"Deception was my job"- युरी बेझमेनोव

Submitted by खेकडा on 12 November, 2016 - 00:37

भारतात सध्या जे चालू आहे आणि गेल्या काही वर्षात जे काही झाले आहे त्याच्यामागे असलेली स्ट्रॅटेजी युरीने त्याच्या ३० वर्षांपूर्वी दिलेल्या मुलाखतीमध्ये मांडली आहे. त्यामुळे त्याने सांगितलेल्या मुद्द्यांना खूप महत्व आहे.

त्याने काय सांगितलं आहे ह्याधी युरी बेझमेनोव बद्दल थोडसं:

युरी हा रशियाच्या गुप्तहेर संघटनेचा म्हणजेच 'केजीबी'चा सदस्य. त्याचा जन्म १९३९साली मॉस्कोमध्ये झाला. त्याचे वडील रशियन सैन्यात होते, त्यामुळे कम्युनिस्ट छळवादी राजवटीत सामान्य जनतेपेक्षा युरीचं बालपण चांगलं गेलं.
कॉलेजात असताना राजकारण आणि भारत ह्या दोन गोष्टींचा त्याने विशेष अभ्यास केला.

नंतर १९६० च्या दशकात युरी रशियाच्या केजीबी ह्या गुप्तहेर संस्थेत रुजू झाला. भारताविषयी अभ्यास असल्यामुळे केजीबीतर्फे त्याची नेमणूक भारतात करण्यात आली.
गुप्तहेरी करण्यासाठी युरी भारतात संपादक बनून आला. नंतर भारताच्या, इथल्या माणसांच्या, संस्कृतीच्या प्रेमात पडला. केजीबी जगभरात आणि भारतात जर काही करते आहे ते खूप चुकीचं आहे, कम्युनिस्टांच्या स्वार्थासाठी इतर देशांचा, तिथल्या लोकांच्या बळी जात आहे, ह्या जाणिवेने त्याने केजीबीला सोडचिठ्ठी दिली. जीव वाचवण्यासाठी भारतात हिप्पी बनून राहिला आणि नंतर कॅनडाला पळून गेला. १९९३ च्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. कसा ते कुणालाच समजलं नाही.

"Deception was my job" गुप्तहेर म्हणून तो करत असलेल्या कामाचं स्वरूप युरीने एका वाक्यात मांडलं आहे.
खोटं असलेलं खरं बनवून दाखवणं, समाजाला भुरळ पाडणं, आपल्या बोलावत्या सरकारला हवं ते चित्र उभं करणं आणि परक्या राष्ट्रांमध्ये जनमत आपल्याला हवं त्या बाजूला वळवणे, हे काम युरी आणि त्याच्यासारखे अनेक गुप्तहेर करत होते आणि आजही करत आहेत.

ह्या सर्वाला त्याने 'सबव्हर्ट' हा शब्द वापरला आहे. सबवर्जन हेच युरी आणि अनेक गुप्तहेरांचं काम आहे.
हि सबवर्जनची थिअरी 'सुन त्झे' ह्या एका चायनीज विद्वानाने २००० वर्षांपूर्वी मांडली. रक्ताचा एक थेंब देखील न सांडता शत्रूला काबीज करणं, त्याच्या देशात आपल्याला अनुकूल मत पैदा करणं आणि मग हळूहळू शत्रूला काबीज करून घेणं हा ह्या थिअरी मागचा गाभा आहे.

आता हे सर्व करायचं तर त्याची एक विशिष्ट पद्धत असायला हवी, त्याची एक मेथेडॉलॉजी असायला हवी. इतर देशांवर कंट्रोल करण्यासाठी केजीबी जे काही करत होती, किंवा आजही अनेक देश जे काही करत आहेत त्याची तपशीलवार माहिती युरीने त्याच्या मुलाखतीत दिली आहे. इंटेरेस्टिंगली सबवर्जन हि एक लॉंग प्रोसेस आहे आणि ह्या सर्व देशांकडे ती अमलात आणण्यासाठी लागणारा संयम आहे.

