गुपित 'आषाढी'च्या ओढीचे ....

Submitted by अजातशत्रू on 3 June, 2016 - 05:38

माघ वारी होऊन जाते अन पंढरीकडे जाणारा ओघ कमी होत जातो, माघ असेपर्यंत हवेत थोडासा गारवा असतो मात्र फाल्गुन येतानाच उन्हाची चाहूल घेऊन येतो. शेतीत आलेले पीकपाणी किती जमले याचा हिशोब हा महीना देऊन जातो. हळू हळू वस्त्यांवरची कामे उरकली जातात येणारा दिवस उन्ह वाढवतच राहतो त्याची दखल बळीराजा घेत राहतो. फाल्गुन सुरु झाला की वसंत ऋतूचे आगमन झालेले असते अन निसर्गाला उधाण आलेले असते पाने फुले अपार रंगून गेलेली असतात, रंगांची - गंधाची उधळण मन मोहून टाकते ! फाल्गुनातल्या अमलकी एकादशीला उन्हात देखील बऱ्यापैकी गर्दी पंढरीत गोळा होते तिच्यात देखील वसंताचे उधाण बघायला मिळते. सुसह्य असणारे ऊन आणि झेपेल अशी गर्दी यातून वाट काढत ही एकादशी निघून जाते. मराठी वर्षातल्या अखेरच्या महिन्यातले सण पुढ्यात येतात, रंगपंचमी अन होळी ! आजकाल पाण्याची फारच ओढाताण वाढल्यामुळे ग्रामीण भागात लहान मुले वगळता मोठी माणसे अपवादानेच रंगपंचमीचा आनंद लुटताना दिसतात. निसर्गाने उधळलेले रंगच काय ते डोळ्यात साठवण्यात गावाकडची माणसे धन्यता मानतात, पिचकारीतून वा डब्यातून बादलीभर रंग एकमेकाच्या अंगावर ओतण्याचे दिवस गावाकडे कधीच ओसरले आहेत. उरल्या आहेत त्या चिंब भिजून गेलेल्या रंगपंचमीच्या कोरडया आठवणी ! आता असते कोरडी रंगपंचमी, नाही म्हणायला लहान पोरे मात्र रंगात न्हाऊन निघतात. होळीचा सण झाल्यावर येणारी धुळवड मात्र बेजान झालेल्या गावात नवा जीव ओतायचा प्रयत्न करते ! धूळवडीच्या दिवशी पीक हाती न आल्याचे दुःख माणसे विसरतात, विहिरी तळाकडे गाळात रुतत चालल्याचे शल्य बाजूला सारतात, मातीला पडत चाललेल्या भेगा नजरेआड करतात, कणगीतले धान्य खाली चालल्याचे आपल्या पोटात ठेवतात अन मातीशी एकरूप होतात ! आदल्या दिवशी पेटवलेली होळीची धग आता कमी झालेली असते अन त्यात लोक पाणी आणून तापवतात, त्या पाण्याने घरातली म्हातारी माणसे अन पोरेबाळे अंघोळ करतात. दिवस चढत जाऊ लागला की त्या राखेत थोडे थोडे पाणी सांडून अन काही मुद्दाम ओतून त्याचा चिखल तयार होतो ! एकेक करून माणसे पोरे त्या चिखलात लोळवली जातात. मातीने कितीही छळले, कितीही वेळा दुष्काळाचे आईने दाखवले तरीही हे भूमिपुत्र धूळवडीला मातीला अंगाखांद्यांवर खेळवून तिच्यावरचे प्रेम व्यक्त करतात. तिच्यात न्हाल्याशिवाय वर्ष संपू शकत नाही अशा भावना या धुळवडीतून प्रकटतात !

