"टींग". अर्धवट झोपेतल्या कंडक्टरने बेल मारली आणि झोपेतच आम्हाला म्हणाला "चला उतरा" उशीर होतोय (???). बाहेर मिट्ट काळोख. आजूबाजूला कुठेही गावाच्या खुणा नाहीत. कदाचीत स्टॉप असावा असे वाटू शकेल अश्या टपर्यांशेजारी गाडी थांबली. आता दाभीळ फाटा स्टॉप कुठे आहे हे आमच्या पैकी कोणालाच माहीत नव्हते. गाडीतले लाईट लागले तेव्हा बघीतले तर सगळे झोपले होते. पोलादपूरला कंडक्टरने सांगीतले होते की मी सांगतो तिथेच उतरा. करता काय वरच्या रॅकवरच्या बॅगा घेऊन आम्ही उतरलो.
--------
आम्ही आठजण जमलो होतो एका वेगळ्या वाटेवरच्या रेंजट्रेक साठी. आपला माबोकर आका पण आमच्या बरोबर हा ट्रेकला होता. जवळ जवळ दोन महीने आणी पावसाचा मेन सिझन ट्रेकविना घालविल्यावर एखादा भन्नाट ट्रेक करावा असे मनात होते. कुठे करता येईल असा विचार करतानाच माझ्या मित्राने काही वर्षांपुर्वी सांगीतलेला धबधबा डोळ्यासमोर आला. ह्याला बघायला जायचे म्हणजे पावसाळ्यातच आणि जायचे तर ह्याला जोडून काहीतरी अजुन हवे म्हणून हा रेंजट्रेकचा घाट घातला होता. सावीत्री घाट - दाभीळ - किनेश्वर - रडतोंडी घाट - कुमठे - कुडपण - वडगांव असा हा दणकट दोन दिवसांचा प्लॅन. थोडेसे जुजबी प्लॅनींग केले होते पण काय अनुभव आले, कसा सह्याद्री अनुभवला, कसे गावकरी भेटले ते सर्व येईलच पुढे.
-------
दिवस पहीला
उतरलो तेव्हा पहाटेचे चार वाजले होते किंवा असावेत. दिवसा ऑक्टोबर हीट जरी जाणवत असली तरी रात्री मात्र मस्त हुडहुडी भरविणारी थंडीच होती. मुंबई सोडल्यावर तर ती जास्तच जाणवत होती. एस्टीने पोलादपुर सोडून महाबळेश्वर रस्त्याला वळण घेतल्यावर ड्रायव्हर जास्तच रंगात आला होता. पाऊस असा नव्हता पण हवेत मस्त गारवा होता. ज्या ठिकाणी उतरलो ते ठिकाण कुठे आहे ह्याचा काहीही पत्ता नव्हता. एक माहीती होती की पोलादपुर - महाबळेश्वर रस्त्यावर वाडा-कुंभरोशी गावाच्या अलीकडे दाभीळ फाट्याला उतरून पायवाटेने जायचे. हाच तो सावीत्री घाट (ह्या नावाची काय गंमत झाली ते शेवटी सांगतोच). पण आम्ही उतरलो तिथे कोणी चिटपाखरूही नव्हते (पहाटे चार वाजता आमच्या स्वागताला कोण असणार म्हणा ). नाही म्हणायला दिवसा चालू असणार्या दोन चार बंद टपर्या दिसत होत्या. आमचा प्लॅन होता की जरासे दिसायला लागले की वाट पकडून खालच्या गावात जायचे. पण कसचे काय आम्हाला कंडक्टरने अश्या ठिकाणी उतरवले होते की वाट सोडाच, समोर अशी "आ" वासून दरी होती . आता या दरीतून सावीत्री घाट असेल तर आम्ही मेलोच असा विचार करत मी आणि इम्रान दोन दिशेला रस्ता शोधायला गेलो पण रस्त्यावरून एक किमी चालत गेलो तरी कोणालाच खाली उतरायची वाट सापडेना. काय करता, बसून राहीलो तश्याच अंधारात. थोड्यावेळाने ५.००-५.३० वाजता समोरच्या डोंगरावर अचानक लाईट लागला. आम्ही निट बघीतले तेव्हा समोर एक झोपडे दिसले.
आम्ही बॅटरीच्या उजेडात गप्पा मारत बसलो होतो, तेव्हढ्यात "ओ, कोणेय"? "थांबा तितंच" करत हाका ऐकू यायला लागल्या. थोड्याच वेळात बॅटर्या, कंदील घेऊन काही माणसे खाली उतरायला लागली. नाही म्हटले तरी आम्ही थोडेसे घाबरलोच. थोड्याच वेळात ती लाठ्या काठ्या घेतलेली माणसे आमच्या जवळ आली आणि उलगडा झाला. आम्ही त्याना घाबरलो होतो आणी ते आम्हाला . झाले होते काय की काही दिवसांपुर्वीच ह्या रस्त्यावरच्या होटेल्सवर काही भुरट्या चोरांचा दरोडा पडला होता. आता इतक्या पहाटे जवळ कुठलाही गाव आणी बस थांबा नसताना बॅटर्या वाली माणसे बघीतल्यावर त्याना आम्ही भुरटे चोर वाटलो होतो (कर्म आमचं. नशीब चौकशी न करता हाणले नाही ते ). पण ह्या नादात आम्हाला एक वेगळाच फायदा झाला. आम्ही कोण कुठले, कुठे जाणार ते सांगताच गावकर्यांनी सांगीतले की आम्ही चु़कीच्या ठिकाणी उतरलोय (आम्हाला ते जाणवायला लागले होतेच) आणि दाभीळगाव फाटा आणि घाटाची सुरुवात चार किमी पुढे आहे :(. त्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही होतो तिथुनही एक वाट खाली "करंदी घाटाने" खाली हळदुले गावात उतरते पण ती पावसाळ्यात बंद असते.
