दिवाळी अंकांचं वास्तव

Submitted by वाचनप्रेमी on 21 November, 2015 - 00:21

महाराष्ट्रात सुमारे ८०० च्या जवळपास दिवाळी अंक प्रदर्शित होतात, असं विकिपिडीयावर वाचलं आणि थक्क झालो.
पण त्याचवेळी मनाला बरेच प्रश्न पडले.
खरंच एवढे अंक कुणी वाचते का? की उगाच जाहिराती मिळतात म्हणून दिवाळी अंक काढतात लोक?
खरोखर वाचले जाणारे लोकप्रिय आणि दर्जेदार अंक किती आणि कोणते?
या चांगल्या अंकांचा किती खप होत असेल?
लायब्ररीमध्ये दिवाळी अंकांच्या स्कीम्स(उदा.. दीडशे रुपयात दीडशे अंक) जाहीर होतात, त्याला कितपत प्रतिसाद मिळतो का?
मायबोलीवर दिवाळी अंकांचा एक धागा पाहिला. पण त्यात कुणीच फारसं लिहिताना दिसत नाही. लोक अंक वाचत नाही की लिहायचा आळस करतात?
दिवाळी अंक वाचणारी पिढी कुठल्या वयोगटातली आहे?
आजकालची तरुण मुलं, कुमार किशोरवयीन दिवाळी अंक वाचतात का? किती प्रमाणात?
सगळ्याच दिवाळी अंकांत सगळेच लेखक चांगले लिहितात असे नाही. तुम्ही यावेळेस वाचलेल्या अंकांमध्ये चांगले लिहिणारे लेखक कोणते आहेत?
असेच अन आणखीही काही प्रश्न आहेत.
तुम्हालाही असले प्रश्न पडले असतील किंवा या प्रश्नांची उत्तरे ठाऊक असतील तर इथे लिहा.
धन्यवाद मंडळी!!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आत्ता कोणी उत्तर देत नाहीयेत. सगळेच बहुतेक दिवाळी अंक वाचण्यात मग्न आहेत. Happy

या माहितीचं तुम्ही नक्की काय करणार आहात ते कळेल का?

मामी - आजकाल मराठी चित्रपट भरपूर निघतात व त्यातले बरेचसे दर्जेदार असतात. लोकही जवळपास सर्व वयोगटातील आवडीने मराठी चित्रपट पाहायला लागले आहेत.
पण दिवाळी अंकांचा ८०० हा आकडा वाचून कुतूहल वाढलं. म्हणजे लोक खरंच एवढ्या प्रमाणात दिवाळी अंक वाचतात की नुसतीच सूज आहे हा आणि इतर प्रश्न पडले. बऱ्याच काळाने मोकळा वेळ उपलब्ध झाला आहे. तो दिवाळी अंकांच्या वाचनासाठी वापरावा असा विचार आहे. तेव्हा चांगल्या दिवाळी अंकांविषयी व लेखकांविषयी कळले तर कुठून सुरुवात करावी हा प्रश्नसुद्धा सुटेल ☺

चांगला विषय आहे. परवाच यावर घरी चर्चा झाली. लहान असताना अनेक अंक दिवाळीत घरी यायचे. आवाज्,सकाळ्,पुढारी,किस्त्रिम्,छावा,किशोर पासून अनेक.प्रत्येकाची आवड जपून निघणारे अंक. आता परवा उगाच दुकानात जाऊन छावा आणि मुलांचे अंक पाहिले. एकंदर 'कंटेंट'चा अभाव आढळून आला.
निव्वळ सकाळ चे सहा दिवाळी अंक आहेत. सगळे पाहिले.एक अनिल अवचटांचा लेख सोडला तर वाचण्याजोगे शून्य.
तिच परिस्थिती इतर अंकांची. लोकसत्ता यावेळी आहे वाचण्यासारखं,निदान कहितरी.

मुळात अंक घेणारेच बाजारातून कमी होत चाल्लेत. कंटेंट तेच तेच होत आहे.

शतायुषी सारख्या अंकाबाबतही तेच घडावं ? अजून दोन वर्षात या अंकाना किमान मागणी तरी असेल का?

महाराष्ट्रात सुमारे ८०० च्या जवळपास दिवाळी अंक प्रदर्शित होतात,>>

खरेच थक्क करणारा आकडा आहे.
गेली कित्येक वर्षे मी दिवाळी अंक वाचला नसावा.
शेवटचा दिवाळी अंक ऑनलाईन मायबोलीचा, यंदा तो देखील नाही.

