या कामशिल्पांचं करायचं काय?

Submitted by वरदा on 19 June, 2017 - 10:25

खरं तर धागा काढण्याएवढं मटेरियल या विषयात नाही, फक्त वादंग तयार करायचं सामर्थ्य आहे. पण राहावलं नाही म्हणून काढते आहे. मी कुठल्याही एका राजकीय विचारसरणीचं अथवा पक्षाचं समर्थन करत नाही. पण टोकाचे विचार करणारे सगळ्याच पक्षांमध्ये असतात, त्यातून मोठे आणि छोटे कुणीच राजकारणी, नेते सुटत नाहीत एवढंच मला म्हणायचं आहे.

खजुराहो च्या प्रसिद्ध मंदिरांपाशी कामसूत्र विकलं जातं यावरून सध्या सगळीकडे तावातावाने चर्चा चालू आहे. आपली संस्कृती, इतिहास याची अर्धवट, भगव्या चष्मातून माहिती व छ्द्मज्ञान (pseudo-knowledge) असलेल्या काही माथेफिरूंनी या सर्वावर बंदी घालावी असं आग्रहाने सुचवलं आहे (त्यांना शक्य असेल तर शक्तीचा वापर करूनही अंमलात आणायचा प्रयत्न करतील, कुणी सांगावे?).... गेल्या तीनचार वर्षांमध्ये आपल्या संस्कृती आणि इतिहासाविषयी लोकपातळीवर छद्मज्ञान पद्धतशीरपणे पसरवलं जात आहे ते फार चिंताजनक आहे.

पण खजुराहो बिचारं कायमच वादाच्या भोवर्‍यात असतं. त्याविषयी नाराजी दर्शवणार्‍यांमधे सध्याचे उजव्या विचारसरणीचेच कशाला, खुद्द गांधीजींचाही समावेश होता. गांधीजी या मंदिरांच्या पूर्णतया विरोधी होते. त्यांच्या मते ही मंदिरं परत मातीच्या ढिगार्‍यात झाकून टाकणेच जास्त योग्य होते. अखेर रवींद्रनाथ टागोरांना यात मध्ये पडून ही मंदिरे आपली आपला राष्ट्रीय वारसा आहेत हे गांधीजींना ठामपणे सांगावं लागलं होतं...
तेव्हा टू सेट द रेकॉर्ड स्ट्रेट - आपल्याला सामाजिक मानसिकतेमध्ये कामशिल्पं ही आपल्या समृद्ध वारशाचा एक भाग आहेत हे कधीच मोकळेपणे मान्य करता आलेले नाही. जसा बहुसंख्येने समाज तसेच त्यांचे नेते.
मात्र खजुराहो हे एकमेव कामशिल्पे असलेले मंदिर नाही. आठव्या नवव्या शतकानंतर उभारल्या गेलेल्या बहुसंख्य मंदिरांमधे कमी-जास्त प्रमाणात कामशिल्पं कोरली जायची. अगदी वेरूळच्या कैलासातही कामशिल्पे आहेत.

तेव्हा आपला सामाजिक दांभिकपणा आणि त्याहूनही ढोंगी नीतीमत्तेची आवरणे बाजूला करून जेव्हा आपण हे मान्य करू तेव्हा सुदिन!!

त.टी. - यावर नेहेमीच्या यशस्वी उखाळ्यापाखाळ्या काढणे, वचावचा भांडणं करणे असं न होता चर्चा झाली तर खूप बरं होईल. तसं चर्चा करण्यासारखंही यात फारसं काही नाही. पण इतरत्र कुठे पोस्ट केली असती तर कदाचित कुणाच्या लक्षात आली नसती. म्हणून इथे वेगळं लिहिलं. तेव्हा वाचा, पोस्ट लिहिलीच पाहिजे असं काही नाही. पण विसरून जाऊ नका Happy

Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

<<तेव्हा आपला सामाजिक दांभिकपणा आणि त्याहूनही ढोंगी नीतीमत्तेची आवरणे बाजूला करून जेव्हा आपण हे मान्य करू तेव्हा सुदिन!!>>

दुर्दैवाने जोपर्यंत राजकारण या जगात अस्तित्वात आहे तोपर्यंत हे शक्य नाही. आपण इतकेच लक्षात ठेवायचे की जसे मंदीरे तोडणारे हात जन्मतात तसेच मंदीरे बांधणारे आणि परत उभारणारे ही हात जन्मतात.