आम्ही अश्या गप्पा मारत होतो तो गावकर्यांच्या घरातल्या बायका आणि मुले हंडे घेऊन खाली रस्त्यावर उतरले. आम्ही विचारले आता इथे कुठले पाणी भरणार? ओढ्याचे काय?. उत्तर आले "ओढा कशाला, टाके आहे ना? लय जुनं हाय". जुने टाके म्हटल्यावर आमचे कान टवकारले आणि आम्ही लगेच ते टाके बघायला गेलो. बघतो तो खरेच, शिवकालीन टाके आणि आत थंडगार पाणी. व्वाव.. लॉटरीच लागली. या वाटेवर असे इथे कुठे टाके असेल असे वाटलेही नव्हते. शिवकालीन टाकी म्हणजे नक्कीच दाभीळ ते प्रतापगड, कुंभरोशी, पार गावाला जोडणारा हा रस्ता. टाके बघून गावकर्यांकडून रस्ता समजावून घेत आम्ही कुंभरोशीच्या दिशेने निघालो. नुकतेच उजाडायला लागले होते. इतक्या सकाळी चार किमी चढणाचा डांबरी रोड तुडवणे म्हणजे शिक्षाच की हो. पण काय करता ती शिक्षा भोगतच, महाबळेश्वरला जाणारे किंवा येणारे यांच्या थोड्याश्या आशचर्यकारक आणि बर्याचश्या दुर्लक्षीत नजरा झेलत जेव्हा चार किमी चालत आलो तेव्हा एका वळणावर दाभीळ फाटा असा बोर्ड दिसला आनी पायवाटही सापडली. आता स्पष्ट उजाडले होते. समोर महाबळेश्वरची डोंगररांग अंग झटकून सकाळच्या सुर्याचे स्वागत करायला तयार होती.
आम्ही लगेच वेळ न घालवता पायवाटेने चालायला लागलो. साधारण १० मि. पठारावरून सरळ चालत गेल्यावर टोकाशी आलो तो अफलातुन नजारा डोळ्यासमोर उघडला गेला. कसल्या जबरदस्त जागी आम्ही उभे होतो. पायाखाली महाबळेश्वर वरुन उगम पावणारी सावीत्री नदी पुर्ण भरात नागमोडी वाहात होती. सभोवताली आणि तळात सगळीकडे हिरव्या रंगाचे साम्राज्य होते. नदीच्या अल्याड पल्याड हळदुले, दाभीळ, लहुळसे, करंजे, देवळे अशी गावे आळस देऊन उठत होती. शेते पुर्ण भरात आली होती आणि सुर्याचे तिरके किरण त्यांचे रंग अजूनच खुलवत होते. समोर करंजे गावाची डोंगर रांग होती जिच्या पलीकडे ढवळीचे खोरे आणि ढवळे गाव दिसत होते. उजवीकडे जुन्या महाबळेश्वरची डोंगररांग आणि पठार दिसत होते. अगदी उजवीकडे कुंभरोशी, जावळी, दरे एरीयाचा नजारा आम्हाला फ्रेश करुन गेला. चार किमी चालण्याने आलेला थकवा कधी पळाला कळलेच नाही.
वाटेवरचे गवत जरी उंच वाढले असले तरी भराभर वाट पायाखाली घालत आम्ही दाभीळ गावात उतरायला लागलो. झिग-झॅग, मध्येच कड्याकाठाने, मधेच कारवीतून असे तासा-दिडतासात आम्ही गावापाठच्या शेतात उतरलो आणि शेतावरच्या बांधावरून गावात दाखल झालो. प्लॅनप्रमाणे आम्ही आम्ही जरी लेट (एस्टीच्या कंडक्टरची कृपा ) झालो असलो तरी जरासा जोर केला तर आम्ही आमच्या पुढच्या गावात किनेश्वरला वेळेत पोचू शकलो असतो. गावात चौकशीकेली तर कळले की एस्टीशिवाय कुठलेही पब्लीक वाहन गावात येत नाही . आमच्या सुदैवाने ८ वाजता पोलदपुरहून एस्टी येणार होती. जरासे चालून एस्टीच्या स्टॉपजवळ आलो आणि जवळचे थोडेसे खाऊन घेतले. ८.३० झाले आणि बस आली. आम्हाला आता पोलादपुर-महाबळेश्वर रस्त्यावरील कापडा गावात उतरून पोलादपुर-किनेश्वर बस पकडायची होती. ९.३० ला फाट्याव्ल्डा फाट्याला उतरलो आणि १०.०० वाजता येणार्या गाडीला वेळ आहे म्हणून मिसळीची ऑर्डर देवून पावाचा पहीला घास घेतला तो समोर गाडी येऊन ५ सेकंद थांबून आमच्यावर धुळ उडवून निघून गेली. आम्ही बघतच बसलो :).