परंपरागत दिवाळी अंक आणि त्यामागची प्रतिष्ठित नावं दरवर्षी निराशाच करतात. मग जाहिरातीसाठीच हौसेने दिवाळी अंक काढणार्‍यांचा प्रश्नच नाही. तेच तेच पाळीव लेखक. एकाच छापाच्या कथा. उदः भारत सासणे नावाचा एक लेखक काय लिहितो त्याचे त्याला तरी कळते की नाही कुणास ठाऊक. त्यामुळे दिवाळी अंकांची खरेदे २-३ वर्षा पासून पूर्ण थांबवली आहे. अन्यथा मौज, दीपावली, अक्षर्,साप्ताहिक सकाळ , हंस फेवरीट असत. आवाजही ह्या वर्षी तरी बरा असेल अशा आशेवर घेत असे. शतायुषीचा देखील दर्जा राहिला नाही. कुठल्या कुठल्या अमराठी आणि अप्रसिद्ध डॉक्टरांचे लेख प्रसिद्ध करीत असतात देव जाणे ! एकूण दिवाळी अंक ही संस्था मोडीत काढण्याची / निघण्याची वेळ झाली आहे हे नक्की...

पाळीव लेखक. एकाच छापाच्या कथा>>>अगदीच बरोबर आहे!

मी दरवर्षी काही अंक विकत घेते आणि जत्रा सारखे अंक न ठेवता नवीन काही ठेवणारी ग्रंथालये / वाचनालये शोधत रहाते. मला वाटते रसिककडचा संच सगळ्यात मोठा आहे.
अनेक सुंदर आणि नवीन लेखन असलेले अंक वाचनासाठी सहज उपलब्ध होत नाहीत हे ही तेवढेच सत्य आहे.

दिवाळी अंक म्हटल्यावर आधी लहानपणीचा उत्साह आठवतो. 'विकत घेऊन वाचणे' हा प्रकार केला नव्हता. लायब्ररीत एक महिना आधी नोटीस लागायची. 'अमुक एक पैसे भरुन दिवाळी अंकांची नोंदणी करा.' आणि लायब्ररीयन काकांना खाजगी स्वरात 'आमच्या साठी आवाज्/जत्रा/मेनका/गृहशोभिका आल्याआल्या लपवून राखून ठेवा' वालं आवाहन प्रत्येक जण करायचा.प्रत्यक्ष दिवाळी जवळ आल्यावर आवाज्/जत्रा/गृहशोभिका/मेनका/माहेर आधीच कॉलेजातल्या सुंदर मुलींसारखे एंगेज झालेले असायचे. 'किस्त्रीम्/शतायुषी/अबकडई' असे काही अंक मात्र एकदम खुल्या दिलाने टेबलावर पडून असायचे. मग चिडून 'त्यांचा परत देऊन झाला की आवाज आम्हालाच द्या' वगैरे धमक्या देऊन श्तायुषी/अबकडई वगैरे घरी आणले जायचे. आवाज जत्रा साधारण दिवाळी संपून एक महिना होईपर्यंत हुलकावण्या देत असायचे. चुकून आवाज्/जत्रा आधी मिळालाच आणि घरी कोणी आलं की मनात 'मी अंक वाचायला घरी नेतो' म्हणेल अशी धाकधूक असायची. आता आयपॅड वर कितीही दुर्मीळ पुस्तक वाचत असलं तरी शेजारचा ढंकून बघत नाही.घरात सुंदर पुस्तकं थेट बाहेरच्या खोलीत टिपॉय वर असली तरी कोणाला ती उघडून वाचण्याचा मोह होत नाही.'छापील पुस्तक(होमवर्क्/ऑफिसची परिक्षा/शिक्षकांचा ससेमीरा मागे लागल्या शिवाय स्वतःच्या इच्छेने आणी आवडीने) वाचणे' हा फ्लॉपी किंवा फिल्म कॅमेरा सारखा ओब्सोलीट प्रकार झाला आहे. सर्व कसं व्हिज्युअल मीडीय मध्ये किंवा लॅपटॉप वर पी पी टी म्हणून पाहिजे.
(हे खूपच 'गुड ओल्ड डेज' च्या चिडक्या सुरात लिहीलं गेलंय पण आजूबाजूचा माहोल तसाच आहे.)

