फुलोंकी घाटी अर्थात व्हॅली ऑफ फ्लॉवर्स - जोशीमठ

Submitted by साधना on 11 October, 2017 - 13:32

आधीचा भाग : https://www.maayboli.com/node/64171

रात्री झोप नीटशी लागली नाही. तिनालाच जाग आली. साडेतिनला दरवाजावर थाप पडली, चहा घ्या म्हणून.   चहा घेऊन, सगळे आवरून, पॅक लंच घेऊन पावणे सहाला निघालो. ब्रेकफास्ट गाडीतच होणार होता.

उत्तराखंड हिमालयाचा पायथा व आजूबाजूला पसरलेल्या भागात आहे.  उत्तर बाजू हिमालयात येते, उत्तरखंडातली सगळी उंच शिखरे म्हणजे नंदादेवी, बद्रीनाथ, कामेत ह्या भागात येतात.  तिथले सगळ्यात उंच शिखर नंदादेवी साधारण 7800 मीटर उंचीवर आहे. म्हणजे जवळ जवळ 25,000 फूट.  दक्षिणेला शिवालीक रेंज आहे. जिम कॉर्बेटचा प्रसिद्ध कुमाऊं भाग यात येतो. याच्या खालच्या टोकाला दलदलीचा तराई भाग येतो.

आमच्या ह्या सफरीत आम्ही हरिद्वार-ऋषिकेश पासून सुरवात करून फुलोंकी घाटी-हेमकुंड साहिब करणार होतो व पुढे बद्रीनाथला जाणार होतो व तिथून परत ऋषिकेश.  हरिद्वार-ऋषिकेश समुद्रसपाटी पासून साधारण 1,200 फूट उंचीवर आहे, फुलोंकी घाटी 12,000 फुट उंचीवर तर हेमकुंड साहिब 15,000 फूट उंचीवर आहे. चारधामातले बद्रीनाथ त्या मानाने खाली आहे,  10,800 फूट उंची. 

1,200 फुट उंचीवरून सुरवात करून आमचा पहिला टप्पा होता जोशीमठ 6,150 फूट उंचीवर. 

ऋषिकेश ते जोशीमठ अंतर फक्त 250 किमी असले तरी रस्ते गोल गोल वळणे घेत वर चढत असतात त्यामुळे वेगावर बंधन येते. उत्तराखंडात बहुतांश सँड स्टोन व स्लेट स्टोनचे प्राबल्य आहे. हे दगड म्हणजे इथे महाराष्ट्रात दिसतात तसे दगड नाहीयेत तर आकाराने प्रचंड मोठे असे बोल्डर्स आहेत, शिळा म्हणता येतील.  याना धरून ठेवणाऱ्या मातीची सतत धूप होत असल्याने थोडा जरी पाऊस झाला तरी या शिळा गडगडत खाली येतात. एकेक खडक इतका मोठा की एकटा एका गाडीला आरामात दरीत घेऊन जाईल.

जून जुलै महिन्यात या भागात उन्हाळा असतो, चार धाम यात्री बहुतेक या महिन्यात येतात. ऑगस्टपासून मात्र पावसाला सुरवात होते व सोबत दरडी कोसळायलाही सुरवात होते.

कोसळलेली दरड

IMG-20171011-WA0056.jpg

बद्रीनाथपासून पुढे भारत चीन सीमारेषा असल्यामुळे इथे मिलिटरीचा वावर आहे. त्यामुळे दरड कोसळली तरी ती लगेच साफ करून रस्ता पूर्ववत केला जातो. बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन हे काम अतिशय वेगात पार पाडते.

IMG-20171011-WA0095.jpg

उत्तराखंडातले रस्ते चांगले आहेत पण जागोजागी वरून येणाऱ्या पाण्यामुळे व कोसळणाऱ्या दरडींमुळे रस्ता खराब होतो. या कारणामुळे 250 किमी पार करायला सहज 10 ते 12 तास लागतात. म्हणजे तेवढे लागले तर आपले नशीब फारच चांगले समजायचे. त्यापेक्षा जास्त वेळ लागू शकतो.

आमच्या गटात 28 लोक होते, 15 स्त्रिया व 13 पुरुष. गणपती बाप्पा मोरयाचा घोष करत आम्ही मिनीबसने निघालो.
गाडी गोल गोल फिरत जाते त्यामुळे पोटातही गोल गोल फिरायला लागते.  गाडीतल्या 1-2 सोबतीणी अधून मधून बस थांबवून उतरत होत्या बॉक बॉक करत. शामलीही  एकदा उतरली. हे सगळे पाहून मी घाबरून खाणेच टाळले.

वाटेत दिसलेला सूर्योदय:

IMG-20171011-WA0076.jpg

2.

IMG-20171011-WA0070.jpg

मध्ये एकदा गाडी थांबली, आम्ही सगळे हात पाय मोकळे करायला उतरलो. होय ना करता नाष्टाही तिथेच करायचे ठरले व शेवटी तिथेच तासभर गेला.  मला नाश्ता करण्यात रस नसल्याने मी इकडे तिकडे झाडे पाहत वेळ काढला.