फाल्गुन संपला की उत्तरायण निम्मे सरते ! राहिलेले उत्तरायण चैत्र, वैशाख अन ज्येष्ठाकडे डोळे लावून बसते, तर वय झालेली, अंथरुणाला खिळून असलेली गावाकडची साधीभोळी माणसे मनातल्या मनात राहिलेल्या उत्तरायणात तरी आपल्याला पांडुरंगाच्या चरणी कायमचे लीन करावे यासाठी प्रार्थना करू लागतात. चैत्राची सुरुवातच गुढीपाडव्याने होते, पूर्वी या सणांत एक जोश होता तो आता लुप्त झाला आहे. आता जास्त करून एक परंपरा, एक रिवाज, एक औपचारिकता म्हणून हा सण साजरा होतो ! चैत्रात नवी पालवी फुटते, नवे धुमारे फुटतात. नवनिर्मितीचा हा महिना बळीराजाला सर्वात जास्त कोडयात टाकतो. कारण या महिन्यात पडणारे ऊन आणि सरत चाललेला पाणीसाठा याचा नेमका अंदाज अजूनही कुणाला बांधता आला नाही ! आडाखे बांधून पुढच्या कामांची दिशा ठरवावी लागते. या ठरवलेल्या बेतांवर वळवाचा एखादा पाऊस कधी पाणी फिरवतो तर कधी एखादी गारपीट पाठ सोलून काढते अन त्याचे वळ पोटावर उठतात. चैत्रातला बहर हाच काय तो थोडासा दिलासादायक असतो. या धकाधकीत चैत्री एकादशी येते आणि इंग्रजी वर्षातली पहिली वारी पार पडते. बळीराजा पांडुरंगाला सगळी हकीकत ऐकवतो. वारी सरते, गावगाडा चालूच असतो अन सृष्टीचक्रही सुरु असते. पुढे उन्ह वाढत जातात अन झाडांच्या पानोपानी सृष्टी नव्या पालवीचे गीत गाते. मंतरलेल्या चैत्रबनाची उभारी जगणं थोडंफार सुसह्य करते. चैत्र संपतो आणि शेतकरयाची अग्निपरीक्षा घेणारा वैशाख येतो. वैशाखात अंगाची लाहीलाही होत राहते आणि मातीच्या देहाची होरपळ सुरु होते.

मातीतले पाणी हळूहळू खोल जाते आणि सदासर्वदा डोळ्यात पाणी दाटून येऊ लागते. भर उन्हाळ्यात जगवलेली पिके कधी आधार देतात तर कधी देशोधडीला लावून जातात, शेतकरी सैरभैर होऊन जातो. कुणाचा उभा ऊस पाण्यावाचून करपून जाऊ लागतो तर कुणाची डाळींबाची बाग तेल्याच्या घशात जाते. पिके जळून जाऊ लागतात. तरीही बळीराजा आशा सोडत नाही, मनातल्या गाभाऱ्यात असणारया पांडुरंगाचा तो धावा सुरुच ठेवतो, विठूराया कधी ऐकतो तर कधी नवा धडा शिकवतो ! अखितीला आंब्याची पूजा होते अन आमरसाची ओठावरची चव बळीराजाचे दुःख काही काळासाठी का होईना हलके करून जाते.आजकाल तर पहिल्यासारखे झाडेच्या झाडे आंब्यांनी लगडलेली नसतात. आंब्यांला आलेला भरगच्च मोहोर गारपीटीत तर कधी वारया वावधानात झडून जातो. नावापुरता थोडासा मोहोर राहतो अन तोही नीट अंग धरत नाही. अक्षय तृतीया झाली की वैशाखवणवा कधी संपेल याची सारी सृष्टी वाट बघत असते. जनावरांचा चारा संपू लागतो, घरातले धान्य तळाशी जाते अन मग सुरु होते जीवाची उपासमार ! मग माणसे मिळेल त्या कामावर जातात, पंचक्रोशीत कुठे जनावरांच्या छावण्या सुरु असल्या तर घरटी एखाद दुसरे माणूस त्या मुक्या जीवासंगे छावणीत जाऊन राहू लागतो.

