बलात्कारी मी: गरज आत्ममंथनाची

Submitted by मार्गी on 20 July, 2016 - 02:13

सध्या बलात्काराच्या वाढत्या प्रसंगांमुळे चिंतेचं वातावरण पसरलेलं आहे. शाळेच्या मुलींमध्ये दहशतीचं वातावरण आहे. रोज कोपर्डीसारख्या घटना समोर येत आहेत. ह्या परिस्थितीमध्ये प्रश्न पडतो की, ह्यावर रामबाण उपाय काय आहे? बलात्का-याला किंवा बलात्का-यांना फाशी किंवा गोळ्या घालणे हा उपाय आहे का? किंवा छेडछाडीसारख्या गुन्ह्यांना कडक शिक्षा ठेवून परिस्थिती बदलेल का? ह्या संदर्भात थोडं खोलवर बघितलं तर अनेक बाजू दिसतात. ह्या प्रश्नाच्याही- ह्या समस्येच्याही अनेक बाजू आहेत आणि म्हणून उत्तराच्या- उपाययोजनेच्याही अनेक बाजू आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे बलात्कारी कोणी अज्ञात- माथेफिरू- सराईत गुन्हेगार असा आहे, हे मनातून काढायला पाहिजे. आकडेवारी सांगते की, मोठ्या प्रमाणात बलात्कार व शारीरिक शोषणाच्या घटनांमध्ये कुटुंबातले जवळचे सर्वसामान्य पुरुषच सामील असतात. आणि जरी कोणी अज्ञात माथेफिरू गुन्हेगार जरी असले तरी तेसुद्धा कोणी तरी माणूसच आहेत ना. आपल्यासारखेच माणूस म्हणून जन्माला आलेले आहेत. त्यामुळे ही समस्या जर ख-या अर्थाने समजून घ्यायची असेल तर माथेफिरू गुन्हेगार असं का करतो, हा प्रश्न विचारून चालणार नाही. त्याऐवजी असा प्रश्न पडायला हवा की, 'मी बलात्कार का करतो?' कारण आपल्याला जरी दिसताना परका माथेफिरू माणूस दिसत असला; तरी तोसुद्धा एक 'मीच' असतो. आणि कितीही माथेफिरू गुन्हेगार म्हंटले, तरी तेही शेवटी माणूसच असतात आणि म्हणून एका अर्थाने 'मीच' असतात. काही 'मी' जास्त गुन्हेगार असतात; काही 'मी' कमी गुन्हेगार असतात.

आणि जर एखादा अज्ञात इसम बलात्कार करत असेल- जो की अन्यथा अगदी सज्जन सरळमार्गी मनुष्य होता- तर स्वत:ला सरळमार्गी समजणारा मीसुद्धा कशावरून बलात्कार करणार नाही असा प्रश्न पडायला हवा. जर आपल्यासारखाच जन्म घेतलेला- आपण राहतो त्याच समाजात राहणारा एखादा माणूस अट्टल गुन्हेगार होऊ शकत असेल तर आपण स्वत:सुद्धा त्याच शक्यतेमध्ये आहोत; आपणही तसे होऊ शकतो असं मानून चालणं शहाणपणाचं असेल. रोगाच्या भाषेत बोलायचं तर जर एखाद्या रोगाची साथ पसरत असेल तर आपण स्वत:ला त्यापासून अलिप्त न मानता त्या साथीपासून वाचवण्यासाठी प्रतिबंधक उपाय सुरू करतो; आपल्या आरोग्याची जास्त काळजी घेतो. हेही काहीसं तसंच आहे.

मुळात आपण जर स्वत:शी प्रामाणिक असू तर अनेकवेळा कळतं की, आपल्या मनामध्येही अपराधी वृत्ती आहे; आपल्या मनामध्येही हिंसा ठासून भरलेली आहे; आपणही अनेकदा इतरांचं अनिष्ट चिंतन करतो. इतरांचा घात करावा असं आपल्या अनेकदा मनात येतं. इतरांचा कशाला; आपण स्वत:चा घात करायचा विचारही अनेक वेळेस केलेला असतो. फळांच्या गाड्याच्या जवळून जाताना आपल्याही मनात येतं की, दोन फळं उचलली तर. . किंवा आपणही चेह-यांवर मोहित होतोच; वासना आपल्यालाही पकडतातच. त्यामुळे वरवर दिसते तशी ही समस्या काही ०.०१% माथेफिरू- अपराधी- अमानवी पुरुषांपुरती मर्यादित नाहीय. कमी जास्त प्रमाणात आणि प्रत्यक्ष- अप्रत्यक्ष स्वरूपात ही सर्वांचीच समस्या आहे. रोगाची लागण सगळीकडेच आहे; फक्त काही ठिकाणी शरीरातली प्रतिकारशक्ती त्याला नियंत्रणात ठेवते तर काही ठिकाणी तो रोग अनियंत्रित होताना दिसतो.

ह्या समस्येच्या मुळाशी जाताना दिसतं की, आपल्या समाजात आपण अशा अनेक गोष्टी करतो ज्या निसर्ग नियमांच्या विरोधात जातात. समाजामध्ये एक व्यवस्था टिकून राहण्यासाठी त्या आवश्यकही असतात; पण त्यामुळे निसर्गात असंतुलन होतं. आता स्त्री- पुरुषांना एकमेकांविषयी वाटणारं आकर्षण ही अतिशय नैसर्गिक बाब आहे. परंतु आजही आपल्या समाजात ह्या आकर्षणाच्या अभिव्यक्तीला योग्य ते स्थान दिलं जात नाही. किंबहुना स्त्री- पुरुष जितके दूर तितकं चांगलं, असंच अनेक ठिकाणी मानतात. अर्थात् त्यामध्ये ही भितीसुद्धा आहे की, स्त्री- पुरुष जर जवळ आले तर रोग अनियंत्रित होईल. त्यामुळे म्हातारा माणूसही गाडीत बसताना बाईजवळ बसत नाही किंवा तरुण मुलगी म्हाता-या माणसाच्यासुद्धा जवळ सहसा बसत नाही. इतकी भिती कशामुळे? इतकी टांगती तलवार कशामुळे आहे? आज आपण रोगाच्या एडव्हान्स्ड स्टेजमध्ये आहोत; त्यामुळे निरोगी स्थिती काय असेल, हे आपल्याला कळणं अवघड आहे.