@ ट्यागो, हर्पेन
हो, खरंतर त्या तर्कशास्त्राने शंकरालाच देव म्हणून ब्यान केलं पाहिजे आणि लिंगपुराण वगैरे संबंधित ग्रंथांना..

तेव्हा टू सेट द रेकॉर्ड स्ट्रेट - आपल्याला सामाजिक मानसिकतेमध्ये कामशिल्पं ही आपल्या समृद्ध वारशाचा एक भाग आहेत हे कधीच मोकळेपणे मान्य करता आलेले नाही. जसा बहुसंख्येने समाज तसेच त्यांचे नेते.>>> खरयं.
कामशिल्पांना विरोध करायचा आणि शंकराच्या पिंडीला तर अगदी हात लावुन वगैरे नमस्कार करायचा, काय गंमत आहे .

शंकराच्या पिंडीला तर अगदी हात लावुन वगैरे नमस्कार करायचा,

>> ते काय करत आहेत हे त्यांना समजले असते तर ते त्यांनी केले नसते हो.

आता त्यांना तसे सांगायचे धाडसही कोणी करणार नाही, मार खायचा काय? Wink

अशी शिल्पे मी कोणार्क चे सूर्यमंदिर, सिन्नर चे गोंदेश्वर इकडे सुद्धा पहिली आहेत. अर्थात शिल्पांची संख्या कमी आहे.

पण वरदा,
हि शिल्पे अंकित करण्यामागे काय हेतू होता (की असावा म्हणू) या वर कोणी प्रकाश टाकू शकेल काय?
लैगिक समागम आपल्या नित्य आयुष्याचा भाग म्हणून त्यांना देवळाच्या भिंतीवर स्थान दिले गेले ,हि थिअरी ऐकली आहे, पण खूपशी पटली नाही

तरी बरं जगाच्या लोकसंख्यावाढीत मोलाची भर घालणारे भारतीयच आहेत! देव करो आणि ह्या नतद्रष्ट लोकांना चघळायला लवकरात लवकर दुसरा विषय मिळो!

ते काय करत आहेत हे त्यांना समजले असते तर ते त्यांनी केले नसते हो.>>>>>>>>>>>
नाना तसे नाही हो, आपल्याकडे नंदीला मुद्दामहून वृषणाला हात लावून नमस्कार करतात, त्या बाबत एक कथा पण आहे.
त्यामुळे अमुक एका अवयवाला हात लावून नमस्कार करू नये असा stigma असेल असे वाटत नाही

सिम्बा,

माझा वैयक्तिक अनुभव आहे तेवढ्यावरुन सांगतो, माझे बालपण आजूबाजुला शंकराचे प्रचंड भक्त असलेल्या मोठ्या लोकसंख्येत गेले आहे, आजही मी अशाच लोकांच्या सहवासात आहे. आजवर कोणीही थोरामोठ्याने हे सांगितलेले नाही की पिंड म्हणजे प्रत्यक्षात लिंग-योनी संगम आहे असे. जशी गणेश, दुर्गा वगैरेंची मूर्ती तशीच पिंडी असते अशीच भावना बघितली आहे. गावाखेड्यांतुन अनेक आकाराचे अनेक देव असतात, तसाच विशिष्ट आकार असलेला हा देव, तो आकार आध्यात्मिक गुढ आहे अशी यांची मान्यता. माझ्या अभ्यासात मला कळले तेव्हा मलाच प्रचंड धक्का बसला होता, अर्थात मी कायमचा नास्तिक आहे म्हणून भावनाओंको ठेस वगैरे पहुंची नही, पण अशी ठेस पहुंचणारे बरेच बघितलेत. त्यांना हे सर्व सांगितले तरी ते विश्वासच ठेवत नाहीत. भक्त आहेत ते शेवटी.