दाभीळ फाट्यावरून दिसणारे पहाटेच दृष्य
दाभीळटोक घाटाच्या सुरुवातीहून दिसणारे सावित्री नदीचे खोरे आणि पायथ्याची गावे
दाभीळ गावातून दिसणारा सुर्योदय आणि पाठीमागे महाबळेश्वर रांग
आता काय? असा विचार करत होतो तोच एक सिक्स सिटर रिक्शावाला आम्हाला विचारता झाला "किनेश्वरला जायचंय काय?" आम्ही चकीत झालो. म्हटले हा काय आमची बस चुकायचीच वाट बघत होता की काय? आम्ही त्याला सांगीतले की एवीतेवी बस गेलीच आहे, तो आता मिसळ आणि तर्री मन लाऊन खाउदे मग जाऊ निवांत. सावकाश मिसळ आणि कटींग मारून त्याच्याबरोबर निघालो. मनात एक विचार आला होता की आडच्या फाट्यावर उतरून चालत जावे काय? पण म्हटले नको. जाऊ तसेच. (पुढे तो निर्णय अत्यंत योग्य ठरला). आडगावाला बगल देऊन मेन रस्ता सोडून आम्ही किनेश्वरच्या "आड" रस्त्याला लागलो आणि शपथ सांगतो कसला डेंजर रस्ता होता. ही अशी अंगावर येणारी वळणे. एका मागोमाग नुसती वळणेच वळणे. ह्या एवढ्याश्या बारीक रस्त्यावरुन बस चालवणे म्हणजे कौशल्याची सिमाच. सतत रस्ता चढण चढत होता. २५ मिनीटाने आमची सहनशक्तीची परीक्षा घेऊन रस्ता संपला तेव्ह किनेश्वर गाव आलेले होते.
किनेश्वर गाव शिवकालापासून प्रसिद्ध आहे ते शिवकालीन शंकर मंदीरामुळे आणि गावात उतरणार्या पारघाटामुळे. पार, कुमठे, डोंगर वरदायनी मंदीर करत करत हा जुना पार घाट प्रतापगडावरून खाली कोकणात उतरतो. आम्हाला तोच वर चढून कुमठे गावात जायचे होते आनी पुढे कुडपणला. आमच्या पैकी कुणीच या वाटेने गेले नसल्याने गावात चौकशी केली की कुणी आमच्या बरोबर येईल का तर धक्काच बसला. आम्ही येऊ पण २००० रु होतील अशी स्वच्छ आणि स्पष्ट ऑफर :). आता या पुर्वी आम्ही गाईड घेऊन घाटवाटा केल्यात आणि न घेता पण केल्यात. पण पार घाट मोडलेला, गवत मरणाचे वाढलेले आणि पुर्वी कोणीच गेले नसल्याने हातातील वेळ बघता गाईड शिवाय शोधाशोध करणे मुर्खपणाचे होते आणि किनेश्वर वाले म्हणत होते की "शहरातले तुम्ही २००० तुम्हाला जड हयेत व्हय". थोडीशीही घासाघिस करायला तयार न झाल्यामुळे आम्ही परत फिरण्याचा निर्णय घेतला. पारघाट हुकल्याचे दु:खतर होतेच पण त्याहुन गावकर्यानी दाखवलेल्या माजाचा आनी मस्तीचा राग जास्त होता. गावात आलेल्याला साधे पाणीही विचारण्याचे सौजन्य किनेश्वरवाल्यानी दाखवले नाही.
-------
आताशा हा अनुभव सार्वत्रीक यायला लागला आहे. "१००० घेईन", "२००० घेईन", "ते देतात तर तुम्ही का नाई", "तुम्हाला काय कमी" "अर्धाच रस्ता दाखवू" अशी पुर्वी ट्रेकिंग करताना कल्पनाही न केलेली वाक्य सर्रास ऐकू यायला लागलीत. दोष कुणाचा यावर चर्चा झडतील, दोन्ही बाजू बरोबर अशी मते व्यक्त होतील पण हाती येणार्या पैशाने आणि शहरातल्या चमचमाटामुळे गावात पैशाचे विष पसरले आहे हे नक्की. असो.
-------
नशीबाने आम्ही सिक्स सिटर वाल्याला परत पाठवले नव्हते . त्याच्याच बरोबर परत त्याच रस्त्याने "आड"ला आलो. सकाळपासून तिनदा प्लॅन गंडला होता. एकदा बसवाल्याने त्याच्या मर्जीच्या ठिकाणी उतरवले, एकदा किनेश्वर बस समोरून निघून गेली, एकदा किनेश्वरवाल्यांनी झटका दिला. (तसे किनेश्वरहून कुमठयाला न जाता कोंडोशीवरून कुडपणला डायरेक्ट जाता येते पण तो पर्यायही प्रचंड गवतामुळे बारगळला होता). पारघाटाने कुमठयाला जायचा प्लॅन हुकल्याने आता आमच्या समोर वाडा कुंभरोशीवरून परत एकदा जिप करून कुमठाल्या जाण्याशिवाय पर्याय नव्हता. आम्ही तसेच केले. एका बस मधून कुंभरोशीला उतरून दुसर्या जिप मधून कुमठ्यात उतरलो तेव्हा १.३० वाजला होता. आम्ही आमच्या पुर्व नियोजीत वेळेत कुमठयात दाखल झालो होतो पण अर्थात पार घाटाचा बळी देऊन
किनेश्वर गावातून दिसणारा रडतोंडी घाट.मध्यभागी डोंगराच्या पाठीमागे कुमठे गाव.
