पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त – ८. खूबसूरत (1980)

Submitted by स्वप्ना_राज on 15 February, 2018 - 07:57

तुमच्यापैकी किती जणांनी 'सुन सुन सुन दीदी, तेरे लिये एक रिश्ता आया है' हे गाणं ऐकलंय किंवा पाहिलंय? हात वर करा बघू. सगळ्यांनीच ऐकलंय? सही आहे! आता ज्यांनी 'खूबसूरत' पाहिलाय फक्त त्यांनीच हात वर ठेवा हं. ओक्के! एव्हढेच जण? हरकत नाही. मी पण कालपर्यंत पाहिला नव्हता. पण त्याचं काय आहे की नव्या वर्षात आवर्जून जुने चित्रपट पाहायचे असं ठरवलं आणि अजूनपर्यंत तरी तो पण टिकवलाय. मग काय ऐकणार का 'खूबसूरत' ची स्टोरी आज माझ्याकडून? अट एकच. स्टोरी आवडली तर चित्रपट नक्की बघायचा (आणि मला वि.पू. करायची!). काय म्हणता? आहे कबूल? लेट्स स्टार्ट.

चित्रपट सुरु होतो तेव्हा पाटी दिसते ती पूना सेन्ट्रल हॉस्पिटलची. अहो, हॉस्पिटल म्हटलं म्हणून घाबरून जाऊ नका असे. इथे आपला हिरो इंदर डॉक्टर आहे. इंटर्नशिप संपवून घरी चाललाय आज. आता रोज घरून हॉस्पिटलला यायला मिळणार आणि कँटीनच्या जेवणापासून सुट्टी मिळणार म्हणून खुश आहे स्वारी. आता बघू यात इंदरच्या घरी कोण कोण असतं ते. बाप रे! सुरज बरजात्याच्या चित्रपटातून असतं तसं मोठं संयुक्त कुटुंब आहे की. वडील द्वारकाप्रसाद बघावं तेव्हा बंगल्यातल्या बागेत खुडबुड करत बसलेले. आई निर्मलादेवी घरचं करून पुन्हा 'दुखीयारी महिला केंद्र' असं काहीतरी नाव असलेल्या संस्थेत कार्यरत. मोठा मुलगा सुंदर, त्याची बायको आणि मुलगी मुन्नी, त्यानंतरचा मुलगा चंदर - हा वकील आहे आणि त्याला 'यंदा कर्तव्य आहे'. त्यानंतरचा मुलगा इंदर म्हणजे आपला हिरो. आणि शेवटचा जगन. तसं तालेवार कुटुंब. पण निर्मलादेवीनी सगळ्यांना अगदी धाकात ठेवलंय. पूर्ण कुटुंब त्यांच्या शिस्तीच्या बडग्याखाली दबलेलं. अगदी सुरुवातीलाच सकाळच्या न्याहारीच्या वेळी त्या सगळ्यांना धारेवर धरताना दिसतात. जमिनीवर उठलेले चिखलाचे पाय बघून नवर्याला त्याचे चपलांसकट पाय त्यांच्यावर ठेवायला लावून ते त्याचेच आहेत हे त्या सिद्ध करतात. जगनवर आत बनियन का घातली नाहीस, केस का विंचरले नाहीस असा प्रश्नाचा भडिमार करतात. मोठ्याने ओरडून बोलायचं नाही, ८:३० च्या ठोक्याला नाश्त्याला हजर झालं नाही तर नाश्ता मिळणार नाही ह्या आणखी काही अटी. घरात कसं वागायचं ह्याचं काही मॅन्युअल आहे की काय अशी शंका यावी असलं शिस्तीचं घर.

ह्याउलट घर आहे अंजू-मंजूचं. वडील रामदयाल ह्यांनी बायकोचं निधन झाल्यावर दोन्ही मुलीना अगदी लाडाकोडात वाढवलेलं. पूर्ण घर, अगदी घरचा नोकर अशर्फीलाल सुध्दा, पद्यात बोलणारे. हं, पण खबरदार. ह्या शेरातला ‘काफिया' जमला नाही तर मात्र कोंबड्याचा आवाज काढून दाखवावा लागतो. मोठ्याने बोलणारं, पत्ते खेळणारं, खळखळून हसणारं आणि मोकळा श्वास घेणारं असं हे घर आहे.

