नवरात्र कोकणातलं...

Submitted by मनीमोहोर on 24 October, 2015 - 11:00

कोकणात गौरी गणपतिचा सण खूप उत्साहात साजरा केला जातो पण आमच्याकडे नवरात्र गणपती पेक्षा ही जास्त उत्साहाने साजरे केले जाते. त्याच काय आहे .... आम्ही रहायला कोकणात पण आमची कुलदेवता आहे लांब मराठवाड्यात.... अंबाजोगाईची श्रीयोगेश्वरी. आमच्या आधीच्या पिढ्या आर्थिक टंचाई आणि प्रवासाची अपुरी साधन यामुळे कुलदेवतेच्या दर्शनाला कधी जाऊ नाही शकल्या म्हणून मग लाड, कौतुक उत्सव सगळं घरातल्या देवीचचं करायची प्रथा घातली गेली असेल. या वर्षी नवरात्रात कोकणात गेले होते. तो अनुभव इतका सुंदर होता की इथे शेअर केल्याशिवाय रहावत नाहीये.

नवरात्राच्या तयारीची सुरवात एक दीड महीना आधीच अभिषेकाला लागणार्‍या तिळाच्या फुलांची आणि झेंडुच्या फुलांची रोपं लावुऩ होते कारण नवरात्रात या दोन्ही फुलांचं महत्व आहे. नवरात्राच्या दोन दिवस आधी देव्हारा , त्या वरची मांडवी आणि देवघराची साफ़ सफाई केली जाते. आमचा देव्हारा खूप जुना आहे १८४५ सालातला. देव्हार्‍यावरच्या पितळी पट्टीवर देव्हारा घडवणार्‍याचं नाव, माझ्या आजे सासर्‍यांचं नाव आणि हे साल ( वर्ष ) कोरलेलं आहे.शिसवी लाकडापासुन बनवलेला आणि कोरीव कामाने नटलेला हा देव्हारा थोडासा जरी पुसला तरी अजुन ही अगदी चमकायला लागतो. देव्हार्‍यावरची मांडवी ही आंब्याचे टाळे, सुपारीची शिपटं, असोला नारळ, कुर्डुच्या फुलांचे तुरे यांनी सुशोभित करतात. नवरात्रात झेंडुच्या फुलांची माळ मांडवीच्या ज्या हुकाला लावली जाते तो हुक ही मजबूत आहे ना याची खातरजमा केली जाते. देव्हार्‍यावर विजेच्या दिव्याच्या लुकलकणार्‍या माळा सोडल्या जातात. देव्हार्‍यातल्या देवाना उजाळा दिला जातो. पूजेची उपकरणी, नऊ दिवस अखंड तेवणारी समई घासुन पुसुन लख्ख केली जातात. उत्सवमुर्ती देवीचे दागिने ही उत्सवासाठी उजळले जातात. आमच्याकडे नऊ ही दिवस ब्राह्मण, सवाष्ण जेवायला असतात. त्यांना ही सुपारी देऊन अगत्याने निमंत्रण दिले जाते. स्वयंपाक घरात ही प्रसाद तयार करणे, इतर पूर्व तयारी करणे अशी धामधुम चालु असते. घरात एकंदरच चैतन्यमय उत्साह असतो.

पहिल्या दिवशी पहाटे उठुन , स्नान करुन मगच पुजेसाठी आगरातुन फुलं आणली जातात. पाच सहा प्रकारच्या जास्वंदी , तगर, कर्दळ , गोकर्ण , सोनचाफा , सोनटक्का , प्राजक्त , गुलाब, दु्र्वा , तुळस, बेलपत्र यांनी परडी भरुन जाते आणि देवघरात यांचा संमिश्र सुवास दरवळायला लागुन वातावरण एकदम प्रसन्न होतं .

From mayboli

From mayboli

कुर्डु
From mayboli

सहस्र कुर्डु तुरे

From mayboli

पहिल्या दिवशी जो पूजा करेल तोच पुढे संपूर्णा पर्यंत पूजा करतो. याला घटी बसणे असे म्हणतात. सकाळी गुरुजी येऊन देवीची पोडषोपचारे पूजा ,अभिषेक, देवीचे सहस्रनाम पठण , ( त्यावेळेस तिळाची किंवा कुर्डु ची फुलं प्रत्येक नावागणिक वहातात) नंदादीप प्रज्वलन , झेंडूची माळ लावणे , आरती इ. कार्यक्रम होतात आणि नवरात्र उत्सवास प्रारंभ होतो. समईच्या शांत प्रकाशात देवीपुढे नतमस्तक होताना तिची कृपा आपल्यावर नेहमीच राहिल या विचाराने खूप आश्वस्त वाटतं.

