कर्मयोगी श्री एकनाथजी रानडे- भाग २ :कहाणी विवेकानंद शिलास्मारकाची

Submitted by मी_आर्या on 19 November, 2016 - 10:12

एकनाथजी रानडे यांचे कार्य:
शिलास्मारकाची कथा एकनाथजींच्या आत्मचरित्रापासून वेगळी करणे अशक्य आहे. ज्यांनी प्रत्येक अडथळा संधीमध्ये परिवर्तित केला, प्रत्येक आव्हानाचे रूपांतर विजयात केले, अश्या असामान्य व्यक्तित्वाचे गुण सांगणे एका छोट्या लेखात शक्य नाही. तरीही हा छोटासा प्रयत्न:
अशी कोणतीही समस्याच नव्हती त्यावरचा उपाय त्यांच्याजवळ नव्हता, 
त्यांचे स्वतःचे शब्दच द्यायचे तर ," प्रत्येक डावपेचाला प्रति-डावपेच, प्रत्येक शस्राला प्रतिशस्त्र असतेच ", या सत्याने समग्र दर्शन, निवारण होणारच अशा अडचणीतून एकनाथजींनी कसा मार्ग काढला यातून होते. 
ज्या लोकांशी एकनाथजींना दोन हात करायचे होते ते सामान्य नव्हते. आपापल्या क्षेत्रातील नेते होते, मोठ्या सत्तेचा जागांवर होते. भक्तवत्सलम हे प्रभावी मुख्यमंत्री होते, तर हुमायून कबीर हे केंद्रीय मंत्री. या दोघांचाही शिलास्मारकाला विरोध होता, परंतु एकनाथजींनी अतिशय चातुर्याने दोघान्वर मात केली आणि आपल्या दृष्टीकोणाकडे वळविले. ज्या थक्क करणाऱ्या कौशल्याने आणि दृढ इच्छाशक्तीने त्यांनी हे करून दाखविले, त्यावरून विशेष क्षमतेचे श्रेष्ठ व्यूहरचनाकार म्हणून त्यांना श्रेय द्यावे लागेल. 
अण्णादुराई, ज्योती बसू यांसारखे संपूर्ण भारतात नाव असलेले नेते होते . उलट एकनाथजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या परिघाबाहेर फार थोड्या लोकांना माहीत होते.
ना. अण्णादुराई, ना. ज्योती बसू विवेकानंदांचे आदर्शवादी प्रशंसक होते. ज्या कुशलतेने एकनाथजींनी या दोन नेत्यांना हाताळले व त्यांना स्मारकाच्या उभारणीच्या कामात सहभागी करून घेतले, त्यावरून अतिशय अनुभवी तज्ज्ञानादेखील मानवी व्यवस्थापनाचे ( ह्युमन मॅनजेमेंटचे) धडे त्यांच्याकडून घ्यावे लागतील, यात नवल नाही.
मग ते संसदेतील ३२३३ सदस्यांच्या सह्या घेऊन तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरूंना अर्ज सादर करणे असो, देशभरात फिरून प्रचंड निधीसंकलन असो कि स्वामीजींच्या पूर्णाकृती पुतळ्याची निवड असो कि प्रत्यक्ष शिलास्मारकाचे काम होईपर्यंत तिथे जाऊन जातिने लक्ष घालणे असो प्रत्येक कामात त्यांचा झपाटा, त्यांचे संघटन कौशल्य, कुशाग्र बुद्धी दिसते.
श्री लालबहादूर शास्त्री अतिशय प्रभावित झाले व एका निर्णायकी क्षणी एकनाथजींची पाठ थोपटून ते म्हणाले, " तुम्ही अतिशय चांगले काम केले आहे. आता माझे काम सुरु झाले आहे. तुम्ही निश्चितपणे जा. याबाबत कोणतीही चिंता करू नका. शिलास्मारक आता निश्चित उभे राहील."
सर्व पक्षांचे नेते मग ते सत्ताधारी असोत कि विरोधी पक्षांचे सर्वजण मनापासून या कामाचे पाठीराखे झाले. प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मग ते कोणत्याही पक्षाचे असोत स्मारकासाठी भरीव योगदान दिले.