ज्येष्ठ मास येतो अन अधूनमधून शिरवळ यायला सुरु होते. आपल्या शेत शिवारापासून दूर गेलेल्या शेतकऱ्याची पावले पुन्हा एकदा रानाकडे वळू लागतात. आपल्या घरधन्याची कुतरओढ घरातल्या बायका बघत असतात, त्याची आपल्या कुटुंबासाठी आपल्यासाठी चाललेली जगण्याची लढाई बघून त्यांचा जीव हरखून जातो अन वटसावित्रीच्या पुनवेला ह्या भोळ्याभाबडया बायका आपल्याला जन्मोजन्मी हाच पती लाभावा म्हणून वडाच्या झाडाला पूजतात. बायका वडापाशी येऊन त्याच्या बुंध्याला धागा बांधताना आपलं हितगुज त्याच्या कानाशी करतात, आपल्या धन्याचे हाल सांगतात. काळजाच्या आतनं आलेल्या ह्या गोष्टी वडाला घायाळ करून जातात, भूमिपुत्राचे हाल वड आधी ढगांच्या कानी घालण्यासाठी आपल्या पानाफांदयातून वरपर्यंत घेऊन जातो, बेपर्वा झालेले ढग त्याला दाद देत नाहीत तेंव्हा वड नाराज होतो अन आपलं गाऱ्हाणं मातीपाशी करायचं ठरवतो. आपल्या पारंब्यातून मातीकडं सांगावा धाडतो. आपल्या भूमिपुत्राचे हाल ऐकून मातीचा जीव कासावीस होऊन जातो. माती तापत जाते, इतकी तापते की तिच्यावर पाय ठेवला तर भाजून निघावे. आपल्या पोराबाळांच्या आबाळीने संपप्त झालेल्या मातीचे हे रूप क्रोधित दुर्गेसारखे असते. सगळ्या आसमंतात असेल नसेल तितके बाष्प गोळा होत जाते अन वळवाचा पाऊस चांगलीच हजेरी लावून जातो. आयाबायांच्या डोळ्यात बऱ्याच दिवसांनी आनंदाश्रू तरळून जातात. मातीला जरा हायसे वाटते. बळीराजालाही हायसे वाटते. गावाकडची माणसं या काळात थोडी गोंधळून गेलेली असतात. पावसाचा अंदाज बांधण्यास सुरुवात होते अन मनाचा हिय्या करून शेतकरी ज्येष्ठ महिन्याचा पहिला पंधरवडा संपला की काळजावर भला मोठा दगड ठेवून पुन्हा एकदा शेतीचा डाव मांडतो ! त्यासाठी आधी तो विठूरायाला आपलं साकडं घालतो. त्याची वारी चालू ठेवण्याचे अभिवचन देतो, त्याबदल्यात तो काही मागत नाही. मातीची कूस उज्वायसाठी त्याची करुणा भाकतो. पंढरीत विटेवर हात ठेवून उभा असलेला विठोबा सारया चराचरात प्रकट होत असतो मात्र तो वारकऱ्यांना जाणवत राहतो, त्यांना कुठल्या न कुठल्या रुपानं भेटत राहतो. या भेटीचा बळीराजा काय तो अर्थ काढतो अन मातीचं देणं फेडण्यासाठी कामाला लागतो

ग्रामीण भागात आजही 'मृगाची पेरणी...धनधान्य देई...' या परंपरागत समजुतीसोबत 'सत्ताविसातून नऊ वजा केले तर शून्य येते,' असेही म्हटले जाते. शेतकऱ्यांचे हे पारंपरिक गणित अगदी अचूक असते. शेतकऱ्यांच्या पारंपरिक समजुतीनुसार एकूण सत्तावीस नक्षत्रांतून पावसाची नऊ नक्षत्रे कोरडी गेली, तर दुष्काळ पडतो. याउलट हीच नऊ नक्षत्रे व्यवस्थित बरसली, तर मात्र अन्नधान्याची संपन्नता येते. साधारणपणे जूनच्या पहिल्या आठवड्यात भारतात मान्सून दाखल होतो आणि तो दाखल झाल्यावर भारतभरात आनंदाचे वातावरण होते. एप्रिल-मेमध्ये उन्हाच्या तडाख्यातही शेतकरयाने शेतजमिनीची थोडीफार मशागत केलेली असतेच. डोळ्यात पाणी आणून शेतकरी मृगाची वाट बघतो. नक्षत्राचा पाऊस चांगला झाला तर मृगातच जूनच्या पहिल्या पंधरवड्यात पेरण्या होतात. गावाकडे मे महिन्याच्या मध्यापासून जूनच्या पाहिल्या पंधरवड्यापर्यंत प्रत्येक गावात सुतार शेतीची अवजारे तयार करण्यात मग्न असतो. सुताराच्या दारात तिफण करून घेण्यासाठी शेतकऱ्यांची गर्दी दिसते. त्यासाठी लागणारे साहित्य लोहाराकडून आणले जाते. गावातल्या मातंगवाड्यात दोरखंड वळण्याचे काम जोरात सुरू असते. ही सगळी कामे फक्त मृगाच्या आगमनावर अवलंबून असतात. गावगाडा चालतो तो या पावसाच्या जोरावर आणि बळीराजाची धारणा असते की पंढरीचा आपला सावळा देव हे चक्र हाकत असतो. डोळ्यात साठवलेल्या विठूच्या रुपाची आता गावाकडच्या माणसांना ओढ लागून राहते. तो कामे पटापटा उरकू लागतो. बी-बियाणांसाठी खेडोपाडी भरणारे आठवडा बाजार गजबजून जातात. त्यामुळे बलुतेदारांसह, बाजारहाट, अलीकडे औषधांची- खतांची दुकानेही गजबजून जातात.