वृषणाची कथा रचली म्हणून हात लावत असतील, खरेतर वॄषणाला हात लावायचा असतो हेच मला आता आता जालावर आल्यावर कळले आहे. Wink

पण शंकराच्या पिंडीसमोर/मूर्तीसमोर असलेला नंदी हा कायम बसलेल्या स्थितीत बघितलेला आहे. बसलेल्या नंदीच्या वृषणाला हात कसा लावता येतो लोकांना?
बाकी खजूराहोच्या देवळांवर्/मूर्त्यांवर किंवा तिथे कामसूत्र पुस्तकं विकण्यावर बंदी आणणे वगैरे परत राजकिय पोळी भाजून घेणे प्रकार असू शकतो आणि अशा प्रकारची बंदी आणणे हा तद्दन मूर्खपणा आहे.

खजुराहोतली देऊळं/शिल्पं युनेस्कोने वर्ल्ड हेरिटेज लिस्ट मध्ये सामिल केलेली आहेत म्हणजे त्यांच्या संरक्षणाची जबाब्दारी भारत सरकारवर येत असल्याने संस्कृतीरक्षकांचा विरोध पेल्यातलं वादळ ठरण्याची शक्यता जास्त आहे.

बाकि, गांधीजींचा हि या शिल्पांना विरोध होता हा मुद्दा आणुन माबोच्या दोन गटांमधल्या पोटेंशियल चर्चायुद्धाला खीळ घातल्याबद्दल अभिनंदन! Happy

>मी कुठल्याही एका राजकीय विचारसरणीचं अथवा पक्षाचं समर्थन करत नाही. पण टोकाचे विचार करणारे सगळ्याच पक्षांमध्ये असतात, त्यातून मोठे आणि छोटे कुणीच राजकारणी, नेते सुटत नाहीत एवढंच मला म्हणायचं आहे.
>तेव्हा टू सेट द रेकॉर्ड स्ट्रेट - आपल्याला सामाजिक मानसिकतेमध्ये कामशिल्पं ही आपल्या समृद्ध वारशाचा एक भाग आहेत हे कधीच मोकळेपणे मान्य करता आलेले नाही

या विषयाकडे थोड्या व्यापक दृष्टीकोनातून पाहिलं पाहिजे असं मला वाटतं.
टोकाचे विचार करणारे सगळ्याच पक्षांमध्ये धर्मांमधे असतात. आपल्याला सामाजिक मानसिकतेमध्ये जगातल्या सामाजिक मानसिकतेमधे काम हा समाजाचा एक भाग आहे हे का लक्षात घेतंलं जात नाही...

सेक्स बद्दलचा दांभिकपणा जगातल्या सगळ्याच धर्मांमधे / समाजा मधे आहे. काळानुसार काही समाजामधे त्या कडे बघायची दृष्टी बदलत आली आहे पण ती नेहमीच तशी होती असे नाही. त्यामुळे "आपल्याकडे" असे म्हणून त्याबद्दल विचार करण्यापेक्षाही मूळातच माणसातल्या वेगवेगळ्या गटांमधे या मूलभूत गोष्टीबद्दल दांभिकपणा का आला असावा हे शोधलं तर या प्रश्नाचं उत्तर मिळणं सोपं होईल. कारण भारतीय माणूस हा एक माणूसच आहे आणि माणसांमधे असलेली दांभिकता त्याच्यातही असणार हे ओघानेच आले.
https://en.wikipedia.org/wiki/Religion_and_sexuality

भारत या बाबतीत मागे आहे? उलट काही बाबतीत आपण पुढारलेले (चांगल्या अर्थाने) आहोत. आपल्याकडे घराबाहेर आईने मुलाला पाजणे चुकीचे समजत नाही. पण ही अमेरिकेतली घटना पहा. ही एक विशिष्ट घटना आहे. हा सार्वत्रिक समज्/अनुभव नाही.
http://www.nbcnews.com/id/15720339/ns/travel-news/t/woman-kicked-plane-b...
आणि ही ऑस्ट्रेलियातली
http://www.dailymail.co.uk/news/article-3018154/Woman-baby-forced-flight...

