गोळवशी माझं गाव

Submitted by किरण भालेकर on 16 September, 2017 - 06:41

गोळवशी_माझं_गांव

रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा तालुक्यापासून ११ किमीवर वसलेले हे एक खेडेगाव होय.कोकणातील ईतर गावांप्रमाणेच या गावावर सुद्धा निसर्गाचा वरदहस्त लाभला आहे.चारही बाजुंनी पसरलेल्या डोंगररांगा,घनदाट जंगले,त्यात दाटीवाटीने वसलेली कौलारु घरे,मुचकुंदी नदीचे खळाळत वाहणारे पात्र गावाच्या वैभवात अजुन भर टाकते.
लांजा तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण असणाऱ्या माचाळ गावातील डोंगरावर असणारया मुचकुंद ऋषींच्या गुहेजवळुन नदीचा उगम होतो.मुचकुंदी माईचा गावाला सहवास लाभला आहे.मुचकुंद ऋषींच्या तपाचरणाने पावन झालेली हि नदी यामुळेच या नदीला मूचकुंदी असे नाव पडले.पुढे ही नदी पूर्णगडच्या खाडीला जाऊन मिळते.गावाच्या सीमेलगत वाहणारी हि नदी पार केल्यास आपण राजापुर तालुक्यातील हसोळ या गावी प्रवेश करतो.या नदीवरती पुल उभारल्यास लांजा ते राजापुर हे अंतर काही तासांचे होईल.हा प्रकल्प शासनाच्या विचारधीन असून लवकरच कामाला सुरुवात होईल अशी आशा आहे.
गोळवशी हे ७०० ते ८०० लोकसंख्येचे गांव होय.सहा वाडयांची ईथे नागरी वस्ती आहे.गावातील लोक प्रामुख्याने शेती हा व्यवसाय करतात.कोरडवाहु व खडकाळ जमीनीमुळे पिके घेण्यावरती मर्यादा येतात.येथील शेतकरी शेतीसाठी सर्वस्वी पावसाच्या पाण्यावर अवलंबुन आहे.त्यामुळे पावसाळी पिके यामध्ये भातशेतीचे प्रमुख उत्पादन याजोडीने फळभाज्या पालेभाज्या यांची लागवड केली जाते.पशुपालन हा कमी प्रमाणात जोडधंदा केला जातो.कोकणातील प्रसिद्ध हापुस आंबा व काजूगर याच्या गावामध्ये फळबागा आहेत.गावातील आर्थिक उत्पन्नाचे साधन म्हणून याकडे पाहिले जाते.याबरोबरच फणस,चिकु,पेरू,नारळ,सुपारी याची फळझाडे सुद्धा घरोघर दिसून येतात.कोकणातील रानमेवा अशी ओळख असणारी करवंदे,जांभुळ,आवळा,चिंच,अशी अनेक फळे गावाच्या आजुबाजूला असणाऱ्या जंगलात विपुल प्रमाणात आढळतात.एप्रिल ते मे महीना भेटीसाठी योग्य कालावधी आहे.

●गावातील प्रेक्षणीय स्थळे ●

@ आई नागादेवी मंदिर ©
आई नागादेवी हि गावाची ग्रामदेवता होय.स्वयंभु शंकराचे हे स्थान अत्यंत रमणीय अशा ठिकाणी आहे.येथील वातावरण मन प्रफुल्लीत केल्याशिवाय राहत नाही.संपूर्ण महाराष्ट्रातून भक्तगण मोठ्या संख्येने आईच्या दर्शनासाठी येत असतात.विशेष आकर्षण म्हणजे बायंगी देवता होय.देवळाच्या बाजूला असणारी देवराई,प्राचीन तळे,सतीची १0५ शिल्पे अभ्यासण्यासारखी आहेत.जैवविविधतेने नटलेला असा हा एकूण परिसर आहे.
© मुचकुंदी नदी खोरे ©
गावच्या सीमेवरुन वाहत जाणारी मुचकुंदी माईचे विस्तीर्ण पात्र पाहताना आत्माही सुखावतो.हिरवागार असा संपूर्ण परिसर,नारळी_पोफळीच्या बागा,लांबवर पसरलेले मैदान व धावगी देवाचे मंदिर यांना आवर्जून भेट दयायलाच हवी.पावसाळा संपल्यानंतरचा काळ यासाठी सर्वोत्तम आहे.