पण अशी कल्पना करूया की, असा एखादा समाज आहे ज्यामध्ये लहान मुलं- मुली अगदी एकत्र वाढत आहेत. अगदी पाच वर्षांपासूनचे मुलं- मुली एकत्र वाढत आहेत- एकाच शाळेत शिकत आहेत; एकाच हॉस्टेलवर राहात आहेत; एकाच तलावात पोहत आहेत असे. अशा समाजामध्ये व अशा सान्निध्यामध्ये वाढलेले मुलं मुलींवर बलात्कार करतील का? बलात्कार लांबची गोष्ट; ते मुलीची छेड तरी काढतील का? आज आदिवासी समाजामध्ये मुलं- मुली काही प्रमाणात अशाच सान्निध्यामध्ये राहतात आणि तिथे अजिबात बलात्कार किंवा छेडछाड होताना दिसत नाही. कारण छेड तेव्हाच काढली जाते; धक्का तेव्हाच मारला जातो; जेव्हा दोघांमध्ये खूप जास्त अंतर असतं. जर दोघांमध्ये तितकं अंतर सुरुवातीपासूनच नसेल; तर छेड काढण्याचं किंवा धक्का देण्याचं कारणच उरणार नाही. बलात्काराचा तर प्रश्नच उद्भवणार नाही.

आपल्याला हे समजून घेताना जड जातं कारण आपण रोगाच्या एडव्हान्स्ड स्टेजला आहोत. पण जी मुलं- मुली छोटी आहेत; त्यांना आपण ह्यापासून वाचवू शकतो. जर मुला- मुलींना ५ वर्षापासून एकत्र ठेवलं तर ह्या रोगाला प्रतिबंध करता येऊ शकतो. अर्थात् हे इतकं सोपं नाहीय. त्यामध्ये असंख्य अडचणी आहेत. समाजामध्ये स्त्रियांना किंवा मुलींना दुय्यम स्थान दिलं जातं, त्यामुळे पहिलीपासूनच शिक्षणात मुलींची संख्या कमी होत जाते. शिवाय समाज सतत मुलींना मुलांपेक्षा वेगळी वागणूक देतो. त्यामुळे मुलं- मुली जितकी एकत्र राहायला हवीत, तितकी राहत नाहीत. मुलं बाहेर उंडारतात; मुली घरातच काम करतात. पण तरीही, बलात्कार करणा-यांचा जर एखादा अभ्यास केला गेला तर त्यामध्ये कळेल की, बलात्कार करणा-या पुरुषांपैकी फार थोड्या पुरुषांना लहानपणापासून बहिण- मैत्रीण ह्या रूपात स्त्रियांची सोबत होती. कारण बलात्कार ही अमानवी कृती असली तरी तो एका आकर्षणाचा विस्फोट आहे. उद्रेक आहे. पण जर ते आकर्षण नैसर्गिक प्रकारे सुरुवातीपासूनच संतुलित राहिलं असेल, तर तिथे स्फोट होण्यासारखी स्थितीच निर्माण होणार नाही.

ह्या प्रश्नाच्या संदर्भात काही समस्या ह्या कारणांचा भाग आहेत. उदा., ग्रामीण- निम शहरी समाजात तरुण मुलीला सुरक्षित वातावरण नसतं; म्हणून ती समाजात फार मिसळत नाही. किंवा मित्रांसोबत बोलू- भेटू शकत नाही. ही एक समस्यापण आहे आणि समस्येचं कारणसुद्धा आहे. कारण तरुण मुलांना किंवा किशोरवयीन मुलांना मुलींचा सहज सहवास- सोबत मिळत नसेल तर आपोआप तिथे तणाव निर्माण होणार आणि मग एकतर्फी प्रेम, छेडछाड, शोषण व बलात्कार असे प्रसंग होणार आणि त्यामुळे परत मग मुली मुलांपासून दूरच जाणार आणि मुलींचा सहवास मिळणं अजून कमी झाल्यामुळे हा ताणही वाढणार. असं हे दुष्टचक्र होणार. आणि मग अशा परिस्थितीत तरुण मुलीच्या पालकांवर तिचं लवकर लग्न करण्यासाठी दबाव येणार. त्यातून परत तिचं स्वतंत्र फुलणं कोमेजणार.

त्याउलट ज्या आदर्श स्थितीमध्ये लहान वयातील मुलं- मुली एकत्र असतील; तिथे किशोरवयामध्येही ताण होणार नाही आणि तारुण्यातही ताण होणार नाही. एकमेकांच्या सोबतीत वाढलेली मुलं- मुली एकतर्फी प्रेमात पडणार नाहीत; निव्वळ आकर्षणाला प्रेम समजणार नाहीत; त्यांच्यात एक समज आलेली असेल. अनेक मित्र आणि अनेक मैत्रिणी बघितल्यामुळे त्यांच्यामध्ये जीवनसाथी निवडण्यासंदर्भात एक दृष्टी आलेली असेल. अशी एकत्र वाढलेली पिढी लैंगिक दृष्टीने स्वस्थ असेल.

पण आपण रोगाच्या ज्या एडव्हान्स्ड स्टेजमध्ये आहोत, तिथून आपल्याला अशी कल्पनाही रुचत नाही. आपल्यावर समाज असंख्य प्रकारे प्रोजेक्शन्स करत असतो- आपल्या नकळत. आपण सहजपणे म्हणून जातो की, तरुण- तरुणींनी एकत्र राहणं चुकीचं आहे. किंवा आपल्याला एकमेकांच्या मिठीमध्ये असलेले तरुण- तरुणी दिसले तर आपण नकळत त्यांना नाव ठेवतो. अनैतिक समजतो. कारण आपल्या मनामध्ये ह्या स्वाभाविक नैसर्गिक ओढीचं इतकं दमन झालेलं आहे की, मिठीमध्ये असलेले तरुण- तरुणी फक्त लैंगिक आकर्षणामुळेच एकत्र आहेत, हे आपण गृहितच धरतो. किंबहुना सेक्सुअलिटीशिवायसुद्धा वेगळी सोबत असू शकते, हे आपल्याला जणू दिसतच नाही. आणि अशा इंटरप्रिटेशनमध्ये आपल्याच मनातले अर्थ प्रोजेक्ट होतात. जर आपण कधी कोणाला असं मिठीत घेतलं, तर त्याचा अर्थ मग निव्वळ सेक्सुअल असेल, हेच आपलं असं इंटरप्रिटेशन सांगत असतं. नैसर्गिक ओढीचं इतकं दमन झाल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टीकडे एका निरोगी दृष्टीने बघणंच शक्य होत नाही.

आणि म्हणून मग आपण स्त्रियांना व्यक्ती म्हणून सन्मान देऊच शकत नाही. आपण त्यांना सन्मान देतो- ओढून ताणून सन्मान देतो पण तो कसा- माता म्हणून, बहिण म्हणून, कोणाची तरी पत्नी म्हणून. पण निव्वळ एक माणूस- एक व्यक्ती म्हणून सन्मान देऊ शकत नाही. किंवा त्या माणूस ह्या नात्याने रिलेटही होऊ शकत नाही. आईपण, बहिणपण किंवा पत्नीपण ह्यापेक्षा माणूसपण मोठं आहे; व्यापक आहे; त्या पातळीवर ते रिलेशन होत नाही. असो.

