भय इथले संपत नाही.. एक रसग्रहण

Submitted by अश्विनीमामी on 29 March, 2017 - 06:53

कवी ग्रेसांच्या प्रतिभेला नमस्कार करून त्यांच्या अमर कवितेचे माझ्या द्रूष्टिकोणातून रसग्रहण, अर्थान्वयन करायचा प्रयत्न करते आहे. ह्यात फारसे गोड काही नाही पण जीवघेणे मात्र आहे. मला ही कविता ब्लॅक ह्युमर सारखी डार्क पोएट्री वाट्ते. गोड व लाडीक रस्त्यावरून दूर जाउन
एका खडतर मार्गावरून ही कविता आपल्याला फरपटत घेउन जाते. अंतःकरणात दाबून लपवून ठेवलेल्या भीती व एकटेपणाचा सामना करायला लावते त्याच वेळी त्या प्रत्यक्ष घटनेतले नाट्य व अंतिम सौंदर्य पण अधोरेखित करते.

कवितेचे नायक नायिका ही एक मेकांवर जिवापाड प्रेम करणारी, एका जोडप्याचा भाग असलेली अशी एक मन दोन शरीर ह्या भावनेने जीवन जगणारी, हळूवार व्यक्तिमत्वे आहेत. कवी त्यांच्या नात्याच्या अगदी खोलवर जातो व तिथे होणार्‍या घडामोडी निर्मम पणे तपासून बघतो व मांडतो. ह्या दोघांपैकी एक जण मृत्यू पावला आहे. व त्याच्या/ तिच्या भौतिक शरिराला जाळायचा विधी चालू आहे. किंवा थोड्याच वेळात होणार आहे. तत्प्रसंगी एक गेलेली व्यक्ती व एक त्याचे जाणे सर्व जिवित पातळ्यांवर अनुभव णारी, त्यावर निस्सीम प्रेम केल्याने आता पूर्ण रीती झालेली व्यक्ती ह्या दोघांमधला हा एक अमूर्त संवाद आहे. नेणिवेत झालेला.

भय इथले संपत नाही. मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते.

कधीही न संपणारे पृथ्वीतलावरचे भय म्ह णजे स्वतःच्या मृत्यूचे. सर्व प्राणिमात्रांना ते कायमच असते.
हे उमजून जोडप्यातला उरलेला गेलेल्याने शिक विलेली, कधी क्वचित दोघांनी मिळून म्हटलेली गाणी गुणगुणत आहे. गेलेल्या जोडिदाराला आठवणीतून जिवंत करून आभासात रमण्याची निकड सर्वात जास्त केव्हा भासणार. ती कायमची गेल्यावरच.

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया

एकाचा भौतिक अर्थी मृत्यू झाला आहे व दुसरा त्यामुळे जिवंतपणे गेल्यागतच आहे. त्या भावविभोर नात्याचा ही अंत झाला आहे आणि आता धरती म्हणजे एक भगवी मायाच. एक कधी न विझणारा वणवा आता जगायचा आहे. अनुरक्त ते विरक्त हा प्रवास एका क्षणात झाला आहे. ते नाते आता एका फुल झाडाच्या पायाशी पुरले आहे. त्यातून नवी झाडे फुले येतील पण ते न्यू नॉर्मल असेल. जुने झरे अंतर्धान पावले आहेत एका जादूच्या राज्यात.

त्या वेळी नाजुक भोळ्या, वार्‍यास हसवुनी पळती
क्षितिजांचे तोरण घेउन दारावर आली भरती.

एकत्र घालवलेले ते नाजूक हसरे क्षण इतके अलवार की खोडकर वार्‍याला देखिल हसवून पळून गेले. किती हळवे गोड ते नाते, ते एकत्र
असल्याचे रेशमी बंध आता तुटले. दूर असलेली क्षितिजे आता तोरणासम जवळ आली आहेत. श्वास कोंडून संपवणारी काळाची भरती
माझ्या घरापर्यंत येउन ठेपली आहे. आता पुढे फक्त शेवट चा श्वास घ्यायचा व ह्या कालसागरात बुडून जायचे. अस्तित्व संपवणारी ही भरती आहे. ( हे जाणार्‍याचे विचार आहेत. पूर्ण कविता कधी त्याचे विचार तर कधी तिचे कधी गेलेल्याचे तर कधी मागे राहिलेल्याचे अशी लिहीली आहे. अमेझिंग इज द ओन्ली वर्ड.)