द्वारकाप्रसादचा जिवलग मित्र उमाशंकर एक दिवस गप्पा मारायला त्यांच्याकडे येतो तेव्हा निर्मलादेवी चंदरसाठी योग्य मुलगी शोधायची विनंती त्यांना करतात. ते अंजूचं स्थळ सुचवतात. ‘नवर्यामुलाने मुलगी बघायला स्वत: जायचं नाही' ह्या निर्मलादेवींच्या शिरस्त्यानुसार इंदर, जगन, सुंदरची बायको आणि द्वारकाप्रसाद मुंबईला रामदयालच्या घरी जातात. अंजू पसंत पडते आणि लग्न होतं. लाडकी अंजू सासरी गेल्यावर इथे तिच्या माहेरी कोणालाच करमत नाही. विशेषत: धाकटी बहिण मंजू तर तिची फारच आठवण काढते. म्हणून मग वडील तिला काही दिवस अंजूकडे जाऊन यायचा सल्ला देतात. कोणालाही न कळवता मंजू एकदम तिच्या सासरी येऊन धडकते. आता एव्हढ्या शिस्तीच्या घरात ही अवखळ मुलगी आल्यावर गोंधळ उडणारच ना. त्यातून मंजू आणि इंदर दोघांची 'नोंकझोंक' अंजूच्या लग्नात झालेलीच असते. मंजू आल्यावर दोघं एकमेकांवर आणखी कुरघोडी करायचा यत्न करतात. पण ह्यात होतं काय की नकळत दोघे एकमेकांकडे आकर्षित होतात.

पण काही म्हणा......मंजूला हे शिस्तीच्या बडग्याखाली दबलेलं बहिणीचं सासर काही आवडत नाही. मग ती जगनला हाताशी धरून घरच्या एकेक सदस्याची आवड जाणून घ्यायला लागते. निर्मलादेवी संस्थेच्या मिटींग्जसाठी गेल्याची संधी साधून मग हे घर थोडंसं फुलायला लागतं. आणि तरी एक दिवस बेंड फुटतंच. घर अभंग राहावं, त्यातले लोक भरकटू नयेत म्हणून आपण लावलेली शिस्त घरच्या मंडळीना मात्र जाचक वाटते, पण हे आपल्याला सांगायची हिम्मत कोणी दाखवली नाही आणि बाहेरून आलेल्या मंजूला मात्र ते कळलं हे समजल्यावर निर्मलादेवी व्यथित होतात. ‘ज्याला जे पाहिजे ते तो आता करू शकतो. आपण काही बोलणार नाही' असा फतवा काढतात. घरच्यांना वाईट वाटतं. बिचारी मंजू तर फारच कानकोंडली होते. आता आपलं आणि इंदरचं लग्न होणं केवळ अशक्य आहे असंच तिला वाटतं.

पण नियतीच्या मनात काही वेगळंच असतं.....

बास, बास, बास. चित्रपट पाहिला नसेल तर ही तुमची लक्ष्मणरेषा बरं का. इथून पुढे एक अक्षरही वाचायचं नाही..........