तेव्हा ह्या मूळ समस्येचेही अनेक घटक आहेत आणि त्यावरच्या उपायांचेही अनेक पैलू आहेत. किंबहुना समस्या व उपाय हे एका अर्थाने वेगवेगळे नसून दोन्ही एकमेकांचे कारण आहेत. म्हणून खरी गरज डोळसपणाची आहे. आपण कदाचित बलात्कार करणार नाही; आपण टोकाला जाणार नाही; पण वासना आपल्या मनातही आहेत. आपल्या मनातही हिंसा आहे. आणि खरं पाहिलं तर ह्या समस्यासुद्धा निसर्ग आपोआप सोडवत असतो. पण आपण निसर्गाच्या प्रक्रियेमध्ये बाधा आणतो. तरुण वयात मुलं- मुली एकमेकांकडे जास्त आकर्षित होतात. मुलं मुलींकडे टक लावून बघतात. वस्तुत:‌ असं टक लावून बघणं, हेसुद्धा नैसर्गिक पातळीवर चालू असलेलं संतुलन आहे. एका अर्थाने निसर्गत: होणारं ध्यान आहे. कारण जर त्या मुलाने खरच टक लावून त्या मुलीला बघितलं; खरोखर निरखून बघितलं; तर त्याला हळुहळु कळतं की, अरे! हा चेहरा काही मोत्यांसारखा नाही; किंवा हा चेहरा काही चंद्रमुखी नाही; हा चेहराही कोमेजतो; हे डोळेही उदास होतात; थकतात; हा चेहराही रागीट होतो; हा चेहराही दुष्ट होतो. पण हे तेव्हाच कळेल जर त्या मुलाला खरोखर टक लावून बघू दिलं तर! पण आपण समाज म्हणून तिथेच अडवतो. त्यामुळे जो चेहरा आपोआप सामान्य बनला असता आणि ते आकर्षण शांत झालं असतं; ते अजून उद्दीपित होतं आणि तो चेहरा सामान्य बनण्याऐवजी अप्सरेचा बनतो; स्वर्गीय बनतो. आणि मग त्यातून एक दिवस टोकाची स्थिती निर्माण होऊ शकते.

निसर्ग आपल्या सगळ्या ताणांचं रेचन करतच असतो. राग येणं ही स्वाभाविक गोष्ट आहे. आपल्याला राग आला की, आपलं मनच नाही, तर शरीरही त्या रागाचं रेचन करत असतं. तो राग व्यक्त करून स्वत:ला हलकं करत असतं. दात ओठ आवळले जातात; शरीर लाल होतं; श्वास जलद होतो. शरीर रागाची ऊर्जा मोकळी करत असतं. पण समाज शिकवतो की, राग तर वाईट आहे. त्यामुळे मग तो राग आपण दाबून टाकतो; शरीर जी ऊर्जा सहज प्रकारे मोकळी करत असतं व मन राग व्यक्त करून हलकं होत असतं; ते अडवल्यामुळे ती ऊर्जा आतमध्येच अडकते. त्यातून ब्लॉकेज निर्माण होतात. सर्व ताणांचं हेच आहे. स्त्री- पुरुष आकर्षण तर रागाच्या वेगापेक्षाही मूलभूत आहे. त्यामुळे ह्या आकर्षणाचा जबरदस्त फोर्स असतो. पण निसर्गामध्ये त्याच्या रेचनाचेही मार्ग असतातच. निसर्गाचा मार्ग अडवला नाही, निसर्गाचा क्रम जर योग्य प्रकारे होऊ दिला, तर ह्या आकर्षणाच्या फोर्सच्या जागी परिपक्वता यायला वेळ लागत नाही. अशी परिपक्वता आज आदिवासी समाजांमध्ये दिसते जिथे महिलांवर अन्याय- अत्याचार तर होतच नाहीत; पण महिलांना बरोबरीचं स्थान आहे. बरोबरीचं आहे असं म्हणणंही चूक आहे; तिथे महिला- पुरुष हा वॉटरटाईट फरकच करता येत नाही (शहरी संपर्कातील आदिवासींमध्ये फरक असू शकतील).

स्त्री- पुरूष हेही एकाच अस्तित्वाचे दोन भाग आहेत. त्यामुळे फक्त स्त्री; फक्त पुरुष असा विचारच करता येत नाही. सुख- दु:खावर जर मात करायची असेल तर दोन्हीच्या परे जावं लागतं. 'ग़म और ख़ुशी में फ़र्क ना महसूस हो जहाँ, मै खुद को उस मक़ाम पे लाता चला गया' प्रमाणेच पुरुष- स्त्री हा फरकच राहायला नको. आज काय होताना दिसतं आहे की, स्त्रियांना ३३% किंवा ५०% आरक्षण मिळत आहे आणि स्त्रियांच्या समस्या मांडण्यासाठी स्त्रिया समोर येत आहेत. सुरुवात म्हणून ही गोष्ट चांगली आहे. पण ह्याचा दुसरा अर्थ हाच आहे ना की, पुरुषांना स्त्रियांचे प्रश्न कळतील, ह्यावर आपला विश्वास नाहीय. म्हणून स्त्रियांच्या समस्यांसाठी स्त्रियाच लागतात. आदर्श समाजामध्ये पुरुषांनाही स्त्रियांच्या समस्या कळतील आणि स्त्रियांनाही पुरुषांच्या समस्या कळतील. 'मी- तूपणाची झाली बोळवण' प्रमाणे स्त्री- पुरुष अशी तूतू- मैमै थांबून तिथे एकच सखोल सोबत असेल.