तो बोल हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू... राघव शेला.

प्रेयसी/प्रियकराचे जीवनातले एक आनंद निधान् म्हणजे त्यांच्यासाठी खास उच्चारलेले प्रेमाचे काळजीचे शब्द, जेवलास का? लागलं का? ठीक आहेस ना? नीट पोहोचलीस का घरी? असले साधे अन छोटे पण त्यानेच जीवनाला एक सोनेरी अर्थ येतो. वनवास तर सीतेचा आहेच पण त्यात आता फक्त हा राघवशेला उरला आहे. आठवणींचा. त्या जणू नंतर तीन रिकाम्या जागा आहेत. तिथे काय शब्द योजावा असे कवीला वाटले असेल? तर तो उरला
तुझ्या साध्या गोड मनापासूनच्या शब्दांनीच माझ्या करंट्या जीवनावर पांघरूण घातले आहे. आता आलेले सीतेसारखे वन वासी कराल एकटेपण ह्या शेल्याला पांघरून सुसह्य होईल कदाचित.

देउळ पलिकडे तरिही तुज ओंजळ फुटला खांब
थरथरत्या बुबुळापाशी मी उरला सुरला थेंब...

गेलेल्या प्रेयसीचे/ प्रियकराचे अस्थिविसर्जन आहे. नदीचा घाट उदास देउळ अशी ही विषण्ण जागा. मन आता दु:ख करायच्या पलिकडे गेले आहे. ओंजळीने अर्घ्य देताना तुला आधीच कसला तरी आधार घ्यावा लागत आहे. ( जुन्या देवळाचा एखादा अलिकडला खांब) रडून सर्व अश्रू संपलेत आता तरी एक थेंब माझ्या नावाचा तुझ्या डोळ्यात उरला आहे. आहेच.

आता कवीने सर्वात भयानक रचना केली आहे. बॅक अँड फोर्थ जाण्यामुळे आपण आता जात्या जिवाच्या मनोगता कडे परत येतो आहोत.
जर तो जीव चितेवर पडून विचार करू शकला असता. ( जर विचार करू शकला असता तर तो तिथे नसता पर्यायाने कविताही नसती पण हे त्याचे विचार आहेत.

संध्येतिल कमलफुलासम मी नटलो श्रुंगाराने
देहाच्या भवती रिंगण घालती निळाइत राने

संध्याकाळच्या वेळी सूर्यकिरणांत चमकणार्‍या कमळासारखा मी सजविला गेलो आहे नटलो आहे नव्या कोर्‍या कपड्यात. चितेवर पडून मला आकाशाची निळाई दिसते आहे व त्यात कडेला स्मशान भूमिच्या आजुबाजूची राने. कवितेत जो व्ह्यू कवीने कल्पिला आहे तो फिश आय लेन्सने काढलेल्या फोटो सारखा आहे. आपल्याच क्रियेला बघणारा त्रयस्थ आत्मा घोर निळ्या आकाशाखाली वार्‍याने डोलणार्‍या रानांना बघतो आहे.

स्त्रोत्रात इंद्रिये अवघी, गुणगुणती दु:ख कुणाचे
हे सरता संपत नाही चांदणे तुझ्या स्मरणाचे

त्या देहा भोवती आता कोणीतरी स्त्रोत्रे म्हणत प्रदक्षिणा घालते आहे. ती आता अग्नीत भस्म होउ पाहणारी इंद्रिये कसले दु:ख गात असतील? ज्या शरीराने असंख्य सुखे भोगली ते त्यागताना कसले दु:ख होत असेल नेमके? पण मागे उरलेल्याला त्या गेलेल्या शरीर वमनाने दिलेल्या अनंत आठवणी सोबत उरलेले क्षण कंठायचे आहेत. ते चांदणे कधी संपणारे नाही. त्याच्या शेवटच्या श्वासा पर्यंत. मग एक प्रेमकहाणीच तिथे पूर्ण विराम घेइल.