हम्म. अजून वाचताय म्हणजे तुम्ही हा चित्रपट पाहिलेला असणार. मग सांगा बरं ह्यातली तुमची सगळ्यात आवडती व्यक्तिरेखा कुठली? अर्थात भानुरेखा. म्हणजे आपली रेखा हो. आजकाल टीव्ही गाईड मध्ये बर्याच चित्रपटात तिचं नाव 'भानुरेखा गणेशन' असंच येतं. तर अवखळ, अल्लड, चेष्टेखोर पण मनाने निर्मळ अश्या मंजूची भूमिका तिच्याशिवाय आणखी कोण करू शकलं असतं? पत्त्यांच्या डावातलं चीटिंग असो, हातावरून भविष्य सांगता येतं असं खोटं सांगून घरच्या लोकांच्या आवडी जाणून घेणं असो, इंदरला त्याच्याच आईकडून ओरडा खायला लावणं असो, आपण नकळत का होईना पण निर्मलादेवींना दुखावलंय हे लक्षात आल्यावर त्यांची माफी मागणं असो किंवा आधी घेऊन ठेवलेल्या व्हिजीटसना जायचंय म्हणून पेशंट सिरीयस असतानाही न ठरवलेल्या व्हिजीटला यायला नकार देणाऱ्या डॉक्टरला खडे बोल सुनावणं असो - रेखा 'एकदम छा गयेली है बाप'. इंदरवर नितांत प्रेम करत असूनही 'आईने लग्नाला परवानगी दिली नाही तर मी बदली करून घेईन. मग आपण लग्न करू' असं म्हणणाऱ्या इंदरला 'असं करून मी त्यांना अजून दुखवू शकत नाही' असं सांगण्याइतकी समज आणि हिम्मत तिच्यात आहे.

ह्यानंतरची आवडत्या व्यक्तिरेखेची पोझिशन मात्र टाय आहे - अशोक कुमार आणि दीना पाठक. घरात शांती राहावी म्हणून बायकोची शिस्त खपवून घेणारा, तिची नजर चुकवून कडक पथ्यातून काही सुटका मिळते का ते पाहणारा, मंजूवर मुलीसारखं प्रेम करणारा, तिची बाजू घेऊन बायकोशी भांडणारा द्वारकाप्रसाद आपल्याला सासरा म्हणून मिळावा असंच कुठल्याही सुनेला वाटेल अशी ही भूमिका दादामुनीनी रंगवली आहे. निर्मला देवीची भूमिका नाही म्हटलं तरी थोडी निगेटिव्ह. पण त्यांचा 'हम करे सो कायदा' हा बाणा, आपली शिस्त घरच्यांना शिक्षा वाटते हे कळल्यावरचं त्यांचं दुखावलं जाणं, मंजूला माफ न करण्याचा आडमुठेपणा आणि तिची कळकळ ध्यानी आल्यावर आपली चूक कबूल करण्याइतका असलेला मनाचा मोठेपणा दीना पाठकने इतका छान व्यक्त केलाय की शिस्तीचा अतिरेक होतोय हे मान्य करूनही शिस्तीने वागणाऱ्या ह्या बाईचं आपल्याला कौतुकच वाटतं. तिची बाजूसुध्दा कुठेतरी पटते. वाढलेल्या वयाचा, पिकल्या केसांचा वारंवार दाखला देत आपलं म्हणणं तरुण पिढीवर लादणं हा ह्या देशातल्या सिनियर सिटीझन्सचा आवडता उद्योग असताना 'इस लडकीने मुझे हरा दिया' अशी प्रांजळ कबुली देणारी ही सासू कुठल्या सुनेला नको असेल?

राकेश रोशन मला फारसा आवडत नाही. त्याच्या विगमुळे तर तो नेहमीच आहे त्यापेक्षा जास्त वयस्कर असल्याचा भास होतो. पण ह्या चित्रपटात तो इंदर म्हणून - रेखाच्या मानाने थोडा मोठा वाटत असला तरी - शोभलाय. शशिकलेला साध्या-सरळ, कुठलंही कटकारस्थान न करणाऱ्या मोठ्या वहिनीच्या भूमिकेत पहाणं मला जरा जड गेलं. सारखं ती मंजूविरुध्द सासूचे कान फुंकते का काय अशी भीती वाटत होती Happy डेव्हिड (रामदयाळ), केश्तो मुकर्जी (नोकर अशर्फीलाल), ओम शिवपुरी (डॉक्टर) आणि रणजीत चौधरी (जगन) ह्यांनी अन्य भूमिका साकारल्या आहेत. इतकंच काय तर सुंदर-चंदर ऑफिसमध्ये ब्रिज खेळत असतानाच्या सीनमध्ये सिनेमाटोग्राफर जयवंत पाठारेही दिसतात.

