अकोल्यातील खादाडी

Submitted by हर्ट on 27 May, 2009 - 09:41

अकोल्यातील खादाडीबद्दल मी इथे लवकरचं लिहिणार आहे.

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

...

तुमाले मनुन एक नुस्का देतो..
कदिबी भाजीत मसाले टाकल्यावर..मंजी तिखट गिकट सब टाकुन झाल्यावर ,, टाकाचा असन त टोमॅटो टाकाचा ..नसन टाकाचा तरी मसाले तेलात हालवहुलव केल्यावर थोडूस पाणी टाकाच.. त्यान का होते ?
मसाले बरोबर शिजते + पोटाले झोंबत नाई + असल नसल सब्बन तेल मसाल्यापासुन अलग होते अन मंग दिसते थे तर्री..

आलु वांग्याची भाजी + साधा भात अन चुलीवरच शिजलेल वरण..बुंदी.. >> आणि पुर्‍या हा स्वयंपाक तर आमच्या नगर जिल्ह्यातल्या लग्नांमध्ये पण असतो. त्या वांग्याच्या भाजीची खुप आठवण येते. अशी मस्त तर्री असते पहिला घास खाल्ला की डोळ्यातून पाणी Lol

ते वर्हाडी चिकन जबराट दिसतयं अगदी !!

टीना, अमरावतीची एक रूममेट होती, तिला सक्त ताकीद दिली होती, अजिबात स्वयंपाक घरात फिरकायचं नाही. महिन्याचं तेल एका दिवसांत वापरून संपवायची. तिखटापेक्षा मला अति तेल वापरून केलेला स्वयंपाक अजिबात खाववत नाही.

Biggrin
मला तर त्या बिचारीची दया येउन राहिली..ती कशीच खात असेल..
बाकी पिण्याइतपत तेल मी पण नै वापरत घरी पण जेवढ तेल भाजीसाठी ओतल तेवढ पन तेल तर्री म्हणुन वर ठेवते मी मसाले व्यवस्थित शिजवून Wink

मला तर त्या बिचारीची दया येउन राहिली..ती कशीच खात असेल..<<< दया येऊ दे, पण तिची सध्याची पृथुल अवस्था बघता आमचाच सल्ला अतियोग्य होता Proud

जेवढ तेल भाजीसाठी ओतल >>> ओतलं????? आम्ही भाजी-आमटी एक एक चमचा (चहाचा) तेल. Wink

असो. अकोल्याची खादाडी चालू द्या.

Biggrin
चहाचा चमचा..कठीणे माझं Proud
आणि तेलान लठ्ठच होते अस वगैरे अजिबात नै हं..नै त विदर्भातले सगळेच लोक ढेरपोटे असते ना Lol

तेल खाण्यावरुन...

शिळी पोळी, छान दोन चमचे तिखट आणि १ -२ चमचे कच्चे तेल.... असा माझा कधीकधी सकाळचा ब्रेक फास्ट असायचा.

आमच्याकडे तर अजूनही एखादीच शिळी पोळी/ भाकरी असेल तर कुणी खायची यावरून चक्क भांडणं होतात.
शिळी पोळी वर उदय म्हणतोय तसं तेल, तिखट, मीठ > पसरवून रोल करायचा न गट्टम करायचा. अगदी ५/७ पोळ्याही आरामात खाल्या जातात.
अजून व्हेरीएशन्स - काळा मसाला + तेल + मीठ || मेतकूट + तेल + मीठ || नुसतं तेल + मीठ || तूप, मीठ || तूप साखर (पण हे पोट्याईकरता) || कारळाची/ तिळाची/ दाण्याची/ कढीपत्यांची/ जवसाची चटणी + तेल + मीठ.
जरूर करून पाहा हे प्रकार. रात्रीच २/४ पोळ्या जास्त करून ठेवायच्या. सकाळी अगदी २ मिनिटांत नाश्ता तयार.

जास्त पोळ्या असतील तर ढीगभर कांदा मस्तपैकी परतून त्याचा कुस्करा. वर हिरवीगार कोथिंबीर. गरमागरम न्याहारी तयार. यात उरलेला भात जर कुणी घातला तर पाप लागतं. तो नुसत्या पोळ्यांचाच खमंग परतून केलेला हवा.

<<जास्त पोळ्या असतील तर ढीगभर कांदा मस्तपैकी परतून त्याचा कुस्करा. >>
----- हे सम्पवण्यासाठी मारामारी...

अजुन एक प्रकार... तव्यावर फोडणी, मुबलक पाणी आणि शिळ्यापोळीचे जाडसर तुकडे... पाण्याला उकळी आल्यावर २-३ मी. ठेवायचे. आजही आमच्या घरात फेमस आहे. (याला कुटके असे म्हणतात ?). जर थोडी फार उरलेली भाजी असेल तर (सम्पवण्यासाठी) टाकायची...

