निरुत्तर...

Submitted by विद्या भुतकर on 11 October, 2017 - 22:21

संध्याकाळची वेळ, गर्दी, ट्रॅफिक, वाहनांचा आवाज आणि प्रदूषण यांनी कंटाळलेला तो, एक सिग्नल ग्रीन होईपर्यंत थांबला होता. आख्खा एक मिनिट थांबावं लागणार म्हणून तो चांगलाच वैतागला होता. इकडे-तिकडे पाहत वेळ घालवत असतानाच त्याला डाव्या बाजूला एका रिक्षात बसलेली व्यक्ती दिसली. ती त्याच्याकडेच पाहत होती. ती हसली आणि तो आश्चर्याने उडालाच. सायलीच होती तर ती. Happy जरा गाल वर आलेले पण तेच तोंडभरून हसू आणि ओसंडून वाहणारा उत्साह. आणि हो तिच्याबरोबर एक बाळ पण होतं छोटासा. @-@ तिने रिक्षावाल्याला 'भैय्या यही रोक देना' म्हटल्यावर त्यानेही गाडी बाजूला लावली. आणि जवळच्याच हॊटेलात ते शिरले.
'काय गं? कधी आलीस परत? कुठे राहतेस सध्या? हे कधी म्हणे?' , बाळाकडे पाहत त्याने विचारले.
ती हसून म्हणाली 'अरे, हो,हो...सगळं सांगते.जरा धीर धर. काही खायचं-प्यायचं तरी सांगू आधी.'

मग मोठ्या मुश्किलीने मेनू कार्डवर पाहून त्याने काही-बाही सांगितलं आणि तो म्हणाला, 'हं, आता बोल पटापट...' सायली सांगू लागली, 'अरे, खरं तर भारतात परत यायचा काय प्लान नव्हता अमितचा. पण त्याचे आई-बाबा काही तिकडे जास्त दिवस राहत नाहीत, त्यांना करमतही नाही. त्यामुळे शेवटी आम्हीच इकडे येण्याचा निर्णय घेतला. आणि ही आमची मुलगी, 'जान्हवी'. जानूच म्हणतो सगळे. Happy तिलाच दवाखान्यात घेऊन गेले होते. हवा बदल झालाय ना, म्हटलं काय काय खबरदारी घ्यावी लागते ते विचारावं डॊक्टरना. सध्या कोथरुडलाच राहतोय. नवीन घर बघतोय. अमितसाठी तिकडूनच नोकरी पक्की करून निघालॊ होतो. मला नवीन शोधण्यापासून तयारी.' तो बोलला, 'अगं, माझ्याकडे दे ना रेझुमे, मी ही आमच्या कंपनीत देतो. बाकी पोरगी फारच गोड आहे. तुझ्यासारखीच दिसतेय हसताना.'

त्याला कळत नव्हतं की आपली ही अवखळ मैत्रीण एव्हढी मोठी झाली याचं कौतुक वाटत होतं की तो इवलुसा जीव तिचाच एक अंश होता याचं. त्याला त्यांचा भूतकाळ आठवत होता. कॉलेजमध्ये नेहमीच बरोबर असणारे हे दोघे नोकरी लागली आणि वेगळे झाले. तसे त्यांचे मित्र-मैत्रिणी त्यांना बरेच चिडवत असत पण त्यांनी कधी लक्ष दिले नाही. कधी दोघांना वाटलेही की आता तो/ती बोलेल मनातली बात पण कुणीच बोललं नाही. नोकरीत असताना त्याला कधीतरी कळलं की सायलीच लग्न ठरलंय. तो काही गेला नाही आणि परत त्यांची भेटही झाली नाही. त्याने बरेचदा विचार केला की काय झालं असतं मी तिला सांगितलं असतं तर? ती हो म्हणाली असती का? का तसं काही नव्हतंच मुळी? आणि दोघं राहिलो असतो सोबत तरीही मैत्री इतकंच प्रेमही सफल झालं असतं का? बाळाच्या रडण्याने तो एकदम भानावर आला. सायली जानूला हसवण्याचा प्रयत्न करत होती.

सायली म्हणाली, "तू काय करतोस सध्या?

तो, "एका कंपनीत म्यानेजर आहे. कॉलेजनंतर MBA पण केलं, मग नोकरी. मध्ये अमेरिकेत आलो होतो पण तुझा काही पत्ता नव्हता माझ्याकडे.
सायली," हो,माहीतेय, तू सफाई द्यायचं काही कारण नाहीये. बाकी, लग्नाचं काय? कुणी पोरगी भेटली की नाही?"

तो," आई-बाबा पाहताहेत सध्या. तू बोल कसं चाललंय सगळं?"

सायली," मस्त रे ! सुरुवातीला अवघड जातं होतं अमितला आणि मला समजून घेणं पण आता दोघांनाही एकमेकांचा स्वभाव कळलाय. तोही फार बोलका आणि एकदम साधा आहे. मीच जरा जास्त आगाऊ होते. Happy त्याने समजून घेतलं बरंच. विशेषतः: परदेशात आम्ही दोघंच होतो आधी. तेव्हा तर जास्त गरज होती समजून घेण्याची. बरेचदा जुन्या मित्र-मैत्रिणींची खूप आठवण यायची, मग त्याचीही सवय झाली. तू तर गायबच झालास नंतर. लग्नाला पण आला नाहीस."

