मी मराठी भाषाभिमानी आहे कि नाही!

Submitted by अदित्य श्रीपद on 9 April, 2017 - 13:03

(हा लेख मी मराठी पिझ्झावर आधी प्रसिद्ध केलेला आहे )
मी मराठी भाषाभिमानी आहे कि नाही हे हल्ली हल्ली मला ठाम पणे सांगता येईनासे झाले आहे.. मराठी भाषेचा अभिमान म्हणजे सध्या जो काही अर्थ प्रचलित होऊ पाहतोय तोच जर खरा अर्थ असे गृहीत धरले तर, भाऊ! आपण मराठी भाषाभिमानी नाही.( तसेच आजकाल अनेक ठिकाणी म्हणजे शाळा, कॉलेज, मराठी वाहिन्या ते अगदी नवनव्या रेडियो चानेलवरती जे काही मराठी म्हणून ऐकू येते ते जर मराठी असेल तर आपण मराठी भाषकही नाही.-भाषक आणि भाषिक ह्या दोन पूर्णपणे भिन्न शब्दांचा अर्थ तर आजकाल मराठी वृत्त वाहिन्याना तरी माहिती आहे कि नाही अशी दाट शंका येऊ लागली आहे.)

अनेक मोठे मोठे साहित्यिक आणि मराठी भाषाभिमानी लोक हाती सतीचे वाण घेतल्याप्रमाणे मराठीच्या अस्तित्वाची काळजी/ चिंता वाहत गावभर बोंबलत फिरत असतात. त्याच त्याच गोष्टी निरनिराळ्या प्रकारे सांगून आपण काही तरी महान क्रांतिकारक बोलत असल्याचा आव आणत असतात. ते पाहता आपण मराठी भाषाभिमानी नाहीच असे मला वाटू लागलेय खास! चांगला कीर्तनकार एकच आख्यान वर्षानुवर्षे त्याच त्या श्रोत्यांसाठी नव्या उमेदीने, नव्या जोमाने आणि क्वचित नवे दृष्टान्त देत लावत असतो. दरेक कीर्तनकाराचे ठराविक भक्त असतात. तेही दरवेळी नव्या चेवाने माना डोलावतात.बुवांचा विस्मयचकित (काय शब्द आहे.....खतरनाsssक!असे प्रवीण तरडे नक्की म्हणाले असते.) नजरेने जयजयकार करतात,पायावर डोके ठेवतात, आणि चालू पडतात.

निमित्त झालय ते हल्ली हल्लीच (एकदाच्या) पार पडलेल्या साहित्य संमेलनाचे. आता हि “साहित्य संमेलनं आणि संमेलनाध्यक्षांची निवडणूक हा सर्व चोरांचा बाजार आणि बदमाषांचा गोंधळ आहे. या बाजारात चांगला माणूस निवडून येणे शक्यच नसते.” असे आपले स्पष्ट मत ( ह्या!...आपले कसले, हे तर गुरुवर्य भालचंद्र भाऊ नेमाडे ह्यांचे स्पष्ट मत. पहा -१९९१ मध्ये 'टीकास्वयंवर'ला साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला. या निमित्ताने दिलेल्या मुलाखती व भाषणे.) आता य. दि. फडके किंवा रा. ग. जाधव यांच्यासारखे जे अध्यक्ष नेमाडे साहेबांच्या ह्या वक्तव्यानंतर साहित्य संमेलनांना लाभले, ते जर चोर आणि बदमाश असतील तर तिथे माझ्या सारख्या सामान्य किंवा अतिसामान्य बौद्धिक कुवतीच्या माणसाचे काय काम?पण यंदाच्या संमेलनाचे अध्यक्ष अक्षयकुमार काळे ह्यांचे भाषण वाचले. वाचले म्हणजे अक्षरानामात एक लेख जो आला होता “संमेलनाध्यक्ष अक्षयकुमार काळे काय बोलले, तुम्हाला काही कळले?” म्हणून त्यात त्यांच्या भाषणातले काही परिच्छेद दिलेले होते ते वाचले, अन्यथा संमेलनाच्या अध्यक्षांचे भाषण एक हाती वाचून काढायची आपली काही छाती नाही. हे अध्यक्ष महोदय गेली ३०-४० वर्षे निष्ठेने साहित्य समीक्षा करतात हेही त्या लेखावरूनच कळाले. सरकारी किंवा कुठेही काम करणारे नोकर जसे ३०-४० वर्षे नोकरी करून रिटायर होताना त्यांच्या सेवेचा गौरव पूर्ण उल्लेख करायचा एक शिष्टाचार आहे तसाच काहीसा हा उल्लेख असावा.

मागील वर्षी अक्षयकुमार काळे यांनी संमेलनाच्या अध्यक्ष पदासाठी अर्ज भरल्यावर, त्यांच्या बरोबरच अर्ज भरणारे कविवर्य प्रवीण दवणे यांनी ‘अध्यक्ष म्हणून लेखक हवा, की समीक्षक ते ठरवा!’ असा सवाल केला होता. तेव्हाच आम्हाला यंदा(देखिल) एक समीक्षकच अध्यक्ष म्हणून लाभणार ह्याचा अंदाज आला होता. (मोठे भविष्यवेत्तेच कि नाही!. मोदी नोटाबंदी करून तोंडाला फेस आणणार ह्याचा अंदाज बरा नाही आला तो...इति पत्नी) म्हणजे काय दवणे साहेब ? समीक्षक हा साहित्यिक नसतो? मागे एकदा पु.ल. देशपांडे हे विनोदी लिहिणारे असल्याने ते लेखक/ साहित्यिक नाहीत असा वटहुकूम काही सामिक्षकानीच काढला होता असे आमच्या मातोश्रीनी कणिक तिम्बताना दात ओठ खात सांगितल्याचे अंधुक अंधुक स्मरते. पण दस्तुरखुद्द समीक्षक हेच साहित्यिक आहेत कि नाहीत असा दावा कुणी करेल असे वाटत नव्हते. अहो आपल्या पायजम्याच्या नाड्या ज्यांच्या हाती त्यांच्या नाकापाशी तपकीर कोण धरेल? ... असो.

१८७८ साली लोकहितवादी आणि न्या. रानडे ह्यांना हि संमेलनाची कल्पना सुचली. तेव्हापासून मधली काही वर्षे वगळता हा वार्षिक गदारोळ अव्याहत चालू आहे. त्यातून १९२६ साली पुण्याच्या तत्कालीन सुप्रसिद्ध( पुण्यात सर्व संस्था नुसत्या प्रसिद्ध नसतात तर त्या सुप्रसिद्ध असतात, जसे पुण्यातला प्रत्येक विद्वान हा महापंडित असतो नुसते पंडित हे आडनाव असते.) अशा ‘शारदा मंदिर’ या साहित्य सेवक संस्थेच्या पहिल्या वार्षिक ‘शारदोपासक संमेलनाचे’ अध्यक्ष पद कधी नव्हे ते इतिसाचार्य राजवाडे ह्यांनी स्वीकारले आणि व्यासपीठावरून “मराठी हि मुमुर्षु भाषा आहे. (म्हणजे मरण पंथाला लागलेली भाषा आहे) तिचे सोहळे कसले करता” म्हणून आयोजकांनाच खडसावले होते. त्या वर्षी त्यांनी जी हि तार छेडली, तीच धरून सम्मेलान्ध्यक्ष दरवर्षी मराठीच्या अस्तित्वाचा कापूस पिंजत असतात.