"आपल्या" कडची कामशिल्पे , प्रत्यक्ष कृती दाखवणारी तरी आहेत. पण जिथे आई मुलाला पाजते आहे त्यात स्तनांचे दर्शन झाले म्हणून ओरडणारे दांंभिक "त्यांच्या" कडेही आजच्या युगात आहेत. म्हणून हा विषय ""आपल्या" कडे इतक्या मर्यादेतून पाहिला तर त्याचे खरे स्वरूप, कारणे, उपाय लक्षात येणार नाहीत.
https://en.wikipedia.org/wiki/Topfreedom

पण शंकराच्या पिंडीसमोर/मूर्तीसमोर असलेला नंदी हा कायम बसलेल्या स्थितीत बघितलेला आहे. बसलेल्या नंदीच्या वृषणाला हात कसा लावता येतो लोकांना? >>> नाही , प्रत्येक नंदीच वृषण दिसेल अशीच मुर्ती घडवलेली असते.

अजय मुद्दा पटला.
रिचर्ड बर्टन यांनी अरेबियन नाईटसचे भाषांतर केले तेव्हा त्यातल्या खूप मोठ्या भागाला संपादकीय संस्करण नावाखाली कात्री लावण्यात आली होती असे वाचल्याचे आठवते आहे.

तसे पाहता टेबलाचे पाय देखिल झाकायला लावणार्‍या व्हिक्टोरियन कालखंडाची ही देणगी असे म्हणता येईल. पण 'आपली' परंपरा तशी नसताना आणि पाश्चात्य प्रभावाला वाईट मानणार्‍या गटाकडून जेव्हा या सर्वावर बंदी घालावी असं आग्रहाने सुचवले जाते तेव्हा त्यातला विरोधाभास थक्क करतो.

>तसे पाहता टेबलाचे पाय देखिल झाकायला लावणार्‍या व्हिक्टोरियन कालखंडाची ही देणगी असे म्हणता येईल.
मला तरी तसे वाटत नाही. प्रत्येक धर्मामधे स्वतंत्रपणे आपआपला दांभिकपणा आला आहे. उगीच इतरांना कशाला नावे ठेवा. गमतीची गोष्ट म्हणजे काही आदिवासी / अबओरीजनल टोळ्यांमधे तो अजिबात नाही तर काही टोळ्यांमधे तो स्वतंत्रपणे आपोआप आलेला आहे. बहुतेक ज्याला आपण सुसंस्कृतपणा म्हणतो त्याची एक बाजू म्हणून दांभिकपणा पण उदयाला येत असावा.

हे पहा,

आपण प्रचण्ड वेगाने उज्ज्वल भूतकाळाकडे दौडत आहोत की नाही? (नमो नमो ← ते नैका काहीतरी पवित्रदेवाच्यानावने अस्लं कैतरी लिहितात तसं लिहायचं अस्तं.)

पण,

त्या "उज्ज्वल" भूतकाळात, आमच्यातल्या खर्‍या उत्तम गोष्टी येतच नाहीत. त्यात येतात फक्त गोमाता, गोमूत्र, योगाच्या नावाखाली खवपलेली तथाकथित आयुर्वेदिक(!) औषधे व कोट्यवधि रुपयांचे साम्राज्य, इतर धर्मांचा द्वेष, इतर जातींचा द्वेष, इतर माणसांचा द्वेष. अन या द्वेषाच्या आगीवर भाजलेली आपल्या स्वार्थाची पोळी.

मानवाला सापडलेल्या पहिल्या वहिल्या देवांत, त्याला भय दाखवणार्‍या निसर्गदेवता होत्या, अग्नि, वायु, आकाश! तशीच त्याहीपेक्षा मोठी आदिदेवता ती मातृका होती. या मातृदेवता, व त्यांच्यातली नवे जीवन निर्माण करण्याची शक्ती अक्षरशः पूजली गेली. त्या काळी समागमातून अपत्यधारणा होते हे ठाऊक नव्हते. फक्त स्त्रीठायी नवे जीवन निर्माण करण्याची शक्ती आहे इतकेच ठाऊक होते.

