाडी चालवत असतांना मोहिनीच्या सौंदर्याकडे त्याचे अचानक लक्ष गेले. एवढ्या जवळून त्या सौंदर्याकडे बघतांना क्षणभरासाठी राजेशचे भान हरपले कारण सुनंदाव्यतिरिक्त त्याने इतर दुसऱ्या कुणा स्त्रीचे असे अर्ध-अनावृत्त आणि इतके रेखीव सौदर्य आणि तेही इतक्या जवळून बघितले नव्हते - अगदी सुप्रियाचे सुद्धा!

दुसऱ्या क्षणीच त्याने स्वत:ला सावरले आणि आपली नजर मोहिनीच्या छातीवरून बाजूला केली.

या सगळ्या गडबडीत तिचा फाटलेला टीशर्ट त्या ठिकाणी जमिनीवरच राहिला होता, हे तिच्या लक्षात आले. राजेशची नजर लक्षात आल्यानंतर मोहिनीने दोन्ही हातांनी आपली छाती झाकली. मग राजेशने गाडी थांबवून तिला अंग झाकायला मागच्या सीटवर ठेवलेला त्याचा ग्रीन ब्लेझर दिला आणि तो तिच्याकडेच राहू द्यायला सांगितला कारण तिच्या सोसायटीत सीसीटीव्ही कॅमेरे होते. ती तशा अवस्थेत फ्लॅटवर परत जाऊ शकली नसती. तीला तिच्या फ्लॅटवर दोन वाजता सोडल्यानंतर राजेश घरी तीन वाजता पोहोचला.

सुनंदा जागीच होती. तिने दार उघडले. हॉल मध्ये काकू झोपलेल्या होत्या. खरचटलेले त्याने अँटिसेप्टिकने धुतले, तोंडावर पाणी मारले. मग तो बेडरूम मध्ये गेला. नाईट लॅम्प चालू होता. पटकन नाईट पॅन्ट घालून तो हळूच झोपायला सुनंदाजळ सरकला. पांघरूण घेतले. झालेला प्रसंग त्याला आठवला.
"जास्त पिलेल्या मोहिनीला एवढ्या रात्री तिच्या घरी सोडण्याची जबाबदारी मी उचलली खरी पण नसत्या प्रसंगातून निभावलो हे बरे झाले!" असा विचार तो करत होता आणि त्याने सुटकेचा निश्वास टाकला.

रागिणीच्या जीवनात जे चाललं होतं ते ऐकून त्याला आश्चर्य वाटत होते आणि आपण काल रागिणी आणि मोहिनी दोघांना अनपेक्षितरीत्या मदत करण्यास कारणीभूत झालो याबद्दल त्याला एक चांगली फिलिंग आली आणि रत्नाकरचा शोध तर अचानक लागला पण या गडबडीत तो आपल्या हातातून मात्र निसटला याचे त्याला वाईट वाटत होते.

त्याला आता झोप लागणे अशक्य होते. सारंग सोमैयाला बोलावून त्याच्या मदतीने रत्नाकरला पकडून त्यांचेकडून छडा लावलाच पाहिजे असे त्याने ठरवले आणि ते काम उद्याच सुरु करायला हवे असे त्याने मनोमन ठरवले. सकाळ कधी होते याची तो वाट पाहू लागला.

सुनंदा जागीच होती, ती हालचाल करू लागली आणि तिच्या एकंदर हालचाली आणि हावभावांवरून वाटत होते की तिला आता लगेच राजेशसोबत सेक्स हवा होता पण राजेशच्या मनात एकूणच घडलेल्या प्रसंगांबद्दल आणि रत्नाकरचे निसटणे याबद्दल जे काही चाललं होतं त्यामुळे त्याला आता सेक्सची मुळीच इच्छा नव्हती. तिने दहा मिनिटे त्याच्या अंगावर सगळीकडे तिचा हात फिरवून पाहिला, तिच्या अर्धनग्न शरीराचा त्याला ती स्पर्श करू लागली. पण त्याच्या तुटक आणि अलिप्त हालचालीवरून तिला त्याची अनिच्छा कळली. मग तिने प्रयत्न सोडले आणि थोडे दूर सरकून झोपली.

राजेशला आठवत होते की सुनंदासोबत रात्रीचे सुखाचे क्षण फार कमी वाट्याला आले होते. सुरुवातीलाच तिचे वडील वारल्यानंतर काही दिवस असेच गेले, मग त्यानंतर रूम शोधल्यानंतर तिला मुंबईत आणले आणि दोघांचे सूर जुळणार तेव्हढ्यात ही काकू अचानक येऊन धडकली. मग त्यांच्यातले ते सुखाचे क्षण फारसे वाट्याला आले नाहीत. फक्त काही दिवसांपूर्वी एकदा काकूला मुंबईमधल्याच एका दूरच्या नातेवाईकाकडे मुक्कामी पाठवले ते दोनचार दिवस आणि रात्र त्यांचा सेक्स कधी नव्हे तेवढा उत्कट झाला होता ज्याद्वारे ते दोघेजण प्रथमच समाधानी झाले होते... आणि त्यानंतर आता??

ही आजची रात्र!!

पाच मिनिटांनी काहीतरी संशय येऊन सुनंदाने अचानक तोफेसारखा त्याच्यावर शाब्दिक हल्ला चढवला,

"तुम्ही आलात ते मी बेडरूम मधून पहिले. तुमच्या अंगावर ब्लेझर नव्हते. ब्लेझर कुठे गेले? आणि तुमच्या सेंटचा वास वेगळाच येतोय. जातांना असा वास नव्हता काही! कुठे गेला होतात का पार्टीनंतर?"

राजेश अतिशय सौम्यपणाचा आव आणून म्हणाला, "ओह नो! अगं ब्लेझर विसरलोच वाटतं पार्टीत! ठीक आहे! मी कुणाकडून तरी मागवून घेईन ते उद्या परवा. अगं आणि वास तोच तर आहे, कुठे बदललाय! तुझं आपलं काहीतरीच! सारखा संशय घेतेस!"

मोहिनीला रात्री तिच्या घरी सोडायला गेलो होतो हे चुकूनही तिला समजता कामा नये नाहीतर तोफेऐवजी हायड्रोजन बॉम्बचा सामना करावा लागेल याची त्याला जाणीव होती.

त्याचे स्पष्टीकरण न पटल्यासारखे तोंड करून म्हणाली, "आता झोपा! उद्या बोलू! खरं खोटं काय ते उद्या पाहू! काकूंसमोरच तुमची खबर घेते मी उद्या!"

हे ब्लेझर प्रकरण आपल्याला भोवणार असे वाटत असतांनाच सुनंदाचे शाब्दिक वादळ अनपेक्षितपणे अचानक शांत झालं पण ते दुप्पट वेगाने केव्हातरी येणारच होते हे राजेशला माहिती होते पण, "आजच्यापुरते वाचलो म्हणजे किमान मला आता उद्याचा रत्नाकर रोमदादडेचा प्लॅन आखता आखता विचार करत करत झोपेचे सोंग घेता येईल!" असे म्हणून राजेशने तोंडावर पांघरून घेतले आणि रत्नाकर रोमदाडे आणि के के सुमनला नामोहरम करण्यासाठी प्लॅन आखू लागला.

सुनंदा झोपून गेली होती आणि घोरायला लागली होती. तासभर वेगवेगळे प्लॅन त्याच्या मनात आले, पण बेडवर पडून राहणे त्याला असह्य झाले, तो उठला आणि फ्रिजमधून पाणी प्यायला. मग जवळच्या पुस्तकांच्या कपटाजवळ जाऊन त्याने एखाददुसरे पुस्तक काढले, लॅम्प लावला आणि बाजूच्या टेबल खुर्चीवर बसून वाचू लागला. सकाळ होईपर्यंत त्याला कसातरी वेळ काढायचा. त्याला सगळ्या जुन्या घटना आठवायला लागल्या.

बराच वेळ तो वाचत बसला. सकाळचे पाच वाजले. वाचण्यात लक्ष लागत नव्हते. बाजूला टेबलवर त्याचा मोबाईल त्याने ठेवला होता. त्यात एक न्यूज नोटिफिकेशन आले.

सहज म्हणून त्याने ते पहिले त्यात लिहिले होते –

"प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री रागिणी राठोडची तिच्या बॉयफ्रेंडच्या फ्लॅटच्या गॅलरीतून उडी मारून रात्री आत्महत्या! अजून डिटेल तपशील उपलब्ध झाला नाही."

राजेशला शॉक बसला. त्याने रागिणीला सूरज फोनवर असलेल्या गोष्टी सांगितल्यानंतर ते दोघे भांडताना त्याने पहिले होते. पण म्हणून त्याचा शेवट काय आत्महत्येत व्हावा?

"सुनंदा, उठ! मी जरा जाऊन येतो! एक बातमी कव्हर करायची आहे, एक आत्महत्येची केस आहे!" असे म्हणून तयारी करून राजेश जायला निघाला.

"अहो, थांबा जरा, आताच तर आले आणि लगेच चालले कुठे?" सुनंदा थांबवत म्हणाली. काकू पण उठल्या होत्या. त्या मोठमोठ्याने आवाज करत गुळण्या करत होत्या पण त्यांचे लक्ष पूर्णपणे त्या दोघांकडे होते.

"टीव्ही वर बातम्या लाव आणि बघ! मी तुला नंतर फोन करतो. आता मला जाऊदे!", असे म्हणून राजेश निघालासुद्धा!



प्रकरण 35

ही बातमी मोहिनीला कळताच तिनेसुद्धा पटकन तयारी केली, टीशर्ट आणि जीन्स घातली, हातात माईक घेतला आणि घाईघाईत बाजूला पडलेले राजेशचेच ब्लेझर घालून रागिणीच्या फ्लॅटकडे कॅमेरामनसोबत पोहोचली.

ती कॅमेऱ्यासमोर पाहून बोलत होती आणि बातम्या देत होती. राजेश तेथे नंतर पोहोचला. तोही बातम्यांचे डिटेल्स घेत होता. राजेशचे ब्लेझर घालून मोहिनी बातम्या देत असतांना टीव्हीवर सुनंदा आणि तिची काकू बघत होत्या. तिने काकूला त्या ब्लेझरबद्दल सांगितले. काकूंच्या म्हणण्याप्रमाणे झाले. सुनंदाचा संशय पक्का झाला की राजेश पार्टीनंतर मोहिनीच्या फ्लॅटवर थांबून मग घरी आला होता. काकूंना आयते कोलीत मिळाले. त्यांनी आणखी तिच्या मनात विविध संशयपिशाच्चे टाकली. सुनंदाने संतापाच्या भरात राजेशला कॉल केला पण "आपण कॉल करत असलेला नंबर उत्तर देत नाही" असा आवाज येत होता...

"आता सुनंदाचा कॉल उचलून उपयोग नाही, घरी गेल्यावरच जे काय व्हायचे ते होईल कारण तिने नक्की ब्लेझर मोहिनीच्या अंगावर टीव्हीत पाहिले असावे", असा विचार करून राजेशने घटनास्थळी काय होतेय याकडे लक्ष देणे जास्त पसंत केले. तशात लगबगीने मोहिनीने राजेशला त्याचा ब्लेझर शुटिंग चालू असतानाच परत केला. हेही सुनंदाने बघितले आणि टीव्ही बंद करून टाकला आणि दोघीजणी चहा पिता पिता खलबते करू लागली..

सूरज खूप दुःखात बुडालेला दिसत होता. राजेशला तर काहीच कळेनासे झाले. त्याला वाटत होते की रागिणीच्या आत्महत्येला तोच अप्रत्यक्षरीत्या कारणीभूत आहे. पण नंतर दुसरे मन त्याला सांगू लागले की त्याने सूरजचे जे बोलणे फोनवर ऐकले ते नुसते ऐकून सोडून देण्याइतका तो माणूसकीहीन नव्हता कारण सूरज जे काही बोलत होता ते केवळ त्याचे खासगी मॅटर म्हणून सोडून देण्यासारखे नक्की नव्हते. त्याने त्यावेळेस योग्य वाटले ते केले. विचारांतून बाहेर निघत त्यानंतर त्याचे पत्रकार म्हणून असलेले काम त्याने केले. पोलीस आलेले होते. पंचनामा वगैरे सुरु होता. मोहिनीच्या निरोप घेऊन त्याने घटनास्थळातून काढता पाय घेतला.

राजेशला या क्षणी जरा एकांत हवा होता. शांत एके ठिकाणी बसून याला योजना आखायच्या होत्या. रत्नाकर रोमदाडे शक्यतो के के सुमन सोबत क्वचितच दिसायचा. नाहीतर एरवी राजेशने अनेक पार्ट्या किंवा शोज मध्ये किंवा टेलिकास्ट मध्ये टीव्हीवर नक्की त्याला ओळखले असते पण काल तर तो प्रत्यक्ष समोर येऊन हातातून निसटला होता.

घटनास्थळाहून राजेश तडक सारंगच्या रूमवर गेला. दरम्यान त्याने सुनंदाला कळवायला फोन केला की तो काही कारणास्तव घटनास्थळाहून सरळ सारंगकडे जातोय पण दोन तीन वेळा ट्राय करूनही ती फोन उचलत नव्हती. काकूंचा फोन पण त्याने ट्राय केला पण कुणीही उचलला नाही. आता जर तो घरी गेला असता तर भांडणामुळे आणखी मूड खराब झाला असता. आता भांडण होणारच आहे तर रात्रीच होऊ दे, तोपर्यंत मी माझे रत्नाकर संशोधनाचे काम आटोपतो असा विचार त्याने केला आणि सारंगच्या घरी पोहोचला.

सारंगला फोन केल्यावर त्याला कळले की सारंगची पत्नी (बँकेत नोकरी करत असल्याने) घरी नव्हती आणि सारंगही आज घरी नव्हता मात्र सारंग त्याला एवढा मान द्यायचा की राजेशला त्याने बिनधास्त शेजाऱ्यांकडून चाबी घेऊन घरी बसायला सांगितले. सारंगला राजेशने थोडक्यात सगळी कल्पना दिली आणि आज दिवसभर शांततेसाठी त्याला सारंगच्या घरी थांबायचे आहे असे सांगितले.

गाडीतून राजेशने लॅपटॉप काढले, आणि सारंगच्या फ्लॅट मध्ये गेला. लॅपटॉप ऑन केला. किचन मध्ये जाऊन कॉफी बनवली. फ्रिजमधून ब्रेड काढून त्याचे सॅन्डविच बनवले आणि कॉफीचे झुरके घेत सारंगच्या फ्लॅटच्या टेरेसवर खुर्ची टाकून बसला. रागिणीची न्यूज त्याने लॅपटॉपवर तयार करून एडिटरला पाठवली. आता शांतपणे तो पुढे काय करायचे याचा विचार करू शकणार होता. मग त्याने लॅपटॉप बाजूला ठेवला आणि समोरच्या स्टूलवर पाय टेकवून दोन्ही हात मानेमागे घेऊन डोळे बंद करून विचार करत बसला...

बराच वेळ विचार केल्यानंतर मग त्याने लॅपटॉपवर सर्च करून रत्नाकरची माहिती काढली, त्याचा पत्ता शोधून काढला. सारंगला कॉल करून त्याने रत्नाकरची माहिती काढायला सांगितले होते. त्यासाठी सारंगने त्याच्या मासिकासाठी रत्नाकरचा इंटरव्ह्यू घायचा ठरवला. सारंग त्याच दिवशी अपॉइंटमेंट घेऊन रत्नाकरला भेटायला त्याच्या ऑफिसमध्ये गेला. सारंग ज्या मासिकासाठी काम करत होता त्यात मुलाखत छापून येणे म्हणजे हमखास प्रसिद्धी असे समीकरण होते. इंटरव्ह्यू दरम्यान अनेक प्रश्न विचारून रत्नाकरची खासगी माहिती काढली. एकंदरीत रत्नाकरच्या बोलण्यावरून असे वाटत होते की त्यालाच एखाद्या इंटरव्ह्यूची आणि जास्त प्रसिद्धीची गरज होती. सध्या के के सुमन एका सिनेमाच्या शूटिंगसाठी लोकेशन शोधण्यासाठी आणि परमिशन घेण्याकरता परदेशात गेलेला होता.

मग सारंगने रत्नाकरकडून एक गोष्ट कबूल करवून घेतली की राजेशसुद्दा त्याचा काही दिवसांनी इंटरव्ह्यू घ्यायला येणार आहे आणि त्यावेळेस सोबत केकेच्या मुलाला पण सोबत असू द्या असे सारंगने सुचवले. रत्नाकारला जास्तीत जास्त प्रसिद्धी हवी होती म्हणून तो हो म्हणाला कारण रत्नाकर आणि के के चा मुलगा मिळून त्यांच्या एका आगामी चित्रपटासाठी स्टोरी लिहीत होते आणि स्टोरी जवळपास पूर्ण होत आली होती असे रत्नाकरने सारंगला सांगितले होते.

अशा प्रकारे रत्नाकारबद्दल बरीच माहिती सारंगने राजेशला फोनवर कळवली. या आणि इतर माहितीच्या आधारे सारंग आणि राजेश मनात वेगवेगळे प्लॅन बनत होते. रात्री सारंगच्या घरी बराच विचारविनिमय केल्यानंतर दोघांनी संगनमताने एक प्लॅन तयार केला आणि रात्रीचे जेवण केल्यानंतर राजेश आपल्या घरी जायला निघाला. गाडीत त्याच्या मनात मिक्स फिलिंग्ज होत्या. रागिणीची आत्महत्या, सुनंदाचे संशय घेणे, रत्नाकारचा लागलेला शोध, मोहिनी आणि त्याचेवर बेतलेला रात्रीचा प्रसंग आणि आता घरी गेल्यावर सुनंदाला तोंड द्यावे लागेल...

घरी पोहोचल्यावर त्याने बेल वाजवली. कुणीच दार उघडले नाही. त्याने स्वतःकडच्या चवीने दरवाजा उघडला. घरात सर्वप्रथम दर्शन देणाऱ्या काकू आता दिसत नव्हत्या आणि हाक मारल्यावर सुनंदाचाही ओ येत नव्हता. समोर टेबलवर एक चिठ्ठी पडलेली होती. त्यात काकूंच्या हस्ताक्षरात लिहिले होते.

"सुनंदाने कायम माहेरी जाण्याचा निर्णय घेतला आहे...
जर तुम्ही पत्रकार, लेखन आणि सिनेमा जगतापासून दूर जाऊन ऑफिसमधे 9 ते 5 वेळेतली नोकरी शोधल्यास ती परत येण्याचा विचार करेल!” - सुनंदाची काकू!

राजेशने कपाळावर हात मारला आणि सोफ्यावर बसला. आता शांत बसायांचे आणि गावाकडून आईचा फोन आलाच तर बघू काय करायचे ते असा विचार करून त्याने ती चिठ्ठी व्यवस्थित घडी करून एका प्लास्टिकच्या चौकोनी डबीत ठेवली आणि बेडखाली ठेऊन दिली. त्यावर उशी ठेऊन रात्रभर तो सुनंदाच्या बदललेल्या वागणुकीबद्दल आणि त्याला कारणीभूत असलेल्या काकूंचा विचार करत होता. काकूंचा काहीतरी बंदोबस्त करायला हवा पण त्याआधी मिशन रत्नाकर रोमदाडे!

सुनंदा काही दिवस माहेरी राहील आणि शेवटी अविचाराने घेतलेला तिचा निर्णय चूक आहे हे लक्षात येईल आणि ती परत येईल असा विचार करून तो उशिरा रात्री झोपला कारण त्याच्या मनात अनेक विचारांचा कल्लोळ चालला होता....त्याचे मन खूप थकले होते!....

राजेश एकटाच लिफ्टमध्ये चढला कारण सुनंदाला त्याने विनंती केली होती पण ती त्याच्यासोबत आली नाही. लिफ्टमध्येही दुसरं कुणी नव्हतं. 6 व्या मजल्याचे बटण दाबायला त्याने हात पुढे केला तेव्हा त्याला तेथे आकडे दिसत नव्हते. त्याऐवजी आकाराने मोठे होत जाणारे स्टार होते. क्षणभर काय करावे हे न सुचल्याने त्याने इकडेतिकडे पहिले आणि लिफ्टमधून उतरून जायचे ठरवले आणि लिफ्टच्या दरवाज्याचे बटण दाबले.

दार उघडले गेले. दरवाज्यासमोर केस मोकळे सोडलेली रागिणी उभी होती. अतिशय घाबरल्याने त्याने पुन्हा दरवाजा बंद केला आणि सगळ्यात मोठा स्टार असलेले बटन दाबले. लिफ्टने अचानक खूप वेग घेतला आणि ती विचित्र पद्धतीने हेलकावे खाऊ लागली आणि राजेशला समजेनासे झाले की ही लिफ्ट नेमकी वर जातेय की खाली जातेय किंवा मग जमिनीला समांतर रेल्वेसारखी पळतेय?

अचानक एक जोराचा धक्का देऊन लिफ्ट थांबली. दार उघडले गेले आणि समोर अंधूक प्रकाशात एक पांढरी दाढी असलेली वृद्ध व्यक्ती उभी होती पण त्याचा चेहरा दिसत नव्हता. तरीपण त्याला चेहरा ओळखीचा वाटत होता पण नेमका तो कोण आहे हे समजत नव्हते एवढ्यात त्या व्यक्तीने राजेशला मदत करण्यासाठी हात पुढे केला. राजेश त्याच्या हातात हात देणार तेवढ्यात लिफ्टमधून मागच्या बाजूने राजेशच्या खांद्यावर एक नाजूक हात पडला आणि मागे वळून बघणार तेवढ्यात राजेश दचकून स्वप्नातून जागा झाला. त्याचा चेहरा घामाने डबडबला होता. सकाळचे पाच वाजले होते. नंतर दहा मिनिटे तो त्या स्वप्नाचाच विचार करत राहिला. आपल्याला असे स्वप्न का पडले असावे? फ्रिजमधून थंड पाणी काढून तो प्यायला आणि त्याने स्वप्नाचा विचार सोडून दिला आणि ब्रश करायला सुरुवात केली. आज तयार होऊन राजेशला रत्नाकरचा इंटरव्ह्यू घ्यायला जायचे होते. तयारी करून राजेश रत्नाकारच्या ऑफिसकडे निघाला. रत्नाकारला त्याने तसे कळवले आणि मग सारंगला फोन लावला.

"सारंग, मी पहिला इंटरव्ह्यू घ्यायला निघालोय. बाकी सगळे ओके ओके आहे ना?"
"होय राजेश. सगळे ओके ओके आहे. ऑन ट्रॅक आहे!"
"ठीक आहे. आपण यापुढील घडामोडींचे अपडेट रेग्युलरली एकमेकांना देत राहू! चल बाय!"
राजेशने रत्नाकरची अर्धा तास मुलाखत घेतली. या इंडस्ट्रीत तो आणि केके कसे आले हे त्याने जाणून घेतले.
मग राजेशने त्याच्या मनात तयार असलेल्या वेगवेगळ्या कथांचे विषय तोंडी रत्नाकरला सांगण्याचे आमिष दाखवले पण त्यासाठी रत्नाकरला राजेशसोबत डिनर आणि ड्रिंक्स घ्यायला यावे लागेल असे कबूल करवून घेतले. हे सगळे केके परदेशातून परत यायच्या आधी राजेशला उरकायचे होते.


प्रकरण 36

केकेचा मुलगा पिके सुमन (पवन किशोर सुमन) हा पक्का पार्टीबहाद्दर आणि प्लेबॉय होता. तो चित्रपटांसाठी खूप चांगले नसले तरी बरे लिखाण करायचा आणि विशेष म्हणजे ते लिखाण कधीही चोरलेले नसायचे. पण केके आणि रत्नाकर मात्र ऑनलाइन आणि इकडे तिकडे छापल्या जाणाऱ्या असंख्य कादंबऱ्या आणि कथांतून कथेचा गाभा बिनधास्त चोरायचे आणि त्यात मीठ मसाला टाकून त्याचा चित्रपट बनवायचे आणि स्वतःच्या नावाखाली ते खपवायचे आणि त्याचे क्रेडिट स्वतः उकळायचे. पिकेला हे अर्थातच माहित नव्हते.

राजेश रत्नाकरला ज्या रात्री डिनर आणि ड्रिंक्ससाठी बोलावणार होता त्याच्या काही दिवसापूर्वी…

पिके एका पार्टीत धूम नाचला. आता वडील सध्या भारतात नसल्याने आणि त्याची आई ही वडिलांपासून वेगळी राहत असल्याने त्याला रान मोकळे झाले होते. त्या रात्री पार्टीत तो बेफाम नाचला. रात्रीचे बारा वाजले आणि एक आकर्षक पोशाख घातलेली महिला त्याचेकडे आली.

"हॅलो, मी रविना! हाऊ आर यू मिस्टर पवनकुमार सुमन?", पिकेच्या डान्स स्टेप्ससारख्याच डान्स स्टेप्स करत तिने पिकेला शेकहॅन्ड साठी हात पुढे केला.

पिकेची डान्स पार्टनर साक्षी तिच्याकडे बघू लागली. ती आणि पिके या रविनाला प्रथमच बघत होते. या आधी रविना कधीही त्यांना कुठे दृष्टीला पडली नव्हती.

"आय एम फाईन! पण सॉरी मी आपणाला ओळखले नाही. म्हणजे तू रविना आहेस ते तू सांगितलंस पण मी तुला ओळखत नाही!" पिके म्हणाला.

"मी लेखकांची चाहती आहे. विशेषतः तुमच्या कथा मला फार आवडतात!", रविना त्याच्या आणखी जवळ येत म्हणाली.

पार्टी, सुंदर मुली आणि लेखन हे तीन विक पॉईंट असलेल्या पिकेला पार्टीत एक सुंदर मुलगी त्याच्या लेखनाचे कौतुक करतेय म्हटल्यावर तो पघळला, नरमला.
"अ हो! थँक्स! थँक्स फॉर द कॉम्प्लिमेंट्स!" नाचतांना तिच्याकडे सरकत रविनाला पिके म्हणाला.

"वुड यु माईंड मी डान्सिंग विथ यु?" रविना त्याचे अधिक जवळ जात म्हणाली.

पिकेला रविनाचा आग्रह मोडवेना म्हणून मग नाईलाजाने त्याने साक्षीला जायला सांगितले. थोड्या नाईलाजानेच साक्षी त्याच्यापासून दूर झाली आणि अंधुक प्रकाशात उघडझाप करणाऱ्या डिस्को लाईट्सच्या प्रकाशात बेधुंदपणे डान्स करणाऱ्या काही जोडप्यांतून मार्ग काढत ती एका सोफ्यावर जाऊन बसली.

काही वेळाने जेव्हा अगदी मंद प्रकाशात संथमधुर संगीत सुरु झाले तेव्हा नाचतांना हळूहळू रविना आणि पिके हे दोघे एकमेकांच्या कानामध्ये कुजबूजत संभाषण करत होते.

रविना- "तुमच्या सर्व कथा मला आवडतात. मनात जे आहे ते स्पष्ट आणि रोखठोकपणे तुम्ही तुमच्या कथेत मांडता, हे मला खूप आवडते!"

पिके- "हो! जीवनाच्या विविध पैलूंवर मला लिहायला आवडते! जीवनातील कोणत्याही विषयावरचा कोणताही प्रसंग लिहायचा असल्यास मी कोणतीही आडकाठी न ठेवता त्याबद्दल लिहितो आणि चित्रपटातही ते तसेच असावे असा माझा आग्रह असतो!"

रविना- "विशेषतः प्रेमाबद्दल आणि सेक्सबद्दल तुम्ही जे स्पष्ट आणि रोखठोक लिहिता ते मला आवडते! काही लेखक फक्त सेक्स हा भाग मुद्दाम वगळून लिहितात!"

पिकेला अशी धाडसी मत व्यक्त करणारी मुलगी प्रथमच भेटली आणि आवडली!

पिके- "हो! अनेक कादंबरीकार अनेक कादंबऱ्या लिहितात, एखाद्याची पूर्ण जीवनकथा लिहून काढतात पण त्या माणसाच्या सेक्स लाईफचा त्या कादंबरीत साधा उल्लेखही नसतो! मला सांग रविना, माणसाच्या जीवनातील प्रत्येक पैलू हा महत्वाचा असतो आणि असा प्रत्येक पैलू संपूर्ण जीवनावर कमी अधिक परिणाम करणारा असतो. मग फक्त सेक्स हाच एक महत्वाचा पैलू टाळून एखादी कादंबरी लिहिली तर त्या कादंबरीतल्या विविध पात्रांना आणि त्यांच्या जीवनप्रवासाला आपण संपूर्ण न्याय देऊ शकू का? अर्थातच नाही!"
"अगदी बरोबर बोललात! मला हेच म्हणायचे होते!" असे म्हणत रविना आणखीन त्याचेजवळ सरकली.

साक्षीला हे पाहवत नव्हते. ती सोफ्यावरून उठली आणि दुसरीकडे गेली. तसा साक्षीला पिकेचा सुंदर मुलींबाबतचा विक पॉईंट माहिती होता. त्यामुळे हे तिला अगदीच अनपेक्षित नव्हते पण पिके भेटून तिला फक्त काही महिनेच झाले होते, त्यामुळे थोडी जेलसी तिच्या मनाला स्पर्शून गेली इतकेच!

रविनाने पिकेला आपली अशी ओळख सांगितली की, ती या मुंबईतल्या फिल्म इंडस्ट्रीत कलाकार बनण्यासाठी आली आहे. टीव्ही किंवा फिल्म्स यात तिला करियर करायचे आहे आणि ती मैत्रिणीच्या एका बंगलोमध्ये सध्या काही दिवस एकटी राहते आहे. मैत्रीण आणि तिचा नवरा परदेशातून परत आले की मग ती दुसरी रूम शोधेल.

* * *

त्या पार्टीनंतर रोज त्यांचे एकमेकांना फोन करणे सुरू झाले. मग चार पाच दिवसातच त्यांच्या प्रेमाचा असा काही अंकुर उगवला की त्याचे आठवड्याभरातच झाड होईल की काय असे एकंदरीत वाटत होते. सोबत बागेत फिरणे झाले, सिनेमा बघून झाले, हॉटेलिंग झाले, मॉल्स मध्ये फिरणे व्हायला लागले, एकमेकांच्या आवडीनिवडी एकमेकांना कळू लागल्या. तिने त्याच्या कथा वाचणे सुरु केले.

* * *

काही दिवसांनी एकमेकांना आलिंगन देणे तसेच परस्पर संमतीने किस घेणे वाढू लागले. बरेचदा किस घेताना पिके अनावर व्हायचा पण राविनाने त्याला हसवून अडवायची मग शेवटी एके दिवशी ती त्याला लाडिक हसत म्हणाली,

"पिके साहेब, तुम्ही प्रेमात बरेच फास्ट दिसता! कथेत लिहिता त्याप्रमाणे खऱ्या जीवनातही बिनधास्त दिसता! आज रात्री नक्की आपण प्रेमाच्या अत्युच्च आविष्कारात भ्रमण करूया! या लवकर संध्याकाळी सात वाजेपर्यंत! मी तयार राहते! माझ्या बंगलोमध्ये! मी वाट पाहाते! येताना लॅपटॉप पण घेऊन ये तुझा! तुझ्या कथा वाचायच्या आहेत, मोकळ्या वेळात! तुझ्या नव्या कथेतले सगळे प्रेम प्रसंग वाचायचे आहेत मला, म्हणजे आपण कदाचित त्या प्रसंगांसारखे प्रेम खरोखर अनुभवू शकू"
"व्हेरी नाईस आयडिया!" पिके म्हणाला.

त्या रात्री साडेसात वाजता-

त्याने अंगावरचे बहुतेक कपडे काढले होते. मग तिचे कपडे काढायची त्याला घाई झाली. त्याने तिला हात लावताच ती म्हणाली, "राजा, घाई करू नकोस! माझ्याकरता "रेड क्राऊन" चा पेग आण! आपण दोघे पिऊ! आजची रात्र मेमोरेबल झाली पाहिजे! कारण रेड क्राऊनशिवाय मजाच ती काय? पाच मिनिटांच्या अंतरावर शॉप आहे! जा, घेऊन ये ना प्लिज!"

