पाचोळा

Submitted by जव्हेरगंज on 5 November, 2015 - 12:13

"नाकाला नुसती धार लागली हुती, रगात नुसतं ठिबकत हुतं" बापुराव घुश्श्यातचं बोलला.
"आरं पण यवढं झालचं कसं?, लिंब्यानं कायचं कसं न्हाय क्येलं" पाटील पानाचा तोबरा भरत बोललं.
"यका बुक्कीत कुठं येवढं रगात येतं व्हयं, गणा बिना फुटला आसल" चवढ्यावर बसलेला मारुती घाऱ्या डोळ्यांनी बघत बोलला.
"ते काय नाय पाटील पोराचा जीव बीव गेला आसता तर, केवढ्याला पडलं आसतं बोला" बापुराव पेटला.
"येका बुक्कीत जीव जायला त्येच्यात काय आवसानच न्हाय वयं, उग काय बी बोलू नगु , घ्या मिटवा मिटवी करुन" पाटील सामोपचाराचं बोललं.
"आसं कसं मिटवायचं, ह्येच्या नाग्याचं डोस्कं बिस्क फुटलं आसतं तर घीतली आसती का ह्यनं मिटवामिटवी करुन?" बापुराव काय थांबायचं नाव घेत न्हवता.
"आरं नाग्या काय तुला आसा तसा वाटला वय? पाय लावुन पळुन ग्येलं तुजं पोरगं म्हायतंय का?"मारुतीरावानं बी आता बार भरला.
"मारुतीराव लय त्वांड आलं काय बोलाय, नाग्यासंग तुलाबी हितं ऊलटं टांगीन, पोरावर जरा ध्यान ठिव, परवा बी म्हणं त्यानं नळात कुणाला तरी बुडवलं" पाटलानं पटका गुंडाळायला घेतला.
"नळाला पाणीच न्हायतर काय बुडवता, आलीकडच्या डबक्यात पोरं पवत हुती, तिथच कायतरी झालं, म्याबी त्येला दोन मुस्काडात ठिवुन दिल्या म्हणा" मारुतीरावानं आपली बाजू पष्ट केली.
"नळाला पाणी न्हाय मनतुय, मग ऊसाचं काय केलयं?" पाटलानं आजुन एक पान काढलं.
"यादवाचं घेतलयं इकात, जमवायच आपलं कसंतरी, यवढा म्हैना गेला की खाल्लाकडच्या तुकड्यात पाईपलाईन टाकायचीय, नळाचं पाणी डायरेक शेतात" मारुतीरावानं बी टोपी वर सारली.
"पाटील, जित्राबास्नी खायला कुटं कडवाळ हायका कुणाचं?" मगापस्न घुम्यावनी बसलेल्या म्हादुबाला आता वाचा फुटली.
"व्हय, लय हाल ओ जित्राबाचं, नुसता कडबा किती खात्याली?" शेजारी बसलेला एकनाथनं त्याचीच री ओढली.
"त्ये काय नाय पाटील, मला चारशेची नुस्कान भरपाई पायजेल, पोराला दवाखान्यात न्ह्यायचय, नाक नुसतं सुजलयं" बापुरावनं काय आपला हेका सोडला न्हाय.
" धा रुपयला गुळी मिळती, हितं गावच्या दवाखान्यात दाखव, उग कायबी सांगु नगू, ही रोख धा रुपय घी आन मिटवुन टाक" मारुतीराव खिशात हात घालतचं बोलला.
"येकुलतं यक पोरगं हाय पाटील, उग हिततिथं दाखवणार न्हाय, आपुन काय चारशेच्या खाली येणार न्हाय, नसता रातच्याला कोयता तयारच हाय, पुना मागनं काय बुलु नगासा" बापूरावचं डोळं आता लालभडक होत चाललं.
"आन आमी काय बांगड्या भरल्यात्या वय, घराम्हागं तलवार पुरुन ठिवलीय, दसऱ्याला पुजा करताना समद्या गावानं बघितलयं" मारुतीरावानं बी फुशारकी मारली.
"बापू, चारशे लैच हुत्यातयं, बघ जरा काय कमी करता आलं तर" पाटील बंडीत हात घालत बोललं. आतल्या खिशातनं शंभराच्या नोटांच बिंडेल काढलं. एक एक करत समद्या पंधराच्या पंधरा नोटा मोजल्या. आन वरच्या काय नोटा हातात घीऊन बोललं,
"म्हादुबा, सहाशे हाईत, सखुबाईला दी, खुरपायच्या बायांची हाजरी मनावं, आन आजुन दोन बाया वाढीव मनावं" म्हादुबानं हात पुढं करुन नोटा घेतल्या. एक एक करत पुना समद्या मोजत राहीला. मारुतीरावाचं काळीज क्षणभर थांबुन पुन्हा धडकलं. बापुरावाचं तर धडाधडा धडकुन पुन्हा मुळपदावर आलं.
"पाटील, बारदाना आणायचा हुता मक्याला, त्येलाबी आजुन दुनीकशी लागतील" म्हादुबा ईमानदारीनं बोलला.
"व्हय बारदाना बी लागलचं, मका नुसती कांबळ्यावर पडुन हाय" एकनाथनं पुन्हा एकदा त्याची री ओढली.
"सकाळपस्न पोरगं थंडीतापानं फणफणलयं, मला जेवानसुदीक गेलं न्हाय" बापूराव आपलं घोडं दामटवत राहिला.
"आपल्याकडं काय पैका न्हाय गड्या, ह्या धा ची बी आता पुडी घ्यायचीय" मारुतीरावानं तर हातच झटकलं.

