सहिष्णु - असहिष्णु

Submitted by धनंजय भोसले on 30 November, 2015 - 04:24

परवा 'टीम लंच' साठी ऑफिस पासून जवळच असलेल्या हॉटेल मध्ये गेलो. शुक्रवार असल्याने आधीच सर्वजण वीकेंड मूड मध्ये आणि त्यात टीम लंच म्हणजे पर्वणीच..! पंधरा जणांची आमची टीम. म्हटले तर छोटी म्हटले तर मोठी. या टीम मध्ये मी नवीनच असल्याने ठराविक जणांशीच ओळख. टीमसोबत चांगल्या हॉटेलमध्ये कंपनीच्याच खर्चाने जेवायला जाणे, मौज-मजा करत वेगवेगळे मेन्यु टेस्ट करणे म्हणजे एक एंजॉयमेंट असते.

१५ जणांच्या टीम मध्ये एक जण दिसायला वेगळा. साधारण सहा फुट उंची, वीतभर वाढवलेली दाढी, सुरमा लावल्याने काळ्या झालेल्या डोळ्यांच्या कडा आणि डोक्यावर सफेद रंगाची गोल टोपी. साधारण बावीस-तेवीस वर्षांचा हा तरुण इतर टीम मेंबर्सपेक्षा दिसायला निश्चितच वेगळा. टीममधे नविनच जॉइन झालेला. थोडसा अबोल, प्रसन्नचित्त, सात्विक आणि हसरा चेहरा असलेला हा तरुण म्हणजे असिफ..!

सर्वजण टेबलावर येणाऱ्या मेन्यूजचा आस्वाद घेत होते. त्या लज्जतदार मेन्युजमुळे खाण्यात एक वेगळीच मजा येत होती आणि प्रत्येकजण हास्य-विनोदात रमला होता. अचानक वीकेंडला कोण-कोण कुठे-कुठे जाणार आणि काय-काय करणार याची चौकशी सुरु झाली. सगळ्यांचे प्लान्स सांगून झाल्यावर असिफने सुद्धा तो आज संध्याकाळच्या एस.टी. ने त्याच्या घरी म्हणजे औरंगाबादला जाणार असल्याचे सांगितले. औरंगाबाद हे नाव ऐकताच एक टीममेट क्षणाचा देखील वेळ न दवडता असिफकडे पाहून म्हणाला, "औरंगाबाद नाही... संभाजीनगर..!"

त्याचे हे बोलणे ऐकून लंच टेबलवर क्षणभर शांतता पसरली. प्लेट्मधील अन्न प्लेट्मधे, चमच्यातले अन्न चमच्यात आणि तोंडातले अन्न तोंडातच ठेऊन सर्वजण एकमेकांकडे आणि नंतर असिफकडे पाहू लागले. मात्र चेहऱ्यावरची प्रसन्नता आणि हास्य जराही विचलित न करता असिफ अंदाज घेत सावरून म्हणाला, "संभाजीनगर तो संभाजीनगर... अपनेको क्या फरक पडता है..!!"

मी मात्र असिफ च्या उत्तराने व्यथित झालो. मुळात चार-चौघात असे लंच टेबलवर त्याला अथवा कुणालाही 'औरंगाबाद कि संभाजीनगर' हा प्रश्न विचारणे मला गैर वाटले. औरंगाबाद हा केवळ ५ अक्षरी शब्द नसून त्यामागे जोडलेल्या मानवी भावना असू शकतात याचा आपणाला विसर का पडावा..?

तसा माझा आणि औरंगाबादचा दुरान्वयेही संबंध नाही. माझे गाव पश्चिम महाराष्ट्रात. सगळे पै-पाहुणे देखील पश्चिम महाराष्ट्रात. औरंगाबादला कामानिमित्तही कधी येणे-जाणे नाही. आत्तापर्यंत १-२ वेळा औरंगाबादला जाणे झाले तेही केवळ पर्यटनासाठी. मग असिफला विचारल्या गेलेला 'औरंगाबाद कि संभाजीनगर' हा प्रश्न अप्रस्तुत का वाटवा..?

