चिंगारी 'अमरप्रेम'मधली .......

Submitted by अजातशत्रू on 29 July, 2016 - 01:45

amaprepm8.jpg

काळोख्या रात्री हेलकावे खात चाललेली नाव. नावेवर प्रत्येक क्षणाला आदळणारया लाटा अन त्यांचा सपासप आवाज. नावेच्या टोकाला पुढे धूसर दिसणारा नावाडी आहे जो नाव हाकतो आहे, एका संथ लयीत तो वल्ही मारतोय. नावेवरच्या शाकारलेल्या झोपडीत पाठमोरी बसलेली आहे, ती पुष्पा ! तिच्या डोईजवळच हलणारया कंदिलाच्या पिवळसर उजेडात ती अगदी दिलखुलास दिसते ,अगदी मन लट्टू व्हावे अशी दिसत्येय ती. आनंदी रंगाची निळ्याझाकेतली साडी तिला खूपच खुलून दिसत्येय. फिकट निळ्या रंगाचे किंचित आवळ पोलके घालून बसलेल्या पुष्पाने हातात गच्च भरलेल्या जर्दनिळ्या बांगड्या, गळ्यात सोन्याचे सर अन कानात हलणारे गोलाकार झुबे घातलेत ! कपाळावर ठळक मोठा गोलाकार गंध अन नाकात सोन्याची मोरणी...खरे तर तिच्या गालावर पडणारया खळ्यानीच माणूस घायाळ व्हावा अन तिच्या मासोळी डोळ्यात सदा पाझरणारे स्नेहाचे भाव बघून पुन्हा जीवित व्हावा ! आपल्या पदराशी ती चाळा करत बसलीय अन तिच्या समोर आहे तो नजरेत अनामिक नशेचे अगणित कैफ घेऊन बसलेला परिटघडीच्या पांढरया शुभ्र कपड्यातला रुबाबदार आनंदबाबू ! पांढरेशुभ्र बंगाली धोतर अन शुभ्र पायघोळ सदरा, त्यावर घेतलेले शुभ्र मखमली उपरणे. या वेशात बसलेले आनंदबाबू हातात लालबुंद मदिरेचा ग्लास घेऊन तिच्याकडे बघत आहेत अन पुष्पा त्यांच्याकडे तोंड करून बसलेली आहे. नावाडी नाव हाकतोय, रात्र देखील या दोहोंच्या हालचाली बेधुंद होऊन बघत्येय, कंदिलाचा पिवळसर उजेड चांदण्याना वाकुल्या दाखवित पुष्पाच्या चेहऱयावरून ओसंडून वाहतोय. अन तो परीकथेतला राजकुमार त्याच्या वेदना मदिरेत उतरवताना दर्दभरया आवाजात तराणे छेडतोय,
'चिंगारी कोई भडके तो सावन उसे बुझाये सावन जो अगन लगाये,
उसे कौन बुझाये पतझड जो बाग़ उजाड़े,
वो बाग़ बहार खिलाये जो बाग़ बहार में उजड़े, उसे कौन खिलाये ?'...

गात असतानाच तो मध्येच उठून नावेच्या टोकाकडे पुढे जातो अन ती त्याच्या हातातला ग्लास घेऊन उभी राहते.तिच्या डोळ्यात तो आता पुरता उतरला आहे अन ती त्याच्या मदिरेत !
..'हमसे मत पुछो कैसे मंदिर टूटा सपनोंका' असे म्हणत म्हणत पुन्हा तिच्या जवळ येऊन उभारतो अन ती हातातला ग्लास त्याला देते.
पार्श्वसंगीतात एक आत्यंतिक विदीर्ण करणारी व्हायोलीन वाजत राहते अन दूर नदीच्या काठावर दिसणारी दिव्यांची बारीक रांग लाटेच्या जोशात या दोहोंसाठी झोके घेत असल्याचा आभास होत राहतो....
मनाला रुखरुख लावत गाणं संपतं ....

अडीचेक तासाचा सिनेमा बघता बघता संपून जातो, थियेटरमध्ये लाईट्स लागतात. प्रेक्षक बळेच उठतात अन एक्झिटडोअर्स कडे सावकाश चालू लागतात..
यथावकाश सिनेमा संपून गेलेला असतो आपण घरीही जातो पण पुष्पा, आनंदबाबू अन त्यांच्या आरसपानी प्रेमाच्या चांदण्यात न्हाऊन निघालेलं हे गाणं काही डोक्यातून जात नाही ...हे गाणं कुठेही कधीही लागू देत मनाची एक का होईना तार छेडल्याशिवाय राहत नाही....
rk.jpg