कुमठ्यात चौकशी केली तेव्हा कळले की आता कुडपणला जायला अर्ध्यापर्यंत कच्चा रस्ता झालाय. व्वा हे तर मस्तच काम झाले. रस्ता वळण वळण घेत हळू हळू चढत होता गाव सोडताच जंगल लागले त्यामुळे ऑक्टोबर हिटचा त्रास जाणवत नव्हता. आहा काय मस्त चाल होती. जंगलातून रस्त्याने चालत चढत केव्हा टॉपला आलो कळलेच नाही. वाटेत एक मोठा सहा-सात फुटी साप आडवा गेला. टॉपला आल्यावर एक रस्ता सरळ कोंडोशीला जातो तर डावीकडचा रस्ता १.१.५ किमी पुढे एका झोपड्या पर्यंत जातो. आम्हाला डावीकडेच जायचे असल्याने आम्ही न थांबता तसेच पुढे निघालो. रस्ता संपून धनगराच्या झोपड्यापाशी आलो तर २.३० वाजले होते. सकाळच्या मिसळीने आम्हाला इथपर्यंत तर आणून सोडले होते पण पुढे जायचे तर जेवणाचा ब्रेक घेण आवश्यक होते. तिथेच झोपडीच्या सावलीत जेवण केले. मी नको म्हणत होतो तरीही बाकीचे भिडू झोपण्याचा वेळ कमी होतो म्हणून पाचएक मिनीटात जेवण उरकून घोरायला लागलेही. मग मिही त्याना आणि स्वतःला नाराज केले नाही :).
३.३० वाजता कसे बसे बळेच उठून कुडपणच्या वाटेला लागलो. वाट पठारावरून आहे आणि पठार शेवटपर्यंत ठळक आहे. पठार संपता संपता समोर सह्याद्रीचा रौद्र पण तेवढाच लोभस कॅनव्हास समोर आला. आम्ही हरखून गेलो. ऐन सह्याद्रीच्या गाभ्यातला, सह्याद्री पर्वत रांगेच्या क्रेस्ट्लाईनवरचा हा प्रदेश. कुठे कुठे चुकार गावे सोडली तर तसा निर्मनुष्यच. आत्ता कुठे गाडीचाकांचा स्पर्श इथल्या निसर्गाला होतोय. डावीकडून उजवीकडे नजर फिरवली तर नजर संपेपर्यंत घनदाट जंगलच जंगल. डावीकडे अस्पष्टसा मधु मकरंद दिसत होता, हातलोट घाट जाणवत होता, समोर नवप्रसिद्ध भिवाची काठी सुळका आणि खडशीचा धबधबा (ह्याचा खास उल्लेख पुढे येईलच) दिसत होता, पायथ्याशी कुडपण गावाची कौलाऊ घरे आणि भात शेती दिसत होती. पण पुढे नजर जाईल तिकडे अफाट जंगल, खोल खोल दर्या. ढग दरीत उतरले होते. पलीकडे सुर्य अस्ताला चालला होता, पायाखालच्या पठारावर मऊ हिरवे गवत पायांशी खेळ करत होते. आहाहा...नजरबंदी व्हावी तशी आम्ही तिथे त्या क्षणाला ते सर्व डोळ्यांतून पिऊन घेत होतो. आणि तरीही समाधान होत नव्हते.
पठार संपले जंगल उतार सुरु झाला आणि वाट गायब झाली. पण आम्हाला आता तशी फार चिंता नव्हती. एकतर ५.३० वाजले होते आणि खाली कुडपनची घरे दिसत असल्याने अंधार पडायच्या आत गावात पोचू शकणार होतो. थोडे एकडे तिकडे करत खाली उतरायची वाट शोधत असताना अगम्य भाषा बोलणारे एक आजोबा गुराखी तिथे आले. त्यांनीच मग योग्य वाट दाखवली. त्या वाटेच्या घसार्यावरून वाटेतल्या एका धनगराच्या झापावरून ४५ मिनिटात कुडपण गावात एंट्री मारली. गावात देवळाची चौकशी करता कळले एक देऊळ ओढ्या पलीकडे आहे. गावातल्या एका घरी गरमागरम चहाची विनंती करून १५ मिनिटात गावा बाहेरच्या देवळात दाखल झालो आणि पहीला दिवसाचा ट्रेक संपवला तेव्हा ६.३० झाले होते.
देवळात आलो तर देऊळ बघून आश्चर्य चकीत झालो. इतक्या आडवाटेला रिमोट गावात इतके मस्त देऊळ असेल असे वाटलेच नव्हते. भिंतीना मस्त रंग दिलेला, चकचकीत संगमरवरी लाद्या, नवीन पंखे, नवीन लाईट बघून हे नुकतेच जिर्णोद्धारीत मंदीर आहे हे कळले. मंदीराशेजारून एक डोंगरातून येणारा थंडगार पाण्याचा ओढा वाहात होता. मग काय वेळ न दवडता बॅगा एका कोपर्यात लावून तिकडेच पळालो. मस्त आंघोळ करून आलो तो दिवसभराचा सगळा शिणवटा पळून गेला होता. आजच्या दिवसात बरेच काही घडले होते. अचानक सापडलेले पाण्याचे टाके, अनावश्यक करायला लागलेली पायपीट, दाभीळ टोकावरून दिसलेले सावित्री खोर्याचे नयनरम्य दृश्य, चुकलेली बस, किनेश्वरचा कडवट अनुभव, कुमठे ते कुडपण मस्त चाल, कुडपण पठारावरून अनुभवलेला सह्याद्री आणि सरते शेवटी रात्री पाठ टेकवायला असे मस्त मंदीर. व्वाह!
कुमठाहून कुडपणकडे जाताना पाठीमागे दिसणारा प्रतापगड आणि पार गांव
कुडपण कडे जाणारा कच्चारस्ता
कुडपण पठाराहून होणारे मुख्य सह्यधारेचे आणि कोकण खोर्याचे होणारे पहीले दर्शन
कुडपणकडे जाणारा रस्ता
कुडपणकडे उतरण्यापुर्वीचे शेवटचे पठार.
