निर्विघ्नं कुरु मे देव! - अर्थात आपत्ती व्यवस्थापन

Submitted by संयोजक on 23 August, 2017 - 19:40

निर्विघ्नं कुरु मे देव!
प्रवासाला निघताना, परिक्षेला जाताना, नोकरीच्या मुलाखती आधी, शाळा-कॉलेजच्या अ‍ॅडमिशन साठी, आणि इतरही अनेकवेळा आपण "निर्विघ्नम् कुरु मे देव!" अशी मनोमन प्रार्थना करतो - कधी उघड, कधी प्रकट तर कधी आपल्या चिंतेत असताना अधाहृत स्वरुपात नकळतही. या प्रार्थनेच्या पुढचं पाऊल म्हणजे अपेक्षित- अनपेक्षित अशा घटनांना तोंड देण्यासाठी आपण करत असलेली तयारी.

कधी प्रवासाला निघताना घरादाराची , बागेची जबाबदारी शेजार्‍यांवर सोपवतो . क्वचित पाणी /वीज / इंटरनेट सेवा खंडित झाली तर काही उपाय योजना आधीच करुन ठेवलेल्या असतात. रोजच्या शाळा / कॉलेज/ ऑफिसला येण्याजाण्यात काही अडचणी आल्या तर काय करता येईल याचे आडाखे बांधलेले असतात.
काही लोक हे सर्व अतिशय जाणीवपूर्वक , नित्य नेमाने करतात तर कधी प्रसंगातून आलेले शहाणपण असतं. "वेळ काही सांगून येत नाही" या म्हणीचा एकदा अनुभव घेतला की मनुष्य त्यातून शिकण्याचा प्रयत्न करतो. घरात वीज / पाणी नसताना २४- ४८ तास काढायची वेळ आली तर काय लागेल ते नेहमीच तयार असतं. बर्फाच्या प्रदेशात गाडीत कायम रस्त्यावरील बर्फाशी सामना करायची किंवा वेळ पडलीच तर रस्त्याच्या कडेला अडकलेल्या गाडीत ४-६ तास काढायची तजवीज केलेली असते.

अतिवृष्टी , पूर, भूकंप अशा नैसर्गिक आपत्ती असोत किंवा दहशतवादी हल्ला, कर्फ्यू, अपघात असे मानवनिर्मित प्रसंग असोत,
अथवा अचानक उद्भवलेले आजारपण, मृत्यू असे वैयक्तिक आघात असोत, अचानक उद्भवलेल्या आपत्तींचा , संकटाचा सामना तुम्ही कसा केलात? त्यातून निभावल्यावर अशी वेळ पुन्हा येऊ नये म्हणून किंवा आलीच तर परत पहिल्यासारखा त्रास होऊ नये म्हणून तुम्ही काय उपाययोजना केली आहे ? काय सावधगिरी बाळगली आहे ?

फक्त तुम्हीच असे नाही तर तुम्ही राहता त्या प्रदेशात स्थानिक सरकारी यंत्रणा नैसर्गिक किंवा मानवनिर्मित आपत्तींच्या नियोजनासाठी काय तयारी करतात ? तुमच्या आजूबाजूचे नागरिक, मित्रमंडळी, ऑफिसमधले सहकारीही साधारणपणे काय तयारी करतात याबद्दल लिहायलाही हरकत नाही. माहितीचा उपयोग आपल्या सगळ्यांनाच होऊ शकतो.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ऑफिसमधल्या मायग्रेशन प्लानिंग बद्दल लिहिते थोडं

माझी कंपनी अमेरिकेतल्या १३ राज्ये आणि वॉशिण्ग्टन डी सी या भागात क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर सेगमेंट मधे काम करते.
ज्या सिस्टम मिशन क्रिटिकल आहेत त्यांचे मोठे अपग्रेड / रिप्लेसमेंट प्रोजे़क्ट ३-४ वर्षे चालतात. यात शेवटचे ४-६ महिने जुनी आणि नवी सिस्टम एकावेळी समांतर काम करत असतात. तरिही जुन्यावरुन नव्यावर कट करताना हार्ट ट्रान्सप्लांट ऑपरेशन सारखी व्यवस्था असते . फक्त आमच्या कामात हार्ट लंग मशीन नसते Happy