एकनाथजींनी प्रत्यक्ष राजकारणात जरी कधी लुडबुड केली नाही तरी त्यांच्याजवळ कुशाग्र राजकीय बुद्धी होती.प्रत्यक्ष ' युद्धात' गुंतलेले असताना ते अतिशय कठोर होते व कोणताही समझौता करायला तयार नव्हते व विरोधी पक्षाकडूनही त्यांची तशी अपेक्षा नव्हती. पण एकदा युद्धबंदी झाल्यावर कोणताही कडवटपणा राहणार नाही याकडे ते लक्ष देत. आपल्या आधीच्या विरोधकांकडे जाऊन त्यांना शुभेच्छा देण्याइतकी उदारता त्यांच्याजवळ होती, जसे त्यांनी श्री भक्तवत्सलम यांच्या बाबतीत केले. याचसाठी एक तत्व म्हणून निदर्शनांपासून ते जाणीवपूर्वक दूर राहिले. कारण त्यांना माहित होते कि निदर्शनांच्या माध्यमातून तुम्ही शेवटी उद्दिष्ट जरी साध्य केलेत तरी त्यात शान राहत नाही. उलट तुम्ही मुळात मित्र असलेल्यांनाही शत्रू बनविता. संघटकाला हे शोभणारे नाही आणि एकनाथजी सर्वोत्कृष्ट संघटक होते.
या कार्यामागे कोणती प्रेरणा होती? त्यांना नेमके काय साध्य करायचे होते? 
त्यांना राष्ट्राची पुनर्बांधणी करावयाची होती. त्यांच्या लक्षात आले कि, या देशामध्ये प्रचंड शक्ती व खूप धार्मिकता होती, जी असंख्य विविध प्रवाहातून वाहत होती. पण ती निर्मितीक्षम राहिली नव्हती. त्यांना वाटले कि या सर्व धार्मिकतेचे रूपांतर लोककल्याणाच्या कार्यात करता येईल आणि राष्ट्राची सर्वांगीण पुनर्रचना होऊ शकेल. या संकल्पनेत महत्वाची बाजू ही की ही समाजाच्या सर्व घटकांना व आपल्या देशातील सर्व भागांना सामावून घेणारी होती. विवेकानंद केंद्राचे कार्य सर्व समाजापर्यंत आणि संपूर्ण भारतात पोहोचावे, अशी त्यांची इच्छा होती. या कार्याने संपूर्ण भारताला जागृत करावे. ते म्हणतात, " प्रत्येकातील भारतीयता जागृत करायला हवी व त्यांच्याकडून काम करून घ्यायला हवे.
त्यांचा असा दृढ विश्वास होता की, "जर तुम्ही पुरेसे खोल खरवडलेत तर भारतीय, प्रत्येकातील हिंदुत्व जागृत होईल. बोलतांना कोणी पाश्चिमात्यवाद किंवा रशियनवाद किंवा आधुनिकतावादाबद्दल बोलत असला तरी मुख्यतः तो याच भूमीचा पुत्र आहे.
राष्ट्रीय एकात्मता आणि राष्ट्रीय पुनर्र्चना या एकनाथजींच्या दृष्टीने पूरक संकल्पना होत्या., हे स्पष्ट आहे. हळूहळू हा एकनाथजींच्या दृढ विश्वासाचा विषय बनला. पूर्वीच्या समृद्ध अनुभवांच्या याआधारे त्यांच्या लक्षात आले कि, यासाठी संघटनेची आवश्यकता आहे. संघटनेशिवाय राष्टीय पुनर्र्चनेची कल्पनाच करता येणार नाही. परंतु संघटना बांधण्याच्या मार्गात काही स्वाभाविक अडथळे होते. शिलास्मारकाच्या मोहिमेच्या दरम्यान एकनाथजींच्या लक्षात आले की, राजकीय अलगतावाद व धार्मिक सांप्रदायिकता , लोकांना राष्ट्रहिताच्या अश्या मुद्द्यांवर एकत्र येण्यापासून अडथळा ठरत होती., ज्याबाबत वस्तूत; त्यांच्यात संघर्ष नव्हता, दुमत नव्हते. राजकारण सत्तेचाच पाठलाग करीत असल्यामुळे ते विभाजनाचे साधन बनू शकत होते. पण एकनाथजींना ही दु:खद जाणीव झाली की, आध्यात्मिक चळवळीदेखील प्रतिस्पर्धी पंथांच्या पातळीपर्यंत घसरल्या होत्या. इतिहासाचे उत्सुक अभ्यासक असलेल्या एकनाथजींना जाणविले कि, हिंदूंच्या बाबतीत हा एक राष्ट्रीय दोष झाला आहे आणि तो दूर झाल्याशिवाय राष्ट्रीय पुनर्र्चना हे एक मृगजळच राहील. म्हणून त्यांनी अशा संघटनेची कल्पना केली की, जी राजकारण व सांप्रदायिकता यापासून हेतुपूर्वक व काळजीपूर्वक दूर ठेवली जाईल. 