पिके एका पायावर तयार झाला. त्याने पुन्हा कपडे घातले आणि म्हणाला, " बरंय मॅडम! आणतो! मी जनरली रेड क्राऊन घेत नाही. थोडी स्ट्रॉंग आहे पण हरकत नाही, तू म्हणतेस तर घेईन मी! पण त्यांनतर मात्र एकही जास्तीचा बहाणा चालणार नाही बरं का! एवढं तडपवू नका माझ्यासारख्या गरीब माणसाला! पाच मिनिटांच्या अंतरावर शॉप आहे, घेऊनच येतो स्वतः जाऊन!"

असे म्हणून तो जायला निघाला तेवढ्यात तिने त्याला थांबवले आणि म्हणाली, "तू येतोस तोपर्यंत मला तुझी नवी चित्रपटाची कथा दे ना वाचायला! तू मला वाचायला द्यायचे कबूल केले होतेस ना! प्लिज! बाकी सगळ्या कथा मी वाचल्या आहेत! विशेषतः त्यातील प्रेम प्रसंग मला वाचायचेत आणि तुझ्यासोबत ते जिवंत करायचेत!"

त्याने तिला त्याचे लॅपटॉप ऑन करून दिले आणि पासवर्ड टाकून दिला आणि वेगवेगळ्या फोल्डर्स मधून त्याच्या नव्या कथेच्या फाईल्स तिला वाचायला दिल्या आणि बाहेर निघून गेला. सेक्ससाठी अधीर झाल्याने त्याचे डोके चालणे जवळपास बंद झाले होते.

मग घाईघाईने लॅपटॉप मांडीवर घेत तिने दरवाजा बंद केला, तिच्या मोबाईलची मेमरी चिप बाहेर काढली, लॅपटॉपला कनेक्ट केली. पिकेच्या नवीन लिखाणाच्या सगळ्या फोल्डर्स आणि फाईल्स तिने कॉपी केल्या आणि मेमरी कार्ड पटकन मोबाईलमध्ये टाकले आणि मोबाईल परत जसाच्या तसा लावला. तिची पर्स आणि इतर साहित्य घेऊन ती पिके यायच्या आत रस्त्यावरच्या गर्दीत मिसळून परागंदा झाली.

तिने पिकेला फोन करून सांगितले की तिच्या एका मैत्रिणीच्या आईला अचानक छातीत त्रास सुरू झालाय आणि मैत्रीण एकटी असल्याने तिच्या आणि आईच्या मदतीला ती रिक्षेने तातडीने जात आहे आणि ती त्याला नंतर भेटेल... सॉरी!

रेड क्राऊनच्या बाटल्या बेडवर ठेऊन तो संतापाने चरफडत होता, पण इलाज नव्हता. आपले लॅपटॉप सोबत घेऊन त्याच्या कारने तो साक्षीकडे जायला निघाला. दरम्याने त्याने रविनाला फोन केला पण स्विच ऑफ येत होता.

"मी नसतं का सोडलं हिला कारने, पण मला न सांगता ही अशी कशी निघून गेली?" असा विचार करतांना त्याच्या मनात रविनाची प्रतिमा येत होती. ती रात्र त्याने शेवटी साक्षीकडे घालवली.

दरम्यान राजेश एका बारमध्ये रत्नाकर सोबत ड्रिंक्स घेत होता. राजेशकडून अनेक नवीन कथा ऐकून त्यावर आधारित आयते अनेक चित्रपट बनवता येतील अशी इच्छा बाळगून रत्नाकर राजेश सोबत वेळ घालवत होता. एक विशिष्ट पेय रत्नाकारच्या नकळत त्याच्या पेयात मिसळल्यानंतर रत्नाकर भडाभडा राजेशला त्याच्या आणि केकेच्या एकंदर फिल्म इंडस्ट्रीतील प्रवासाबद्दल स्वत:च्या नकळत सगळे खरे खरे सांगू लागला. राजेश हा अशा काही लेखकांपैकी एक असेल ज्याची कथा आपण कधीतरी चोरली आहे याची पुसटशी सुद्धा कल्पना रत्नाकरला नव्हती.

"केके आणि मी उनाडक्या करणारे बेरोजगार युवक होतो. त्याची आणि माझी चांगली मैत्री होती. केकेची आई आणि गावातील लोक आमच्या उपदव्यापांनी त्रासले होते. केकेचा (किशोर) चा भाऊ कुमार याच्यासारखे अभ्यासात हुशार होण्यासाठी आमच्यावर दबाव यायचा. कुमार चांगल्या मार्कांनी पास व्हायचा तर किशोर आणि मी कॉपी करून काठावर पास व्हायचो. स्वतः मेहेनत न करता लोकांच्या मेहनतीची नक्कल करणे आणि त्यावर यश मिळवणे हा आमचा लहानपणापासूनचा आवडीचा खेळ!!

आम्हाला अभ्यासवगैरेंचा जाम कंटाळा यायचा पण चित्रपट बघणे आम्हाला खूप आवडायचे. मी आणि किशोर तासनतास विचार करत बसायचो की ही फिल्म इंडस्ट्री म्हणजे चमधमक आहे. येथे एकदा प्रवेश मिळवला की पुढे पैसाच पैसा आणि सुंदर सुंदर बायका. अभिनय कशाशी खातात किंवा चित्रपटासारखी कलाकृती बनवण्यासाठी काय मेहनत करावी लागते, सकस लिखाण करावे लागते हे आम्हाला माहिती नव्हते आणि कुणी सांगून ते आम्हाला पटलेही नसते.

त्या काळात सिंगल स्क्रीन थिएटर मधले सकाळी दहा वाजता लागणारे खास ऍडल्ट बी ग्रेड चित्रपट खूप पैसा कमवायचे. त्यामानाने त्या चित्रपटांना बजेट कमी असायचे. त्यात सुंदर सुंदर मुलीही काम करायच्या. आपण जर का अशा चित्रपटात काम केले तर आपल्याला पैसेही मिळतील आणि सुंदर सुंदर स्त्रियांचा सहवासही लाभेल या विचाराने आम्ही पछाडलो आणि मग आम्ही दोघे शेवटी गावातून पळून गेलो आणि मुंबईत आलो. रस्त्यांवर राहिलो. पडेल ती कामे केली. आमचे चित्रपटाचे वेड पाहून जेथे आम्ही काम करत होतो तेथील एकाने आम्हाला एका बी ग्रेड सिनेमा बनवणाऱ्या डायरेक्टर प्रोड्युसरचा पत्ता दिला. त्याचे नाव होते- केवलजीत! मग त्याने आमची टेस्ट घेऊन त्याच्या बी ग्रेड सिनेमात काम दिले. पैसे थोडेफार मिळत होते आणि सुंदर मुलींबरोबर काम करायला मिळायचे. तशा सिनेमात सिरीयसली अभिनय वगैरे फारसा करावा लागायचा नाही. मग आम्ही परस्पर एक धंदा सुरु केला!"

"कसला धंदा रत्नाकर? सांग ना!", राजेश म्हणाला.

"तुला माहिती आहे राजेश की भारतात फिल्म इंडस्ट्रीचे किती आकर्षण आहे ते! पूर्वीही आणि आजही भारतातील अनेक खेडे आणि शहरांतून अनेक मुली मुलं नशीब आजमावण्यासाठी हजारोंच्या संख्येने मुंबईत येतात. काही खरोखरीच अभिनयगुणसंपन्न असतात आणि त्यांना कालांतराने संघर्षानंतर यश जरूर मिळते. काहींमध्ये अभिनयगुण नसतात ते निराश होऊन परत जातात. पण काही जण विशेषतः त्यातील काही मुली ज्या घरून पळून वगैरे तर आलेल्या असतात पण त्यांच्यात अभिनयगुण नसतो पण सुंदर असतात आणि जीवनात खूप पैसे मिळवणे हेच यांचे ध्येय असते. रिच लाइफस्टाइल त्यांना जगायची असते. जीवनाची अनेक सुखे त्यांना भोगायची असतात. मग त्या स्वतःच्या शरीराचा उपभोग इतरांना घ्यायला देऊन येनकेन प्रकारे चित्रपटात विशेषतः बी ग्रेड चित्रपटात कामं मिळवतात.

मग आम्ही अशा प्रकारच्या मुलींना जाळ्यात ओढायचे सुरु केले. त्यांची शरीरं उपभोगली आणि त्यांना केवलजीतकडे पाठवायचो. काही मुली राजीखुषीने तर काहींना आम्ही बळजबरी करून आमच्याशी शरीरसंबंध ठेवायला भाग पडायचो आणि मग केवलजीतकडे पाठवायचो. त्यावेळी मुली आतासारख्या सजग नव्हत्या. अन्यायाविरुद्ध आवाज उठवायला घाबरायच्या. केवलजीत पण त्यांच्याकडे शरीरसुखाची मागणी करायचा. पण आम्हीही त्यांना उपभोगायचो हे केवलजीतला कळले आणि ते त्याला आवडले नाही. आम्हाला दोघांना त्याने कायमचे कामावरून काढले.

मग नंतर आम्ही स्वतःची प्रोडक्शन कंपनी काढली कारण आमच्याकडे तोपर्यंत बराच पैसे आला होता आणि नेहमीप्रमाणे केवलकडे काम करून करून आम्ही जे काही फिल्म मेकिंग बद्दल शिकलो तेच आमच्या साठी आम्ही कामी आलं. कॉपी करायची आमची सवय कामी आली. इतरांच्या सृजनशीलतेवर जगण्याची आमची लहानपणापासूनची सवय होती तीच अंगावळणी पडली.

पण नंतर नंतर बी ग्रेडचे चित्रपट आणि मेनस्ट्रीम सिनेमा असा भेद जवळजवळ नष्ट झाला. मग आम्ही मेनस्ट्रीम सिनेमामध्ये नशीब आजमावून बघायचे ठरवले. तेव्हा आम्हाला चित्रपट बनवतांना अडचण आली ती सशक्त कथेची. आम्ही दोघे त्याबाबतीत मठ्ठ!!

काही दिवसानंतर एकदा मी रेल्वेत प्रवास करत होतो. बाजूच्या सीटवर कॉलेजचा एक मुलगा "डिटेक्टिव्ह कथा" नावाचा दिवाळी अंक वाचतांना दिसला. आपल्या आईला एका सस्पेन्स कथेबद्दल तो सांगत होता आणि म्हणत होता की अनेक हॉलिवूड आणि हिंदी, मराठी चित्रपटांना शोभतील अशा कितीतरी कथा दिवाळी अंकात छापून येत असतात, पण ते क्षेत्र कधीही या कथांची दखल घेत नाही असे दिसते.

झाले! माझ्या माझ्या मेंदूत ‘कॉपी करण्याची सृजनशीलता’ दाटून आली. मग दादरला मी तात्पुरते दिवाळी अंक कार्यालय उभारले आणि पेपरात जाहिरात देऊन महाराष्ट्रभरातून नवीन दिवाळी अंकासाठी कथा मागवल्या. हजारोंनी कथा आल्या आणि मग त्या कथा घेऊन आम्ही कार्यालयाला टाळा ठोकला. त्यातील एका कथेवर आम्ही “किस्मत का खेल” हा सिनेमा बनवला त्यात खुद्द अमितजींनी म्हणजे सुपरस्टार अमित श्रीवास्तव यांनी काम केले आहे! मग काळ बदलला तसा इंटरनेटवर अनेक मराठी लेखक हजारो फ्री कथा लिहून टाकू लागले मग आम्हाला फुकटात खजिनाच सापडला! चोरून न्यायला!"

आताच त्याच्या कानाखाली चार पाच दणादण माराव्यात आणि त्याला रस्त्यावर फरफटत नेऊन दोनचार तगडे गुंड भाड्याने घेऊन त्याला धो धो बदडून काढावा असं राजेशला प्रकर्षानं जाणवलं पण त्याने स्वतःला सावरलं. शेवटी इतक्या उशिरा का होईना पण छडा लागला होता.

राजेश आणि रत्नाकर बसले होते त्या टेबलखाली एक माईक लावलेला होता आणि शेजारी असलेल्या एका टेबलवर वेष बदललेला सारंग सोमैया त्याच्या चष्म्याला लावलेल्या मायक्रोकॅमेरामधून ह्या सगळ्याची व्यवस्थित व्हीडिओ रेकॉर्डिंग करत होता. या सगळ्यांच्या बदल्यात राजेशने रत्नाकरला एक कथा फुकटात लिहून रत्नाकारच्या चित्रपटासाठी द्यायचे कबूल केले होते.

काही दिवसांनी –

वीणा वाटवे (जिला सारंगने गावाकडून मुंबईत टीव्ही आणि फिल्म इंडस्ट्रीत काम मिळवून देण्यासाठी आणले होते), राजेश आणि सारंग हे तिघे राजेशच्या फ्लॅटवर बसले होते.

सारंग म्हणाला, "तर मग रविनाजी उर्फ वीणाजी, ती पिकेकडून चोरलेली कथा मिष्टी मेहरानला दिली ना?"

वीणा, "होय! आपण ठरवल्याप्रमाणे मिष्टी लवकरच त्यावर एक तासांची शॉर्ट फिल्म बनवते आहे. लवकरच ती बनून पूर्ण होऊन "व्हीडिओ ट्यूब" वर अपलोड सुद्धा होईल. मग पिके, केके आणि रत्नाकर तिघांना जबर धक्का बसेल!"

राजेश, "ग्रेट! आता पिकेच्या इतरही काही कथांवर शॉर्ट फिल्म बनवा आणि जगभर जाहिरात करून त्यात लेखक म्हणून एक कुणाचेतरी काल्पनिक नाव टाका! त्या फिल्म्स रिलीज होताच बरोबर पिके आणि केके यांची मेहनत वाया जाईल आणि त्यांना कळेल कथाचोरीचे दुःख!"

सारंग, "आणि वीणा! त्या शॉर्ट फिल्म रिलीज होईपर्यंत तू अधूनमधून पिकेला भेटत राहा. हळूहळू त्यांचेपासून दूर निघून जा! असे की त्याला तुझ्यावर संशय येता कामा नये!"

वीणा, "होय! मी रविना बनताना खूप मेहनत घेतली, वेशभूषा बदलली, मेकप केला. इतकं की रविना म्हणून मी त्याच्या आयुष्यातून निघून गेल्यानंतर जरी वीणा म्हणून पुन्हा त्याचे समोर गेले तरीही तो मला ओळखण्याची शक्यता कमी आहे!"

राजेश, "वा सारंग! माझा शिष्य शोभतोस! खऱ्या जीवनात जर ही मुलगी एखाद्या काल्पनिक पात्राची भूमिका बेमालूमपणे वठवते तर सिरियल्स आणि चित्रपटांत तर धमालच करेल! वीणा, तुला मी आताच माझ्या टेलिव्हिजन शोसाठी को-अँकर म्हणून घेतो!"

वीणा, "थँक्यू राजेश सर!"

मग पुढचे काही प्लॅन आखले गेले.

मध्यंतरी राजेशला आईकडून काही कॉल आले खरे पण त्याने काहीतरी जुजबी बोलून आईला थोपवून धरले. सुनंदाचा मुक्काम सध्या तिच्या फेवरीट काकूंकडे होता. खरे तर त्या काकूला सुनंदाकडून राजेश आणि त्याच्या आईला मिळालेली संपत्ती डोळ्यात खुपत होती. तसेच तिचा मुलगा आणि राजेश याची तुलना ती लहानपणापासूनच करायची आणि राजेशला मिळालेले प्रसिद्धीवलय तिच्या डोळ्यात खुपायला लागले. म्हणूनच ती राजेश-सुनंदाचा घटस्फोट करवण्याच्या मागे होती हे कालांतराने राजेशच्या आईला कळून चुकले होते आणि आता सुनंदाला हे कसे समजवायचे आणि त्या काकूच्या प्रभावातून बाहेर कसे काढायचे आणि मग राजेशला हे सगळे कसे समजावून सांगायचे या विवंचनेत राजेशची आई होती पण राजेश सध्या काही ऐकण्याच्या मूडमध्ये नव्हता! दरम्यान त्या काकूंच्या शेजारपाजारच्याकडून राजेशच्या आईला आणखी एक बातमी कळली...!!

* * *

मिष्टी मेहरानने पिकेकडून चोरलेल्या कथेवर एक तासाची सशक्त शॉर्ट फिल्म बनवली आणि व्हीडिओ ट्यूबवर रिलीज केली फक्त मुद्दाम शेवट थोडा बदलला. ती फिल्म पहिल्याच दिवशी चार लाख लोकांनी पहिली कारण त्या फिल्मला माऊथ पब्लिसिटी मिळाली.

दरम्यान वीणा रविना बनून पिकेला अधूनमधून भेटत राहिली. केके आणि रत्नाकरच्या चोरीचा भुर्दंड पिकेला भरावा लागला होता. खरं तर पिके काही कथाचोर नव्हता. काही पर्सनल गोष्टी सोडल्या तर प्रोफेशनली पिके खूप चांगला माणूस होता. विणाचे पिकेवर कालांतराने खरंच प्रेम बसले. तो तिला आवडू लागला.

नंतर केके परदेशातून परत आला. तोपर्यंत शॉर्ट फिल्मबद्दल पिके, केके आणि रत्नाकर या तिघांना कळले आणि त्यांना दुःखद आश्चर्याचा झटका बसला.

मिष्टी मेहरानकडे तिघांनी जाब विचारला आणि जवळची कथाही तिला दाखवली आणि चोरी मान्य कर नाहीतर कोर्टात केस दाखल करु अशी धमकी दिली.

पण मिष्टीने त्याला सांगितले, "एकच कल्पना दोन किंवा जास्त जणांना सुचू शकते मिस्टर केके! आणि लक्षात घ्या की तुमच्या आणि माझ्या कथेचा शेवट सारखा नाही. समजलं? त्यामुळे तुमचा दावा खोटा आहे. तुम्हाला कोर्टात जायचं तर खुशाल जा! मी निर्दोष सुटेन!"

हळूहळू विश्वासात घेऊन विणाने पिकेला त्याच्या कथांची चोरी तिने रवीना बनून कशी केली ते सांगितले आणि त्याच्या वडिलांच्या आणि रत्नाकारच्या भूतकाळातील चौर्यकृत्यांबद्दल सांगितले. त्यालाही आश्चर्य वाटले आणि त्याचा वडिलांबद्दल संताप झाला.

विणाने पिकेकडून वचन घेतले की जोपर्यंत राजेश केकेला योग्य धडा शिकवत नाही तोपर्यंत त्याने केकेला यातले काहीएक सांगू नये. कारण केकेला कोर्टात जाण्यापासून रोखणे, त्याची कथा चोरून जशास तसे बदला घेणे आणि केकेच्या आगामी चित्रपटाची कथा आधीच फोडून त्याचे जबर आर्थिक नुकसान करणे एवढाच फक्त राजेशचा उद्देश या सगळ्यामागे नव्हता तर केके आणि त्याच्यासारख्या इतर लोकांचा खरा चेहरा टीव्ही, बॉलिवूड इंडस्ट्रीसमोर आणणे हा उद्देश होता म्हणजे पुन्हा कुणी असे करायला धजावणार नाही.

नंतर पिके कडून चोरलेल्या आणखी दोन कथांवर मिष्टीकडून शॉर्ट फिल्म बनवून नेटवर फ्री अपलोड करण्यात राजेश यशस्वी झाला आणि समिरणला मराठीऐवजी हिंदी चित्रपट बनवायला सांगून बॉलिवूडमध्ये लेखक म्हणून राजेशचा शिरकाव आधीच झाला होता. तो आता योग्य वेळ आणि योग्य व्यासपीठ मिळण्याची वाट बघत होता.



प्रकरण 37

राजेश एकटाच लिफ्टमध्ये चढला.
सुनंदाला त्याच्यासोबत आली नाही.
तो लिफ्टमध्ये एकटाच!
नंबर्सऐवजी आकाराने मोठे होत जाणारे स्टार!
लिफ्टच्या दरवाज्याचे बटण.. दार उघडले गेले. दरवाज्यासमोर रागिणी!
घाबरल्याने पुन्हा दरवाजा बंद!
मोठा स्टार असलेले बटन!
लिफ्टचा अनाकलनीय वेग आणि हेलकावे!
अचानक जोराचा धक्का, लिफ्ट थांबली!
दार उघडले गेले..
अंधूक प्रकाशात एक दाढी असलेली वृद्ध व्यक्ती!
चेहरा क्लियर दिसत होता!
येस! हे तर सुपरस्टार अमित श्रीवास्तव!
त्यांनी लिफ्टमधून राजेशला बाहेर येण्यासाठी मदतीचा हात पुढे केला!
मग खांद्यावर एक नाजूक हात?
कुणाचा हात आहे? बघूया तर खरं?
तेवढ्यात राजेश स्वप्नातून जागा झाला.
सकाळचे पाच वाजले होते!

सुपरस्टार अमित श्रीवास्तव! त्यांचा आजपर्यंत एकदाही इंटरव्ह्यू घेण्याचा प्रसंग राजेशला आला नव्हता. ते खूप बिझी स्टार होते. नुसते स्टार नाही तर ते सुपरस्टार होते. स्वप्नात त्यांनी मला मदतीचा हात दिला? का? माझ्या सध्याच्या संघर्षात त्यांची मला मदत होईल असा त्याचा अर्थ घ्यायचा का? तो पाठीवरचा हात कुणाचा? सुनंदाचा? नसावा कारण ती तर लिफ्टमध्ये आली नव्हती!

विचार करत करत राजेश उठला. ब्रश करून त्याने चहा घेतला आणि गॅलरीत जाऊन तो विचार करू लागला. सुनंदाविना रिकामे घर भकास वाटत होते.

सुरुवातीला अनिच्छेने लग्न केले असले तरी राजेश सुनंदाचा संसार नंतर रुळावर आला असे वाटत असतानाच काकूंच्या कालवलेल्या विषाने तोही संसार अधांतरी लटकत होता. सकाळी झोपेतून उठल्यानंतरच्या सुनंदाच्या हालचाली, चाहूल सगळे त्याला आठवायला लागले. कदाचित सुप्रियाचे हृदय मी तोडले म्हणून तर मला अशा प्रसंगातून जावे लागत नाही ना? पण मी सुप्रियाशी ब्रेकप घेतला ते त्यावेळेस योग्य होतं असं मला वाटतं!

कदाचित आज माझा बदला आणि संघर्ष अंतिम टप्यावर पोहोचतोय ते बघायला ती असती तर?
ती सोबत असतांना सुद्धा मी इथपर्यंत पोहोचू शकलो असतो का?
ती बरोबर म्हणत होती का?
पण त्यावेळेस समजा सुप्रियाशी लग्न केलं असतं
आणि आईचा सुनंदाशी लग्न करण्याचा तगादा त्याच वेळेस रोखला असता तर?
पण तो सुनंदावर अन्याय नसता का झाला?
वचन मोडले नसते का गेले?
पण सुप्रियावर तरी अन्याय कसा झाला असू शकतो?
ती तर लग्न करून इटलीत सेटल झाली आहे!
मग मी आता काय करू?
अन्याय तर माझ्यावर झाल्यासारखा वाटतोय, नियतीचा!!
* * *
सकाळी दहा वाजता समिरणचा फोन आला.

"अरे! लेखक साहेब आहेत कुठे? कशी काय चालली आहे सुट्टी? एन्जॉय करतोय का बायकोसोबत?"

"अ हो हो! म्हणजे ... हो हो!"

"चला बरंय! अरे मी तुला यासाठी कॉल केला आहे की एक गुड न्यूज आहे आपल्या चित्रपटासाठी!"

"काय आहे ती न्यूज समिरण?"
"अरे! मी अमितजींना आपल्या एका आगामी मराठी चित्रपटांत पाहुणा कलाकार घेतो आहे कारण त्यांना माझे पूर्वीचे चित्रपट आवडलेत आणि त्यांनी स्वतःच एका पार्टीत मला विचारले की समिरण मला तुझ्याबरोबर काम करायची इच्छा आहे! ऐकलं का? स्वतः अमितजी!"

राजेशचा प्रथम कानांवर विश्वासच बसेना. आपल्याला पडलेले स्वप्न??

"अरे! काय विचारात पडलास राजेश? मी खरं तेच सांगतोय! पुढे तर ऐक! मी त्यांना म्हटलं की सर मी माझे हे भाग्य समजतो की तुमच्यासारखा सुपरस्टार माझ्या चित्रपटात काम करायला उत्सुक आहे आणि त्यांच्या पंधरा मिनिटांच्या रोलसाठी तुला लिखाण करायचे आहे तेही त्यांचेशी चर्चा करून!"

"काय सांगतोस समिरण?" खरंच, ग्रेट न्यूज दिलीस!"

समिरण पुढे म्हणाला,

"आणि माहितीये का? ते आपल्या मराठी चित्रपटाला फायनान्स पण करणार आहेत. तसेच ते एक हिंदी चित्रपट काढत असून मला दिगदर्शक म्हणून घेणार आहेत आणि तुला लेखक म्हणून घायचं मी आधीच त्यांचेकडून कबूल केलंय! आणि त्या चित्रपटासाठी त्यांच्या मुलाला – अभिजितला लीड रोलमध्ये घायचे आहे! अभिजितसाठी सशक्त व्यक्तिरेखा लिहिणे हे आता तुझे कौशल्य आहे रे बरं का राजेश! त्यांच्या मुलाला एका हिट चित्रपटाची आवश्यकता आहे! तर मग बोल केव्हा भेटतोस मला राजेश?"

पुढच्या दहा मिनिटांत राजेश वेगाने समिरणकडे निघालासुद्धा आणि कार चालवत असतांना त्याचा मनात एक प्लॅन तयार होत होता!



प्रकरण 38

सकाळचे अकरा वाजले होते.

चार पाच वेळा बेल वाजवूनसुद्धा दरवाजा उघडत नाही म्हणून रायमा बोस यांनी शेजारच्यांच्या मदतीने दरवाजा तोडला. त्या आणि शेजारच्यांपैकी दोन महिला घाईघाईत सरळ बेडरूम मध्ये पोहोचल्या तर त्यांना बेडवर अस्ताव्यस्त पहुडलेली रिताशा दिसली.

तिचा श्वास चालू होता आणि जवळच्याच टेबलवर दोन टॅब्लेट्स पडल्या होत्या त्या उचलून बघत त्यांनी रिताशाला गदागदा हलवत आणि स्वर रडकुंडीला येत म्हटले, "बेबी, शोना उठ! तुझी मम्मी आलीय. तू झोपेच्या गोळ्या घेतल्या? मला अशक्य वाटतंय!

उत्साहाने सळसळणारी सतत पॉझिटिव्ह राहणारी माझी बेबी रिताशा! आज काय हालत झाली तुझी? आणि मला एका शब्दानंही कॉल करून तू सांगितलं नाहीस? बेबी उठ!"

असे म्हणून रडत रडत रिताशाचा हात हातात घेऊन बाजूच्या खुर्चीवर रायमा बोस बसल्या. तिच्या सोबतच्या एक महिलेने एका ग्लासमध्ये फ्रिजमधले थंड पाणी घेतले आणि रिताशाच्या चेहऱ्यावर ओतले. ती आता हालचाल करू लागली पण तिचे डोळे खोल गेले होते आणि चेहऱ्यावर अतिशय निर्विकार आणि शून्याकडे बघत असल्याचे भाव होते. रायमाने तिला कमरेत धरून उठवले आणि उशीला टेकून बसवले.

रायमा इतर दोन महिलांना म्हणाली, "कृपया, मी तुम्हाला विनंती करते की हे सगळं कुणाला सांगू नका आणि तुमच्यासोबत असलेल्या इतरांनाही सांगा की कुणाला सांगू नका म्हणून! मीडियाला हिच्या अशा अवस्थेबद्दल कळलं तर ते प्रश्न विचारून विचारून हिचं जगणं नकोसे करून ठेवतील!"

त्यापैकी एक महिला म्हणाली, "काळजी करू नका ताई. आम्ही कुणाला सांगणार नाही. आजपर्यंत आमच्याशी रिताशाचे शजारी म्हणून वागणे खूप चांगले राहिले आहे. तुम्ही हिला हॉस्पिटल मध्ये घेऊन जा!"

रायमा म्हणाल्या, "धन्यवाद तुमच्या या सगळ्या मदतीबद्दल! मी आता हिला कोलकात्याला घेऊन जाते मगच तिथल्या हॉस्पिटलला दाखल करते! काहीही केलं तरी इथे मीडिया पाठ सोडणार नाहीत!"

रायमा बोस यांनी त्या रात्री सगळीकडे गुप्तता पाळून एयर अम्ब्युलन्स मागवली आणि त्या रिताशासह कोलकात्याला पोहोचल्या. तोपर्यंत आई सोबत असल्याने रिताशाला हायसे वाटले आणि प्रवासात ती जराशी रिलॅक्स वाटत होती पण अधून मधून स्फुंदून स्फुंदून रडतही होती तेव्हा तिची आई तिच्या पाठीवरुन हात फिरवत होती मग तिला तेवढ्यापुरते बरे वाटे पण अर्ध्या तासानंतर तिला पुन्हा रडू कोसळे!

मुंबईत अशी बातमी पसरवली गेली की अभिनेत्री रिताशा काही काळाकरता सुट्टीवर गेल्याची शक्यता आहे.

तेथील डॉक्टरांनी आठ दिवसानंतर हॉस्पिटलमधून तिला परत जाऊ दिले. झोपेच्या गोळ्यांचा डोस जास्त झाल्याने झालेले परिणाम भरून काढण्यासाठी त्यांनी मेडिसिन दिले आणि घरी जाऊ दिले पण त्यांनी तिचे मन इकडेतिकडे रमवायला सांगितले. रिताशाचे वडील लहानपणीच वारले होते. मग तिची आईच तिचे वडीलसुद्धा झाली होती. आईनेच तिला फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाण्याच्या तिच्या निर्णयाचे समर्थन केले होते. पण रिताशाला सहजासहजी बॉलिवूडमध्ये एंट्री मिळाली नव्हती...

रिताशाला एका रात्री अंथरुणात पडल्या पडल्या जुने संघर्षाचे दिवस आठवू लागले...

कोलकात्यातील नाट्यगृहात एकच टाळ्यांचा आवाज ऐकू आला कारण छोटी रिटा (म्हणजेच रिताशा) हिने वयाच्या बाराव्या वर्षीच "अभिसुंदरी" या नाटकातील "मौमिता" या पत्राचे संवाद अशा काही सहजसुंदर अभिनयाने सजवून म्हटले जाते की टाळ्यांचा गाजर काही केल्या थांबेचना.

जरी ती सावळी होती तरी नाकी डोळी आणि अंगाने नीटस होती. नाटकाचे दिगदर्शक बिजॉन घोष यांनी तर त्यानंतर तिला यानंतरच्या त्यांच्या सगळ्या नाटकांत तिला भूमिका देण्याबाबत घोषणासुद्धा करून टाकली. वडील लहानपणीच वारल्यानंतर आईच रिटासाठी सगळे काही होती. रिटाची लहानपणापासूनची अभिनयवृत्ती ओळखून तिने त्याला विरोध करण्याऐवजी सपोर्ट केला.

विविध बंगाली नाटकांत आणि टीव्ही शो मध्ये रिताला भाग घेण्यासाठी प्रोत्साहन तर तिने दिलेच त्याबरोबरच तिच्या अभ्यासाकडे दुर्लक्ष होऊ नये हेही तिने कटाक्षाने पाळले. तिच्या नात्यातील एका काकांचा घराण्यातील मुलींनी नाटकात, टिव्हीत काम करायला विरोध होता. पण त्यांच्या विरोधाला न जुमानता प्रसंगी समाजाचे टक्के टोपणे सहन करत तिने आपल्या लाडक्या रिटाला तिच्या स्वप्नांच्या पूर्ततेसाठी सर्वतोपरी प्रोत्साहन दिले. त्या काकांनी समाजात तिचे लग्न होऊ देणार नाही अशी धमकी दिली पण त्यावेळेसही रिटाची आई अटळ राहिली.