आता त्यांचे हे वाक्य बघा

खेड्यापाड्यांतल्या, उपेक्षित वस्त्यांतल्या, कलाशाखेतल्या सतत हिणवले जाणाऱ्या, पोरक्या ठरू पाहणाऱ्या मराठी माध्यमातील शिक्षणाकडे कानाडोळा करून इंग्रजी शिक्षणमाध्यमाच्या राजरस्त्यावरून विज्ञान, तंत्रविज्ञान, वैद्यक, व्यवस्थापन, विधी इत्यादी क्षेत्रांतील शिक्षण पूर्ण करून युरोप,अमेरिकेची दारे ठोठावता येतात, याबद्दल पुरेपूर खात्री पटल्याने आमच्या केवळ उच्चभ्रू समाजानेच नव्हे, तर सर्व जातिगटांतील मध्यमवर्गीय समाजाने देखील मराठी माध्यमातील शिक्षणाकडे एक तुच्छतापूर्ण कटाक्ष टाकून, त्याकडे कायमची पाठ फिरविली आहे.

महाराज हे एक वाक्य आहे बर का! अक्खा परिच्छेद नाही. वाचताना दम लागतो, अर्थ कधी लागायचा! काय ती भाषा! काय तो डौल! आता अक्षर्नामावरचे टप्पू सुलतान म्हणून कोणी आहेत त्यांनी ह्या सगळ्याच भाषणाचा व्यवस्थित समाचार घेतलेला असल्याने मी परत त्या फंदात पडत नाही. मला काय म्हणायचे आहे ते मी म्हणायला सरळ सुरुवात करतो.

कोणतीही जिवंत भाषा प्रवाही नदी प्रमाणे असते. तळयासारखी स्थिर नसते. नदी जशी वाहत जाताना प्रवाहातले थोडे पाणी आणि गाळ कांठावर पसरवत आणि तिला येऊन मिळणाऱ्या पाण्याला, गाळाला सामावून घेत पुढे जात असते, त्याचप्रमाणे निनिराळ्या ठिकाणाहून नवनवे शब्दप्रयोग, संकल्पना घेत आणि देत भाषा वाहत असते. जड झालेले, उपयोगातून बाद झालेले शब्दप्रयोग तळाशी साचतात, स्मृतीतून नाहीसे होतात. आज मी जे शब्दप्रयोग आपल्या बोलण्यात व लिखाणात वापरतो ते सारे मी कुठे ना कुठे कधी ना कधी पुनःपुनः ऐकलेले किंवा वाचलेले असतात.सतत उपयोग होत असल्यामुळे ते चलनात असतात. उपयोग कमी झाल्यानंतर ते बाहेर फेकले जातात. त्याचप्रमाणे जीवनशैलीतील बदल, वाचन, प्रसारमाध्यमे आणि इतर लोकांशी होणारा संपर्क इत्यादींमधून त्यात अनेक नवनवे शब्द समाविष्ट होत राहतात. ही प्रक्रिया अत्यंत संथपणे आणि बिनबोभाटपणे सतत चाललेली असते.मराठी भाषा गेल्या ५०-६० वर्षात फार बदलली. तिच्यातली संस्कृत प्रचुरता गेली, वाक्य छोटी झाली,‘जेहत्ते काळाचे ठायी’ किंवा ‘एकसमयावच्छेदेकरून’ अशा जडजंबाल शब्दांचे श्रीवर्धनी रोठे फोडून अर्थ वेगळे काढायची गरज उरली नाही. नुसती लोकांची बोलणी नाही तर नाटक, सिनेमा, मालिकांमधून लांबच लांब पल्लेदार वाक्य आणि ती एका दमात म्हणून टाळ्या घेणारे अभिनय सम्राट हि गेले. लोक खरं खरं अभिनय वगैरे करू लागले.(काय हा अत्याचार!) एकदा रेडियो मिरची का असाच कुठला तरी तत्सम रेडियो चानेल ऐकताना RJ म्हणाला “हेल्लो पुनेकर, पुण्यात ( SORRY, पुन्यात) चिल आउट करायला सोयीचा स्पॉट शोधताय. लेट अवर शाम का साथी डू इट फॉर यु.” ह्या मराठी सारख्या दिसणाऱ्या वाक्याने आधी माझाही फ्युज उडाला पण नंतर विचार केला, तरुणाईला (घरच्या आया कमी वात आणायच्या म्हणून आता ह्या नव्या आया आल्यात छळायला, हिरवाई, निळाई, आणि सगळ्यात फेमस आणि डेंजरस तरुणाई)ह्याच्या सारखीच भाषा( परत sorry, लँग्वेज) आवडते त्याला ते तरी काय करणार? आता बघा मी सुद्धा बोलताना ‘फ्युज उडाला’ रेडियो चानेल, डेंजरस असे शब्द वापरलेच कि नाही. कोण वाचतय? हे जसं महत्वाच तसच जास्तिजास्त लोकांना कळेल आणि मुख्य म्हणजे आवडेल असं बोलण लिहिणं महत्वाच.(त्यालाच साहित्य असे म्हणतात मामू!) मराठी साहित्य आणि भाषा ह्याबद्दल बोलताना एक वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे कि बोली म्हणून मराठी खूप जुनी भाषा खचितच आहे. मराठी साहित्यालाही अगदी प्राचीन म्हणावा असा इतिहास आहे.पण अनेक शतकं मराठी भाषा बहुतकरून पारमार्थिक स्वरूपाचे साहित्यच प्रसवत होती. पेशवाई बुडाल्यानंतर जसा जसा इंग्रजांचा आणि त्यांच्या इंग्रजीचा प्रादुर्भाव(!) वाढला तसा कथा, लघुकथा, निबंध, स्फुट, कादंबऱ्या, नवकविता वगैरे इतर साहित्य प्रकार मराठीत येऊ लागले.अर्वाचीन साहित्यिकांनी दर्जेदार साहित्य निर्मिती करून मराठीला वैभव आणले हे खरे पण हि परंपरा २००-२२५ वर्षांपेक्षा जुनी नाही.

पन्नास वर्षांपूर्वी बहुतेक प्रौढ स्त्रिया 'लुगडे' नेसत असत, तरुणी 'गोल पातळ' नेसत आणि लहान मुली 'परकर पोलके' घालत. 'साडी' हा शब्द तेंव्हा फारसा प्रचारात नव्हता.'लुगडे' नेसणार्‍या स्त्रियांची पिढी काळाआड गेली आणि जाड्या भरड्या सुती कपड्या पासून बनलेल्या लुगड्या ऐवजी नायलॉन वगैरे सारख्या पातळ कपड्याची ‘पातळं’ आली.'गोल पातळ' जाऊन आलेली 'साडी' मध्यमवयीन व प्रौढ महिला नेसतात. बहुतेक तरुण मुली जीन्स किंवा कॅप्री आणि टॉप घालतात. पंजाबी ड्रेस आता 'पंजाबी' राहिला नाही, 'सलवार कमीज' किंवा 'सलवार सूट' या नांवाने तो सर्वच वयोगटात वापरला जातो. फ्रॉक, स्कर्ट आणि त्यांचे मिनि, मॅक्सी, मिडी वगैरे अनंत प्रकार येत आणि जात असतात. राजस्थानी, गुजराती किंवा लमाणी पध्दतीच्या कपड्यांचाही क्वचित कधी वापर दिसतो. नव्या पिढीतल्या मुली 'फंक्शन' किंवा 'ऑकेजन' च्या निमित्याने कधी कधी "साडीही" 'घालतात'.(नेसत नाहीत) आणखी तीन चार दशकांनंतरही कोणत्या ना कोणत्या नांवाने साडी शिल्लक राहील पण 'नेसणे' हा शब्द कदाचित राहणार नाही असा माझा अंदाज आहे.