काही वर्षांपूर्वी अशा एका मायग्रेशनमधे भाग घेण्याचा अनुभव आला. तेंव्हा केलेल्या / समजलेल्या काही गोष्टी

१. आमच्या कंपनीच्या ऑपरेशन सेंटर चे इलेक्ट्रिक फीड दोन वेगळ्या डिस्ट्रिब्युशन सिस्टम वर आहे . बर्‍याच हॉस्पिटल्स , एअरपोर्ट , स्टेडियम्स वर अशी व्यवस्था असते. एका सुपरबोल मधे अर्धे स्टेडियम अंधारात गेलेले आठवत असेल.

२. कॅम्पसमधे तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन जनरेटर्स आहेत. प्रत्येक जनरेटर ऑपरेशन सेंटर / डेटा सेंटर तीन दिवस फुल कॅपसिटी वर चालू शकतो इतका डिझेल साठा असतो. दर आठवड्यात एकदा ऑपरेशन सेंटरच्या सप्लाय जनरेटर वर ट्रांसफर करून ३-४ तास टेस्टिंग होतं.

३. फोन सिस्टम - कॉपर लाइन फोन दोन वेगळ्या कंपन्यांतर्फे आहेत. शिवाय आय पी फोन आहेत. ऑपरेशन्स मधल्या लोकांसाठी सॅटेलाइट फोन्स आहेत.

३. ऑपरेशन सेंटर मधे तीन शिफ्ट , २५ व्यक्ती महिनाभर जेऊ खाऊ शकतील एवढं पाणी/ ड्राय फूड साठवलेलं असतं, महिन्यातून एकदा त्याची एक्सपायरी डेट तपासली जाते आणि लागेल तसा नवा स्टॉक भरला जातो.

४. स्थानिक पोलिस, फायर मार्शल, स्टेट पोलिस हे सर्व आमच्या ' फ्रेंड लिस्ट' मधे आहेत. कॅम्पस वर विविध वेळी त्यांना बोलवत असतात.

अजून आठवले तसे लिहिन. थोड्या वेळाने स्नो स्टॉर्म / पोलार व्होर्टेक्स आणि हरिकेन यांच्या तयारीबद्दल पण लिहिते.

यावर लिहिण्यासारखे बरेच आहे. लगेच सुचलेलं : बेसिक च आहे पण तरी -
पर्सनल लेवल वरचे काही खबरदारीचे उपाय :
बर्‍याच वर्षांपूर्वी एकदा घरात चु़कून कार्बन मोनॉक्साइड आणि सगळे फायर अलार्म वाजायला लागले. कुठे काही पेटल्यासारखे चटकन दिसेना. बेसमेन्ट मधे जरासे डोकावून पाहिले तिथेही ओकेच दिसत होते पण फार काना कोपर्‍यात आत पर्यन्त जायची रिस्क नको वाटली तेव्हा . मग सगळे बाहेर आलो, आणि खबरदारी म्हणून फायर कंपनीला बोलावले. त्यांनी चेक केले आणि कन्फर्म केले की फॉल्स अलार्म होता, फॉल्टी बॅटरी की असेच काही कारण होते.
पण त्या घटनेने लक्षात आले की खरोखर आग असती तर ? बाकी सगळे जळाले तरी चालेल पण तुमच्या डॉक्युमेन्ट्स, आयडेन्टिटी ला जपावे लागते. तेव्हा पासून आम्ही फायरप्रूफ बॉक्स आणून पासपोर्ट, इन्शुरन्स पेपर्स, विल ची कॉपी वगैरे महत्त्वाचे पेपर्स त्यात ठेवायला सुरुवात केली.
अजून काही खबरदारीच्या सवयी :
१) मुलांना इमर्जन्सी मधे (आई बाप सोडून) कुणाला कॉल करायचे किंवा कुठे जायचे ते माहित हवे.
२) घरातले सगळेच एखाद्या लांब प्रवासाला जात असल्यास शेजार्‍यांना किंवा कुणाला तरी पूर्ण प्रवासाचा प्लॅन, यायच्या जायच्या तारखा, वेळा सांगणे आणि त्या दरम्यान एकदा - दोनदा आप्लयाला कॉल करायला सांगणे (आपण पोहोचलो / परतलो की नाही हे कुणाला तरी माहित असावे) . हेही आम्ही इतरांच्या कटू अनुभवावरून शिकलो.
३) गर्दीच्या ठिकाणी लहान मुलांना, ज्येष्ठ नागरिकांना घेऊन जात असल्यास चुकामूक होऊ शकते, अशा वेळी जवळचा सहज दिसेल असा एखादा लँडमार्क "मीटिंग पॉइन्ट" म्हणुन आधीच ठरवणे. हे फार उपयोगी पडते.