चितेवर देह जळताना उरलेल्यांनी एका क्षणा पर्यंत थांबायचे असते ही अभद्र रूढी उरलेल्याला सहन होत नाही. अचानक वाताव रणात
संध्याकाळचा हाडापर्यंत पोहोचणारा गारवा पसरला आहे. धुके डोळ्यात मनात येउन पोहोचते व कदाचित तो धूरही असेल. पण त्याला आता परत जायची एकदम घाई होते. तिथे त्याचे कोणीच नाही. जगात कोणी नाही. अंधार येउ घातला आहे. पानगळीचे देखिल वैभव झिड्कारून झाडे कोरडी अलिप्त उभी आहेत. तो परत जायचे पाउल पुढे टाकतो.
तेव्हा जिवलगाचा आत्मा त्याला एक हाक देतो

ते धुके अवेळी होते की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या निष्पर्ण तरुंची राई.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अमा, कातील लिहिले आहे! आता पुन्हा ऐकताना हाच अर्थ डोक्यात येणार आहे!
ग्रेस यांच्या कवितेची हीच मजा आहे प्रत्येकासाठी ती वेगळी प्रतीत होत रहाते आणि शिवाय कविता म्हणूनही ती उरतेच!

सुंदर रसग्रहण. भय इथले संपत नाही मज तुझी आठवण येते. यात मज च्या ऐवजी मल मग असे वाटायचे. पण मग असले तरी तोच अर्थ!

ह्यात फारसे गोड काही नाही पण जीवघेणे मात्र आहे. ...एका खडतर मार्गावरून ही कविता आपल्याला फरपटत घेउन जाते. अंतःकरणात दाबून लपवून ठेवलेल्या भीती व एकटेपणाचा सामना करायला लावते > काय सुरेख लिहिलं आहेत अमा! अप्रतिम!

अमा... काय कातील लिहलं आहेस..
सुपर्ब... ग्रेसची ओळख या कवितेपासुनच झाली... दूरदर्शन वर सह्याद्री वाहिनीवर महाश्वेता नावाची सिरिअल यायची त्याच शीर्षकगीत होतं ना हे..
आता मलापन हाच अर्थ आठवेल यापुढं ऐकताना..

खूप छान लिहलयं ! अगदी आत भिडलं.. अतिशय प्रिय व्यक्तीचा मृत्यू आणि तोही जर अकाली असेल तर दु:ख कल्पातित आहे...ग्रेसची "ती गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता" अशीच व्याकूळ करते..

एखादे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट आर्ट असावे तशी प्रतिमासृष्टी आणि लोलकातून पाहिल्यावर प्रत्येकाला दिसलेले वेगवेगळे सुरेख विभ्रम. हे सारेचविभ्राम विलोभनीय वाटतात. हे रसग्रहण ही असेच सुरेख, सुंदर.

अमा , खरंच सपना म्हणते तसं या कवितेच्या लोलकातून किती रंग दिसतात! स्वामीजींना यात फलित साधना दिसली, मला विफल साधना आणि तुम्हाला चिरविरह!
अतिशय तरलतेने लिहिलं आहे तुम्ही, सलाम !

अमा, अतिशय च सुन्दर लिहिलं आहे तुम्ही....काल पासून खुपदा वाचलं हे रसग्रहण...तुमची आकलन शक्ती अफाट आहे! मी आत्ता पर्यन्त अनेक आव्रुत्त्या वाचल्या ह्या कवितेच्या रसग्रहणाच्या....पण ही आवृत्ती मला विषेश आवडली...

रसग्रहण खूप च सुंदर आहे...

कवितेचे नायक नायिका ही एक मेकांवर जिवापाड प्रेम करणारी, एका जोडप्याचा भाग असलेली अशी एक मन दोन शरीर ह्या भावनेने जीवन जगणारी, हळूवार व्यक्तिमत्वे आहेत. >>> याच आशयाची एक कविता आहे "माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले... माझे प्राण, तुझे प्राण उरलेना वेगळाले... "

सह्यद्री वाहिनी वर "स्वामी" मालिका होती त्याचं टायटल साँग होतं हे.

अवांतराबद्द्ल क्षमस्व.

रसग्रहण खूप छान. अनेक वर्षानी कवितेचे रसग्रहण वाचले. शाळेनंतर आजच. पण छान वाटले.