मग आत्ता आपण नक्की काय करू शकतो? पहिली गोष्ट म्हणजे स्वत:मध्ये हे सर्व बघायला पाहिजे. स्वत:चं आत्ममंथन केलं तर त्यातून हे सगळं विष आणि काही अमृत समोर येताना दिसू शकतं. आणि मग आपली अपराध्याकडे बघण्याची दृष्टीही बदलते. अपराधी हा जास्त गंभीर रुग्ण आहे; आपण अपराधी नाही; पण आपणही थोडे रुग्ण तर आहोतच, ही जाणीव होते. दुसरी गोष्ट म्हणजे आत्ता मोठं झालेल्या पिढीवर काम करणं खूप अवघड आहे. किमान आपण नवीन येणा-या पिढीला चांगलं वातावरण देऊ शकतो. म्हणजे शक्य तितक्या प्रमाणात मुलं- मुली एकत्र येतील असा प्रयत्न करू शकतो. आता मुलींच्या शिक्षणाच्या समस्या वेगळ्या आहेत; त्यामुळे काही शाळा फक्त मुलींच्या असणं ही गरज आहे. पण तरीसुद्धा जमेल तितक्या प्रमाणात आपण हे अंतर कमी करू शकतो. त्यासाठी लहान मुलांना बहिण असणं हा एक भाग खूप महत्त्वाचा ठरू शकतो. रक्षा बंधनामागचा खरा उद्देश हा असावा. बहिण हे एक निमित्त- एक माध्यम. त्यातून ही सोबत मिळावी; पोषक वातावरण मिळावं, हा तो उद्देश असावा. आज कित्येक मुलं एकटी वाढत आहेत; अनेकांना भावंडंच नाहीत. त्यामुळे आपण निदान इतकं करू शकतो की, चुलत बहिण/ भाऊ- मामेबहिण/ भाऊ, मानलेला भाऊ/ बहिण ह्यांना तरी सख्ख्या- बहिण- भावासारखी स्पेस देऊ शकतो आणि द्यावीच लागेल. नाही तर पुढच्या पिढीमध्ये ह्या नात्यातला गोडवाच उरणार नाही. आणि बदलत्या समाज- जीवनामुळे ह्या गोष्टी आपोआप होतही आहेत. एकेकाळी ज्या समाजात तरुण मुलं- मुली बोलणं ही एक अतिशय दुर्मिळ घटना होती; तिथे आता मुला- मुलींमध्ये संवाद होतोय. सामाजिक चाको-या मोडत आहेत. पण ह्या बदलांसोबत अनेक विकृत घटकही समोर येत आहेत. त्यांच्यापासून सावधानसुद्धा राहावं लागेल. डोळस राहावं लागेल. . .

******

माझे सर्व लेख इथे एकत्र आहेत.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

एकूण एक मुद्द्याशी सहमत.
मला तरी असे जाणवते की भावना दडपून टाकणारी समाजव्यवस्था निर्माण झाली कारण शारीरिक संबंधातून निर्माण होणारी गुंतागुंत.
शरीरसंबंध ठेवणाऱ्या तरुण मुलामुलींना त्यातून होणाऱ्या संभाव्य परिणामांची जाणीव असेलच असे नाही. परंतु योग्य वयात मुलांना शास्त्रीय शिक्षण दिल्यास हा प्रश्न बऱ्याच अंशी सुटू शकेल.
मुख्य समस्या ही की आपण शारीरिक संबंध पावित्र्याच्या (?) बंधनातून कधी मुक्त करणार ? मुला-मुलींचे; विशेषतः मुलींचे, असे संबंध उघड होतात, अन लगेच त्यांच्यावर बदफैली असल्याचा शिक्का मारला जातो, ज्याचे परिणाम त्याला/तिला आयुष्यभर भोगावे लागतात. मुळात असे संबंध लग्नापूर्वी आले, यात वावगं ते काय? लग्न म्हणजे केवळ एकमेकांबरोबरच्या सहवासाचे प्रतीक आहे, ते असले काय किंवा नसले काय, त्या पूर्वी झाले काय किंवा नंतर झाले काय, याने असा कोणता फरक पडतो ?

दुसरी एक अनुभवातून जाणवलेली गोष्ट म्हणजे जीवनाची दिशा ठरवण्याचा निर्णय आणि अनावर भिन्नलिंगी आकर्षण, या दोन्ही गोष्टी आयुष्याच्या एकाच टप्प्यावर येतात. ज्या वयात मुलामुलींचे मन भावनांच्या लाटांत हेलकावे खात असते, त्याच वेळी त्यांच्यावर स्वतःच्या करिअरबद्दल निर्णय घ्यायची वेळ येते. आजपर्यंतच्या अनुभवातून मला तरी असे वाटते की दोन्ही गोष्टी एकाच वेळी निभावून नेणे बरच अवघड आहे. अशा वेळी मुले बहुदा आकर्षणाचा मार्ग निवडतात, थोडेच जण आकर्षणाला आवर घालतात आणि इतर गोष्टींवर लक्ष्य केंद्रित करतात. मग प्रसंगी मनातल्या भावनांचे दमन करणारे मार्ग ते आपापल्या परीने शोधतात.

सद्यस्थितीत मलातरी या दुसऱ्या समस्येवर जालीम उपाय दिसत नाहीये. Sad

अनेक मुद्दे पटले नाहीत. अत्याचार कमी व्हावेत ह्या भावनेतील प्रामाणिकपणा तेवढा जाणवला.

लेख आवडला... पण इथे मायबोलीवरही वयाचा तो टप्पा पार केलेले साभासदच लिहितात. अगदी त्या वयाचे लोक त्यांचे विचार मांडतील तर !!!!

लेख चांगला आहे.
पण बलात्कार करणार्‍या व्यक्तीची मानसिकता 'सेक्स' पेक्षा 'डॉमिनंस' स्वरूपाची जास्त असते असं मला वाटतं.

कुणावरतरी अधिकार गाजवू शकणे, कुणाचा तरी अपमान करणे, कुणाचा तरी बदला घेणं, कुणालातरी तिची /त्याची जागा दाखवून देणं या गोष्टी शक्यतो बलात्काराच्या मागे असतात.

त्यात स्त्री ही फक्त उपभोगाची गोष्ट आहे. ती आपल्याला नाही म्हणूच शकत नाही अशीही एक मानसिकता असते.

सो, समोरचा पुरुष असो की स्त्री, त्याला मानवतेच्या दृष्टीकोनातून पहावे अशी एक भावना समाजात निर्माण झाली तर बलात्कार/ खून असे प्रकार होणार नाहीत असे वाटते.

साती, आपल्या म्हणण्यात तथ्यांश आहे, पण केवळ सूडाच्या भावनेतून केलेला बलात्कार केवळ स्त्रीचे समाजातील जगणे मुश्किल करण्यासाठी केला जातो, शारीरिक सुखपोटी नाही. पण म्हणून मूळ मुद्दा तोच राहतो, शरीसंबंधाचं पावित्र्याशी जोडलेला संबंध; हेच सूडापोटी केलेल्या बलात्काराचे मूळ कारण होय.
तथाकथित पावित्र्य (?) नष्ट झाल्यामुळे जणू काही आभाळ कोसळले अशा अविर्भावात आपल्या समाजाची वागणूक असते.
जिच्यावर अन्याय झाला तिला आधार द्यायचे सोडून उलट तिलाच बोल सुनावले जातात.
मार्गींनी मांडलेले आदिवासी समाजाचे उदाहरण म्हणूनच मला पटले. तिथे अशा बलात्काराचे प्रमाण जवळजवळ नसावे याचे कारण, एखाद्या स्त्रीचे जीवन निव्वळ नकोशा शरीसंबंधाने उध्वस्त होते, असा विचारच त्या समाजात नाही.