गाण्यांपैकी 'सुन सुन सुन दीदी' आवडीचं. शोलेत अमिताभ बसंतीच्या मौसीकडे धर्मेंद्रचं 'गुणवर्णन' करतो त्याची हे गाणं ऐकताना मला नेहमी आठवण होते. ‘पिया बावरी' थोडं शास्त्रीय बाजाचं त्यामुळे त्यावर काही भाष्य करण्यास अस्मादिक असमर्थ. ‘कायदा कायदा' थोडं बालिश वाटलं. पण रूढार्थाने बालवय नसतानाही 'दुधाचे झरे, झाडावर लागलेले लाडू आणि टॉफीज, तळ्यात पोहणारे पक्षी आणि आकाशात उडणारे मासे' वगैरे ऐकून मजा वाटते हेही खरंच. ‘सारे नियम तोड दो' लहानपणी (आणि कॉलेजात असतानासुध्दा) आईने सांगितलेली एखादी गोष्ट करायची नसली की म्हणायचं हमखास गाणं होतं. विशेषत: ‘इन्किलाब जिंदाबाद' ही ओळ ठासून म्हटली जात असे. Happy

ऋषिकेश मुकर्जीच्या निदान मी आतापर्यंत पाहिलेल्या चित्रपटांत तरी खाऊन-पिऊन सुखी असलेली कुटुंबंच पाहिली आहेत. वडिलांचं अकाली निधन झालंय, आईला औषधासाठी पैसे नाहीत, बहिणीने लग्न होत नाही म्हणून आत्महत्या केली, हिरो गरीब म्हणून हिरोईनच्या वडिलांनी लग्न लावून द्यायला नकार दिला वगैरे भानगड आणि तदनुषंगाने येणारी रडारड नाही म्हणून मी ह्या चित्रपटांवर जाम खुश आहे. सगळ्या व्यक्तिरेखा पु.लं.च्या केशर मडगावकरसारख्या पांढर्या व्हाईट्टपणाची कमाल मर्यादा करतात. पण आपली तक्रार नाही. सदानकदा लोकांचं वाटोळं करायचे बेत करणाऱ्या केकता कपूरछाप सिरीयल मधल्या पात्रांपेक्षा ह्या व्यक्तिरेखा परवडल्या. गुलजारचे क्रिस्प डायलॉग्ज इमर्जन्सी, सिगारेटसवरचा वैधानिक इशारा, ८० च्या दशकातलं राजकारण ह्यावरही टिप्पणी करतात. मंजूच्या घरच्यांचं पद्यात बोलणं अफलातून. तसेच चटपटे संवाद द्वारकाप्रसाद आणि निर्मलादेवी ह्यांच्यामधल्या जुगलबंदीत आहेत. उदा. उमाशंकर 'तुम दोनोको देखकर ऐसे लगता है जैसेकी शिव और पार्वती....राम और सीता'. ह्यावर द्वारकाप्रसाद लगेच 'जैसे गुलाब और कांटा' म्हणून उत्तरार्ध पुरा करतो. ‘सुंदर, चंदर आणि इंदर' नंतर जन्मलेल्या मुलाचं नाव 'जगन' असं वेगळं का ठेवलं ह्याचंही तो मजेदार कारण सांगतो. अश्या संवादांना तश्याच प्रसन्न प्रसंगांची जोड आहे. मंजू आणि इंदर ह्यांच्यातला 'प्यारका इजहार' सुध्दा एकदम फ्रेश पध्दतीने दाखवलाय. उमाशंकर चंदरच्या कुटुंबाला अंजूची आणि अंजूच्या वडिलांना चंदरच्या कुटुंबाची 'गारंटी मै देता हू' असं म्हणतो ते ऐकून मात्र 'गेले ते दिन गेले' असं म्हणावंसं वाटलं. Happy