आपण ठरवू किंवा न ठरवू, बोलत असतांना आपल्या मनातले विचार आपोआप सोयीस्कररित्या व्यक्त होतात. आपले सांगणे ऐकणार्‍याला लगेच समजणे हे जास्त महत्वाचे असते. माझे आईवडील ज्या(मराठी) बोलीत माझ्या लहानपणी बोलत असत, त्या बोलीत मी माझ्या मुलीशी बोलत नाही. जरी ती मराठीच असली तरीही (तिची आणि तिच्या पिढीची भाषा मराठीसदृश कोणती तरी आहे पण आम्हाला एकमेकांशी संवाद साधता येतो हे काय कमी आहे! ). 'फडताळ', 'शिंकाळे', 'सन्दुक' असे जुने शब्द माझ्या बोलण्यात फारसे कधी येत नाहीत कारण त्या वस्तू माझ्या घरात नाहीत, तसेच ' सीडी' , ' मॉल' , 'रिमोट', ‘जॅम’, सॉस आदि शब्द सतत येतात कारण त्या वस्तू नुसत्या माझ्या घरात नाहीत तर सतत वापरात असतात.( वरील तीन परिच्छेदातील काही उदाहरणे प्रा. मिलिंद वाटवे ह्यांच्या लेखातून तसेच श्री. बा. जोशी ह्यांच्या आकलन आणि उत्तम मध्यम ह्या पुस्तकातून घेतली आहेत.)

आपले लेखन वाचणारे जे लोक असतात. (माझे लेखन लोक वाचतात अशी माझी आपली समजूत आहे...पण ते एक असो) त्यांना आपल्याला अभिप्रेत असलेला नेमका अर्थच कळावा यासाठी लेखनाच्या भाषेत शुध्दलेखनाच्या नियमांचे शक्य तितके पालन करणे आवश्यक असते.हे मला मान्य, पण त्याचबरोबर त्यात वापरलेले शब्द मूळ मराठी आहेत (म्हणजे नेमके काय?), संस्कृतजन्य आहेत, आपल्याच देशातल्या परप्रांतातून आले आहेत की परदेशातून आले आहेत यापेक्षाही किती लोकांना ते समजतील याकडे अधिक लक्ष द्यायला हवे असेही मला वाटते.आकाशवाणी असे म्हटल्यावर कुणाला लगेच म्हणजे काय? असा प्रश्न पडणार नाही पण म्हणून रेडियो हा शब्द वापरल्यावर लगेच विटाळ झाला असे समजून शहारायाचीही गरज नाही. ईश्वरीय संदेश म्हणून जेव्हा आकाशवाणी हा शब्दप्रयोग केला जातो त्याऐवजी कोणी रेडियो असा शब्दप्रयोग करणार नाही. केला तर ते हास्यास्पदच होईल.

जिवंत भाषा ही प्रवाही आणि नव्या शब्दांना व शब्दरचनांना सामावून घेणारी असावी हे मी वर सांगितलेच आहे. माझ्या कल्पनेप्रमाणे इंग्रजी भाषा तशी आहे. कॉम्प्यूटर युग आल्यापासून आणि विशेषतः इंटरनेटच्या प्रसारानंतर त्यात कितीतरी नवे शब्द आले आहेत आणि 'रन', 'सेव्ह', आदि जुन्या शब्दांना नवे अर्थ प्राप्त झाले आहेत. चॅटिंगसाठी तर नवी लिपीच तयार झाली आहे असे म्हणता येईल.