IMG-20171011-WA0090.jpg

रस्त्यावर लिंबूसरबत, कणसे वगैरे विकणारे बरेच होते. आमच्या ग्रुपमधल्या काहींनी लिंबूसरबत घेऊन ते छान आहे असा निर्वाळा दिल्यावर मीही थोडे धाडस करून गेले सरबतवाल्याकडे.  रस्त्यावरचे खाणे म्हणजे पोट बिघडवून घेणे हे डोक्यात पक्के. प्रवासात पोट बिघडवून घ्यायची रिस्क कोण घेईल?  

स्टॉलवर गेल्यावर आधी त्याला विचारले, भय्या पानी कहासे लाये? तो म्हणाला यहा नॅचरल मिनरल वाटर मिलता है, वोही हम लाते है। मला आश्चर्य वाटले. म्हटले कहा है? त्याने थोड्या अंतरावरच्या एका पाइपकडे बोट दाखवले.  डोंगरावरचे पाणी घळीतून खाली येत होते, त्या घळीतच एक पाइपचा तुकडा घुसवून ठेवलेला. घळीतले थोडे पाणी त्या पाइपमधून येत होते, खाली बादल्या लावून हॉटेलवाले ते पाणी सैपाक व पिण्यासाठी वापरत होते. 

IMG-20171011-WA0074.jpg

ये पानी बहोत साफ है, इतना अच्छा पानी कही मिलेगा नहीं, पिके देखो जरा। मी आधी त्याच्या सरबताचा आस्वाद घेतला आणि मग पाईपचे पाणीही प्यायले. काय अमृततुल्य चव!

इथे मुंबईत क्लोरीनयुक्त पाण्याची चव तोंडात बसलीय.
त्या चवीपुढे तिथले डोंगरातून, दगड धोंड्यातून वाहत येणारे पाणी अगदी अमृताहून गोड लागले. नॅचरल मिनरल वॉटर ह्यापेक्षा वेगळे असूच शकत नाही. तिथे सगळ्यांनी आपापल्या पाण्याच्या बाटल्या भरुन घेतल्या.  त्यानंतर पूर्ण ट्रेकभर
असेच डोंगराचे पाणी आम्ही सगळे पित होतो. ट्रेक आटपून परत ऋषिकेशला आल्यावर विकतचे पाणी घ्यावे लागले.

 प्रवासात बसमधल्या लोकांचे नेहमीचे अंताक्षरीचे प्रयोग सुरू झालेले.  कोण कोण काय कसे आहेत याचा अंदाज यायला लागलेला.   2 मोठे ग्रुप होते. एक अमदाबादच्या मुलींचा ग्रुप व एक बेंगलोरच्या मुलींचा ग्रुप. मला गुजराती लोकांची थोडी ऍलर्जी आहे कारण स्थळ काळ न पाहता  गुजरातीत मोठमोठ्याने बोलणे ही त्यांची खासियत मला अजिबात आवडत नाही. गुजराती ग्रुपमधल्या 3 मुली कुठल्यातरी
वर्तमानपत्रात रिपोर्टर होत्या. मला त्या दैनिकाच्या वाचकांचे उगीचच थोडे वाईट वाटले.  पूर्ण ट्रेकभर त्या मुलींनी त्यांच्या बडबडीने कानांवर अत्याचार केले. त्यांच्यासोबत एक मुलगा होता.

त्याउलट बंगलोरकर मुली. अगदी सॉफिसटीकेटेड वागणूक. थोडी शिष्टपणाकडे  झुकणारी.  पण इतरांना आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजीही घेत होत्या. त्यांच्यासोबत 1 तरुण जोडपे होते जे हा ट्रेक आटपून पुढे लेहला जाऊन महिनाभर राहणार होते. हे ऐकल्यावर मी हेव्याने जळून मेले.  त्या जोडप्यासोबत एक गृहस्थ होते ज्यांना तो ग्रुप मामा म्हणून हाक मारत होत्या. 

दोन हरयानवी मित्र व दोन गुजराती मित्र होते.  गुजराती एकमेकांना इतके चिकटलेले की मी त्यांचे नामकरण रमेस व सुरेस केले. ते स्वतः व त्यांचा बिंनेस यापलीकडे बोलायला त्यांच्याकडे दुसरे काहीही विषय नव्हते. ते बालपणापासून एकत्र होते म्हणे.   दोघा हरयानवीमधला एक बँकेत होता, प्रचंड बडबड्या, थोडा फ्लर्ट पण लाघवी. आवाज चांगला होता व सुरात होता. ऑफ बिट गाणी तोंडपाठ होती. त्याचा मित्र मात्र अबोल होता, हा आमचा को ग्रुप लीडर होता.