अर्थात प्रत्येक हिंदी चित्रपटाप्रमाणे ह्यातही काही गोष्टींचा उलगडा होत नाही. उदा. अंजूला 'बघायला' येणार आहेत म्हटल्यावर भडकणारी फायर-ब्रँड मंजू चित्रपटाच्या शेवटी मात्र डोईवर पदर घेऊन सासर्‍याला 'अबसे आप मुझे गर्लफ्रेंड नही बहू कहके बुलाइये' असं म्हणते ते तिच्या स्वभावाशी पार विसंगत वाटतं. द्वारकाप्रसादवर इलाज करणारा डॉक्टर 'इंदर माझा जुनिअर आहे' असं म्हणतो ह्याचा अर्थ तो सरकारी हॉस्पिटलमध्ये नोकरी करत असतो मग तो प्रायव्हेट व्हिजीट कश्या करत असतो हे कोडं उलगडलं नाही. तसंच इंदर बाकी लोकांबरोबर इलाहाबादला जाणार नाही असं ठरलं असताना तो का जातो? कथानकाच्या सोयीसाठी का? बाय द वे, हृषीकेश मुकर्जीच्या सगळ्या चित्रपटात हे इलाहाबाद कनेक्शन आहे का? निदान 'चुपके चुपके' मध्ये तरी होतं. परिमल आणि सुलेखाची कुटुंबं इलाहाबादची दाखवलेत. अर्थात शेवट म्हणजे मंजूचं चिठ्ठी ठेवून जाणं, मग निर्मलादेवी आणि इंदरचं स्टेशनवर जाणं, तिथे मंजूचं अजून बसून असणं वगैरे थोडं disappointing वाटलं. तरी हिंदी चित्रपटात customary असलेली मॅरेथॉन पहावी लागली नाही हे बरं. निर्मलादेवीना उद्देशून लिहिलेल्या चिठ्ठीत 'आप सब रोकनेकी कोशिश करेंगे इस लिये बिना बताये जा रही हू' असं मंजू का लिहिते तेही कळलं नाही. त्या अडवतील असं तिला वाटलं तर त्यांचा तिच्यावरचा राग गेलाय हे तिला माहित आहे. मग घर सोडून जायची गरजच नव्हती.

असो. महाशिवरात्र होऊन गेली आहे. त्यामुळे रताळ्याचा काढला तेव्हढा कीस नको काढायला. थोडक्यात काय तर आमच्या घरात जोराने हसायला अजिबात हरकत नसल्याने जिथे हसू आलं तिथे मी 'खुलके' हसले. आणि थँक्स टू गुलझार अ‍ॅन्ड हृषीकेश मुकर्जी, ह्या चित्रपटाने तसे हसायचे क्षण भरभरून माझ्या झोळीत टाकले. एक प्रेक्षक म्हणून आपलं तरी दुसरं काय मागणं असतं, नाही का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वन मोअर फिदर इन कॅप! Happy
स्वप्ना हा सिनेमा अ फा ट आहे. माझा अत्यंत आवडता.
यात सर्व पात्रं अत्यंत महत्वाची आहेत नोकरासकट तो म्युझिक आवडणार्‍या भावापर्यंत.
सिनेमा काय आहे हे सांगणे नव्हे, अनुभवणेच रास्त.

तुझी ही सिरिज मला प्रचंड आवडते आहे. प्लिज सिनेमे पहात रहा आणि लिहित रहा. Happy

>>अंजू पसंत पडते आणि लग्न होतं. लाडकी अंजू सासरी गेल्यावर इथे तिच्या माहेरी कोणालाच करमत नाही. विशेषत: धाकटी बहिण अंजू तर तिची फारच आठवण काढते>> इथे धाकटी बहिण मंजू हवं.
बघितला आहे दोन तीनदा पण पुन्हा बघितला तरी तेवढीच मजा येईल.

ऊत्तम!!!!!!!!!!!!!!

मुड खराब असेल तर मी खुबसुरत, छोटीसी बात, अंगूर, चुपके चुपके लावतो.

एका प्रसन्न दुपारी चांगले मार्क मिळाल्याच बक्षिस म्हणून दाखवला गेलेला चित्रपट. लगेच थोड्या दिवसात दुरदर्शननेही दाखवला
आमच्याकडे ऑल्विन नावाच एक मोssठ गेट, बाल्कनीत जाणारा मोठा गोल जीना, तिथे मोठा सज्जा वगैरे पण आतून इवलस असलेलं एक थिएटर होतं.
कित्येक आनंदी क्षणांच साक्षिदार होतं हे टॉकिज.
आजही मला ते लाकडी कपाटात लावलेले छोटे छोटे सिन्सचे फोटो आठवतायत.