या प्रश्नाचे कारण शोधता शोधता मन थेट भूतकाळात गेले. हायस्कूलला असताना शैक्षणिक सहलीनिमित्त औरंगाबाद शहर आणि जिल्हा पाहण्याचा योग आला होता. त्याआधी औरंगाबाद म्हणजे महाराष्ट्रातील एक जिल्हा आणि ते आपल्या गावाहून फार-फार लांब आहे एवढीच काय ते माहिती. औरंगाबाद म्हणजे काहीतरी हिरवे आणि आपले गाव म्हणजे भगवे असले काही शाळेत शिकवलेले नसल्याने औरंगाबाद हे नाव तेव्हा सुद्धा छानच वाटायचे आणि अजुनही वाटते.

औरंगाबाद हे नाव कुठून आले आणि का आले असले प्रश्न न पडता आम्ही विद्यार्थ्यांनी तेव्हा औरंगाबाद, पैठण, वेरूळ,खुलताबाद, अजिंठा, दौलताबाद यांसारख्या ऐतिहासिक स्थळांना दिलेली भेट अजुनहि आठवते. दौलताबादचा देवगिरी किल्ला पाहताना विस्फारलेले डोळे, विस्मयचकित होउन पाहिलेल्या वेरुळच्या लेण्या व घृष्णेश्वर मंदिर. अजिंठ्याचे जगप्रसिद्ध लेणे आणि त्यातील चित्रांची मोहमय दुनिया पहताना मिळालेली मन:शांती. लेण्यांशेजारून वाहणारी निर्मळ नदी आणि तीवर असलेला पांढराशुभ्र धबधबा पाहताना झालेला अवर्णनीय आनंद. पैठणचे नाथमंदिर, गोदावरी नदीवर बांधलेले धरण आणि त्याच्या पुढे पसरलेला अवाढव्य नाथसागर जलाशय पाहून प्रसन्न झालेले मन. धरणाच्या पायथ्याशी असलेले उद्यान आणि त्यात असलेले म्युझिक फाउंटन पाहून डोळ्याचे फिटलेले पारणे. औरंगाबाद शहरातील बीबी-का-मकबरा आणि पाण्यावर चालवली जाणारी आटे कि चक्की पाहताना इतिहासात डोकावण्याची मिळालेली संधी. औरंगाबादच्या रस्त्यांवर मिळणारे चविष्ट रोट खाऊन भागवलेली भूक. कधीही न पाहिलेले परदेशी लोक आम्ही औरंगाबादच्या सहलीत मात्र मोठ्या प्रमाणात पाहिले. काहीतरी प्रेक्षणीय असल्याशिवाय जगभरातील पर्यटक नक्कीच औरंगाबादला येत नसणार. हे सगळे अनुभव आठवल्यावर 'औरंगाबाद' या नावामुळे तिथल्या प्रेक्षणीय स्थळात काही बदल होणे दुरापास्त वाटते.

असे असताना एखद्याच्या जात-धर्म-पंथावरुन त्याची टिंगल-टवाळी करणे किंवा टोचुन बोलणे मला बरोबर वाटले नाही. आपण जिथे जन्मलो त्या गावाशी आपली नाळ आपोआप जोडली जाते. त्या गावाचे-शहराचे नाव बदलले जाणे हे कुणालाही क्लेशकारकच वाटत असणार. मग तो कोणत्याही धर्माचा-जातीचा किंवा पंथाचा असो. आपण ज्या शहरात राहतो अथवा ज्या पेठेत राहतो त्या पेठेचे नाव बदलण्याचा विचार मनात आणून पहिला तरी या विषयाची दाहकता मनाला स्पर्शून जाते आणि मग असिफला असा प्रश्न विचारणे हे सहिष्णु कि असहिष्णु याचे उत्तरही आपोआप मिळते...!!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

असे प्रसंग, तेही मुस्लिम मित्रांच्याच बाबतीत घडलेले माझ्याही अनुभवात आहेत. अचानक ऑक्वर्ड सिच्युएशन येते. काहीतरी बोलून हसण्यावारी नेणे किंवा विषय बदलणे असे काही केविलवाणे उपाय हाताशी असतात आणि ते वापरावे लागतात.