कुडपण पठार. मध्यभागी इंग्रजी व्ही म्हणजे कुडपण ३ वरून वडगावला उतरणारा म्हारखिंडीचा रस्ता
कुडपणकडे उतरणारा शेवटचा टप्पा. मध्यभागी भिवाची काठी सुळका आणि निगडा घाट. फोटोच्या मध्यभागी सर्वात पाठीमागे वडगाव.
पण दिवसाचा शेवट इथेच झाला नाही. अजुन धक्के बाकी होतेच. देवळातल्या घडाळ्याने सातवर काटा नेला आणि लिटरली हर हर महादेवच्या आवेशात घटना घडल्या. अचानक गाभार्यापासून सभामंडपातले आणि आजूबाजूचे लाईट लागले, नगारा सुरु झाला, स्पीकरवर भजन सुरु झाले. आम्हा सगळ्यांना हे असे अचानक काय झाले हे कळेचना. विचार केला की कुठेतरी एकच बटन असेल आणि संध्याकाळच्या पुजार्याने ते चालू केले असेल. पण ७.३० झाले तरी मंदीरात कोणी येईचना. मग आम्ही बुचकळ्यात पडलो. ७.४५ झाले तशी जसे एकदम सुरु झाले होते तसे एकदम सगळे बंद झाले. आम्ही टरकलोच, म्हटले ही काय भानामती झाली ?? ८.०० वाजता एक गावकरी आम्ही सांगीतलेला चहा घेऊन आला, पण तो तर नॉर्मल वाटत होता . आमचा पहीलाच त्याला प्रश्ण की हे काय होते. त्याचे अतीशय कॅज्युअल उत्तर "ह्या, ते होय. ते टायमर वर चालते".. हे भगवान.. कुडपण सारख्या अतिशय दुर्गम खेड्यात असे टायमरवर ऑपरेट होणारे देऊळ आणि त्याची व्यवस्था आम्ही कल्पिलेही नव्हते.
तो गावकरी आला थोडाच वेळ पण आमचा मस्त बनलेला मुड खराब करून गेला. पहील्यांदा त्याने आम्हाला घाबरवले, म्हणाला की तुम्ही ज्या वाटेने कुमठ्यावरून आलात त्या एरीयात हल्ली अस्वलांचा आणि रानडुकरांचा वावर भयानक वाढला आहे. तुमचे नशीब की तुम्ही सुखरूप आलात. असे म्हणून त्याने गेल्या आठवड्यातल्या एका गावकर्याच्या झालेल्या शिकारीचा फोटो मोबाईलवर दाखवला. अत्यंत भयावह दृश्य, एका सुळेवाल्या रानडुकराने त्याला अक्षरशः उभा फाडला होता. जागच्या जागी खलास . हे बघीतल्यावर आम्ही किती सुदैवी ठरलो याची आम्हाला जाणीव झाली. त्याला विचारले की उद्या आम्हाला इथून वडगावला जायचे तर कोकणात कसे उतरु. त्याचा प्रतीप्रश्ण, "वडगाव ला उतरून काय करणार", "तिथून पुढे खेड आणि पुढे मुंबई" - आम्ही. "मंग मुंबईला जायला वडगावला कश्याला जायला लागतेय, इथूनच १० ची पोलादपूर एस्टी पकडा आणि जा की मुंबईला". जा की काय कप्पाळ. आता आम्ही त्याला आमचा प्लॅन समजावण्याच्या भानगडीत पडलो नाही. विचारले की इथून वडगावला जायला वाटा कीती. त्याच्या म्हणण्यानुसार दोन, महारखींडीची एक वाट आनी दुसरी निगडा घाटाची. महार खिंडीची वाट पावसाळ्यात अतीशय अडचणीची आणि लांबची. निगडा घाट जवळचा पण जंगलातला. पण प्रॉब्लेम असा होता की शेतीची कामे आणि शहराकडे गेलेले असल्याने वाटेने सोबतीला येणारे गावातले कोणी नव्हते. अस्वलाच्या आणि रानडुकरांच्या भीतीने आम्हीही गावकर्यांशीवाय जायचा धोका घेऊ इच्छीत नव्हतो.
शेवटी नाईलाजानेच चौथ्यांदा प्लॅनमधे बदल करून सकाळी लवकर उठून फक्त कुडपण शेजारचा खडशीचा धबधबा आणि भिवाची काठी सुळका बघून १०.०० च्या गाडीने पोलादपूरमार्गे परतायचे ठरले. मग बॅगेतले रेडीटूईट काढून जेवून झोपून गेलो.
-------
दिवस पहीला समाप्त
------
दिवस दुसरा
सकाळी जाग येण्याकरता वेगळे काही करावेच लागले नाही. देवळाचा टायमर होता ना . ठरल्या प्रमाणे सकाळी ६.०० ला सगळे सुरु झाले . भिवाची काठी सुळका आणि खडशी धबधबा कुडपण गावापासून थोडासा लांब आहे. रस्त्यावरून पोलादपुरच्या दिशेला गेल्यावर १ ते १.५ किमीवर अजून एक कुडपन आहे. ही कुडपन बौद्धवाडी, तिथेच हा धबधबा आहे आणि एक्झॅकटली समोर भिवाची काठी सुळका (हा सुळका साधारन ६०० फुट आहे आणि मुख्य डोंगररांगेपासून सुटावलेला आहे. यावर आरोहणदेखील झाले आहे.). तसे तिसरे कुडपण पन आहे, त्याला मोर्यांचे कुडपन म्हणतात ते डोंगराच्या पलीकडे आहे. आम्ही राहीलो ते कुडपन बु. किंवा शेलारांचे कुडपण. (पुर्वी ह्या तिनही गावांना कुडपण १, कुडपण २, कुडपण ३ अशी सिंपल नावे होती ).