पण बलात्कार करणार्‍या व्यक्तीची मानसिकता 'सेक्स' पेक्षा 'डॉमिनंस' स्वरूपाची जास्त असते असं मला वाटतं>>>>. अगदी....
थोडीफार सहमत Happy

विलभ,
हो. तुम्ही म्हणताय ते ही बरोबरच आहे.
पण मी बलात्कार्‍याची मानसिकता काय असू शकते ते लिहीलंय.
बलात्कारित स्त्रीची आणि इतर समाजाची मानसिकता नक्कीच तुम्ही म्हणताय तशी असते.

>>>मार्गींनी मांडलेले आदिवासी समाजाचे उदाहरण म्हणूनच मला पटले. तिथे अशा बलात्काराचे प्रमाण जवळजवळ नसावे याचे कारण, एखाद्या स्त्रीचे जीवन निव्वळ नकोशा शरीसंबंधाने उध्वस्त होते, असा विचारच त्या समाजात नाही.<<<

लेखामधील अश्याच प्रकारची काही सरसकटीकरणे पटली नाहीत. (हे वर कोट केलेले वाक्य लेखातील नव्हे तर विलभ ह्यांचे आहे, पण उदाहरणादाखल घेतलेले आहे).

केवळ ह्या (विलभ ह्यांच्या) वाक्यावर प्रतिवाद करू पाहत आहे.

आदिवासींपैकी काही वस्त्यांमध्ये संबंधांबाबत मुक्तपणा आढळतो हे खरे असले तरी तेथे बलात्कार होतच नाहीत असे म्हणता येणार नाही. तसेच, 'नकोश्या संबंधाने स्त्रीचे जीवन उद्ध्वस्त होत नाही' ह्याचा अर्थ तेथे नकोसे संबंध सहजपणे स्वीकारले जातात असेही नाही.

आदिवासी समाजात बलात्काराचे कमी प्रमाण ही माझ्या मते अतिशयोक्ती नसावी, कदाचित यामुळे की प्रत्यक्ष माहिती फारशी उपलब्ध नसावी.
आजवर जी माहिती आहे ती discovery किंवा तत्सम माध्यमांमुळेच. अशाच एक माहितीपटात उत्तर-पूर्व भारतातल्या राज्यांविषयी यासंदर्भात माहिती देण्यात आलेली. देशातील सर्वाधिक आदिवासी वस्ती असणाऱ्या या राज्यात महिलांशी निगडित गुन्ह्यांचे प्रमाण सर्वात कमी आढळते (Women Population of North East India: A Study in Gender Geography,पान १३६)

भारतातिल सुसंस्कृत समाजाच्या मान्यता कल्पनाची देणगी आहे दमण करने आणि त्याचे उद्दातिकरण करणे आसाराम सारखे संत म्हणवुन घेणारे बलत्कार सारखे गुन्हे करतात तिथे सामान्य मानसाचे काय.
खुप छान लिहिले आहे एवढे सगळे मुद्देसुद लिहिल्या बद्दल धन्यवाद.

माझा मुद्दा परत एकदा लिहितो..

१४ ते १८ वयात नेमकी मानसिक कुचंबणा ( या बाबतीत ) होते का ? कशी होते ? कुठल्या बाह्य कारणांनी होते ?
त्यांना काय अपेक्षित आहे ? वगैरे आपल्याला त्या वयातील लोकांकडून ( निदान इथे तरी ) समजत नाही.

कदाचित त्या वयातल्या कुणी मोकळेपणी लिहिले तर आपल्यालाही विचार करता येईल, कि नेमके काय बिघडत गेलेय. आपल्याल्या त्या वयात असा कोंडमारा सोसावा लागला होता का ? असल्यास आपण कसा सामना केला. त्या काळात कुणाचा आधार वाटला होता ? तो आजच्या तरुणांना उपलब्ध नाही का ?

या वयातील मूलांना व्यक्त होण्याचा प्रॉब्लेम आहे. म्हणजे वरकरणी ती बडबडी वाटतात, पण मनात काहितरी
दडपून ठेवेलेले असते, असेही वाटत राहते.

दहावीत असतानाची एक अशीच घटना आठवते. मित्राला एक वर्गमैत्रिण खूप आवडायची, पण बोलण्याचा धीर व्हायचा नाही. एके दिवशी त्या मैत्रिणीला आडमार्गाने याची कुणकुण लागली, अन पाठोपाठ शिक्षकांना. मित्राचे लफडे तिथेच आटोपले, पण नंतर शिक्षकांची त्याच्याशी वर्तणूक एक गुन्हेगारासारखीच राहिली. आम्हाला नंतर कळले की त्या मैत्रिणीचा असा समाज झाला होता, की आमचा मित्र तिच्याकडे "तशा" नजरेने पाहतो.
सुदैवाने मित्राने एवढे मनावर घेतले नाही, पण अशा प्रसंगामुळेच मुलामुलीत एकमेकांबद्दल अढी बसते. कदाचित कालपरत्वे मग याचे पर्यवसान सूडात होते. मोकळ्या वातावरणात, जिथे मुलामुलीत संवाद राहील अशा परिस्थितीत अशा घटना कमी होतील.

१४-१८ वयोगटात तसेही शारीरिक आवेग हळू-हळू आपले अस्तित्व दाखवायला सुरू करतो. पण बऱ्याचदा बोलायचीच चोरी, भेटणे आणि इतर शारीरिक संबंध तर दूरची गोष्ट. मग आवेग अगदी अनावर झाला, की मुले आपापले मार्ग शोधतात. एखादा मग अशा विकृतीच्या वाटेवर जातो.

१४ ते १८ वयात नेमकी मानसिक कुचंबणा ( या बाबतीत ) होते का ? कशी होते ? कुठल्या बाह्य कारणांनी होते ?
त्यांना काय अपेक्षित आहे ? वगैरे आपल्याला त्या वयातील लोकांकडून ( निदान इथे तरी ) समजत नाही.
<<

सिम्पल बेसिक ह्यूमन डेवलपमेंटबद्दल वाचन केल्यास याबद्दल थोडी जाणीव होते.

निसर्गतःच टीनेज (थर-टीन पासून नाईन्टीन पर्यंत,) मराठीत पौगंडावस्था (काय पण शब्द आहे!) सुरू झाली, की लहानपणी एकत्र खेळणारी मुले मुली एकमेकांपासून दूर जाऊ लागतात, या वयात मुली मुलिंसोबत, व मुले मुलांसोबत राहणे जास्त पसंत करतात. नंतर लेट टीन्स मधे जेंडर अवेअरनेस येऊ लागतो. व सुमारे १६-१८ च्या वयात पुन्हा मुले मुली एकमेकां जवळ येणे पसंत करतात परंतु याच्यात लैंगिक आकर्षणाचाही भाग असतो.