ऐशु पर्यावरण पर्यवेक्षक होती. म्हणजे ट्रेकदरम्यान कोणी कचरा इथे तिथे टाकत तर नाहीय ना हे बघणे तिची जबाबदारी होती.  बाकी उरलेल्यात एक धुळ्याचे
कुलकर्णी जोडपे होते, मुंबईची एक सीए मुलगी नूपुरा होती, शामली तिला लगेच चिकटली.   एक मुंबईचाच फोटोग्राफर अशोक होता जो भल्यामोठ्या लेन्सचा कॅमेरा घेऊन अखंड फोटो टिपत होता.

आमचा ग्रुपलिडर महेशही मुंबईचाच होता.  त्याने सह्याद्रीत व सह्याद्रीबाहेर भरपूर ट्रेकबाजी केलेली होती.  

एक  बंगलोरचे जोडपे होते जे कोणाशी तोंडदेखलेही काही बोलत नव्हते ना हसत होते.  बायकोला प्रत्येक गोष्टीचा त्रास होत होता व चेहरा सतत लटकावून नवरा 'मीही तुझ्यासोबत त्रासात आहे' हे तिला दाखवत होता. बायको चुकून आजूबाजूला नसेल तेव्हा तो चेहरा थोडा हसरा करायचा. एक गुजराती जोडपे जे वयाने चाळीशीत होते पण एकमेकांचे नवरा बायको नव्हते  तेही कोणात फारसे मिसळत नव्हते. तरी ते नवरा बायको नसल्याने त्यांच्याबद्दल इतरांनी नसती कुजबुज करून घेतली, ज्यात गुजराती मंडळ आघाडीवर होते. कोण नवरा बायको, कोण फक्त मित्र ह्या चौकशा व चर्चा लोक का करतात देव जाणे.

कर्नाटकचे संजय होते जे वयाने माझ्याएवढेच होते पण माझे वय कोणाला माहीत नसल्याने एकटेच सिनियर सिटीझनचा मान मिळवून बसलेले. त्यांनी चारधाम याआधी दोनदा केलेले.  घरी इस्टेटीवरून वाद झाल्यामूळे नैराश्य आले, ते वातावरण नको म्हणून बाहेर पडले आणि मग प्रवासाला जाणे हा छंद झाला.  आम्ही दोघे सोडता बाकी ग्रुपचा वयोगट 20 ते 35 एवढा होता. आदल्या दिवशी yhai च्या बेस कॅम्पवर दारातल्या रजिस्टरमध्ये जन्मतारीख व नाव लिहून मगच आत प्रवेश घ्यावा लागलेला. आम्ही सर्वात शेवटी आल्यामुळे मी माझी माहिती भरताना बाकीच्यांच्या जन्मतारखांवर उगीच नजर टाकून घेतलेली.

गाडीत अंताक्षरी सुरू झाल्यावर गुजराती मंडळ हिरीरीने पुढे झाले.   एक बाजू ते सांभाळायला लागले पण प्रॉब्लेम असा की गाणे कुठलेही असो, पहिल्या ओळीनंतरची चाल ते ओढून ताणून गरबा चालीवर नेत होते.

मीही सुरवातीला यात भाग घ्यायचा प्रयत्न करून पाहिला. पण एकतर मला नवीन गाण्यांपैकी एकही गाणे माहीत नव्हते आणि जी मला माहित होती ती गाणी कोणी गायला लागले की गुजराती मंडळ ती गाणी हायजॅक करून चुकीचे शब्द वापरून गरबा चालीत गात होते.  दोन्ही बाजूनी हाच ग्रुप गाणी रगडतोय आपला.  मी सहन करू शकत नाही अशा गोष्टींच्या लिस्टमध्ये गाण्याची चाल बदलून व चुकीचे शब्द वापरून गाणी गाणे हे टॉप 50 मध्ये येत असल्याने मी अंताक्षरीचा नाद सोडला व खिडकीबाहेर लक्ष केंद्रित केले.

IMG-20171011-WA0093.jpg

2.

IMG-20171011-WA0089.jpg

3.

IMG-20171011-WA0077.jpg

खिडकीबाहेर जर जमिनीच्या लेवलच्या वर पाहिले तर उंचच उंच हिरवेगार डोंगर, डोंगरमाथ्यावरून खाली झेपावणारे मजबुत मोठ्ठाले धबधबे, कोणी उगीच फेकल्यासारख्या पडलेल्या शिळा, उंचच उंच वृक्ष, झाडे, झुडपे, डोंगर कापत निघालेले इवलुले रस्ते, मधूनच डोकावणारी घरे असा नयनरम्य नजारा दिसायचा व जमिनीच्या लेव्हलच्या खाली पाहिले तर रस्त्याशी काटकोन करत खाली झेपावलेली दरी,  दरीच्या तळाला रोंरावत धावणारी नदी आणि नदीपात्रात पडलेल्या प्रचंड शिळा हे अंगावर काटा आणणारे दृश्य दिसायचे.  मुंबईत असताना 'हिमाचल परिवहन मंडळाची बस दरीत कोसळून सगळे प्रवासी वाहून गेले' ही बातमी मी चहाचा घोट घेता घेता नुसती हेडलाईन वाचून पान परतले असणार. इथे मात्र ती बातमी माझीही असू शकते याची सतत जाणीव होत होती.