मराठी भाषेच्या संवर्धनाविषयी बोलताना मातृभाषेतून शिक्षण हा आपल्याकडचा सर्वात महत्वाचा आणि बहुधा सर्वाधिक चर्चिला जाणारा विषय आहे.(जणू मातृभाषेतून शिक्षण एवढा एक मुद्दा सोडला तर दुसरे कोणतेही प्रश्न, आव्हानं शिक्षणक्षेत्रात नाहीत.) जवळपास सगळे तथाकथित तज्ञ, सूज्ञ, शिक्षण हे मातृभाषेतूनच दिले गेले पाहिजे ह्या एका मुद्द्यावर सहमत होताना दिसतात. कमीत कमी प्राथमिक शिक्षण तर मातृभाषेतूनच झाले पाहिजे ह्यावर तरी एकमत असतेच. सर्वसाधारण मनुष्य सुद्धा बोलताना मातृभाषेतून शिक्षणाची भलावण करताना आढळतो.ह्यावर अगदी पु. लं. देशपांडे ते भालचंद्र नेमाडे, आणि इतर अनेक मान्यवर दिग्गजांनी अनुकूल अभिप्राय दिले आहेत. तरीही आज मुंबई-पुण्यात तरी खाजगी मराठी शाळांची अवस्था काय आहे? ह्यावर मी वेगळे भाष्य करायची गरज नाही. कारण सरळ आहे. जे आपल्या मुलांना खाजगी शाळात पाठवू शकतात अशा मध्यम वर्गीय पालकांनी खाजगी मराठी शाळाकडे चक्क पाठ फिरवली आहे. महानगर पालिकांच्या शाळांबद्दल न बोललेलंच बऱ कारण तिथे सरकारी अनास्था, अनागोंदी आणि भ्रष्टाचार ह्यांचा फार जास्त प्रमाणात संबंध आहे आणि त्यावर बोलू जाणे म्हणजे विषयांतर होणे. मुंबई-पुण्यात खाजगी मराठी शाळा विद्यार्थी नसल्याने बंद पडू लागल्या आहेत किंवा माध्यम बदलाकडे वळू लागल्याआहेत. मातृभाषेतून शिक्षणाच्या आग्रहामध्ये बऱ्याच जणांचा ‘त्यामुळे मुलांना विषय नीट समजतात’ या कारणाच्या आड मराठी भाषेच्या संरक्षणाची काळजी आणि संवर्धनाची एक आस असते. तसे असणे काही गैर नाही पण विषय मुलांच्या शिक्षणाचा आहे भाषेच्या संवर्धनाचा नाही याचे भान बऱ्याचदा सुटलेले आढळते.
मी माझा अनुभव सांगतो. आमच्या कॉलनीमध्ये २७ बंगले आहेत. त्यामध्ये साधारण ४५-५० शाळेत जाणारी मुलंआहेत. हि मुलं विविध वयोगटातली आहेत त्यामुळे अगदी अंगणवाडी पासून ९वी-१०वी पर्यंत ची मुलं यात येतात. महाविद्यालयातली मुलं यात धरली नाहीत. एक श्री. मुळे म्हणून आहेत त्यांच्या नातीचा सन्माननीय (!) अपवाद सोडला तर सर्व मुलं इंग्रजी माध्यमाच्या शाळात जातात. तरीही ही मुलं आपापसात खेळताना अस्खलित मराठी बोलतात. त्यांना मराठी की इंग्रजी असा पेच पडत नाही. त्यांचे आजी आजोबा लोक, जे मराठीच बोलतात, त्यांच्याशी संवाद साधताना ह्या मुलांना काहीही ‘प्रॉब्लेम’ येत नाही. ह्याचं कारण साधंसरळ आहे मुलांना आपण जरी शाळेत शिकायला पाठवत असलो तरी त्यांचं शिक्षण त्या आधीच सुरु झालेलं असत आणि ते घर, आसपासचा परिसर त्याच्या मित्रपरिवाराकडून बरच काही शिकत असतात.माझी मुलगी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जाते आणि तिथे असलेल्या हिंदी भाषक मुलांच्या संगतीने तिच्या वयाच्या मानाने बरे हिंदी बोलते. आम्ही गुजरात मध्ये राहत असतो तर तिला गुजराती सहजगत्या आले असते. ते कशाला, माझा मित्र बलराम छप्पर म्हणून एक कानडी आहे. त्याचा ८ वर्षांचा मुलगा मराठी, हिंदी, इंग्रजी आणि कानडी अस्खलित बोलतो. तेव्हा मातृभाषेतून शिक्षणाचा फार बागुलबुवा करायची गरज नाही. आणि तसही इंग्रजी माध्यमामुळे मुलांना मराठी नीट बोलता येत नाही असे बोम्बलणाऱ्या लोकांना ‘म्हणजे तुम्हाला नक्की काय म्हणायचे आहे?’ असे विचारले तर त्यांना नीट सांगता येत नाही. मराठी बोलताना इतर भाषेतल्या शब्दांची फार सरमिसळ होते असा काहीतरी त्यांच्या तक्रारीचा सूर असतो. ठीक आहे, पण मग आपण आज जी मराठी भाषा बोलतो ती ५० वर्षापूर्वी वापरात होती काय? आणी १०० वर्षांपूर्वी? तेव्हा काय होतं? आज किती जणांच्या बायका पंजाबी ड्रेस नाही तर पंजाबी पोशाख किंवा पेहेराव घालतात? साडी ऐवजी लुगडे किंवा पातळ कोण नेसते? आपण मोटार सायकल वरून(सांप्रत काळी तर बाईक वरून) नव्हे तर स्वयंचलित दुचाकीवरून कितीवेळा जातो? पेट्रोल टाकणे, स्पार्कप्लग बदलणे, पंक्चर काढणे हे मराठीतून कसे सांगणार? आणि ज्याला ते सांगू त्याला समजेल काय? जुनेच पण रोजच्या वापरातले शब्द सुद्धा मराठी नसतात.,जबाब,जबाबदारी, हरकत,घड्याळ, हे शब्द काय मराठी आहेत कि संस्कृत? पण ते वापरताना आज आपल्याला उष्टावाल्यासारखे वाटत नाही. अस्खलित मराठी वापरून आज आपण कुणाशी संवाद साधू शकू? ते सोडा आजच्या विषयांवर तर आपण मराठीत बोलूच शकणार नाहि. मोबाईल, सीडी, पेन ड्राईव,digital, Analogue यांना पर्यायी शब्द मराठीत नाहीत. ते मराठीत नव्याने जन्माला घालायची गरज नाही. फार कशाला ज्या इंग्रजीच्या मराठीतील संसर्गाने हे लोक शहारतात, त्या इंग्रजीच्याच सोवळेपणाबद्दल काय? दरवर्षी ह्या भाषेत साधारण ८५० नवे शब्द सामावले जातात आणि त्यातले फार थोडे इंग्रजी असतात. साधी atomic theory हा शब्द आपण अस्खलित इंग्रजीत वापरुं शकणार नाही atom हा लाटिन आहे तर theory ग्रीक आहे.सरसकट वापरला जाणारा “सामान्यत: एकत्र जमण्याची जागा” अशा अर्थाचा Rendezvous हा शब्द मूळ फ्रेंच आहे. भाषा जिवंत असते म्हणजे तिच्यात सतत बदल घडत असतो आणि तिचा एकूण तोंडावळा तोच राहिला तरी स्वरूप मात्र बदलत असते. नव्हे तोंडावळा सुद्धा बदलतोच.