दुपारी ब्राह्मण, सव्वाष्ण , घरातली मंडळी, प्रसादासाठी आलेली पाहुणे मंडळी यांची माजघरात पंगत मांडली जाते. निगुतीने वाढप केलेली केळीची पानं पंगतीची शोभा वाढवितात. हसत खेळत जेवणं होतात. नऊ ही दिवस कांदा लसूण विरहीत स्वयंपाक असतो. पहिल्या दिवशी आणि शेवटच्या दिवशी रस-वडे, घारगे आणि लाल भोपळयाची भाजी, पंचमीला तांदळाच पक्वान्न जसं की मोदक किंवा घावन घाटलं, अष्टमीला पुरण हे ठरलेल असतं. इतर दिवशी मग खीर , केशरीभात ,श्रीखंड- पुरी असं काही ही करतात.

संध्याकाळी परत स्नान करुन सोवळयाने देवीची सायंपूजा करतात आणि त्या नंतर सगळयांच्याच लाडक्या आरतीच्या कार्यक्रमाला सुरवात होते. आरती साठी झांजा तर असतातच पण आमच्याकडे पेटी, तबला आणि मृदंग ही असतात जोडीला. घरातलीच मुलं वाजवतात. त्यामुळे आरत्या खुप रंगतात. नेहमीच्या आरत्या तर म्हणतोच पण एक खुप जुनं आरत्यांच पुस्तक आहे आमच्याकडे त्यातल्या ही आरत्या म्हणतो. त्यापैकी " अरे माझ्या गोपाळकृष्णा" ही कृष्णाची, " महालक्ष्मी करवीरक्षेत्री ज्योतिरुप आहे " ही महालक्ष्मीची आणि " जाहले भजन आता नमीतो तव चरणा" हे निरोपगीत माझ्या विशेष आवडीचे. आरत्यांना एक मेंबर अगदी न चुकता हजर असतो तो म्हणजे आमचा जॉनी. मुलांनी झांजा वाजवाय्ला सुरवात केली की हा ओटी आणि माजघर याच्या उंबरठ्यावर पुढचे दोन पाय टेकवून जो बसणार तो आरत्या संपल्या कीच उठणार.

ललिता पंचमीच्या दिवशी नेवैद्य संध्याकाळी असतो. संध्याकाळी ललितेच्या प्रतिमेची सत्यनारायणाच्या पूजेसारखी पूजा असते. चौरंगावर कलश मांडुन त्यावर ताम्हनात ४८ सुपार्‍या आणि ललितेची प्रतिमा ठेवतात आणि तिची षोडशोपचारे पूजा करतात. या पूजेसाठी इतर पूजा साहित्या बरोबर ४८ दुर्वांच्या जुड्या आणि ४८ प्रकारची पत्री लागते. आमच्या आगरातच यातील पुष्कळशी झाडं आहेत. या दिवशी संध्याकाळी सहा साडेसहालाच पंगत बसते.

अशा तर्‍हेने नऊ दिवस कसे जातात आणि संपूर्णाचा दिवस कधी येतो ते कळत ही नाही . संपुर्ण नवमीला असते. ते कधी दसर्‍याच्या दिवशी तर कधी त्याच्या आदल्या दिवशी येते . ह्या वर्षी दसर्‍याच्या आदल्या दिवशी संपूर्ण झाले. उत्तर पुजा झाली की नवरात्र समाप्ती होते.

पण तरीही दसर्‍यामुळे उत्साह टिकुन असतो. दसर्‍याच्या आदल्या दिवशी संध्याकाळी आम्ही घरच्या वहानांसाठी , दाराला लावण्यासाठी, लहान मुलांच्या सायकलींसाठी वगैरे घरीच केले हार. ते रात्री काठीला टांगुन खळ्यात ठेवले होते, रात्री त्यावर दव पडल्यामुळे ते दुसर्‍या दिवशी ही छान टवटवीत राहिले होते.