IMG-20171011-WA0075.jpg

मजल दरमजल करत शेवटी 4 वाजता जोशीमठ गाठले.  तिथला मुख्य रस्ता स्वातंत्र्यदिनी संचलन की तसल्याच काही निमित्ते बंद होता असे ऋषीकेशला मॅनेजरसाहेबांनी सांगितलेले.  तो आजही बंद असल्याचे दिसले. ड्रायवर तिथे ड्युटीवर असलेल्या पोलिसाशी वाद घालत होता तेवढ्यात Yhai चे आजचे कॅम्प लीडर तिथे येऊन पोचले. त्यांना पाहताच हे गृहस्थ अतिउत्साही आहेत हे लक्षात आले.

पोलिसाशी वाद घालण्यात काहीही अर्थ नाही, बस दुसऱ्या रस्त्याने नेऊन आपण आपल्या लिस्टवरची 2 देवळे पाहून घेऊ म्हणत त्यांनी ड्रायवरला आवरले व बस वळवून घेतली. लोकांना खरेतर कॅम्पवर म्हणजेच हॉटेलवर जाऊन फ्रेश व्हायचे होते पण तसे केले तर देवळे पाहण्यासाठी परत चालत यावे लागेल, बस येणार नाही असे साहेबांनी म्हटल्यावर लोक गपचूप देवळे पाहायला राजी झाले.

बस आम्हाला एक छोट्याश्या देवळाकडे घेऊन गेली.  तिथे उतरून आजूबाजूचा परिसर पहात आम्ही नृसिंहाचे देऊळ पाहायला गेलो. हा नृसिंह म्हणजे आपला भक्त प्रल्हादवाला नृसिंह, विष्णूचा चौथा अवतार.  ह्या देवळात बद्रीविशाल ही बद्रीनाथमधील देवता थंडीच्या दिवसात राहायला येते. तिकडे वर बर्फ पडायला लागला की पुजारी तिथली एक मूर्ती घेऊन इथे येतात. नरसिंहाच्या देवळात मग दोन मूर्ती पूजल्या जातात.

IMG-20171011-WA0097.jpg

अशी आख्यायिका आहे की नरसिंहाच्या मूर्तीचा उजवा हात दिवसेदिवस कृश होत चाललाय व एके दिवशी तो हात तुटून पडेल. कलयुगाच्या समाप्तीची सुरवात होतेय याची ती खूण असेल. नंतर खूप मोठी दरड कोसळून बद्रीनाथला जाणारा रस्ता कायमचा बंद होईल व कलयुग संपेल. परत सत्ययुग सुरू होईल व बद्रीविशाल आपला मुक्काम इथून  20 किमी वर असलेल्या भविष्य बद्रीनाथ मंदिरात हलवतील.

या प्रवासादरम्यान बद्रीनाथच्या वाटेवर इतक्या खतरनाक दरडी कोसळलेल्या बघितल्यात की ही आख्यायिका एके दिवशी खरी होणार याबद्दल माझ्या मनात कुठलाही संशय राहिलेला नाही.  फक्त ते घडताना मी त्या भागात नसावे ही प्रार्थना मी मनातल्या मनात केली.

नृसिंहाच्या देवळाची व मूर्तीची स्थापना आदी शंकराचार्यांनी केलेली आहे.  देऊळ परिसरात अजून काही मंदिरे आहेत ज्यांना मी बाहेरूनच नमस्कार केला.  आदी शंकराचार्यांचे देऊळही या मंदिरांच्या परिसरात आहे. तिथेच केदारनाथसारखे दिसणारे एक खूप मोठे दगडी देऊळ बांधून पूर्ण झालेले आहे. आत मूर्ती स्थापना अजून झालेली नाही.

दोन्ही देवळे पाहून आम्ही बसने हॉटेलात गेलो. आमची खोली मिळताच दोन्ही पोरी बेडवर आडव्या झाल्या व घोरायला लागल्या.  दुसऱ्या दिवशी सकाळी 6लाच निघायचे असल्याने जोशीमठ पाहायची संधी मिळणार नव्हती. त्यामुळे आता काळोख पडायच्या आत जितके पाहायला मिळते तितके पाहून घेऊ म्हणत मी लगबगीने फ्रेश झाले व एकटीच बाहेर पडले.

थोडी पुढे आले तर सिनियर सिटीझन संजय दिसले. त्यांनी पुढे शंकराचार्य मठ आहे, चला पाहू म्हणून सुचवताच मीही मठ पहायचे ठरवले. मठाकडे जाणारा रस्ता जवळजवळ 60 अंशाच्या कोनात वर चढत होता, पण परत कधी पाहायला मिळणार म्हणत मी निमूटपणे चालायला लागले. संजय चारधाम यात्रेचे डबल पुण्य गाठीशी बांधून असल्याने त्यांना सगळ्या जागांची खडानखडा माहिती होती.