बिजॉन घोषच्या पुढील प्रत्येक नाटकांत रिटाचा रोल असायचा. त्या रोलला ती जीव तोडून आपल्या उपजत अभिनयाने न्याय द्यायची. तिच्या अनेक नाटकांत तिच्यासोबत काम केलेला पुरुष सहकलाकार सौमित्र सरकार याचे तिच्यावर एकतर्फी प्रेम होते. पण तो ते कधीही शब्दांनी व्यक्त करू शकला नाही आणि डोळ्यांची भाषा समजण्यात रिताशा कमी पडली. पण रिताशाच्या आईला हे समजलं होतं. ती एके दिवशी सौमित्राशी बोलली आणि रिताशाच्या मनात काय आहे हवं ती जाणून गजेईन असे तिने त्याला सांगितले, त्यासाठी तिने त्यांचेकडे काही काळ मागितला.

दरम्यान एके दिवशी मूळचे बंगाली आणि आता एक प्रसिद्ध बॉलिवूड दिगदर्शक रबिंद्र सरकार एका बंगाली पुस्तकावर आधारित बॉलिवूड चित्रपट बनवण्यासाठी काही बंगाली कलाकार निवडीसाठी बिजॉनला भेटले. त्यांची काही नाटके त्यांनी पहिली. त्यांनी रिताशाला आपल्या आगामी हिंदी चित्रपटासाठी कास्ट करायचे ठरवले आणि बिजॉन यांची परवानगी मागितली. बिजॉन यांनी प्रथम रिताशाचा कल तपासला. फक्त राज्यापुरता अभिनय मर्यादित न ठेवता पूर्ण देशाला आपले अभिनयगुण कळले पाहिजेत असे तिलाही वाटले आणि मग बिजॉय यांनी सुद्धा तिला थांबवले नाही. अर्थातच रिताशाच्या आईनेसुद्धा तिला परवानगी दिली. मुलीच्या सुखातच आपले सुख आहे असे तिने ठरवले होते. तिचे ग्रॅज्युएशन सुद्धा तोपर्यंत पूर्ण झाले होते. मग अशी अनुकूलता झाल्यावर रिताशाने चित्रपटांत जीव तोडून काम केले. तिची आईसुद्धा मुंबईत येऊन तिच्यासोबत राहिली.

रिताशाचा हा पहिलाच बॉलिवूड चित्रपट "दास बावरा" सुपर डुपर हिट ठरला. अर्थात त्यात रिताशासोबत बॉलिवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री "तरण्या अरोरा" सुद्धा होती. पण तरण्यासोबतच रिताशाचा अभिनयसुद्धा वाखाणला गेला.

समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून तिचे वारेमाप कौतुक झाले. मग तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येऊ लागल्या. तिने मग आपल्या आईलाच आपले मॅनेजर बनवले. दिगदर्शक, प्रोड्युसर यांना रिताशाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट करता येईनासा झाला.

रिताशाला न सांगताच परस्पर तिची आई तिला ऑफर झालेल्या काही भूमिका नाकारून टाके. कथेची गरज असली तरी काही किसिंग, बेड सिन चित्रपटांत असतील तर ते कापावे अथवा रिताशा चित्रपटांत काम करणार नाही असे तिची आई ठणकावून सांगायला लागली. कधीकधी ती शूटिंगच्या सेटवरही हजेरी लावायची. प्रथम रिताशाला हे योग्य वाटले पण नंतर तिला ऑफर येईनशा झाल्या तेव्हा बदलत्या जगानुसार आपणही बदलावे असे तिला वाटू लागले, ती आईशी वाद घालू लागली. सौमित्रबद्दल आईने सांगताच ती चिडली आणि त्याच्याशी लग्न करणार नाही असे तिने निक्षून सांगितले कारण बॉलिवूडचा एक मॅचो मॅन आणि ऍक्शन हिरो जॉनी डिसुझा तिच्या जीवनात आला होता. त्याचे अजून दोन तीनच चित्रपट आले होते आणि ते खूप जास्त सुपरहिट नव्हते पण फ्लॉपसुद्धा झाले नव्हते.

शेवटी रिताशापुढे आईने हार मानली आणि पोरीच्या सुखातच आपले सुख असे मानून तिला हवी ती मोकळीक दिली. पण तोपर्यंत तिच्या हातून अनेक चांगल्या भूमिका निघून गेल्या. एक दीड वर्षे ती रिकामी बसली.

मग एके दिवशी सुभाष भट यांनी तिला हॉरर चित्रपटाची ऑफर दिली ज्यात अनेक बेड ऐन, किसिंग सिन आणि खूप अंगप्रदर्शन करावे लागणार होते. रिताशाने कोणतीही अट न घालता होकार दिला. काही दिवस परदेशात शुटिंग होती. चित्रपटाचे नाव होते "जमीन का राज”. चित्रपट खूप सुपरहिट झाला.

काही समीक्षकांनी रिताशावर अंगप्रदर्शनाचा मार्ग स्वीकारल्याबद्दल टीकेची झोड उठवली आणि टीव्ही चॅनेल्सनी रिताशाचे चित्रपटातील हिरोबरोबर, पिंटो मोरिया बरोबर परदेशातील शुटिंगसाठीच्या वास्तव्यादरम्यान अफेअर असल्याच्या काल्पनिक बातम्या पसरवल्या. त्या इतक्या खऱ्या वाटल्या की रिताशा ने स्वतः त्याचे खंडन करूनही लोकांना आणि इंडस्ट्रीतील लोकांना ते अफेअर खरेच वाटले. याचा परिणाम म्हणून जॉनीने तिच्याशी ब्रेकप केला.

खरं तर नवखा हिरो पिंटो यानेच स्वतःच्या प्रसिद्धीसाठी या अफवा पसरवल्या होत्या पण हे त्याने बेमालूमपणे केले आणि ते अजूनही कुणालाच कळले नाही. त्यानंतर ती डिप्रेशनमध्ये गेली पण आईच्या मदतीने सावरली.

दरम्यान तिला एकाच साच्याच्या हॉरर चित्रपटातल्याच भूमिका ऑफर होऊ लागल्या पण त्या स्वीकारण्याशिवाय तिच्याकडे पर्याय नव्हता. अर्थात ते चित्रपट हिट होत होते आणि ती समाधानी होती. जणू काही हॉरर चित्रपटांत तिची एकटीची एकाधिकारशाही झाली पण प्रत्येक चित्रपटांत तिचे अंगप्रदर्शन हटकून असायचे पण कालांतराने वय वाढत गेल्यावर तिच्या अभिनयात आणि अंगप्रदर्शनात तोचतोचपणा आला. तिचा हॉटनेस कमी झाला. दरम्यान तिची आई पुन्हा आपल्या घरी निघून गेली होती.
रिताशाला महागड्या लाईफस्टाईलची तोपर्यंत सवय झाली होती. जवळचे पैसे चैनीसाठी मुंबईत अपुरे पडू लागले. दर उन्हाळ्यात युरोप फिरून येण्याची सवय होती त्यासाठी आता पैसे कमी पडू लागले.

तशातच तिला कळले की एका सुमार दर्जाच्या टीव्ही स्टारला म्हणजे सोनी बनकरला सुभाष भटनी त्यांच्या आगामी चित्रपटांत घेतले. आता हक्काचे सुभाष भट सुद्धा दुरावले होते आणि हॉरर चित्रपटांची लाट थंडावली. कित्येक दिवस तिने आईला फोन केला नाही. ती डिप्रेशन मध्ये गेली. डॉक्टरांची ट्रीटमेंट सुरू केली. एकदा कहर झाला. तिने एका रात्री नैराश्यापोटी झोपेच्या जास्त गोळ्या घेतल्या पण योगायोगाने त्या दिवशी तिची आई तिच्याकडे आली आणि तिने तिला कोलकात्याला परत आणले...

हे सगळे आठवल्यावर तीला घाम आला. ती थरथर कापू लागली. तिला तहान लागली. फ्रिज मधून काचेच्या ग्लास मध्ये पाणी ओतत असतांना तिच्या डोक्यात विचारांचा गलका असह्य झाला आणि तिला डीप्रेशनचा सौम्य झटका आला. तिने ग्लास समोरच्या भिंतीवर भिरकावून दिला!!

ती मोठमोठ्याने म्हणत होती, "एक सुमार दर्जाची अभिनयशून्य नाचरी नालायक बाई, सटवी! सोनी बनकर! माझी जागा घेते? आणि तेही सुभाष भटच्या पिक्चर्स मध्ये?"

रायमा बोस, तिची आई जागी झाली आणि तिने लाईट लावला आणि तिच्याकडे धावत गेली तोपर्यंत रिताशाने तीन शोभेचे काचेचे फ्लॉवर पॉट जमिनीवर फेकून त्यांचा चुरा चुरा करून टाकला होता आणि आता तिच्या हातात भिंतीवरचे महागडे क्लॉक होते. ते क्लॉक तिने टीव्हीच्या दिशेने भिरकावले पण रायमा आडवी आली आणि ते क्लॉक जमिनीवर पडून फुटले. टीव्ही वाचला!

रायमाने तिला बळजबरीने खांद्याला पकडून ओढत नेले आणि पलंगावर बसवले.

"रिलॅक्स, बेबी! असे तोडफोड करून काहीच होणार नाही. शांत हो!"

"त्या सटवीला, सोनी बनकरला मी धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही."

"तिने तुझे काय बिघडवले आहे रिटा? तिला दोष देऊ नकोस!"
"तिने माझा हक्काचे काम हिरावले माझ्यापासून! माझे “वलय”, माझे ग्लॅमर हिसकवले आहे तिने माझ्यापासून!"

"बेबी! हे तर चालायचंच या इंडस्ट्रीमध्ये! तिने ते काही मुद्दाम केलेले नाही हे तुला माहितेय! तिच्याकडे संधी आली आणि तिने ती स्वीकारली!"

"पण तिने माझी जागा घेतली त्याचे काय? नाही! मी तिला असं करू देणार नाही! ती मस्त पिक्चर करेन, यश चाखेन आणि मी इथे गाशा गुंडाळून स्वस्थपणे बसणार? मुळीच नाही!"

"अगं, मग तू करणार आहेस तरी काय?"
"मी परत मुंबईला जाणार!"
"अगं, तुझी हालत ठीक नाही. तिथे जाऊन काय करणार?"

"माझी हलत ठीक आहे! सगळं ठीक आहे. यापूर्वीही मी डिप्रेशनमधून सावरले होते! आतासुद्धा मी सावरले आहे नैराश्यातून! मी परत जाणार! काम शोधणार!"

"हे बघ बेबी! इथे कोलकात्याला पुन्हा तू थिएटर मध्ये काम करायला लाग!"
"नाही, मी बरी आहे! मी उद्याच पुन्हा मुंबईला जाणार!"

आईने लाख समजावले पण तिने ऐकले नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी तिच्या वागणुकीत बदल जाणवत होता. ती जाणीवपूर्वक स्वतःला कंट्रोल करत होती आणि ही एक चांगली गोष्ट होती. तिने फ्लाइटचे तिकीट बुक केले आणि सामान बांधून ती तयारी करू लागली. तिच्या मनात नेमके काय चाललंय हे आज तिच्या आईला मुळीच समजत नव्हते शेवटी नाईलाजाने तिने परवानगी दिली.

मुंबईच्या विमानात बसल्यानंतर रिताशाच्या चेहऱ्यावर एक अद्भुत आणि गूढ हसू उमटले. तिच्या मनात नेमके काय चाललंय हे फक्त तीच सांगू शकणार होती, पण कसलातरी गाढ निश्चय तिच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता हे विमानातील तिच्या बाजूच्या सहप्रवाशाला जाणवलं हे नक्की!


प्रकरण 39

ऑस्ट्रेलियातील बोन्डी किंवा युकेतील बाऊनमाऊथ बिचवर जसे स्त्रियांना टॉपलेस व्हायला व्हायला परवानगी आहे तसे ब्राझील देशातल्या रिओ दि जनैरोच्या कोपाकबाना बीचवर परवानगी नाही. त्यादिवशी संध्याकाळी सूर्य मावळतीला असतांना कोपाकबाना बीचवर आलेल्या बहुतेक ब्राझीलियन किंवा इतर देशांतील पर्यटक स्त्रियांनी घातलेली बिकिनी ही आकाराने एवढी छोटी आणि तोकडी होती की त्या जवळपास न्यूडच वाटत होत्या.

काही जणी पोहोण्यासाठी बिकिनी तर काहीजणी फक्त ऊन खाण्यासाठी नेहमीच्या वापरातील रंगीबेरंगी ब्रा आणि पँटी किंवा फक्त पँटी घालून तेथे आलेल्या होत्या. बहुतेक पुरुष मंडळी ब्रीफ घालून फिरत होते. अनेक स्त्रिया बिनधास्तपणे नियम झुगारून टॉपलेस होऊन फिरत होत्या आणि हे नियम बनवणाऱ्याना सुद्धा माहिती होतेच. या बीचवरील स्त्रियांपैकी अर्ध्या स्त्रिया या बहुतेक करून मॉडेल होत्या आणि असतातच. रिओला दक्षिण अमेरिकेचे पॅरिस म्हणतात ते उगाच नाही. त्या बीचवर नेहमीच या मॉडेल्स येत असतात. कधी कधी येथे सौदर्य स्पर्धा सुद्धा भरते. हॉलीवूड चित्रपटांत दिसणाऱ्या बिकिनीतील सुंदर आणि भरीव शरीरयष्टीच्या अभिनेत्रींपेक्षाही कित्येक पटींनी सुंदर अशा हजारो स्त्रिया अगदी तिथे सहजच दृष्टीस पडत होत्या.

स्थानिक पुरुषांच्या दृष्टीला असे उघड उघड मादक सौंदर्य बघणे अंगवळणी पडलेले असते पण भारतात राहणाऱ्या मंडळींना मात्र ते डोळे भरभरून बघतच बसावे असे वाटते.

असेच दोन भारतीय चेहरे काळा कोट, हातात ब्रिफकेस आणि चेहऱ्यावर गॉगल लावून झपाझप चालत किनाऱ्याकडे निघाले होते. बिचवरच्या टॉपलेस मॉडेल्सकडे बघून त्यांचे मन भरत नव्हते. किनाऱ्याजवळ आरामात पहुडलेल्या एका पिळदार शरीरयष्टीच्या माणसाकडे ते आले. तो माणूसही भारतीयच होता. ते दोन जण आल्याचे बघून तो अलर्ट झाला आणि जागेवरून उठून उभा राहिला, त्याने त्या दोघांशी हस्तांदोलन केले.

"हॅलो मिस्टर बाजवा अँड मिस्टर काजवा! केव्हा येणार आहे ती व्हेरोनिका सिसिली?"

"सर साहेब, ती येतच असेल. पंधरा मिनिटात पोचेल ती आपल्याकडे!"

मग ते तिघे जवळच्या चार पैकी तीन खुर्च्यांवर बसले. एक खुर्ची रिकामी होती. ती बहुदा त्या व्हेरोनिकासाठी असावी. तिघेही बराच वेळ बोलत होते आणि त्या बीचवर आलेल्या स्त्री पुरुषांकडे बघत होते.

पाच मिनिटातच व्हेरोनिका समोरच्या गर्दीतून वाट काढत येतांना दिसली. तिने काळ्या रंगाची बिकिनी घातली होती. ती त्या तिघांच्या जवळ आली आणि तिघांनीही तिला उभे राहून शेक हँड केले. त्या तिघांमध्ये बराच वेळ काहीतरी बोलणे झाले आणि मग चौघे जवळच्या आराम खुर्च्यांवर बसले. ते बीचवरच्या स्त्री पुरुषांची लगबग बघत बसले.

व्हेरोनिका मग फोनवर कुणाशीतरी बोलली. ते दोघेजण नंतर निघून गेले. आता तिथे व्हेरोनिका आणि तो "सर साहेब" हे दोघेजण होते. ते दोघे बराच वेळ बोलत होते आणि गर्दीत कुणी त्यांचेकडे बघतय का असा मागोवा घेत होते.

मग, व्हेरोनिकाने सरसाहेबकडे हसून पाहिले, स्वत:ची ब्रा काढून टाकली आणि बाजूच्या एका टेबलावर ठेवली. आता ती संपूर्ण टॉपलेस झाली होती. मग इकडेतिकडे पाहिल्यावर ती सरसाहेबला बाय करून टॉपलेस अवस्थेत त्या बीचवरील गर्दीत निघून गेली. जातांना तिच्या नजरा सावधपणे इकडेतिकडे भिरभिरत होत्या. मग ती गर्दीत दिसेनासी झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी अटलांटिको पेस्ताना या हॉटेल मध्ये सरसाहेब अंघोळ करून सोफ्यावर कुणाची तरी वाट बघत होता. बाजूला विमानप्रवासासाठी एक बॅग तयार दिसत होती. थोड्याच वेळात बेल वाजली आणि एक अतिशय सुंदर स्त्री आत आली. तिच्याकडे बघून ती युरोपिअन असावी असे वाटत होते. तिचे केस लालसर सोनेरी होते. चेहरा अतिशय बोलका आणि सुंदर होता. तिने हसून सरसाहेबकडे पाहिले. तिच्या हातात एक हँडबॅग होती. ते दोघे इंग्रजीत बोलू लागले.

"शाल वी गो?"

"एस, माय लव्ह! बट व्हेअर इज माय गिफ्ट?"

"गिफ्ट?", तो हसायला लागला, "हे काय! देतो थांब!"

त्याने बाजूला ठेवलेली काळ्या रंगाची ब्रा तिला दिली.
"वाव! मस्त आहे! पण माझ्या आधी तूच माझे गिफ्ट म्हणजे ती नवी कोरी ब्रा उघडून बघितलीस? एवढी घाई?", असे म्हणून तिने त्याचेकडे लाडाने बघितले.

तो डोळे मिचकावत म्हणाला, "मला उत्सुकता होती तू यात कशी दिसशील ते, म्हणून मी तू येण्याआधी थोडी कल्पनाशक्ती लढवत होतो!"

तिने मग तिचा टॉप त्याच्यासमोर काढला. ती आता टॉपलेस होती. त्याने तिला मिठी मारली आणि कुरवाळायला सुरुवात केली.

ती त्याची मिठी सोडवत म्हणाली, "नाही डियर! आता नाही. आता आपल्याला प्रवास करायचा आहे ना! हे आता नंतर! इंडियात गेल्यावर! आता मला तुझी गिफ्ट घालू दे ना!"

मग तो नाईलाजाने बाजूला झाला कारण त्याना लवकरच एयरपोर्टकडे निघणे जरुरी होते. तिने ती काळी ब्रा घातली आणि टॉप चढवला. ते दोघे हॉटेलचे चेकआउटचे सोपस्कार आटोपून निघाले.

थोड्याच वेळात सिक्युरिटी चेक झाल्यानंतर मग त्यांचे "एयर फ्रांस" चे विमान आकाशात उडाले.

भारतात आल्यावर विमानतळावरचा सिक्युरिटी ऑफिसर म्हणाला, "वेलकम टू इंडिया! मिस्टर सूरज सिंग और मिस ऑलिव्हिया ब्रूनर!"


प्रकरण 40

नंतर मुंबईतील सूरजच्या फ्लॅट वर -

सेक्स केल्यानंतर सूरज आणि ऑलिव्हिया एकमेकांच्या बाहुपाशात पहुडले होते.

"रागिणी इज आऊट ऑफ माय माईंड नाऊ. तुला भेटायला मला ब्राझीलला येण्याची वाट बघावी लागत होती पण आता रागिणी इज आऊट ऑफ माय माईंड अँड आऊट ऑफ धिस वर्ल्ड ओल्सो! मला तुम्ही दोन्ही आवडत होत्या!" हसत सूरज म्हणाला. पण अधून मधून त्याचे लक्ष टेबलावर पडलेल्या त्या काळ्या ब्राकडे होतं.

"तुला आम्ही दोन्ही आवडतात यात मला त्यात काही हरकत नव्हती पण रागिणीने आत्महत्या करून योगायोगाने का होईना माझं शेअर केलेलं प्रेम एकट्या मला दिलं! न मागता मला तू पूर्ण मिळालास!", ओलिव्हिया म्हणाली.

"खरं तर मलाही तेच हवं होतं कारण रागिणी आजकाल माझ्यावर जास्त संशय घ्यायला लागली होती. कुठून कुठून काय काय माहिती मिळवून आणि माझे फोनवरचे बोलणे चोरून ऐकून मला जाब विचारायला लागली होती ती!

मला ती वडलांच्या पार्टीत भेटली आणि आवडली पण मला तिने सिनेक्षेत्रापासून दूर राहावे असे वाटत होते. घरच्या प्रोडक्शन हाऊस मध्ये ठीक आहे पण त्यापुढे जाऊन चित्रपटात तिने काम करणे मला नको होते. तिची सुभाष भटच्या चित्रपटातली एक संधी मी मुद्दाम हुकवली! हे कळलं तर मला जाब विचारायला लागली ती!"

"यु आर सो बॅड! का केलंस असं? तू मला तर तसे नाही ना करणार?", ऑलिव्हिया म्हणाली.

"तू तिच्या साईडची आहेस की माझ्या? मी तुला असं करणार नाही ऑलि! तू मला खूप आवडतेस! आणि ठरल्याप्रमाणे आपण आता "लिव्ह इन" मध्ये राहू! माझ्याच फ्लॅटवर! आणि तुला काय वाटलं? रागिणी धुतल्या तांदळासारखी होती? नाही! तिचा एक बॉयफ्रेंड होता, तो मेल्यानंतर तिने ज्याच्याशी लग्न केलं त्याला सोडून पळून निघून आली होती ती मुंबईला!"
"तू जर माझ्या सुद्धा करियरच्या आड आलास तर मी आहे तशी युरोपला निघून जाईन!"

"तशी वेळ येणार नाही. आता मी चित्रपट निर्मितीत उतरणार आहे. सोबत हॉटेल आणि फूड चेंन्स आहेतच माझ्या. पप्पांशी माझे रागिणिच्या आत्महत्येवरून मतभेद झाल्यावर आता आम्ही एकमेकांना भेटत नाही. यापुढेही नाही भेटणार! ते त्या मूर्ख रागीणीची बाजू घ्यायला लागले मग मी त्यांना खडसावले. खरं तर पत्नीने कसं पतीला पूर्ण समर्पित व्हायला पाहिजे आणि रागिणी? बरं झालं आम्ही लग्न केलं नव्हतं! एनिवे! मेलेल्या व्यक्तीबद्दल वाईट बोलू नये म्हणतात! चल बस झालं! तिचा विषय बंद! मस्तपैकी अंघोळ करून ये आता! पण मला तिच्या आत्महत्येचा अफसोस वाटतो आणि वाटत राहीन!"

आंघोळ केल्यानंतर ओलिव्हिया तयारी करून तिच्या मुंबईतील तिच्या एका मॉडेल मैत्रिणीला भेटायला निघून गेली.

तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत सूरज हसत मनात म्हणाला, "ओलिव्हिया, तू मला दाखवतेस तितकी स्मार्ट नाहीयेस! तुला एक गोष्ट माहीत नाही की पार्टीच्या रात्री घरी रागिणीच्या नकळत ती किचनमध्ये असतांना मी घरातील फ्यूज निकामी केला, अंधार केला. मग तिच्याशी भांडताना खांद्यावर धरून हलकेच तिला गॅलरीच्या कठड्याच्या बाजूला आणले आणि तिला ती बेसावध असतांना ढकलले! तिचा तोल गेला... मग काय! ही एक आत्महत्याच वाटली! कारण रागिणीला माझे असे सत्य गवसले होते जे अजून तुलाही माहीत नाही!

मी आंतरराष्ट्रीय ड्रग्ज टोळीशी संबंध ठेऊन आहे. माझी “फूड चेन” ही माझे लोकांना दाखवायचे दात आहेत. त्यातले फूड्स एकदा खाल्ले की लोकांना एवढे चटक लावतात की पुन्हा पुन्हा ते तो पदार्थ खातात, कारण मी त्यात सौम्य असे एडीक्टिव्ह ड्रग्ज (नशिले पदार्थ) मिसळतो ज्यामुळे लोकांना त्याची खूप चटक आणि सवय लागते आणि मी भारतात विषेशतः मुंबई आणि दिल्लीत ड्रग्जचे जाळे पसरवून ड्रग्ज विकतो...

आणि आता पुढचं पाऊल म्हणजे, एका आंतरराष्ट्रीय डॉन कडून मला चित्रपटनिर्मितीसाठी करोडो पैसे मिळणार आहेत! पण त्याची अट एकच आहे, ती म्हणजे भारतातील आणि परदेशातील त्या डॉनशी संबंधित असणाऱ्या गुन्हेगारांच्या जीवनावर चित्रपट बनवायचा, त्यांचे उदात्तीकरण करायचे!”

असा विचार करून तो हसायला लागला आणि पुढे मनाशी विचार करत राहिला, "ओलिव्हिया, आता तुला मी माझ्या पिक्चर मध्ये काम देणार! तुझ्यासोबत राहून मजा करणार! पिक्चर बनवून करोडो कमावणार! फूड चेन मधून कमावणार! मालामाल होणार! जीवनातली सगळी सुखं उपभोगणार! माझ्या जीवनाचा एकच उद्देश आहे, अमाप पैसा कमावणे, मग तो कोणत्याही मार्गाने असो आणि मग त्या पैशांनी तुझ्यासारख्या आणि तुझ्यापेक्षाही सुंदर अशा अनेक स्त्रियांना उपभोगणार! अगं, स्मार्टनेसचा आव आणणारी तू एवढी बुद्धू आहेस की, तूला हे ही माहीत नाही की तुझा वापर मी ब्राझीलहून येतांना तुझ्या ब्रा मध्ये लपवून आणलेल्या एका नव्या अमली पदार्थाच्या तस्करीसाठी केला आहे. विशिष्ट प्रकारे खास बनवून घेतलेल्या त्या काळ्या ब्राची शिवण उसवून मी आता त्यातून ड्रग्जची पावडर काढणार! आणि पुन्हा जशीच्या तशी तुझी ब्रा तुला परत! काय? बरोबर ना?"

काही दिवसांनंतर, सूरज आणि त्याच्या नव्या गर्लफ्रेंडबद्दल न्यूज चॅनेल्सनी वेगवेगळे प्रोग्राम्स केले. सूरजने एका पत्रकार परिषदेत जाहीर केले, "आता मी चित्रपट निर्मितीत उतरणार आहे. माझी स्वर्गीय मैत्रीण रागिणी हिला मी माझा पहिला चित्रपट समर्पित करणार! माझ्या प्रॉडक्शन हाऊसचे नाव सुद्धा रागिणी एंटरटेनमेंट हाउस लिमिटेड हेच असणार आहे."

याच वेळेस दूर आकाशात कुठेतरी एक अतृप्त आत्मा पृथ्वीवर पुन्हा येण्यासाठी काय करावे लागेल या विवंचनेत भटकत होता पण त्याला अजून मार्ग सापडत नव्हता.

रागिणीची केस पोलिसांनी बंद करून टाकली होती कारण सूरजने पोलिसांना सांगितले होते की, "ती तिच्या पूर्वायुष्याबद्दल खूप टेन्शन घ्यायची. तिचे विवादास्पद पूर्वायुष्य मी खुल्या मनाने स्वीकारले होते. पण जेव्हा टीव्हीवर त्याबद्दल चर्चा झाली त्यानंतर ती खूप तणावाखाली होती. मी तिला खूप समजावलं पण ...", असे म्हणतांना त्याला खोटे रडू कोसळले होते.

मनातल्या मनात सूरज म्हणाला, “आणि एखाद्या पत्रकाराने एखाद्या कलाकाराचे खरे पूर्वायुष्य जगासमोर आणले म्हणून त्या कलाकाराने आत्महत्या केली तरी त्या पत्रकाराला दोषी धरता येणार नाही कारण मनोरंजनाच्या या वलयांकित क्षेत्रात अशा अनेक गोष्टी पचवायची हिम्मत असावी लागते!”

त्यावेळेस रागिणीची कॅनडातील मैत्रीण मात्र अस्वस्थ होती. तिला एकंदरीत रागिणीच्या नेहमी येणाऱ्या फोन कॉल वरून आणि एकंदरीत बोलण्यावरून ती आत्महत्या करेल असं कधी वाटलं नव्हतं. मात्र कॅनडात राहून याबद्दल ती पोलिसांना काय आणि का आणि कसे सांगणार?
सूरजला लवकरच एक फोन आला, "सर साहेब, बाजवा बोल रहा हूं!"

"बोल बाजवा!"

"सरसाहेब, व्हेरोनिका को आपकी याद आ रही है! मिलने बुलाया है आपको!"

"साले, बाजवे! सिर्फ इतना बताने के लिए मुझे कॉल किया? मुझे पता है! उसने मुझे कॉल किया था!"

"सरसाहेब, और एक दुसरी जरुरी बात है, भाईने आपके लिए संदेसा भेजा है!"

"क्या संदेसा है? बोल जलदी!"

"दुबई में भाई का एक चचेरा भाई है “कातील खान”, उसपर ऍक्टिंग और कॉमेडी का भूत सवार है!"

"हां हां, आगे बोल!"

"तो भाई चाहते है की आप पहले एक कॉमेडी मूव्ही बनाव और उसने भाई के भाई को हिरो लेलो!

"चलो ले लिया! आगे बता!"

"कातील को अब भाई के लिए जुर्म करने का कंटाला आगया है और उसका दिल बॉलीवूड हिरोईन माया माथूर पे आ गया है! तो मूव्ही में उसको हिरोईन लेना है!"

माया माथूर त्याच्या चित्रपटाला हो म्हणेल की नाही याबद्दल सूरजच्या मनात शंका दाटायला लागली पण...
बाजवा म्हणाला, "अगर माया ना बोले ना, तो भाई को बोलो, भाई को अपने तरिके से काम करवाना आता है! चलो अब फोन रखता हूं!"

सूरज विचार करू लागला.

"भाई म्हणतो आहे तर कॉमेडी मूव्ही जरूर बनवू, लागलं तर माया माथूरला धमकावू! ते काही कठीण नाही! पण व्हेरोनिकाला भेटण्याची आता मला जास्त ओढ लागली आहे कारण तिच्यासोबत फार कमी क्षण मला राहायला मिळाले आहेत आणि आता ऑलिव्हिया भारतात आल्यानंतर व्हेरोनिकाला ब्राझीलला जाऊन भेटणे थोडे चॅलेंजिंग झाले आहे!"

सूरजच्या चेहऱ्यावर व्हेरोनिकाला भेटण्याची अनावर ओढ दिसत होती. त्याला आता ऑलिव्हियाला काहीतरी कारण सांगून ब्राझीलला जावे लागणार होते.

आधी व्हेरोनिका मग भाईची कॉमेडी मूव्ही!

प्रकरण 41

हॉलीवूड आणि बॉलीवूड यांच्या एकत्र प्रयत्नातून जो एक जागतिक कथा असलेला भव्यदिव्य चित्रपट तयार होणार होता आणि ज्याची भारतीय पातळीवरील कलाकार निवडीसाठी एकमेव भव्य ऑडिशन “मॅडम” मध्ये टप्प्याटप्प्याने होणार होती. त्याचा डिरेक्टर आणि प्रोड्युसर होता, "पीटर ब्लूमबर्ग" आणि कास्टिंग डायरेक्टर होता, "केंट पॉल".

चित्रपटाची स्क्रिप्ट जवळपास तयार होती, पण नेमकी कथा काय आहे याची पुसटशी कल्पना ठराविक लोक वगळता कुणालाही नव्हती. ते अतिशय गुप्त ठेवण्यात आले होते. या दोघांनी मिळून आणि वेगवेगळे असे जवळपास आठ हॉलिवूड सुपरहिट आणि भव्य चित्रपट बनवले होते आणि हा त्यांचा आतापर्यंतचा एक अतिशय महत्वाकांक्षी प्रोजेक्ट होता. हे दोघेजण भारतात इतर हिंदी डिरेक्टर सोबत प्रसिद्ध मराठी डायरेक्टर "श्यामकांत निळजे" यांच्याशी सम्पर्क साधून होते कारण त्यांच्या "गावरान गोष्ट" या मराठी चित्रपटाला “हॉस्कर” आणि “गोल्डन डॉल” पुरस्कार मिळाला होता आणि तो चित्रपट या दोघांना खूप भावला होता.