दरम्यानच्या काळात स्व चा शोध घेणे सुरू झालेले असते. शारीरिक बदलही होत असतात, व स्वतःला एक प्रौढ मनुष्यप्राणी म्हणून एस्टॅब्लिश करण्याचे प्रयत्न सुरू असतात.

या वयातल्या भिन्नलिंगी मुलामुलींना एकत्र राहू दिले, तरीही स्वैराचार होण्याचे प्रमाण भरपूर कमी असते. व्यसनाची जोड लागली तर मात्र हे वाढू शकते.

तरीही एकंदर विचार करू जाता, को-एड स्कूलिंग घेणार्‍या मुला-मुलिंचा स्त्री-पुरुष मैत्रीबद्द्लचा दॄष्टीकोण हा मुले व मुलींच्या वेगळ्या शाळात शिकलेल्या (व घरी/शेजारी समवयस्क भिन्नलिंगी मित्र/मैत्रीण्/भावंड) नसलेल्या मुलांपेक्षा जास्त निकोप असतो, असे म्हणावेसे वाटते.

*

पण बलात्कार करणार्‍या व्यक्तीची मानसिकता 'सेक्स' पेक्षा 'डॉमिनंस' स्वरूपाची जास्त असते असं मला वाटतं
<<

आपल्याकडे सेक्सुअल अ‍ॅक्ट हा संभोग आहे, सम-भोग आहे, ही बेसिक कन्सेप्टच मुलांपर्यंत खुलेपणाने पोहोचवली जात नाही. Our mentality is trained in such a way, that males want to "have" sex, not 'make love'. For them sex is about grabbing pleasure, with or without consent of the female partner.

And at the same time females are warned against each and every male, with a sort of abhorrence towards the sexual act deeply trained into their minds.

दुसरा एक बिनडोकपणा म्हणजे बाई/मुलगी नाही म्हणतेय म्हणजे त्याचा अर्थ 'हो' समजायचा.

तेव्हा माझ्यामते तरी,

अ‍ॅब्सोल्यूट रँडम व्हिक्टीमवर झालेले बलात्कार, उदा. दरोडेखोरांनी/दंगलखोरांनी केलेले- हे मनोविकृती व गुन्हेगारी मानसिकतेतून होत असतात. जे प्रमाण एकूण घटनांच्या २-५%पेक्षा अधिक नसावे. इतर ९५-९८% तरी 'बलात्कार' हे माहितीतल्या व्यक्तीकडून व स्त्री ने त्या व्यक्तीची तथाकथित प्रेमभावना मान्य न केल्याने होतात, असे मला वाटते. यापैकी मोठा टक्का अनरिपोर्टेड असतो. (एक स्वपत्नीवर बलात्कार अशीही कन्सेप्ट लिटरेचरमधे आहे.)

तात्पर्य, पुरुष श्रेष्ठत्व (डॉमिनन्स, BDSM नव्हे. त्यात बहुतेकदा कन्सेसुअलच असते.) सिद्ध करण्यापेक्षा (शरीर)सुख 'ओरबाडूनच' घ्यावे लागते या कल्पनेतून बलात्कार होतो. असे माझे मत आहे.

(बलात्काराच्या काही रिपोर्टेड घटनांत 'लग्नाचे आमिष दाखवून' बलात्कार केला जातो. तो कोणत्या प्रकारात मोडतो याची मला कल्पना नाही.)

अर्थात, याच अर्थाचे मुद्दे लेखात आलेले आहेत, व त्याच्याशी मी सहमत आहे.

लेख आवडला. प्रतिक्रियांमधले डॉमिनन्सबद्दलचे मत पण पटले. हे टाळण्यासाठी लहानपणापासूनच मुलींकडे बघण्याची नजर निरोगी करायला हवी वगैरे मान्य. मला प्रश्न पडलाय तो हा की हे सगळं सुशिक्षित घरांमधे/माणसांमधे सुरू करता येईलही पण समाजाचा जो भाग अशिक्षित आहे त्यांना हे सगळं कसं समजावता येईल?

>>>पण अशी कल्पना करूया की, असा एखादा समाज आहे ज्यामध्ये लहान मुलं- मुली अगदी एकत्र वाढत आहेत. अगदी पाच वर्षांपासूनचे मुलं- मुली एकत्र वाढत आहेत- एकाच शाळेत शिकत आहेत; एकाच हॉस्टेलवर राहात आहेत; एकाच तलावात पोहत आहेत असे. अशा समाजामध्ये व अशा सान्निध्यामध्ये वाढलेले मुलं मुलींवर बलात्कार करतील का? बलात्कार लांबची गोष्ट; ते मुलीची छेड तरी काढतील का? आज आदिवासी समाजामध्ये मुलं- मुली काही प्रमाणात अशाच सान्निध्यामध्ये राहतात आणि तिथे अजिबात बलात्कार किंवा छेडछाड होताना दिसत नाही. कारण छेड तेव्हाच काढली जाते; धक्का तेव्हाच मारला जातो; जेव्हा दोघांमध्ये खूप जास्त अंतर असतं. जर दोघांमध्ये तितकं अंतर सुरुवातीपासूनच नसेल; तर छेड काढण्याचं किंवा धक्का देण्याचं कारणच उरणार नाही. बलात्काराचा तर प्रश्नच उद्भवणार नाही. <<<

व्वा

काय मुद्दा आहे.

हे असे करून बलात्कार थांबतील हे गृहीतक खूप्पच मस्त! आणि सोयीस्कर! आणि सगळ्यांना आवडलेलेही दिसते.

इतक्या बाळबोध पॅरावर सहमत्या येत असतील तर बोलणेच खुंटले.

(असा काल्पनिक समाज निर्माण झाला तर मुलामुलींना एकमेकांबद्दल आकर्षण तरी राहील का, हे लिहायचे राहिलेले दिसते बहुधा)

वाचनाबद्दल आणि इतक्या भरघोस प्रतिक्रियांबद्दल सर्वांना मन:पूर्वक धन्यवाद! मी केवळ एक बाजू/ एक एप्रोच मांडला आहे. आणि त्यावर आलेल्या विभिन्न मतांचं व विविध मुद्द्यांचं स्वागत करतो! धन्यवाद.