मुळात दोन्ही बाजूच्या बहुतेकांना असे रिमार्क्स आवडत नसतातच. कोणीतरी एखादा बिनडोक मनुष्य असे अविचारी ताशेरे ओढतो. पण आताची परिस्थिती अशी आहे की एवढ्यातेवढ्यावरून कोणाची धार्मिक, जातीय, राजकीय अस्मिता कधी फडफडेल आणि त्याच्यातला विवेक कधी आचके देईल ते सांगता येत नाही. त्यामुळे अश्या गोष्टी घडल्याच तर सौम्यपणे आणि मैत्रीपूर्ण हसत हसत थोडे स्पष्ट बोलावे लागते की:

"अरे यार हे संभाजीनगर, औरंगाबाद वगैरे सगळे वाद ठीक आहेत, पण आत्ता ह्या ग्रूपमध्ये कशाला पाहिजे हा विषय" वगैरे!

बाकी मुसलमान आणि इतरही निकषांप्रमाणे जे अल्पसंख्यांक असतात त्यांना घरूनच प्रशिक्षण मिळालेले असते की असा काही मुद्दा अचानक समोर आलाच तर देहबोली कशी ठेवावी, वेळ कशी मारून न्यावी आणि नेमके काय बोलावे. त्यामुळेच तो बाविशीचा मुस्लिम मुलगा न बिथरता योग्य ते बोलला असे दिसते.

मात्र हे घरून मिळणारे संस्कार आणि बाहेर येणारे अनुभव ह्यातूनच माणूस अधिक कट्टर होतो हेही खरे!

मागे मी कॉलेजमधे असताना एकजण म्हणाला की त्याचे गाव आहे "धाराशिव"
नंतर कळाले की ते "उस्मानाबाद" चे नाव आहे. Uhoh
जी नावे फार काळ रूढ झालेली असतात ती बदलण्यात पॉइन्ट नाही हे.मा.वै.म. (कृपा करून कोणी असला आयडी घेऊन पकवू नये. :डोमा:)

@ बेफिकिर आणि महेश : या विषयाला अनुसरुन तुम्ही एक-एक पैलु उलगडुन दाखवले त्यबद्द्ल धन्यवाद...! Happy

अनुभव अस्वस्थ करणारा आहे. पण बेफिजींनी लिहिल्याप्रमाणे ग्रुपमधला एखादा बिनडोक असे ताशेरे ओढतो आणि काहीही ध्यानीमनी नसताना बाकी सर्वांना त्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. कट्टरतावाद हा काही लोकांच्या मनात खुपच भिनला असतो आणि त्यांची सारासार विवेकबुध्दी कट्टरतेच्या अधिन झालेली असते. परंतु अश्या व्यक्तींमुळे काहीही कारण नसताना संपुर्ण समाजाला त्याचे परिणाम भोगावे लागतात.

या उलट अनुभव पण आहे, एकदा एका हिंदी भाषिक माणसाची ओळख झाली, तेव्हा नावगाव चौकशीत मी म्हणालो "पूना" तर त्याने थांबवले आणि म्हणाला की "आप लोग खुदही पुणे नही बोलोगे तो बाकी लोगभी नही बोलेंगे" Happy

कलकत्ता या नावाची एक गम्मतच आहे. त्याचे स्पेलिन्ग Calcutta आहे की Kolkata ??
पहिले असेल तर त्याला कॅलकुट्टा म्हणावेसे वाटते ! Happy

शहराचे अधिकृत नाव औरंगाबाद आहे की संभाजीनगर आहे ?

देशाचे अधिकृत नाव भारत आहे.. उद्या कुणी म्हणेल हिंदुस्तानच बोला , कुणी म्हणेल जंबुद्वीपच म्हणा तर ते योग्य आहे का ?

मी जपान मधे असताना एका भारतीय (मराठी) व्यक्तीशी बोलत असताना सांगितले की मी लवकरच भारतात परत जाणार आहे. तर त्या व्यक्तीने मला विचारले की तुम्ही मराठी माध्यमात शिकला आहात का ?
प्रश्न एकदमच टॅन्जन्ट होता असे वाटेल, पण पुढे ऐका - - - - - - -
मी का विचारल्यावर त्याने सांगितले की मराठी माध्यमातले लोक "भारत" म्हणतात आणि इंग्रजी माध्यमातले लोक "इंडिया" म्हणतात. असे त्याचे निरिक्षण होते. Happy

विषय छान आहे,

पण यात दोन विषय आहेत, एक नामांतराचा वाद. जुना घीसापीटा विषय आहे.