पिके चांगली आली तरच शेतकऱ्यांच्या चेहऱ्यांवर आनंद ओसंडून वाहत असतो. शेतकऱ्यांच्या हातात पैसा पडण्याची शक्यता निर्माण होते आणि त्यामुळेच विविध सणही उत्साहात साजरे होतात. शेतीत वर्षभर राबणाऱ्या बैलाची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी शेतकरी बैल पोळा सण साजरा करतात. मग पाठोपाठ आपले विविध सण येतात. त्या दरम्यान शेतीचे उत्पन्न चांगले झाल्याने खरीप आणि रब्बी पिकांचे पैसे शेतकऱ्यांकडे आलेले असतात. मृगाच्या आगमनापासून ते हस्ताच्या मोत्यापर्यंतच्या कामगिरीवर पुढच्या वर्षीचे गणित अवलंबून असते ! या पावसाची समाधानकारक हजेरी लागली नाही, तर मात्र शेतकरी चिंतातूर होतो. दुष्काळाचे सावट गडद होते. खरिपाच्या पेरण्या होत नाहीत, राने कोरडी पडतात. जनावरांच्या चाऱ्यांचा प्रश्न भेडसावायला लागतो. पाणीटंचाई गंभीर रूप धारण करते. अन्नधान्याचे दर वाढतात. शेतीचे एक उत्पन्न गेले तर शेतीचा खर्च भागविणे शेतकऱ्याच्या हाताबाहेर जातात. गावगाडा ठप्प होतो. छोटा शेतकरीच नाही तर अगदी मोठी शेती, बागायत असणारा शेतकरीही अडचणीत येतो. तरुण, शेतमजूर आणि शेतकरी मोठ्या प्रमाणावर बेरोजगार होतात, अशा अवघड परिस्थितीतच दुष्काळ जाहीर करण्याची मागणी व्हायला लागते. बेरोजगारांचे तांडे शहराकडे धाव घेऊ लागतात. त्यामुळे खेड्यापासून शहरापर्यंतची अर्थव्यवस्था दुर्बल बनते. गेल्या काही वर्षांमध्ये शेतकऱ्यांनी केलेल्या आत्महत्या म्हणजे पाऊस लांबल्याने, त्याने दडी मारल्याने गेलेले बळीच आहेत. पाऊस ठीक तर गावगाडा नीट आणि गावगाडा नीट तर आर्थिक गणित व्यवस्थित असे हे गणित असते ! त्यामुळे हा पाऊस वेळेत आणि चांगला झाला तरच शेतकरी, खेडी, आणि पर्यायाने अर्थव्यवस्थेला हत्तीचे बळ मिळते...जरतरचा हा पाठशिवणीचा खेळ बळीराजाची पाठ कधीच सोडत नाही त्यामुळे आपल्या मनातले हे मणामणाचे ओझे शेतकरी साहजिकच विठूच्या चरणी ठेवतात.