हा चित्रपट 4K ultra HD म्हणजे थ्रीडीच्या पलीकडे जाऊन फोरडी तंत्रज्ञानाने बनणार होता आणि एकूणच या चित्रपटाची हवा आणि आवाका पाहता, जगभरातील मनोरंजन क्षेत्रातील व्यक्तींना या भव्य प्रोजेक्ट मध्ये थोडा का होईना सहभाग हवा होता आणि ज्यांना कोणत्या न कोणत्या कारणाने चित्रपटाचा भाग होता येणार नव्हता ते एकतर निराश तरी झाले नाहीतर त्यांनी चित्रपटाविषयी आणि चित्रपटाशी निगडित व्यक्तींचा द्वेष करणे किंवा त्यांची बदनामी करणे असे खेळ खेळण्याचे मनोमन ठरवले.

लंडनमधील जगप्रसिद्ध नाट्यभूमीतून केंटने तीन कसलेले कलाकार निवडले.

मग चायना, फ्रांस, जर्मनी अशा देशातून विविध कलाकार, गायक, संगीतकार आणि तंत्रज्ञ निवडीनंतर अभिनयसमृद्ध इटालियन चित्रपटसंस्कृतीकडे ते दोघे वळले.

आणखी एक युनिट यूएसए मधील लॉस एंजिल्स आणि नॉर्थ अमेरिकेत कार्यरत होते. इटलीतील भव्य थ्रीडी चित्रपट बघून फ्रांको बोनूकी याला विचारणा करण्यात आली.
फ्रांको जास्त प्रसिद्ध कलाकार नव्हता आणि म्हणून तो या प्रोजेक्टसाठी जास्त वेळ देऊ शकणार होता. फ्रांकोच्या मनात एक भारतीय चेहरा होता- सुप्रिया जिचा एक्सप्रेसिव्ह आणि बोलका चेहरा त्याने सिनेसीत्ता मध्ये पहिला होता आणि तेव्हापासूनच त्याने तिला त्याच्या सिनेमात एक रोल दिला होता आणि सोबतच एक डबिंग आर्टिस्ट म्हणून काम मिळवून दिले होते.

आता सुप्रियाने या भव्य हॉलिवूड चित्रपटात काम करावे असे त्याला मनापासून वाटत होते आणि त्यासाठी त्याने केंट कडे विनंती केली होती. तिच्या आवाजाच्या क्लिप्स पाहून आणि इंग्रजीतील स्पष्ट उच्चार ऐकून केंटने तिला भेटण्याची इच्छा व्यक्त केली. हे व्हीटोरिओला कळवल्यानंतर त्याने सुप्रियाचा फोन ट्राय केला पण तो सायलेंट वर होता कारण ती रेडिओच्या प्रोग्राम मध्ये बिझी होती. मग व्हीटोरिओने सुबोधला फोन लावण्याचे ठरवले..

याच वेळेस इटलीत एक घटना घडली. इटली देशातील कार्यरत असलेल्या एका दहशतवादी संघटनेने आपल्या मागण्यांसाठी रोम शहरातील एका बिझिनेस सेंटर जवळ ठेवलेल्या डस्टबिनमध्ये शक्तिशाली स्फोट केला. इमारतीच्या काही भागाला आग लागली. अनेक जण मारले गेले. स्फोट होतांना त्यातून अनेक छर्रे उडाले आणि अणकुचीदार पत्रे आग लागून हवेत वेगाने उडाले. जवळून एक ट्रेन जात होती आणि नेमका त्याच वेळेस हा स्फोट झाल्याने, त्या स्फोटाच्या वेगाने आणि जळते पत्रे डब्यावर आदळल्याने डब्याला आग लागली.

गरम हवेच्या झोताने डबा हळूहळू रुळावरून घसरू लागला. घाबरून डब्यातील लोक पटापट उड्या मारू लागले. ट्रेनमध्ये मोबाईलवर बातम्या वाचत सुबोध उभा होता. अचानक खिडकीतून एक जळता अणकुचीदार पत्रा त्याचेकडे आला आणि खिडकीची काच फुटली आणि त्याच्या अंगात घुसला. इतर लोकांप्रमाणे काय करायचे ते न कळून इमर्जन्सी एक्सिटच्या खिडकीतून सुबोधनेही उडी मारली आणि सुबोधसाहित ते सर्वजण बाजूच्या रुळांवर पडले. त्या रुळावर उलट्या दिशेने भरघाव वेगाने एक ट्रेन आली त्याखाली हे सगळे चिरडले गेले. सुबोधच्या दूर फेकल्या गेलेल्या मोबाईलवर व्हीटोरिओचा कॉल आला पण तो उचलायला सुबोध जिवंत नव्हता...

एफएम रेडिओच्या ऑफिस मध्ये रेडिओवर सुप्रिया प्रोग्रॅम अंकरिंग करत असतांना तिच्या प्रोग्राम कोओर्डीनेटरने तिला गाणे मध्येच थांबवून ट्रेन दुर्घटनेची अनौन्समेंट करायला सांगितली. अनौन्समेंट करता करता ज्या मृत व्यक्तींची ओळख पटली होती त्यात सुबोधचे नाव ऐकून ती बेशुद्ध झाली. रेल्वे रुळांवर सुबोधचे आयडी कार्ड सापडले असल्याने त्याच्या मृतदेहाची ओळख पटली होती.


प्रकरण 42

सूरजशी भांडण होऊन तो अलग झाल्यानंतर आणि त्यांची हक्काची सिरीयल मधली कलाकार रागिणी जी त्यांची सून होऊ शकणार होती, तिने आत्महत्या केल्यानंतर डी. पी. सिंग काही दिवस अस्वस्थ होते.

रागिणी गेल्यानंतर जणू काही त्यांच्या सिरीयल मधली जान निघून गेली होती. लोक सिंग फॅमिलीकडे संशयाने बघायला लागले होते. दुसऱ्या कलाकारांना घेऊन ती सिरीयल त्यांनी चालवली पण त्या सिरीयलची टीआरपी रेटिंग दिवसेंदिवस घसरत चालली होती.

ज्या चॅनेलवर ती सिरीयल प्रसारित होत होती त्यांनी एक महिन्यांत सिरीयलची टीआरपी वाढवण्याची मुदत दिली अन्यथा ती सिरीयल “ऑफ एयर” करण्याची वॉर्निंग दिली, कारण त्या सिरीयलचा फायनान्सर चिडला होता आणि जाहिराती मिळणे कमी झाले होते.

हॉरर व्यतिरिक्त अन्य विषय निवडून नवीन प्रकारची सिरीयल बनवणे सोपे काम नव्हते, कारण त्यासाठी पुन्हा नव्याने सुरुवात करावी लागणार होती. विविध माध्यमांनी ही बातमी छापली होती आणि टीव्हीवर सुद्धा दाखवली होती:

"प्रसिद्ध हॉरर मालिकेचे सर्वेसर्वा सिंग संकटात. मालिका बंद पडण्याच्या मार्गावर! टीव्ही चनेलने दिली नोटीस!"

एके दिवशी घरी चिंताग्रस्त डी. पी. सिंग सोफ्यावर डोक्याला हात लावून बसले होते तेव्हा त्यांची पत्नी म्हणाली,

"दिनकर, एवढे टेन्शन घेऊ नका. तुमच्याप्रमाणेच मलाही दुःख वाटते आहे. सूरज घर सोडून गेला. रागिणी जग सोडून गेली. आपल्या प्रोडक्शन हाऊसच्या भविष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पण शांत मनाने विचार केल्यास काहीतरी मार्ग निघेलच!"

"माझं काही डोकच चालेनासं झालंय! सूरजचे मला काही खरे दिसत नाही. त्याने आता एक नवी गर्लफ्रेंड ब्राझीलहून आणली आहे म्हणे! तिच्यासोबत आता लिव्हिन मध्ये राहणार आहे! आणि पठ्ठा भरपूर कामावतोय आणि आता चित्रपटनिर्मितीत उतरणार आहे! मला विचारले असते तर मीपण कोप्रोड्यूस केला असता त्याचा पिक्चर! पण एनिवे, तो रागिणीला नीट हँडल करू शकला नाही! आणि आपल्याशी भांडून गेला तो! कोणत्या मार्गाने जातोय काही कळत नाही! त्याचा मार्ग वेगळा आहे! जाऊदे!"

तेवढ्यात त्यांचा फोन वाजला. अनोळखी नंबर होता.

"हॅलो? कोण?"

पलीकडून एका स्त्रीचा सुंदर आवाज आला, "तुम्ही सिरीयल बंद करू नका! तशी पाळी तुमच्यावर येणार नाही."

"क क कोण आपण?", आवाज थोडा ओळखीचा वाटत होता, पण नक्की ओळखू येत नव्हता.

"उद्या तुमच्या ऑफिसमध्ये मी येते, तेथेच तुम्हाला माझी ओळख होईल आणि तुमची चिंता पण नाहीशी करते!"

"हॅलो, हॅलो, कोण? तुमचं नाव तर सांगा आधी?"

"उद्या सकाळी दहा वाजता! शार्प! बाय!" असे म्हणून फोन कट् झाला.

"कुणीतरी लेडीज आहे. म्हणतेय की आपली सिरीयल बंद करायची पाळी येणार नाही! उद्या भेटायला बोलावलंय!"

"जाऊन पाहा! बघू काहीतरी सोल्युशन असेल तिच्याजवळ! चान्स घ्यायला काय हरकत आहे? नाहीतरी आपल्याकडे काय ऑप्शन आहे?"

दहा वाजता सिंग आणि त्यांची पत्नी (जी सिंग यांच्या प्रोडक्शन हाऊसचे काही व्यवहार सांभाळायची) दोघेही ऑफिसमध्ये वाट बघत बसले. दरवाजा टक टक करून अभिनेत्री रिताशा आत आली तसे सिंग पती पत्नी आश्चर्याने उभे राहिले आणि शेक हँड करून तिला बसायला सांगितले. मीडियाने ओळखू नये म्हणून ती गॉगल घालून थोड्या वेगळ्या गेटअप मध्ये आणि भाड्याची कॅब करून आली होती.

गॉगल काढून टेबलावर ठेवत ती म्हणाली,

"सिंग साहेब! ही एंटरटेनमेंट इंडस्ट्री खूप वाईट आहे असे नाही! एकदा का तुम्ही मेहनत करून जम बसवला की ती आपल्याला भरभरून देते! सगळं देते! मान, सम्मान, प्रसिद्धी, पैसा, घर, सोशल लाईफ! पण जर का आपल्याला आपले “वलय” अनेक वर्षे टिकवता आले नाही तर मात्र आपली हालत ‘ना घर का ना घाट का’ अशी होते!", रिताशा पाणी प्याली. तिला हे बोलतांना भर एसी मध्ये घाम फुटलेला दिसत होता.

"हो! मान्य आहे! रिताशाजी! तेच तर घडतेय माझ्यासोबत आता!", हताश होऊन सिंग म्हणाले.

रिताशा हसली आणि म्हणाली, "सिंग साहेब, हे सगळं मी तुमच्याबद्दल नाही तर माझ्याबद्दल बोलते आहे! आणि जास्त खोलात न शिरता मी सांगू इच्छिते की खरं तर मला तुमची गरज आहे! तुम्ही मला वाचवू शकता आणि त्या बदल्यात कदाचित तुमची सिरीयल वाचू शकते असा प्रस्ताव मी घेऊन आलीय! पूर्वी मी छोट्या पडद्याला महत्व देत नव्हते पण आज मला त्याचीच मदत घ्यावी लागतेय!"

"नक्की तुमच्या मनात काय ते सांगा!"

"सांगते! हे बघा! मला तुमच्या हॉरर सिरीयल मध्ये काम करण्याची इच्छा आहे!"

"ओह! पण मला तुमचे मानधन परवडणार नाही रिताशाजी!", असे म्हणून सिंगनी पत्नीकडे बघितले, तिने आश्वासक नजरेने त्यांना हो खुणावले.

"मी मानधनाबद्दल बोलले का काही? याचा अर्थ असा नाही की मी मानधन घेणार नाही! एक बॉलिवूड मधली प्रसिद्ध हॉररपटातील हिरोईन टीव्ही मालिकेत काम करणार म्हटल्याबरोबर तुमच्या मालिकेला नवचैतन्य लाभणार! टीआरपी वाढणार! नंतर तुमचा फायदा झाल्यावर तुम्हाला वाटलं तर मग मला पैसा द्या!"
"नाही नाही! रिताशा जी! तुमचे कारण कोणतेही असो, तुम्ही आमच्या सिरीयल मध्ये काम करणार हीच खूप मोठी गोष्ट झाली, मी तयार आहे! मी तुम्हाला सुरुवातीपासून तेवढेच मानधन देणार जेवढे रागिणीला देत होतो!"

"खरंच! खूप चांगली अभिनेत्री होती ती, सिंग साहेब! माझ्यानंतर तीच बॉलिवूड हॉरर क्वीन व्हायला लायक होती, पण सुभाष भटनी सोनी बनकर नावाच्या सुमार आणि अभिनय न येणाऱ्या नाचऱ्या नटव्या बाईला ती संधी दिली याचे खूप आश्चर्य वाटते! रागिणीबद्दल ऐकून खूप वाईट वाटले! ती तुमच्या मुलाची गर्लफ्रेंड होती नाही का?"

सिंग पती पत्नी थोडे भावूक झाले पण लगेच रिताशा म्हणाली, "आय एम सॉरी! बरं, माझी आणखी एक विनंती आहे! सिरीयल मध्ये काही बदल करण्याचे आणि सिरीयलचे काही कलाकार निवडण्याचे स्वातंत्र्य तुम्ही मला दया!"

"हरकत नाही!"
"मला तातडीने तुमच्याकडून त्याबद्दल मदत हवी आहे!"
"कोणती?"
"मला भूषण ग्रोवर आपल्या मालिकेसाठी माझ्यासोबत हवा आहे! मुख्य पुरुष पात्र!"
"भूषण ग्रोवर? अच्छा! तो BEBQ मधला पार्टीसिपेंट? जो मागील एका पार्टीत सोनी बनकर सोबत दिसून आला होता तो?"
"एक्साक्टली! तोच! कसेही करुन त्याला राजी करा! माझेकडे एक कथा आहे त्यात तोच फक्त फिट बसेल!"
"ठीक आहे! काम होऊन जाईल!" सिंग पती पत्नी राजी होत म्हणाले.
सिंग यांच्या ऑफिसमधून कॅब मधून परत जातांना रिताशा मनातल्या मनात खुश होत म्हणाली, "सोनी बनकर! माझी बॉलिवूडमधली जागा लायकी नसतांना तू पटकवतेस काय? आता जर का तुझा बॉयफ्रेंड नाही गटवला तर नावाची रिताशा नाही मी!"
प्रकरण 43

सकाळी सकाळी ९ वाजता मेन गेट वरील सिक्युरिटी गार्डला पास दाखवल्यावर त्या शांत बंगल्यात पाठीवर सॅक असलेल्या राजेशने प्रवेश केला.

गार्डने घराजवळील बागीच्याकडे बोट दाखवले, "साहब, वहां है! आपको वही बुलाया है! जाईये!"

एवढा मोठा सुपरस्टार, पण अगदी सामान्य माणसासारखा बागेतील झाडांना तन्मयतेने पाणी देत होता. त्यांनी साधे आणि सफेद कपडे परिधान केले होते. गेटवरील हालचाल ऐकल्याने आणि भेटण्याची वेळ ठरलेली असल्याने राजेश त्यांचेकडे आल्यावर त्याची मागे वळून पाहिले.

त्यांच्या धीरगंभीर आवाजात ते म्हणाले, "आईये! आईये! राजेशजी! स्वागत है आपका! आप सामने रखी कुर्सी पर विराजमान होईये.. हम जरा आते है! बसा! बसा! संकोच करू नका!"

त्यांचा मराठी उच्चार अगदी छान होता. बागेच्या मधोमध तीन खुर्च्या आणि एक टेबल ठेवलेला होता. वातावरण अगदी प्रसन्न होते. राजेशने सॅक बाजूला ठेवली.

"धन्यवाद सर!" असे म्हणत राजेश बसला. थोड्या वेळाने अमित श्रीवास्तव आले. सोबत चहा घेऊन एक नोकर आला. त्याने चहाचे समान टेबलावर ठेवले आणि तो मध्ये निघून गेला. लगेचच तेथे त्यांची पत्नी वंदना आली.

जुजबी बोलणे झाल्यावर अमितजी म्हणाले, "राजेश और मेरे लिये गरम थालीपीठ और थंडा दही बनाइएगा श्रीमतीजी!"

राजेशला आश्चर्य वाटले की एवढे मोठे सुपरस्टार पण किती अदबीने बोलत आहेत! आणि त्यांची पत्नी सुद्धा किती नम्र? आणि त्या स्वत: नाश्ता बनवणार आणि तो पण मराठी? यांना कसे कळले की मला थालीपीठ आवडतंय?

राजेशची चेहऱ्यावरील धांदल आणि आश्चर्य पाहून अमितजी हसत म्हणाले, "राजेश जी! हमने भी आपके इंटरव्ह्यू पढ रखे है, आपकी पसंद नापसंद के बारे में हमने थोडीसी जानकारी तो पहले से ही पता कर ली थी!"

त्यांची पत्नी हसत म्हणाली, "राजेश जी आपकी पत्नी नाही आयी? उनको भी साथ में ले आते तो हम दोनो थोडा समय साथ में बीता लेते, गपशप कर लेते! वैसे भी हमारा बेटा अभिजित और बहू सौंदर्या देश से बाहर गये हुये है!"

सुनंदाबद्दल काय सांगावे या विवंचनेत राजेश पडला पण तो लगेच म्हणाला, "ती माहेरी गेली आहे! मैके गायी है!"

ओके ओके म्हणत त्या मध्ये निघून गेल्या.

"आप बहोत अच्छे लेखक है! समीरण के मुव्ही में मेरे छोटेसे रोल के लिये आप स्क्रिप्ट लिखने वाले है यह सुनके मुझे बहोत आनंद हुवा!

"धन्यवाद सर!" सॅक मधून लॅपटॉप काढत फाईल ओपन करून तो म्हणाला, "मैने ये स्क्रिप्ट लिखी है, प्रथम आपण ती वाचा मग आपण त्यावर चर्चा करू शकतो!"

दोघांनी चहा घ्यायला सुरुवात केली. अमिताजीनी काही वेळ ती स्क्रिप्ट वाचली. त्या चित्रपटातील काही पात्रे समाजातील तळागाळातील लोकांसाठी खूप संघर्षानंतर एक संस्था स्थापन करतात हा त्या चित्रपटाचा मूळ गाभा होता. समाजातील काही विघातक प्रवृत्ती त्यांना त्रास देतात, हे टीव्हीवर बघून अमितजी व्यथित होतात आणि ते त्या संस्थेला मदत करायचे ठरवतात. त्यांच्या सपोर्टमुळे आणि स्वत: त्या संस्थेच्या समर्थनार्थ एके ठिकाणी त्यांनी दिलेल्या भाषणामुळे संस्थेला विरोध करणारे काहीजण नरमतात. त्या संस्थेला अमितजी पैशांची सुद्धा मदत करतात एवढा त्यांचा चित्रपटात रोल होता ज्यासाठी राजेशने स्क्रिप्ट लिहिली होती. ती स्क्रिप्ट खूप प्रभावशाली होती. अमितजींना ती आवडली. समीरणला लगेच कॉल करून त्यांनी राजेश एक चांगला लेखक असून त्याची स्क्रिप्ट त्यांना आवडल्याचे सांगूनही टाकले.

मग वंदनाजी नाश्ता घेऊन आल्या. तिघांनी सोबत नाश्ता केला. थोडे जुजबी बोलणे झाले. मग वंदनाजी निघून गेल्या.

राजेश मग म्हणाला, "आप जो अभिजित को लेकर होम प्रोडक्शन में मुव्ही बना रहे है, उसमे आपके बेटे अभिजित के किरदार के लिये स्टोरी और स्क्रिप्ट लिखना शुरू कर दिया है! वह भी आप एक बार देख लिजीए!"

मग अमितजी ते वाचू लागले. अर्थातच तेही त्याना आवडले. त्यांनी थोडे बदलही सुचवले व म्हणाले, "स्क्रिप्ट और स्टोरी कम्प्लीट होने के बाद अभिजित को जरूर दिखाईएगा! वे बहोत उमदा कलाकार है! वे आपके स्टोरी को बहोत पसंद करेंगे! उनको भी आपके साथ काम करने की बहोत बहोत इच्छा है! अभिजीतने आनेवाले समय में कुछ मराठी फिल्मे प्रोड्यूस करने का निश्चय किया है!"

"बिलकुल सर! शुअर! इट्स माय प्लेजर!"

त्या चित्रपटाची संकल्पना थोडक्यात अशी होती:

"एका आंतरराष्ट्रीय डॉनला पकडण्यासाठी भारत सरकार चार जणांची गुप्तचर टोळी बनवून परदेशात पाठवते ज्याच्या प्रमुखाचा (म्हणजे कप्तान वीरेंदर सिंगचा) रोल अभिजित करणार असतो. दरम्यान एका देशात गुप्तहेर कारवाया करत असतांना त्याला नताशा भेटते जिचा रोल प्रसिद्ध अभिनेत्री शलाका करणार असते, पण ती नेमकी कोण असते? भारताची मित्र कि शत्रू? कप्तान वीरेंदर तिचा पर्दाफाश कसा करतो? मग अनेक देशांत प्रवास करून अनेक थ्रिलिंग हाणामारी एक्शन घडून या चित्रपटाचा क्लायमॅक्स भारतात संसद भवनाजवळ होतो."

मग राजेशने एका वेगळ्या विषयाला हात घातला, "अमितजी! एक महात्वाच्या विषयावर बोलायचे आहे! तुम्हाला वेळ आहे ना?"

"बोलिये बोलिये राजेश जी! आज शाम पाच बाजे तक हम आपके लिये मौजूद है! बस हमने आजका डिनर किसी फॅमिली के साथ करने का वादा कीया है! इसलिये शाम को बाहर जायेंगे! यु नो! थोडा सोशलायझेशन जीवन में आवश्यक है!"

"हा अमितजी! आप बिलकुल ठीक कह रहे है!" राजेशने पुष्टी जोडली.

"हा तो बोलिये! क्या कहना चाह राहे है आप? आप अपने विषय पर बोलने के बाद आपके लिये हमारे पास एक सरप्राईज और एक न्यूज है! बहोत बडा सरप्राईज!"

राजेशला मनोमन आश्चर्य वाटले. कोणते सरप्राईज असणार यांचेकडे? पण त्याआधी माझा विषय मी संपवतो.

"अमितजी! आजकल आपने सुना होगा की उमदा लेखको जो कथा लिखकर निर्माता और निर्देशक को सुनाते है, वे बाद में उस कथा के आधार पर अपना नाम डालकर मूवी बनाते है! और लेखको को उसका क्रेडीट देते नाही है!"

"हा राजेश! हमे पता है! हम भी ऐसी घटनाओ से व्यथित है! पर ज्यादातर ऐसी घटनाओ मे सबूत न होने के कारण और कॉपीराईट के नियम पता न होने के कारण लेखक कुछ नाही कर पाते! कुछ लेखक जल्दबाजी में अपनी कथा निर्माताओ को सुना देते है और कोई सबूत नही रहता की उसने कथा सुनाई की नही इस बात का कोई सबूत बचता नही!"

आता राजेश हिम्मत करून जे सांगणार होता ते अमितजी स्वीकारतील की नाही आणि कसे स्वीकारतील याबद्दल तो थोडा साशंक होता!

पण थोडी हिम्मत करूज तो म्हणाला, " अमितजी! तुम्हाला तुमच्या करीयरच्या सुरुवातीचा चित्रपट आठवत असेल! "किस्मत का खेल!"?

"हा! बिलकुल! हमे याद है! त्या चित्रपटामुळे माझ्या करियरला चांगले वळण मिळाले! मग मला अनेक चित्रपट मिळत गेले आणि मी यशस्वी झालो! के के सुमनची कमाल म्हणावी. त्यांनी त्या चित्रपटात माझा दमदार रोल लिहिला होता. त्यानंतर जरी मी त्याच्या पुढच्या चित्रपटात काम केले नाही, तरी माझ्या करियरला यशस्वी वळण दिल्याबद्दल मी त्यांचे नेहमी आभार मानतो!"

"आणि मी जर का म्हणालो कि केके सुमनने ती कथा सपशेल चोरली आहे तर?"
"क्या? क्या कह रहे है राजेश आप?"

"सर! और अगर मै आपसे कहू की वो स्टोरी मैने ही अपने कॉलेज जीवन में लिखी है तो?"

अमितजी अस्वस्थ होत म्हणाले, "क्या बात कह रहे हो राजेश? आप "केके सुमन" पर गंभीर किस्म के आरोप लगा रहे है! माना की आप एक जाने माने लेखक है पर किसी निर्माता को बदनाम करके आपको क्या मिलेगा? आप जो आरोप लगा रहे है, उसके पुष्टी के लिये क्या सबूत है आपके पास?"

अमिताजींचा हा पवित्रा थोडा अनपेक्षित असला तरी त्याने असा अंदाज बांधला होता.

तो तयारीनिशी आला होता.

त्याने लॅपटॉपवर एक व्हीडीओ प्ले केला आणि अमितजी तो पाहू लागले. रत्नाकरला विश्वासात घेऊन राजेशने त्याचेकडून जी माहिती आणि कबूली त्याच्या नकळत रेकॉर्ड केली होती त्याचा तो व्हीडीओ होता. त्यांनंतर राजेशने अमितजींना थोडक्यात त्याच्या जीवनातील पूर्वीच्या घटना सांगितल्या.

तसेच केकेचा मुलगा पिके याच्यासोबत राजेशने केलेल्या ऑपरेशनबद्दल पण सांगितले. अमितजींना ते ऐकून राजेशचे कौतुक वाटले आणि हसू सुद्धा आवरले नाही.

"राजेश जी! मै मानता हुं! आपके साथ बहोत गलत हुवा है! माझी सहानुभूती आहे तुम्हाला! पिके सोबत तुम्ही जे केलत ते एका अर्थाने योग्यच होतं! "

दुपारी जेवण झाल्यानंतर आता तिघेजण निवांत बसले होते.
वंदनाजी, राजेश आणि अमितजी!

अमितजींनी आपल्या पत्नीला सुद्धा राजेशबद्दल आणि एकूण सगळ्या लेखन चोरीच्या प्रकाराबद्दल सांगितले.

मग अमितजींनी राजेशला यासंदर्भात सर्वोतोपरी शक्य असेल तशी मदत करण्याचे आश्वासन दिले! मग राजेशने निरोप घेण्याआधी अमितजी सकाळी त्याला जे सिक्रेट किंवा सरप्राईज सांगणार होते ते त्यांनी राजेशला सांगितले. ते सरप्राईज म्हणजे अतिशय दुर्मिळ अशी संधी होती जी राजेशकडे लवकरच चालून येणार होती आणि त्याद्वारे राजेशला न भूतो न भविष्यती असा फायदा होणार होता.

ती गोष्ट अशी होती की – हॉलीवूडच्या त्या बहुचर्चित आगामी भव्य चित्रपटासाठी भारतात घडणाऱ्या घटनांमध्ये एका अध्यात्मिक महागुरुची भूमिका करण्यासाठी अमितजींना केंटकडून डायरेक्ट ऑफर आली होती आणि त्यांनी ती स्वीकारली होती.

तसेच अभिजितसाठी राजेशने लिहिलेल्या स्क्रिप्टमुळे प्रभावित होऊन त्या हॉलीवूडच्या चित्रपटाच्या भारतात घडणाऱ्या भागासाठी लेखन करण्याची संधी राजेशला मिळावी अशी विनंती ते केंटला करणार होते!!!

समाधानी मनाने राजेश समीरणकडे जायला निघाला. आजचा दिवस त्याचेसाठी आणि त्याच्या एकूणच करियरसाठी खूपच मोलाचा आणि महत्वाचा ठरला होता पण सुनंदाचा विचार मात्र त्याला अधूनमधून अस्वस्थ करत होता.



प्रकरण 44

फ्रांको आणि व्हिटोरीओ दोघांनी एकमेकांना संपर्क साधल्यावर त्यांना कळले की अपघातात सुबोधचा मृत्यू झाला आहे. व्हिटोरीओने सुप्रियाच्या आई वडिलांना आणि सुबोधच्या आईला कॉल करून ही वाईट बातमी सांगितली. प्रसंग खूपच दु:खद होता. सुबोधची आई शुद्ध हरपून बसली. सुप्रियाच्या घरी सुद्धा वाईट हाल होते. दोघांचे नातेवाईक इटलीत यायला निघाले. ते येईपर्यंत सुप्रियाला धीर देण्याचे काम व्हिटोरीओ आणि त्याची पत्नी क्रिस्टीना यांनी केले. मृतदेहाचे तुकडे एकत्र करून तो घरी आणला गेला होता. दहशतवाद्यांना लवकरच पकडून शिक्षा करण्याचा निर्धार स्थानिक पोलिसांनी केला. मृतदेहाचे इटलीतच विद्युत दाहिनीत अंतिम संस्कार करण्याचे ठरवले गेले. सुप्रिया सतत स्फुंदून रडत होती. तिचे हाल बघवले जात नव्हते.

शेवटी तिचे मन वळवण्यासाठी व्हिटोरीओ इंग्रजीतून तिला म्हणाला, “हे बघ, ऐक! एक बातमी सांगतो तुला. तुला एका भव्य हॉलीवूडपटात डबिंग आर्टिस्ट म्हणून काम मिळण्याची शक्यता आहे, गरज आहे फक्त तू एक ऑडीशन देण्याची!"

तिच्या चेहऱ्यावर खिन्नता आणि विषाद दर्शवणारी शून्य नजर होती. तिच्याकडून काहीएक प्रतिक्रिया आली नाही. तिने फक्त थोडेसे वळून व्हिटोरीओकडे पाहिले.

व्हिटोरीओने क्रिस्टिनाकडे पाहिले. ती म्हणाली,

"हे बघ सुप्रिया, जीवनात असे प्रसंग सांगून येत नाहीत. पण आपण अश्या प्रसंगाना सामोरे जायला शिकले पाहिजे!"

आता सुप्रियाच्या चेहऱ्यावर भयंकर राग दिसून आला.

"मी त्या दहशतवाद्यांना सोडणार नाही. मला त्या सगळ्यांना गोळ्या घालायच्या आहेत. तरच सुबोधला ती श्रद्धांजली ठरेल!"

क्रिस्टिना म्हणाली, "तुझा राग योग्य आहे, पण दहशतवाद्यांना शिक्षा करण्याचे काम तुझे नाही पोलिसांचे आहे!"

व्हिटोरीओ पुढे म्हणाला, "सुबोधची सुध्दा इच्छा तुला मनोरंजन क्षेत्रात खूप यश मिळावं हीच होती. तेव्हा तू या दुःखातून सावरून लवकरच या क्षेत्रात अधिकाधिक यश मिळवले तर ती खरी श्रद्धांजली ठरेल सुबोधला!"

क्रिस्टिनाने विनंती केली, "एकच कर की यापुढे सगळे निर्णय विचारपूर्वक घे. लगेच इटली सोडून जाण्याचा निर्णय घेऊ नकोस. इथे एकटे वाटून घेऊ नकोस. आम्ही दोघे आहोत. आम्हाला तुझे फॅमिली मेंबर समज!"

दुसऱ्या दिवशी सगळे सोपस्कार आटोपल्या नंतर दहा दिवसांसाठी सुप्रिया भारतात गेली.

***

दरम्यान राजेशच्या आईने राजेशला कॉल केला.