● गावातील प्रमुख सण ●
© होळी ©
हा गावचा प्रमुख सण आहे.या दिवशी सर्व गावकरी होळीचा मांड या पुरातन ठिकाणी जमतात.गावातील सर्व प्रमुख देवतांची पालखी सजवली जाते.यालाच रुपे लावणे असे म्हणतात.प्रामुख्याने आंबा किंवा ताड या झाडांच्या होळया असतात.ही होळी आदल्या दिवशी रात्री देवीची पालखी घेवून वाजतगाजत मांडावर आणली जाते.दुपारच्या सुमारास पोर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी होळया पेटवल्या जातात.एकुण दोन होळयापैकी होम होळीभवती पालखीच्या पाच प्रदक्षिणा घालुन मानाचा नारळ आगीतुन उडी मारुन पाडला जातो.तसेच दिवसभर देवीला कोंबडीबकरे यांचे नवस केले जातात.यानंतर तीन दिवसानंतर खावडी गावची नवलादेवी आणि नागादेवी या बहिणीची मांडावर ओटी भरून भेट होते.व दोन्ही पालख्या नाचवल्या जातात.हा सोहळा पाहण्यासाठी सर्व ग्रामस्थ एकत्र येतात. शिवजयंती साजरी झाली कि गावकरी देवीची पालखी घेवून गांव प्रदक्षिणेला म्हणजेच गावातील प्रत्येक घरामध्ये पालखी घेवून जातात.दहा दिवस गावात आनंदाला उत्साहाला भरते येते.कित्येक भोजनावळी उठतात.
© गणेश उत्सव ©
या सणाला मुंबईतील चाकरमानी गावात हजेरी लावतात.संपूर्ण गावामध्ये घरगुती गणेशाची प्राणप्रतिष्ठापना केली जाते.सामूहिक आरत्या व भजने,फुगडया,जाखडी असे कार्यक्रम करून रात्रभर जागरणे केली जातात.गौराई मातेचे मनोभावे पूजन केले जाते.अनुक्रमे ६ व १० दिवसाच्या बाप्पाना पारंपारिक वारकरी संप्रदायाच्या अभंगावरती दिंडी काढून आणि ढोलताशांच्या गजरात साश्रुनयनांनी निरोप दिला जातो.गणेशमुर्त्या शाडुच्या मातीच्या असल्यामुळे तसेच मुर्तीचे नैसर्गिक स्त्रोतांमध्ये विसर्जन करून पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा केला जातो.

● विशेष आकर्षण ●
© खांबडवाडी नवरात्र उत्सव व गोकुळाष्ठमी ©
आश्विन शुद्ध पक्षी दुर्गादेवीचे मोठया जल्लोषात खांबडवाडी समाजमंदिर येथे आगमन होते.गेली 19 वर्ष खांबडवाडी मित्र मंडळ देवीची प्रतिष्ठापना करत आले आहे.यामध्ये 'नऊ दिवस नऊ कार्यक्रम' हि संकल्पना राबविली जाते.भजन,कीर्तन,जाखडी,रास गरबा,गोपी नृत्य,लहान मुलांसाठी स्पर्धा,गुणवंत विद्यार्थी व थोरामोठयांचा सत्कार यासारखे उपक्रम राबविले जातात.दसरयाच्या दिवशी सोनेलुट करून सर्व ग्रामस्थांची गळाभेट घेतली जाते.
व दुसऱ्या दिवशी देवीची विसर्जन मिरवणूक काढुन भजनाच्या तालावर आणि वाद्यांच्या गजरामध्ये धरणामध्ये विसर्जन केले जाते. मोठ्या प्रमाणावर भक्तगण या सोहळ्याला उपस्थीत असतात.यावेळी भाविकाना प्रसादाचे वाटप केले जाते.
गोकुळाष्टमी व दहीहंडी उत्सव खांबडवाडीमध्ये गेल्या ५० वर्षापासून हा सोहळा साजरा केला जातो.गोकुळाष्टमीला वाडीतील सर्व ग्रामस्थ एकत्र येवून श्रीकृष्णाची मनोभावे पूजा व आरती करतात.बाळ श्रीकृष्णाला पाळण्यात घालून स्त्रीया पाळणा गीते गातात.दुसऱ्या दिवशी गोपाळकाला असतो.देवाला आलेल्या नवसाच्या हंडया चार ते पाच थरांवर बांधल्या जातात.भजनाच्या दिंडीमधून श्रीकृष्णावरील कवने गायली जातात.पाण्याचा कमी वापर आणि योग्य नियोजनाने व गांवकऱ्यांच्या सहभागातुन ४ ते ५ हंडया बाळगोपाळ फोडतात.भाविकाना प्रसाद वाटप करून कार्यक्रमाची सांगता होते.