देवळातुन बाहेर पडून डांबरी रस्त्याने कुडपण १ कडे चालायला लागलो, अर्धा रस्ता चालल्या नंतर सगळा नजारा समोर आला. काय जबरदस्त व्ह्यू.. अफलातून.. वर्णन करायला शब्द अपुरे. डावीकडे भिवाची काठी, उजवीकडे खडशी धबधबा, मधे प्रचंड खोल दरी आणी तळापासून समोर लांबवर पसरलेले वेडेवाकडे घनदाट जंगल. समोरच्या जंगलाच्या टोकाला कुठेतरी वडगाव होते. जरा पुढे गेलो तर खडशी धबधबा समोर आला. पाऊस उणावल्याने बारीक धारेचा जरी पडत असला तरी मी इतकी वर्षे भटकताना बघीतलेल्या धबधब्यात याचा नंबर फार वरचा. वरुन तो जो सुटलाय तो सरळ थेट १००० फुट दरीत कोसळतो. ऐन पावसाळ्यात रौद्र पण लोभसवाणा दिसतो. याचे आंतरजालावर फोटोही उपलब्ध आहेत.
कुडपण गाव
खडशी धबधब्याचा पहीला व्ह्यू
खडशी धबधबा, भिवाची काठी सुळका, जगबुडी नदीची दरी आणि वडगाव
इथे फोटोग्राफी करून पुढे गेलो तो कुडपण १ वस्ती लागली. कोणाच्यातरी घरी चहा प्यावा म्हणून आम्ही वस्तीवर गेलो तर गावकरी म्हणाले इकडे कुठे. मग सगळा सविस्तर प्लॅन त्यांना सांगीतला आणि वडगावला कोकणात उतरता येत नसल्याचे दु:ख देखील बोलून दाखवले. मग अचानक काय कसे झाले पण बोलण्याची गाडी अचानक निगडा घाट उतरण्याकडे वळली. फासे मनाजोगते पडले म्हणा की अजून काय, गावातला एक जण त्याच्या दिवसभराच्या मजूरीवर यायला तयार झाला. आम्ही नाही म्हणण्याचा प्रश्नच नव्हता. पन मुख्य अडचण वेळेची होती. आत्ता वजले होते ९.००. वडगावला खेडवरून एस्टी येते १.३० वाजता म्हनजे आमच्या हातात होते जेमतेम ४ तास. आमच्या गावकर्याच्या मते जर आम्ही त्याचा चालीने चालतो तर ३.३०-४.०० तासात वडगावला पोचणे शक्य होते. बरोबरच्यांचा कौल घेतला. सगळे एका पायावर तयार झाल्यावर चहा घेऊन ९.३० ला निघालो. ह्या बौद्धवस्तीतुनच एक वाट खडशी धबधब्याच्या टॉप ला जाते, तिकडे दुर्लक्ष्य करुन पलीकडील भिवाच्या काठीकडे नजर टाकून निघालो. वस्तीच्या पाठीमागे भात शेती आहे, तिथेच एका मळ्यात माझा पाय भासकन फुटभर एका मोठ्या खेकड्याच्या बिळात गेला आणि मी शेतात आडवा झालो . मला लागले नव्हते पण सगळा चिखलात बरबटलो होतो. तसाच पुढे निघालो.
वस्तीच्या पाठीमागे लगेचच निगडा घाट सुरु होतो. हे दिसते तेव्हढे साधे प्रकरण नाही हे लगेच लक्षात आले कारण घाट सुरु झाल्या झाल्या पहील्या वळणावरच आम्ही ८-१० फुट खाली उतरलो. अक्षरशः एकमेकांच्या डोक्यावरुन उतरतोय की काय असा भास व्हावा असा ग्रॅडीएंट होता. पण थांबायला वेळ कुठे होता. अंधुकशी वाट झाडाझुडुपातुन जात होती आणि बरी होती म्हणण्यापेक्षा एकच होती आणि गावकरी पुढे होता. तो तर सटासट स्लीपरवर उड्या मारत झाडे बाजूला करत जात होता आणि आम्ही त्याच्या मागे धडाधड उतरत होतो. वाटेच्या एकंदर अवस्थेवरून असे वाटत होते की शिकारी किंवा अस्सल भटके ट्रेकर या शिवाय ह्या वाटेचा कोणी क्वचीतच वापर करत असेल. आम्ही दुसर्या प्रकारतले तर, आमच्या गावकरी पहील्या प्रकारातला :). धबधब्याला समांतर एकेक पावलाला ३-४ फुट उतरत चाललो होतो. चाललो होतो म्हणण्यापेक्षा उभे उतरत होतो. शेजारीच खडशी धबधबा जणवत होता आणि मधूनच त्याचा आवाज येत होतो. असाच एक तास उतरल्यावर पार तळात आलो आणि पहीली सपाटी आली. इथे दोन वाटा फुटत होत्या डावीकडची वाट धबधब्या पायथ्याला जात होती (गावकर्यांच्यामते तिथे मोठे कुंड आहे आणि बारमाही पाण्याचा साठा. शिकारीच्या वेळेला त्यांचा तो रात्रीचा अड्डा) आणि सरळ जाणारी वडगावकडे. आम्ही सरळ जाणारी वाट पकडली आनी जंगलात घुसलो.