अजून एडिट करून लिहीन इथेच नंतर.

मै मस्त पोस्ट. छान लिहिलय.

माझा मुलगा तेव्हा खूप लहान होता. त्याला सर्दी खोकला फार व्हायचा. त्यामुळे तो आणि आम्ही अगदी हैराण झलो होतो थंड पाणी किंवा इतर काही थंड खाऊन खोकला आणखी वाढेल ह्या भीतीने आईसस्क्रिम वैगेरे तर सोडाच पण साधं थंड पाणी ही आम्ही फ्रीज मध्ये ठेवत नव्ह्तो.

सहाजिकच ह्या गोष्टींबद्द्ल त्याच्या मनात फार आकर्षण होतं . एक दिवस दुपारी जेवण झाल्यावर मी मागच आवरत होते. तो तिथेच काहीतरी खेळत होता. तेवढ्यात वँ वँ असा अगदी आतून आल्यासारखा त्याचा अवाज मी ऐकला, कुठेतरी दाराच्या फटीत बोट अडकलं असं मला वाटलं म्हणून मी बघितलं तर फ्रिज उघडून हा वे़जिटेबल ट्रे च्या पुढे असणार्‍या जागेत चढला होता आणि फ्रिजरला जीभ लावून चाटत होता. त्या दिवशीच मी फ्रोस्ट काढल्याने त्या पत्र्याच्या फ्रिजरला त्याची जिभ चिकटली होती आणि त्यामुळेच त्याच्या तोंडातून शब्द फुटत नव्हता आणि त्याला हलता ही येत नव्ह्तं

प्रसंग कठिणच होता. पण तेव्हा मला काय बळ आलं माहित नाही . मी त्याला आणि मला स्वतः ला ही धीर दिला . पहिल्यांदा फ्रिजचं बटन बंद करुन वीज सप्लाय बंद केला. गॅस वर पाणी कोमट केलं आणि ते पाणो फ्रीजर मध्ये टाकलं . कोमट पाण्यामूळे तिथलं तपमान वाढलं आणि त्याची जीभ दोनच मिनटात सुटली. जीभ नैसर्गिक पणे सुटल्यामुळे जिभेला काही इजा ही झाली नाही.

आज ही तेव्हा मला हे क्सं सुचलं ह्याच नवल वाटत.

मनीमोहोर, वाचून बापरे वाटलं एकदम..

हा विषय मांडल्याबद्दल संयोजकांचे आभार. वाचायला सुरुवात केली आणि लक्षात आले की जर उद्या काही आणीबाणीचा प्रसंग आला आणि घराबाहेर पडणे मुश्किल झाले तर बेसिक डाळ तांदूळ कडधान्य सोडली तर तयारी अशी काहीही नाहीय. घरात जे काही आहे तेही असली काही तयारी ठेवायला हवीय म्हणून आणलेले नाहीय तर नेहमीचा किराणा म्हणून आणलेले आहे. घरात किंवा बाहेर वावरताना काही संकट आले तर काय हा विचारही केलेला नाही.

मागे एकदा सगळ्या बँक, इमेल अकौंटसचे नंबर/आयडी व पासवर्ड्स लिहून ठेवलेले, इन्व्हेस्टमेंट्स, दागिने वगैरेची माहिती लिहून ठेवलेली, जेणेकरून आपले काही अकस्मात बरेवाईट झाले नंतर घरच्यांना त्रास होऊ नये. पण तेही नंतर अपडेट केले नाही.