याच तालावर नंतर स्त्री-पुरुषाचे मीलन झाल्यावर नवा जीव जन्म घेतो हे जसे समजू लागले, तसे या रतिक्रीडेला पूजनाचे महत्व आले. याचेच एक्स्प्रेशन त्या शिल्पांत आहे, असे माझे मत. नवजीवनाची निर्मीती हा देव असला, तरी त्यास कारणीभूत ठरणारी कामक्रीडा देवाच्या आजूबाजूस असावी अशी कल्पना मुळात असावी.

याही नंतर कधीतरी सर्वच धर्मांतल्या धर्ममार्तंडांनी/मौलवींनी/पाद्र्यांनी रतिक्रीडा ही आनंदासाठी नकोच असा स्टँड का घेतला, हे माझ्यातरी आकलनाबाहेरचे आहे. (कुठेतरी हे सगळे जबरदस्तीचे 'ब्रह्मचारी' असतील बहुतेक Wink ) अन त्यातूनच, देवापर्यंत पोचायचे, तर या सगलळ्या आकर्षणातून बाहेर यावे लगेल, व यासाठीच या शिल्पांची निर्मीती झाली, असल्या भाकड एक्स्प्लनेशन्स जन्माला आल्या असाव्यात. (वीर्यनाश हा मृत्यू म्हणे!! LOL)

तर एकंदरितच, आपल्याला ..

  • इतिहास, ही अभिनिवेश व "जय भवानी जय शिवाजी" सारख्या सेंटिमेंट्स बाजूला ठेवून वाचायची/अभ्यासायची गोष्ट आहे,
  • आपल्या पूर्वजांनी जे करून ठेवले, ते आपल्याला संपूर्ण आकळले नाही तर नको, पण ते नष्ट न करता आपल्या वंशजांना समजेल कदाचित म्हणून जतन करुन ठेवले पाहिजे,
  • इतिहाससंशोधक हे न्यूट्रलही असू शकतात. (उदा. बखर = बायस्ड/भाटांचे लिखाण. त्यानंतरच्या ३०० वर्षांनी त्याचे इंटरप्रिटेशन व त्यावरील चर्चा?..)

असल्या संकल्पनांचा गंधही नाही..

तेव्हा, मूळ धाग्याच्या उत्तरार्थः

एकतर तालिबान्यांनी झाडले तसे तोफगोळे झाडून बमियान बुद्धाला विद्रुप करावे,

अर्थातच, आपला परम आदर्श, तो दीनदार बुतशिकन अफझुल्ल्या, त्याने अनेकानेक फोडल्या तशा या मूर्ती फोडून टाकाव्यात...

किंवा आमचे मित्र सिंबा यांनी अड्ड्यावर लिहिले, तसे या शिल्पांना कपडे शिवावेत Wink
/quote
haha.jpg
/unqote
21.gif

वेमा ,
अंजली यांनी शंका विचारली म्हणून इकडे चित्र टाकत आहे, विषयांतर वाटले तर उडवून टाकावेScreenshot_2017-06-19-22-36-32.pngIMG-20170619-WA0009_0.jpg

कथाकल्पतरु स्तबक 3 अध्याय 14 ओवी 36

अजय, तुमच्याकडून 'आपलं' आणि 'त्यांच' याच्या विरोधाकरता नर्सिंगचं उदाहरण, ते ही वरच्या घटना हा पुरावा देऊन यावा याचं सखेद आश्चर्य वाटतं.