हिंदू धर्माला संगठित करणारे आदी शंकराचार्य यांनी चार दिशांना जे चार मठ स्थापन केले त्यात बद्रिकाश्रमी स्थापन केलेला मठ म्हणजे जोतिर्मठ किंवा जोशीमठ.  आठव्या वर्षी संन्यास घेऊन ते वाराणसीला आले, तिथून बद्रीकाश्रमी आले. इथे त्यांनी जिथे तपसाधना केली ती गुहा पाहायला मिळते. ज्या तुतीच्या झाडाखाली बसून त्यांनी शंकराची आराधना केली ते झाड, ती शंकर पिंडी व तिथली अखंड ज्योती आजही पाहायला मिळते. ते झाड कल्पवृक्ष म्हणून प्रसिद्ध आहे.   कल्पवृक्षाचा बुंधा प्रचंड विस्तारलाय.  10-15 लोक हातात हात घालून बुंध्याभोवती उभे राहिले तर बुंधा कदाचित कवेत घेता येईल इतका तो पसरलेला आहे.   बुंध्याभोवती मजबूत लोखंडी जाळी बसवलीय आणि एका बाजूला ती उघडी आहे जिथून पूजा अर्चा करता येते.  अर्थात वृक्षाची पूजा अर्चा का करावी हा मुद्दा आहेच पण श्रद्धेपुढे आपण काय करणार ?

मी आधी मठाचा परिसर फिरून पाहिला. खूप छान जागा आहे. गच्चीवरून पूर्ण जोशीमठाचे दर्शन होते. गच्चीच्या कठड्यावर गुलाबाची झाडे लावलेली ज्याला मंद सुगंधित पांढरेशुभ्र टप्पोरे गुलाब लागलेले.

IMG-20171011-WA0092.jpg

मुंबईत कितीही मेहनत घेतली तरी गुलाबाची झाडे काही बहरत नाहीत अशी मनोमन टिप्पणी करत मी तिथे फिरून शंकराचार्यांची व त्यांच्या शिष्याची गुहा वगैरे सगळे पाहून घेतले.  वर गुहा पाहायला जात असताना गोड आप्पे तळल्याचा मस्त वास येत होता पण प्रसाद म्हणून कोणी आप्पे वाटताना दिसले नाहीत याचे थोडे वाईट वाटले.

तिथून खाली येत असताना परत संजय भेटले. ते पुढे चाललेले. पुढे कल्पवृक्ष आहे तोही पाहून घ्या असा त्यांनी सल्ला दिला. कल्पवृक्षाच्या बुंध्यातच श्री जोतेश्वर महादेव मंदिर आहे.

 मंदिराच्या परिसरात आम्हाला रमेस सुरेस जोडगोळीतला सुरेस भेटला. थोडा चिंताग्रस्त वाटला. आम्ही काही विचारायच्या आधीच त्याने त्याच्या मोबाईलची कॉर्ड कुठेतरी पडली, त्याने कमरेच्या पाउचमध्ये ठेवलेली पण आता ती त्यात नाहीय, बसमध्ये वगैरे सगळीकडे शोधून झाले, त्याचा फोन अमुक तमुक कंपनीचा असल्याने दुसरी कुठलीही कॉर्ड त्याला चालत नाही वगैरे दुःखद समाचार आमच्या कानावर घातला. कल्पवृक्ष हा मूळ मलबेरी वृक्ष आहे हे ज्ञान मला तेव्हा नसल्याने त्याची पाने वगैरे हाती लागू शकतील का म्हणजे मला हा वृक्ष कोणता हे कळेल या खटपटीत मी असल्याने त्याचे बोलणे अर्धवट ऐकत होते.

झाडाच्या पानांचे वगैरे निरीक्षण करून मी मंदिराकडे मोर्चा वळवला. श्री जोतेश्वर महादेवाचे दर्शन घेऊन, अखंड ज्योतीचे दर्शन घेऊन मी कल्पवृक्षाचे जवळून दर्शन घेत असताना तिथला पुजारी म्हणाला की कल्पवृक्षाला हात लावून तुम्ही जी काय इच्छा मनात धराल ती पूर्ण होतेच.  मी काय इच्छा धरावी याचा विचार करत होते तेवढ्यात सुरेस व सोबत संजय तिथे आले.  संजयनी व मी सुरेसला कल्पवृक्षालाच साकडे घाल म्हणून सल्ला दिला. तोही बिचारा घायकुतीला आल्याने त्याने लगेच कल्पवृक्षाला धरून इच्छा प्रदर्शित केली आणि काय आश्चर्य!! पुढच्याच क्षणी त्याची कॉर्ड त्याच्या कमरेच्या पाऊचमध्ये सापडली.  सद्गदित होऊन तो परत जोतेश्वराच्या मंदिरात देवाचे पाय पकडायला धावला.  (हे आपले उगीच, शंकराच्या देवळात फारतर नंदीचे पाय धरता येतील).  मला आधी काय करावे सुचेना, पण लगेच स्वतःला सावरून मी हॉटेलकडे धाव घेतली. असा इच्छापूर्ती कल्पवृक्ष हाताशी सापडलाय तर याचा मुलींनाही लाभ मिळावा या इच्छेने मला भारून टाकले.