मराठी वर अतिक्रमण करणाऱ्या भाषांमध्ये इंग्रजीचा जितका दु:स्वास केला जातो तितका इतर कुठल्याही भाषेचा केला जात नाही. जणू मराठीवर अतिक्रमण फक्त इंग्रजीचेच झालेले आहे. बटाटा, टोमाटो, पगार, चावी, हरकत, इस्त्री, आजार इ. शब्द इंग्रजी नाहीत आणि ते मराठीही नाहीत. मुळात इंग्रजी हा शब्दच इंग्रजी नाही तर फारसी आहे.गेल्या १००-१५० वर्षात मराठीच नव्हे तर सर्वच भारतीय भाषांचा इंग्रजीशी संबंध आला म्हणून मराठीवर इंग्रजीचे अतिक्रमण होते असा समज रूढ झाला आहे. कोणत्याही दोन भाषांचा संनिकर्ष अनेक प्रकारांनी होतो. इंग्रज जगभरात अनेक ठिकाणी गेले त्या त्या ठिकाणच्या भाषा , संकल्पना शब्द त्यांनी आपल्या भाषेत सामावून घेतले आणि ती भाषा समृद्ध केली आज त्याच्या भाषेतले बहुतांश शब्द परकीय आहेत पण त्यामुळे इंग्रजी मृतप्राय न होता उलट अधिक समृद्ध झाली आहे.
मनोरंजन म्हणून ह्या इंग्रजीत सामावले गेलेले काही भारतीय शब्द पाहू. ह्यातले काही फारसी आहेत कारण राज्यव्यवहाराची भाषा म्हणून फारसी भाषा अनेक वर्षे प्रचलित असल्याने सर्वच भारतीय भाषांवर फारसीचा प्रभाव होता. हे शब्द सामावून घेताना जे आपले गुलाम आहेत त्यांच्या भाषेतले शब्द आपल्या श्रेष्ठतर भाषेत कसे घ्यायचे असा विचार इंग्रजांनी केला नाही( अर्थात त्यांच्या मध्येही नेमाडेंसारखे महाभाग होतेच...)
शर्करा हा मूळ संस्कृत शब्द अनेक रुपात फिरून शुगर म्हणून इंग्रजीत स्थिरावला.( शक्कर- फारशी, झुकेर – इटालियन, त्सुकर – जर्मन इ.) अल किंवा एल अशा तुकड्यांनी सुरु होणारे बरेच इंग्रजी शब्द मूळचे फारसी किंवा भारतातून फारसीत जाऊन मग इंग्रजीत गेले आहेत. राम बाण उपाय ह्या अर्थाने वापरला अक्सीर इलाज मधला अक्सीर हा इंग्रजीत Elixir म्हणजे अमृत म्हणून वापरला जातो. रसायन शास्त्र पूर्वी भारतात प्रचलित होते, जादू सारख्या वाटणाऱ्या ह्या क्रियाना सामान्य लोक किमया समजत तीच अरबांनी अल( दैवी) किमया केली आणि इंग्रजीत त्याची Alchemy झाली.पूर्वी व्यापार करताना इकडून तिकडे नेताना बराचसा माल खराब होत असे अशावेळी चांगला राहिलेला माल आणि खराब झालेला माल ह्यांची सरासरी काढून दर ठरवत . खराब माल म्हणजे आवारा माल त्याची आणि उरलेल्या चांगल्या मालाची सरासरी म्हणजे avearage. बंगला म्हणजे बैठे घर, हा भारतीय शब्द पण इंग्रजीत two storeyed bunglow कुणी चूक मानत नाही. शोरबा म्हणजे काढा किंवा अर्क त्यावरून syrup आला तर चंपी वरून shampoo. Tamarind म्हणजे चिंच, व्यापाराच्या निमित्ताने भारतात आलेल्या अरबांना त्यांच्या खजूर आणि आपल्या चिंचेत काय साम्य जाणवले कुणास ठावूक पण भारताचा खजूर असे तिचे त्यांनी तमार-इ-हिंद असे नामकरण केले त्याची इंग्रजीत Tamarind झाली. कापूर (Camphor), चंदन(Sandal), पिप्पली-मल्याळी(Pepper), इंजीयर-मल्याळी(Ginger), असे कितीतरी इंग्रजी शब्द मूळ भारतीय आहेत. बनिया, शिपाई, गुरु, बझार,कुली,असे शब्द तर जसे च्या तसे इंग्रजीत वापरले जातात. आपण भारतीय म्हणून आपल्याला हे माहित आहे पण Window, porch, portico, mango हे शब्द मूळचे पोर्तुगीज आहेत हे आपल्याला फारसे माहिती नसते.(संदर्भ: संकलन ले. श्री. बा. जोशी)
भाषाशुद्धीच्या नावाने ओरड जशी मराठीत चालू आहे तशी इंग्रजीतही झाली. तो सगळा इतिहास मोठा रंजक आहे. जिज्ञासूंनी यु ट्यूब वर बीबीसी ने ह्याविषयावर केलेली ८ भागांची प्रदीर्घ documentary आवर्जून पहावी. खाली लिंक दिलेली आहे
https://www.youtube.com/playlist?list=PLHzvYltPyWa-TPD3kKRGvG97wBHuUqVYo.
मराठी भाषाशुद्धीचे प्रयत्न सावरकरांनीही केले, महापौर, स्थानक, दिनांक असे अनेक पर्यायी शब्द त्यांनी रूढ केले पण चावट लोकांनी जड जड लांबलचक संस्कृत प्रचुर शब्द मुद्दाम वापरून त्याची हुर्यो केली आणि तो एकूण उपक्रमच हास्यास्पद झाला. आठवा, पेढा म्हणजे दुग्ध शर्करा युक्त घानागोल गट्टू किंवा रेल्वे स्टेशन म्हणजे अग्नीरथ आगमन निर्गमन सूचक ताम्र नील लोह पट्टीका ...
जड जड शब्द अर्थ न कळल्यामुळे हास्यास्पद वाटतात हे खरेच! पण मग विद्यमान अध्यक्षांच्या भाषणातले खाली आलेले हे काही शब्द पहा.
आकृतीबंधात्मक आशयानुसंचारीत्व , साहित्यशास्त्रीय संज्ञाबोध, कल्पनात्मक प्रतिक्रियांतील निर्जीव आवर्तितता आणि अंतर्निष्ठ अनुभवविस्तृततेचा अभाव, समकाळाशी सहकंप पावणारे व्यापक जीवनानुभव,, जीवनाचा पृथगात्म साक्षात्कार, शैलीसंपन्न रूपसौष्ठवाने नटलेला आविष्कार व त्याची आस्वाद्यमानता इत्यादी इत्यादी (हुश्श)
अहो हे काय आहे? कुणाला समजावे म्हणून हे लोक असे लिहितात, बोलतात? साहित्य प्रेमी मराठी भाषक अशामुळे साहित्याच्या जवळ येईल कि दूर जाईल? डोक्यावरच्या विद्वत्तेच्या पगड्या आणि डोळ्यावरचे मराठीच्या भविष्याबद्दलच्या चिंतेचेचढवलेले काळे चष्मे काढा आणि बघा. मराठी is doing fine. मराठीत खूप दर्जेदार साहित्य निर्मिती होऊ शकते नव्हे होतेच आहे. तिची चिंता सोडा आणि आपल्या परीने तिच्या समृद्धीत भर टाकायचा प्रयत्न करा उगाच गळे काढून आमच्या कानाचे पडदे फाडणाऱ्या किंकाळ्या ठोकू नका.
साधारण १२ कोटी लोक मराठी भाषक आहेत त्यातले ८०% किमान साक्षर तरी आहेतच. मराठी भाषा समजणारे, बोलणारे लोक जगभर पसरले आहेत. मराठीच्या ज्ञात अशा ४२ बोली आहेत दर १२ कोसावर आपला पोत लहेजा बदलणारी हि भाषा जवळपास सव्वा दोन हजार वर्ष जुनी आहे. इंग्रजी पेक्षा ८०० वर्षे जुनी.पण ह्यासृष्टीतला आश्चर्य आणि विलोभानियतेने नटलेला खजिना त्यापेक्षा खूप खूप मोठा आहे. त्याला गवसणी घालण्याचे, ते सौंदर्य आपल्यात व्यक्त करण्याचे सामर्थ्य ह्या भाषेत नक्कीच आहे. त्या दृष्टीने प्रयत्न करा जमत नसेल तर गप्प बसा आणि इतर लोक जे हा प्रयत्न करताहेत त्याचा, त्यांच्या कलाकृतींचा आस्वाद घ्या. मनावरची आणि बुद्धीवरची मरगळ जरा झटकली जाईल.
मराठी भाषेचा आणि साहित्याचा भूतकाळ आणि वर्तमानकाळ देदीप्यमान तर आहेच पण भविष्यकाळ हि उज्वलच आहे.
काळजी नसावी. लोभ असावा,
कळावे.
---आदित्य

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिले आहे.
आणि तरी पण - "मी मराठी भाषाभिमानी आहे कि नाही हे हल्ली हल्ली मला ठाम पणे सांगता येईनासे झाले आहे. .. " ?

आकृतीबंधात्मक आशयानुसंचारीत्व , .... व त्याची आस्वाद्यमानता
मला तर या सगळ्या शब्दांचे अर्थ कळले, फक्त पहिल्या दोन शब्दांचे सोडून.
फक्त पूर्ण वाक्ये आली असती तर ते कशासंबंधी बोलताहेत ते कळले असते. बाकी विषय काय असेल, यावरून त्यातले शब्द, केवळ सामान्यांना समजायला कठीण, म्हणून समर्पक असले तरी वापरू नयेत असे का? ते संमेलनात आलेल्या किंवा ज्यांच्या बरोबर चर्चा करत असलेल्या लोकांशी बोलत होते का? मराठी साहित्य परिषदेला येणार्‍या लोकांना, कवि, लेखक, टीकाकार यांना, या शब्दांचे अर्थ समजू नयेत? निदान या निमित्ताने तरी या शब्दांचा अर्थ काय हे समजून घेण्याची इच्छा व्हावी?
अर्थात त्या विद्यमान अध्यक्षांबद्दल काही वैयक्तिक आकस असेल, तर त्यांनी केलेले सगळेच गैर. साधे शब्द वापरले तर हे कसले थोर? यांना फार थोडे शब्द माहित आहेत! खरे शब्द असे असे आहेत!

शेरो शायरीच्या मेहफिलमधे जाऊन उर्दू कळत नाही म्हणून ओरडा कराल का? नाही कळले उर्दू तर धडपड करून अर्थ जाणून घ्याल, पण कुणि महाराष्ट्रीयाने जरा अवघड, अपरिचित शब्द वापरला तर त्यावर तोंडसुख घ्याल.
कुणि गणित, पदार्थविज्ञान इ. विषयांच्या परिषदेला जाऊन तिथे थर्मोडायनॅमिक्स कळत नाही म्हणून बोंब मारावी का?