भारतात राहणाऱ्या लोकांची या बाबतीतली तयारी काय आहे/असावी याबद्दल इथे वाचायला आवडेल.

मनीमोहोर बापरे.. खतरनाक अनुभव.. आणि खरेच कमाल सुचले

छान धागा आणि छान प्रतिसाद येताहेत, येतील.. नेहमीचेच कामात येणारे

मनीमोहर खतरनाक अनुभव.

माझी मुलगी ७ वर्षाची होती. शाळेसाठी बस होती. बस गेट समोर थांबत होती. आमच्या घरातिल खिडकीतुन ती उतरताना दिसत असे मग त्यानंतर दोन बिल्डींग ओलांडुन लिफ्ट ने ९व्या माळ्यावर घरी येईपर्येन्त ती दिसत नसे. त्यासाठी तीला ३ मिनिटे लागत होती. गेटेड कम्युनिटी असल्याने तशी भिती न्हवती. रोज आम्ही खिडकीतुन ती बस मधुन उतरताना बघत असु. एके दिवषी ३ मिनिटाच्या एवजी १० मिनिटे झाली तरी ती आली नाही. सुरवातिला वाटले की कोणा मैत्रिणी बरोबर बोलत उभारली असेल. पण १० मिनिटानी घराच्या बाहेर येउन बघितले तर लिफ्ट बंद. मग प्रत्येक माळ्यावर जाउन तिला आवाज दिला. दुसर्या माळ्यावर तिने रिस्पोन्स दिला. त्यानंतर गार्ड कडुन नंबर घेउन. (त्यात १० मिनिटे गेली) लिफ्ट कंपनीला फोन केला. त्याची गाडी ट्रॅफिक मुळे ४० मिनिटानी आली. तिला लिफ्ट मधुन बाहेर यायला १ तासापेक्षा जास्त वेळ लागला. आम्ही तिला बाहेरुन धिर देत होतो. तिला वॉटर बॉट्ल बगले पाणी प्यायला सांगितले.
त्यामुळे शक्यतो लहान मुलाना लिफ्ट मधुन एकटे जाउ नये आणि गेल्यास आपल्याकडे lift maintenance चा नंबर ठेवावा. लिफ्ट मध्ये तो नंबर असतो पण तो आतल्या बाजुला लिहलेला असतो.

मनीमोहोर, वाचून धस्स झालं एकदम....
बापरे वाटलं एकदम..
साहिल...मनीमोहोर, तुम्हला लगेच सुचलं म्हणुन बरं....

साहिल, लिफ्ट मध्ये एकटीनं अडकणे मुलीला किती कठीण गेलं असेल.

ज्या गोष्टींची आपण कल्पना करू शकतो त्याबाबत आपण प्रतिबंधक उपाय करू शकतो . पण कधी कधी एका सेकंदात आणीबाणी निर्माण होते ज्याच्या साठी आपण काहीच तरतूद करून ठेवलेली नसते . लहान मुलांच्या बाबतीत हे अधिक घडत . अशा वेळी डोकं शांत ठेवणं , घाबरून न जाणं आणि प्रसंगावधान राखून निर्णय घेणं कामी येतं

सर्व टीप्स व अनुभव बरच काही शिकवतात .
मनिमोहोर तुम्ही आलेल्या प्रसंगाला घाबरून न जाता ज्या प्रकारे हैंडल केलं ते काबिले तारीफ़ आहे .

इथे सध्या टेक्सस आणि दक्षिणेकडच्या बर्‍याच राज्यांमधे वादळ आणि पावसामुळे पूर आले आहेत. अतिवृष्टी झाली की रस्ते पाण्याने भरून जाणे साहजिकच. दर वेळी अशा परिस्थितीत पाण्यात गाड्या अडकण्याच्या किंवा वाहून जाण्याच्या बातम्या येतात. याचे कारण ड्रायव्हर्स ना अंदाज येत नाही समोर रस्त्यावर नक्की किती पाणी असेल आणि त्याचा जोर किती असेल. याविषयी कुठल्यतरी चॅनल वर माहिती देत होते आज. इथे विषय चालूच आहे तर शेअर करावी म्हटलं.