ब्रेस्ट फीडिंग केलं म्हणून अमेरिका, ऑस्ट्रेलिया मधील काही अ‍ॅनेकडॉटल घटना आणि त्याची तुलना करून 'आपल्याकडे घराबाहेर आईने मुलाला पाजणे चुकीचे समजत नाही' हे संपूर्णपणे जनरलाईज्ड विधान!!! स्पीच्लेस.
अमेरिकेत/ कॅनडात मॉलमध्ये, ट्रेन स्टेशनवर, रेस्टोरंट मध्ये, एअरपोर्टवर, विमानात तर अनेकदा (टेक ऑफ आणि लँडिंगला तर दडे बसू नये म्हणून डॉक्टर नर्स करा असा सल्ला देतात) आणि अनेक पब्लिक ठिकाणी जिकडे फॅमिली रुम/ फिडिंग रूम आहे तिकडे जाऊन, नसेल तर थोडी प्रायव्हसी मिळेल अशा ठिकाणी, ते ही शक्य नसेल तर फीडिंग क्लॉथ लाऊन नर्स करताना मी (माझ्या बायकोसकट) कित्येक स्त्रीयांना बघितलं आहे. फीडिंग करताना काही अपवादात्मक नजरा सोडल्या (दुर्दैवाने त्या नजरा मोस्टली साउथ एशियन मेल आणि अनेकदा फिमेलच्या होत्या) तर वाईट अनुभव फार नाही.
भारतात नर्सिंग मदर यातील कुठल्या ठिकाणी जाऊन नर्स करू शकते? किंवा नर्स करताना कोणी बघितली आहे ?

वरदा, विषय भरकटत असेल तर पोस्ट काढून टाकतो. राहवलं नाही.
>>देव करो आणि ह्या नतद्रष्ट लोकांना चघळायला लवकरात लवकर दुसरा विषय मिळो!>> अगदी सहमत.

अमितव +१११
अजय च्या पोस्ट मधले जनरलायजेशन पाहून आश्चर्य वाटले.

स्त्री-पुरुष यांच्याता घडणारी ती अत्यंत स्वाभाविक आणि सुंदर घटना आहे.याबाबत आपले तत्कालीन पूर्वज फार प्रामाणिक होते असं मला वाटते.
बाकी देव वगैरे पटत नाही.कारण जवळजवळ प्रत्येक दैवताला मानवी स्पर्श आहे.

नंदीच्या डोक्याला हात लावताना पाहिले आहे,बाकी हे आताच वाचतेय.

सेक्स बद्दलचा दांभिकपणा जगातल्या सगळ्याच धर्मांमधे / समाजा मधे आहे. काळानुसार काही समाजामधे त्या कडे बघायची दृष्टी बदलत आली आहे पण ती नेहमीच तशी होती असे नाही.>>>>>>> अजय, वरदा नी आपल्या भारतातला दांभिकपणा ह्याचा उल्लेख केलेला असला तरी मुद्दा फक्त दांभिकपणा सर्वत्रच आहे हा नाहीये. प्रश्न ह्या दांभिक मनोवृत्ती असलेल्या लोकांची मजल कुठ पर्यंत जाऊ शकते हा आहे. इथे अमेरिकेत जरी दांभिक लोकं असले तरी ला अ‍ॅन्ड आर्डर चे टोटल बारा वाजलेले नसल्यामुळे हे दांभिक लोकं जाग्याव थयथयाट ह्या शिवाय फार काही करु नाही शकत. भारतात तसं नाही होत. भारतात अशाच दांभिक लोकांनी बाबरी मशिद पाडण्या पर्यंत मजल गेली. (हे फक्त एक उदाहरण आहे. दुसर्‍या बाजूचे म्हणजे मुसलमान लोकं सुद्धा असं काही करायला मागे पुढे सरकणार नाही हे मी वेगळं सांगायला नको).
आपल्या इथला दांभिकपणा टोटली मी नाही ह्यातली अन कडी लावा आतलीचं मुर्तीमंत उदाहरण आहे. जिथे संसकृतीचं रक्षण करायला ही लोकं असले फुटकळ मुद्दे मुद्दाम आणतात, तीच लोकं, संधी मिळाली की स्त्रीयांचे बलात्कार करायला कमी करत नाहीत. प्रश्न दांभिकपणा एक्जिक्युट करता येण्याच्या रेंजचा आहे.

माझ्या पोस्टमधे जे जनरलायझेशन झाले आहे ते चुकीचे आहे हे कबूल. ते तसे होईल हे मला लिहिताना लक्षात आले नाही. लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद.