From mayboli

दसर्‍याच्या दिवशी वहानांची , सायकलींची, पीसीची वगैरे पूजा केली जातेच पण आमचा प्रमुख व्यवसाय शेती आणि बागायती. शेतीच्या अवजारांप्रती कृतज्ञता व्यक्त करायला दसर्‍या सारखा दुसरा उत्तम मुहुर्त कोणता ? म्हणुन त्या दिवशी कुदळी , फावडी, विळे, कोयते वगैरे सर्व अवजारं घासुन पुसुन एका खोलीत मांडली जातात आणि त्यांचे ही मनोभावे पूजन केले जाते. हा फोटो.

From mayboli

दसर्‍याच्या दिवशी काढलेली रांगोळी

From mayboli

संध्याकाळी घरातले सगळे पुरुष आणि मुलगे सीमोल्लंघनासाठी बाहेर पडतात. गावच्या ग्रामदेवतेचं दर्शन घेऊन गावच्या सीमेवर असलेल्या आपट्याच्या पानांचं सोनं घरी आणतात . ते प्रथम देवाला वाहुन मग घरातल्या सर्वांना देतात आणि मग हा उत्सव संपतो.
असा हा दहा दिवसांचा सण उत्साहात साजरा होतो. पण उत्सव संपला की एक प्रकारचं रितेपण येतं, आणि का ते कळत नाही पण एक प्रकारची हुरहुर मात्र लागतेच...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अगो, धन्यवाद. पहिल्या प्रतिसादासाठी. देव्हर्‍याचा फोटो देऊ की नको या संभ्रमात आहे.

देव्हर्‍याचा फोटो देऊ की नको या संभ्रमात आहे. >>> हो, त्याची कल्पना आलीच म्हणून फोटो का टाकला नाही असं विचारलं नाही.

खुप सुंदर.. या कुटुंबातील सर्व मंडळींना कायम सुखसमाधान लाभो, अशी शुभकामना. प्रत्यक्ष गाठभेट झाली नाही तरी त्यांचे समाधानी चेहरे डोळ्यासमोर येतात.

छान लिहिलेय,

आमच्या गावीदेखील दसर्‍याला नांगरापासुन स्क्रु ड्रायवर, सुई पर्यंत सगळ्या शस्त्रांची पूजा होते. ग्रामदेवतेच्या मंदिराच्या प्रांगणात एका खांबाला आपट्याच्या फांद्या बांधलेल्या असतात. संध्याकाळी आरती झाली की सगळे जण अक्षरशः त्या फांद्या ओरबाडून पाने लुटतात आणि मग ती पानेच सगळ्यांना सोने म्हणून वाटतात.

नेहमीच्या आरत्या तर म्हणतोच पण एक खुप जुनं आरत्यांच पुस्तक आहे आमच्याकडे त्यातल्या ही आरत्या म्हणतो. त्यापैकी " अरे माझ्या गोपाळकृष्णा" ही कृष्णाची, " महालक्ष्मी करवीरक्षेत्री ज्योतिरुप आहे " ही महालक्ष्मीची आणि " जाहले भजन आता नमीतो तव चरणा" हे निरोपगीत माझ्या विशेष आवडीचे.
>>>>
यातले निरोपगीत माहिती आहे, पण इतर आरत्या पहिल्यांदाच ऐकतोय, त्या स्पेशल आरत्या मायबोली वर देता येतील का?

वॉव हेमाताई, अप्रतिम नेहेमीप्रमाणे लेखन आणि फोटोही लवली. अरे वा गावाला जाऊन आलात, मस्तच.

आमच्याकडे कुर्डूच्या फुलांची वाढती माळ असते. (मी त्याला चिमणीचे दात आणि चिमणीचे डोळे म्हणते).

मी नाही अजून नवरात्रात गावाला गेले. अष्टमीची महालक्ष्मी वाडा गावात उभी करतात असं ऐकलंय, त्याबद्दल काही माहितेय का.