त्यांनी अशा टिप्स दिल्या होत्या :
१. आधी मुख्य म्हणजे रस्ता पाण्याने कव्हर्ड असेल तर थोडेच तर आहे पाणी , जाऊ चटकन असे अन्डरएस्टिमेट करून पाण्यात गाडी घालू नका. अगदी कमी पाणी घात करू शकते.
२. फक्त सुमारे १ फूट पाणी गाडी वाहून न्यायला पुरेसे असते. एकदा पाण्यच्या धारेत गाडी लागली की तुमचा सर्व कन्ट्रोल जातो. गाडीचे दार बाहेरच्या पाण्याच्या प्रेशर ने उघडत नाही अशा वेळी.
३. तरी गेलीच गाडी पाण्यात आणि कन्ट्रोल जातोय असे वाटले तर खिडक्या शक्य तितक्या लवकर उघडा. खिडकी उघडू शकलात तर वाचण्याची शक्यता वाढते. सीट बेल्ट, जॅकेट्स वगैरे काढा. आणि खिडकीतून बाहेर पडा. वस्तू वगैरे वाचवण्यात क्षणही घालवू नका.
४. खिडकी आणि दार दोन्ही उघडता आले नाही तर भितीदायक पण त्यातल्या त्यात वाचण्याची शक्यता म्हणजे पाणी आत शिरण्याची वाट पहा. पाणी आत येऊन गळ्यापर्यन्त आले तरी पॉझिटिव रहा! त्या वेळी आतले आणि बाहेरचे प्रेशर सेम झाल्यामुळे दार उघडता येते!
५. खिडकी उघडेपर्यन्त जर गाडी प्रवाहात वाहत जात असेल तर खिडकीतून बाहेर पडा आणि टपावर चढा, पण उभे न राहता पालथे पडून गाडीला धरून स्टेबल राहणे आणि रेस्क्यू ची वाट पहाणे हे सर्व्हायवल चे बेस्ट चान्सेस म्हणे.

मनीमोहोर आणि साहिल, अगदी खतरनाक अनुभव.
आपत्ती व्यवस्थापनाबाबत पर्सनल लेव्हलला अमेरिकेत आणि भारतात जमीन आस्मानाचा फरक आहे. सार्वजनिक लेव्हलला नाही, असंही म्हणवत नाही. पण पर्सनल लेव्हलला अगदे जाणीवही नाही, हे इथल्या पूर्वतयारीबद्दल वाचून जाणवलं. २६ जुलैच्या महाप्रलयानंतर अनेक मुंबईकरांना आपल्या घरातेल वस्तूंचाही विमा उतरवायला हवा हे कळले.

इथे एखादी इमारत कोसळल्याची/इमारतीला आग लागल्याची बातमी येते, तेव्हा त्या इमारतीतले लोक आपली महत्त्वाची ओळखपत्रे, बँक इ.संबंधी कागदपत्रे कशी रिकव्हर करत असतील, आणि ती नाही झाली तर पुढे काय करावं लागत असेल, असा प्रश्न पडतो. यांच्या फोटो कॉपीज काढून बँकेच्या लॉकरमध्ये ठेवणं हा एक उपाय झाला. पण त्याची चावी आणि अकाउंट नंबरची माहिती २४ तास अंगावर बाळगायची का?

आपली महत्त्वाची ओळखपत्रे, बँक इ.संबंधी कागदपत्रे कशी रिकव्हर करत असतील,>>>> मीहा बेसिक उपाय करते. महत्तवाच्य वाटनार्या प्रत्येक डॉक्युमेंट ची स्कॅन कॉपी एका पेनड्राईव्ह ला , २ वेगवेगळ्या ईमेल अकाउंट ला ,आनि एक ऑफीसमधल्या फाईल ला मेंटेन करते.कुठुनही रीट्राईव्ह करता यावी म्हणुन.
अर्थात हे करण्याची बुद्धी मेजर डॉक्युमेंटेस हरवल्यानंतर झाली.