मस्त!
माझा जरा ' झूठी' आणि खूबसुरतमधे गोंधळ झालाय. दोन्ही चित्रपट पाहिले आहेत खूप पूर्वी, पण आता सगळी सरमिसळ झाली आहे डोक्यात! Sad

तुमच्या बर्‍याच शंकाचं कारण ८० तला सिनेमा २०१८ मध्ये पाहिल्यामुळे असावं. हे सिनेमे त्या-त्याकाळाचा सोशल सेटप, सिनेमा निर्मितीचं तंत्र इ. ची प्रतिबिंब आहेत.

>>निर्मलादेवीना उद्देशून लिहिलेल्या चिठ्ठीत 'आप सब रोकनेकी कोशिश करेंगे इस लिये बिना बताये जा रही हू' असं मंजू का लिहिते तेही कळलं नाही. त्या अडवतील असं तिला वाटलं तर त्यांचा तिच्यावरचा राग गेलाय हे तिला माहित आहे. मग घर सोडून जायची गरजच नव्हती.<<
इमोशनल ब्लॅकमेलिंगचं ते एक सटल उदाहरण आहे. हल्ली त्याचं रुपांतर "इमोशनल अत्याचार" मध्ये झालेलं आहे...

जगनचं काम केलेला रणजित चौधरी त्याकाळात अशा प्रकारच्या हलक्या कॉमेडित (खट्टा मिठा, बातों बातोंमे इ.) दिसला. पर्ल पदमसीचा मुल्गा असल्याने मुंबईत नाटकां मधुनहि कामं करायचा...

पिया बावरी या गाण्याच्या सुरुवातीला आणि मुखड्यात शशिकला रेखाच्या तोडिस तोड नाचलेली आहे हे आवर्जुन मांडावसं वाटतं... Happy

सायो, चूक लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद! दुरुस्त केली आहे. रणजित चौधरी 'द ऑफिस' मध्ये होता हे माहित नव्हतं. तो पर्ल पदमसीचा मुलगा आहे. बातों बातोंमें मध्ये पण होता तो.

सर्वांचे पुन्हा एकदा आभार Happy

पाहिलाय खुप वेळा.
सारे नियम तोड दो, नियम पे चलना छोड दो, भारी आवडायचं लहानपणी Happy

हा ही लेख मस्त. सिनेमा तर आवडता आहेच. हृषीकेश मुखर्जी चे हे सिनेमे म्हणजे खरोखरचे "निर्मल आनंद" वाटतात.

राज, टिप्पणी आवडली. पिया बावरी माझं अतिशय आवडतं गाणं आहे; आर्डी-गुलझार कॉम्बिनेशन स्पेशल गाणं Happy अशोक कुमार चा त्या गाण्यातला भाग ऐकायलाही खूप मजा येते.

स्वप्ना, खूप सुरेख लिहिले आहेस, नेहमीसारखे Happy पहिला पॅरा खुसखुशीत एकदम!!

हा चित्रपट तुफान गाजलेला. रेखा तोवर इस्टेब्लिश झालेलीच पण ह्या चित्रपटाने रेखाला सार्वभौमत्व दिले, हेमाची मक्तेदारी तोडून. या नंतर श्रीदेवी, माधुरी सुपरस्टार्स होईपर्यंत रेखा नंबर वन होती. यातला तिचा स्कर्टब्लाउज, पंजाबी किंवा साडी व कानावरच्या दोन वेण्या पुढे घेतलेल्या हा लूक प्रचंड गाजला, खूप जणींनी फॉलो केला. अर्थात तेव्हा हे लूक वगैरे प्रकरण माहीत नव्हते. फक्त रेखाला हा वेश उत्तम दिसतो एवढेच कळत होते.

मला संवादासकट आठवत नाही आता. एकदाच टीव्हीवर पाहिलाय. मला रेखा खूप आगाऊ वाटलेली Happy दुसऱ्याच्या घरात घुसून ढवळाढवळ करणारी. दिना एवढी कठोर का याचे कारण योग्य वाटते चित्रपटात.