हा चित्रपट होता अमरप्रेम. राजेशखन्ना अन शर्मिला टागोरचा १९७२ मधला सुपरहिट चित्रपट. मी कधी पाहिलाय नेमके आठवत नाही. पण २५ मीटर बॅंड अर्थात रेडीओ सिलोन, विविधभारती लावुन हे गाणे अनेकवेळा ऐकल्याचे आठवते .सिनेमा पाहताना लक्षात राहणारे आणखी पात्र नंदूचे आहे. सावत्र आईचा छळ सोसणारा नंदू.सावत्रपणाचा दुष्टपणा, छ्ळ पडद्यावर प्रत्यक्ष पाहताना तेंव्हा फार वाईट वाटायचे. नंदू, त्याची सावत्र आई आणि शेवटी मोठा नंदू मानलेल्या आईला घेऊन जातो, इतकीच अमरप्रेमची आधीची आठवण. ’बडा नटखट है’ हे एकच गाणं तेव्हा खूप दिवस लक्षात राहीलं. आनंदबाबु, पुष्पा यांचं नातं कळण्याचं ते वयच नव्हतं. पण पुढे आयुष्याच्या प्रत्येक वळणावर ’अमरप्रेम’ भेटतच राहीला. दुःख आणि आनंदाचे रंग गडद करत गेला ....

पुढे दूरदर्शनवर छायागीत अन रंगोलीमध्ये हे गाणं खूप वेळा पाहिलं. वयानुसार वाढलेल्या जाणीवा अन अनुभव यातून नंतर या गाण्याचा अर्थ थोडाफार कळत गेला पण अजूनही पूर्ण अर्थ कळलाच नाही असे वाटते. काही वर्षांनी अमरप्रेम मॅटिनीला पाहिला त्या काळी मॅटिनीला जुने चित्रपट लागत असत.. तेंव्हा पाहिलेला अमरप्रेम अन किशोरवयात पाहिलेला अमरप्रेम अन आता यु ट्यूबवर पाहतानाचा अमरप्रेम दरवेळेस वेगवेगळे अनुभव देऊन जातो. आनंदबाबू अन पुष्पाच्या नात्यातले गहिरे रंग दरवेळेस अजून गहिरे होतात. शक्ती सामंतांचे दिग्दर्शन, आनंद बक्षींचे संगीत, आरडीचे मेंदूवर ताबा मिळवणारे संगीत अन चित्रपटातल्या सर्वच अभिनेत्यांचा कसदार अभिनय. लताजींचे ‘रैना बीती जाये’ मधले सुरुवातीचे आलाप विचारमग्न करून जातात. आनंद बक्षींचे ‘कुछ तो लोग कहेंगे, लोगोंका काम है कहना....सीताभी यहा बदनाम हुई’ आर्त मनाचे दुखणे मांडून जाते. छोट्या नंदूवर अपार वात्सल्याने प्रेमाचा वर्षाव करणारी शर्मिला टागोर म्हणजेच पुष्पा आनंदबाबूच्या प्रेमाला कसे सामोरे जावे याचा मात्र सामना करू शकत नाही. आनंदबाबू आणि पुष्पा प्रौढत्वाकडून वृद्धत्वाकडे झुकतात अन त्यांच्या प्रारब्धाचा भोग ते भोगू लागतात. पुष्पा आता धुणे-भांडी करणारी गलितगात्र वृद्धा झालीय तर आनंदबाबूंचे ऐश्वर्य अन शानोशौकत लोप पावलेय. ते दोघेही काळाच्या एका वळणावर पुन्हा भेटतात, तेंव्हाचा सीन खूप भाव खाऊन जातो.स्वतःच असहाय असलेला आनंद पुष्पाला सहानुभूती दाखवू लागतो तेंव्हा त्याच्यावर म्हातारचळ लागल्याचे टोमणे उडतात अन पुष्पाच्या चारित्र्यावर पुन्हा शिंतोडे! तिच्या अवहेलनेचा हा मूक प्रवास तो पुन्हा पुन्हा अनुभवतो. एका असहाय स्त्रीच्या प्रेमाची कथा अमरप्रेम आपल्या समोर मांडत राहतो अन व्यवहारी दुनिया परत परत तिचे तुकडे करत राहते....
sharmila.jpg