समईच्या शांत प्रकाशात देवीपुढे नतमस्तक होताना तिची कृपा आपल्यावर नेहमीच राहिल या विचाराने खूप आश्वस्त वाटतं.>>>>>+१११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११११

अतीशय आवडले हे वाक्य.:स्मित: ममो अतीशय सुन्दर आणी भरभरुन लिहीलस. सर्व सोहळा अगदी डोळ्यासमोर उभा राहीला. सर्वच फोटो आवडले. मी जाऊन आलेय श्री योगेश्वरीला. बरोबर परळी वैजनाथ् पण केले. माझी सासरची देवी श्री रेणूका आणी माहेरची श्री अम्बाबाई ( कोल्हापूर). पण या देवीचे पण दर्शन घडल्याने आनन्द झाला.

अस सतत लिहीत रहा. आम्हालाही नवीन अनूभव मिळत रहातील.

सुंदर लिहिलंय. तुमच्या लिखाणामध्ये मला कायमच एक प्रसन्नपणा आणि समाधानी वृत्ती दिसून येते. तुमचा लेख सकाळी वाचला की दिवसाची सुरूवातच छान झाल्यासारखी वाटते.

वा खरच नेहमी प्रमाणे प्रसन्न सुंदर आणि वाचतच रहाव अस वाटणार लेखन असत तुमच हेमाताई. अजुन लिहीत रहा.

वाह!!किती सुंदर वर्णन करतेस, सोबत फोटोज ही अतिशय सुर्रेख.. खूप छान वाटत राहिलं वाचून संपल्यावरही.. स्मित >>>>> +१११११११

धन्यवाद सगळ्यांना प्रतिसादासाठी. तिकडे खरं तर इतकं छान वाटत होत की जे होत त्याच्या पन्नास टक्के सुध्धा माझ्या लिखाणात दिसत नाहीये.

दिनेश, तुम्ही बरोबर ओळखलतं . ग्रेट आहात. खरचं आमच्या घरातली माणसं खूप समाधानी आहेत. इर्षा, असूया मत्सर या त्रयींना त्यांच्याकडे जरा ही स्थान नाहीये., जे खरोखर अतिशय दुर्मिळ आहे.

अंजू, या वर्षी वाड्यात नव्हती महालक्ष्मी पण पडेलला होती. आमच्या घरातली माणसं गेली होती रात्री दर्शनाला पण मी नव्हते गेले. मी ललिला पंचमीच्या दिवशी रात्री कोट्कामत्याच्या भगवती देवीला गेले होते. ते ही खूप पूरातन आणि सुंदर आहे देऊळ. . देवीची मूर्ती ही प्रसन्न दिसत होती. रात्री घरी येताना आम्हाला कोल्हा, कंडेचोर आणि रानमांजर दिसले.

त्या स्पेशल आरत्या माबो वर टाकते. घरी फोन केलाय त्याच्या झेरॉक्स पाठवण्यासाठी.

अनु, सॉरी फॉर टायपो. कंडेचोर नाही, कांडेचोर.

हा एक वानरा एवढा, काळा, थोडासा केसाळ असा जास्त उपद्रवी नसलेला प्रणी असतो. याला सगळ्या प्रकारची फळं फार आवडतात. कधी कधी घरात ही शिरत ते.

मनीमोहोर, किती सुरेख लिहिल आहेस आणि चित्रही खूप सुरेख आहेत. एकदम भावनिर्मीती झाली आहे हे पाहूण आणि वाचून.

आमच्याकडे पण थोड्याफार फरकाने असेच वातावरण असते. नऊ दिवसांचे नऊ हार करण्याचे काम माझ्याकडे असायचे. रोज एक वेगळे फुल वा पान -असायचे. आता मी परदेशात असल्यामुळे हे सर्व होत नाही पण आई तिच्या परिने घट बसवते.

डोळ्यात पाणी उभे राहिले अगदी इतके निर्मळ लिहिले आहे. देव्हार्‍याचा फोटो बघायला आवडेल.

सुंदर वर्णन! पहिला फ़ोटो देव्हार्‍याचा असेल असंच वाटलं होतं. पण सगळेच सुगंधी फोटो आवडले. हत्यारांच्या पुजेचा फोटो छानच. किती वर्षांनी हे पहायला मिळालं. आम्ही पण अशीच सगळी हत्यारे मांडून पूजा करत असू. वडीलांना पण आठवण झाली होती. रात्रीच ते जुन्या आठवणींत गुंग झाले होते. Happy

Pages