स्वामीजींचे जीवन व त्यांचे विचार यांचा काळजीपूर्वक अभ्यास केल्यानंतर त्यांची खात्री झाली कि, स्वामी विवेकानंदांची अशा असांप्रदायिक आदर्शांचीच बांधिलकी होती. अशी नि:पक्षपाती, असांप्रदायिक संघटना केवळ उच्च आदर्शाभोवतीच बांधली जाऊ शकत होती. " मानवसेवा हीच खरी ईश्वरसेवा' हा विचार , ही स्वामीजींची वैशिष्ट्यपूर्ण देणगी होती. त्यांनी आपल्याला ईश्वराचा शोध गुहेतील एकांतवासात नाही तर समाजाकडे परत फिरून घ्यायला सांगितला.
अनेक शतकांच्या इतिहासाने एकनाथजींना शिकविले होते की, हिंदू समाज आत्मविश्वासाचा अर्थच गमावून बसला होता. त्यांना समाजाला वाचविण्यासाठी एखाद्या अवताराची वाट पाहण्याची सवय झाली होती. याहूनही वाईट म्हणजे एखाद्या थोर पुरुषाने समाजासाठी काही केले तर त्याच्या मागे जाणेच अधार्मिक झाले होते. दीनवाणेपणे दैवी अवताराची वाट पाहणे. एकनाथजींनी स्पष्ट व प्रभावी शब्दात जाहीर केले की, हा आत्मघातकी कला बदलणे निकडीची आहे. ज्यांना ते काहीही करू शकतील असा स्वतःवर विश्वास आहे अशी नवी पिढी त्यांना हवी होती. 
स्वामी विवेकानंदांकडे अवतार म्हणून पाहण्याची सुचना त्यांनी स्पष्टपणे बाजूला सारली. त्यांनी स्वामीजींना एक असा सामान्य माणूस म्हणून स्वीकारले की जो आत्मविश्वास व आत्मत्याग यांच्या जोरावर मानवी विकासाच्या सर्वात उच्च पातळीवर पोहोचला. 
म्हणून त्यांनी स्वामीजींच्या बसलेल्या ध्यानमग्न पुतळ्यांऐवजी... उभा, राष्ट्रकार्यासाठी निघण्याच्या असलेला पुतळा उभारला. हा निर्णय रूपकात्मक व ऐतिहासिकदेखील होता.
हे स्मारक 2 सप्टेंबर 1970 रोजी तत्कालीन राष्ट्रपतींच्या उपस्थितीत रामकृष्ण मठाच्या अध्यक्षांच्या हस्ते राष्ट्राला अर्पण करण्यात आले. लक्षावधी देशी व विदेशी जिज्ञासू पर्यटक स्मारकाला प्रतिवर्षी भेट देऊन विवेकानंद विचारानी प्रेरित होतात.
शिलास्मारक ही आता खात्रीलायक बाब झाली आहे व ते पूर्ण होणे हा केवळ वेळेचा प्रश्न राहिला आहे हे जसे त्यांच्या लक्षात आले, त्याबरोबर त्यांनी दुसऱ्या टप्प्याचा विचार करायला सुरुवात केली. ' सिमेंट- काँक्रीटचे एखादे बांधकाम उभे करणे अशा कामासाठी माझा जन्म झाला नाही. मला असे सजीव व शक्तिशाली स्मारक उभारायचे आहे, जे स्वामी विवेकानंदांच्या योग्यतेचे असेल, जे त्यांच्या भविष्यातील भारताच्या भव्य स्वप्नाला फलद्रूप करणारे असेल,' असा विचार त्यांनी केला. आणि ' विवेकानंद केंद्र' आकारास आले. " मानवसेवा हीच माधवसेवा' हे तत्व आपले अंतिम ध्येय समजून विवेकानंद केंद्राची स्थापना 7 जानेवारी 1970 रोजी कन्याकुमारी येथे झाली.
एकनाथजींच्या द्वारे लावलेल्या या एका छोट्याश्या रोपट्याने आज अरुणाचल, आसाम, नागालैंड, अंदमान, तामिळनाडू या ठिकाणी एका बहुआयामी संघटनेचे रूप धारण केले आहे.