इच्छापूर्ती कल्पवृक्षाबद्दल ऐकताच ऐशु लगेच उठून बसली. रात्रीच्या जेवणात चिकन सूप मिळावे ही इच्छा मी मनात धरली तर पुरी होईल का ? तिने आशेने विचारले. माझा संताप संताप झाला.  देवभूमी उत्तराखंडात येऊन असल्या इच्छा?  तू थोडी बुद्धीच आधी माग, ती मिळाल्यावर इतर इच्छा आपोआप सुचतील म्हणत दोघींनाही ओढत देवळात नेले.  दोघीनीही कल्पवृक्षकडे कसल्या कसल्या इच्छा मागितल्या. शामली खरेच इच्छा पुऱ्या होणार का हे दोन दोनदा विचारून परत परत काहीबाही मागत राहिली.  तिच्या ग्रुपसाठीही म्हणे मागितले.  मुली काहीतरी अतरंगी मागणार हे मी जाणून असल्याने 'त्यांच्या योग्य इच्छाच पुऱ्या होवोत, बाकीच्या डीलिट मार रे कल्पवृक्षा' ही इच्छा करून गप्प बसले. रात्री जेवणानंतर जोशींमठमध्ये फिरताना एका रोडसाईड स्टॉलवर अकस्मात मोमोज, नूडल्स व पास्ता मिळाल्यावर  कल्पवृक्ष खरोखर लगेच इच्छापूर्ती करतो हा निर्वाळा ऐशूने दिला.   मी यांनी अजून काय इच्छा मागितल्या असतील ह्याचा विचार करणे सोडून दिले.

त्यानंतर मी परत दोघींना घेऊन शंकराचार्य मठाला भेट दिली. मठाच्या गच्चीचा परिसर दोघींनाही खूपच आवडला. जरा इकडे तिकडे हिंडून काळोख पडल्यावर हॉटेलवर परतलो.

या वेळचे कॅम्पलीडर जरा अतिउत्साही आहेत ह्याची शंका बसमध्ये भेट झाली तेव्हा आलेलीच. चहासाठी जमलेलो तेव्हा त्यांनी कुठल्या खोलीतून कोण अजून आलेले नाही याचा हिशोब बांधायला सुरवात केली तेव्हा खात्रीच पटली. अर्थात त्यांनी व्यवस्था अगदी चोख ठेवलेली. सूप प्यायच्या वेळेस सुद्धा त्यांनी लोकांचा हिशोब ठेऊन सगळ्यांना बोलावून आणून सूप पाजले. Yhai पॅकेड लंच मध्ये प्लेन पराठे व सुक्या भाज्या द्यायचे पण सकाळचा नाश्ता व रात्रीचे जेवण अगदी उत्तम असायचे, तेही अनलिमिटेड. रात्रीच्या जेवणात स्वीट डिश असायचीच. सकाळी गोड दलिया असायचाच. गोवा ट्रेकला आम्हाला उकडलेले अंडेही मिळायचे, इथे देवभूमीत मात्र सगळे शाकाहारी.

रात्रीचे जेवण आठला आटपून आम्ही तिघी परत बाहेर पडलो. ऐशूने फारसे काही खाल्ले नव्हते व बाहेर काही चांगले मिळाले तर हवे होते. दुकाने उघडी होती, रस्त्यावर बऱ्यापैकी रहदारी होती. एका दुकानात लोकरीचे गुंडे दिसल्यावर मला राहवेनाच. 50 रुपयाला 100 ग्राम म्हणजे इथल्या भावाच्या जवळजवळ निम्मे. मी 6 गुंडे घेतले. अजूनही थोडे घेतले असते पण ठेवायला जागा नव्हती ना.

तसेच फिरत फिरत पुढे गेलो तर चक्क रोडसाईड स्टॉल वर मोमो, पास्ता, नूडल्स वगैरे मंडळी हजर. असल्या गोष्टींसाठी पोटात कायम जागा असतेच पण उगीच ट्रेकच्या सुरवातीलाच फूड पॉईजनिंग नको म्हणत ऐशूने तीनही डिशेश अर्ध्या अर्ध्या मागवल्या आणि दोघींनी मिळून संपवल्या. मी फक्त चव घेऊन पाहिले, चांगली होती चव.

रात्री नऊ वाजता कॅम्प फायरसाठी बोलावलेले. Yhai खरी आग पेटवून कॅम्प फायर कधीही करत नाही. काहीतरी दुर्घटना घडलेली म्हणे. तेव्हापासून बंद केली असे ऐकिवात आहे. आणि तसेही जंगलात आग पेटवायला बंदी असते. सगळ्या ट्रेक्सना yhai ची कॅम्प फायर विदाऊट फायर असते.

