इंग्रजी भाषेचा विजय (ले० सलील कुळकर्णी)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

लोकसत्ता (लोकमुद्रा पुरवणी दि० ०४ ऑक्टोबर २००९) मध्ये प्रकाशित झालेला हा लेख, प्रत्येक स्वाभिमानी व स्वभाषाप्रेमी माणसाने आवर्जून वाचावा असा आहे.
—————
आज इंग्रजी भाषा ही जगातील अत्यंत प्रगत भाषांपैकी एक आहे. इंग्लडसारख्या एका चिमुकल्या देशात जन्मलेल्या या भाषेची एकेकाळी त्याच देशात किती दयनीय परिस्थिती होती आणि इंग्रजांनी जिद्दीने कशा प्रकारे तिचे पुनरुत्थान केले याची ’सुरस आणि विस्मयकारी’ कथा पुढील दुव्यावर सापडेल.

http://amrutmanthan.wordpress.com/2009/10/04/इंग्रजी-भाषेचा-विजय-ले०-स/

मायबोलीवर मायबोलीमध्ये मायबोलीविषयी रंगीबेरंगीच्या पानावर लिहिण्याचा संकल्प केला आहे. आज मी जो लेख आपल्यापुढे सादर केला आहे तो आपल्याला आवडेल अशी आशा करतो. अशा महत्त्वाच्या विषयावरील आपले अभिप्राय लेखकाला अवश्य कळवा.

प्रकार: 

लेख चांगला आहे.
काही मुद्दे: त्या काळात व्यापार जगभर पसरलेला नव्हता. देश लहान होता, देशातल्या देशात सुद्धा व्यापार फारच मर्यादित असावा. त्यामुळे भाषा संपूर्णपणे बदलणे शक्य होते.

नंतर अर्थातच युद्ध करून जवळपास सर्व जग जिंकले नि तिथे आपल्या भाषेची सक्ति केली! अमेरिकेत असे म्हणतात की केवळ एका मताने जर्मन ऐवजी इंग्रजी ही राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारली गेली!

पेशव्यांनी म्हणे सगळ्या भारतावर अंमल बसवला होता. पण शिंदे, होळकर त्यांच्या राज्यात मराठी बोलत असते तर त्यांच्या राज्यांच्या ठिकाणी आज मराठी नसते का आले? मराठीबद्दल लाज वाटणे, परभाषेचे प्रेम हे असे फार पूर्वीपासून आहे, ते नाहीसे करणे आजकालच्या काळात फार जास्त कठीण आहे.

आजकालच्या काळात, भारतातातल्या भारतात सुद्धा व्यापार म्हंटला तरी एकच मराठी भाषा पुरत नाही. गुजरात्यांचा व्यापारात प्रभाव असल्याने बर्‍याच मराठी लोकांना गुजरातीच शिकावे लागले. गुजराती, मारवाडी लोक पण मराठी शिकले, पण त्यांनी त्यांची भाषा सोडली नाही.

जागतिकीकरणाच्या नावाखाली शाळेत सगळे इंग्रजीच शिकवले जाते. महाराष्ट्रात मराठी लोक घरीसुद्धा इंग्रजीतून बोलतात. रोजच्या मराठी भाषेत सुद्धा इंग्रजी शब्दच जास्त. साहित्यात सुद्धा वास्तवतेच्या नावाखाली भरपूर इंग्रजी किंवा हिंदीच असते. मोठ्या आशेने मायबोलीवर यावे तर तिथेहि इंग्रजीच. याबद्दल मी एक मोठा लेख माझ्या रंगीबेरंगी पानावर लिहीला आहे.

असे ऐकले आहे की महाराष्ट्र राज्य सरकारच्या कचेर्‍यांमधे मराठीच बोलले पाहिजे. ते जर सगळीकडे पसरले तर ते शब्द जास्त प्रचलित होतील नि वापरल्या जातील. सध्या चित्र विरुद्धच दिसते. माहित असलेल्या मराठी शब्दांसाठी सुद्धा इंग्रजी वापरण्यात येते. जसे 'मला फार बरे वाटले' ऐवजी 'मला फील गुड झाले!' (प्रत्यक्षात ऐकलेले!)

थोडक्यात, इंग्रजांइतकेच आपले आपल्या भाषेवर प्रेम असले, अभिमान असला तरी तेव्हढा बदल फार जास्त कठीण आहे. फार तर मायबोलीसारख्या ठिकाणी मराठी भाषा जास्त वापरावी एव्हढीच अपेक्षा ठेवता येईल. नि मग तिथे फक्त माझ्यासारखे लोक येतील, RTMM - (रिकामटेकडी म्हातारी माणसे).