तेलाची आवड मी पाहिलीय. आमची एक काकू(नागपूरचीच आहे) नवीन लग्न झाल्यावर पहिल्यांदा आमच्या घरी आलेली. घरी आईने पहिल्या दिवशी इडल्या नाश्त्याला बनवलेल्या. पण फ्रीझमधला उरलेला भात काढून आई भाताचे काय करावे विचारात किचन मध्ये उभी होती. काकूने काय केले, आईकडे तेल, तवा , कांदा व मसाला मागितला, तेल टाकले तव्यावर, तापलं न तापलं मग त्यावर लाल मसाला आणि उरलेला भात जरासाच परतून मग बशीत काढून त्यावर परत कच्च तेल आणि कच्चा कांदा. खुशीत नाश्ता म्हणून खाल्ला. मला सकाळी सकाळी इडली चटणी नाही आवडत म्हणत.
तिचा दुसरा आवडता नाश्ता म्हणजे, कुस्करलेली भाकरी, मसाला, कच्च तेल आणि ताजा मिरची-लसणाचा ठेचा. वर टंपाळभर काळा चहा.

हा प्रकार तिने आठवडाभर रहाताना रोज आलटून पालटून केला. अगदी आईला कधी भात आदल्या दिवशी ज्यास्त करायला सांगून. नाहितर ज्वारीच पीठ मागवून आदल्या दिवशी रात्री भाकरी बडवायची( ती बडवायचीच कारण इतका आवाज यायचा ती दोन हाताने थापताना भाकरी. :). आमच्याकडे सर्व बाया एकाच हाताने थापतात भाकरी त्यामुळे ती पद्धत नवीन होती.

>>>भाऊ फुग्यात आलू घालसान ते वरण नोका घालजा"

>>>फोकनीच्याहो अकोल्याचे लेकर कुटी न्यायच्या लायकी चे नाई बे हलकटहो!! मह्या दुकानातनी जितल्या मिर्च्या दिवस भर लागतेत तितल्या तुम्ही ८ पोट्याईन संपवल्या लेक!!"

Rofl

सोन्याबापू, तुम्च्या पोस्टी वाचूवाचू हसा येते. मजा आणलीत ह्या धाग्यावर!

वर्हाड - विदर्भातल्या लोकांना 'आमचं नाही बा जमत तिखटावाचून, तुमचा पुचाट स्वयंपाक ठेवा तुमच्यापाशी' असा एक अहंगंड असतो. ह्यात कुठेतरी पट्टीचं तिखट खाणं लै भारी अशी भावना असते. नको तिथे अल्सर्स होऊन मरायला टेकलं की अक्कल ठिकाणी येते. अनेक वैदर्भियान्चे आणि स्वानुभवाचे बोल आहेत. Proud

अहो अनेक म्हणजे सगळे नाही न तै! आम्हाला तिखट आवडते ह्याची लाज ही नाही अन माज ही नाही , हवेचा फरक पडतो चवीत अन खानपान संबंधी सवयीत ! उलटे काही लोकांस मात्र विदर्भ किंवा तिथली संस्कृती म्हणताच काय होते माहिती नाही टाइप केलेले शब्द सुद्धा तुच्छतादर्शक दिसुन येतात! त्यातही अहंगंड का काय म्हणतात तो सापडतोच! (परत इथे काही लोक असे वाचणे महत्वाचे अन तुम्ही तो वाचाल अश्या आशेवर ज़रा ओपनली बोललोय nothing personal and no hard feelings)

विदर्भाच्या हवामानाचा विचार करता तिखट खाल्लं जाणं साहजिक आहे.

जुन्या कॉटन मार्केटात बद्री म्हणून एक हलवाई आहे. त्याची जिलबी अफाट असते. गांधी चौकात पूर्वी सोना कोल्ड्रिं हाऊस होतं. तिथे बदाम शेक मस्त मिळायचा.

अकोल्यात पूर्वी यादवराव नावाचे एक आचारी होते. अकोल्यातल्या सगळ्या जुन्या, मोठ्या, महत्त्वाच्या अशा विविध प्रकारच्या घरांमधल्या मंगलकार्यांत तेच असायचे. अजूनही त्यांच्या हातचं लग्नाचं जेवण आठवतं. तसा मुगाचा हलवा पुन्हा कधी खाल्ला नाही.

<<अकोल्यात पूर्वी यादवराव नावाचे एक आचारी होते.>>
------ येस... नाव एकले आहे... यादवराव यान्च्या स्वयम्पाकाची स्तुती माझे वडिल नेहेमी करायचे, सर्व परिचितान्च्या लग्नासाठी त्यान्च्या नावाची दिलखुलास शिफारस करायचे.

मी १९८० मधे काही काळ गेलो...

खादाडीसाठी अकोला, अमरावती, नागपुर ट्रीपा मारायच्या गोष्टी करणारे लोक्स जरा जपून.
हे पदार्थ तिथल्या लोकांना जवळचे वाटतात एवढेच लक्षात घ्या. त्यातही तिथली संस्कृती आणि हवामान वेगळे आहे.