या वर्षीच्या अंकांबद्दलः बसून शांतपणे छापील अंक वाचण्याचा निवांतपणा कोणी देईल असं वाटत नाही पण बुकगंगा वर माहेर आणि मेनका विकत घेतले आणि आवडले.कंटेंट अजूनही क्वालिटी राखून आहे. त्यातल्या प्रत्येक पानावर असलेल्या जुन्या यामिनी बर्गे मच्छरदाणी, ए-पिल ऑन टॉन्सिल,आणि लाय्सिल वगैरे जाहीराती वाचून बॅक टु पास्ट गेल्यासारखं वाटलं. या गोष्टी मात्र बदललेल्या नाहीत.

या क्षेत्रात नक्कीच फायदा आहे त्याशिवाय एवढे अंक निघणार नाहीत. आतबट्ट्याच्या व्यवहार कुणी करणार नाही.
आपण फक्त शहरातील वाचकांचा विचार करतोय, मला वाटते या अंकाना ग्रामीण भागात वाचक वर्ग असणार. ( केवळ धार्मिक , भविष्य विषयाला वाहिलेले अंकही फार दिसताहेत. त्यांना असे स्थानिक ग्राहक असतीलही )

एखाद्या आडगावच्या पेट्रोल पंपावर् थांबलात तर तिथे एक सिडीचे दुकान हमखास दिसते. त्यातल्या सिडीवरचे गायक ना आपण ऐकलेले असतात ना त्यांच्याबद्दल कुठे वाचलेले असते, पण त्यांची तूफान विक्री होत असते. खुपदा एखादा ड्रायव्हर, द्या कि एखादी तडक भडक सिडी, झोप उडाली पाहिजे, असे सांगत सिडी घेताना दिसतो तसे काही या अंकाबाबत होते का ?

अंकाची विक्री नक्कीच होत असणार कारण मी जानेवारीत भारतात येतो तेव्हा बहुतेक अंक संपलेले दिसतात. काही वेबसाईट्स वर मात्र गेल्या दोन तीन वर्षांचे अंक आहेत.

नावाजलेल्या लेखकांनी तेच तेच दळू लेख वा कथा पाडल्याचे तर मी अनेक वर्षांपासुन बघतोय. पण खरे तर त्यांनाही चार पैसे कमवायचे असतात. संपादकांना त्या नावाने विक्री वाढवता येते. मग आपण का हरकत घ्या ?

दिनेशदा थोडा सहमत आहे मी.
मी एका आघडीच्या मराठी वृत्तपत्राशी जोडला गेलो आहे. मासिकाचं गणित निश्चितच ग्रामिण भागात चांगलं आहे.कारण तिकडे अजून वाचकवर्ग आहे.कारण मनोरंजन साधनांची अजूनही वानवा आहे त्या भागात.शिवाय टिव्ही हा लोडशेडींगसारख्या कारणाने फार कमी लागतो.तेव्हा वाचन करणारा वर्ग चांगलाच आहे.

पण जगभरात वेगवेगळ्या विषयांची भरमार असताना, यांचे लेख हे अत्यंत सुमार दर्जाचे आणि शहरातील ज्या बौध्दिक,नविन विषय वाचणारा वर्ग आहे त्याला समाधान देऊ न शकणारे असतील तर त्यांनी तरी ते का विकत घ्यावेत?
तुम्हाला उदा. द्यायचे झालेच तर शतायुषी च्या यावर्षीच्या अंकाचे घ्या.डॉक्टरी सत्यकथांचा विभाग दोन कथांमध्ये संपला असे पहिल्यांदाच झाले आहे.शिवाय लेखांमध्ये तेच तेच विषय झाले आहेत. मेडीकल क्षेत्रातील कित्येक विषयांना हाताळायचे आहेत असे का येउ नाही शकले?

दिवाळी अंक ८०० हून अधिक छापले असले तरी अंकांचं गणित पुन्हा त्याच्या छापिल प्रतींच्या संख्येवर सुध्दा अवलंबून आहे. एखाद्या अंकाच्या किती प्रती छापल्या असव्यात यावर त्या अंकाची लोकप्रियता टिकलेली असते.
म्हणून आठशे प्रकाशनामध्ये काही १०० प्रती ते लाख भर प्रतींचे पण असू शकतील.

पण कंटेंटच्या अभावाचा आणि त्याच त्याच लेखकांच्या लेखनाचा कंटाळा ही कारणं तशीच राहीली तर मात्र दिवाळी अंक फक्त जुन्या पुस्तकांच्या दुकानात किंवा अर्काईव्ह विभागातच पाहयला मिळतील हे नक्कीच.