>>> विलभ | 20 July, 2016 - 21:25 नवीन

मग बलात्कार नेमके कशाने थांबवता येतील? सौदी अरेबिया सारखे कायदे करून ?
<<<

माझ्या वरील एक दोन प्रतिसादांना उद्देशून हा प्रतिसाद असल्यासः

तो विषय नाही. 'गरज आत्ममंथनाची' जेव्हा म्हंटले जाते तेव्हा प्रत्येक पुरुषाची मानसिकता बदलण्याचे सांस्कृतीक (कपल्ड विथ सरकारी) प्रयत्न व्हावे लागतील. ती लांबलचक प्रक्रिया ठरेल आपल्यासारख्या देशात! एकाच जलतरण तलावात सख्खे भाऊ बहिणही पोहतात. म्हणून भाऊ पुढे जाऊन बलात्कारी होणार नाही असे नाही. आदिवासींमध्ये बलात्कार होत नाहीत हेही एक निव्वळ गृहीत आहे. चार भिंतींमध्ये, आजूबाजूच्या सर्वांना मान्य असलेले संबंध बलात्कार असू शकत नाहीत असे ते गृहीत. खरे सांगायचे तर खरोखरच बलात्कार्‍याला भीतीच वाटायला हवी कायद्याची. त्याशिवाय हे थांबणार नाही. पण आपल्याकडे तसे कायदे होणे अशक्यप्राय आहे. आहेत त्या कायद्यांच्या अंमलबजावणीचा तर बोर्‍याच वाजलेला आहे. त्यामुळे दोन उपाय उरलेले आहेत. जेसुद्धा अशक्यप्रायच आहेत, पण निदान समर्थनीय आहेत.

१. अविवाहीत मुलींना बलात्कार किंवा छेडछाड स्वरुपाचे गुन्ह्यांपासून बचाव करण्यासाठी शस्त्राचा वापर करण्याची परवानगी देणे

२. 'लग्न' हे स्त्रीला बद्ध करते आणि म्हणून मुलीच्या स्वतःच्या मर्जीशिवाय (म्हणजे पालकांनी करवलेल्या) लग्नापासून मोकळे ठेवणे

त्याहीनंतर काही झाले तर कायद्याची कडक अंमलबजावणी होणे अत्यावश्यक आहे आणि तीही वेगात.

एवढे करूनही तान्या बालिका, अल्पवयीन मुली, म्हातार्‍या वगैरे सुटणार नाहीत, हे दुर्दैव! त्यासाठी पुन्हा पहिलाच मुद्दा, 'भीती बसली पाहिजे'! (गुन्हेगाराला)

लेखामागची कळकळ जाणवली. विचार करायला लावणारा लेख आहे. पण 'बलात्कार करणार्‍याच्या आणि बलात्कार होणार्‍याच्या या दोन्ही बाजुंनी हे थोडं ओव्हर्सिंपलीफाईड केलेलं वक्तव्य वाटतंय मला, पर्सनली. सेक्स, इंटेन्स अनकंट्रोल्ड इच्छा हे बलात्कार होण्यामागचं एक कारण असलं, तर शेवटी हा 'पॉवर प्ले' आहे. मुळात अश्या वेळी समोरची व्यक्ती स्त्रीच असायला हवी असंही भान राहत नाही, इतका स्ट्रॉग लेव्हलचा तो 'पॉवर प्ले' होतो.
ज्या व्यक्तीवर बलात्कार होतो, त्या बाजूने योनीसुचितेइतकाच, बळाचा केलेला वापर हा जास्त आणि जास्त काळापर्यंत क्लेशदायक ठरणारा असतो. आणी मग जेव्हा 'मीच का?' हा प्रश्न परत परत पडायला लागतो, तेव्हा त्या दु:खाची ईंटेन्सीटी अधिकच वाढते.
मुळात ज्या व्यक्तीवर बलात्कार झाला आहे, तिनं स्वतःला दोषी न मानणं ह्यासाठी काय उपाय करता येतील याकडे लक्ष द्यायला हवं. माझ्याबाबतीत असं होईल, म्हणून जगण्याचं स्वातंत्र्य गमावणं हा जो उपाय सुचवला जातो, त्याने ह्या अ‍ॅक्ट मधला 'पॉवर प्ले' अँगल अधिकाधिक डॉमीनंट होतो. पण आजूबाजूच्या लोकांनी, समाजव्यवस्थेने 'ज्या व्यक्तीवर बलात्कार झाला आहे' तिला ह्या घटनेच्या गिल्ट मधून, बर्डन मधून बाहेर यायला मदत, सपोर्ट करणं आवश्यक आहे. ह्याने एक तर जास्तीत जास्त केसेस बाहेर येतील, आणि 'माझ्यावर बलात्कार झाला यात माझी चूक नाहीये. त्या घटनेची सर्व नैति/सामाजिक/इमोशनल/फिजीकल जब्बाबदारी/बर्डन मी घेण्याची जरूर नाही' हे कुठेतरी पटवून देणं आवश्यक आहे.
आजवर कायमच 'मी बलात्कार करणार नाही, माझ्या आजूबाजूच्यांना करू देणार नाही' ह्या बाजूने विचार केला गेला आहे. उपाय केले/सुचवले जाताहेत. पण तरीही बलात्कारांचं प्रणाम काही कमी झालेलं नाही. अश्या सध्याच्या परीस्थीतीत 'माझ्यावर बलात्कार झाला तर काय? माझ्या आजूबाजूच्या कोणावर बलात्कार झाला तर काय?' ह्या बाजूनेही विचार /उपाय होणं आवश्यक आहे, असं मला वाटतं.

अजूनही बाजू /मुद्दे आहेत. जसं वेळ होईल तसं लिहिन.

चांगला लेख. अगदी जवळ जवळ सगळेच मुद्दे पटले.

त्यात साती यांचा "मानसिकता 'सेक्स' पेक्षा 'डॉमिनंस' स्वरूपाची जास्त असते" हा मुद्दाही बरोबर वाटतो थोड्या फार प्रमाणात.

रार चे "'माझ्यावर बलात्कार झाला यात माझी चूक नाहीये. त्या घटनेची सर्व नैति/सामाजिक/इमोशनल/फिजीकल जब्बाबदारी/बर्डन मी घेण्याची जरूर नाही' हे कुठेतरी पटवून देणं आवश्यक आहे." हे मतही पटले.

अजुनही आपल्याकडे बलात्कार नाही तरीही नुसती हरॅसमेंट झाली तर ती डोळेझाक करणे किंवा तिच्याकडे विविध कारणांनी लक्ष न देणे - यामध्ये मग भिती वाटणे, आपलीच चूक आहे असे वाटणे, इतकंच आहे ना सगळीकडे होते, माझ्यावर नाही झाली मैत्रिणीवर झाली अशा अनेक कारणांनी त्याची वाच्यता न करता गप्प राहण्यात येते. त्यात माझीच बदनामी होईल अशी भिती अधिक असते. आणि ती मानसिकता बदलली तर बराच बदल घडू शकतो.