9 ते 9.30 कॅम्प फायर आहे हे फर्मान निघालेले. त्याप्रमाणे हॉटेलच्या गच्चीत सगळे जमलो. कॅम्पलीडर साहेबांनी सगळ्यांना आपली ओळख करा वगैरे बोरिंग कामाला लावले. ते आटपल्यावर आता कार्यक्रम करा म्हणून फर्मान सोडले. असे हुकूम देऊन काही होते का? पण असो. त्यात त्यांनी कुठल्याही जाती धर्मावर , राजकारण व राजकारणी व्यक्तींवर बोलू नका हे उपकलमही जोडले. एवढे सगळे एलिमीनेशन केल्यावर राहिला अंताक्षरीचा कार्यक्रम. तो गुजराती मंडळाने कब्जात घेऊन दोन चार गाणी रगडली. अजून गाणी रगडायचा बेत करत होते तेवढ्यात 9.30 झाले. तसे लिडर साहेबांनी इतका सर्वांगसुंदर कार्यक्रम सादर केल्याबद्दल सगळ्यांचे आभार मानून गुड नाईट केले. पूर्ण वेळ तिथेच असूनही मला तो तथाकथीत सर्वांगसुंदर कार्यक्रम का दिसला नाही याचे आश्चर्य करत मी खाली आले.

दुसऱ्या दिवशी सकाळी 4.30ला बेड टी मिळणार आणि तो दारातच मिळणार त्यामुळे आपापले कप उशाशी ठेऊन झोपा हा हुकूम मिळालेलाच. आज सकाळी तिनालाच उठल्यामुळे निदान उद्या तरी साडेचार पर्यंत झोप मिळुदे अशी प्रार्थना करत मी निद्रादेवीच्या आराधनेला लागले. खरेतर कल्पवृक्षालाच साकडे घालायला हवे होते पण माझे नेहमी असेच होते. देवाजवळ काही मागायची वेळ आली की काय हवेय तेे आठवतच नाही आणि नंतर चुटपुट लागून राहते.

सकाळी जाग आली ती कोणीतरी पायातली चप्पल ओढत चालण्याच्या आवाजाने. माझ्या सहन न व्हायच्या यादीत पायातली चप्पल ओढत चालण्याची लोकांची सवय टॉप 50 येत असल्याने माझे डोळे खाडकन उघडले व झोप उडाली. बाहेर लीडरसाहेबांचा आवाज येत होता. सकाळचा नाश्ता व लंच वेळेत द्यायचा तर कॅम्पवरच्या लोकांना इतके लवकर उठणे भाग असते. मोबाईलवर पाहिले तर साडेतीन वाजलेले. परत झोप लागण्याची शक्यता शून्य होती, गुपचूप उठून बसले. बरोबर 4.30 ला दारावर थाप. बेड टी. आता उठलोच तर तेही करूया म्हणत बेड टी घेतला आणि बाहेर येऊन परिसराचे निरीक्षण करू लागले. वर उत्तरेला खूप लवकर उजाडते.

उत्तराखंड पूर्ण डोंगरमय आहे. शहरे दिसतात शहरासारखी सपाट पण प्रत्यक्षात डोंगरात वसलेली आहेत. हॉटेलच्या खोलीतुन बाहेर पाहिले तर तुम्ही तळ मजल्यावर असाल तर तुम्हाला समांतर शेजारच्या हॉटेलची खोली दुसऱ्या मजल्यावरची असते आणि तुम्ही दुसऱ्या मजल्यावर असाल तर शेजारचा त्याच्या तळमजल्यावर असतो. त्याच नियमाला धरून आमच्या तळमजल्यावरच्या खोलीसमोर असलेल्या बिल्डिंगच्या दुसऱ्या मजल्यावरची खोली मला समोर दिसत होती.

माझ्या खोलीच्या दारातच एक मोठेे झाड होते. त्याला मोसंब्याएवढी मोठी हिरवीगार फळे लागलेली. त्या भागात मोसंबी असायची शक्यता कमी असल्याने ते बहुतेक इडलिंबूचे झाड असावे असा तर्क मी बांधला.

IMG-20171011-WA0098.jpg

झाडाला लागलेली फळे:

IMG-20171011-WA0096.jpg

हे झाड नक्की किती खालून वर आलेय याचा अंदाज येत नव्हता म्हणून मी वाकून पाहिले तर ते झाड खालून बिलून अजिबात न येता चक्क खोलीसमोर असलेल्या कठड्याच्या पहिल्याच फरशीमधून आलेले दिसले. झाड खूप मोठे होते असे नाही, साधारण आपल्या अनंताच्या झाडाइतके होते पण ते असे कडेवर आलेले आणि फळेही लागलेली बघून आश्चर्य वाटले. त्या फरशीतून मुळे आत खोलवर गेली असणार.

यथावकाश मुलींना उठवून तयारी करून, नाश्ता करून, सोबत पॅकेड लंच घेऊन निघालो. आजपासून ट्रेक चालू होणार होता. त्यामुळे सगळे जरा जोशात होते.