एखाद्या देशात राजकीय, आर्थिक वा सामाजिक अस्थैर्य निर्माण करणं हा सबवर्जनचा उद्देश आहे. गुप्तहेर संघटनांच्या बजेटपैकी ८५% निधी ह्यासाठी वापरला जातो.

जिथे सामाजिक सीमारेषा फार मजबूत नसतात, जिथे समाज हा फार जास्त विचारी नसतो, जिथे देशाचे राज्यकर्ते स्खलनशील असतात, राजकीय नियंत्रण फार कमी असतं, त्या देशांना अश्या पद्धतीने नियंत्रणात आणणं फार सोपं असतं.
सबवर्जनमध्ये असणारी एकेक पायरी बघितली तर कोणत्याही सजग नागरिकाला ती पायरी उदहरणासाहित उमजून जाईल.
Demoralisation अर्थात समाजाचं खच्चीकरण करणे, हि एक पायरी त्यात आहे.
ह्यासाठी १५ ते २० वर्षांचा कालावधी आहे. एवढाच का? कारण ह्या कालावधीत एक पिढी शाळा कॉलेजचे शिक्षण घेऊन बाहेर पडते. त्यावेळी आपल्याला हवे असलेली मूल्य त्यांच्यावर बिंबवली तर त्यांचा कल बदलता येतो. कोवळ्या मनांवर आपली मतं लादणे आणि आपल्याला हवा तो प्रोपोगंडा राबवणं हे ह्या पायरीत केलं जातं. मग त्यांच्या पुस्तकात चुकीची माहिती छापणे हाही त्यातलाच एक भाग. उदाहरण डोळ्यासमोर आलं असेलच.

ह्याशिवाय समाजाचे असे जे आदर्श आहेत, ज्यांच्यावर सामान्यजन श्रद्धा ठेवून आहेत, त्यांना धक्का देणं, त्यांच्याविरुद्ध चुकीची विद्रोही माहिती पसरवणे हाही एक अजेंडा. असं झालं कि मग कर्ण चांगला वाटू लागतो, रावण हाही भाऊ असावा असा वाटतं आणि महिषासुर दिन साजरा केला जातो. समाजाला आपले मूळ आदर्श विसरायला लावणं हा हेतू साध्य होऊ लागतो.

धार्मिक मान्यता, शिक्षणपद्धती, सामाजिक जीवन, अडमिनिस्टरेशन सिस्टीम, कायदा आणि सुव्यवस्था, कामगार यंत्रणा गढूळ करून असंतोष पैदा करणं हा देखील ह्याच पायरीचा भाग. मग त्यात आजूबाजूला चालू असलेल्या वेगवेगळ्या देशविरोधी, समाजघातक चळवळींना पाठिंबा दिला जातो. वैचारिक दृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांपेक्षा अविचारी, आततायी, प्रसिद्धीलोलुप लोकांना हेरून मोठं केलं जातं.
त्यात 'मीडिया' हा एक मोठा भाग हातात घेतला जातो. सर्वसामान्य दर्जाचे पत्रकार समाजाचा आणि देशाचा आवाज बनवले जातात. खोट्या आणि एकसुरी बातम्या मीडियामधून वारंवार प्रसारित केल्या जातात. समाजात अस्थैर्य निर्माण होईल असे सर्व प्रयत्न मिडियाद्वारे करवले जातात.

राजकीय सत्ता आणि न्यायव्यवस्था गढूळ केल्या जातात. पद्धतशीर रित्या गुंडांचं ग्लॅमरायझेशन केलं जातं. गुंड प्रवृत्तीची माणसं हीच हिरो वाटायला लागतात. सत्शील, सदप्रवृत्त माणसाला बावळट आणि कुचकामी ठरवलं जातं. गुंड हे समाजशोषक नसून त्यांच्या परिस्थितिचे बळी आहेत, असं भासवलं जातं.
अतिसामान्य वकुबाची माणसं समाजाचं नेतृत्व हातात घ्यायचा प्रयत्न करतात.