तो काय बोलणार होता यावर? कसं सांगणार होता की किती आवरलं होतं त्याने स्वतः:ला आणि पश्चात्तापही केला होता तिला आपल्या मनातलं न बोलल्याचा. त्याच चुकीची केव्हढी मोठी शिक्षा तो भोगत होता.
तीच पुढे म्हणाली," किती अवघड असतं नाही कॉलेजांबाहेरचं जग? नोकरीच नव्हे घरातही किती उलाढाल होत असते. सगळ्य़ांना सांभाळून घ्यावं लागतं. सासू-सासरे, नणंदा, दीर, सासर-माहेरचे नातेसंबंध. फार त्रास झाला सुरुवातीला. हॉस्टेलवर कुठे रे हे सगळं बघावं लागतं? आपण बरे आणि आपले मित्र-मैत्रिणी. प्रेमात आणि संसारात फार फरक असतो रे. मला लाख वाटतं माझ्या नवऱ्याने मला रोज गुलाबाची फुलं देऊन उठवावं, पण सासरी सगळ्यांची उठाठेव करताना कळत की आपण किती बावळट होतो असल्या अपेक्षा ठेवताना. आपण किती भांडायचो नाही फालतू कारणांवरून? आता खूप वेळा स्वतः:च समजून घ्यावं लागतं, गप्प बसावं लागतं. तुलाही आत्ताच सांगते, ही सगळी प्रेमाची सोंग चार दिवस चालतात. भाजी आणायला जाणाऱ्या नवऱ्याच्या तोंडावरचे भाव पाहिल्यावर कळेल तुला. Happy "

सायली जानूला काही हवं-नको बघत पुढे म्हणाली, " आता हेच बघ ना, तुला तर माहीतेय मला लहान मुलांशी खेळायला किती आवडायचं, पण आता हिला सांभाळताना कळताहेत सगळे कष्ट. धड शांतपणे खाताही येतं नाही. मला किती राग यायचा कुणी जेवताना उठवलं तर आणि आता रोजचंच झालंय. तसा अमितही खूप मदत करतो. रात्री मला जाग आली नाही तर हिचं सगळं तोच बघतो. नोकरीमुळे घरची कामे एकटीला होत नाहीत त्यातही बरीच मदत करायचा तो. तू शिकला का रे काही जेवण बनवायला? किती आळशीपणा करायचा तुम्ही मुलं तेव्हा. रूमही धड साफ नसायची. बरं झालं परदेशी राहिलास ते, तिथं राहिलं की सगळेच शिकून जातात बरोबर. "

त्याला अजूनच वाईट वाटत होतं हे सगळं ऎकताना. त्याला नेहमी वाटायचं आपण दोघे मिळून सगळं सांभाळून घेतलं असतं, तिला अगदी फुलासारखं जपून ठेवलं असतं.आणि ती म्हणाली तसाच असला संसार, तरी त्याला तोही तिच्यासोबतच करायचा होता. छोट्या-मोठ्या भांडणात, तेच मिटल्यावर प्रेमात, कंटाळलेल्या,थकलेल्या दोघांच्या रोजच्या जीवनात जे क्षण मिळतात तेच तर त्याला तिच्याबरोबर वाटून घ्यायचे होते. पण हे सगळं तो तिला थोडीच सांगू शकणार होता? त्याने विषय बदलण्याचा प्रयत्न केला. ते दोघं जुन्या मित्र-मैत्रिणींबद्दल बोलू लागले. कोण कुठे असतो, काय करतो, आता परत आल्यावर कुणाकुणाला भेटायचं आहे, इ.इ. त्याने तिला विचारलंही की शनिवारी येणार का ३-४ जण तरी भेटतील. पण तिला कुठेतरी जायचं होतं, नातेवाईकांकडे. त्याने तोही विषय सोडून दिला मग. समोर आलेलं खाणं लवकर संपवून जावंस त्याला वाटत होतं.

शेवटी तिच म्हणाली, "चल मला जावं लागेल. बराच वेळ झाला. घरी जाऊन आवरायचं बरंच. अजून घर नीट लावलंही नाहीये. तुझा नंबर दे ना, बोलूच आपण मग परत". बिल भरून ते दोघं बाहेर येऊन थांबले तिच्यासाठी रिक्षाची वाट बघत.