"राजेश, फोन कट करू नको. मी काय सांगते ते ऐक. तूला बाळ होणार आहे. आणि सूनंदाच्या त्या काकूला मी लवकरच वठणीवर आणणार आहे. तिनेच तुझ्या बायकोच्या मनात विष पसरविण्याचे काम केले आहे. तिला सुनंदाची संपत्ती आपल्याला मिळाल्याचं सहन झालं नव्हतं म्हणून ती असे तुमच्या संसारात विष कालवण्याचे काम करत होती!"

पुढचं जास्त न ऐकता आपल्याला बाळ होणार या कल्पनेने राजेश सुखावला होता.

"आई, फार छान बातमी सांगितली, कधी आहे तारीख?"

"काही महिन्यातच!!"

"मग निघतो यायला पण सुनंदा, तिच्या मनातले गैरसमज?"
"मी जेव्हा तिच्याशी बोलले होते राजेश तेव्हा तिला पण तिची चूक वाटू लागली पण काकूच्या धाकाने ती तुला संपर्क करण्यास धजत नव्हती. शेवटी लहानपणाासूनच त्या नालायक काकुचा पगडा तिच्या मनावर होता..तू ये. ती नाही कसला गैरसमज करणार! आणि गावाला निघून येण्याआधी जे काही घडले ते तिने मला सांगितले आता त्याचं मात्र काय ते तू बघ बाबा, आधी ये तर घरी!"

राजेश स्वागतपुरीला जायला निघाला. त्याला वारंवार पडणाऱ्या त्याच त्याच स्वप्नांत लिफ्टमध्ये तो नाजूक हात कुणाचा होता ते आता त्याला कळून चुकले होते, तो होता बाळाचा!!

***

माया माथूर जॉगिंगला गेली. सकाळच्या सहा वाजेच्या फ्रेश हवेत जॉगिंग केले तर बॉडी अर्थातच फिट राहणार होती. गेले तीन महीने तिने आराम करायचे ठरवले होते. अजून तिच्याकडे एकाही नवीन चित्रपटाची ऑफर नव्हती.

"माया म‌‍ॅडम!" कुणीतरी आवाज दिला होता.

"एक्स क्यूज मी, तुमच्या मागे बघा!"

"आय डोन्ट नो यू, कोण तुम्ही!"

"मी सूरज सिंग. म्हटलं तुमच्याशी बोलायला ही सकाळची वेळच योग्य होईल, एरवी जरी सध्या चित्रपट आणि शूटिंग नसली तरी तुम्ही डान्स क्लासेस घेतात त्यामुळे बिझी असता."

"पण तुम्ही आहात कोण मिस्टर, सॉरी मी तुम्हाला ओळखले नाही. जन्टलमन तर दिसता पण तुम्हाला साधा शिष्टाचार माहीत नाही की अनोळखी महिलेशी बोलता तर बोलता, आणि विचारून सुद्धा ओळख सांगत नाहीत!"

थोडासा अंधार होता पण हळूहळू उन्हाची तिरीप चेहऱ्यावर पडल्यावर अचानक मायाला काहीतरी आठवले, "एक मिनिट, एक मिनिट, मी ओळखलं तुम्हाला! टीव्ही अॅक्टर रागिणी राठोडचे पती! आय फील सॉरी फॉर युवर गर्लफ्रेंड! आय थिंक यू आर एन ओनर ऑफ ए फुड चेन! डी. पी. सिंगचे पुत्र ना तुम्ही?"

सूरजने चेहरा गंभीर केला.

"चला बाजूला बाकड्यावर बसूया!" सूरज म्हणाला.

बाकड्यावर:

"माझ्या जीवनातल्या त्या घटना मला विसरायच्या आहेत. पत्रकाराने टीव्हीवर रागिणीच्या पूर्वायुष्यातल्या घटना उघड केल्याने तिने फार मनाला लावून घेतले होते, मी तिला सपोर्ट केला पण तिने .... !" असे म्हणून तो थोडा गंभीर झाला आणि पुढे बोलू लागला, "काही कारणास्तव मी आता डी. पी. सिंग सोबत राहत नाही. पण सोडा त्या सगळ्या गोष्टी आणि मी तुमच्याकडे कशाकरता आलोय ते सांगतो! मी चित्रपट निर्मिती सुरू केलीय हे तुम्हाला माहीत असेलच, तेव्हा माझ्या चित्रपटात तुम्ही काम करावं अशी माझी इच्छा आहे, पण चित्रपटात लीड अॅक्टर मात्र नवीन आहे, आणि आपल्या देशातला नाही पण इंडियन ओरिजिन आहे."

थोडा विचार करून माया म्हणाली, "मला वाटते थोडी घाई होतेय. मला इतर सगळे डिटेल पण हवेत, लीड अॅक्टर कोण आहे काय आहे हे सगळं बघावं लागेल नाही का! तुम्ही पुढच्या आठवड्यात माझ्या ऑफिस मध्ये सगळे डिटेल्स घेऊन या, मग बघुया!"

सूरज बागेतून परत गाडीत बसत असतांना थोडा चिंताग्रस्त दिसत होता. हिने ऐकलं नाही तर? मग तिला राजी करायला दुसरा पर्याय वापरायची वेळ तर नाही ना येणार? बघूया!" असे म्हणून तो गाडी वेगाने पळवू लागला.

नंतर एके दिवशी सूरजने मायाच्या ऑफिसमध्ये तिला त्याच्या विनोदी पण गुन्हेगारी पार्श्वभूमीवर आधारित चित्रपटाची कथा ऐकवली जी स्वत: त्याच्या “भाईने” सांगितली होती. मायाला काही ती कल्पना पसंत पडली नाही! तसेच अशा अप्रकार्च्या नवख्या हिरोबद्दल ती काम करायला तयार नव्हती. तिने नकार कळवला.
सूरज अस्वस्थ झाला. तिकडे दुबईहून भाईचा अभिनयशून्य “चचेरा भाई” माया माथुर सोबतच चित्रपटात येण्यासाठी अडून बसला होता आणि भाई त्याचेसाठी काहीही करायला तयार होता कारण चचेरा भाईने त्या भाईच्या ड्रग्ज बिझिनेस मध्ये भाईला खूप मदत केली होती. आणि इकडे सूरजने जर भाईचे ऐकले नाही तर त्याच्या धंद्याला आणि पर्यायाने एकूणच त्याला मिळणाऱ्या अमाप संपत्तीला आणि त्याद्वारे मिळणाऱ्या विविध सुंदर स्त्रियांना मुकावे लागणार होते. माय माथूर...? काय करू तुला राजी करण्यासाठी?

***

सोनी बनकर आणि भूषण ग्रोवर यांचा साखरपुडा पार पडला. अनेक वर्तमानपत्रे आणि बॉलीवूड न्यूज चॅनल्सनी त्याला ठळक प्रसिद्धी दिली. राजेशने विणा वाटवे आणि सारंग सोमय्याला त्या इव्हेंटचे कव्हरेज करायला सांगितले होते.

भूषण ग्रोवरला बॉलीवूड अभिनेत्री रिताशासोबत टीव्ही सिरीयलची ऑफर आल्याने तो खूश होताच पण सोनी सुध्दा दुप्पट खुश होती. एकंदरीत दोघांचे टिव्ही इंडस्ट्रीत बरे चालले होते आणि दोघेही एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडलेले होते म्हणून त्यांनी साखरपुड्याचा निर्णय घेतला होता आणि लवकरच ते लग्न बंधनात अडकणार होते. रिताशाही त्या साखरपुड्याला आवर्जून हजर होती. "डर की दहशत" ही सिरियल सुरू झाली होती आणि त्यात रिताशा भूषण यांची प्रमुख भूमिका होती. सिरियल पुन्हा चालायला लागली. लोकांमध्ये लोकप्रिय व्हायला लागली आणि सोनीची पण सुभाष भटच्या चित्रपटाची शूटिंग जवळपास संपली होती.

रिताशा आता त्या दोघांचे लग्न होण्याची वाट बघत होती. साखरपुड्याला रिताशाने त्या दोघांना भेट दिलेला एक आकर्षक आणि महाग ताजमहाल रात्री त्यांनी पॅकेज मधून उघडला तर टेबलवर ठेवताच त्याचे आपोआप दोन तुकडे झाले. दोघानाही आश्चर्य वाटले आणि थोडी चिंताही वाटली कारण हा एक प्रकारचा अपशकुन होता का? पण कदाचित अनेक हातांनी हाताळला गेल्याने तो तुटला असावा असे समजून त्यांनी तो फेकून देण्याचे ठरवले. मुद्दाम टीचलेला ताजमहाल रिताशने पॅक करून दिला होता आणि तो उघडताच दोघांचा चेहरा कसा झाला असेल हे आठवून ती गालातल्या गालात घरी रात्री हसत होती.

लवकरच त्या दोघांचे लग्न झाले. सिरियल अजूनही चॅनलच्या टॉप लिस्टवर होती. हनीमूनसाठी स्विसला जातांनाचे, गेल्यानंतरचे, सकाळी झोपेतून उठल्यावरचे, खातांना, पितांना, नाचताना, गातांना, बर्फ खेळताना, ट्रेनमध्ये एकमेकांचा किस घेतांना असे सगळे फोटो म्हणजे सेल्फी त्या दोघांनी फोटोग्राम, फ्रेंडबुक, चॅटर या सोशल साईट्स वर शेअर केले. फक्त रात्रीचे प्रायव्हेट क्षण सोडून!! रिताशा हे सगळे फॉलो करत होती. तिला त्यांची आयती खबर मिळत होती. सोनी ऐवजी फोटोत मी असेन, हा माझा पक्का निर्धार आहे असे म्हणून तिने रागाने एक फ्लावर पॉट जमीनीवर आदळला.

दोघेही हनिमूनहून परत आल्यावर काही दिवसानंतर:

रितशाने डी. पी. सिंग यांना एक सल्ला दिला की आता सिरियलची शूटिंग आपण युरोपात केल्यास प्रेक्षकवर्ग अजून वाढेल. युरोप मध्ये रहात असलेले भारतीय आणि त्यांचे स्थानिक मित्र यांना तिथे आलेले भूतांचे अनुभव आपण युरोप टूरच्या सिझन मध्ये दाखवू. तेथील स्थानिक कलाकारांना सुध्दा सामील करून घेऊ. त्यांना कल्पना पसंत पडली. मग लवकरच युरोपात जाऊन लेखकांची टीम काम करायला लागली. हा हेतू होताच पण सिरियल भारताबाहेर घेऊन जाण्याचा मूळ हेतू रिताशाचा हा होता की त्याच दरम्यान सोनी बनकरला एका डान्स रियालिटी शो मध्ये तीन पैकी एक जज्ज म्हणून संधी मिळाली, म्हणजे ती युरोपात भूषण सोबत येऊ शकणार नव्हती!



प्रकरण 45

टीव्हीवर राजेशचा एक प्रोग्राम टेलिकास्ट होत होता. त्याची शूटिंग आधीच झालेली होती आणि आता तो फक्त टेलिकास्ट होत होता आणि पब्लिक डिमांड मुळे हा शो आज बहुतेक सगळ्या प्रमुख प्रायव्हेट आणि दूरदर्शन चॅनल्स वर प्रसारित करण्यात येत होता. अमितजी सुद्धा आवडीने हा कार्यक्रम बघत होते.

"आजचा आपला विषय आहे भारतीय चित्रपटसृष्टीतील आणि टिव्ही क्षेत्रापुढील विविध आव्हाने. आज कधी नव्हे एवढी चित्रपटातील अभिव्यक्ती स्वातंत्र्याची चर्चा होते आहे पण त्याचबरोबर विविध मार्गांनी चित्रपटांची सेन्सॉरशिप पण वाढली आहे!"

स्टेजवर साऊथ, मराठी, हिंदी तसेच इतर अनेक चित्रपट सृष्टीतील आघाडीचे तसेच नवखे प्रोड्युसर्स आणि डायरेक्टर्स आणि काही सुपरस्टार हिरो हिरोईन बसलेले होते, आणि नेहमीप्रमाणेच ऑडीयंस मध्ये सामान्य सिनेप्रेमी माणसे, तसेच बॉलीवूड मधील पडद्यामागे काम करणारे कलाकार तसेच त्यांचे नातेवाईक व इतर मंडळी बसले होते.

एक निर्माता म्हणाला, "हे एक आव्हान आहेच. सिगारेट पिताना दाखवलं तर सिगारेट हानिकारक अशी सूचना दाखवा, दारुसाठी तेच! प्राणी असल्यास त्याच्या जीविताला हानी पोहोचवली नाही हे दाखवा, शिव्या चालत नाहीत, पण खून मारामारी, हे सगळं चालतं. प्राण्यांना हानी पोचवली तर चालत नाही पण येथे स्टंटमेन स्टंट सिन करताना बरेचदा मृत्यूमुखी पडतात त्याचे काही सोयरसुतक नाही!"

दुसरा एक निर्माता म्हणतो, "जितकी बंधनं जास्त होत गेली तेवढे जास्त स्वातंत्र्य चित्रपटात घेण्यात येऊ लागले. कुठल्यातरी आडमार्गाने चित्रपट सेन्सॉर कडून मंजूर करून घेणं किंवा ए चित्रपटाला यू ए सर्टिफिकेट लाच देऊन मिळवणं हे सुरु झालं. तसं पाहिलं तर ए आणि यू ए चित्रपटां मध्ये आता सीमारेषा नाहीशी झाली आहे किंवा पुसट झाली आहे. टीव्हीवर सुध्दा आता सेन्सॉर सर्टिफिकट बंधनकारक करण्यात येणार असल्याचे ऐकिवात आहे. अशाने आधीच हॉलिवूडशी स्पर्धा करण्यासाठी म्हणून खर्चिक झालेली भारतीय चित्रपटनिर्मिती अशा सेन्सॉरशिप मुळे धोक्यात आली आहे. सेन्सॉर बोर्ड कमी आहे की काय म्हणून आता विविध संघटना सुध्दा जाळपोळ करतात, धमकी देतात. बायोपिक काढला तर त्यांचे वंशज धमक्या देतात, पण एका अर्थाने बायोपिक काढताना निर्मात्यांनी भान ठेवलेच पाहिजे कारण तथाकथित व्यक्ती ज्याच्यावर बयोपिक निघतोय त्यांच्या बद्दल खरेच दाखवले गेले पाहिजे आणि शक्यतो वादग्रस्त भाग टाळला पाहिजे."

राजेश म्हणाला, "आज अशी परिस्थिती निर्माण झाली आहे की सेन्सॉर बोर्ड अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करतंय की अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली काहीजण सेन्सॉर बोर्डाची मुस्कटदाबी करत आहेत तेच कळेनासं झालंय. मुळात हे दोघे एकाच बाजूला आहेत की विरुद्ध बाजूला तेच समजत नाही!"

एक मराठी निर्माता म्हणाला, "तुझे म्हणजे अंशत: बरोबर आहे आणि त्यात भरीस भर म्हणून पायरसी वाढली आहे. आजकाल लोक चित्रपटाची पायरेटेड कॉपी मोबाईलवर, लॅपटॉपवर बघणे पसंत करतात, थिएटरमध्ये कुणी येत नाही!"

एक कसलेला अभिनय सम्राट तरुण अभिनेता म्हणाला, "पण मल्टिप्लेक्स थिएटरचे दर किती वाढले आहेत हो! त्यामुळे सामान्य माणूस जातच नाही चित्रपट बघायला, आणि आजकाल मनोरंजनासाठी घरी स्वस्तात कितीतरी पर्याय उपलब्ध आहेत, पूर्वी असे नव्हते म्हणून थियटर मध्ये पिक्चर गोल्डन जुबिली साजरे करायचे. आजकालच्या पिढीला हे माहितीसुद्धा नाही!"

दुसरी एक अभिनेत्री म्हणाली, "पायरसी रोखू शकत नाही म्हणून मल्टिप्लेक्सला पहिल्या एक दोन आठवड्यात कमावून घ्यायला लागते म्हणून तिकिटांचे दर वाढवले आहेत असे म्हणायचे की मल्टिप्लेक्सचे दर जास्त असल्याने पायरसी वाढली आहे असे म्हणायचे? अंडे आधी की कोंबडे असा हा सवाल आहे!"

आणखी एक अभिनेता म्हणाला, "काहीही असले तरीही पायरसीचे समर्थन करता येणार नाही. उलट आजकाल दोन तीन आठवडे चित्रपट चालल्यानंतर दोन चार महिन्यांच्या आत टीव्हीवर येतोच ना! तरीही पायरसी चालूच आहे. ती रोखण्यासाठी कठोर शिक्षा व्हायला हवी पण मुळात सर्वप्रथम कॉपी कधी आणि कुठे होते ते आपण शोधू शकत नाही मग शिक्षा नेमकी कुणाला करणार?"

राजेश म्हणाला, "हो, तो मोठा गहन प्रश्न आहे. बनावट सीडी विक्रेत्यांना अटक करून फारसे काही होणार नाही!"
राजेश पुढे सांगू लागला, "आजकाल चित्रपटसृष्टीच नाही तर लेखनक्षेत्रात सुध्दा पायरसी वाढली आहे, बनावट पुस्तके सर्रास रस्त्यांवर विकत मिळतात आणि त्यात भरीस भर म्हणून काही डायरेक्टर लोकं लेखकांच्या कथेची सर्रास चोरी करतात, पण असो तो विषय वेगळा आहे आणि या आधी चर्चिला गेला आहे!"

एक निर्माता म्हणाला, "मग कधीतरी बॉलीवूड मंदीतून सावरायला सेक्सचा आधार घेते असे आढळून येते. सेक्सवर आधारित कथा हा चित्रपट चालण्याचा हुकुमी एक्का मनाला जातो! यात इन्व्हेस्टमेंट कमी असते आणि रिटर्न्स बऱ्यापैकी मिळतात, निदान नुकसान होण्याची शक्यता कमी असते नाही का?"

प्रेक्षकांतला एकजण म्हणाला, "पण एकूणच समाजमनावर याचा परिणाम काय होतो याचा कुणीही निर्माता, लेखक, निर्देशक विचार करतांना दिसत नाही!

राजेश, "ते ही काही अंशी खरे आहे, पण प्रत्येक गोष्टीला दोन बाजू असतात हे ही लक्षात घ्या. तर आपण एकूणच भारतीय चित्रपट सृष्टीसमोरील आव्हाने याबद्दल चर्चा करत होतो. चुकीची सेन्सॉरशिप किंवा वैयक्तिक आकसापोटी किंवा राजकीय हेतूने प्रेरित अशी लादली गेलेली सेन्सॉरशिप, पायरसी आणि अजून कोणती आव्हाने आहेत, सांगा बरे?"

दुसरा एक प्रेक्षक म्हणाला, “आजकाल टीव्हीवर एक ट्रेंड दिसतो. एखादी सिरीयल वर्षानुवर्षे चालते आणि मग अचानक काहीतरी कारण देऊन निर्माते ती अचानक बंद करतात. ही तर प्रेक्षकांची शुद्ध फसवणूक आहे. याची दाद कुठे मागता येईल का? वर्षानुवर्षे सिरीयल रोज रोज बघून अचानक मधूनच ती बंद केल्यास प्रेक्षकांनी आतापर्यंत सिरीयल बघायला दिलेल्या वेळ हा वाया गेल्यासारखा नाही का?”
राजेश म्हणाला, “हा मुद्दा बरोबर आहे. कुणी सिरीयल विरोधात तक्रार केली असेल आणि कोर्टाने तसा सिरीयल बंद करायचा आदेश दिला असेल तर तो भाग वेगळा पण निर्मात्यांच्या लहरीखातर सिरीयल बंद करणे हा मात्र अन्याय आहे. याबाबत कन्झुमर कोर्टात दाद मागता यायलाच हवी!”

प्रेक्षकांतला आणखी एकजण म्हणाला: "राजेश मला असे वाटते की कास्टींग काऊच हा आपल्या भारतीय चित्रपट सृष्टीतील एक मोठ्ठा कलंक मोठ्ठा डाग आहे, आजही ते चालते हे सत्य नाकारून चालणार नाही! आणि आपल्या मॅडम अॅकॅडमी आणि त्यासारख्या संस्थांमध्ये पण आजकाल भ्रष्टाचार वाढलाय असे ऐकिवात आहे, अभिनय शिकविणाऱ्या अशा प्रकारच्या अनेक संस्थांमध्ये राजकीय हस्तक्षेप वाढतोय असे नाही का वाटत?"

राजेश म्हणाला, "प्रत्येक क्षेत्रात बऱ्यावाईट गोष्टी असतातच, त्यामुळे आपण मिळून वाईट गोष्टी कमी करण्याचा प्रयत्न करू म्हणजे लोकांचे या क्षेत्राबद्दल गैरसमज दूर होतील. मी याबद्दल सुपरस्टार अमित श्रीवास्तव यांची मदत घेणार आहे. त्यांनीही या चर्चेत सहभागी होण्याबद्दल मी विनंती केली होती पण काही कारणास्तव ते येऊ शकले नाहीत. कास्टींग काऊच बद्दल माझेकडे बॉलीवूड मधील काही तथाकथित प्रसिद्ध व्यक्तींविरोधात पुरावे सुध्दा आहेत, स्टिंग ऑपरेशनमध्ये ते अडकले आणि पुरावे हाती आले, योग्य वेळ आली की ते जगासमोर मी आणणार!"

हा कार्यक्रम टीव्हीवर बघत असताना राजेश त्याच्या छोट्याशा बाळाशी खेळत होता आणि पिकेचा संताप होत होता. त्याने राजेशला कॉल केला, "राजेश, विणा वाटवेने मला सांगितल्या प्रमाणे तुम्ही लोकं माझ्या वडिलांचे काळे कारनामे पब्लिक समोर आणणार नव्हता फक्त माझ्यासाठी, माझ्या विनंतीवरून! माझ्या कथा चोरून तुम्ही आमचा बदला घेतला, फिट्टम फाट झाले आता मला वाटते तुम्ही थांबावे, वडिलांच्या भविष्याचा प्रश्न आहे, आमच्या कुटुंबाच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे!"
राजेशने त्याला खोटा दिलासा दिला, "काळजी करू नको पिके, ते मी प्रोग्राम मध्ये सहज म्हणालो पण मी तसे करणार नाही! माझ्यावर विश्वास ठेव!"

राजेश मनात म्हणाला, "बेटा पिके, कथाचोरीचा गुन्हा तर तुझ्या बापाने केला आहेच पण, चित्रपटांत काम देण्याच्या आमिषाने फसवणूक आणि लैंगिक अत्याचार केलेल्या मुलींबद्दल काय? केकेला एक्स्पोज केल्याशिवाय तक्रार दाखल करायला त्या पुढे येणार नाहीत. जरी त्या गोष्टीला अनेक वर्षे लोटली तरी न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. ज्यांनी स्वखुशीने केकेला शोषण करू दिले त्यांच्या बद्दल काय बोलणार? पण ज्यांच्या मनाविरुध्द शोषण केले होते त्यांचे काय?"


प्रकरण 46

माया माथुरचे पती सुशांत माथुर हे एक नावाजलेले डॉक्टर होते आणि त्यांनी स्वत: उभारलेल्या एका मोठ्या हॉस्पिटल मध्ये ते नेहमी बिझी रहात. त्यांनी आजवर अनेक गरीब रुग्णांना मोफत किंवा अगदी कमी खर्चात ऑपरेशन आणि औषधसेवा दिली होती. डॉक्टरी पेशाचा कधीही त्यांनी दुरुपयोग केला नव्हता आणि माया माथुर एक प्रसिद्ध अभिनेत्री असल्याने दोघांच्या आयुष्यात खूप पैसा, प्रसिद्धी आणि नावलौकिक मिळाला होता. सौंदर्य, अभिनय आणि नृत्य या तीन गोष्टींच्या जोरावर तिने चित्रपटसृष्टीची अनेक वर्षे गाजवली होती. सध्या तिच्याकडे चित्रपट नव्हते पण ती डान्स क्लासेस घेत होती.

त्या दिवशी सहावीत शिकत असलेली माया माथूरची जुळी मुले घरी आली. दप्तर बेडवर फेकून ती दोघे ओरडत म्हणाली, “मम्मा, उद्या सुट्टी आहे. टुडे वी फिनिश्ड अवर क्राफ्ट प्रोजेक्ट. वी विल नॉट डू होमवर्क टुडे. वी आर गोइंग तो प्ले इन द गर्दन डाऊन!” असे म्हणून दोघांनी फ्रीजमधून ब्रेड आणि जाम काढले आणि मम्माला म्हणाले, “आम्हाला ब्रेड जाम आणि दूध दे मम्मा, मग आम्ही खेळायला जातो, पटकन दे! भूक लागली आहे!”, असे म्हणून दोघेही टीव्ही लाऊन सोफ्यावर बसले.

दोघांची खाण्यापिण्याची आवड जवळपास सारखीच होती. एकाचे नाव अरुण आणि दुसरा वरूण.

“अरे बाबांनो, खायची घाई, खातांना टीव्ही पण पाहिजे, लगेच खेळायला जायची सुद्धा घाई? अरे दप्तरातून सकाळचा टिफिन आणि पाण्याची बाटली तर काढाल की नाही, की ते पण मीच काढू?” असे म्हणून ती प्रथम त्यांच्या दप्तराकडे गेली तेवढ्यात दोघे पुन्हा ओरडले, “आई प्रथम दूध जाम ब्रेड मग आमचा टिफिन नंतर काढ दप्तरातून!”

शेवटी तिने दप्तराचा नाद सोडला आणि ब्रेड जाम आणि दूध बोर्नव्हीटा करायला घेतले.

“चला, जा बेसिन मध्ये हात धुवून घ्या बरं आधी! चला उठा!” असे म्हणून तिने जबरदस्तीने त्यांना सोफ्यावरून उठवले आणि हात धुवायला पिटाळले.
अर्धा तास डोरेमोन आणि शिनचान बघता बघता दूध ब्रेड जाम खाऊन झाल्यावर मग ते दोघे खाली पळाले. लिफ्टमध्ये लिफ्ट अटेंडंट असल्याने तसे ते दोघे सातव्या मजल्यावरून खाली बागीच्याकडे जाऊ शकत होते. थोड्याच वेळात खिडकीसमोरच्या बगिच्या ते दोघे त्यांच्या मित्रांसोबत लपाछपी पळापळी खेळायला सुद्धा लागले होते. त्या दोघांना मुक्तपणे खेळताना पाहून मायाला इतर कशापेक्षाही जास्त आनंद झाला. त्यांचे टिफिन दप्तरातून काढतांना अचानक एक चिठ्ठी खाली पडली. ती मायाने उचलली! दप्तरात ही कोणती चिठ्ठी असे म्हणून ती चिठ्ठी उलगडतांना विचार करू लागली, “शाळेने एखादी सूचना पालकांसाठी लिहून दिली असावी!”

चिठ्ठी प्रिंटेड होती आणि लाल अक्षरात होती, ज्यामुळे माया जरा घाबरलीच.

“घाबरलात ना? मुलांच्या दप्तरात ही चिठ्ठी अचानक कशी आली ते बघून? तुमची दोन्ही मुले ज्या नावाजलेल्या शाळेत जातात त्यात इतकी सुपर सिक्योरिटी असूनही ही चिठ्ठी आम्ही मुलांच्या दप्तरात टाकू शकलो तेही त्यांच्या नकळत तर आम्ही त्यांना किडनॅप पण सफाईदारपणे करू शकतो! अ अ अ! पूर्ण वाचा आणि पोलिसांना किंवा तुमच्या डॉक्टर पतीला यातले काही एक सांगण्याचा विचार चुकुनसुद्धा मनात आणू नका! आता दुसऱ्या दप्तरातली चिठ्ठी वाचा!”

फुल एसीमध्ये चेहऱ्यावर घाम जमा होऊन माया थरथरायला लागली आणि तिने खिडकीतून खाली पहिले. मुले दृष्टीस पडली नाहीत. ती खूपच घाबरली आणि तिने आणखीन डोकावून पाहिले तेव्हा तिला अरुण घसरगुंडीहून सरकतांना आणि वरूण उंचच उंच झोके घेतांना दिसला. मेन गेट जवळ सिक्योरिटी गार्डस होते, मग तिला हायसे वाटले.

नोबिता घरातून गायब झाल्याने चिंता करत असलेली त्याची आई डोरेमोनला विनंती करते की कोणतेतरी गॅजेट काढ ज्याद्वारे तो नोबिताला शोधू शकेल, असे दृश्य टीव्हीवर सुरु असलेले पाहून तिने पटकन टीव्ही बंद केला आणि दुसरे दप्तर घेऊन त्यात तिने चिठ्ठी शोधली. त्यात लिहिले होते:

“सूरज तुमच्याकडे विनंती करण्याकरिता आला होता, तुम्ही त्याला नाही बोलला. तो तर फक्त आमचा मोहरा आहे. त्याला तुम्ही नाकारलेत, पण आमच्यापासून तुम्ही वाचू शकणार नाहीत. तुमच्या मुलांची सुरक्षितता हवी असेल तर सूरजच्या चित्रपटाला फटक्यात हो म्हणा! आमच्या भाईचा भाई त्यात काम करणार आणि माया माथुर त्याला नाही म्हणणार? भाईला सहन होईल का ते? सांगा बरं? तुमचे खूप भले आहे मॅडम असे करण्यात! काय मग फोन करून सांगता ना आताच सूरजला? दोन्ही चिठ्ठ्या मस्तपैकी जाळून टाका आता. खूप भलं होईल तुमचं असं केल्यावर!!”

घामाने डबडबलेल्या चेह्र्यासह ती मटकन खुर्चीवर बसली. पाणी पिता पिता ती विचार करू लागली, त्या चिठ्ठ्या जाळून टाकायच्या का? की कुठेतरी लपवून ठेऊ? सुश ला सांगू की नको? तो म्हणेल सोडून दे ही मनोरंजन नगरी! बास आणि बासरी दोन्हीही राहणार नाहीत. पण सोडून दिली समजा ही चित्रपटसृष्टी तरी माझ्यामागचे वलय कायम राहणार! आणि आता सोडण्याचा विचार केला तरी काय होणार? हा चित्रपट करावाच लागणार असं दिसतंय आणि समजा मी चित्रपट केला तरी काय हरकत आहे? प्रथम हो तर म्हणूया, शुटींग सुरु करुया मग बघू काय करायचे ते?

खिडकीतून हाका मारून तिने दोघाना वर बोलाऊन घेतले आणि त्यांच्यावर अनेक प्रश्नांचा भडीमार सुरु केला जसे –

“बेटा, तुला शाळा सुटल्यावर कुणी अंकल भेटले होते का?”

“बसमध्ये चढतांना कुणी भेटलं होतं का?”

“रस्त्यात कुणी..?”

सगळ्या प्रश्नाचे उत्तर “नाही” असे आले.

“का विचारते आहेस मम्मी आम्हाला असे?”

“काही नाही आपलं सहज रे! अनोळखी लोकांना भेटत जाऊ नका रे! चांगले नसतात बरे!” असे सांगून तिने विषय बदलून टाकला.

म्हणजे ज्यांनी दोघांच्या दप्तरात नकळत चिठ्ठ्या ठेवल्या ते सराईत गुन्हेगार असावेत. अशांच्या विरोधात जाण्यापेक्षा सध्या त्यांची मागणी पूर्ण करणे हाच उपाय आहे. चित्रपटात काम करा अशीच अपेक्षा ते करत आहेत दुसरे तर काही ते मागत नाहीएत, बघुया! आता हो म्हणूया मग पाहू! पण तिच्या मनात सूरजला भेटल्यापासूनच शंकेची पाल चुकचुकतच होती. कारण फिल्म इंडस्ट्रीत बऱ्याच जणांना रागिणीची आत्महत्या मान्य नव्हती, त्याना तो खूनच वाटायचा. शंकेला वाव होता. मायाला सुद्धा रागिणीच्या आत्महत्येमागे काहीतरी गौडबंगाल आहे असे वाटत होतेच. पण कुणाजवळ पुरावा नव्हता आणि कोर्ट पुरावा मागतं. जसा एखाद्या माणसाला जिवंत राहण्यासाठी ऑक्सिजन हवा असतो तसा जज्जला न्याय देण्यासाठी पुरावा हवा असतो. काय करणार? जज्ज हा सुद्धा कायद्याच्या चौकटीत राहूनच न्याय देऊ शकतो!