राकेश रोशन माझा फेव होता. इथे कुणीतरी हमारी बहू अलकाचा उल्लेख केलाय. फारसा न गाजलेला म्हणता येईल पण उत्कृष्ट चित्रपट. थेटरात जाऊन पाहीलेल्या मोजक्या चित्रपटांपैकी एक. रती अग्निहोत्रिसोबत त्याचा एक चित्रपट थेटरात जाऊन पाहिलेला, नाव आठवत नाही . त्याचे तिला मदत करणारा पण मदतीचे ओझे होणार नाही याची काळजी घेणारा तरुण साकारलेला. त्याच्या भूमिका नेहमी साध्या सुध्या असायच्या.

खूबसुरत वन टाईम वॉच आहे.. संजय दत्त च काम चांगले आहे ...>>तो ए शिवानी तू लगती है नानी वाला हा नाही ओ च्रम्पस हा जूना खूबसूरत
हा माझाहि आवडता चित्रपट
विशेषतः सुन सुन दीदी तेरे लिए हे गाणे खुप आवडीचे
पण लहानपणी पाहिलाय सो जास्त डिटेलस आठवत नाहीत

छान लिहीले आहे. एकदाच पाहिला आहे पण तेव्हाही आवडला होता. रेखा अत्यंत आवडती आहेच.

ज्या वेळेस स्मिता पाटील व शबाना च्या चित्रपटांची जुगलबंदी समांतर चित्रपटांमधे चालत असे त्यावेळेस रेखाने घर, मुकद्दर का सिकंदर, खूबसूरत आणि उमराव जान असे प्रचंड विविधता असलेले रोल्स केलेले आहेत.

स्वप्ना, ही सिरिज बाकी छान सुरु केली आहेस. आवडली मला.
खुबसुरत पाहिलाय. चांगला आहे सिनेमा.
काही प्रसंगात रेखाचं कॅरॅक्टर जरा आगाउ वाटतं मला.
किंवा मला जरा अतिच अवखळ, अतिच बालिश चाळे करणार्‍या हिरोयणी कैच्याकै वाटतात म्हणुन असेल.
बाकी सिनेमा मस्तच आहे. सगळे कॅरेक्ट्र्स मस्त आहेत.

मस्त सिनेमा आहे. ॠषिकेश मुखर्जींच्या सिनेमात बर्‍यापैकी मिड्ल ऑफ द रोड कॅरेक्टर्स असायची. त्यामुळे सिनेमा खूप पटकन रिलेट होऊन जायचा. (अपवाद : 'झूठ बोले कौव्वा काटे' - फारच ओढून ताणून केलेला अन 'बीवी और मकान' - बनवाबनवी चा ओरिजिनल, पण फारच सपक)

खूबसूरत चा रीमेक म्हणजे कहर प्रकार होता. सोनम कपूर अन फवाद खान. एकमेव प्लस पॉईंट म्हणजे दीना पाठकच्या रोलमधे तिचीच मुलगी रत्ना पाठक-शाह.

"रती अग्निहोत्रिसोबत त्याचा एक चित्रपट थेटरात जाऊन पाहिलेला"
शुभकामना.
"बुलबुल क्यों नहीं गाऐं" हे साधारण "पिया बावरी" टाईप पिक्चरायझेशन असलेलं गाणं त्यात होतं.
पुर्वी शो टाईम नावाचा एक कार्यक्रम लागायचा , त्यात यातले सिन्स सारखे दाखवायचे.

रणाजीत चौधरी हृषिकेश मुखर्जींच्या बर्‍याच चित्रपटात असायचा. नंतर तो cross-over films मधेच दिसायचा त्यामुळे अमेरीकेतल्या एखाद्या शिरेलीत दिसला तर नवल नाही. फायर मध्येही अत्यंत गलिच्छ कलात्मक रोल होता.

हा पण एक आवडीचा चित्रपट. माझ्या मते आख्खा चित्रपट रेखाने खिशात टाकला आहे. अप्रतिम सहज वावर आहे तिचा!!

मल ह्यातला एक संवाद खूप आवडतो.