रार,

फार पुस्तकी पोस्ट आहे. तुम्ही म्हणता तसे 'तिनं स्वतःला दोषी न मानणं ह्यासाठी काय उपाय करता येतील याकडे लक्ष द्यायला हवं' वगैरे छापील मुद्दे वाटतात. जिथे शिक्षेची भीतीच नाही आणि जिथे बलात्काराची धड व्याख्याच नाही तिथे काय डोंबल होणार आहे? म्हणजे बलात्कार झाले तर झाले, शोषित व्यक्तीने स्वतःला शोषित मानू नये, असे??

आणि आर एम डी ह्यांना तुमची पोस्ट पटली हे छान, पण त्यांची स्वतःची पोस्ट निराळीच आहे. त्या पोस्टचे काय?

त्या त्यांच्या पोस्टमध्ये 'संभाव्य बलात्कार्‍यांचे समूपदेशन' ह्या विषयावर बोलत आहेत. त्यात त्यांनी सुशिक्षित, अशिक्षित हा मुद्दा आणलेला आहे. तुमची पोस्ट त्यांना पटल्यानंतर तो मुद्दा आटोपला असे समजायचे का?

पुस्तकी हे कदाचित माझ्या वापरलेल्या भाषेमुळे असू शकतं. पण माझ्या व्यक्तीगत आयुष्यात मी जेव्हा एकटी जगभरात डोंगर दर्‍यात भटकते, आदिवासींमधे रहायला जाते, गावागावात फिरते त्यावेळी कुठेतरी मी स्वतःला हे सांगत असते. कोणीतरी मला त्रास देईल, बलात्काराची भीती ह्या पायी मी सतत बरोबर पुरुष सोबत घेऊनच सगळीकडे जावं का? मला माझा फ्रीडम आहे की नाही व्यक्ती म्हणून?
हे विचित्र वाटेल वाचायला - पण माझ्यावर बलात्कार झाला तर माझा त्याकडे बघण्याचा स्टँड काय असेल? मी स्वतःला दोषी समजीन का? हे प्रश्न माझे मला विचारून झालेले आहेत. आणि स्वतंत्रपणे जगण्याची इच्छा असणार्‍या प्रत्येक व्यक्तीनं ते कधी ना कधी स्वतःला विचारयाची गरज आहे.

शिक्षा, त्याबद्दलची भीती ह्या सिस्टीमने अ‍ॅड्रेस करायच्या गोष्टी आहेत. कायदा अपुरा आहे, कायद्याचा धाक नाही ह्याची नैतिक जबाबदारी सिस्टीमची, गव्हर्मेंटची आहे. त्याचीही जबाबदारी एक सामान्य व्यक्ती म्हणून मीच का घ्यायची?
ती जबाबदारी सिस्टीमनी उचलायला हवी. आणि तसं करण्यात सिस्टीम जर फेल जात असेल (जी जातेच आहे हे दिसतंय) तर त्या सिस्टीमच्या फेल्युअर नंतरही एक नागरीक म्हणून मी काय करू शकते ही जबाबदारी मी घ्यायला हवी. माझ्या पोस्ट मधे मी त्याबद्दल लिहिलंय.

आणि मायबोलीवर एखादी व्यक्ती ह्या विषयांवर लिहित नाही, बोलत नाही याचा अर्थ ती व्यक्ती एकाद्या विषयाच्या बाबतीत, त्याच्या practical बाजूच्या बाबतीत अनभिज्ञ असेल असं समजणं योग्य नाही. किंवा फ्क्त पुस्तकी, थेअरी विचार मांडतीये असंही नाही. कदाचित अशी एकादी व्यक्ती वर्षानुवर्ष अश्या कामात अ‍ॅक्टीव्ह देखील असू शकते. त्यातल्या अनुभवांतून ती काही मतं/विचार मांडू शकते हे देखील लक्षात घ्यायला हवं.

माझ्या पोस्टमधे मी केवळ एक प्रश्न/शंका विचारली आहे. मला काय काय पटलं ते सांगितलं आहे. अजून मुद्दे वगैरे मांडलेच नाही आहेत तर ते आटोपणार कसे?

>>>सिस्टीमच्या फेल्युअर नंतरही एक नागरीक म्हणून मी काय करू शकते ही जबाबदारी मी घ्यायला हवी.<<<

तुमच्या ह्या प्रतिसादामधील सर्व मुद्यांशी सहमत असूनही असे म्हणावेसे वाटते की सिस्टीम फेल होत असेल तर केवळ स्वतःला शोषित न समजत राहणे हा उपाय नसून असे काही होणारच नाही ह्याची काळजी घेण्यासाठी शस्त्र वापरणे योग्य!

हे सगळे अतिशयोक्त, विचित्र, अकल्पित वाटले तरी घटना टाळण्यासाठी तेच आवश्यक आहे असे वाटते. घटना घडून गेल्यानंतर काय मानसिकता असावी ह्याबद्दल आपण बोलत आहात. घटना घडूच नये ह्याबदल मी! जाणीव आहे, हे सगळे 'जितके लिहायला सोपे' तितके करायला नसतेच. Sad

>>>आणि मायबोलीवर एखादी व्यक्ती ह्या विषयांवर लिहित नाही, बोलत नाही याचा अर्थ ती व्यक्ती एकाद्या विषयाच्या बाबतीत, त्याच्या practical बाजूच्या बाबतीत अनभिज्ञ असेल असं समजणं योग्य नाही. किंवा फ्क्त पुस्तकी, थेअरी विचार मांडतीये असंही नाही. कदाचित अशी एकादी व्यक्ती वर्षानुवर्ष अश्या कामात अ‍ॅक्टीव्ह देखील असू शकते. त्यातल्या अनुभवांतून ती काही मतं/विचार मांडू शकते हे देखील लक्षात घ्यायला हवं.<<<

ओके.

हे सर्कल आहे. घटनेनंतर जर दहशत बसत असेल ( ज्या अर्थाच्या वाक्यने ह्या लेखाची सुरुवात झाले आहे) तर बलात्कार करणार्‍याला , तशी वॄत्ती असणार्‍या माणसाला अजूनच पॉवरफूल वाटण्याची संधी मिळते.
आजवर सगळे उपाय हे बलात्कार होऊ नये, बलात्कारी माणसांची मानसिकता बदलावी, कायदा ह्याच बाजूने केले गेले आहेत. तितकीच जर बाजू असती तर बलात्कारांचं प्रमाण कमी व्हायला हवं. तसं न होता, ते वाढतंय. कारण दुसर्‍या बाजूने विचारच होत नाहीये. एकाद्याच्या योनीसूचीतेचा टॅबू दुसर्‍याला सत्त्ता गाजवायला किती टेंप्ट करतो ह्या मानसिकतेत बलात्काराची मूळं आहेत हे आपण कधी पहातच नाही, आणि पाहिलं तरी मान्यच करत नाही.

Pages