शिक्षणाचं केंद्र असणारी कॉलेजेस अथवा विद्यापीठं ह्यात शिक्षण दुय्यम केलं जातं आणि प्राचार्य आणि विद्यार्थी, सरकार आणि विद्यार्थी ह्यांच्यात बेबनाव माजवला जातो.
स्त्रीवादि, समलिंगी, विद्यार्थ्यांच्या चळवळी उभ्या राहतात. समाजाला अचानकरीत्या त्यांच्या हक्कांची जाणीव होऊ लागते.एकंदरीत समाजात अशांतता माजवण्याचे, परकीय विचारसरणी बिंबवण्याचे शक्य तेवढे प्रयत्न केले जातात. ह्यालाच युरी 'Destabilization' असं म्हणतो.

Destabilization नंतर राजकीय कंट्रोल आणि मग आपल्याला हवा असलेला अजेंडा त्या देशात राबवणे.
एकदा समाजाचा कंट्रोल हाती आला कि समाजातील जी काही प्यादी अशांतता माजवण्यास उपयोगी पडलेली असतात त्यांनाच पद्धतशीररीत्या संपवलं जातं. नवीन राज्यकर्त्यांना त्या व्यक्तींची वा चळवळीची गरज राहिलेली नसते.

सबवर्जनसाठी उपयोगी पडणाऱ्या सामाजिक घटकांची एक यादीच युरीने एका दुसऱ्या इंटरव्ह्यूमध्ये दिली आहे. हि यादी ऐकली/ वाचली तर धक्काच बसेल.

चित्रपटक्षेत्रातली मंडळी, स्वत:ला बुद्धिवादी म्हणवून घेणारे लोकं, स्वत:भोवती वलय उभं करून स्वत:चं महत्व समाजात वाढवणारे स्वार्थी खोटारडे लोकं ह्यांचा उपयोग समाजात अस्थैर्य निर्माण करण्यासाठी केला जातो.

युरी म्हणतो, ह्या सर्वाला थांबवायचा उपाय आहे. आणि तो म्हणजे हे चालू होत असतानाच थांबवणे. ज्यावेळी समाजाची बेसिक मुल्य परदेशीमूल्यांच्या पंखाखाली जाऊ लागतात त्या आधीच ते थांबवणं महत्वाचं असतं.

भारतात लहान मुलांच्या पुस्तकात चुकीचा इतिहास छापून येतो, त्यांच्या कोवळ्या मनावर आणि बुद्धीवर फुटीरतेचे संस्कार केले जातात, अचानक कुणीतरी कोलेजातली मुलं एकदम मोठी होतात, त्यांना समाजाचं नेतृत्व मानलं जातं, मीडियातून एकाच बाजूच्या बातम्यांचा मारा होतो, चित्रपट क्षेत्रातली मंडळींना देश आपला वाटेनासा होतो- ह्या आणि अशा अनेक घटनांचं जणू भाकीत युरीने आपल्या मुलाखतीत मांडलं आहे.
आपल्या देशातल्या घटना असो वा इजिप्तमधली सो कॉल्ड राज्यक्रान्ति- सर्वांचा क्रम एकसारखा आहे.
रशियासारख्या देशाच्या एका एजंटने हि माहिती उघड उघड मांडली आहे. ह्यापलीकडे चालणार्या अनेक गोष्टी आपल्यासारख्या सामान्य माणसांच्या बुद्धीच्या पलीकडे असतील आणि त्या आपल्याला उभ्या आयुष्यात समजणार देखील नाहीत.