जोशींमठ ते गोविंदघाट हा 25 किमी प्रवास बसने व गोविंदघाट ते घागरिया हा 13 किमी ट्रेक पायी करायचा होता.  ट्रेक पायी करणे जरी अपेक्षित असले तरीे आम जनतेसाठी तिथे हेलीकॉप्टर, खेचर, पोर्टर व पालखीची सोय होती. स्वतःच्या खर्चाने यातले कुठलेही साधन निवडायला yhaiची आडकाठी नव्हती.

पुढचा भाग :
https://www.maayboli.com/node/64214

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मुली काहीतरी अतरंगी मागणार हे मी जाणून असल्याने 'त्यांच्या योग्य इच्छाच पुऱ्या होवोत, बाकीच्या डीलिट मार रे कल्पवृक्षा' ही इच्छा करून गप्प बसले. रात्री जेवणानंतर जोशींमठमध्ये फिरताना एका रोडसाईड स्टॉलवर अकस्मात मोमोज, नूडल्स व पास्ता मिळाल्यावर कल्पवृक्ष खरोखर लगेच इच्छापूर्ती करतो हा निर्वाळा ऐशूने दिला. मी यांनी अजून काय इच्छा मागितल्या असतील ह्याचा विचार करणे सोडून दिले. >> फिसक्कन हसले ना वाचता वाचता! मस्त जमलाय हा भाग पण .

तीनही भाग वाचले. एखादी डायरी वाचल्याचा फील येतो. प्रवासवर्णनं आवडतात आणि त्यातून ती हिमालयातली असली तर आणखी आवडतात. छान लेखन! Happy

आत्तापर्यंतचे सगळे भाग वाचले. अगदी ओघवती भाषा आहे, साधना. मधे मधे टाकलेले पंचेसही पोचले आणि आवडले.
मालिका छान चाललीये. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत.

देवाजवळ काही मागायची वेळ आली की काय हवेय तेे आठवतच नाही आणि नंतर चुटपुट लागून राहते. >> Lol
टॉप ५० यादी मध्ये पाय घासत चालणे, मोठ्याने बडबड करणे, बिंनेस बद्दल सतत बोलणे, गाण्याला 'गरबा चाल' लावणे हे टिक झालय. Proud जोकिंग.. छान चालली आहे.

आत्तापर्यंतचे सगळे भाग वाचले. अगदी ओघवती भाषा आहे, साधना. मधे मधे टाकलेले पंचेसही पोचले आणि आवडले.
मालिका छान चाललीये. पुढच्या भागाच्या प्रतिक्षेत. ...+१

Proud मस्त झालाय हा भाग सुद्धा.

माझ्या यावर्षी व्हॅली ला जायच्या प्लॅनवर पाणी पडलं. पुढ्च्या वर्षी इन्शाल्ला.

भारीच भारी लिहिलय... बाकी तुमचे वय कळत नाही याचे रहस्य पण लिहा... तो एक सुपरहिट धागा होईल..

साधना हा भाग खुपच छान लिहीला आहेस. अगदी प्रमाणीक, खुसखुशीत लेखन झाले आहे. मजा आली वाचताना. हा भाग वाचतच रहावा संपू नये अस वाटत होत. आता नियमीत लिहत रहा.

सगळे लेख एक से बढकर एक आहेत. हाही आवडला. डिलीट मारण्याची प्रार्थना आवडली, रमेस सुरेस आवडले आणि अंताक्षरी हाय्जॅक करून गरबागीत गाण्यातली भीषणताही आवडून गेली. मस्त. पुढचा भाग येउं दे लवकर .

मस्तच लिहिले आहे . आवडला हा भाग पण.
त्यांच्या योग्य इच्छाच पुऱ्या होवोत, बाकीच्या डीलिट मार रे कल्पवृक्षा>> Lol
पुभाप्र.. Happy

रमेस , सुरेस , गाणी रागडणे वाचून मज्जा आली . कल्पवृक्षाची नोंद घेतलीये
लेखनशैली मस्त !खुसखुशीत

अगदी ओघवतं वर्णन... मस्तच

मुख्य रस्ता वरिल जोशीमठ पेक्षा वर गावातील जोशीमठ खुप सुंदर आहे... आम्ही दोन दिवस राहिलो तिथे.. ग्रे ट्रीपाय, स्ट्रीक्ड लाफिंगथ्र्श, प्लमबियस वॉटर रेड्स्टार्ट, ब्लॅक हेडेड जे, फ्ल्मेबॅक वुड्पेकर तर दिसलेच.. रिसॉर्टच्या परिसरात सुंदर फुल झाडे आणि अक्रोडची झाडे होती. संध्याकाळी पक्षी निरक्षणा करता गावात फिरताना तिथल्या मुलांसोबत धमाल केली. तिथल्या लोकांच्या आयुष्यातला निवांतपणा बघुन त्यांचा हेवा वाटला.

हे पक्षी मात्र मला कधी दिसत नाहीत. ते कसे बघायचे याच्या टिप्स दे रे...

खरेच निवांत असतात लोक .. आपण इथे कुठे व कशासाठी पळत असतो देव जाणे..

Pages