सूरजला मायाकडून फोनवर गुड न्यूज मिळाली की ती त्याच्या कॉमेडी चित्रपटात काम करणार!

सूरज खुश होऊन मनात म्हणाला, “चला बरे झाले! पुन्हा व्हेरोनिकाला भेटायला जायला आता मी मोकळा आणि टेन्शन फ्री!”

कातील खान आणि माया माथूरचा तो विनोदी चित्रपट – “गँगस्टर की दुल्हन!” सुपरहिट झाला. त्यात ओलिव्हियाला त्याने महत्वाची भूमिका देऊ केली होती. त्या चित्रपटानंतर कातील खान भारतात राहायला येऊन त्याने मुंबईतच बांद्रयाला तळ ठोकला, भाईच्या कृपेने कमी किमतीत समुद्रकिनारी फ्लॅट मिळवला. माया माथुरच्या चित्रपटानिमित्त लाभलेल्या सहवासातच तो सध्या खुश होता. दरम्यान सूरजचे ड्रग्ज कनेक्शन वाढत गेले आणि त्याचे विनोदी चित्रपट सुद्धा सुपरहिट होत गेले. त्याचे ओलोव्हीया आणि व्हेरोनिका सोबत प्रेमसंबंध अव्याहतपणे चालत राहिले. आणि प्रत्येक चित्रपटाच्या सुरुवातीला तो “माझे प्रिय प्रेम रागिणी, तुला हा चित्रपट समर्पित” असे वाक्य टाकायचा!


प्रकरण 47

रिताशा युरोपच्या टूरवर सगळ्या टीम सोबत खूश होती. सोनी भारतात डान्स शोच्या जज्जच्या भूमिकेत खूश होती आणि त्यात ती तिच्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन पण करत होती. इकडे भूषण ग्रोवर लग्न, हनिमून आणि करीयर मार्गी लागल्या बद्दल खूश होता पण रिताशाच्या मनात काय चालले आहे याची त्याला पुसटशीही कल्पना नव्हती. आता तर अशी स्थिती होती की जवळपास युरोप टूरची अघोषित सिरियल डायरेक्टर तीच झाली होती. डिपी सिंग सुध्दा खूश होते कारण त्यांच्या मागचे काम कमी झाले होते आणि त्यांचे करीयर पुन्हा मार्गी लागले होते.

आयर्लंड सरकारची परवानगी घेऊन त्यांच्या टीमचा मुक्काम सध्या मॉलवरिन या भूत बाधित कॅसलच्या जवळ असलेल्या हॉटेल मध्ये होता. आसपासचे लोकं सांगायचे की या किल्ल्यात एका पहारेकरीला त्याच्या राजाच्या पत्नीसोबत संबंध ठेवल्याच्या खोट्या आरोपाखाली मृत्यूदंड दिला गेला होता पण फाशीच्या शेवटच्या क्षणापर्यंत आणि प्राण जाई जाई पर्यंत तो म्हणे ओरडत होता की तो निर्दोष आहे. त्याची आरोळी त्यावेळेस फाशी देताना ज्या लोकांनी ऐकली होती त्यापैकी काही जण वेडे झाले, काहीजण पाच दिवसात मेले तर काहीजण म्हणे बेपत्ता झाले. आजही म्हणे तेथे तसा त्याच्या ओरडण्याचा आवाज ऐकू येतो की मी निर्दोष आहे.

संध्याकाळी पाच नंतर तेथे जायला बंदी असते. त्यांची टीम सगळी शूटिंग दिवसा करायची आणि नंतर स्पेशल इफेक्ट द्वारे दिवसाचे सिन रात्रीचे वाटतील असे त्यात बदल करायचे.

त्या दिवशी शूटिंग अर्ध्या दिवसात संपली होती. सहज म्हणून जवळपास फिरण्यासाठी रिताशाने भूषणला विनंती केली. तो तयार झाला. थोड्याच वेळात पाऊस येईल अशा प्रकारे मोबाईलवर हवामानाचा अंदाज पाहिल्यावर तिने मुद्दाम त्याला फिरायला चालण्याची विनंती केली. नंतर ती म्हणाली, "चल भूषण, जरा सिटी फिरून येऊ! परवा आपल्याला येथून निघायचे आहे, आज वेळ मिळाला आहे तर जवळपास जाण्यापेक्षा सिटी मध्ये मिड टाऊन मॉलमध्ये फिरून येऊ!"

भूषण हो म्हणाला कारण त्यालाही हॉटेलच्या रूमवर बसून बोअर होणार होते आणि मिड टाऊन मॉल मधून सोनीसाठी काहीतरी विकत घेता येईल असा विचार करून तो तिच्यासोबत निघाला. भूषणने सोनीला कॉल लावला पण ती शूटिंग मध्ये व्यस्त असल्याने फोनवर उपलब्ध नव्हती.

काही अंतर मॉलमध्ये चालल्यानंतर अचानक एक मोठा आवाज आला आणि पळापळ सुरु झाली. त्यामुळे ती संधी साधून दचकल्यासारखे करून रिताशाने भूषणच्या थोडे जवळ सरकत त्याचा तळहात धरला आणि तिची पाचही बोटे त्याच्या हाताच्या बोटात लॉक केली. भूषण थोडा अवघडला पण सोबतच्या एका लेडीची भीतीने अशी होणारी प्रतिक्रिया साहजिक आहे असे समजून त्याने तिला विरोध केला नाही. तसे पाहता सिरियल मध्ये शूटिंगच्या वेळेस तिच्या शरीराचा स्पर्श त्याला कित्येक वेळा झाला पण ते सगळे लोकांसमोर आणि मुद्दाम केले असल्याने त्याची अनुभूती वेगळी आणि आताच्या स्पर्शाची अनुभूती कित्येक पटीने वेगळी होती.

नंतर घोषणा झाली आणि कळाले की ती पळापळी म्हणजे मॉल मधले “मॉक ड्रील” होते म्हणजे एखादा दहशतवादी हल्ला झाला तर काय करायचे याची ती रंगीत तालीम होती.

पण तोपर्यंत त्या गोंधळात मार्ग काढतांना घाबरून रिताशा बराच वेळ भूषणच्या अंगाला अंग घासून चालत होती. आज कोणत्याही परिस्थितीत डाव साधायचा कारण युरोपला येऊन बरेच दिवस झाले होते पण हवी तशी संधी मिळत नव्हती, जी आज नक्की मिळेल असे तिला आज सकाळपासून खूप मनापासून वाटत होते. त्या दृष्टिकोनातून पाहिले पाऊल योग्य संधी साधून तिने टाकले होते.

रिताशाने त्याच्या हातात तिचा हात जेव्हा दिला तेव्हा भूषणला तिच्या हाताची लांबसडक बोटे प्रकर्षाने दिसली. जाणवली! ती बोटे त्याला खूपच आवडली. हातात हात घालून तो अनेकदा सोनीसोबत फिरला होता पण रिताशाच्या बोटांच्या स्पर्शाने त्याला जी अनुभूती मिळाली ती आयुष्यात प्रथमच त्याने अनुभवली होती, अगदी सोनीच्या हातांच्या स्पर्शात सुद्धा ती जादू नव्हती!

नंतर ते दोघे अनेक दुकानं फिरले. सोनीकरता भूषण जी वस्तू खरेदी करण्याचा प्रयत्न करायचा त्याबद्दल तो रिताशाचे मत विचारायचा कारण एक महिला दुसऱ्या महिलेला काय आवडेल हे ठामपणे सांगू शकते ज्याद्वारे सोनीला त्याने घेतलेले गिफ्ट आवडण्याचे चान्सेस वाढणार होते. पण रिताशा भूषणने निवडलेल्या प्रत्येक आयटेम मध्ये काहीतरी खोट काढून त्याला गोंधळून टाकायला लागली. शेवटी भूषण तिच्या बोलण्यात येऊन कोणतीच वस्तू नीट निवडू शकला नाही.

नाही म्हटले तरी त्या रात्री भूषणच्या मनात तिच्या हाताच्या घट्ट स्पर्शाबद्दल एक वेगळेच आकर्षण घर करून राहिले.

दुसऱ्या दिवशी सकाळी –

सकाळी पाच वाजताच रिताशाने भूषणच्या रुमच्या दरवाज्यावर टक टक केले. रात्रीचा वन पीस गाऊन तसाच अंगावर ठेऊन ती आली होती.

"अरे बापरे, रिताशा एवढ्या सकाळी?"

"सकाळी अकरा वाजता शूटिंग चालू होते आहे. वेळ कमी आहे. म्हणून लवकर उठले आज. म्हटलं रिव्हर साईडला फिरून येऊ. तुझ्या पेक्षा कुणी डीसेंट आणि सिंपल माणूस कंपनी द्यायला मला आपल्या पूर्ण टीम मध्ये दिसत नाही म्हणून तुला विचारले. असा आश्चर्यजनक चेहरा काय केलास? तू म्हणशील तर जाते मी परत...!"

सकाळी सकाळी अचानक उठवल्याने त्याचा चेहरा आश्चर्य दर्शवत होता आणि त्याने काही बोलण्याच्या आतच तिने बडबड चालू केली.

"रिटा, तसे नाही, ये बैस. अचानक पणे तू सकाळी सकाळी आलीस म्हणून बाकी काही नाही", त्याची नजर तिच्या गाऊन मधून दिसणाऱ्या शरीरावरून हट म्हणता हटत नव्हती," बैस! मी पटकन ब्रश करून येतो!"

ती त्याच्या बेडवर बसली आणि तो ब्रश करायला वॉशरूम मधील बेसिनकडे गेला तेव्हा ती त्याच्या बेडवर आडवी झाली. एखाद्या परपुरुषाच्या रुममध्ये आपण सकाळी सकाळी आलो आहोत याची तमा न बाळगता एक आळस देऊन ती बेडवर पहुडली.

दहा मिनिटांनी वॉशरूम मधून ब्रश करून बाहेर आल्यावर बेडवर नजर टाकताच त्याचा अनपेक्षित दृश्याने आ वासला गेला. नजर बेडवर खिळली.

रिताशा बेडवर पूर्ण नग्नावस्थेत होती आणि रूमचा दरवाजा, पडदे, खिडक्या सगळे लावलेले होते. तिच्या नजरेतून आणि शरीरातून एक मादक आव्हान झळकत होते. त्याच्या हातातून रुमाल आणि ब्रश खाली पडला...

मग त्या दिवसानंतर एक दिवसाआड रिताशा त्याला उद्युक्त करायची आणि मग दिवसा किंवा संध्याकाळी किंवा रात्री वेगवेगळ्या ठिकाणी शूटिंगच्या ब्रेक मध्ये आडोसा शोधत कुठेही ते बिनधास्तपणे प्रेम करायला लागले अर्थात त्यांच्या टीमपासून हे लपवण्याची खबरदारी घेण्यात ते चुकत नव्हते.

खरेतर भूषण हा रिताशा सोबत प्रथम शारीरिक पातळीवर गुंतला होता आणि नंतर रिताशा त्याची आवड निवड छोट्या छोट्या प्रसंगाद्वारे सांभाळायला लागली तेव्हा मात्र तो हळूहळू तिच्यात स्वतःच्या नकळत भावनिक पातळीवर सुध्दा गुंतत गेला.

युरोपमधून परत आल्यानंतर एक वेगळ्या प्रकारचा बदललेला भूषण सोनीला जाणवला. सोनीसोबत प्रेम करतांना त्याला रिताशा आठवायला लागली कारण सोनी भूषण ज्या खेळात अजून नवशिके होते त्यात रिताशा खूप अनुभवी होती आणि तिचा तो वेगवेगळा अनुभव त्याने अनुभवल्यानंतर त्याला साधा मिळमिळीत अनुभव नकोसा वाटायला लागला. सोनीला अजूनही कळत नव्हते नेमके काय झाले ते! आणि भारतात आल्यानंतर फोनवर आणि शूटिंगच्या दरम्यान फ्री वेळ जेव्हा जेव्हा मिळेल तेव्हा तेव्हा भूषण वेड्यासारखा तिच्यात गुंतत चालला होता. सोनीला काही काळानंतर थोडा थोडा संशय आला पण तिला एखादा ठोस पुरावा मिळेल असे काही अजून मिळत नव्हते.



प्रकरण 48

सुनंदा राजेश सोबत राहायला मुंबईत आपल्या बाळासह आली. राकेशने बाळाचे नाव “अक्षर” ठेवले.

दरम्यान अभिजित श्रीवास्तवसाठी राजेशने लिहिलेल्या स्क्रिप्टमुळे प्रभावित होऊन अमितजींनी राजेशला जो एक गुप्त प्लान सांगितला होता त्याची वेळ येऊन ठेपली होती.

अमित श्रीवास्तव यांचा “मालामाल हो जाओ” या कार्यक्रमाचा नुकताच दहावा सिझन सुरू झालेला होता आणि त्याच्या शुक्रवारच्या खास एपिसोड मध्ये अमितजिंनी सिनेक्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या राजेशला निवडले होते. सिने क्षेत्रातील लेखकांसाठी त्याला काहीतरी कामगिरी करायची आहे हा विचार अमितजींना आवडला. आणि नेहमीप्रमाणे डायरेक्ट दहा हजाराच्या प्रश्नापासून सुरुवात केली गेली.

विशेष म्हणजे अमितजींच्या खास विनंतीवरून हा शो लाईव्ह ठेवण्यात आला होता आणि शोचे सर्वेसर्वा "कमलेन्द्र बोस" यांनी अमिताभच्या विनंतीला मान दिला होता.

गेम शो सुरु होण्याआधी -

"राजेश जी, आम्हाला सांगा, तुम्ही येथून एक करोड जिंकलात तर त्या पैशांचे काय करणार आहात?"

"या सिनेसृष्टीत मी अनेक वर्षांपासून फ्री लान्स फिल्म जर्नालिस्ट आणि एक लेखक आणि समीक्षक म्हणून कार्यरत आहे. येथून मी जी काही रक्कम जिंकेन त्यातील काही रक्कम मी या क्षेत्रातील लेखक आणि पत्रकार यांचेसाठी एक संस्था उघडून त्यांना आर्थिक मदत तसेच योग्य मार्गदर्शन करण्यासाठी वापरेन!"

"धन्यवाद राजेश जी बहोत उमदा विचार ही आपके! तो चलीये खेलते है - मालामाल हो जाओ!"

खेळ सुरु होतो -

"तो राजेश जी, अगला प्रश्न दस हजार रुपये के लिये ये रहा आपके कंप्युटर स्क्रीन के ऊपर!"

इनमेसे कौन "कौन है वह" फिल्म मे भूत नही बना है?
1. राकेश कुमार
2. पवन ममतानी
3. फारुख पटेल
4. अनिता राठी

"सर D अनिता राठी"

"बिलकुल सही जवाब आपका! अगला प्रश्न बिस हजार रुपये के लिये ये रहा!

आपको एक गाना सुनाई देगा आपको बताना है ये किस अभिनेत्री पर चित्रित किया गया है?
"राजाजी का बजा दूंगी मै बाजा, तो फिर नाच नाच, नाच नाच, नाच रे मन मोहना!"
1. शिवानी संध्या
2. मनमित कौर
3. साबरिना सोनाटा
4. मधुमालीनी मेहता

सर "मनमित कौर" पर ठप्पा लगा दो.

मुबारक हो! आप बिस हजार जित गये.

चालीस हजार रुपये के लिये अगला प्रश्न ये रहा!

1983 का वर्ल्ड कप भारत ने जीता तब कप्तान कौन थे?
1. सुनील गावस्कर
2. कपिल देव
3. रवी शास्त्री
4. राणा दुग्गुबाती

सर "कपिल देव" पर ठप्पा लगा दो.

बिलकुल सही जबाब आपका!

अस्सी हजार लिये प्रश्न ये रहा

कौनसे फिल्म मे फिल्म के हिरो राजेंद्र शास्त्री मोबाईल के टॉवर पर चढ जाते है?
1. आग के गोले
2. भोले दोस्त
3. जाली दुश्मन
4. कालिया का बदला

सर "आग के गोले" पर सिक्का मार दो.
अस्सी हजार जित गये आप.
एक लाख साठ हजार के लिये प्रश्न ये रहा.

इनमेसे कौनसी फिल्म पाच साल थिएटर मे चली?
1. भले आदमी दुल्हन चुरा लेंगे
2. ‎हमारी दुल्हनियाँ की मेहंदी
3. मेहंदी वाले हाथो में कंगना खनक खनक जाए
4. चुडियो का चाँद

सर ऑप्शन मेहंदी वाले हाथो पर ठप्पा लगा दो .
आ बिलकुल सही जवाब!
एक लाख साठ हजार जित गये आप.

पुढे आणखी प्रश्न विचारले गेले. तोपर्यंत फक्त एकच चौथी लाईफलाईन उरली होती.
कॉल युवर बडी!
आणि शेवटी एक करोडचा प्रश्न आला.

"किस्मत का खेल" इस फिल्म की कथा किसने लिखी?
1. के. के. सुमन
2. पि. के. सुमन
3. ‎आनंद कुमार
4. ‎संतोष ठाकूर

राजेश मुद्दाम विचारात पडला. त्याला उत्तर माहित नाही असे तो चेहऱ्यावर दाखवू लागला.

"राजेश जी, आप लेखक है और आपको इसका उत्तर मालूम होना चाहिये!"

तरीही राजेश विचारात गढलेला दिसत होता.

"कोई बात नही. अगर उत्तर मालूम नही हो तो अभी भी आपके पास एक लाईफलाईन बची है! कॉल युवर बडी!"

"ठीक है सर! मै लाईफलाईन युज करना चाहूँगा!"

"किसे कॉल लगायेंगे आप?"

"सर मेरा दोस्त! माझे चांगले मित्र आहेत जे आता फिल्म इंडस्ट्री मध्येच कार्यरत आहेत - सारंग सोमैय्या! त्यांना मी कॉल करू इच्छितो!"

"कंप्युटर भैय्या, सारंग जी को फोन लगाया जाय!"

ट्रिंग ट्रिंग ट्रिंग

"सारंग सहाब नमस्ते, मैं अमित श्रीवास्तव बोल रहा हूं, मालामाल गेम शो से!"

"सर, नमस्कार कैसे है आप?"

"मैं बढिया हुं, आप बताईए क्या हालचाल है आपके?"

"बस सर! आपके राज मे सब कुछ ठीक चल रहां हैं!"

"अरे अरे ऐसां मत काहिये. मेरे सामने बैठे है राजेश. वे पचास लाख जित गये है और उन्हे जरुरत हैं आपकी मदद की एक करोड के सवाल के जवाब के लिये. वें अब प्रश्न पढेंगे!"

काउन्ट डाऊन सुरू झाले.

राजेश सारंगशी बोलू लागला, "सारंग, किस्मत का खेल या हिंदी चित्रपटाची कथा कुणी लिहिली, मी ऑप्शन वाचतो..!"

राजेशला मध्येच तोडत सारंग म्हणाला, "राजेश अरे, ऑप्शन वाचायची काय गरज आहे? या चित्रपटाची कथा तूच तर लिहिली आहेस राजेश!"

एव्हाना हा कार्यक्रम बघणाऱ्या कुणीतरी पिके आणि केकेला फोन करून टिव्ही लावायला सांगितले आणि मालामाल कार्यक्रम बघायला सांगितले. आतापर्यंत त्या कार्यक्रमात काय काय झाले हे सांगितले.

पिके आणि केकेला आता काहीतरी मोठा घोळ होणार आणि आपण अडकणार आणि आपले बिंग फुटणार याची चाहूल लागली...

"क्या बात कर रहे हो आप सारंग भाई? कृपया राजेश को चार ऑप्शन में से सही जवाब बताईये, समय बीता जा रहा है."

"सर, अब मैं क्या बताऊ आपको, सच हकीकत तो राजेश ही बतायेगा आपको, राजेश जिस पेन से आप कागज पे लिखते हो उस पेन की कसम और जिस कीबोर्ड से आप कंप्युटर पर टाईप करते हो उस कीबोर्ड की कसम, आपको सच बोलना पडेगा!"

राजेश ने विचार केला आणि सूचक नजरेने अमितजी कडे पाहिले आणि शेवटी बोलायला लागला, "हो, अमितजी! किस्मत का खेल या चित्रपटाची कथा ज्यात तुम्ही काम केले होते आणि तो चित्रपट खूप हीट झाला होता, त्याची कथा मी एका दिवाळी अंकात म्हणजे दिवाळीच्या काळात छापले जाणारे मराठी मॅगझिन यात लिहिली असून ती केके सुमनने चोरली आणि स्वतः च्या नावावर खपवली! इसलिये इस सवाल के चार ऑप्शन गलत हैं अमितजी! सही जवाब हैं राजेश, खुद मैं!"

"आप केके जैसे महान हस्ती पर गलत इलजाम लगा रहे हैं राजेश, क्या सबूत हैं आपके पास?"

"सर, अगर आप आज्ञा दे तो मेरे पास एक व्हिडिओ हैं! मोबाईल में. आप कृपया इस बडे परदे पर दिखाईये."

"ये गेम शो एक अजीब मोड पर आकर रुका हैं. मैं इस गेम शो के मालिक "कमलेन्द्र बोस" से मिलकर पाच मिनट मे आता हूं, तब तक आप हॉट सीट पर बैठे रहे!"

दरम्यान या शोने अतिशय वेगळे वळण घेतल्याने भारतात सगळीकडे अनेक लोकांनी एकमेकांना नातेवाईकांना मित्रांना फोन करून करून टीव्हीवर तो प्रोग्राम लावायला सांगितले.

कमलेंद्रने अमितजींना अर्थातच व्हिडिओ दाखवण्याची परवानगी दिली कारण हे आधीच ठरलेले होते. हे राजेशलाही माहीत होते. प्रेक्षकांना मात्र हा रियालिटी शो रियल वाटावा म्हणून थोडेसे रियल नाटक केले गेले. राजेशने त्या रात्री रेकॉर्ड केलेला तो व्हिडिओ प्ले केला आणि केकेचे सगळे बिंग फुटले.

केके ला अस्वस्थ वाटू लागले. त्याला दवाखान्यात नेण्यात आले. पिकेने कोर्टात मानहानीचा दावा दाखल करायचे मनोमन ठरवले पण वीणा वाटवेने त्याला रोखले.

मग त्या कार्यक्रमात अनेक प्रेक्षकांचे फोन आले. प्रेक्षकांनी राजेशची सहानुभतीपूर्वक चौकशी केली. अनेक प्रश्न विचारले. अनेक लेखकांचे फोन आले. त्यांनी राजेशला या धाडसी कृत्याबद्दल धन्यवाद दिले. अनेक दिवाळी अंकांच्या लेखकांनी, संपादकांनी कार्यक्रमात फोन केले आणि राजेशचे आभार मानले. केकेच्या कास्टिंग काऊचला बळी पडलेल्या काही जणींनी सुध्दा कार्यक्रमात फोन केला. त्या आजही बॉलीवूड मध्ये काही ना काही दुय्यम भूमिका करत होत्या.

राजेशच्या टीम मधील एकाने एकंदर परिस्थिती पाहता ठरल्याप्रमाणे कोर्टात राजेश तर्फे केकें विरुद्ध केस दाखल केली. केके ला हॉस्पिटल मधून बरे वाटल्यावर पोलिस अटक करणार होते. जवळपास आता केके वर आरोप निश्चिती झाली होती. कोर्टात रितसर आरोप निश्चित होऊन जवळपास के के ला अटक होण्यासारखी परिस्थिती निश्चित होती.

कोर्टात केकेच्या वकिलाने असा युक्तीवाद करण्याचा प्रयत्न केला की, राजेशने धोका देऊन केकेच्या असिस्टंटला व्हिडिओ समोर धमकावून खोटे खोटे आणि बळे बळेच केकेला त्याने न केलेला गुन्हा कबूल करायला लावला पण एकंदर कास्टिंग काऊचला बळी पडलेल्या अनेक जणींनी आणि शेवटी मतपरिवर्तन झालेल्या पिकेने केकेच्या विरोधात साक्ष दिल्याने तसेच रत्नाकर रोमदाडेने प्रतीपक्षाच्या वकिलाने केलेल्या प्रश्नांवर पत्करलेली शरणागती आणि त्याची उडालेली भंबेरी आणि शेवटी त्याने कबूल केलेला गुन्हा यामुळे आरोप निश्चिती झाली.

कोर्टाने दोन गुन्ह्यांखली केकेला एकूण दोन शिक्षा सुनावल्या: चार वर्षांचा तुरुंगवास आणि नुकसान भरपाई म्हणून राजेशला पन्नास लाख रुपये देण्याचा आदेश दिला. मालामाल हो जाओ कार्यक्रमात मिळालेले एक कोटी रुपये राजेशने ठरल्याप्रमाणे संस्थेसाठी वापरण्याचे ठरवले आणि पन्नास लाख रुपये त्याला कोर्टाकडून भरपाई म्हणून मिळाले.



प्रकरण 49

फिल्म इंडस्ट्रतील सर्वात प्रतिष्ठेचा आणि सर्वात जुना अवार्ड "मॅडम फिल्म मॅक्सीमा" (MFM) अवार्ड मिळवणे आजही फिल्म इंडस्ट्रीतील कलाकारांसाठी अतिशय सन्मानाचे वाटत असे. मॅडम अवार्ड हे मॅडम अकादमी तर्फे चालवले जात. पूर्वी "फिल्म मॅक्सीमा" मासिकातर्फे चालवत येणारा हा अवार्ड नंतर मॅडम अकादमीने स्पॉन्सर करायला सुरुवात केली होती. या अवार्डसाठी सगळेच आधीपासून तयारीला लागले होते. गेल्या काही वर्षांपासून या अवार्डमध्ये टेलिव्हिजन अवार्ड सुध्दा सामील करण्यात आल्याने जवळपास सर्वच कलाकार या फंक्शनला यायचे. यात मराठी चित्रपट आणि सिरियलचे पण अवार्ड सामील होते.

हा अवार्ड शो वगळता इतरही अनेक संस्था अवार्ड द्यायच्या. असे एकूण जवळपास सोळा ते सतरा वेगवेगळ्या प्रकारचे अवार्ड दरवर्षी दिले जायचे. पण कलाकारांसाठी मॅडम फिल्म मॅक्सीमा हा अवार्ड खूप प्रतिष्ठेचा होता. हॉलीवूडच्या “गोल्डन वर्ल्ड अवार्ड”च्या तोडीचा हा अवार्ड मानला जात होता.

माया माथूरला या वर्षी आश्चर्यकाररीत्या “बेस्ट फीमेल लीड इन कॉमिक रोल” साठी नॉमिनेशन मिळाले होते आणि तिला स्पर्धेला फक्त आणखी एक नटी होती पण मायाच जवळपास तो अवार्ड पटकावणार हे जवळपास निश्चित झाले होते. आपले जुळे मुलं आणि डॉक्टर पती यांच्यासमवेत ती अवार्ड फंक्शनला आली होती. अजूनपर्यंत तिने तिला मिळालेल्या धमकीबद्दल नवऱ्याकडे अवाक्षर सुध्दा काढले नव्हते कारण झालाच तर चित्रपट केल्याचा तिला फायदाच झाला होता पण आताशा काही दिवसांपूर्वी कातील खान तिच्याशी अकारण जवळीक करण्याचा प्रयत्न करत होता आणि ते तिला खटकत होते. पण सूरज सोबत चांगले मैत्रीपूर्ण संबंध निर्माण झाल्याने तिने सूरजला त्याबद्दल तक्रार केली नव्हती. आणि इतक्या उशिरा नवऱ्याला सांगितले तर तो ओरडणार अशा विवंचनेत ती होती. पण चेहऱ्यावर दाखवू शकत नव्हती.

राजेश सुध्दा सुनंदा, त्याची आई आणि त्याच्या मुलासह तेथे उपस्थित होता. सारंग, पिके, वीणा आणि राजेशच्या टीम मधील मंडळी तेथे उपस्थित होती. राजेशचे फिल्मी करियर एकदम सुरळीत सुरू होते. त्याचा कथाचोर सापडला होता त्याला अमितजींच्या मदतीने अटकही झाली होती, त्यामुळे फिल्म इंडस्ट्रीत राजेशला एक वेगळेच “वलय” प्राप्त झाले होते. त्याचेकडे सगळे लोक आदराने बघत होते. अख्ख्या इंडस्ट्रीतील लेखकांचा त्याला पाठिंबा मिळाला होता. त्याचे पर्सनल लाईफसुध्दा रुळावर आले होते.
पिके आणि वीणा आता रिलेशनशिप मध्ये होते. त्याचे मतपरिवर्तन झाले असले आणि कोर्टात त्याने वडिलांविरोधात साक्ष दिली असल्याने त्याला सगळीकडे सहानुभूती मिळाली असली तरीही मनाच्या कोपऱ्यात एके ठिकाणी त्याला राजेशाबद्दल अढी होतीच. पार्टीत तो जरी सगळ्यांत मिसळत असल्याचे वाटत होते तरीही ते फक्त वरवरचे होते. मनातून त्याला या पार्टीत बिलकूल स्वारस्य नव्हते. त्याचे वडील तुरुंगात होते आणि आई मुंबईतच वडिलांपासून वेगळी रहात होती. केकेला अटक झाल्यानंतर मात्र तिचा फोन त्याला आला होता. त्याची विचारपूस तिने केली होती. आई वडिलांचे वेगळे राहण्यामागचे कारण होते “मिनालिका रेड्डी” ही नटी! तिचे केके सोबत अफेअर होते.

आता वीणा त्याचसोबत त्याच्या घरी राहायला लागली होती. दोघांनी लग्न करायचे ठरवले होते. पिके बराच वेळ एका खुर्चीवर बसून शून्य मनाने समोर स्टेजवर काय चालले आहे ते बघत होता. त्याच्या मनात काहीतरी वेगळाच प्लॅन आकाराला येत होता. आपल्या त्या प्लॅनवर त्याच्या गालावर हास्याची लहर उमटली.

अमितजी आजच्या अवार्ड फंक्शन मध्ये राजेशची भेट एका व्यक्तीशी घालून देणार होते ज्यामुळे राजेशला हॉलीवूडच्या चित्रपटासाठी लेखनाची संधी मिळणार होती कारण आजच्या फंक्शनला त्या भव्य हॉलीवूड चित्रपटाची टीम येणार होती.

सध्या राजेशच्या मनात अजून एक कथा घोळत होती. फिल्म इंडस्ट्री मध्ये घडणाऱ्या घटनांवर त्याला एक कथा लिहून त्यावर चित्रपट बनवायचा आणि त्याची निर्मिती आणि दिग्दर्शन त्याला स्वतः करायचे होतें. त्यात तो त्याची स्वतःची कथा चोरीची कहाणी आणि इतर काही पात्रांच्या कथा मांडणार होता. थोडे सत्य आणि थोडे काल्पनिक असे मिश्रण त्याच्या कथेत असणार होते. त्याचा प्लॉट त्याच्या मनात तयार होता आणि थोडे थोडे लिखाण त्याने सुरू सुध्दा केले होते पण त्या आधी हॉलीवूडची संधी त्याला घ्यायची होती...

या वर्षी बॉलीवूड मध्ये बॉलीवूडच्याच पार्श्वूमीवर चित्रपट बनला होता: "रांगिला राजन". त्या अनुषंगाने राजेश आणि त्याच्या टीम मध्ये सहज चर्चा चालली होती.

राजेश म्हणाला, "एक मात्र नक्की! इतर विविध क्षेत्रातील घडामोडींवर काल्पनिक कथा लिहून आपण बॉलीवूडवाले त्यात खूप ड्रामा भरतो. काही वास्तववादी चित्रपट सोडले तर अशा नाट्यपूर्ण चित्रपटात जसे दाखवतात तशा घटना त्या त्या क्षेत्रातील लोकांच्या जीवनात कधी खरोखर घडत नाहीत, पण पडद्यावर ते नाट्य आपल्याला बघायला आवडते, नाही का? आणि कथानक पूर्ण काल्पनिक असेल तर त्या क्षेत्रातील फारसे कुणी ऑब्जेक्शन घेत नाहीत. कारण त्यांनीही तो पडद्यावरचा ड्रामा मनातून आवडत असतोच!"