‘रो मत पुष्पा, आय हेट टियर्स ! क्योंकी आंसू इन्सान को कमजोर बना देते है’ असे म्हणणारा आनंद वृद्ध पुष्पाच्या आजारपणाच्या वंचनेत असतानाच त्याला पुन्हा एकदा नंदू भेटतो. तो नंदूला पुष्पाकडे घेऊन जातो. चित्रपटाच्या शेवटी नंदू आपल्या मानलेल्या आईला म्हणजे पुष्पाला आपल्या घरी घेऊन जातो. तो तिला घेऊन जातो ते दिवस दुर्गापूजेचे आहेत, सिनेमात पडद्यावर तो तिला टांग्यात बसवून घेऊन जातानाचे दृश्य आहे, त्याच्या पार्श्वभागात अनेक लोक आपापल्या हातात दुर्गामातेची तसबिर घेऊन घराकडे जाताना दिसताहेत ही विलक्षण परिणामकारक टायमिंग यात घेतली आहे. नंदू लहान असताना लावलेले पारिजातकाचे रोपटे आता एका बहरदार अन फुलांनी डवरलेल्या झाडात रुपांतरीत झालेले आहे. अमरप्रेम पाहताना त्याचा शेवट डोळ्यातल्या पारयावर अश्रूंच्या धुक्याची हलकी सर घेऊन येतो, ही अश्रूंची सर हवीहवीशी वाटणारी आहे. विभूतिभूषण बंदोपाध्याय या महान बंगाली कथालेखकाच्या कथेवर आधारित हा सिनेमा आहे. अपूर संसार,पाथेर पांचाली हे सत्यजित रें चे सिनेमे यांच्याच कथांवर आधारित होते. ही देखील एक ऐतिहासिक पृष्ठभूमी या सिनेमाला आहे, किंबहुना या दमदार कथेच्या जोरावर अमरप्रेम मनात घर करून राहतो....

आज अमरप्रेमला चार दशके उलटून गेलीयत पण आजही नावेत वसलेले राजबिंडे आनंदबाबू अन पाठमोरी बसलेली देखणी पुष्पा अन त्या दोघांच्या अंगावर नावेतल्या कंदिलाचे हळुवार पडणारे पिवळसर कवडसे अजूनही काही केल्या नजरेपुढून हटत नाहीत. याचे सर्वाधिक श्रेय किशोरदाना आहे. कधीकधी तर असे वाटते की ते राजेशखन्नाच्या मागे कुठेतरी उभे असावेत अन तिथेच सिनेमातला प्रेमाच्या वेदनेचा कैफ त्यांच्या गायकीत उतरवला असावा. अनेक गाणी येतील जातील, अनेक गायक येतील जातील पण अमरप्रेममधलं चिंगारी कोई भडके हे गाणं ऐकून त्याला नाक मुरडणारा रसिक कोणालाच भेटणार नाही....

आयुष्यातल्या अनेक सुखदुःखाच्या घडीत ही गाणी आपले मन रिझवतात अन आपण आपल्या रोजच्या लढाईसाठी ताजेतवाने होत राहतो......

- समीर गायकवाड.

http://sameerbapu.blogspot.in/2016/07/blog-post_63.html

amar-prem-1972.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

व्वा बापू...!

मस्त लेख्..आणि तो ही इतक्या आवडत्या चित्रपटावर. Happy
"Platonic love" च्या कन्सेप्ट वर उभा असलेला हा चित्रपट. बिभितीभूषण बंदोपाध्याय ह्यांनी बंगाली मधे लिहिलेल्या मूळ कथे वर शक्ती सामंतांनी खूप सुरेख चित्रपट काढला. फरक इतकाच की मूळ कथा नंदू च्या पॉईंट ऑफ व्ह्यु नी आहे. पंचम ह्या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक आणि वेगवेगळ्या गाण्यांसाठी गायक म्हणून किशोर दा, लता आणि दस्तरखुद्द बडे बर्मन दा. राजेश खन्ना आणि 'ला टागोर' ने ज्या ज्या चित्रपटांमध्ये अतीशय संयत काम केले आहे, त्या मधे अमर प्रेम चा नंबर फार वरचा आहे. कहानी [विद्या बालन चा] मधे जसे कोलकाता एक शहर म्हणून नाही तर एक व्यक्तिरेखा म्हणून समोर येते..अगदी तसेच त्या काळचे कलकत्ता अमर प्रेम मधून डोकावत राहते.
सुरेख चित्रपट आणि तुमचा लेख पण...

काय डोळ्यासमोर चित्र उभे राहिल असे लिनिलय. उत्तम कथा आणि सादरीकरण असलेला चित्रपट आणि राजेश खन्नाचा आणि शर्मिलाचा साजेसा अन्हिनय

शर्मिला सुंदर दिसलीय खरी त्यात. तिचे हिंदी उच्चार आणि भलतेच लाडे लाडे बोलण जरी नेहमी खटकले तरी बरी वाटलीय राजेश खन्ना बरोबर ती आराधना, अमरप्रेम मध्ये.

बरं बांगड्या निळ्या नाही आहेत ओ....

छानच लिहिलय्,पु ले शु

एक शन्का :शेवटचे बहर्लेले झाड माझ्यामते पारिजातकचे नसुन्,रजनिगन्धाचे असावे.