ऑफीसमधे एका कलिगला सकाळपासुन बरे वाटत नव्हते.दुपारपर्यंत तर त्यांना जाणवु लागले की आपलयाला अ‍ॅट्क येतो आहे,त्यांनी लगेच टेबलावरील बेल वाजवुन ,वस्तु पाडुन आवाज केला,आजुबाजुचे केबिन मधे डोकावले, त्यांनी खाणाखुणा करुन सांगितले,सेंकदाच्या अवधीत डोकावण्यार्याना झेपल,(नशिब) लगेच माणस गोळा झाली.बसलेल्या खुर्चीतुनच त्यांना लिफ्टपर्यंत ढकलल,तोपर्यंत फ्लोर च्या दुसर्या टोकाच्या माणसाला ओरडुन सांगितल्,त्याने पळत जाऊन फोर व्हिलर काढली.लिफ्ट्मधुन , गाडी,आनि गाडी थेट जवळच्या हॉस्पिटलमधे.त्यांचा जीव वाचला.
अर्थात त्यांनी स्वतःच स्वतःला आधी मदत केली,म्हणुन आम्ही मदत करु शकलो.

इथे बर्‍याच टाउनशिप्स ने चालू केलेली एक उपयुक्त आणि इनोवेटिव कल्पना शेअर करावीशी वाटतेय - इन्टरनेट सेफ एक्ष्सचेन्ज झोन्स.
हल्ली इंटरनेट साइट्स वरून अनोळखी लोकांकडून वस्तू विकत घेणे/ विकणे हे तसे कॉमन आहे. पण त्या व्यवहारात पूर्णपणे अनोळखी व्यक्तीला तुम्ही तुमच्या घराचा पत्ता सांगणे तितके सुरक्षित नसते. इथे बरेच गुन्हेही घडलेत त्यामुळे.
तर ही एक साधीच कल्पना आहे पण इफेक्टिव्ह आहे. अशा इंटरनेट वरून केलेया व्यवहाराचे देणे घेणे - ती एक्सचेन्ज एका सेफ जागी करणे. टिपिकली पोलिस स्टेशन चे किंवा सरकारी ऑफिस च्या पार्किंगचा काही भाग ' सेफ एक्सचेन्ज झोन' म्हणून मार्क केलेला असतो. हा भाग झगझगीत उजेड आणि २४ तास कॅमेरा सर्व्हेलन्स मधे असतो.
त्यामुळे अशा ठिकाणी काही वावगा प्रकार करायला सहसा कोणी धजावत नाही. आणि कोणी अशा ठिकाणी व्यवहार करायला नकार दिला तर तुम्ही काय ते समजावे!

वाहत जात असेल तर खिडकीतून बाहेर पडा आणि टपावर चढा, पण उभे न राहता पालथे पडून गाडीला धरून स्टेबल राहणे आणि रेस्क्यू ची वाट पहाणे हे सर्व्हायवल चे बेस्ट चान्सेस म्हणे.
नवीन Submitted by maitreyee on 27 August, 2017 - >>>>>>>

मैत्रेयी च्या प्रतिसादाशी संबंधित,
26 जुलै चा अनुभव घेतल्यावर गाडीत एक व्हीक्ट्रिओनिक्स ची survival नाइफ ठेवायला सुरवात केली आहे, कार सीटचा शेजारी सहज हाताशी येईल, मात्र इम्पॅक्ट मुळे दूर जाणार नाही अशी ठेवली आहे.
त्यात एक ब्लेड (सीट बेल्ट कापायला) आणि एक शॉर्ट टोकदार हातोडा असतो(काच फोडायला)
माझा कामानिमित्त कार ने खूप प्रवास असतो, ही अशी इन्व्हेस्टमेंट आहे, जींचा वापर झाला नाही तर मी खुश असेन Happy