पाटील तोबऱ्यावर तोबरं भरत राहिलं. म्हशीच्या शेणापासुन ते केळीच्या पट्टीपर्यंत विषय काढत आन खिशातल्या नोटा चार पाच वेळा मोजत म्हादुबा घुम्यावाणी बसुन राहिला. एकनाथ बी आळस देत त्याची री ओढत गेला.
ह्या गोंधळात आख्खी दुपार गेली. शेवटी ठरलं आसं की 'बघु ऊंद्याच्याला'. आन लिंबाखालची चावडी ऊठली.

***********************************************************************

रातच्याला लिंब्या उड्या हाणतच खेळाय गेला.पोरं शिवनापाणी खेळत हुती. सुटणी झाली. नाग्यावर राज्य आलं. लिंब्या लांब पळत सुटला. डाव्या हातानं शेंबुड पुसत नाग्या त्याच्या म्हागं लागला. पळता पळता लिंब्या थांबला आन म्हागनं येणाऱ्या नाग्याच्या तोंडावर त्यानं जोरदार ठोसा मारला. नाग्या धडपडतच खाली बसला.
नाकाला नुसती धार लागली हुती, रगात नुसतं ठिबकत हुतं.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्त Happy

तुमच्या सगळ्याच कथा आवडतात.

ह्या कथेत पोरानेच स्वतःला न्याय मिळवून दिलाय.

पण ह्या कथेला 'पाचोळा' हे नाव का दिलंय ते कळलं नाही.

छान कथा.
फुकाच्या गप्पा कस्पटासमान म्हणुन पाचोळा हे नाव आहे का? कारण पोरांनी आपापसात मिटवुन टाकलय आपल्य पद्धतीने आणि मोठे मात्र चर्वण करत राहिले.

धन्यवाद सर्वाचे !!

(अतिअतिअवांतर : मला १३ हा आकडा आवडतचं नाही, छ्या Sad )

पहिल्यांदाच तुमचं लिखाण वाचलं. जबरदस्त आहे. संवाद जिवंत आहेत. ओघवते आहेत. सकस लिखाण आहे. इतके दिवस न वाचल्याबद्दल मनापासून क्षमा !!

मस्त, या कथेत निवेदनातही तोच भाषेचा बाज आलाय म्हणून जास्त आवडली. ( तो आणखी अस्सल करता आला तर बघा ना प्लीज.. इथे वाचक नक्कीच समजून घेतात. एखादा शब्द अडला तर जरूर शंका विचारु. )

फारच सुंदर. खूप आवडलं

शुभांगीचा प्रतिसाद पण खूप छान आहे.

आता समिकरणच बनलय, जव्हेरगंज + उत्कृष्ट कथा. तुमची नविन कथा आली की लगेचच वाचण्यात येते.
नेहमीप्रमाणे मस्त कथा.
शुभांगी यांच्यामुळे शिर्षकाचा अर्थही लागला. धन्यवाद!