ती अचानक त्याला म्हणाली," तुला माहीतेय मी नेहमी विचार केला आपल्या दोघांचा. मला सारखं वाटायचं की आपण दोघं असतो तर कसे राहिलो असतो? काय केलं असतं? पण तू कधी बोललाच नाहीस. मग मी ही स्वतः:ला गुंतवून घेतलं बाकी गोष्टीत. बरेचवेळा अमितची तुझ्याशी तुलना केली त्यामुळेच अमितशी जुळवून घेताना फार अवघड गेलं मला. पण त्याच्याबरोबर राहिल्यावर जाणवलं की मनमोकळं असलेलं किती चांगलं असतं. शंका, अहंकार सगळं विसरून प्रेम करायचं असतं. खरंच जर तुला सांगायचं असतं, मला थांबवायचं असतं तर तू ते केलंच असतंस. ते तू केलं नाहीस आणि मी ही. कदाचित आपण दोघंही खूप सारखे आहोत. कदाचित दोघांचाही अहंकार आपल्याला नडला आणि पुढेही नडला असता संसारात. त्यामुळे मी स्वत:लाच समजावलं, कदाचित सोबत राहूनही आपलं पटलंच नसतं.........."
समोर आलेली रिक्षा थांबवून ती निघूनही गेली होती. पुन्हा एकदा त्याला उत्तर द्यायची संधी न देता........

-विद्या भुतकर.
https://www.facebook.com/VidyaBhutkar1/

त.टी. (ही माझी एक जुनी कथा आहे. १०-१२ वर्षे जुनी. इथल्या वाचकांसाठी पोस्ट करत आहे.)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कदाचित दोघांचाही अहंकार आपल्याला नडला आणि पुढेही नडला असता संसारात.
>>> मला नाही वाटत तो अहंकार होता.. कधी कधी बोलायचे असून व्यक्त न करता येणे - मोस्टली भीती असू शकते..
झालं ते चुकीचं झाले !

कथा छान आहे. पण काही वेळेला अश्या प्रसंगात हळव्या लोकांना अहंकारापेक्षा मैत्री तुटण्याची भीती थांबवते.

आवडली कथा, खरे आहे बरेचदा व्यक्त होणे प्रत्येकाला जमत नाही.
अन नंतर हातातुन सगळे निसटुन गेल्यावर जाणीव होते, पण त्याचा तेव्हा काही ऊपयोग नसतो.
मनात फक्त एक खंत शिल्लक राहते

याला अजूनच वाईट वाटत होतं हे सगळं ऎकताना. त्याला नेहमी वाटायचं आपण दोघे मिळून सगळं सांभाळून घेतलं असतं, तिला अगदी फुलासारखं जपून ठेवलं असतं.आणि ती म्हणाली तसाच असला संसार, तरी त्याला तोही तिच्यासोबतच करायचा होता. छोट्या-मोठ्या भांडणात, तेच मिटल्यावर प्रेमात, कंटाळलेल्या,थकलेल्या दोघांच्या रोजच्या जीवनात जे क्षण मिळतात तेच तर त्याला तिच्याबरोबर वाटून घ्यायचे होते. >>
असं काही नाही त्या फुलाचे लग्नानंतर काटे टोचले की फुलासारखं जपुन ठेवायचं विसरुन जात..

अग्निपंख +१

म्हणजे लग्न वाईट नसतं.. पण लग्न न केलेल्या माणसांना आपण 'हे करू.. ते करू' असं काय काय वाटतं ते सगळं शक्य होईलच असं नाही हे कळायला लग्न व्हावं लागतं.

मला कथा वाचताना का कोणास ठाउक पण सायलीचं पात्र वाचताना ती सद्ध्या काय करते मधली तेजश्री प्रधानच येत होती डोळ्यासमोर.

छान कथा...
नवीन Submitted by पियू on 12 October, 2017 - 08:11
....पण काही वेळेला अश्या प्रसंगात हळव्या लोकांना अहंकारापेक्षा मैत्री तुटण्याची भीती थांबवते.
+१
त्या त्या वेळी खुप कन्फ्यूजन असतं.. तिला आपल्यासारखंच वाटत असेल का? नक्की काय बोलेल? कधीतरी तिच स्वत: हून बोलेल, आपण सांगितल्यानं मैत्री तुटली तर...वैगरे नाना गोष्टी मनांत काहूर करतात. शेवटी वेळ निघून जाते. मनातलं मनातच राहून जातं. अव्यक्त प्रेम नंतर कळतं तेव्हा निरूत्तर करतंच कारण 'जरतर' ला महत्व उरलेलं नसतं.

मला कथा वाचताना का कोणास ठाउक पण सायलीचं पात्र वाचताना ती सद्ध्या काय करते मधली तेजश्री प्रधानच येत होती डोळ्यासमोर.
>>>
हाहा प्लस सेव्हने एटी सिक्स. मलाही तीच आठवत होती. आणि शेवटाला अहंकाराचा अँगल वाचून तर मग अगदीच तीच ती झाली Happy

अहंकार हे एक कारण झाले. भिती हे दुसरे. संकोच हे तिसरे. ... आणि अशी बरीच असू शकतात.

छान आहे कथा.

म्हणजे लग्न वाईट नसतं.. पण लग्न न केलेल्या माणसांना आपण 'हे करू.. ते करू' असं काय काय वाटतं ते सगळं शक्य होईलच असं नाही हे कळायला लग्न व्हावं लागतं. >> +१