अतिशय छान धागा काढला आहे हा. ईथले अनुभव वाचून नक्कीच कोणालातरी त्याच्या उपयोग होऊ शकतो. माझाही एक अनूभव.
आम्ही सर्व भावंड एका भावाच्या घरी नाईट आउटसाठी जमलो होतो. तो सहा महिन्यांनपुर्वीच त्या नविन घरात रहायला आला होता. घर चार रूमच (२ बी एच के) होत. जेवणं झाल्यावर आम्ही सगळ्या मुलांना एका खोलीत खेळायला पाठवलं, आम्ही हॉल मधे गप्पा मारत बसलो. रात्रीचे दहा वाजून गेले होते. मुलं दार लावून खेळत होती. त्या वेळी सगळे चार-आठ -दहा अशा वयाचे होते. अचानक मुलांच्या खोलीच दार जोर जोरात वाजू लागलं. काय झाल म्हणून बघायला आम्ही तिथ गेलो, तर कळाल की दार आतून लॉक झाल आहे. आज कालच्या नविन पद्धतीप्रमाणे त्याच्या दाराला साधी कडी न्हवती. गोल गट्टूच लॅच होत. मुलांनी आतून दार उघडायचा बराच प्रयत्न केला, पण काही उपयोग नाही झाला.
मग आम्ही काही जण खाली पार्किंगमधे जाऊन खिडकीतून मुलांना धीर देऊ लागलो, सूचना करू लागलो. भावाने दुसर्‍या चावीने दार उघडण्याचा प्रयत्न केला. पण त्यानेही काही होईना. नेमक काय झाल आहे ते ही कळेना. ह्या सगळ्यात अकरा वाजून गेले. आम्ही चावी वाल्याला फोन केला तर त्यानेही त्याला आत्ता जमणार नाही तो सकाळी येईल असे सांगीतले. आम्हाला काय करावे ते कळेना. पण मुल अजीबात घाबरली नाहीत.(आम्हीच घाबरलो होतो)
मग आम्ही हिंदी सिनेमास्टाईल दाराला लाथा मारू लागलो, दंडाने धडका मारू लागलो, पण ईथे कोणाच्यातच 'दया' न्हवता.
मग आमचा मोर्चा वळाला स्क्रुड्राईव्हर कडे. दाराच्या त्या बारीक फटीतून तो काही आत जाईना.
मग घरातले उलतने,पक्कड, हतोडी असे काय काय वापरून बघितेले. तेव्हा कुठे दाराला थोडी फट पडली. शेवटी त्याचा दाराचा तो गट्टू बाहेरच्या बाजूने तोडून काढला. तरीपण दारात अडाकलेली त्याची पट्टी तशीच घट्ट अडकलेली होती. एव्हाना दारात बर्यापैकी फट तयार झाली होती. मग हातोडी आणि स्क्रुड्राईव्हरने दाराची कड तोडली आणि हतोडीने आतील बाजूचा गट्टू आतल्या बाजूला पाडण्यास सुरवात केली. तस आतील बाजूने गट्टू खाली पडाला. दार उघडले, मुलं बाहेर आली. तरीही ती पट्टी तशीच दराच्या चौकटीत अडकलेली होती. हे सगळ होईपर्यन्त रात्रीचे बारा वाजून गेले होते.
तर लहान मुलं आणि दाराच्या कड्या मग त्या जुन्या पद्धतीच्या असो की नविन या पासून मुलांना लांब ठेवणे अथवा दार बंद करून खेळू न देणे योग्य.

इथे हा धागा येणं आणि मुंबईत पुरसदृश परिस्थितीमुळे आपत्कालीन व्यवस्थापनाची तातडीची गरज भासणं हा विचित्र योगायोग म्हणावा लागेल. कालही बातम्यांमध्ये फुटेज दाखवत होते तेव्हा अनेक लोक कारची चारही चाकं पाण्याखाली जातील इतकं पाणी असतानासुद्धा त्यातून कार नेण्याची रिस्क घेत होते. (त्याही टॉप एन्ड*, ऑटोमॅटिक खिडक्या दरवाजे लॉक होणाऱ्या, खिडक्या पूर्ण बंद करून वगैरे) तेव्हा या धाग्याची आणि वर मैत्रेयीने दिलेल्या टिप्सची आवर्जून आठवण आली.

* इथे टॉप एन्ड म्हणजे मला परदेशी बनावटीच्या, कमी उंची आणि कमी ग्राउंड क्लिअरन्स असणाऱ्या गाड्या म्हणायचे आहे.

जपानात रहाणार्‍या लोकानी इथे लिहाव अशी विनंती.
एका आठवड्याच्या कोर्सला गेले होते तेव्हाही होस्टेल मधे रूम ची चावी देताना ,भुकंप/ इतर आपत्कालीन प्रसंगी काय करा अश्या सुचना वजा व्हिडिओ दाखवला होता.