छान लिहिलय. गाणी सुरेख आहेत सर्वच. सिनेमा काही खास आवडीचा नाहीये माझ्या.
शर्मिला टागोर मला कधीच शालीन, सुशील, बुद्धीवान यापैकी कोणीही वाटत नाही. अत्यंत नटवी वाटते. आणि ओठ आणि जिवणी यांच्या ज्या अगम्य हलचाली करते तो बहुधा तिचा अभिनय असावा! आता प्रौढ वयात मात्र खूपच छान वाटते. (मिले सुर मेरा तुम्हारा मधेही छान दिसली आहे)

खरंय रावी. शर्मिला मलाही कधी आवडली नाही. अत्यंत लाडीक पणे सदोष बोलायची. नूतन, वहिदा वगैरे कशा 'अभिजात' होत्या......!!
पण हा लेख छान उतरलाय. म्हणजे ते गाणंही तितकंसं आवडीचं नाहीये तरी......
शर्मिला मुळेच गाणं आवडत नाही..ती खूप नटवी व ऑड दिसते त्यात.

सुंदर लिहिलेय. चित्रपट आवडता आहेच. गाणीही अप्रतिम होती.
पण शर्मिलाच्या जागी आणखी कुणीतरी हवे होते.. म्हातारपणीच्या मेकप मधे तर ती अजिबात शोभली नाही.

आहाहा सुंदर लिहिलंय.. राजेश चा हा सिनेमा ही क्लोज टू हार्ट..

त्याच्याबरोबर ची कोण आहे तिकडे लक्ष कोणाचं जात होतं.. Happy

मस्त लिहिलंय.
शर्मिला सुंदर दिसलीय खरी त्यात. तिचे हिंदी उच्चार आणि भलतेच लाडे लाडे बोलण जरी नेहमी खटकले तरी बरी वाटलीय राजेश खन्ना बरोबर ती आराधना, अमरप्रेम मध्ये. >>>>>+१

शर्मिलाचा म्हातार्‍या स्त्रीचा मेकप खरं तर चांगला झालाय आराधना आणि अमर प्रेम मधे. ती खरीखुरी म्हातारी वाटते त्यात! उगाचच एक केसांची बट चंदेरी रंगवून म्हातारी झालेली दाखवली नाहीये. अनुपमा, देवर, गृहप्रवेश या चित्रपटांत तिने चांगला अभिनयही केला होता.

मस्तच!
गाण्याचा ताल, तालवाद्याच्या मदतीने नव्हे तर गिटारच्या स्ट्रिंग्जवर तोलला आहे, क्रेझी आर्डी!

छान लिहिलंय. हा चित्रपट आवडता आहे. शर्मिलाही, तिच्या दोषांसकट. सतत आपला नाजूकपणा मिरवत असल्यासारखी वाटणारी. नाटकी वाचणार्‍या उच्चारांसकट. (मौसममध्ये ती जरा कमी नाटकी वाटते किंवा अजिबात वाटत नाही का? पुन्हा बघायला हवं.)

वसंत बापटांच्या मानसीमध्ये एक ओळ आहे, 'तिच्या क्लासिक मानेच्या उतारावर माझ्या अधःपाताची सोय" ती ओळ शर्मिलाला पर्फेक्ट लागू होईल. त्यात त्या मानेला डोक्यावर बसवलेलं सुगरणीचं घरटं पेलायला लागायचं.

राजेश खन्ना या सिनेमात आवडलाय.

शेवटच्या सीनमध्ये दुर्गामातेच्या तसबिरी घेऊन जाणारे लोक आहेत हे लक्षात आलं नव्हतं.

गाणी आणि संगीत दोन्हीही मस्तच. दिग्दर्शक शक्ति सामंतांचा उल्लेख हवाच.

वरच्या फोटोत दोघांचेही कपडे अगदी नवेकोरे वाटताहेत. चित्रपट पाहताना हे कधी जाणवलं नव्हतं.

छान लिहिलंय. अत्यंत आवडता चित्रपट. राजेश खन्ना, शर्मिला बेहद्द आवडतात यात व आराधना मधे पण.

का कोणास ठाऊक, शर्मिला टागोर मला तिच्या घरट्यासहीत व नाटकी बोलण्यासहीत पण नेहमीच आवडली.

मला पण आवडते गाणे व चित्रपट. हिंदी चित्रपटांत काही अश्या कलाकृती असतात की त्यात सर्वच गाणी टेरिफिक, परफेक्ट त्यातले हे एक आहे. अजून उदाहरणे गाइड, मेरे जीवन साथी, आराधना.
रैना बीती जाये फार उच्च गाणे आहे. तन्मय भट्ट ने ऐकले नसावे कदाचित. शम्मु मला आवडते. इन जनरल बंगाली स्त्रियाच आवड्तात. तरतरीत व बुद्धिमान दिसतात. त्यामानाने पंजाबी कुडी व यूपीतल्या गोरीया जरा बुद्दु वाट्तात. बट नॉट कंप्लेनिन्ग.