बर्‍याच वर्षापूर्वी नवीन लग्न झालं तेव्हा फारच कौतुक एका अमरावतीच्या 'गड्ढा' नावाच्या हॉटेलाच. घरातल्या पब्लिकला चोरुन तिकडे नेलं होतं. तिकडली घाण बघून नव्या नवरीला चक्करच यायची बाकी होती. त्यात ते तिखटजाळ, अति तेलकट पदार्थ. 'यात काय चांगलं आहे रे ?' - असं मी थक्कं होऊन नवर्‍याला विचारलं होतं. त्याने 'पूर्वी फार चांगले खाद्यपदार्थ मिळायचे. मी सुद्धा बर्‍याच वर्षात आलो नाही'. असं उत्तर दिलं.
नवीन लग्न होतं, पुरेशी ओळख नव्हती, आणि ठरवून वगैरे केलेलं लग्न. हा असा नवरा ? असं मला झालं होतं. असो.

आता इतक्यावर्षांनंतर पुलाखालून इतकं पाणी वाहून गेलय की स्ट्रीटफूड खाणारी मीच उरलेय, त्यामुळे तुच्छ कटाक्ष मला मिळतात.
आमच्या विदर्भातल्या नवर्‍याच्या मते पुण्यातले माझे आवडते 'वैशाली' जाम ओव्हरर्‍एटेड आणि बेकार आहे. एकही खाद्यपदार्थ धड नाही. आणि त्याने असं म्हटल्यावर मला फार म्हणजे फार राग येतो. अजूनही.

तात्पर्य : आपल्याला जे 'अन्न' गोड लागतं आणि वाटतं त्यात perception चा भागच जास्त आहे एकुणात.

सोन्याबापू, तुम्ही ओपनली बोला, आम्ही काही जिवाला लावून घेत नाही. जन्मापासून लग्नापर्यंत सगळी वर्षं विदर्भातच काढलीत. gustatory facial sweating माहिती आहे. तिखट का खाता हा मुद्दाच नाही. एकूणच 'तिखट खाऊन हजम करता येणं' म्हणजे फार भारी वाटणं आणि न खाणारे पुचाट वाटणं हा आहे. कितीही डिनाय केलं तरी तिखट खाणार्‍या वैदर्भियांमध्ये थोड्याफार फरकानं ते आहे हे नाकारता येणार नाही. कबूल करा, नका करू. Happy

धागा थोडा अवांतर होतोय पण विषय निघाला म्हणून बोलतो.
खाण्यापिण्याची गोष्ट निघाली की वर्‍हाडी माणसं जरा अतिच अहंगंडाने बोलतात हा नेहमीचाच आरोप. पण त्यामागचं कारणही समजावून घेणं आवश्यक आहे.

वर्‍हाड हा आताआतापर्यंत म्हणजे आजच्या महाराष्ट्रात येईपर्यंत अत्यंत संपन्न, सुबत्ता असलेला प्रदेश. आमचे ९०वर्षीय आजोबासुद्धा अजूनही कधीकधी 'वर्‍हाड वर्‍हाड सोन्याची कुर्‍हाड' म्हणतात. जुन्या वैभवाच्या गोष्टी सांगतात.

तूर, मूग, ऊडीद, भुईमूग, भाज्या, आंबे,इतर फळं इ.इ. इत्यादीचं भरपूर उत्पादन. कोरडवाहू शेती जास्त असली तरी पावसाची जवळपास हमी असलेला हा भाग. आणि अत्यंत सुपीक काळी माती. इथले कास्तकार मित्र यावर जास्त प्रकाश टाकू शकतात. राजकीयदृष्ट्याही जवळपास स्थैर्य. इथे कधी फार मोठ्या लढाया , युद्ध वगैरे झाल्याची माहिती नाही. आणि अल्पसंतुष्टता. त्यामुळे एक आपोआपच कंफर्टेबल लाईफस्टाईल , आरामशीर मनोवृत्ती तयार झाली.

आणि माणसाची सुबत्ता,आर्थिक स्थिती ताबडतोब कशात झळकत असेल तर ती खाण्यापिण्याच्या सवयीत. त्यामुळे इतर प्रांतांच्या लोकांना वर्‍हाडी माणसांच्या खाण्यापिण्याच्या सवयी विलासी, उधळमाधळ करणार्‍या वाटतात,यात नवल नाही. अघळपघळ वागणं, अरबटचरबट खाणं, अद्वातद्वा बोलणं, हास्यविनोद करणं, आपला भाग सोडून बाहेर जायला असलेली रिलक्ट्न्सी या व अशा वृत्ती हळुहळू डेवलप होत गेल्या.

आमच्या आताच्या पिढीचंस्थलांतर हे प्रामुख्याने बेकारीतून आणि संधींच्या अभावातून आलेलं आहे. पण मागच्या शतकापर्यंत हा ट्रेण्ड उलटा होता. इथे खाण्यापिण्याची,रोजगाराची सोय होते म्हणून अनेक लोक जसे मारवाडी, गुजराती, कोकणस्ठ चित्पावन,तेलगू ,बलुची,भैय्ये,शीख इ.इ. आणि फाळणीनंतर प्रामुख्याने सिंधी,पंजाबी असे अनेक लोक इथे आले व इथलेच झाले. त्यामुळे एक मिश्र अशी खाद्यसंस्कृती इथे तयार झाली.असो.

Pages