खरेच अतिशय उपयुक्त माहिती देणारा धागा आहे. मनीमोहोर, साहिल आणि सर्वांचे अनुभव ,समयसूचकता नक्कीच लक्षात ठेवण्यासारखे आहेत

दारास कडी- कोयंडा असतो .त्याचा उपयोग कुलूप लावण्यासाठी केला जातो.घराबाहेर जाताना कुलूप लावून बाहेर पडतो पण आल्यावर बाहेरनं कडी उघडीच रहाणार कि नाही ! याचाच फायदा घेऊन एकदा आमच्या बिल्डिंगमध्ये चोराने ज्या घरात शिरायचे त्याखेरीज सर्व घरांची ((flats )दारे बाहेरून बंद करून आपले काम केले. त्या घराचे सगळे बाहेरगावी गेले होते .सकाळी शेजारच्या घराच्या दाराची खडखड ऐकू आली .
. जाग येऊन बाहेर आलो. तेव्हां आम्ही दार उघडले .नंतर उरलेली दारे पण एकामागून एक उघडली.सारा प्रकार लक्षात आला............ आता तुमच्या मनात शंका येणार न की आम्ही बाहेर कसे आलो?......त्याचे असे झाले आम्ही दार उघडून घरात जातांना कुलूप कोयंड्यात लावून ठेवतो . त्यामुळे चोरास आमचे दार बाहेरून बंद करता आले नव्हते.ही घटना घडली तेव्हां फोन एवढे बोकाळले नव्हते. दारास अंगाची कुलुपे व ग्रीलची दारे नव्हती. असे असले तरी आजही दारास कडी कोयंडा असतो . हे लक्षात घ्यावे.

जपानात रहाणार्‍या लोकानी इथे लिहाव अशी विनंती. >>इन्ना जरा वेळ काढून लिहिते मी इथे. जपान मधे उद्या म्हणजे १ सप्टेंबर हा दिवस डिझास्टर प्रिव्हेन्शन डे म्हणून जाहिर केला आहे. भूकंप प्रवण देश असल्याने आणि त्सुनामी, पूर अशा नैसर्गिक आपतींचा अनुभव असल्याने, इथे त्या बाबतीत अत्यंत जागरूकता दिसून येते. हा पूर्ण आठवडा ऑफिसेस, शाळा, शासकिय कार्यालये या ठिकाणी अत्यंत विचारपूर्वक आखलेली आणि शिस्तबद्ध प्रिव्हेन्शन ड्रिलस असतात. आमच्या ऑफिसचे ६ तारखेला आहे. मी फायर गार्ड टीम मधे असल्याने आधी उद्या त्याचे ट्रेनिंग आहे!! बाकी प्रत्येक कर्मचार्‍याला हेल्मेट, पोर्टेबल टॉयलेट, फूडकॅन्स, अ‍ॅल्युमिनियम ब्लँकेट, पाणी वगैरे असलेले इमर्जन्सी किट पुरवणे कायद्याने बंधनकारक आहे.

कुलूप कोयंड्यात लावून ठेवायची प्रथा मुंबईत कित्येक वर्षांपासून आहे. आम्ही पण तसे करतो. अर्थात इमारती तील सर्व सदनिका धारकांनी तसे केले तर फायदा होतो.

कुलूप कोयंड्यात लावून ठेवायची प्रथा मुंबईत कित्येक वर्षांपासून आहे. आम्ही पण तसे करतो. अर्थात इमारती तील सर्व सदनिका धारकांनी तसे केले तर फायदा होतो.
कुमर१ ....अगदी बरोबर म्हणता आहात

मैत्रेयी यांनी लिहिलेली 'सेफ झोन' ची कल्पना चांगली आहे. पण एक गंमत बघा. घरून अजिबात कुठे न हलता वस्तू मिळावी म्हणून ऑन लाईन खरेदी चा उदय झाला. आणि आता तशी मागवलेली वस्तू ताब्यात घ्यायला आपण घरापासून काही अंतरावरील ठिकाणी जाणार ! ☺

Pages