नाहीतर मराठी साहित्य परिषद चक्क हिंदी, उर्दू किंवा इंग्रजीत करावी!
म्हणजे काय, कुण्णि तक्रार करणार नाहीत. उर्दू वर टीका केली तर तुमचे घरदारच जाळून टाकतील नि इंग्रजीविरुद्ध बोललात तर इतर महाराष्ट्रीय, तुम्ही किती अडाणी, अशी तुमची नालस्ति करतील. हिंदीवर टी़का केलीत तर देशद्रोही ठराल.
तेंव्हा अजापुत्रं बलि दद्यात् म्हणून महाराष्ट्रीयांच्या भाषेवर दोन्ही बाजूंनी महाराष्ट्रीयांनीच टीका करावी. ते स्वाभिमान, शौर्य वगैरे सगळे हरवले आहे आता महाराष्ट्रातून. तेंव्हा मराठीवर टीका करण्यात काही धोका नाही.
खुद्द पुण्यात एका बँकेत मला तिथल्या माणसाणे ठणकावून सांगितले हिंदी मे बोलो जी!
मी तिथून काढता पाय घेतला याचे कारण माझा स्वाभिमान की मला हिंदी धड येत नाही, हे गुपितच राहू द्या.

उर्दू वर टीका केली तर तुमचे घरदारच जाळून टाकतील

Proud

मराठीवालेही खळ्ळ फट्याक करतात ना ? ( त्यांची मुले डॉण भोस्कोत शिकतात म्हणे ! )

कसले खळ्ळ फट्याक. कुणितरी मराठी नीट बोलायला लागले का अजून? पुण्यात सदाशीव पेठेत किंवा लक्ष्मी रोडवर सुद्धा मराठीपेक्षा हिंदी जास्त चालते.

तुमचे मुद्दे फारसे पटले नाहीत. तारतम्य बाळगावे, उगाच अवजड संस्क्रुतोद्भव शब्द वापरण्यात काय हशील- हे मान्य.
परंतु, प्रमाणीकरण हेच कसे चुकीचे आहे, हे अमान्य.

त्या संदर्भात या अग्रलेखातील भूमिका मला योग्य वाटते.
http://www.loksatta.com/agralekh-news/writer-madhuri-purandare-in-marath...

परंतु तरीही भाषेचे, लिखित भाषेचे म्हणून काही प्रमाणीकरण असतेच असते. आपण ब्राह्मणी म्हणवून घेण्याच्या भीतीने ते सोडून देऊ लागलो आहोत. आपल्यापेक्षा जातीय, धार्मिक, सांस्कृतिक वैविध्य हे जागतिक पातळीवर आहे. परंतु म्हणून इंग्रजी लेखन प्रमाणिततेचा डौल सोडत नाही. म्हणजे केरळी, मराठी, ब्राह्मण, उत्तर प्रदेशी, बिहारी, अफ्रिकी, इस्लामी, पश्चिम आशियाई अशा अनेकांच्या इंग्रजी बोलीचा लहेजा वेगळा असेल. परंतु या सर्वाचे इंग्रजी लेखन हे प्रमाणित नियमांच्या आधारेच असते. परंतु हे आपणास मान्य नाही. कारण पुरोगामी म्हणवून घेण्याच्या हौसेपोटी आपण भाषेस पायदळी तुडवू लागलो आहोत. वास्तविक भाषा हा गंभीर चिंतनाचा विषय आहे. परंतु कट्टय़ावरच्या वावदूक गप्पांनाच चिंतनीय मानण्याची प्रथा आपण आनंदाने रूढ करून घेतली असल्याने भाषेच्या हेळसांडीची आपणास जराही खंत वाटत नाही.

आणि हो, अमुक पदार्थ 'बनवला' हे ऐकणे खरोखर क्लेशकारक आहे. Sad

तुम्ही सांगितलेला लेख रविवारीच वाचला आहे. मी माझा लेख बराच आधी लिहिलेला आहे. त्याचे प्रयोज़न ही थोडे भिन्न आहे अर्थात मला तो लेख ( माधुरी पुरंदरे ह्यांचा )फारसा पटलेला नाही पण त्यावर सविस्तर लिहीनच नंतर....
<<इंग्रजी लेखन प्रमाणिततेचा डौल सोडत नाही. म्हणजे केरळी, मराठी, ब्राह्मण, उत्तर प्रदेशी, बिहारी, अफ्रिकी, इस्लामी, पश्चिम आशियाई अशा अनेकांच्या इंग्रजी बोलीचा लहेजा वेगळा असेल. परंतु या सर्वाचे इंग्रजी लेखन हे प्रमाणित नियमांच्या आधारेच असते. >>
ह्या मुद्द्याशी पूर्णपणे असहमत, तसेच प्रमाण इंग्रजी भाषा लेखनाचे नियम स्थळपरत्वे वेगळे आहेत... प्रमाण इंग्रजी भाषालेखनाचे नियम वारंवार बदलत/ सुधारत आलेले आहेत.

आदित्य आपण हा लेख बराच आधी लिहिलेला आहे असे म्हणताहात तर तुम्हाला आजमितीस लेखात काही विचार बदल / सुधार करावासा वाटला आहे का याबद्दलची टिप्पणी वाचायला आवडेल.

बदल म्हणजे माझे मत बदलणार नाही (अजून तरी)पण हो काही भर आणि मांडणीतली सुधारणा नक्कीच करायची आहे शिवाय (मराठी )भाषा संरक्षण आणि संवर्धनाचा जो मुख्य पैलू म्हणजे शिक्षण त्यावर तर सुरु केलेली लेखमाला अर्धवटच राहिलेली आहे त्यात हे सगळे घ्यावे असे वाटू लागले आहे. मी आणि माझी पत्नी आम्ही ह्या क्षेत्रात थोडे फार( फार नाही थोडेच ) कार्य करत आहोत त्यामुळे पुण्यासारख्या मर्यादित का होईना पण तरीही मोठ्या भागातील मुलांच्या शाळा आणि त्यातल्या समस्या ह्यांच्याशी थोडा परिचय आहे. आपल्याकडे मातृभाषा आणि शिक्षण हि बाब सोडली तर इतर समस्या बद्दल फारसा विचार कोणी करत नाही उदा. लैंगिक शिक्षण( आणि मुलांचे होणारे लैंगिक शोषण आणि त्यावरचे प्रतिबंधात्मक उपाय), स्वच्छता, क्रीडा सुविधा असंख्य बाबी आहेत. पण हळू हळू त्यावर लिहिणार आहे.. मला खात्री आहे ह्यातील प्रत्येक मुद्द्यावर जोरदार वाद विवाद होईल पण ह्या विचार मंथनातून हलाहल बाहेर ना पडता अमृतच बाहेर पडेल...

ऊर्दुवर कुणी का टीका करेल? कित्ती गोड आहे भाषा .... मोघले आझम , मेरे मेहेबूब यांच्य सर्टिफिकेटवर बहुदा उर्दू ( भाषा) लिहिले आहे

बदल म्हणजे माझे मत बदलणार नाही

जोरदार वाद विवाद होईल पण ह्या विचार मंथनातून हलाहल बाहेर ना पडता अमृतच बाहेर पडेल...

>> तुम्हाला शुभेच्छा.

मराठी )भाषा संरक्षण आणि संवर्धनाचा जो मुख्य पैलू म्हणजे शिक्षण

...

