अजि म्यां पु.ल. पाहिले

Submitted by अश्विनी कंठी on 19 November, 2017 - 21:06

माझ्या वडिलांनी श्री.वसंतराव देशपांडे यांचा एक वाढदिवस आमच्या गच्चीवर अनेक मित्र मंडळीबरोबर साजरा केला होता.आम्ही त्या निमित्ताने पु. ल. देशपांडे ह्यांना देखील आमच्या घरी येण्याची विनंती केली होती.त्या प्रसंगी प्रोफेशनल फोटोग्राफर बोलावून आम्ही त्या दोघांचे काही फोटो काढले होते. त्यातला एक फोटो पु. ल. देशपांडे यांना आवडला होता. त्याची कॉपी सुनीताबाईंनी मागितली होती. माझ्या वडिलांनी मला मुद्दाम आई बरोबर फोटो द्यायला जायला सांगितले.आणि म्हणूनच माझ्या आयुष्यात तो सुवर्ण क्षण आला होता.

Baba Photos0011.jpg

१८ जुलै १९८४
आज सकाळपासून पाऊस चालू होता. म्हणतात ना ज्या दिवशी पाउस पडतो तो दिवस चांगला जातो. खरेच असणार ते.

आज सकाळी १०.३० वाजता मी माझ्या आईबरोबर पु.ल. देशपांडे यांच्याकडे गेले होते. समजा आपल्याशी पु.ल.बोलले तर? याचाच मी रस्ताभर विचार करत होते. आपण कसे उत्तर द्यायचे? अगदी मोजके बोलायचे? का नीट व्यवस्थित उत्तर द्यायचे? का कोण जाणे पण मनावर दडपण आले होते खरे! आम्ही त्यांना ‘त्यांचा आणि वसंतराव देशपांडे यांचा एकत्रित’ फोटो द्यायला गेलो होतो.

आम्ही घरी गेलो तर ते हॉलमधेच बसले होते. आम्ही येताच म्हणाले, “या या, तुमचीच वाट पहात होतो.” आम्ही सर्वात प्रथम त्यांना तो फोटो दिला. त्यांनी तो शेजारी ठेवून घेतला. आता प्रश्न पडला, पुढे काय बोलायचे. मी तर तिथे गेल्यावर एकदम भारावूनच गेले होते, भांबावून जाउन त्यांचे घर बघत राहिले. घरातले मला सर्वात जास्त काही आवडले असेल तर त्यांची सही असलेला एक आडवा ठोकळा टीव्ही वर ठेवला होता. तो इतका छान दिसत होता की संपूर्ण भेटीत मी सारखी तिकडेच पहात होते. जवळच एक २ वर्षाचा छोटा मुलगा खेळत होता. तो सुनिताबाईंच्या बहिणीचा नातू होता – अश्विन लोकरे.

या अश्या शांततेचा भंग माझ्यावरून होईल असे मला अजिबात वाटले नव्हते. अचानक पु.ल. नी मला विचारले, “काय, कितवीत शिकतेस?” मी एकदम दचकलेच. म्हणले, “मी बारावी सायन्सला आहे” त्यावर ते मला म्हणाले, “अगदी खर सांगू का? टोटलच्या मागे लागू नकोस. या डॉक्टर, इंजिनीरिंगमध्ये काही अर्थ नसतो. हल्ली खूप वेगवेगळे कोर्स निघाले आहेत. पॅथॉलॉजी, बी.फार्मा, मायक्रोबायॉलॉजी….का सगळे मार्कांच्या मागे लागतात कोण जाणे.” यावर मी काय बोलावे मला सूचेना. सुनीताबाई तिथेच कॉफी घेत बसल्या होत्या. त्या म्हणाल्या, “अहो, त्या पदव्यांमध्ये काही अर्थ नसतो आणि शिवाय मुलींनी एव्हढे शिकून त्यांना नुसती धावपळच करावी लागते.” आई म्हणाली, “ती सायन्सला गेलीय खरी, पण तिला मराठीची फार आवड आहे.” पु.ल. म्हणाले, “अरे वा! मग छानच आहे की. युगांत वाचलेस का?” मी “हो” म्हणाले. मग सुनिताबाईंनी आमच्या पुढ्यात कॉफी आणि केक आणून ठेवले. अश्विनने एक केक उचलला. पु.ल. म्हणाले, “काय रे, इतर वेळेस तर काही खात नाहीस. बघा ना कसा आहे अंगाने.” नंतर आम्ही त्यांना आमच्या फॅक्टरीत बनवलेली खोडरबरे दिली. सुनीताबाई म्हणाल्या, “मावशीला आणि ताईला ते ‘डीचांग डीचांग उपाशी वऱ्हाड नाचतंय’ गाणे म्हणून दाखव ना”