"बरोबर आहे राजेश, त्यामुळेच तर ते चित्रपट चालतात कारण त्यात मसाला असतो, ड्रामा असतो, सगळं लार्जर दॅन लाईफ असतं. जे खऱ्या जीवनात त्या त्या क्षेत्रात कधी घडू शकत नाही."

"मग फिल्मी क्षेत्रावर जर असे अनेक मसालेदार, नाट्यपूर्ण घडामोडी असलेले चित्रपट बनवले तर काय बिघडले? आणि कुणी लेखकाने चित्रपट सृष्टीवर अशी नाट्यपूर्ण कथा लिहिली तर काय बिघडलं? मी तर लिहिणार आहे! माझ्यासोबत घडलेल्या कथाचोरी बद्दल मी एक चित्रपटाची कथा लिहिणार! स्वत: प्रोड्यूस करणार!!"

ही चर्चा मन लावून आणि कान टवकारून बाजूला गप्पा उभा असलेला संदीप पटेल हा निर्माता बऱ्याच वेळेपासून ऐकत होता. तो “हिरेश रासिलीया” या प्रसिद्ध संगीतकाराशी बोलत होता. हा संगीतकार नंतर गायला सुद्धा लागला होता पण त्याचे “गाणे” फारसे लोकांनी पसंत केले नाही तरीही तो गातच सुटला होता. नंतर त्याही पुढे जाऊन त्याने अक्षरश: अभिनय करायला सुरुवात केली, जे लोकांना त्याच्या आवाजापेक्षाही जास्त असह्य होऊ लागले पण त्याने प्रयत्न करणे काही सोडले नव्हते. प्रत्येक अवार्ड शो मध्ये हा संगीतकार आवर्जून डायरेक्टर, प्रोड्युसर तसेच कास्टिंग डायरेक्टर वगैरे मंडळीना भेटत राहायचा जेणेकरून कुणीतरी त्याला “अभिनय” करायला देईल! गाणे आणि अभिनय या हट्टापायी त्याच्यातला संगीतकार मात्र कुठेतरी हरवत चालला होता पण त्याला त्याचेशी काही घेणे देणे नव्हते!

इकडे राजेश आणि टीममध्ये गप्पा चालूच होत्या.

"मुळीच काहीच नाही बिघडलं. लिही बिनधास्त राजेश. लिहित रहा, लिखाण एन्जॉय करत रहा! आम्ही सर्व तुझ्या कायम पाठीशी आहोत."

"धन्यवाद माय डियर टीम!" राजेश म्हणाला.

आणि मग त्यांनी आपापले ग्लास उंचावत चीयर्स केले.

हा चियर्सचा जल्लोष बघून संदीप पटेल हिरेशला एक्स्क्यूज मी करून त्या टीमजवळ आला आणि राजेशला म्हणाला,

“राजेश, आप बडे लेखक हो, पत्रकार हो, बडे बडे लोगों मी उठना बसना है आपका! अच्छी बात है! लेकीन सर जी, फिल्म इंडस्ट्री में रहके फिल्म इंडस्ट्री के ही बारे में या फिर इंडस्ट्री के लोगों के बारे में भला बुरा लिखना नाही चाहिये राजेस बाबू!”

राजेश म्हणाला, “क्यो? आपको ऐसा क्यों लागता है?”

संदीप म्हणाला, “देखो राजेस भाई! ये बात तो ऐसी हो गयी ना की पानी में रहके मछली से बैर! पहले ही आपने केके सुमन जैसी हस्ती से पंगा ले लिया है, तो क्यो बार बार अपनीही घरकी मछली से पंगा लेना? है ना? क्युं भाई सारंग सोमैय्या जी ? सही कहां न मैने?”

सारंग म्हणाला, “छोडो ना मोटा भाई! आप पार्टी एन्जॉय करो! राजेस भाई देख लेंगे क्या करना है! क्युं राजेस?” असे म्हणून सारंगने डोळा मिचकावला आणि सगळी टीम खळाळून हसायला लागली. या प्रकाराने अपमान वाटून संदीपने चिडून तेथून काढता पाय घेतला आणि हिरेश सोबत जॉईन झाला.

भव्य 4K हॉलीवूड चित्रपट निर्माण करणार असलेल्या त्या हॉलीवूड टीमला आजच्या या अवार्ड फंक्शनच्या आधारे एका दगडात अनेक पक्षी मारायचे होते, त्यापैकी महत्त्वाचा पक्षी म्हणजे प्रदर्शनाआधीच त्या चित्रपटाची जबरदस्त हवा आणि पब्लिसिटी भारतात करायची!! भारतासारख्या प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशात चित्रपट हिट झाला तरी निर्मात्याचे अर्धे पैसे वसूल होणार होते.

आता फक्त उत्सुकता होती त्या व्यक्तीला भेटण्याची जी राजेशला हॉलीवूड लेखनासाठी चान्स देण्याची शक्यता होती आणि जिथे अमितजी सारखा कलाकार राजेशची शिफारस करणार तिथे नाही म्हणण्याची कुणाची मजाल? या संधीसाठी राजेशने अनेक हिंदी मराठी चित्रपट निर्मात्यांची ऑफर नाकारली होती. कारण त्याला आता हॉलीवूडसाठी लेखनाचा अनुभव घेऊन बघायची उत्सुकता होती. दरम्यान त्याची फिल्मी पत्रकारिता थोड्या प्रमाणात सुरूच होती.

आजच्या कार्यक्रमातला राजेशच्या जीवनातला विशेष “अवार्ड विनिंग सीन” म्हणजे सुनंदा आणि मोहिनी अवार्डच्या ठिकाणी अगदी हसत खेळत एकमेकांशी बोलत उभ्या होत्या. एकमेकांना काय हवं नको ते विचारत होत्या. पूर्वी मोहिनीमुळे निर्माण झालेल्या गैरसमजामुळे जो गोंधळ उडाला होता ते आठवून आठवून हसत होत्या त्या दोघी!!

राजेशने स्वतःला एक चिमटा काढला आणि हे सगळे सत्य आहे याची खात्री करून घेतलीं. हॉलीवूडची टीम अजून अवार्ड नाईट मध्ये यायची बाकी होती. ते एक सरप्राइज असणार होते. ती टीम अवार्ड नाईटच्या आधी फक्त ठराविक लोकांनाच भेटली होती.

अवार्ड नाईट मध्ये अभिनेत्री रिताशा सुध्दा भूषण ग्रोवर सोबत आनंदाने बागडत असतांना दिसत होती. त्या दोघांनी लग्न केले होते...

सोनी बनकर मात्र कुठेच दिसत नव्हती. सुभाष भट सोबत तिने केलेला एकच सिनेमा बऱ्यापैकी हीट झाला होता पण नंतर भूषण ग्रोवर सोबत तिचे संबंध ताणले गेल्याने आणि नंतर त्याने तिला घटस्फोट दिल्याने ती मनातून पूर्ण कोलमडून गेली होती. नंतर तिने कोणत्याही चित्रपट किंवा टिव्ही निर्मात्याची ऑफर स्वीकारली नाही. घटस्फोटानंतर ती मुंबई शहरातून दिसेनाशी झाली. कुणाच पत्रकाराला किंवा तिच्या ओळखीच्या लोकांना माहिती नव्हतं की सोनी नेमकी गेली कुठे?

आयुष्यात बालपणी अनेक सुख दुःखाचे चढ उतार पाहिल्यानंतर, ती मुंबईत आली आणि होती आणि आईशी खोटे बोलून तिने “मॅडम अॅकॅडमी” जॉईन केली. मग साकेतच्या रूपाने तिला मित्र मिळाला पण तोही सोडून गेला. कालांतराने सेल्फी प्रकरणाचे निमित्त होऊन आईने तिच्याशी संबंध तोडले पण तिच्या शिक्षणावर तिच्या काकांनी केलेल्या खर्चाची भरपाई तिला महिन्याला पैसे गावी पाठवून करावी लागली.

पण जमेची बाजू म्हणजे तिच्या आवडीच्या क्षेत्रात चांगले काम मिळवून लग्न झाले आणि थोडा सुखी संसार सुरू झाला असतांना आणि नवऱ्याकडून प्रेम मिळू लागले असताना अचानक नवऱ्याकडून अनपेक्षितरित्या दुसऱ्या स्त्रीसाठी घटस्फोटाची नोटीस सोनीला मिळाली आणि तिने ती शेवटी स्वीकारली.

पण या सर्व प्रकारामुळे ती खूप कोलमडून पडली. आई सुद्धा पारखी झाली होती आणि वडील तर नव्हते. साकेत सारखा मित्र पण तिच्या जवळ नव्हता.

फिल्मी जगतात मिळाला तर एकदम वलयांकित झगमगाट मिळतो नाहीतर मग टोकाचे दुःख काहींच्या वाट्याला येतं. तिला हे ब्रेकअप, हे दुःख सहन झाले नाही. अनेक महिने काम न मिळाल्याने आणि जे काही मिळाले ते काम तिने दुःखाच्या भरात न स्वीकारल्याने तिला पैशांची चणचण भासू लागली होती. मग शहरात अक्षरशः ती केस विस्कलेल्या स्थितीत आणि विमनस्क अवस्थेत कुणी ओळखू नये म्हणुन अंगावरून आणि चेहऱ्यावरून शाल पांघरून इकडे तिकडे फिरू लागली.

काही दिवस अक्षरशः फूटपाथवर झोपली आणि मग जे काही थोडे पैसे होते त्याद्वारे ती तिच्या मूळ गावी गेली. तेथे तिला कुणीही ओळखले नाही. पुन्हा आई आणि गाववाले आपल्याला स्वीकारणार नाहीत हे तिला मनोमन पटले होते. आईने स्वीकारले तरी तिचे काका काहीतरी गडबड घोटाळा करणार आणि तिला सुखाने जगू देणार नाही हे तिला कळून चुकले होते.

नेहमी काहीतरी सनसनाटी बातम्या हव्या असणाऱ्या काही ठराविक न्यूज चॅनल्सनी तिच्या गायब होण्यावर अनेक कार्यक्रम बनवले. काही मराठी चॅनल्सनी सुध्दा तसे कार्यक्रम बनवले. सोनी गायब होण्यामागे तिचा घटस्फोट हेच एक प्रबळ कारण असावे असे चॅनलवाले वारंवार ओरडून सांगत होते.

रात्र झालेली होती. सोनीच्या मूळ गावात असाच एक कार्यक्रम सोनीची आई बघत होती आणि तिला सोनीची खूप आठवण आणि दया आली. ती रडू लागली. तिच्या स्वत:च्या घराच्या आसपास फिरत असताना सोनीला खिडकीतून तो टिव्ही आणि तो प्रोग्राम दिसले. आई आणि काका तो प्रोग्राम बघत होते. आईला रडताना बघून तिला वाईट वाटले. त्या गावात सोनीला कोणीही ओळखले नाही. असेल कुणी एक वेडी भिकारीण म्हणून लोकांनी दुर्लक्ष केले.

एक क्षण सोनीला वाटले की पुन्हा आईच्या कुशीत शिरावे, रडावे आणि आईसोबत राहावे..

सोनीच्या वडिलांच्या हार घातलेल्या फोटोखाली असलेल्या पलंगावर बसून टिव्ही बघता बघता डोळे पुसत सोनीची आई तिच्या काकाला म्हणाली, "पोरगी लई वाया गेली! बरं झालं तिला धडा मिळाला! सटवी कुठली! कुठे मरून गेली असेल तर निदान तिच्या जीवाले शांती भेटेन!"

"आन आपल्या बी!" डोळे मिचकावत काका म्हणाला आणि तिच्या आईला त्याने कमरेभोवती हात घालून जवळ ओढून घेतले. सोनीच्या वडलांच्या फोटोला घातलेला हार थोडासा हलल्यासारखा वाटला. जणू काही तिचे वडील तिला आपल्या दु:खाची जाणीव करून देत होते.

हे बघून आणि ऐकुन हुंदका आवरत सोनी तेथून तडक पळतच निघाली आणि गावापासून तीन किलोमीटरवर असलेल्या पुलावर चालत गेली. पुलावरून कठड्याला टेकून खालच्या नदीतल्या अंधाऱ्या पाण्याकडे तिने बघितले.

काळाकुट्ट अंधार! आणि नदीपात्रातले काळेशार भीतीदायक पाणी! त्या पाण्याकडे ती बघत राहिली आणि रडत राहिली.

अचानक त्या पाण्यात तिला उजेड जाणवला आणि त्या उजेडात तिला तिचे वडील दिसले.

या क्षणी तिला वडलांची जास्त आठवण आली. तिचे वडील तिच्या फार लहानपणीच वारले होते, पण थोडी थोडी आठवण तिच्या मनात शिल्लक होती. तिला पुसटसे आठवत होते की वडील तिला मांडीवर घेत, तिचे कौतुक करीत, तिला अंगाखांद्यावर खेळवीत. वडील घरी आले की ती पळत पळत त्यांचेकडे जाऊन त्यांना बिलगत असे...

आताही तिच्या वडिलांनी अंधाऱ्या नदीतल्या पाण्यातून तिला कडेवर घेण्यासाठी हात पुढे केले. सोनीला लहान झाल्यासारखे वाटले. ती लहान मुलीसारखी हसू लागली. पुलावर आता एकही वाहन नव्हते. गावातली पुलावराची वाहतूक रात्री जवळपास बंद व्हायची. एखाद दुसरी बाईक गेली तर गेली! गावाबाहेरच्या अंधाऱ्या जागेतील त्या अंधाऱ्या पुलावर एकटी उभी राहून ती हसत होती. वेड लागल्यासारखी ती मोठमोठ्याने हसायला लागली. बॉलीवूड मधील एक वलय एका वेगळ्याच वळणावर पोहोचलं होतं..

तिने हसणं अचानक थांबवलं. पाण्यात दिसणाऱ्या त्या वडिलांना भेटायला ती अधीर आली आणि नदीच्या प्रवाहात तिने उडी टाकली. तिचे वलय पाण्यात पडताच विझले होते आणि प्रवाहासोबत वाहत गेले...

सोनीने पाण्यात उडी टाकल्यानंतर पाणी वेगाने वर उसळले आणि इकडे रिताशाने भूषणच्या ड्रिंक्सच्या ग्लास मध्ये बर्फ टाकल्याने त्यातील दारू वर उडाली होती. ग्लास रिचवत अवार्ड नाईट मध्ये ती भूषण सोबत एन्जॉय करत होती. तिला अनेक नव्या निर्मात्यांनी पुन्हा ऑफर दिल्या कारण तिचा टिव्ही शो हीट झाल्याने ती पुन्हा फॉर्म मध्ये आली. मात्र एकीचे वलय विझून दुसरीचे विझलेले वलय पुन्हा निर्माण झाले होते.

आजच्या या अवार्ड मध्ये दिनकर सिंग, त्यांची पत्नी हे सुद्धा आलेले होते. पण ते सूरजला भेटले नाहीत आणि सूरज सुद्धा त्यांना भेटला नाही. सिंग यांचेशी नजरानजर झाल्यानंतर सूरजच्या चेहऱ्यावर एक कुत्सित हसू दिसत होते. एकंदरीत रीताशा आणि सिंग यांची सिरीयल हिट झाली होती. मात्र सिंग यांना एक गोष्ट खटकत होती ती म्हणजे रीताशा आणि भूषणचे जमलेले सूत आणि त्यासाठी सोनी बनकरला भूषण ने दिलेला घटस्फोट आणि सोनी मुंबईतून गायब होण्याबाद्दलच्या उलटसुलट अफवा! पण याबद्दल फार काही खोलात रिताशाला विचारणे म्हणजे आपल्याच पायावर धोंडा मारून घेतल्यासारखे आहे हे त्याना माहित होते! म्हणून त्यांनी फार काही त्यात लक्ष घातले नाही.

अवार्ड शो सुरू झाला.

सगळीकडे डिस्को लाईटस चमचमत होते. ते फिल्मी तारे तारकांच्या अंगावरून फिरत होते. आकाशातले तारे सुध्दा त्या दिवशी या जमिनीवरच्या ताऱ्यांचा हेवा करत होते. सुपरस्टार निखिल कुमार, जोरावर खान हे सूत्र संचालन करत होते. त्यांच्या जोडीला काव्या कुमारी पण होती. एकमेकांवर आणि प्रेक्षकांत बसलेल्या बॉलीवूड मधील मंडळींवर ते विविध प्रकारचे जोक्स करत होते. महा सुपरस्टार अमित श्रीवास्तव हे त्यांची पत्नी आणि मुलगा, सून यांचेसह हजर होते.

एक हरहुन्नरी अभिनेता जो एका वर्षी एकाच चित्रपट करायचा तो मात्र नेहमीप्रमाणे अवार्ड शो मध्ये आला नव्हता कारण म्हणे त्याचा अशा अवार्ड्सवर विश्वास नव्हता.

उमंग कुमार या रबरासारखी बॉडी असलेल्या कलाकाराने स्टेजवर जबरदस्त नाच सुरु केला.

"मैं हुं सबसे प्यारा, डिस्को दिवाना...!"

प्रेक्षक टाळ्यांवर टाळ्या देत होते. मग बेस्ट स्पेशल इफेक्ट, तसेच बेस्ट गायक, बेस्ट स्टंट वगैरे असे पुरस्कार मराठी आणि हिंदी दोन्ही चित्रपटासाठी क्रमाने दिले गेले.

मग धनिका दास या अभिनेत्रीने एका आयटम साँगवर डान्स चालू केला. तिच्या दिलखेचक नृत्याने प्रेक्षकांत बसलेल्या भल्या भल्या मंडळींचा काळजाचा ठोका चुकला.

स्टार्टर्स आणि काही ड्रिंक्स पोटात गेल्याने बरेच जण आता रिलॅक्स होते.



प्रकरण 50
माया माथूर आपल्या दोन मुलांना पतीकडे सोपवून वॉशरुमकडे निघाली. वॉशरुममध्ये आरश्यात केस आणि मेकप नीटनेटका करत असताना ती थोडी चिंतेत दिसत होती कारण आताशा कातिल तिच्याशी जास्त सलगी करायला लागला होता. तिला खटकेल अशा रीतीने. तिने बरेचदा हसून वेळ मारून नेलेली होती पण आता थोडे जास्त होते आहे असे तिला वाटायला लागले होते. आरशासमोर विचार करता करता बराच वेळ ती शून्य मनाने मेकप सावरत होती. तिला जास्त चिंता याची होती की तिने आपल्या पती पासून सुरुवातीपासून सगळे लपवले होते आणि आता एकदम अती झाल्यानंतर सांगितल्यावर त्याची काय प्रतिक्रिया असेल?

विचारांत असताना समोरच्या काचेवर वाफ जमा झालेली तिला दिसली आणि त्यावर बोटाने इंग्लिश मधून लिहिले जात होते, "टूडे इज युवर लास्ट डे ऑफ वरी!" (आज तुझ्या काळजीचा शेवटचा दिवस आहे!")

ती अचानक दचकली आणि घाबरून ओरडणार एवढ्यात समोरचे ते लिखाण नष्ट होऊन स्वच्छ आरसा दिसत होता.

आपल्या मनातले विचार कुणाला आणि कसे काय कळले आणि अचानक काचेवर कुणी लिहिले आणि माझ्या चिंतेचा आज शेवटचा दिवस? हे काय होते? मला हे कसले भास होत आहेत? अती काळजीमुळे तर नाही ना असे होत?

ती तडक वॉशरुम मधून घाईघाईने निघून अवार्ड शो सुरू असलेल्या ठिकाणी आपले सीट शोधत आली.

तिचे दोन्ही जुळे मुलं कंटाळल्याचे दिसत होते. कारण मायाला जाऊन बराच वेळ झाला होता.

एव्हाना हॉलीवूडची टीम अवार्ड नाईट मध्ये आलेली होती आणि त्यांची चित्रपटाबद्दल जाहिरात करून झाली होती. मात्र काही जण बाहेर व्हॅनीटी व्हॅन मध्येच थांबले होते. त्यांना अशा नाच गाण्यांत इंटरेस्ट नसावा!

स्टेजवर दोन आघाडीच्या अभिनेत्री ज्यांनी हॉलीवूड मध्ये आपले बस्तान बसवले होते त्या आपल्या एकत्र डान्स परफॉर्मन्सने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करत होत्या. आजूबाजूला दहा पुरुष आणि स्त्री नर्तक त्यांच्या स्टेप्स डान्स स्टेप्सला फॉलो करत त्यांना मनापासून साथ देत होते. स्टेजवर कॉन्फेटी म्हणजे रंगीबेरंगी कागदांचे तुकडे इकडे तिकडे उधळले जात होते. शो ऐन रंगात आला होता. मग गाणे संपता संपता प्रेक्षकांत बसलेला हॉलीवूडचा एक आघाडीचा अँक्शन हिरो टॉम टींसेल स्टेज वर आला आणि दोघींना डान्स मध्ये जॉईन झाला. प्रेक्षकांत टाळ्यांचा भरपूर कडकडाट झाला.

गाणे संपल्यावर त्याने जोरावर खान कडून माईक घेतला आणि म्हणाला, "आय जस्ट लव्ह धीस डान्स अँड साँग्ज पार्ट इन बॉलीवूड मुव्हीज. सुरुवातीला आम्ही हॉलीवूडवाले तुमच्या या सिनेमात असणाऱ्या डान्स आणि लीप सिंक असणाऱ्या गाण्यांना नावे ठेवायचो, कमी लेखत होतो पण आज? .. आज हॉलीवूड मधील अनेक असे सिनेमे आहेत जे आता चित्रपटांचे थीम साँग बनवायला लागले आहेत, काही चित्रपटांमध्ये तर एखाद दुसरे गाणे पण दिसायला लागले आहे. काही चित्रपटात तर तुमच्या बॉलीवूड मूव्ही सारखा ड्रामा सुध्दा आता दिसतो. आम्हाला वाटायचे तुम्ही आमच्या चित्रपटांची कॉपी करता, पण नाही तुम्हीच नाही आम्ही पण तुमच्या चित्रपटांतील अनेक नावीन्यपूर्ण गोष्टींची कॉपी करतच असतो. कुणी आजपर्यंत हे उघडपणे मान्य नव्हतं करत पण हे खरं आहे!"

मग टॉमची फिरकी घेण्यासाठी जोरावर खान म्हणाला, "सो टॉम, व्हॉट डू यू थिंक अबाऊट अॅक्टींग इन लीड रोल इन 'भले आदमी दुल्हन चुरा लेंगे' सिक्वेल? (‘भले आदमी दुल्हन चुरा लेंगे' या चित्रपटाच्या पुढच्या भागात हिरो म्हणून काम करशील का?")

यावर हसत टॉम म्हणाला, "अरे यार, तुम्हारी जनता टकलू हिरो को पसंद नही करेंगी!"

जोरावर म्हणाला, "तो विग लगा लेंगे यार, व्हॉट्स द बिग डील?"

यावर टॉम आणि प्रेक्षक हसायला लागले.

स्टेजच्या मागच्या बाजूला सूरज तयारी करत होता. बेस्ट फिल्म अवार्ड त्यालाच मिळणार होता. तयारी करून प्रेक्षकांत पुढच्या रांगेत बसायचे आणि अवार्डची अनाउन्समेंट झाली की तो घ्याला स्टेजवर जायचे असा प्लॅन होता. कपडे बदलून येण्याआधी तो वॉशरुम कडे जायला निघाला. लॉन मधून तो वॉशरुम कडे जात होता. आता हळूहळू स्टेजवरील मोठ्ठा आवाज कमी कमी होत गेला. आता बरीच शांतता होती.

कोण जाणे त्याला मनात एक प्रकारची अस्वस्थता जाणवू लागली. तसं पाहिलं तर त्याच्या मनाप्रमाणे सगळं चाललं होतं. ओलिव्हीया आणि व्हेरिनिका या दोघींनाही तो एकाच वेळेस मॅनेज करत होता. त्याचा फूडचेनचा बिझिनेस आणि त्याच्या आडून चालणारा ड्रगचा बिझिनेस व्यवस्थित चालू होता.

रागिणीला मार्गातून मोकळे करण्यात त्याला यश आलेले होते आणि पोलिस, कोर्ट काहीही सिद्ध करू नव्हती आणि तिची आत्महत्या सिद्ध झाली होती. अनेक फ्लॅट आणि एक बंगला मुंबईसारख्या शहरात त्याच्या मालकीचा होता. करोडो रुपये त्याने कमावले होते. त्याचे चित्रपट हीट होत होते आणि आता तर आज त्याच्या चित्रपटाला अवार्ड मिळणार होता. सुख म्हणतात ते हेच का?

वॉशरुम मध्ये गेल्यावर त्याने आरशात पाहिले. त्याने आपली बॉडी चांगली मेंटेन केली होती. एकदा आरशात आपले सिक्स पॅक एब बघायचा मोह त्याला आवरला नाही. त्याने वरचे कपडे काढले आणि आरशासमोर टॉपलेस झाला.

परदेशात असताना त्याच्या ठराविक गर्लफ्रेंड व्यतिरिक्त ब्राझिलमधील बिझिनेस निमित्ताने त्याच्या संपर्कात येणाऱ्या अनेक श्रीमंत मुलींनी फक्त त्याच्या एकूण व्यक्तिमत्त्वावर आणि विशेष म्हणजे त्याच्या सिक्स पॅकवर फिदा होऊन एका रात्रीसाठी तरी त्यांच्यासोबत त्याने सेक्स करावा अशी विनंती केली होती आणि त्यासाठी त्या पैसे मोजायला सुध्दा तयार होत्या. त्यामुळे सुखावून त्याने चारेक जणींची ऑफर स्वीकारली सुध्दा होती आणि इच्छा एकेका दिवशी पूर्ण केली होती. मात्र नंतर नंतर त्याने अशा गोष्टी बंद केल्या.

हे सगळे आठवून तो सुखावला आणि एकटक स्वतःकडे आरशात बघत उभा राहिला.

त्याच्या सिक्स पॅकवर केस मोकळे सोडलेल्या रागिनीचा पुसट चेहरा आकार घेऊ लागला आणि तेव्हा मात्र तो दचकला आणि मागे सरकला. सिक्स पॅक वर जणू काही तो चेहरा गोंदला जात होता. हा चेहरा अचानक असा कसा गोंदला गेला? तो चेहरा हसायला लागला. कुत्सितपणे त्यांचेकडे बघायला लागला आणि गायब झाला.

घाबरून पूर्ण चेहरा घामाने भरल्यानंतर त्याने पटापट घाईने कपडे अंगावर चढवले आणि वेगाने तो अवार्ड फंक्शनच्या ठिकाणी जायला निघाला.

"सुबहा दिवानी दिवानी दिवानी
शाम सुहानी सुहानी सुहानी
रात शराबी शराबी शराबी
हो जाती है,
जब तुम
जब तुम
जब तुम
मेरे साथ
होती हो हो हो ss"

या गाण्यावर एक नवी नटवी नटी नाचत होती. तिचा या वर्षी पहिलाच चित्रपट रिलीज झाला होता त्यामुळे ती खूप फॉर्मात होती. इथे चांगला परफॉर्मन्स केला तर आणखी चित्रपट मिळतील हे तिला माहित होते.

डान्स संपल्यानंतर लगेचच सूरजच्या अवार्डची अनाउन्समेंट झाली. थोड्या घाबरलेल्या आणि गोंधळलेल्या स्थितीतच तो स्टेजवर चढला आणि त्याने अवार्ड घेतला.

जोरावर खान म्हणाला, "सर आप रागिणी के बारे मे कुछ कहना चाहेंगे? आज आपके साथ वो होती तो उन्हे कैसा लागता आपके इस अवार्ड के बारें में?"

सूरजचे लक्ष नव्हते. समोर प्रेक्षकांत त्याला प्रत्येक सीटवर रागिणी बसली आहे असे दिसू लागले. जोरावरला उत्तर न देताच तो खाली उतरला आणि आपल्या चेहऱ्यावरील अस्वस्थता लपवण्यासाठी अगदी शेवटी एका रिकाम्या असलेल्या रांगेत रिकाम्या खुर्चीवर घाईघाईने जाऊन बसला.

अवार्डकडे बघत असताना त्याला बाजूला रिकाम्या खुर्चीवर रागिणी बसली असल्याचे दिसले. तिचा चेहरा खूप भेसूर होता. तिने त्याच्या नजरेत नजर धरली. ती नजर खूप जहरी होती. तिच्या अशा अवताराने सूरजला घाम फुटलेला असतांना रागिणीच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद जाणवत होता...
***
अमितजी राजेशला सोबत घेऊन स्टेजजवळ असलेल्या हॉलीवूड अभिनेत्यांच्या व्हॅनीटी व्हॅन मधे घेऊन गेले.

फ्रांको बोनुकीशी राजेशची लेखक म्हणून ओळख करून दिल्यानंतर ते एका लेडीच्या येण्याची वाट बघू लागले कारण या हॉलीवूड चित्रपटाच्या भारतातील विभागाची ती प्रमुख होती.

कोणत्या कामाकरता कुणाकुणाला निवडायचे, कुणाला नाही हे ठरवण्याचे अधिकार तिला होते.

थोड्याच वेळात ती व्हॅनमध्ये आली.

"राजेश, प्लीज मीट मिसेस प्रीसिला बोनुकी! प्रोजेक्ट हेड!"

तिच्याकडे बघताच राजेशच्या अंगात अचानक वीज चमकल्यासारखे झाले. ही नक्की सुप्रिया आहे, मी चुकणार नाही ओळखतांना तिला!! क्षणभर तो अवाक होऊन बघत राहिला. सुप्रिया उर्फ प्रिसिलाच्या डोळ्यात राजेशबद्दल स्पष्टपणे द्वेष जाणवत होता. अर्थात त्यांच्या या क्षणभराच्या नजरकैदेबद्दल अमितजी आणि फ्रँको याला शंका यायला काही कारण नव्हते, कारण त्यांना काहीही माहिती नव्हते! तिच्या डोळ्यातील अंगार बघून आणि तिची एकूण नजर पाहून राजेश तेथेच गर्भगळीत झाला...

त्याला आठवले, ब्रेकपच्या वेळेस सुप्रिया म्हणाली होती:

“पण, हे बघ राजेश. आपण एकाच क्षेत्रात आहोत. कामानिमित्त आपली भेट होतच राहाणार. सो लेट्स बी प्रोफेशनल! आपल्या वैयक्तिक गोष्टी कामाच्या आड येऊ द्यायच्या नाहीत. नाहीतर त्यामुळे दोघांचेही नुकसान होईल!”

आणि तिचा हा नियम पहिल्यांदा तिनेच मोडला होता, सिरीयल सोडून देऊन आणि राजेश पासून दूर निघून जाऊन! पण आता त्याने पाहिलेली सुप्रिया काहीतरी वेगळीच होती!!! मध्यंतरी एका स्थानिक वर्तमानपत्रात सुप्रियाच्या नवऱ्याच्या मृत्यूबद्दल त्याने छोटीशी बातमी वाचली होती. हिचे नाव प्रीसिला बोनुकी म्हणजे इटालियन माणसाशी हिने लग्न केले? आणि तेही फ्रांको बोनुकी याचेशी?

अमितजीच्या विनंतीला फ्रँकोने तर लगेच होकार दिला पण प्रिसिला म्हणाली, "मी दोन दिवसात निर्णय कळवते!" तिचा इंग्लिशचा उच्चार पण थोडा थोडा भारतीयच वाटत होता, म्हणजे ही नक्की सुप्रिया आहे, यात वादच नाही! मात्र तिच्या वेशभूषेत आणि केशभूषेत अमुलाग्र बदल झालेला दिसत होता. इतका बदल की जवळचे नातेवाईक किंवा मित्र मैत्रिणी वगळले तर तिला कुणीही युरोपियन समजणार हे नक्की!

उद्यापासून हॉलीवूडच्या त्या भव्य चित्रपटासाठी मॅडम अकादमी मध्ये ऑडिशन सुरू होणार होते आणि त्याची सुध्दा प्रमुख सुप्रियाच होती. असे कसे घडले? नियतीचा हा कसला डाव? राजेश भीतीयुक्त विचारात पडला.