ज्याने त्याने स्वतःचा मर्जीनुसार माध्यम वापरावे

<<ऊर्दुवर कुणी का टीका करेल? कित्ती गोड आहे भाषा .... मोघले आझम , मेरे मेहेबूब यांच्य सर्टिफिकेटवर बहुदा उर्दू ( भाषा) लिहिले आहे>>>
अगदी बरोबर, हि एक भारतीय भाषा आहे आणि अत्यंत गो ड आणि समृद्ध भाषा आहे तरुण भाषा आहे ...मला अतिशय आवडते... फक्त उर्दु तील 'उ' ऱ्हस्व आहे ...

मला वाटते संस्कृतचा अभ्यास नसल्याने संस्कृत मूळ असलेले शब्द आताशा लोकांना कळत नाहीत. तसेहि मराठी व्याकरण जरा कठीणच. र्‍हस्व, दीर्घ, अनुच्चारित अनुस्वार यामधे चूक झाली तर अर्थ बदलतात. हिंदी , इंग्रजी चा प्रभाव वाढल्याने ते मात्र कळतात, मग लोक वापरू लागतात, मग मराठी बिघडली असा ओरडा होतो.

परंतु तरीही भाषेचे, लिखित भाषेचे म्हणून काही प्रमाणीकरण असतेच असते.
खरे आहे.
पण प्रमाणीकरण हा मुद्दा थोडा जास्त स्पष्ट कराल का? विशेषतः खालील प्रश्नः
१. प्रमाणित भाषेत परकीय भाषेत असलेले नि मराठीत रूढ झालेले शब्द चालतील का? रूढ म्हणजे केंव्हा रूढ झालेले? टेबल, पेन, फोन हे तर फार पूर्वीपासून आहे पण गेल्या काही वर्षात लोक स्वयंपाक बनवतात, मग हे रूढ समजायचे का? का लिहिताना स्वयंपाक करणे लिहायचे पण बोलताना बनवणे म्हणणे चालेल? रूढ आहे. अनेक अनेSSक शब्द आजकाल परकीय भाषेतून आले आहेत कारण आपल्याकडे ते कधी नव्हतेच. उदा. काँप्युटर, प्रोग्रॅमर, सी प्लस प्लस इ. यांचे जबरदस्ती मराठीकरण करायला पाहिजे का? आणि तरी ते काही लोकांना कळले नाही तर?

२. वर ज्या शब्दांचा अर्थ कळणे कठीण झाले आहे तसे शब्द वापरू नयेत का? लोकांना समजेल असे लिहायचे म्हणजे कोणत्या लोकांना? ज्यांना त्या विषयातील माहिती नाही त्यांनाहि समजेल असेच लिहायचे? मग मराठीत शास्त्रीय विषयावरील, वैद्यकीय विषयावरील मासिके, पुस्तके लिहिणेच कठीण.
इ. इ.

हा लेख तुमच्या इतर लेखांच्या तुलनेत आवडला नाही. कंसातली अनेक वाक्यं अनावश्यक वाटली. मुद्दामून उपहासात्मक लिहिले आहे त्यामुळे रसभंग होतो असे वाटते.
काही नवीन मांडायचे आहे असं वाटलं नाही.

वरील लेखात प्रमाणीकरण व व्याकरणावर फारसे भाष्य न येता बोली भाषा व शब्द यावर जास्त भर आहे. प्रमाणीकरण, नियम यांना पर्याय नाही व नसावा.

जिज्ञासांनी लिहिलेला मुद्दा मलाही तुमच्या लेखात फार खटकतो. ती कंसातली वाक्ये/संवाद दाताखाली खडा आल्यासारखी वाटतात वाचताना.

भाषा प्रमाणीकरण व व्याकरण नियम या वर ढिग भर धागे आणि चर्चा झालेली आहे कि या अगोदरच...

माझा एका मागील धाग्यावरचा प्रतिसाद इथे देतो...

काही मुद्दे... भाषा आणि प्रमाणिकरण....
कोणत्याही भाषे मध्ये व्यकरण, लिपी व शब्दसंग्रह हे मुख्य घटक असतात..
१. व्यकरण : मराठी भाषे मध्ये व्यकरण याचे प्रमाणिकरण अगोदरच झालेले आहे..
२. लिपी : "बाळबोध देवनागरी" हि प्रमाणित आहे की नाही हा मुद्द गौण...मराठी भाषेची मुळ लिपी "मोडी" जी ७०० वर्ष जुनी होती, इंग्रजानी मुंबई प्रांताचा व्यवहार सोईचा व्हावा व छापाई सुलभते साठी ती बदलली..आणि आपण स्वीकारली..
(गुजरात वेगळा झाल्यावर त्यानी त्यांची मुळ लिपी परत व्यवहारात आणली, आपण मात्र विसरलो.. असो...)
३. शब्दसंग्रह : हा मुख्य मुद्दा आहे जो इथे चर्चीला जात आहे.. शब्दसंग्रह याचे प्रमाणिकरण हे मुर्खपणाच आहे ..
अ) जगातील कोणत्याही भाषेत शब्दसंग्रह हा केव्हाच बंदिस्त वा संकुचीत नसतो..
ब) नवीन शब्द भाषेमध्ये येत असतात..व जुने शब्द लोप पावतात..
क) नवीन येणारे शब्द हे मुख्यत्वे दुसर्‍या भाषेतील असतात ..
ड) स्वभाषेतील जोड शब्द तयार करुन ही नवीन शब्द बनतात ..पण प्रमाण खुप कमी असत..
इ) शब्दसंग्रह हा प्रवाही असतो.. तो केव्हाच स्थीर नसतो..
ई) मराठी मध्ये ...काळानुरुप.. द्रवीड, प्रशीयन व योरोपीयन भाषेतील शब्द येत गेलेले आहेत व आपण ते स्वीकारले आहेत.. काही शब्द उदा:
पोर्तुगीज - ते - मराठी
ईस्त्री ( कपड्यान करतो ती)
अननस
चावी (मुळ मराठी शब्द कळ)
जुगार
पगार
पाव ( वडापाव चा पाव )
नाव ( पाण्यतील नाव)
कन्नड -
मका,
वेलची
प्रशियन -
बाजार,
दरवाजा
ताजा, (ताजी भाजी )
रो़ज ( प्रत्येक दिवस)
शहर
पसंत
चकमक
खरेदी
बाजी ( जाणकारानी या शब्दावर नीट प्रकाश पाडावा माझी माहिती कदाचीत चुकीची असु शकते)
गरीब
हिशोब
खुर्ची
शरबत ( लिंबु शरबत)
खरा मुद्दा हा आहे..
- शब्दसंग्रहचे प्रमाणिकरण करतबसण्या ऐवजी अशी प्रक्रीया निवडावी ज्याणे नवीन शब्द स्वीकारणे सोपे जावे...

अशी प्रक्रीया निवडावी ज्याणे नवीन शब्द स्वीकारणे सोपे जावे...
वारंवार वापरून नवीन शब्द, वाक्यरचना, व्याकरण सगळे स्वीकारल्या जाते. म्हणून अमुक पदार्थ 'बनवला' हे ऐकणे खरोखर क्लेशकारक आहे असे आत्ता वाटले तरी हळूहळू तेहि स्वीकारल्या जाईल. मग प्रमाणीकरण सुद्धा बदलेल नी असे सगळे प्रमाणित होईल, जसे ऑक्स्फोर्ड शब्दार्थसंग्रह ( डिक्शनरी) दर वर्षी नवीन शब्द प्रमाणित करतात.