© गावातील शाळा ©
पहिली ते सातवीपर्यन्त म्हणजेच प्राथमिक शिक्षणाची गावात सोय आहे.गावामध्ये एकुण तीन शाळा आहेत.माध्यमिक शिक्षणासाठी बाजुच्याच खावडी गावातील माध्यमिक शाळेत तर महाविद्यालयीन शिक्षणासाठी तालुक्याच्या ठिकाणी लांजा येथे जावे लागते.

● गावात कसे पोचाल ●
ट्रेन -जवळचे स्टेशन रत्नागिरी,आडवली,विलवडे,लांजा

बस-रत्नागिरी ते लांजा आगार
लांजा आगार ते गोळवशी गांव
रिक्षा /वडाप/जीप

लेखक
किरण प्रकाश भालेकर
Bhalekar117.blogspot.com

आई नागादेवी ग्रामदैवत
आई नागादेवी-800x600.jpgपालखी आई नागादेवी
FB_IMG_1505718307869-600x600.jpgपाण्याचे टाकं
तळी-800x600.jpg

गावाला लाभलेली प्राचीनता मंदिरात असणाऱ्या या वीरगळीवरुन स्पष्ट होते.मंदिराच्या मागच्या बाजूला अजून काही वीरगळी आहेत.
वीरगळ
वीरगळ-600x800.jpg

गावात अशी 5 ते 6 छोटी धरणेवजा बंधारे आहेत.पावसाळ्यात जेव्हा हि धरणे भरून वाहायला लागतात तेव्हा इथल्या छोट्या मुलांच्या आनंदाला उधाण येते.गणपती विसर्जनासाठी याचा प्रामुख्याने वापर होतो.
धरण
धरण-800x600.jpgभातशेती
शेती सर्वस्वी पावसावर अवलंबून आहे तसेच प्रमुख पीक हे तांदूळ आहे.
भातशेती-600x800.jpg

गोळवशी गावची ओळख असलेली ही शेड इथून गाव सुरू होतो.गोळवशी आंबा असे या ठिकाणचे नाव आहे.
प्रवासी शेड
शेड-800x600.jpg

पहिली ते चौथी (खांबडवाडी)
माझी शाळा लहानपणीची
IMG-20170914-WA0004-800x480.jpgगावातील माझं घर
IMG20170829110945-800x600.jpg

गणेश विसर्जनचा 2017चा हा विडिओ लिंक देत आहे पाहायला विसरू नका.
https://youtu.be/YtBqfwKe_6U

गावातील होळी उत्सव कसा साजरा होतो त्याचीसुद्धा आपल्याला एक झलक नक्कीच पाहायला मिळेल.
खाली लिंक देत आहे.
https://youtu.be/zlvCKWcXvGk

खांबडवाडीची पारंपरिक दहीहंडी लिंक देत आहे.
https://youtu.be/khrINEPBXQs

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त!
भातशेतीचा फोटो खूप सुंदर!!! Happy

किरण भालेकर साहेब मूचकुंदी नदीचा उगम विशाळगडाच्या पायथ्याशी नाही तर माचाळ गावात होतो. विशाळगड कोल्हापुरात जोडला जातो तर माचाळ गाव रत्नागिरी जिल्हा आणि लांजा तालुक्यात येत.
याच माचाळ गावचा मी रहिवासी आहे. महाराष्ट्र शासनाने पर्यटन स्थळ म्हणून घोषित केलेलं गाव पण अजूनही रस्ता नाही असं गाव.
बाकी माहिती छान दिलीत.
धन्यवाद

साईवेद भाऊ सुधारणा केल्या आहेत.धन्यवाद याबद्दल माहिती होती.तुमचं माचाळ गाव खूप ऐतिहासिक आहे.श्रीकृष्णस्पर्शीत ती गुहा आणि तिथे पूर्वी किल्ला होता अशी प्राथमिक माहिती मिळते.प्रभानवल्ली गावात असणारी तीन भुयारे बघायला यायचं आहे.पालु गाव हे पालव राजांच्या नावावरून आहे.