चैत्र वैशाख ज्येष्ठ यांच्या रानजाळात बळीराजा पुरता कातावून गेलेला असतो. त्याच्यापुढे सर्व प्रश्नांची उत्तरे घेऊन जेंव्हा आषाढ येतो तेंव्हाच आषाढाच्या मध्यात येते आषाढी वारी ! या वारीनंतरच रोरावणारा पाऊस येतो जो मातीच्या कुशीतल्या बीजांचे अंकुर फुलवून जातो. ऊनपावसाच्या खेळाच्या ऐन मध्यात आषाढी वारी येते अन या काळात घडणाऱ्या निसर्गचक्रावरच बळीराजाचा जीवनगाडा अवलंबून असल्याने या वारीला शेतकरी अनन्यसाधारण महत्व देतो. खरे तर तो चैत्री वारीपासूनच हवालदिल झालेला असतो पण चेहऱ्यावर तसे काही दाखवत नाही. त्यामुळे या आषाढीची ओढ सर्वांत जास्त असते, शेतकरी आपलं मशागत केलेलं शेतशिवार टाकून जेंव्हा विठूच्या भेटीस येतो तेंव्हा त्याला विठूच्या तृप्त झालेल्या चेहऱ्यात आपले हिरवेकंच झालेले शेत दिसते. त्याचा जीव पुरता खुलून जातो अन वारीचे उधाण त्याच्या नसानसांत भिनते ! वारीच्या निमित्ताने आपली दुःखे हलकी करायला आलेल्या वारकऱ्यांचे समाधानाने फुललेले चेहरे पाहून पांडुरंग धन्य होतो, सुखावतो. विठूकडे आलेल्या या लेकरांचे त्याच्याशी असणारे हे नाते भावभक्तीपेक्षाही एक अनोख्या परस्परासाक्तीचे असते. मायलेकराचे हे नाते असते म्हणूनच सगळी वारकरी मंडळी विठोबाला माऊली असं संबोधतात !

'विठुमाऊली तू माऊली जगाची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा
काय तुझी माया सांगु शिरीरंगा
संसाराचि पंढरी तू केली पांडुरंगा
डोळ्यांतून वाहे माय चंद्रभागा
अमृताची गोडी आज आलीया अभंगा
विठ्ठला पांडुरंगा
अभंगाला जोड टाळचिपळ्यांची
माऊलीत मूर्ति विठ्ठलाची, विठ्ठला मायबापा...'
असं एकमेकाशी तादात्म्य पावलेलं हे नातं त्यामुळं अधिकच घट्ट होत जातं, आषाढी वारीला आलेला वारकरी तृप्त मनाने गावाकडे परतीच्या प्रवासाला निघतो तेंव्हा पंढरीतला विठ्ठल या सर्वांच्या शेतशिवारात नानाविध कामं करत असतो, तो कधी वरुणराजाला दावणीला जुंपतो तर कधी वारयावावधानाला कोंडून ठेवतो तर कधी वाफ्यातल्या पाण्यात लोळतो तर कधी दंडातल्या पाण्यासोबत वाहत जातो, विहिरींच्या झरयात झिरपत राहतो, गोठ्यातल्या गायीच्या डोळ्यात साठत जातो तर कधी शेवरीसोबत रानभर फिरत राहतो, उसाच्या फडात हरवून जातो, भाजीपाल्याच्या पेंडयात गुंतवून घेतो तर कधी नांगराच्या फाळाशी रुतून बसतो तर कधी पाभरीच्या तळातून ओघळत राहतो, बांधावरच्या झाडांच्या सावलीत ताणून देतो तर कारभारणीच्या डोईवरच्या दुरडीत डोकावून बघतो, पानाफुलांच्या आड लपतो, कधी गंमत म्हणून कुसळीच्या रूपाने तळपायात घुसतो ! तो चंद्रमौळी घराच्या पत्र्यातून ओलेत्या डोळ्याने आपल्या लेकरांचा संसार न्याहाळतो, गावातल्या देवळात विराजमान असणारया आपल्या मुर्तीरुपास आलिंगनही देऊन येतो, तिथल्या शिखराभोवती रुंजी घालतो, गावकुसात वाऱ्याबरोबर सैर करून येतो,चावडीवरच्या सुखदुखाच्या गप्पा ऐकून येतो, पारावरच्या थकलेल्या तळहातांना आपल्या गाली लावून येतो, ऐन्यात न बघता कुंकू लावणाऱ्या सवाष्णीच्या कपाळाचे चुंबन घेऊन येतो, पोराबाळांच्या बरोबर आट्यापाट्या खेळतो, तो अंगात उधाण आल्यागत दिवसभर सर्वत्र घुमत राहतो, सांज होताच निळाईच्या पायथ्याशी बाजेवर पडून रुखमाईला सांगतो की, "मी इथे इतका खुश आहे की माझ्यासाठी हेच कैलास आहे, हेच वैकुंठ आहे, हाच स्वर्ग आहे, हेच तिन्ही लोक आहेत, इथली सारी लेकरे आपली जन्मजन्माची आप्तं आहेत !"