संदर्भ: पुस्तकाचे नाव: कथा विवेकानंद शिलास्मारकाची

खालील युट्युबलिंकवरून एकनाथजींच्या असामान्य कार्याचा आवाका लक्षात येईल.

https://m.youtube.com/watch?v=bAmB0-7fMHQ

https://m.youtube.com/watch?v=igKT_5i2v_4

Group content visibility: 
Public - accessible to all site users

माननीय एकनाथजी perfectionist होते. त्यांचा Perfectionistness जाणून घेण्यासाठी एकदा शिला स्मारकाला भेट द्यावी. मा.इंदिरा गांधी उदघाटनाला गेल्या होत्या मुख्य दालनात प्रवेश करताना साडी ओली होऊ नये म्हणून वर उचलली Happy त्यांना वाटलं तिथे पाणी आहे. मनासारखी चकाकी येईपर्यंत फरशीला पॉलिश करुन घेतलं होतं ..... एकेक गोष्ट ते बारकाईने बघत आणि ती परफेक्टच हवी असायची. लोकसहभागातून उभा राहिलेला हा प्रथम प्रकल्प असावा. आज साठीच्या व त्यापुढच्या लोकांनी विद्द्यार्थी वयात एक रुपायचं तिकीट घेतल्याचं स्म्रत असेल. माझ्या एका मावशीने जी शाळेत शिक्षीका होती, ह्या प्रकल्पासाठी निधी संकलित करुन पाठवल्याचं अभिमानाने सांगते

धन्यवाद मंजूताई, Happy
अजून एक सांगितलं जातं याबद्दल!
अहोरात्र शिलास्मारकाचे काम चालू असतांना एकनाथजींच्या डायरीत रोज कुठले काम झाले पाहिजे हे डीटेल लिहिलेले असायचे. त्याप्रमाणे ते वेळोवेळी स्मारकाला भेट देत आणि हे करतांना निधीसंकलनासाठी देशभर दौरेही चालू होते. एकदा ते असेच रात्री १२ वाजण्याच्या सुमारास स्मारकावर पोहोचले. दुसर्या दिवशी सकाळीच त्यांना निघायचे होते. तर प्रवेशद्वारावरच्या एका हत्तीचा दात बसवला गेला नाही हे त्यांच्या लक्षात आले. त्या दिवसाच्या शेड्युलमध्ये ते काम होते. तेव्हा त्यांनी लगेच तेथील कामगारांना बोलावून रात्री ३ पर्यंत स्वतः थांबून ते काम करवून घेतले. हे सगळं करतांना कामगारांच्या चहा नाश्त्याची ही सोय त्यांनी केली होती.

असे अनेक किस्से आहेत, आर्या. एक वेळ अशी आली होती की कलाकारांना द्यायला पैसे नव्हते. मिळणार्‍या दोन वेळच्या जेवणावर त्यांनी काम सुरु ठेवलं होतं. ह्या सर्व कलाकारांना विनम्र आदरांजली !

वाचतोय...
प्रेरक व्यक्तीमत्वाबद्दल लिहिताना हात आखडता घेऊ नका. भरपूर भाग होऊदे.

सुरेख लेख नयना. एकनाथजींच्या नंतर बाला'जी' आणि लक्ष्मीदीदींनी सुद्धा खुप काम केलय या संदर्भात. त्यांच्याबद्दल पण कुठे माहिती मिळाली तर वाचून काढ. अतिशय प्रेरणादायक व्यक्तिमत्वे आहेत ही.

http://prakashan.vivekanandakendra.org/author/dr-m-lakshmi-kumari

विलक्षण व्यक्तित्व आहे हे... डॉ लक्ष्मी कुमारी! थॅन्क्स विशाल! आता अधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढलीये.
नक्की यांची माहिती मिळवते... पुण्याच्या केंद्रातून.
केंद्राच्या शिबिरात रोजच्या कार्यक्रमाव्यतिरिक्त जीवनव्रतींचे आयुष्यही जवळून बघता आले. इतके साधे सोपे निस्वार्थी ही जगता येऊ शकते हा परिपाठ मिळाला . एकनाथजींसारखेच हे ही लोक निगर्वी, प्रसिद्धीपरान्मुख असल्याने फारच थोडी माहिती उपलब्ध असते, जनरली.