फोटो व लेख आवडला.
कोकणातील निसर्ग सौंदर्य पुरेपूर अनुभवत आहे हे जाणवले.
बादवे, कुवे ते वनगुळे ही गावे या परिसरात येतात का?

पालीचा पल्लीनाथ ,तिथे आलो होतो फेब्रुवारीत ,तिथुन शिवने या गावी गेलो होतो.तिथुन कीती लांब आहे हे तुमचे गाव?

लिखाण आणि छायाचित्रं दोन्ही सुरेख.
तुमचं गावातलं घर फार म्हणजे फार आवडलं.
मला अशा घरात एक दोन दिवस जाऊन रहायची फार इच्छा आहे, पण माझ्या ओळखीचे कुण्णी कोकणात रहात नाही Sad

छान लेख आणि छायाचित्रे!

गोळवशी हे गाव "बायंगी" साठी प्रसिद्ध आहे. वरील लेखात तुम्ही "बायंगी देवता" असा उल्लेख केला आहे, पण इतर गावात बायंगी हे पिशाच्च म्हणून ओळखले जात.
हे पिशाच्च घर-बागा यांच्या रक्षणासाठी, भरभराटी साठी गोळवशीतून आणले जाते, त्याला वर्षाला ठराविक दिवशी कोंबडे-बकरे असा काही बळी द्यावा लागतो, नाही दिला तर ते जो घेऊन आला त्याच्या घरादाराचा नाश करुन ते परत मूळ ठिकाणी जाते. असे ऐकले आहे.
हे खरे आहे काय?
याविषयीचे काही माहिती/किस्से असल्यास वाचायला आवडेल. Happy

गमभन हे खरे आहे माझं गाव या बायगी साठी प्रसिद्ध आहे.किस्से वडीलधारी मंडळी सांगतात.महाराष्ट्र किंवा बाहेरून सुद्धा लोक येत असतात.व्यापारीवर्ग जास्त असतो.सर्व जातीधर्माचे लोक या मंदिरात येतात.चक्क आमदार,खासदार असे भलेभले निवडणूक आल्यावर देवळात हजेरी लावतात.

दक्षिणा , आभारी आहे.आपल्या भावना पोचल्या मी समजू शकतो.☺☺ अहो आम्हीच पाहुणे म्हणून जातो 5 दिवस गणपतीला तर 5 दिवस मे मध्ये नाहीतर आमची घोंगडी पोटापाण्यासाठी मुंबईतच भिजत पडलेली असते.

किरण किती नशिबवान तू, निदान पाहुणा म्हणून ४-५ दिवस तरी जाता येते तुला.
मजा करून घे, आम्ही तुझ्या फोटोवर समाधान मानून घेऊ Happy

काही वर्षांपूर्वी माझ्या आईची गोळवशीला प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका म्हणून बदली झाली होती. बहुतेक खांबडवाडीच शाळा होती. तेव्हा तिच्याबरोबर तिथे जायची इच्छा काही पूर्ण झाली नव्हती. (तिच्या प्रत्येक शाळेत नि त्या गावात मी फिरुन यायचे.)
आता फोटोत बघायला मिळालं गाव. मस्त आहे. भातशेतीचा फोटो मस्त.

किरण,
त्या बायंगीचे काही किस्से तुम्हाला माहिती असल्यास इथे शेयर करा. वाचायला मजा येईल.
इथे नाहीतर मायबोलीवरच "अमानवीय" हा भुताखेतांच्या गोष्टींसाठी धागा आहे, तिथे लिहा.

दक्षिणा,गमभन,निधी आपल्या छान छान प्रतिसदांबद्दल आभारी आहे.गमभन भाऊ मी नक्कीच ते किस्से लिहण्याचा प्रयत्न करेन त्या धाग्यावर आताच काही सांगत नाही.गावी गेलो की वडिलांकडून माहिती घेऊन लिहण्याचा नक्की प्रयत्न करेन.

Pages