लोकसत्तामधे तो लेख वाचला होता! Happy इथे लिन्क दिल्याबद्दल धन्यवाद

वाजपेयीन्च्या डुगडुगत्यामानेवर नि वाढत्या वयोमानावर विनोद करणार्‍या कितीजणान्नी, ते स्वतः जेव्हा अर्ध्या चड्डीत असून गळकी नाके शर्टाच्या बाहीला वा गन्जीफ्रॉकला पुसत होते, त्याकाळी वाजपेयीन्नी सन्सदेत दिलेले पुस्तकाचे सन्दर्भ व भाषेबाबतची धोकादायक सूचना, आज या लेखाद्वारे समोर आले अस्तानाही वाचायचे कष्ट घेतले अस्तील याची शन्काच आहे! असो.

झक्की, पुणेमुम्बईतील तथाकथित "सुशिक्षीत" इन्ग्राजाळलेली जन्ता म्हणजे आख्खा महाराष्ट्र नाही! अजुनहि आशेला जागा आहे.

zakki>> नि मग तिथे फक्त माझ्यासारखे लोक येतील, RTMM - (रिकामटेकडी म्हातारी माणसे).

इंग्रजांनी ६०० वर्षांच्या न्यूनगंडावर मात केली आणि आपण २०० वर्षांच्या न्यूनगंडाचा बाऊ करतो. ज्या भाषेत वैद्यकीय शिक्षण दिले तर रोगी मरतील आणि जी भाषा फक्त पैलवानांना भांडण्याच्याच कामाची आहे; न्यायालयातील युक्तिवादाला नाही अशी प्रतारणा केली गेली ती भाषा आज वैद्यकीय संशोधनासाठी व इतर विविध परदेशातील राष्ट्रीयच नव्हे तर लहानसहान शहरे, नगरपालिका, संस्था यांचेदेखिल कायदे-घटना तयार करण्यास वापरली जाते ही गोष्ट इ०स० १६०० साली कोणी दारूच्या (स्कॉचच्या?) नशेत तरी म्हटले असते असते का?

शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं तेव्हा महाराज, जिजाबाई, रामदास स्वामी, दादोजी कोंडदेव (महाराष्ट्र शासनाची क्षमा मागतो) वगैरे थोडके दूरदर्शी वगळता इतर कोणी स्वप्नात तरी तसे पाहिले होते का? इंग्रजांच्या अंमलापासून स्वातंत्र्य मिळणे ही सुद्धा एकेकाळी अशक्यप्राय घटना होती. भारतीय माणूस स्वातंत्र्यास नालायक हे केवळ चर्चिलसारख्या इंग्रजांनाच नव्हे तर अनेक भारतीयांनाही मनापासूनच वाटत होते. पण स्वाभिमान, निर्धार, ध्येयासक्ती इत्यादी गुण हे अशा दुष्कर, दुष्प्राप्य (खरं म्हणजे हे सर्व अशक्य नव्हतेच) गोष्टी यशस्वी करून दाखवतात.

म्हातार्‍या माणसांनी सुद्धा स्वतःला रिकामटेकडे का म्हणावे? प्रत्येक म्हातारा हा रिकामटेकडाच असतो असे नाही आणि प्रत्येक तरूण हा उद्योगी असतोच असे नाही. वृद्धांच्या ज्ञानाचा व अनुभवाचा फायदा इतरांना नक्कीच होऊ शकतो. म्हणून तर ज्ञानवृद्ध असा शब्दप्रयोग प्रचारात आला. वर उल्लेख केलेले समर्थ रामदास, दादोजी कोंडदेव यांनी शिवाजी महाराजांना स्वराज्यासाठी मार्गदर्शन केलं. आपणही स्वभाषेसाठी बरंच काही करू शकता. मराठी माणसाचा स्वाभिमान पुन्हा फुलून यावा, आत्मविश्वास वाढावा यासाठी तरूण पिढीला मार्गदर्शन करू शकता, त्याबद्दल लिहू शकता. आमच्या ओळखीचे एक वयोवृद्ध गृहस्थ आहेत ते स्विट्झरलंडमध्ये मराठी बालकांना व तरूणांना आपली भाषा, आपली संस्कृती याची शिकवण देतात. स्वभाषेबद्दल व स्वसंस्कृतीबद्दल त्यांच्या मनात प्रेम व अभिमान रुजवतात. दुसरे एक निवृत्त प्राध्यापक मराठीप्रेमी तरुण व प्रौढांना इतकी स्फूर्तिदायक माहिती देतात, इतकं लेखन करतात की त्यांच्या उत्साहापुढे आम्हाला न्यूनगंड वाटावा. हे दोघेही ऐंशीच्या घरात असावेत. आपणही आपल्या मायबोलीसंबंधी जनजागृतीचे कार्य करू शकता. माहिती अधिकार वापरून तीवर होणार्‍या अन्यायाविरुद्ध काही विधायक कार्य करू शकता. उलट पोटापाण्याच्या जबाबदारीतून निवृत्त झाल्यावर आपण अधिक मोकळेपणाने व अधिक जोमाने अशी कामे करू शकता. निवृत्त आयुष्य म्हणजे खर्‍या अर्थाने कर्मण्येवाधिकारस्ते अशा प्रकारचे आयुष्य जगण्याची संधी. ती आपण नक्कीच सार्थ कराल.