रच्याकने: हा धबधबा आनी भिवाची काठी मधली दरी म्हणजेच खेडच्या प्रसिद्ध जगबुडी नदीचा उगम.
जंगल कसले ते मिनी अॅमॅझॉनच होते ते. पायाखालची अस्पष्ट अशी वाट, ओला पाला पाचोळा तुडवत आम्ही चालत होतो. २ तास झाले होते निघाल्या पासून पण जराही ब्रेक घेतला नव्हता. एका बर्या ठिकाणी बघून आम्ही १० मि. विसावा घेतला. पाठीमागे वळून बघीतले तर आम्ही कसे आलो ते कळत होते. समोर नाळ (हाच तो निगडा घाट जो उतरून आम्ही आलो होतो), शेजारी दरी आणि पलीकडे भिवाची काठी सुळका. हाच धबधबा, दरी, सुळका काही तासांपुर्वीच आम्ही वरुन बघीतला होता आणि आता खालून बघत होतो. डोळे फिरवणारे दृष्य होते ते. दरीच्या पायथ्याला नदीशेजारी घनदाट जंगलाच्या मध्यभागी असा ब्रेक घेणे ही कल्पनाच जरी जबरी रोमांचकारी असती तरी आम्हाला जास्त वेळ घालवून चालणार नव्हता. एव्हाना आमचं आणि गावकर्याचं मस्त ट्युनींग जमल होत. आता पार नदी पळाशी आल्याने जंगल चालत रहाणे हाच एक कार्यक्रम राहीला होता.
असे जात असताना प्रथमच नदी ओलांडायची वेळ आली. मग तिथे संधी न दवडता फ्रेश झालो. अहाहा... नदीचे वाहते जंगलातील थंड पाणी. सुख अगदी... . पलीकडील तिरावर आल्यावर जंगल चालण्याचा कार्यक्रम परत चालू. असेच १० मी. चालल्यावर परत नदी ओलांडून अलीकडे आणि परत सुरु. असे दोन-तीन वेळा घडले. तुम्हाला सांगतो गावकर्यावर १००% विश्वास होता म्हणून बिनधास्त चालत होतो त्याच्या मागून. गावकरी घेतला नसता आम्हाला हे वडगाव निगडा घाटाचे कोडे सोडवणे अशक्य होते. हा भागच असा आहे ना की माहीतगाराशीवाय या अश्या भयाकारी जंगलात शिरणे म्हणजे जिवाशीच खेळ. केवळ गावकरी होता म्हणून आम्ही आरामात चालत होतो. साधारण एक तास असे चाललो असू तरी गावाच्या खूणा काही येईनात पण आता पुर्वी कधीतरी वहीवाटीतील असावेत असे वाटणारे शेतांचे चौकोनी तुकडे सुरु झाले होते. असे वाटत होते की वडगांव जवळच आहे पण आमचा गाईड "वडगाव आले हो" हे शब्द काही उच्चारायला तयार नव्हता. सकाळी ७ ला चाल सुरु केली होती आणि आत्ता वाजले होते १२.३०. छोटे छोटे एकाद दोन ब्रेक सोडले तर सतत चालत होतो. शेवट १ वाजायला आल्यावर गावाच्या खुणा दिसायला लागल्या आणि अखेरीस १.१५ वाजता वडगाव ला पोचलो.
निगडा घाटाची सुरुवात
निगडा घाट उतरताना
अत्यंत घनदाट जंगलातून निगडा घाट उतरताना. मध्यभागी वडगाव गावाची दिशा.
वाटेवरचे घनदाट जंगल. निगडा घाट उतरून तळाशी आल्यावर रस्ता अश्या नदीकाठाने जंगलातून वडगावकडे जातो.
जगबुडी नदी आणि जंगल.
जगबुडी नदी.
निगडा घाट उतरून आलो ती नाळ मध्यभागी.
भिवाची काठीसुळका तळातून
घनदाट जंगलातून वडागावकडे जाताना.
वडगावकडे. फोटोच्या मध्यभागीच्या डोंगराच्या पाथीमागे वडगाव गाव आहे.
वडगाव गावाची घरे दिसायला लागल्यावर गाईडला बिदागी देऊन परत पाठवले आणि १.३० ची एस्टी पकडायला निघालो. तो बस स्टॉपपण गावाच्या पार पलीकडे होता. १.३० ला म्हणजे निघाल्या पासून बरोब्बर चार तासानी वडगाव बस स्टॉपवर पोचलो. कसला परफे़क्ट अंदाच वेळेचा. अर्थात हा अंदाज चुकला असता तर वडगावात वस्ती करण्याशिवाय पर्याय नव्हता कारण १.३० वाजताची ही शेवटची एस्टी होती खेडला जाणारी. पाठीमागे वळून बघीतले तर केवळ अफलातून अशक्य अशी वाटणारी चाल अश्या भयाकारी घनदाट जंगलातून केवळ स्थानीक गावकर्याच्या भरवश्यावर आम्ही हाणली होती.
--------
वडगाव सह्यकुशीत अगदी अंतर्भागात दोंगरदरीच्या बेचक्यात वसले आहे. गाव तसे मोठे, खेडवरून बस येते (येते म्हणजे काय तर एस्टी हेच एकमात्र प्रवासाचे साधन कारण इथून खेडला पोचायला २.३० लागतात. म्हनजे इथल्या लोकाना शहराचा पहीला संपर्क २.३० तास लांब आहे ), लाईट आहे पण एकंदरीतच बेसीक सुवीधांची कमरतता.