अशा रितीने "ब्रेस्ट फिडींगला" विरोध करणारे जितके थोडे आहेत त्यामुळे सगळा समाजच त्याच्या विरोधात आहे असे होत नाही हे पूर्ण मान्य. मला असे वाटते की (नक्की आकडेवारी माहीती नाही) की कामशिल्पाना विरोध करणारेही असे कमीच असावे आणि सगळा समाजच त्याच्या विरोधात आहे असे होत नाही .

असो. लक्षात आणून दिल्याबद्दल पुन्हा धन्यवाद. यावर मी जास्त लिहिले तर विषयांतर होईल.

कोणे एके काळी एक होता राजा. राजाला वाटलं आपण मंदिर बांधावे. जे खूप खूप वर्षे राहील. माणसाने आदर्श आयुष्य कसा जगावं ह्याची लोकांना आठवण करून देत राहील. माणसाच्या आयुष्यातील चार कर्तव्ये: अर्थ, धर्म, काम आणि मोक्ष. काम हे तर किती महत्वाचे काम. म्हणून राजाने एक १०% शिल्पा मधून कामाचे काम कसा करायचं ह्याची काही शिल्पे बनवून टाकली. राजा तसा हुशार होता. उगाच एखाद्याला लिहिता वाचता नाही आले किंवा उद्या भाषा बदलली तर उगाच अडचण नको म्हणून शिल्पांची कल्पना. सगळ्यांना सगळं ज्ञान मिळायची सोय.

मग खूप खूप वर्ष लोटतात. समाज, धर्म, धारणा बदलत जातात. काम जरी महत्वाचे काम असला तरी ते जाते पडद्याआड. लोक विसरून जातात राजाला. त्याच्या हेतूला. मग एके दिवशी एक नवीन राजा येतो. तसा त्याला उगाच तो राजा आहे असा वाटत असतं. खरं तर पाच पन्नास लोक ज्यांना त्याच्यापासून फायदा होईल असा वाटतं ती त्याला म्हणतात राजा. पण त्याला ते खरंच वाटतं. त्या काळच्या समाज नीती नुसार त्याला वाटतं, अरे हे काय. ह्या मंदिरावर हि असली शिल्पे. काय चालू आहे. फोडून टाकली पाहिजेत. मग राजा चार दोन बेरोजगार वार्ताहर बोलावतो. लगेच आपला मत सांगून बाईट बनवून देतो. गरीब बिचारे वार्ताहर २४ तास काय बातम्या दाखवणार. दाखवून देतात बाईट. पण राजाचा दुर्दैव. समाजात बरीचशी लोकं हुशार असतात. त्यांना कळत असते राजाची अडचण. दुर्लक्ष करतो.

खरा तर पहिल्या राजाच्या काळात हे जाला असतं तर शहराचा कोतवालाने राजाला सांगितले असतं "गुमान राव्हा! आपल्याला ज्यातलं काही काळात नाही त्या विषयावर बोलू नये. तुमच्या डोक्याच्या बाहेरची काम आहेत हि. उगाच काही फ्लेक्स बिक्स लावा मोठ्या राज्याच्या वाढदिवसाचे. नसते उपद्याप करू नका"

पण नवीन काळात लोकशाही आलेली असते. सगळ्यांना आपली मते मांडता येत असतात. बातम्या देणाऱ्या चॅनेल ला आपल्या बातम्या लोकांनी पाहाव्या असा वाटत असता. मग ते गल्लीतला राजा हस्तिनापूर नरेश असल्याच्या थाटात त्याची बाईट दाखवून टाकतात.

मग आता प्रश्न येतो जनतेसमोर. काय करायचा? मग जनता राजाची कुंडली काढते. आणि जनतेला कळतं राजाला तर गल्लीतला पानवाला पण उधारी साठी अडवतो म्हणून राजा दुसऱ्या रस्त्याने गल्लीबाहेर जातो. मग जनता राजाला विसरून जाते आणि महत्वाच्या प्रश्नाकडे लक्ष देऊ लागते. विषय फार गंभीर असतो. सर रवींद्र जडेजा यांची सर पदवी काढून घ्यायची का?

Pages