जुजबी बोलून आणि चेहऱ्यावरील अस्वस्थता लपवत अमिताजींसोबत शक्य तितक्या लवकर व्हॅनीटी व्हॅन मधून राजेश बाहेर पडला. तो बाहेर पडेपर्यंत आणि पूर्ण परत जाईपर्यंत प्रिसिला त्याचेकडे एकटक नजरेने बघतच राहिली होती. तिच्या डोळ्यात एक प्रकारचा अंगार दिसत होता. कसलीतरी गरम ठिणगी दिसत होती.

राजेश परत येऊन नंतर सुनंदाच्या बाजूला येऊन बसला आणि कार्यक्रम पाहू लागला.

काही वेळानंतर कार्यक्रम संपला. सगळे अवार्ड देऊन झाले होते. आयोजक आता पटापट आवरा आवर करुन जाण्याची तयारी करत होते. प्रेक्षक उठून निघून गेले. मात्र शेवटच्या रांगेत प्रेक्षकांत एकजण निश्चल बसूनच आहे असे हिरो उमंग कुमारच्या लक्षात आले. त्या व्यक्तीच्या पेहरावावरून दुरूनच त्याने ओळखले की तो सूरज असावा!

उमंग कुमार त्याचेकडे पोहोचत होता तरीही सूरज खुर्चीवरून अद्याप उठला नव्हता आणि अगदी हालचाल न करता निश्चल पडून होता त्यामुळे उमंग कुमारला कसलीतरी अभद्र शंका आली. त्याला उठवायला म्हणून उमंग कुमार त्याच्या खुर्चीजवळ गेला तेव्हा अवार्ड पायाजवळ खाली पडून त्याचे दोन तुकडे झालेले त्याला दिसले. उमंगला आश्चर्य वाटले!

"ज्या धातूचा हा अवार्ड बनवला आहे तो धातू, अवार्ड नुसता खाली पडल्यावर फुटला कसा? कमाल आहे!"

असे म्हणून त्याने सूरजला हात लावून उठवण्याचा प्रयत्न केला पण त्याच्या हाताच्या थोड्याशा धक्क्याने सूरज खुर्ची वरून खाली कोसळला...
ही बातमी कळताच घरी जायला निघालेले अनेकजण परत आले. दिनकर सिंग आणि त्यांची पत्नी यांना हे ऐकून शॉक बसला . ते पळत पळतच तेथे आले. सूरजचा असा अंत झालेला पाहून त्या दोघांना अपार दु:ख झाले. रिताशाला सुद्धा रडू येत होते.

नंतरच्या डॉक्टर आणि पोलिस यांच्या एकूण तपासानंतर सूरज हार्ट अटॅकने मेल्याचे सिद्ध झाले. काहीतरी अनपेक्षित बघून मनावर अचानक सहन न करण्याजोगे प्रचंड दडपण आल्याने मृत्यू झाला असे डॉक्टर म्हणाले. बऱ्याच जणांना वाटले की अवार्ड मिळण्याच्या आनंदामुळे असे झाले तर काहींना एका वाईट माणसाचा अंत झाल्याने आनंद वाटला.

काही दिवसानंतर कातील खान काही काळाकरता तडाफडकी परदेशात निघून गेला त्यामुळे माया माथूरला आनंद झाला. तसेच अवार्डच्या रात्री आरशात तिला मिळालेला मेसेज शेवटी खरा ठरला आणि मायाची धारणा पक्की झाली की सूरजच्या मृत्यूसंदर्भात नक्की मेलेल्या रागीणीच्या आत्म्याचा संबंध असावा!

प्रकरण 51

काही महिन्यानंतर -

शहरापासून दूर समुद्रकिनारी राजेशने एक बंगला विकत घेतला जेथे वीकेंडला किंवा कामापासून सुटी घेतल्यानंतर येता येईल आणि फॅमिली सह राहता येईल. तसेच निसर्गाच्या सानिध्यात, पक्ष्यांची किलबिल चालू असताना आणि समोर समुद्राचे पाणी असतांना लिखाण करायचे राजेशचे खूप वर्षांपासूनच मनात होते ते आता प्रत्यक्षात अवतरत होते. अधून मधून समुद्रकिनारी येऊन त्याने अनेक कथा लिहिल्या होत्या. अशा नैसर्गिक वातावरणात त्याची प्रतिभाशक्ती आणि कल्पनाशक्ती उफाळून यायची आणि कीबोर्ड द्वारे कॉम्प्युटर मधल्या कागदावर धडाधड उतरायची. त्याचा अगोदरचा फ्लॅट शहरात होताच.

आठ दिवस सुट्टी घेऊन तो येथे आला होता. हा बंगला नुकताच विकत घेतलेला होता. अर्धे पैसे आधीच दिले होते आणि अर्ध्या पैशांचे कर्ज काढले होते. एक दोनदा सुनंदा आणि अक्षर तेथे येऊन गेले होते पण तो बंगला पूर्णपणे राहण्यायोग्य बनला नव्हता. त्यासाठीच राजेश आठ दिवस येथे आलेला होता. एकटा. सुनंदा आणि अक्षर जवळ फ्लॅट मध्ये त्याची आई आलेली होती, काही दिवसांसाठी!

या आठ दिवसात बंगल्यातील फर्निचर तसेच समोरची छोटीशी बाग आणि इतर काही गोष्टी त्याला मार्गी लावायच्या होत्या आणि त्याचबरोबर थोडेसे लिखाणही करायचे होते.

आजूबाजूला दूर दूर अंतरावर छोटे छोटे बंगले होते पण त्यापैकी एखाद दुसऱ्याच बंगल्यात फक्त एक दोन माणसे दिसायची. इतर बंगले बंद राहायचे किंवा कुणीतरी एकटा दुकटा गडी दिवसभर देखभाल करायला तेथे थांबायचा. छोटे बंगले आणि काही मानवी वस्ती आणि तुरळक शेती, दुकाने, छोटी मोठी सरकारी कार्यालये आणि शाळा असे मिळून ते एक छोटेसे गांव होते.

आज सकाळपासूनच तेथे सुतारकाम करणारे, प्लंबर तसेच साफ सफाई करणारे कामगार आलेले होते. राजेशच्या मुंबईतील फ्लॅटमध्ये गेल्या एक महिन्यापासून घरकाम आणि स्वयंपाक करायला कायम गावाकडून आणलेला एक विश्वासू माणूस "गौरव देव" हा राजेश सोबत बंगल्यात आलेला होता आणि एकूणच इथल्या सगळ्या कामांवर देखरेख ठेवणार होता.

फर्निचरचे काम सुरू झाले.

"गौरव दा, मी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांवर देखरेख करा. कामे करवून घ्या. मी तश्या त्यांना तुमच्यासमोर सूचना दिल्या आहेतच, पण तरीही आता तुम्ही जातीने त्यांचेकडून कामे करवून घ्या. मी आता घराजवळच्या बागेत गवतावर बसून लॅपटॉपवर थोडे लिहायला बसतो आहे. काही लागलं तर सांगा मला!"

"हा राज साहेब. नक्की. तुम्ही काय बी काळजी नगा करू. म्या पाहतो सगळं. तुम्ही तुमचं लिव्हा!"

"बरं, गौरव दा आणखी एक करा. दहा मिनिटांत माझ्यासाठी गरमागरम डार्क कॉफी घेऊन या!"

कॉफी पिल्यानंतर राजेश लिहायला बसला. बराच वेळ तो लिहित होता. कामं पटापट आणि व्यवस्थित होत होती. घरातील खिडकीत ठोकठाक चा आवाज येत होता.

खिडकीत उभा राहून इलेक्ट्रिक करवतीने काम करणारा एक कामगार बराच वेळ बागेत बसलेल्या राजेश कडे एकटक बघत होता.

"ए, गड्या, काय बघतूया समोर? काम कर की आपलं!"

"आरं, मी ईचार करतूया की आपलं साह्यब एवढं काय लिवत्यात त्या ल्यापताप वर? नुसती खट खट खट बटण दाबत असत्यात. बोटं लई झर झर चालत्यात त्यांची न्हाई!"

"चालत्यात! आता तू बी आपली बोटं चालव. लेखक आहेत ते साह्येब. लै लोक वाचतात त्यासनी लीवलेलं!"

नंतर तो करवतवाला राजेश साह्यबाकडं एकटक पहात लाकडे कापत राहिला...

"काय गप्पा मारता रे! पटापट उरका तुमची कामं, टाईम पास नगा करू!" असे म्हणत गौरव देव तेथे आला आणि दोघांना तंबी देऊन गेला.

संध्याकाळी बरेच कामगार निघून गेले. रात्री आठ पर्यंत दोन जण होते ते सुध्दा नंतर निघून गेले.

"गौरव दा, माझ्यासाठी गरम फुलके आणि फोडणीचे वरण करा. आणि हो, थोडा भात पण टाका गरमागरम!"

"होय राज साहेब!"

मग राजेशने घरातल्या टेबलावर ठेवलेली त्याची लाल रंगाच्या कव्हरची फाईल उचलली. त्यात त्याची जुनी कादंबरी होती. ती कादंबरी पुढच्या वर्षीच्या दिवाळी अंकात छापण्याची तयारी दहा आघाडीच्या दिवाळी अंकांनी तयारी दर्शवली होती. दहा दिवाळी अंकांत एकच कादंबरी छापली जाण्याची ही पहिलीच वेळ असणार होती. त्या कादंबरीला स्वतः अमितजी प्रस्तावना लिहिणार होते.

फिल्मी क्षेत्रावर आधारित कादंबरी राजेशने आधीच लिहायला सुरू केली होती. हा चित्रपट राजेश मराठीत बनवणार होता आणि स्वतः प्रोड्युस करणार होता आणि समिरण डायरेक्ट करणार होता! तसेच समिरण आणि राजेशने मिळून अनेक मराठी चित्रपट निर्मिती करायचे ठरवले होते. मराठी चित्रपटांना आंतरराष्ट्रीय गोल्डन डॉल पुरस्कार मिळवून द्यायचा हेच एकमेव लक्ष्य दोघांनी ठेवले होते. फक्त एकदाच नाही तर पुन्हा पुन्हा! मराठी साहित्यिक आणि चित्रपट टिव्ही क्षेत्रात लिखाण करण्याची इच्छा असलेल्या नवोदित लेखकांना सर्वतोपरी मदत करायचे हे त्याने ठरवून टाकले होते. तसेच दरवर्षी दिवाळी अंकासाठी तो खास एक कादंबरी लिहून देणार होता, एक कृतज्ञता म्हणून!

बॉलीवूड मध्ये तर तो स्थिरावला होताच पण हॉलीवूडच्या टीम सोबत काम करून त्याचा अनुभव घेऊन ते सगळे तंत्र मराठीत वापरायचे हा त्याचा उद्देश होता. मात्र काही महिने उलटल्यानंतरही अजून प्रिसीला कडून हॉलीवूड चित्रपटात राजेशच्या लेखनासाठी होकार आलेला नव्हता. मागील महिन्यापासून प्रिसीला आणि इतर हॉलीवूड टीम "ग्रँड पर्पल" या सेव्हन स्टार हॉटेलमध्ये उतरली होती.

"एकदा मला प्रीसिला म्हणजे सुप्रियाला एकांतात भेटायला बोलवलं पाहिजे म्हणजे तिच्या मनात नेमके काय आहे ते कळेल!" असा विचार राजेश करत होता. पण पुन्हा वैवाहिक जीवनात यामुळे वादळ तर निर्माण होणार नाही ना? तो द्विधा मनस्थितीत सापडला. हॉलीवूडसाठी मिळालेली आयती लेखनाची संधी त्याला कोणत्याही परिस्थितीत सोडायची नव्हती.

राजेशने अभिजितसाठी लिहिलेल्या स्क्रिप्टवर चित्रपट शूट करून झाला होता फक्त रिलीज व्हायचा बाकी होता.

मागील काही महिन्यांत राजेशने ऐकले होते की सूरजच्या मृत्यूनंतर त्याची फूड चेन आणि त्याच्या फ्लॅटची जप्ती करण्यात आली कारण त्याचे आंतरराष्ट्रीय ड्रग माफिया आणि टोळीशी संबंध असल्याचे पुरावे पोलिसांना आढळले आणि रागिणीच्या आत्महत्येची फाईल पुन्हा उघडली गेली. पोलिस तपास जोरात सुरू होता. सध्या पत्रकारिता थोडी कमी केली असली तरी त्याची टीम त्याला सगळ्या खबरी देत होतीच.

त्याच्या टीमकडून त्याला आणखी एक गोष्ट कळली होती ती म्हणजे वीणा वाटवे आणि पिके यांच्यात अलीकडे भांडणे वाढली होती. त्यांचा ब्रेकअप होऊ नये यासाठी हर तऱ्हेचे प्रयत्न सारंग करत होता. त्यांच्या भांडणाचे कारण आणि मूळ हे केके विरूध्द राजेशने आणि एकूण टीमने चालवलेल्या एकूण अभियानात होते.

तसेच सोनी बनकरच्या मुंबईतून अचानक गायब होण्यामागचे गूढ अजून उलगडले नव्हते. राजेश आणि त्याची पत्रकार टीम शोधून थकली पण सोनीचा ठावठीकाणा लागला नाही.

तिने पाण्यात उडी मारल्याचे कुणालाही माहिती नव्हते कारण तिचे प्रेत अजूनही कुणालाच सापडले नव्हते म्हणून गायब झालेले किंवा हरवलेले व्यक्ती यांच्या लिस्टमध्ये तिचे नाव पोलिस स्टेशन मध्ये लिहिलेले होते.

घरी अक्षर हळूहळू मोठा होत चालला होता. कधी कधी तो हवी ती वस्तू मिळवण्यासाठी खोटे खोटे रडण्याची अशी काही अॅक्टिंग करायचा की राजेशला वाटायचे की याचे नांव अक्षर न ठेवता अभिनय ठेवायला हवे होते.

"साहेब, हे घ्या, गरम फुलके आणि वरण. मग भात सुध्दा आणतो!"

गौरव देवच्या या वाक्याने विचार करता करता राजेश भानावर आला. त्याने गरमागरम जेवण करून घेतले. मग सुनंदा आणि आई तसेच अक्षर याचेशी तो फोनवर बोलला.

रात्री -

"साहेब, मी निघतो आता. परवा दुपारी येतो. माझ्या काकांकडे जाऊन येतो. त्यांनी बोलवलं आहे कधीचं! त्यांना थोडं महत्वाचं काम आहे."

"ठीक आहे, गौरव दा. हरकत नाही. या तुम्ही! आता उद्या मला सगळं बघावं लागणार पण हरकत नाही, एकाच दिवसाची तर गोष्ट आहे. मी करून घेऊन अॅडजस्ट!"

गौरव देव निघून गेला.

रात्री राजेशने बरेच लिखाण केले. रोज तो दिवसभरात लिहिलेले सगळे लिखाण ऑनलाइन गुगल ड्राईव्हवर सेव्ह करून ठेवायचा. आज मात्र त्याला कंटाळा आला आणि झोप पण खूप येत होती. लॅपटॉप बंद करून तो जवळच्या बेडवर गेला आणि झोपेच्या अधीन झाला.

&&&&

प्रकरण 52

"मुंबईतच काय, मी म्हणतो पूर्ण आशिया खंडात कुठेही अशा प्रकारचे लेखकांसाठी असलेले थीम पार्क नसावे!" श्री. वामनराव विभुते म्हणाले.

"खरे आहे तुम्ही म्हणता ते! मुंबईतील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या थीम पार्क मध्ये बसून महिन्याची फक्त माफक नाममात्र फी भरून कुणीही नवोदित लेखक अगदी शांततेत लिखाण करू शकतो. काहींना लिहिण्यासाठी लॅपटॉप सुध्दा मोफत उपलब्ध करून दिले जाईल किंवा ज्यांना कागदावर लिहायचे आहे त्यांना वह्या पेन दिले जातील. विशेषत: फिल्म क्षेत्रात लिहिणाऱ्या लेखकांना प्राधान्य दिले जाईल!" राजेश म्हणाला.

"वा! कल्पना आवडली तुमची. काही आणखी मदत लागली तर सांगा मला!" विभुते.

राजेश पुढे म्हणाला, "धन्यवाद सर! शेजारच्या या दोन मजली बिल्डिंगमध्ये मुंबई बाहेरच्या नवोदित लेखकांना माफक पैशांत राहण्याची आणि खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात आली आहे! वरच्या मजल्यावर एक मोफत लायब्ररी आहे! आणि फक्त लेखकच नाही तर ज्यांना शांततेत वाचन करायचे आहे अशा पुस्तक प्रेमी मंडळींसाठी सुद्धा हे थीम पार्क एक पर्वणी आहे."

त्या थीम पार्क मध्ये छोटेसे तळे, छोटी हॉटेल्स, हिरवेगार गवत, हिरवीगार झाडे, फुलझाडे लावलेली होती. तसेच काही ठिकाणी झाडाऐवजी खोडाच्या आकाराएवढ्या उभ्या पेन्सिल्स आणि त्यांच्या अणीच्या टोकांवर फांद्या उगवून पसरलेल्या होत्या पण फांद्यांवर पाने फळे यांच्या ऐवजी कॉम्प्युटरच्या कीबोर्डच्या किज (कीबोर्डची बटणे) जोडलेली होती आणि पारंब्यांच्या ऐवजी फिल्म स्ट्रीपस लटकावलेली होती. ही अशी पेन्सिल झाडे एकत्र ओळीने लावली होती. झाडांच्या बाजूला अनेक खोडरबर ओळीने पेरून त्यांना जाळीने बांधून त्याचे कुंपण केले होते. तसेच रस्त्याने अनेक बाके ठेवलेली होती. खाली हिरवळीवर बसण्याची व्यवस्था होती.

हे बघून विभुते म्हणाले, "राजेश, तुमच्या कल्पनाशक्तीला मनापासून दाद द्यावीशी वाटते!"

"धन्यवाद!" राजेश म्हणाला.

अचानक तेथे अंधार झाल्याचे राजेशला दिसले. विभुते कुठे दिसत नव्हते. आता त्या थीम पार्कमध्ये विभुतेच काय तर इतर दुसरे कुणी चिटपाखरूसुध्दा नव्हते! पक्ष्यांची किलबिल अचानक थांबली. पानांची सळसळ बंद झाली. कुठे गेले सगळे? असा विचार करून राजेश त्याच्या जवळ असलेल्या मोबाईलच्या टॉर्चच्या उजेडात पुढे पुढे सरकू लागला. वर आकाशात चंद्र सुध्दा नव्हता!

दूरच्या एका पेन्सिल झाडाजवळ ठक ठक असा आवाज येत होता. कुणीतरी पाठमोरा माणूस पेंसिलीच्या झाडावर कुऱ्हाडीने घाव घालत होता. राजेशला ते सहन झाले नाही. तो टॉर्चच्या उजेडात त्या माणसाजवळ जाऊ लागला. खाली कीबोर्डचे बटणं इकडे तिकडे विखुरलेले होते.

"ए! कोण आहेस तू?" राजेशने त्याच्या जवळ जात दरडावून विचारले.

तो अद्याप पाठमोराच होता. कुऱ्हाडीचा घाव घालणे त्याने चालूच ठेवले. त्या घावांमुळे पटापट कीबोर्डचे बटन खाली पडत होते. त्या फिल्म स्ट्रीप खाली कोसळत होत्या.

"मी तुला विचारतोय माणसा! कोण आहेस तू? काय करतोयस येथे? कुणाच्या परवानगीने अलास? ही झाडे का तोडतोयस?" राजेश एकामागून एक प्रश्नांची सरबत्ती सुरू केली.

तो माणूस घाव घालायचे थांबवून हसायला लागला. अजून पाठमोरा होता तो!

"मी कोण? हा हा हा हा! मी आहे विमा! विचारांचा मारेकरी!" अजूनही तो पाठमोरा होता.

"विचारांचा मारेकरी? म्हणजे नेमका कोण आहेस तू?"

"एखादा विचार आवडला नाही तर मी त्या विचारांना नष्ट करतो आणि ते विचार निर्माण करणाऱ्या लोकांना सुध्दा!" असे म्हणून त्याने आपली मान 360 डिग्री कोनातून स्वतःच्या पाठीमागे म्हणजे समोर राजेशकडे फिरवली आणि जबरदस्त घाम येऊन राजेश स्वप्नातून जागा झाला..

"बापरे! काय भयंकर स्वप्न!" असे म्हणून बघतो तो काय पूर्ण बंगल्यातील लाईट गेलेले होते. त्याने मोबाईलची बॅटरी लावली आणि तो पाण्याचा ग्लास शोधू लागला. रात्रीचे दोन वाजले होते.

पाण्याचा ग्लास शोधत असताना त्याला त्याचा लॅपटॉप चालू असलेला दिसला पण तो टेबलापासून थोड्या वर उंचीवर होता. पाणी प्यायचे सोडून तो टेबलजवळ गेला तर त्याला एक काळा कोट घातलेला माणूस दिसला ज्याचा चेहरा कोटाच्या टोपीमुळे डोळ्यापर्यंत झाकलेला होता! आणि अंधार सुध्दा असल्याने चेहरा नीट दिसत नव्हता.

त्या माणसाने राजेशचा लॅपटॉप एका हातात धरला होता आणि दुसऱ्या हातात लाकडे कापायची करवत होती. लॅपटॉपला चार्जिंगची वायर तशीच जोडलेली होती.

स्वप्न आठवून राजेशला अजून जास्त भीती वाटली.

"क क कोण आहेस तू?" राजेशने गर्भगळीत होऊन विचारले आणि त्या माणसाकडे जाऊ लागला.

"मी कोण? हा हा हा हा!" असे म्हणून त्याने राजेशच्या लॅपटॉपला हवेत जोराने छताकडे भिरकावले. जोराच्या झटक्याने प्लग सॉकेट मधून निघाला आणि लॅपटॉप छताला वेगाने आपटून फुटला आणि सीलिंग फॅन वर जाऊन अर्धा उलटा हवेत लटकला. वायर एका पात्यात आणि लॅपटॉप एका पात्यामध्ये अडकून हवेत लटकू लागला.

अचानक झालेल्या या विचित्र घटनेने राजेश घाबरला. त्या माणसाने वेगाने राजेशच्या हाताला झटका दिला आणि राजेशच्या हातातला मोबाईल खाली पडला. मग बुटाने तो मोबाईल त्याने तोडला आणि तो माणूस आता ती इलेक्ट्रिक करवत (पण लाईट नसल्याने बंद असलेली) दोन्ही हातात घेऊन राजेशकडे येऊ लागला. राजेश मागे सरकला आणि त्याचा धक्का लागून लटकणारा लॅपटॉप खाली पडून आणखी फुटला आणि राजेश बेडवर पडला. त्या माणसाने वेगाने बेडवर मुसंडी मारली आणि राजेशचा उजवा हात एका हाताने दाबून धरला आणि त्याच्या हाताची बोटे करवतीने कापायला सुरुवात केली. अंगठा जवळपास अर्धा कापला गेल्याने वेदनेने राजेश ओरडला आणि त्याने त्या माणसाच्या पोटात जोराची लाथ हाणली.

तो माणूस भेलकांडून दूर झाला तोपर्यंत राजेश बेडवरून उठला. राजेशने पाण्याचा काचेचा जग उचलला आणि त्या माणसाच्या डोक्यावर भिरकावला. तो त्याच्या टाळक्यावर आदळला आणि थोडेसे रक्त आले आणि खाली पडून काचेचे तुकडे झाले. त्यामुळे तो बावचळला आणि खवळला.

त्याने खालचा लॅपटॉप उचलला आणि राजेशच्या डोक्यावर नेम धरून फेकला पण राजेश बाजूला झाला आणि लॅपटॉप खाली पडला. पण राजेशच्या पायात त्या फुटलेल्या काचेचे तुकडे गेले आणि तो विव्हळू लागला. मात्र त्या माणसाच्या पायात बूट असल्याने त्या काचेच्या तुकड्यांवरून तो पुढे राजेश कडे येऊ लागला.

त्याने राजेशचा उजवा हात एका हाताने पुन्हा दाबून धरला आणि त्याच्या हाताची बोटे करवतीने कापायला सुरुवात केली. अंगठ्या जवळची बोटे कापली जाऊ लागली. राजेश वेदनेने ओरडू लागला आणि डाव्या हाताने राजेशने त्याच्या गळ्याला नख लावून कुरताडले. त्या माणसाच्या नरड्यातून रक्त वाहू लागले तसा तो बिथरला आणि करवत फेकून देऊन त्याने राजेशच्या कानाफडात दोन थपडा लगावल्या आणि राजेशला तो एका पाठोपाठ एक तोंडावर बुक्के मारत राहिला आणि म्हणाला, "साल्या, तुझी दहा पैकी दहा बोटे तोडल्याशिवाय मी राहणार नाही!"

मग दोघेही एकमेकांना भिडले. जवळपास कुस्ती खेळतात तसे ते एकमेकांना उचलून हवेत फेकू लागले. तो माणूस करवत पडली होती तिथे जायला निघाला तर जमिनीवर पडलेल्या राजेशने दुखणाऱ्या हातानेच त्याचे पाय जोराने ओढले आणि तो माणूस तोंडावर आपटला. मग तितक्याच त्वेषाने तो उठला आणि त्याने राजेशच्या छातीवर बुटाची लाथ मारली आणि पुन्हा पुन्हा मारू लागला. राजेशने त्याला जोराने ढकलले. तो पडला!!

बराच वेळ त्या अंधाऱ्या एकाकी बंगल्यात हे द्वंद्व सुरू होते. मग काही वेळाने त्या बंगल्यातून एक जोराची किंकाळी ऐकू आली...!!

(समाप्त)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

धन्यवाद पलक. वाचून झाल्यावर प्रतिक्रिया जरूर द्या.
संपूर्ण कादंबरी पुस्तक रुपात ईसहित्य वर उपलब्ध आहे:
http://www.esahity.com/uploads/5/0/1/2/501218/valay_nimish_sonar.pdf

निमिष, प्रथम कादंबरी लेखनाबद्दल अभिनंदन!!

कादंबरी पूर्ण वाचली. बॉलिवूडची बरीचशी पात्रे ओळखीची वाटतात. मांडणी छान Happy
काही पात्रे अर्धवट वळणावर सोडून दिलेली वाटतात. उदा. सुप्रिया...तिचा प्रवास अंधारातच रहातो.
शेवट तितकासा लक्षात आला नाही.
ह्या गोष्टी असल्या तरी कादंबरी पकड घेते हे खरे! अभिनंदन!!

धन्यवाद विनिता!

शेवटाबद्दल: राजेशची बोटे तोडून त्याला लिखाणापासून परावृत्त करायला कुणीतरी त्याचेवर हल्ला करतं!
शेवटी ऐकू आलेली किंकाळी कुणाची आहे? राजेशची की त्या मारेकऱ्याची? राजेश मरतो की त्याच्यावर हल्ला करणारा मारेकरी?
म्हणजे राजेश हा "विचारांच्या मारेकरी" असलेल्या समाजातील काही अपप्रवृत्तीला बळी पडला की विचारांचे मारेकरी मेले हे मी वाचकांवर सोपवले आहे..
सुप्रियाचा फ्रांकोसोबत लग्न करेपर्यंतचा प्रवास आणि ती राजेशला हॉलीवूड चित्रपटाच्या लेखनासाठी घेईल की नाही? त्याला माफ करेल की त्याला बरबाद करून सोडेल? यासारखे प्रश्न आणि त्यांची उत्तरे मी मुद्दाम अनुत्तरीत ठेवले आहेत, कदाचित वलय च्या दुसऱ्या भागासाठी! पण अजून ते निश्चित नाही!
तसेच राजेशवर हल्ला करणारा हल्लेखोर हा एक प्रकारे आज काल लेखकांवर आणि त्यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर होणाऱ्या हल्ल्याचा प्रतीकात्मक प्रतिनिधी आहे.

विचारांचे मारेकरी मेले हे मी वाचकांवर सोपवले आहे..>>> नको तुम्हीच पूर्ण लिहा अजुन पाहीजे तर भाग येउद्या .
बाकी कादंबरी खुप आवडली.

वाचली पूर्ण

पण अर्धवट वाटली

शेवट तर कैच्या काय

नाही आवडला

टुकार कथा व सुमार लेखन. आता दुसरा भाग लिहून स्वतःचा व वाचकांचा बहुमूल्य वेळ घालवू नका. शेवट सुचला नाही म्हणून काहीही लिहिता आणि दुसरा भाग येणार म्हणून जाहीर करता, काहीही!

@ राहुल सुहास सदाशिव:
प्रत्येक पात्राचा संघर्ष एका विशिष्ट टप्प्यावर नेऊन मी थांबवला आहे...
त्यामुळे शेवट सुचला नाही आणि म्हणून काहीही शेवट केला असे म्हणणे योग्य होणार नाही.

सर्वप्रथम स्पष्ट व परखडपणे मत मांडल्याबद्दल क्षमस्व!
कथा कुठे थांबवायची हे संपूर्णपणे लेखकाच्या हातात असले तरी त्याचा योग्य शेवट करून ती थांबवणे ईष्ट असते. तेव्हाच ती वाचकांना प्रभावित करते, दीर्घकाळ स्मरणात राहते. समजा एखादे नाटक/सिनेमा/मालिका ऐन रंगात आली आहे आणि मध्येच थांबवली, तर प्रेक्षकांना, वाचकांना किंवा चाहत्यांना मुळीच आवडणार नाही. मुळात तुमच्या मालिकेतील कुठलेही पात्र समाजकारणी वा राजकारणी नाहीत, मग विचारांचे मारेकरी कुठून आले? त्यासाठी काहीही लिहून त्याचे समर्थन करू नका. हवी तर कादंबरी अपूर्ण ठेवून पुढचे भाग लिहायला घ्या. अनेक गाजलेल्या नाटक/सिनेमा/मालिका/कथा ह्यांचे एका विशिष्ट ठिकाणी थांबवून, अर्थपूर्ण शेवट करून प्रवास थांबवला आहे. त्यानंतरच त्यांचे पुढचे भाग आले आणि गाजले. उदा. वाडा चीरेबंदी/मग्न तळ्याकाठी नाटक, मुंबई-पुणे-मुंबई भाग १ व २ व असे अनेक चित्रपट, दिल दोस्ती दुनियादारी/दिल दोस्ती दोबारा मालिका, हॅरी पाॅटर कादंबरी इत्यादी. रामचंद्र सडेकरांच्या बऱ्याचश्या कादंबर्या वलय सारख्या आहेत, त्या वाचा.

@ VB: शेवटी वाचकांनी विचार करायचा आहे, की विचारांचे मारेकरी जिंकतात कि लेखक? >>>

मी हि कादंबरी एकसंध वाचली आहे, पण प्रामाणिक पणे सांगायचे तर बिल्कुल नाही आवडली
अर्धवट तर वाटत आहे पण विस्कळीत सुद्धा वाटली.
आणि शेवट तर काहीच्या काय आहे,

माझा वेळ वाया गेला असे वाटले, तुमचे इतर लेखन वाचायची यापुढे इच्छाच नाही. पण इकडे सुद्धा का, का वाचले मी हे असे वाटते.

अर्थात, हे मा वै म

मला आवडली. तुमची pdf देखील मी डाउनलोड केली आहे.
पुढील लेखनास शुभेच्छा..
आणखी कथा/कादंबऱ्या वाचायला आवडतील.

ओ निमिष सोनार! किती आवडत होती ही कादंबरी मला, पण कसला भंकस शेवट केलात! फारच अपेक्षाभंग झाला आहे माझा. Alternate ending करा बरं! अजून किमान 4 मोठे भाग टाका! न्याय द्या इतक्या चांगल्या कथेला. शेवटी पार जॉनरच बदलून टाकलात तुम्ही! बोअर झालात की काय लिहिता लिहिता?

प्रचंड बोरिंग, शेवटीतरी काहीतरी होईल अस वाटलं, आणि कपाळावर हात मारला.
बादवे, हा लेखकाचा आवडता प्रकार असावा का, की मी काहीतरी जबरदस्त लिहिणार आहे याची आवई उठवायची आणि मग डोंगर पोखरून उंदीर काढायचा.