--------
हे वडगाव म्हणचेच ट्रेकर्समधे प्रसिद्ध असणार्या महीपतगडाच्या पुर्वीकडील पायथ्याचे गाव. महीपतगडावरून वडगावला यायला अशीच ३-३० तासाची जंगल वाटचाल करावी लागते. १.३० वाजताची बस चक्क १.४५ वाजता आली आणि यु टर्न करुन निघून गेली. आम्ही बघतच बसलो. नंतर कळले की शेजारच्या वस्तीपर्यंत जाऊन परत फिरून येणार आहे. २० मि ती परत फिरुन आली आम्हाला खेडला घेऊन गेली. खेडला उतरल्यावर शहरी झटके बसायला सुरु झाले. मुंबईची एकही बस न थांबणे, प्रचंड गर्दी, मग अश्याच कुठल्यातरी बस मधून उभ्याने पेण, पनवेल करत मुंबई गाठणे यात नेहेईप्रमाणेच घरी पोचायला रात्रीचे १ वाजला.
पण खेड ते मुंबई हा प्रवास त्रासदायक झालाच नाही कारण आम्ही ह्या दुनीयेत नव्हतोच मुळे, आम्ही हरवलो होतो दाभीळ टोकावर, किनेश्वरच्या गवतात, कुमठ्याच्या वाटेवर, कुडपणच्या ऑटोमॅटीक देवळात ( ), खडशी धबधब्याच्या अजस्त्रपणात, भिवाच्या काठीच्या भव्यपणात, निगडा घाटाच्या निबीड अरण्यात. असे हरवण्यातही असणारे सुख सह्याद्रीतल्या ट्रेकींगने आम्हाला असंख्य वेळा दिलेय.
"सह्याद्रीतल्या २ दिवसातल्या टॉनीकवर शहरातले २८ दिवस आरामात जातात हे इतक्या वर्ष्यांच्या अनुभवाने आम्हाला कळून चुकलेय ".
भेटू अश्याच एका ट्रेकला.
लेखनसिमा.
--------
इतरत्र पुर्वप्रकाशीत...
सर्व फोटो माझ्या मोबाईल कॅमेरातून...
रच्याकने: दोन वर्षांपुर्वी हा ट्रेक केल्यापासून ह्यावर्षीच्या पावसाळ्यापर्यंत मी आमच्या पहील्या केलेल्या घाटाला सावीत्री घाटच समजत होतो पन माझा एक ट्रेकर मित्र पावसाळ्यात ह्या भागात ट्रेक करून आला आणि त्याने खात्री केली की आम्ही केला तो दाभीळ टोक घाट आणि सावीत्री घाट दुसरा आहे पण सध्या अनेक वर्ष्यांमध्ये कोणी न गेल्यामुळे संपुर्ण मोडला आहे. काहीका नाव असेना, ना बदलले म्हणून आमच्या आनंदात शतांशानेही फरक पडला नाही
--------------
जबराट, खतरनाक व्ह्यू आणि
जबराट, खतरनाक व्ह्यू आणि तितकेच प्रत्ययकारी वर्णन.
अजून घाटवाटा पण येऊ देत
एक नंबर, कड्डक,
एक नंबर, कड्डक,
फोटो आणि वर्णन दोन्ही जबरा !
२००० रु होतील अशी स्वच्छ आणि
२००० रु होतील अशी स्वच्छ आणि स्पष्ट ऑफर Happy :).
वाईट परिस्थिती, असो बाकी माहिती छान.
बाबौ! काय वर्णन आणी फोटो आहेत
बाबौ! काय वर्णन आणी फोटो आहेत ! धन्य आहात तुम्ही लोक. खरोखर निसर्ग जगता. नाहीतर आम्ही, बसलोय कीबोर्ड बडवत.
मस्तच वर्णन आणि प्रचि
मस्तच वर्णन आणि प्रचि
क्या बात है. अगदी फिल आला
क्या बात है. अगदी फिल आला निगडाच्या जंगलाचा.. मस्तच!
व्वा मस्तच लिव्हलय.. भारी
व्वा मस्तच लिव्हलय.. भारी
जबऱ्या ट्रेक केलात एकदम
जबऱ्या ट्रेक केलात एकदम तंगडतोड आणि ऑफबीट सुद्धा अशा ट्रेकमध्ये भटक्यांचा खरा कस लागतो.ट्रेक वर्णन आणि फोटो दोन्ही खूप छान...
अतिशय सुंदर वर्णन
अतिशय सुंदर वर्णन
पोलादपुर, हलदुले, कापडे,
पोलादपुर, हलदुले, कापडे, कुड्पण सगळी जवळची ऐकलेली नावं.
माझ्या आईचं आजोळ हलदुल्याच्या पुढचं केवनाळे गाव.
हालदुल्यातही बरेच नातेवाईक आहेत. कापड्यातही.
लहान असताना ३-४ वेळा गेले आही मी. आई-आज्जी-मामाबरोबर केवणाळ्याला.
केवनाळच्या घराच्या ओटीवरुन प्रतापगड दिसतो.
छान लिहिलाय वृत्तांत.
जबरदस्त झालाय ट्रेक , माहिती
जबरदस्त झालाय ट्रेक , माहिती पण सुंदर ...
!!!जबरदस्त!!! अतिशय सुंदर
!!!जबरदस्त!!! अतिशय सुंदर ट्रेक वर्णन
सुपर्ब वर्णन आणि फोटोज.
सुपर्ब वर्णन आणि फोटोज.
वा सुरेख ट्रेक
वा सुरेख ट्रेक