कविता जीवघेणी आहे, त्यावर जशी गायलीय त्याने अजून त्रास होतो. प्रत्येक वेळी ऐकताना अंगावर काटा येतो.

हा माझा एक प्रयत्न ...

ग्रेस आणि आरती प्रभू या कवींची रचना संध्याकाळच्या वेळी खुलते. ती अंगणात फुलते. एकातून एक प्रतिमा उभी करत जाते आणि त्या मायाजालातून शोभादर्शी सारखे विभ्रम निर्माण करते. शोभादर्शीकडे तासन तास निरखून पाहू गेल्यास विभ्रमांचे नियम जाणवू लागतात. तशी ग्रेसजींची कविता.

भय इथले संपत नाही. मज तुझी आठवण येते
मी संध्याकाळी गातो तू मला शिकविली गीते.

आयुष्य़ाची संध्याकाळ झाली आहे. अशा वेळी भय दाटून आले असताना कवी त्याला ज्या कुणी गाणी शिकवली आहेत त्याची गाणी गात आठवणींनी व्याकुळ झाला आहे. या कडव्यातल्या प्रतिमा कशा रितीने आल्या असाव्यात आणि त्यातून काय चित्र उमटले ते सांगण्य़ाचा हा प्रयत्न.

भय कशाचेही असू शकते. एकंदरीत कवीच्या एकटेपणी त्याला आठवणी येताहेत म्हणजे एकांताचे भय त्याला वाटत असावे. ज्या व्यक्तीची आठवण येते तिने गाणी शिकवली आहेत म्हणजे ती ज्येष्ठ असावी. आई, वडील, गुरू, मार्गदर्शक किंवा कुणी संत महंत. आयुष्याच्या कातरवेळी आता हुरहूर दाटून येताना ही गाणी मनाला आधार वाटत असावीत.

हे झरे चंद्र सजणांचे, ही धरती भगवी माया
झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया

कवीने एक स्वाभाविक नियम सांगितला आहे. या नियमांशी दोन प्रतिमा बांधल्या गेल्या आहेत. एक झरे आणि दुसरी धरती भगवी माया. झाडांशी निजलो आपण झाडांत पुन्हा उगवाया हा पुनरुत्पादनाचा नियम आहे. ज्यावर सृष्टी चालते. चराचर टिकून आहे. सृष्टी निरंतर चालावी म्हणून प्रीतीची (माया) योजना केली गेली आहे. सृष्टीचे नियम हीच एक माया आहे. त्यातून मनाने मुक्त होणे हा संन्यास , विरक्ती. तिचा रंग भगवा.
चंद्र प्रियकर आणि धरती प्रेयसी यांच्यातून कुठले सृजन आकाराला येते ? तर या प्रियकराला (साजन) भरते आलेय पण धरती या सर्व मायेत असूनही नसल्य़ासारखी आहे. या नियमांनी बांधली गेली ही माया आहे पण ती मनाने किती विरक्त आहे....

तशी ती असावी जिची कवीला आठवण येतेय. ती जगरहाटीच्या नियमांनी बांधलेली तरीही वेगळी. विरक्त. अशा तिने कवीला शिकवण दिलेली आहे. म्हणजे तो ठेवा साधा नसावा.

त्या वेळी नाजुक भोळ्या, वार्‍यास हसवुनी पळती
क्षितिजांचे तोरण घेउन दारावर आली भरती.

या द्विपदीत पहिल्या ओळीत क्रियापद कमी पडलेय का ? नसेल तर मग दुसरी ओळ तिचा विस्तार वाटतो.
वारा हा लबाड, खट्याळ मनुष्य या अर्थाने ग्रेसजींच्या कवितेत येतो. असा मनुष्य प्रणयराधना करतो. त्याला कुणी फसते. पण इथे नाजूक भोळा वारा ही प्रतिमा चंचल विचारांसाठी योजली असावी. चंचल , चोरटा असा विचार भोळसटपणे मनात डोकावतोय. त्या वेळी अमर्याद शक्यतांची भरती आलेली आहे. त्या शक्यतांचा (क्षितीज) विचार मनात येताच चोरटे विचार पळून जात आहेत.

तो बोल हळवासा आयुष्य स्पर्शुनी गेला
सीतेच्या वनवासातील जणू... राघव शेला.