दुसरा विषय म्हणजे संवेदनशील विषयावर ओळखीतले हिंदू मुसलमान कशी चर्चा करतात. यावर मी नंतर माझे अनुभव लिहेन.

ना भोसलेंची इस्टेट मला मिळाली ना औरंगजेबाची.

त्यामुळे वाट्टेल ते नाव ठेवा. किंवा दोन्हीही सोडून देऊन अशोकनगर किंवा बाहुबलीनगर किंवा एलिझाबेथनगर ठेवा.

आम्हाला सगळे सारखेच.

@ moga : विचार भारीच आहेत हां तुमचे..!
@ बाळाजीपंत : जुने धागे पण आहेत का या विषयावर..?
@ महेश : आभारी आहे... Happy
@ ऋन्मेऽऽष : शेअर युवर अनुभव प्लिज Happy

औरंगाबाद हे नाव ऐकताच एक टीममेट क्षणाचा देखील वेळ न दवडता असिफकडे पाहून म्हणाला, "औरंगाबाद नाही... संभाजीनगर..!"

त्याचे हे बोलणे ऐकून लंच टेबलवर क्षणभर शांतता पसरली. प्लेट्मधील अन्न प्लेट्मधे, चमच्यातले अन्न चमच्यात आणि तोंडातले अन्न तोंडातच ठेऊन सर्वजण एकमेकांकडे आणि नंतर असिफकडे पाहू लागले.

>> हे तुम्हीच लिहिल हे बरे केले. ह्या भावना हेच सांगतात की तुमच्या कलीग्सचा हेतू सुद्धा असिफ किंवा इतर कुणीही मुस्लीम धर्मातल्या व्यक्तीला दुखवायचा नव्हता. तो फक्त एक निखळ विनोद होता. ह्यात मला तरी सहनशील किंवा असहनशील वागणे बोलणे असे काहीच दिसत नाही. वाटत नाही.

काही लोकांना पार्टी /ऑफिस /बैठक वगैरेचे भान नसते, व सोशल साईटवर (अगदी इथे माबोवरही) केव्हाही कुठेही कसलीही कॉमेण्ट कसलाही विधीनिषेध न बाळगता "ठोकुन" देणे जसे केले जाते, तसेच पार्टी/ऑफिस /बैठका वगैरे ठिकाणीही "अस्थानी" कॉमेण्ट करीत असतात, त्यातलाच हा एक प्रकार होय. हा प्रकार टाळला गेलाच पाहिजे.

अर्थात यास वा यावरुन लगेच " ही सगळी असहिष्णुता" वगैरे असले मापदंडही मी लावणार नाही कारण निव्वळ "पेठी घार्‍यागोर्‍या बामणांपैकी" असल्याने मी बाकी हिंदु समाजाकडूनच काय काय घाणेरडे चित्रविचित्र ऐकुन घेतले आहे त्याची यादीही थक्क करणारी आहे, इथे तर निव्वळ एका गावाचे नाव वेगळे उच्चारले आहे. अन तरीही त्यांना मी असहिष्णु म्हणत नाही, इथे वरील उदाहरणात तर नाहीच नाही.
पण मला ऐकायला लागले, वा ऐकवतात म्हणून मी देखिल त्यांच्यासारखेच कुठेही पचकावे असे थोडीच आहे?

सहिष्णु/असहिष्णुतता फार भिन्न आहे. त्याबद्दल परत कधीतरी.

लिंबुटिंबु तुम्ही म्हणता हा प्रकार थांबायला हवा पण ह्या देशात किती लोकसंख्या आहे आणि व्यक्ती तितकी प्रकृती असते. आपल्याच घरामधे छोटेमोठे एकमेकांचे ऐकत नाही आणि हवे ते बोलतात मग बाहेरच्या लोकांकडून अशी अपेक्षा करणे हेच मुळात अयोग्य आहे. लोकांचे चेहरे वाचायचे असतात. कुणी खरेच मनात हेतू ठेवून बोलला का हे आपल्याला लगेच कळते.