बळीराजाची झोळी यंदातरी भरली जावी अन काळ्या आईला हिरवा शालू चोळी मिळावा हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना...

- समीरबापू गायकवाड.

http://sameerbapu.blogspot.in/2016/04/blog-post_18.html
vithoba.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

खुप मस्त लिहलयं माऊली Happy

बळीराजाची झोळी यंदातरी भरली जावी अन काळ्या आईला हिरवा शालू चोळी मिळावा हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना... +१११११११११११११११११

खूपच छान लेख!
असं एकमेकाशी तादात्म्य पावलेलं हे नातं त्यामुळं अधिकच घट्ट होत जातं, आषाढी वारीला आलेला वारकरी तृप्त मनाने गावाकडे परतीच्या प्रवासाला निघतो तेंव्हा पंढरीतला विठ्ठल या सर्वांच्या शेतशिवारात नानाविध कामं करत असतो................................................सांज होताच निळाईच्या पायथ्याशी बाजेवर पडून रुखमाईला सांगतो की, "मी इथे इतका खुश आहे की माझ्यासाठी हेच कैलास आहे, हेच वैकुंठ आहे, हाच स्वर्ग आहे, हेच तिन्ही लोक आहेत, इथली सारी लेकरे आपली जन्मजन्माची आप्तं आहेत !" >>>>>>>>>अप्रतिम!!!!!!!!!

बळीराजाची झोळी यंदातरी भरली जावी अन काळ्या आईला हिरवा शालू चोळी मिळावा हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना... >>>>>>१११११११११११११११११११११११

समीर तुम्ही अप्रतीम आणी हृदयस्पर्शी लिहीता. गावाकडले लिहीत रहा आणी गाव ते गावच. कितीही शहरात राहीलो तरी गावाकडचा नैसर्गीक शुद्ध वारा/ हवा, निर्मळ मने खचीतच अनूभवायला मिळते. मी अगदी लहानपणी सोलापूरला आले होते. माझ्या आईचे मामा ( श्री. देशपांडे ) तिथे रहायचे. आता बहुतेक तिथे कोणी नाही. नंतर बर्‍याच वर्षांनी अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांचे दर्शनासाठी आलो होतो तेवढेच. पंढरपूरला तर अजून जाणे झालेले नाहीये, योग येईल तेव्हा जाणारच.

बळीराजाची झोळी यंदातरी भरली जावी अन काळ्या आईला हिरवा शालू चोळी मिळावा हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना...>>>>>> आमेन! तथास्तू ! शुभं भवतु!

-

तुमचा लेख वाचून गावाची इतकी आठवण आली....
खरंच शेतकऱ्यांवर देवाची कृपा होवो. Ultimately ती आपल्यावर पण कृपाच असेल.

सुरेख लिहलयं Happy
बळीराजाची झोळी यंदातरी भरली जावी अन काळ्या आईला हिरवा शालू चोळी मिळावा हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना... > +१

आवडला लेख.

बळीराजाची झोळी यंदातरी भरली जावी अन काळ्या आईला हिरवा शालू चोळी मिळावा हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना... > +१

समीरजी,
वाचून अंगावर रोमांच आणि डोळ्यांत पाणी तरळले. खूपच ह्रदयस्पर्शी !! खेड्यातली पार्श्वभूमी असल्यामुळे अधिकच भिडला. माझी आई वयाच्या सत्तरीतही पंढरपूरची वारी चुकवत नाही. अप्रतिम लेख!

खूप सुरेख लिहलयं!!
अगदी मनातलं...

बळीराजाची झोळी यंदातरी भरली जावी अन काळ्या आईला हिरवा शालू चोळी मिळावा हीच पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना...>>>>>> +१

मृगाच्या आगमनापासून ते हस्ताच्या मोत्यापर्यंतच्या >>>>

ते स्वातीच्या मोत्यापर्यंत म्हणायचयं का? मोती स्वातीच्या पावसाने शिंपल्यात तयार होतात असे म्हटले जाते!
'पडतील स्वाती तर पिकतील मोती' अशी एक म्हण पण आहे! Happy

आणि स्वातीचा पाऊस चांगला झाला तर गहू हरभर्‍या सारख्या रब्बी पिकांनाही फायदा होतो कारण नंतर केवळ थंडी जेवढी जास्त तेवढे ती पिके चांगली येतात!