दीना पाठकः (अ‍ॅपल की खीर) तुम्हे पसंद है?
रेखा: अ‍ॅपल की खीर किस गधे को पसंद नही.
दीना पाठक: (कोरा चेहरा ठेवून) मुझे पसंद नही.

दीना पाठक आणि रेखा दोघींचे हावभाव एक नंबर आहेत. दीना पाठकचं टायमिंग अप्रतिम

स्वप्ना, खूप सुरेख लिहिले आहेस, नेहमीसारखे > +१
काही प्रसंगात रेखाचं कॅरॅक्टर जरा आगाउ वाटतं मला.
किंवा मला जरा अतिच अवखळ, अतिच बालिश चाळे करणार्‍या हिरोयणी कैच्याकै वाटतात म्हणुन असेल. >+१

स्वप्ना, सगळ्या माझ्या आवडत्या चित्रपटांबद्दल लिहलयस. भरभर वाचून काढले सगळे लेख. Happy
मागे मी लिस्ट लिहिलेली परत लिहिते. नक्की लिही. वाचायला आवडेल.
छोटीसी बात
खुबसुरत
दामाद
हमारी बहू अलका
किसीसे ना केहना
लाखों कि बात
बातो बातो मे
रजनीगंधा (नक्की लिही या विषयी)
रंगबीरंगी
खट्टा मीठा
गोलमाल
अंगूर
चष्मे बद्दूर
कथा (खूप नाही आवडत)
चितचोर
शौकीन
पसंद अपनी अपनी
किरायेदार (ठिक)
गुड्डी (जया भादूरी आवडत नाही तरी चित्रपट आवदतो)
चुपके चुपके
नरमगरम
बात बन जाये (ठिक ठाक)
मेरे बिवी कि शादी
अब आयेगा मजा (ठिक )

आणखी आठवल तर लिहिते नंतर.
मराठीतले ऑल टाईम फेव्हरेटः
बिन कामाचा नवरा
मुंबईचा फौजदार
गुपचुप गुपचुप Happy

छान लिहीलं आहे. पूर्वी बघितला आहे. रेखा फार आगाऊ वाटली होती. राकेश रोशनवर माझा एकेकाळी क्रश होता, आता तोच चित्रपट परत बघितल्यावर वाटतं, आपल्याला का आवडत असेल हा तेव्हा Happy त्याचा कामचोर हा पिक्चर खूप आवडला होता. रेखाला यासाठी फिल्मफेअर मिळालं होतं. तेव्हा आजच्यासारखी भरमसाठ अवाॅर्ड नव्हती त्यामुळे त्याचं वेगळं महत्व होतं. रेखाचा कपडेपट आणि मेकप आवडलेला. रणजीत चौधरी खट्टा-मिठापासून आवडता. सोनम कपूर आणि रेखा ही काही तुलनाच नाही त्यामुळे त्याला रिमेक तरी का म्हणावं.

हा चित्रपट रेखाच्या लाइफ मधला टर्निंग पॉइन्ट आहे. कारण जाडी, भदाडी , बटबटीत रेखा ह्या चित्रपतापासून स्लिम झाली आणि तिला मेक अपचा सेन्स आला आणि तिचे फाइन ट्युनिंग झाले आणि तिने जणू कातच टाकली. या पूर्वीची रेखा म्हनजे मट्ठ , नुसतीच एक्स्पोजरवर भर देनारी होती , नन्तर ती एवढी भारदस्त झाली की कुठल्या चीप गिमिक्स करायची गरजच राहिली नाही. ह्यात किरण वैराळेही होती मला वाटते. मंत्री मधुसूदन वैराळेंची मुलगी.

>>कारण जाडी, भदाडी , बटबटीत रेखा ह्या चित्रपतापासून स्लिम झाली आणि तिला मेक अपचा सेन्स आला आणि तिचे फाइन ट्युनिंग झाले आणि तिने जणू कातच टाकली. >> च्च्,च्च, कामदेव बाबा, त्याला हल्ली ‘मेकओवर’ म्हणतात. Wink
मी ही काल पाहिला. रेखाचा लुक आणि रोल जरी आवडला तरी ती वयाला न शोभणारा आगाऊ आणि बालिशपणा एकत्रच करताना दाखवली आहे.

Pages