बी, तरीही एक मुद्दा उरतोच बघ.
त्या असिफच्या जागी एखादा सुरेश, रमेश अस्ता तरीही त्या दुसर्‍याने औरंगबाद की संभाजीनगर हे विचारलेच अस्ते! नाही कशावरुन?
अन अध्यार्‍हुत किंवा छुपा रोख /गृहितक दिसते की असिफ होता म्हणून म्हणले, तर हेच मला मान्य नाही, निदान मी तरी औरंगाबाद म्हणणार्‍याला संभाजीनगर अशी दुरुस्ती सुचवितो तेव्हा समोर कोणत्याही जातीधर्माचा माणुस असतो, फक्त मुस्लिम असला म्हणजेच हे म्हणतो असे नाहि.
हल्ली तर मी सरसहः "हिंदुस्थान" असाच माझ्या देशाचा उल्लेख बोलाचालित करतो. इर्रेस्पेक्टिव्ह ऑफ समोर कोण आहे.
आता यास असहिष्णु वगैरे कुनाला ठरवायचे असेल तर ठरवुदेत बापडे..... Proud

@ बी आणि limbutimbu : अजुन तरी सरकार दरबारी औरंगाबाद चे संभाजीनगर झालेले नाही. त्या शहरात रहणारा कुणाही हिन्दु-मुस्लिम-जैन-पारसी-शिख-ख्रिश्चन ला 'औरंगाबाद नाही..संभाजीनगर..!' असं सांगण्याचा शाहजोगपणा कोण करत असेल तर त्या औरंगाबादच्या रहिवाशावर जाणुनबुजुन प्रेशर टाकल्यासारखे नाही का वाटत..??

भारताच्या ईतिहासातील कोणताही कृरकर्मा, सत्तेसाठी भाउच नव्हे तर वडीलांचीही हत्या करणारा, बहुसंख्य समाजाला जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्याची ईच्छा बाळगणारा, त्या साठी अनेक चुकीचे कामं करणारा ई. ई. अनेक वाईट गुण असणारा "हिंदु" राजा दाखवा.
त्याच्या नावाने असलेले गाव दाखवा.
उद्या जर त्या गावाचे नाव बदला अशी मोहीम सुरु झाली तर मला काहीही अपमान वाटणार नाही.
माझा धर्म या कॄरकर्मा हिंदु राजाशी संबंधीत नाही. मला त्याच्याने काहीही फरक पडत नाही.
त्या गावाचे नाव बदलल्याने मी, माझा समाज, माझे किंवा माझ्या मुलांचे भवितव्य किंवा माझा धर्म यापैकी काहीही "खतरेमे" पडत नाही.
कंपनी टींम लंच मधे इतर १५ दुस-या धर्माच्या लोकांनी जर मला, त्या गावाचे नवे नाव सुचवुन दुरुस्त केले तर मला त्यात काहीही वावगे वाटणार नाही.

आणि मला खात्री आहे की ९९.९९ टक्के हिंदुंचे विचार असेच असतील.

समस्या तेव्हा येते जेव्हा हेच "दुस-या बाजुच्या राजाच्या" बाबतीत होते तेव्हा खतरेमे चा नारा दिला जातो, भावना दुखावल्या जातात, असहिस्णुतेचा आरोप केला जातो.

हा सगळा दुट्टपी खेळ चांगलाच ठाऊक आहे. त्यामुळे मुळात जरी मला औरंगाबाद नावाने काहीही फरक पडत नसला तरीही
या दुट्ट्पी कारस्थानाला नेस्तनाबुत करण्यासाठी माझा या नामकरणला पाठिंबा आहे. तुमच्या मित्राने केले त्यालाही पाठींबा आहे.

ईथे माबोवर की फेबुवर कुठेतरी एका ताईंच्या लेखात वाचले होते की सुवर्णमंदीरात प्रवेश करताना सहज टेस्ट म्हणून त्यांनी डोक्यावर काही घेतले नाही, तर लगेच एक कॅमेरामन की विक्रेता येऊन दरडावणीच्या सुरात त्यांना ओढणी डॉक्यवर घ्यायला सांगीतली.