मी केक खात असंताना पु.ल. माझ्याकडेच बघत आहेत की काय असे वाटत होते. मी मनात म्हटले की आता नेमका माझा केक खाली पडणार. पण झाला बाई एकदाचा केक खाऊन.

सुनीताबाई माझ्याकरता एक गुलाबी गुलाब घेवून आल्या, अश्विनला म्हणाल्या, “ताईला दे गुलाब” तो म्हणला,”थांब, हात पुसून येतो.” पु.ल म्हणाले, “याला स्वच्छतेची इतकी आवड आहे. बघा कसा हात पुसतोय. आणि इतका चावट आहे की मला भाईकाकू म्हणतो. मग मीही त्याला आशुताई म्हणतो.” मी म्हणाले, “याला पाहून दिनेशदादांची आठवण येते.” दोघांना इतका आनंद झाला. सुनीताबाई म्हणाल्या, “तो सध्या हार्वर्डला असतो. डॉक्टरकी करतोय. वसंतराव गेल्याचे कळताच त्याला इतक वाईट वाटले पण भावना शेअर करायलाच कोणी नव्हतं.”

जवळ जवळ एक दीड तास पुष्कळ विषयांवर बोलण झालं. दोघेही जण आनंदात आमच्याशी बोलत होते. माझ्या बाबांबरोबर २-४ दिवस पु.ल. नी राधानगरीला रहायला येण्याचे मान्य केले होते. त्याची आईने आठवण करून देताच हा पावसाळा संपताच जावू या असे ते म्हणाले.

निघताना पाऊस होता म्हणून त्यांनी आशूच्या बाबांना आमच्याकरता रिक्षा आणायला सांगितली. आमची रिक्षा वळून जाईपर्यंत पु.ल.आशूला कडेवर घेवून गॅलरीत उभे होते. आम्हाला हात हलवून अच्छा करत होते.

मला कल्पनेपलीकडचा आनंद झाला होता.

प्रांत/गाव: 
Group content visibility: 
Use group defaults

किती नशीबवान आहात तुम्ही..१-१.५ तास पुलंसोबत....मस्त...
मी रोज ऑफिस वरुन घरी जाताना मुद्दाम "मालती-माधव" वरुन गाडी नेते...त्या अपार्ट्मेंट्च्या त्या दारात आणि त्या रस्त्यावर कधीतरी पु.लं चे पाय लागले असतील या विचारानं मस्त वाटतं मला...खरतर भरुन येतं....

वा मस्त आठवणी . नशीबवान आहात.
पु. ल. माझं ही दैवत . शाळेत, सत्कार समारंभात, पर्यटन करताना, परदेशी फिरताना, विमानात, घरी दरी ते नेहमी माझ्या बरोबर असतात. कुठे ही गेलं तरी त्यांचं लिखाण रिलेट होतच आणि मजा वाटते.

कुठे ही गेलं तरी त्यांचं लिखाण रिलेट होतच आणि मजा वाटते.>> अगदी मनीमोहोर! कित्ती तरी वेळा पुलं आठवतात.

मस्त! वरचा पुलंचा फोटोही मस्त आहे.

वसंतराव देशपांडे तोपर्यंत हयात नव्हते का? म्हणजे कार्यक्रमानंतर या प्रसंगाच्या आधी ते गेले, असे दिसते.