थोडक्यात मला मूळ लेखातला मुद्दाच नीट समजला नाही असे म्हणावे लागेल.

आदित्य, तुमचा लेख आवडला.
रैना, तुमच्या प्रतिसादाशी सहमत. गिरीश कुबेरांचा लेख वाचल्यावर इकडच्या एका धाग्याची आठवण झाली होती.
माझ्यापुरते म्हणाल तर आवर्जून स्वयंपाकघर्,कढीलिंब इ.म्हणणे. वस्तू 'भेटली" इ ऐकल्यावर समोरच्याला दुरुस्त करणे इतकेच.
आमच्याकडच्या तरुण मुलांना शेवटी मी विचारायचे की तुम्हाला राग येत असेल ना माझा, पण खरंच सांगायला आनंद वाटतो की नंतर ती मुले आपणहून विचारायची की हे बरोबर आहे ना.बरीच सुधारणा झाली त्यांच्या लिहिण्या-बोलण्यात.अर्थात हे सर्व त्यांनी मनावर घेतले म्हणूनच शक्य झाले.

जगातील कोणत्याही भाषेत शब्दसंग्रह हा केव्हाच बंदिस्त वा संकुचीत नसतो..
आणि व्याकरण. नवीन प्रमाणित व्याकरणात आम्ही शिकलेल्या व्याकरणाचे अनेक नियम बदलून टाकले आहेत. र्‍हस्व, दीर्घ, अनुच्चारित अनुस्वार इ. यांचे महत्व आम्हाला घोटून घोटून शिकवले होते, तसे नीट लिहीले नाही तर अशुद्ध समजत!! नि आता?
उद्या लिपीचेहि तसेच होईल!
अनेक वर्षांपूर्वी (६० वर्षांपूर्वी) पुण्याहून नागपूरला गेलो तर तिथल्या लोकांनी माझे मराठी बरोबर नाही असे मला सांगितले नि तसेच नागपूरहून पुण्याला आलेल्या लोकांचे अनुभव.

मग ही भाषा शुद्धतेची चर्चा किती दिवस चालणार?

वारंवार वापरून नवीन शब्द, वाक्यरचना, व्याकरण सगळे स्वीकारल्या जाते.
>>

हे स्वीकारल्या जाते आम्ही स्वीकारलेच की.

पदार्थ बनवण्यात अंगावर शहारा येण्याइतके काय आहे हे मला अजून समजलेले (की समजलेल्या) नाही. खिचडी टाकली, खिचडी केली, खिचडी बनवली - यात का इतके दुखते? की बनवणे हे क्रियापदच नाहिये मराठीत (करणे) या अर्थाने? बनवणे म्हणजे फक्त मूर्ख बनवणे हाच अर्थ आहे का? हा प्रामाणिक प्रश्न आहे. मागे दिवाळी अंकाचे काम करताना या शब्दप्रयोगावरून बरेचदा 'बदल' सुचवला होता. तेव्हाही मला नीट समजले नव्हते.

<<<पदार्थ बनवण्यात अंगावर शहारा येण्याइतके काय आहे हे मला अजून समजलेले (की समजलेल्या) नाही. खिचडी टाकली, खिचडी केली, खिचडी बनवली - यात का इतके दुखते? की बनवणे हे क्रियापदच नाहिये मराठीत (करणे) या अर्थाने? बनवणे म्हणजे फक्त मूर्ख बनवणे हाच अर्थ आहे का? हा प्रामाणिक प्रश्न आहे. मागे दिवाळी अंकाचे काम करताना या शब्दप्रयोगावरून बरेचदा 'बदल' सुचवला होता. तेव्हाही मला नीट समजले नव्हते.>>
मलाही तुमच्या सारखेच वाटते . ठीक आहे ना, बनवला स्वयपाक, तयार नाही केला काय बिघडल एवढ त्यात...मराठी भाषेत भेसळ होत नाहीये तर ती उत्क्रांत होते आहे, बदलत आहे. म्हणजेच ती जिवंत भाषा आहे. मग तिच्या अस्तित्वाची चिंता करण्यापेक्षा आपण आपली हि भर (साहित्य रूपाने) टाकावी आणि इतरांनी केलेल्या साहित्य निर्मितीचा मनमुराद आनंद घ्यावा ....

टण्या,
मुद्दा भाषेच्या श्रीमंतीचा आणि सपाटीकरणाचा आहे. 'बनवणे' या एकाच क्रियापदाचा कुबड्या वापरून इतर चपखल क्रियापदं वापरणं आपण सोडून देतो. काळाच्या ओघात नवीन शब्द तयार करणं (आता इथे मी 'नवीन शब्द बनवणं' असंही लिहू शकतो), इतर भाषांमधल्या शब्दांना सामावून घेणं, हे न करता आहे ती क्रियापदं आणि शब्द विस्मरणात ढकलत आहोत.

जुनी पाककृतींची पुस्तकं वाचताना हे विशेष जाणवतं. 'मुद्दा समजल्याशी कारण' हे बरोबरच आहे, पण मुद्दा समजवताना भाषेची श्रीमंती जपणं, हा काही गुन्हा नाही.

हे न करता आहे ती क्रियापदं आणि शब्द विस्मरणात ढकलत आहोत.
कारण आजकाल भाषेचा अभ्यास करायला उत्तम मराठी पुस्तके, मासिके आहेत कुठे? मराठी वर्तमानपत्रात तरी मराठी दिसते का? उत्तम मराठीतून बोलणारे वक्ते आहेत कुठे?त्यांची भाषणे ऐकायला कोण जाते? मुळात अनेक शब्द संस्कृतप्रचुर नि ते तर कुणाला समजत नाही, कठीण वाटतात, सोपे शब्द पाहिजेत. सोपे म्हणजे नेहेमीच्या बोलण्यात असलेले, नि ते म्हणजे आजकाल हिंदी, इंग्रजी, पंजाबी हेच.

मग करतो ऐवजी बनवतो म्हणायचे नि भाषा समृद्ध झाली म्हणायचे. VT चे नाव बदलून छ. शिवाजी टर्मिनस केले, तेहि टर्मिनसच कारण मराठीत त्याला काही शब्द असेल हे माहितच नाही बर्‍याच लोकांना, नि त्यालाहि आता सीएस्टी म्हणायचे.

आहे कुणाला मराठीची चिंता? फक्त रिकामटेकड्या लोकांना. बाकीचे कामात असतात, त्यांना 'मुद्दा समजल्याशी कारण' .

आपणच आता शुद्ध मराठीत लिहू या. एक धागा काढा - तिथे मराठीतील जुन्या पुस्तकांतून आलेली भाषेची श्रीमंती, सौंदर्य दाखवणारे लिखाण दाखवा. मायबोलीवरहि असे बरेच आढळेल. त्याचा उल्लेख करा. मायबोलीवर बरेच लोक आहेत जे त्याचे रसग्रहण लिहितील. म्हणजे बाकीच्यांना कळेल. सगळे जग राहू दे, आधी मायबोली पासून सुरुवात करू या.
आवडले लोकांना तर लोक शिकतील, नाहीतर टंकलेखक बिघडला, आम्ही इंग्रजीतूनच शिकलो, 'मुद्दा समजल्याशी कारण' . अशी नानाविध कारणे सांगून पुनः ये रे माझ्या मागल्या.