या वर भाष्य करण्याची आवश्यकता नाही. अनेकांना या द्विपदीचा अर्थ समान लागतो.

ते धुके अवेळी होते की परतायाची घाई
मेंदूतुन ढळली माझ्या निष्पर्ण तरुंची राई.

ही गुंगवणारी द्विपदी आहे. धुके मनाची निराशा दर्शवते. आयुष्याची संध्याकाळ झाली आहे. अजूनही बरीच रात्र शिल्लक आहे. पण अशा वेळी मनात निराशा दाटतेय की या जगाचा निरोप घेण्याची वेळ आली आहे, एक्झिटची घाई आहे हे स्वत:चे स्वत:ला समजेनासे झालेले आहे.
या अवस्थेत स्मरणातून सर्व हिरव्यागार आठवणी पुसून चालल्या आहेत. निष्पर्ण तरूंप्रमाणे शरीर आणि मन झाले आहे.

म्हणूनच अशा वेळी तिने शिकवलेल्या गीतांचा आधार वाटतो आणि तिची आठवण येतेय.

या द्विपदीत पहिल्या ओळीत क्रियापद कमी पडलेय का ?>> नाही पळती हे आहे क्रियापद. दोज डेलिकेट स्वीट टाइम्स दॅट रॅन अवे आफ्टर टिकलिंग द मिस्चिवस विंड्स असे असावे माझ्या मते.

ओह. ...
चुकभूल द्यावी घ्यावी...

ही कविता प्रथम ऐकली आणि एक अनाकलनीय सावट मनावर आरूढ झाले. कवितेचा अर्थ कळायचे वय नव्हते पण ते काम ह्रुदयनाथान्च्या सन्गीताने आणि लताजीन्च्या आवाजाने केले.
ही कविता एक वेगळाच यमन घेउन समोर आली. प्रत्येक रागाचा स्वतःचा एक स्वभाव असतो , एक व्रुत्ती असते. पण बन्दिश बान्धणारा आणि ती गाणारा ; त्या आक्रुती बन्धाला वेगळ्याच रन्गाचे कवडसे टाकून उजळवतो !
तसे काहीसे झाले आहे इथे.
गन्धार आणि मध्यम कासावीस करत रहातात आणी पन्चम - षड्ज त्यावर शीतलतेचा शिडकावा करतात ! एक भकास पूर्णत्वाचा भास या यमन ने दिला.
ग्रेस ; ह्रुदयनाथजी आणि लता दीदी , तिघान्नाही नम्र वन्दन !

अमा, ही कविता स्वतंत्रपणे वाचली तेव्हा मला अर्थ कळला नाही. पण तुम्ही केलेलं रसग्रहण कळलं, उगीच ओढून ताणून अर्थ काढलेला आहे असं अजिबात वाटलं नाही. तुम्ही जे interpret केलंय ते कसं केलं? कवींनी कुठे स्पष्टिकरण लिहून ठेवलंय का?

छान लिहिलेय. कवीला नेमका असाच अर्थ अभिप्रेत असेल का हे अर्थातच सांगता येणार नाही, पण जो काय काढलाय तो भारी आहे !

मस्त रसग्रहण, दोन्ही Happy

ह्या कवितेची पार्श्वभूमी मला कॉलेजमध्ये असतांना, एका ग्रेस+हृदयनाथ मंगेशकर पंख्याने सांगितलेली आठवतेय... ग्रेस खूप आजारी होते, आणि त्यांना जगण्याची शाश्वती वाटत नव्हती... त्यावेळी त्यांनी हृदयनाथांना उद्देशून (की त्यांच्यासाठी?) ही कविता लिहिली, कारण ग्रेस आणि बाळासाहेब हे जीवलग मित्र होते... कुणाला खात्री असेल तर कन्फर्म होईल मी ऐकलेलं...

सुरेख रसग्रहण! छानच!
अर्थात काही कडव्यांचे अर्थ मला वेगळेच ऊमजलेत. असो. हीच तरी कवी ग्रेस यांची खासियत आहे.
ग्रेसांची कविता 'अगोदर छळते, मग कळते' असं माझं मत आहे.
अजुन सविस्तर लिहिलं असतं तरी आवडलं असतं वाचायला. सुरेखच लिहिलय.
शुभेच्छा!!!

Pages