मला एवढे कळते की, हा खतरेमे चा आणि सतत आम्हीच व्हिक्टीम आहोत हे दाखवुन सोयी सुवीधा दया सांत्वन लुबाडण्याचा दुट्टपीपणा मोडुन काढण्यसाठी माझा या सगळ्याला पाठींबा राहील आणि तुमच्या मित्राने केले ते अगदी बरोबर केले. तसेही ते अगदी सहजच झाले होते नै का?

भारताच्या ईतिहासातील कोणताही कृरकर्मा, सत्तेसाठी भाउच नव्हे तर वडीलांचीही हत्या करणारा, बहुसंख्य समाजाला जबरदस्तीने धर्म परिवर्तन करण्याची ईच्छा बाळगणारा, त्या साठी अनेक चुकीचे कामं करणारा ई. ई. अनेक वाईट गुण असणारा "हिंदु" राजा दाखवा.

>>>

जर इथे एखादा वाईट कामे करणारा नेता दाखवला आणि त्याच्या नावाचा मार्ग किंवा चौक दाखवला तर ....

जर इथे एखादा वाईट कामे करणारा नेता दाखवला आणि त्याच्या नावाचा मार्ग किंवा चौक दाखवला तर .... >>
काहीही फरक पडत नाही.
मला फक्त एवढीच काळजी आहे की नेत्याने किंवा पक्षाने काम काय आणि किती केले.
मी कामाला, कार्याला, गुणाला मानतो व त्याच्याच पुढे झुकतो.
ते गुण किंवा काम ज्या व्यक्तीचे आहे त्याला फक्त धन्यवाद म्हणतो, त्याचा अनुयायी होत नाही किंवा मानसीकरित्या त्याच्यापुढे झुकत नाही, त्याचा मानसीक गुलाम होत नाही.

याबाबतीत आम्हाला डॉ. आबेंडकरांचा लीडर आणि त्यांचे अनुयायी या अर्थाचा एक धडा होता शाळेत तो नेहमी आठवतो.

अच्छे दिन वरचे ध्यान हटवन्यासाठी लोकांच्या डोक्यात घातलेले फंडे आहेत हे.
नाव बदलण्यामुळे कुठल्या समस्याचे निवारण होणार आहे?

@ ऋन्मेऽऽष, सकुरा : Happy
@ स्पॉक. : चांगलेच भडकलात की..! Happy
उदाहरण म्हणुन : बॉम्बे-बम्बई चं मुंबई केलं.. मद्रास चं चेन्नई केलं.. कल्कत्ता चं कोलकता झालं.. काय फरक पडला हो जनतेच्या आयुष्यात..? राजा वाईट होता... म्हणुन निदान ५०० वर्षान्पासुन अस्तित्वात असलेल्या शहराला त्याचे नाव नको हे हस्यास्पद नाही का वाटत या जमान्यात..?

राजा वाईट होता... म्हणुन त्याचे नाव नको हे हस्यास्पद नाही का वाटत या जमान्यात..?
>> ईतर शहरांच्या नामकरणाने जर फरक पडत नाही,
वाईट राजाच्या नामकरणाने जर फरक पडत नाही,
तर,
डूकराच्या चित्रावर काहीतरी लिहिले तर फरक का पडतो,
वंदे मातरम म्हणताना फरक का पडतो,
राष्ट्रगीतासाठी उभे राहताना फरक का पडतो,
"सेकुलर सोशलिस्ट" भारतात राहताना असा काय फरक पडतो ज्य्यामुळे वेगळा पर्सनल लॉ बॉर्ड मागावा लागतो?
असा काय फरक पडतो ज्यामुळे यु.सी.सी. ला विरोध करावासा वाटतो?
नक्की काय फरक पडल्यामुळे बांग्लादेशात ब्लॉगर्सच्या हत्या होतात, तस्लिमा बाईंना देश सोडावा लागतो
ई. ई आणखी खुप काही!

"दुस-या बाजुला" फरक पडने थांबले की ईकडे फरक पडने आम्ही थांबवू.

Pages