एखादा माणूस जीव तोडून सत्य लोकांसमोर आणायचा प्रयत्न करतो पण आपल्यावर असलेल्या खोट्याच्या प्रभावामुळे आपण सत्य स्वीकारत नाही. ह्याच गोष्टीला युरीने ideological subversion असं म्हंटलं आहे.
त्यामुळे समाजात घडणाऱ्या घटनांनी आपण जर भारावून जात असू किंवा त्याच बरोबर आहेत हे आपल्याला वाटत असेल तर आपण 'सबवर्ट' झालो आहोत, असत्याचा पाठपुरावा करणाऱ्यांपैकी एक आहोत.
References- युरी बेझमेनोव्हच्या मुलाखती!

(सोर्स- आंतरजाल )

Group content visibility: 
Public - accessible to all site users

काही मुद्दे पटले, पण काही गोष्टी खटकल्या.
कर्ण चांगला वाटू लागतो >> बाकीच्यांचे माहित नाही, पण "कर्ण" या व्यक्तिरेखेला चांगल्या अन वाईट अशा दोन्ही बाजू आहेत. एकाला त्याची चांगली बाजू पटली, तर यात चुकीचे काय?

स्त्रीवादि, समलिंगी, विद्यार्थ्यांच्या चळवळी उभ्या राहतात. समाजाला अचानकरीत्या त्यांच्या हक्कांची जाणीव होऊ लागते.>> म्हणजे हे सगळे होऊ नये कि काय? समलिंगी व स्त्रियांवर अत्याचार कधी होतंच नाहीत अन या सर्व चळवळी बिनबुडाच्या आहेत, असा याचा अर्थ होतो.

एकेकाळी जातीभेद अन सती परंपरा आपल्या समाजाचा अन संस्कृतीचा अविभाज्य भाग होता, पण आता सतीची परंपरा जवळपास नामशेष झालीय, अन जातीव्यवस्था नष्ट व्हावी, याबाबत अनेकांचे आजघडीला एकमत दिसते.
समाजाने कवटाळलेली चुकीची मूल्ये नष्ट करण्यासाठी लोक स्वतःहून असे उठाव करू शकतात, दरवेळी बाहेरच्यांची फूस असलीच पाहिजे का?

या हिशेबाने राजा राम मोहन राय अन बाबासाहेब आंबेडकर रशियाचे/ब्रिटिशांचे एजंट मानले पाहिजे. वर्षानुवर्षे साचून राहिलेल्या चुकीच्या कल्पनांमुळे आधीच ९०० वर्षांची गुलामगिरी सहन केलीय, आता कुठे जरा जाग येतेय तर त्यात असा बुद्धिभेदाचा मोडता घालू नका.

@ खेकडा, धन्यवाद! छान माहितीपूर्ण लेख. समाजातील माहितगार जेव्हा एखाद्या घडलेल्या घटनेविषयी म्हणतात कि 'ह्यात परकीय शक्तींचा हात आहे' तेव्हा त्यांना वरील लेखात सांगितलेली संकल्पनाच सुचवायची असते. मला एक उदाहरण आठवते. काही वर्षांपूर्वी लोकल ट्रेनवर दगड भिरकवण्याचे प्रकार वाढले होते. ज्यामुळे बऱ्याच जणांना त्यात आपले डोळे गमवावे लागले होते. रेल्वे रुळाजवळील वस्तीतून दगड मारले जात असत. जखमींचे प्रमाण वाढल्यामुळे लोकक्षोभ निर्माण झाला होता. अखेर त्या वस्तीत अहोरात्र साध्यावेशातील पोलीस बंदोबस्त ठेवल्यावर आणि लोकलच्या खिडक्यांना जाळ्या लावल्यावर हा प्रकार थांबला. अचानक असे प्रकार सुरु होणे आणि थांबणे, ह्यात नक्कीच परकीय शक्तींचा हात संभवतो. जे समाजात अस्थैर्य आणू इच्छितात.

किस्त्रीम २०१६ च्या दिवाळी अंकातला लेख ऑलमोस्ट कॉपी केला आहेत तर निदान त्याचे श्रेय तरी द्यायचे होते Happy