माझे बाबा,मला उलगडलेले- डायरीच्या नोंदीतून. भाग नऊ

Submitted by किंकर on 19 July, 2015 - 11:48

भाग एक - http://www.maayboli.com/node/54368

भाग दोन - http://www.maayboli.com/node/54425

भाग तीन - http://www.maayboli.com/node/54450

भाग चार - http://www.maayboli.com/node/54489

भाग पाच - http://www.maayboli.com/node/54490

भाग सहा - http://www.maayboli.com/node/54566

भाग सात - http://www.maayboli.com/node/54601

भाग आठ - http://www.maayboli.com/node/54666
डायरीतील नोंद -- असलेली.
शनिवार ता. २३-१-७१ आज स्टे. वेटिंग रूम मध्ये सकाळ उजाडली.कालचा विचार पुढे चालू होता.निर्णय स्नान करून घेण्याची कल्पना.स्नान.

नंतर कार्यक्रम आखला.भारत भ्रमण पायी व रु.५० आरंभी जमवणे आवश्यक आहे काय? W. Ticket सारे विचार मनात घोळत होते.निवेदन व रामकृष्ण मिशन हे विचार मनात आले.निवेदन तयार केले व विठ्ठल मंदिर शहादे येथे रवाना. मनाशी ते विठ्ठलाच्या पुढ्यात वाचून,प्रथम निष्कांचन सराफ होणार.जवळची पुंजी ५०पैसे विठ्ठल पेटीत टाकून आजपासून समाजाच्या जीवावर जगण्याचा निश्चय.

दुपार१२.५५ ....रेयॉन चे मॅनेजर ट्रस्टी बिर्लांपैकी देवळाच्या व्यवस्थापनामध्ये अतिथि अभ्यागत सोय नाही.तशी सोय वैष्णव मंदिरात असते.असे स्थानिक पुजारी म्हणाले. विश्रांती भवनामध्ये पैशांनी सोय व अगोदर नोटीस देण्याचा परिपाठ.देऊळ पालीढाणा शिल्प पद्धतीचे.वाईचा नंदी आणि येथील फात्तरांच्या शिल्प कृती मध्ये वाई उजवी वाटली.
खर्चाचा अंदाज बांधण्याचा कालावधी नमूद नाही. स्त्री मूर्तीमध्ये काही उणीवा. निगा निगराणी चांगली. देऊळ टेकडीवर त्यामुळे प्रसन्नता, संगमरवरी फरशी स्वच्छता ,हिरवळ, पाण्याची सोय, पंडेगिरी नाही. आजच अगदी अनोखे वातावरण. फुटाणे घेण्याची हि सोय राखली नाही. एका केळीवाल्याला विनंती करताच केळ व सिंधी हिंदू खानावळी मध्ये सर्व आवरल तरी डाळ रोटीची सोय.

भोजन, भगवान तेरा भला करे असा आशीर्वाद.स्टेशन शहादवर पुढे टिटवाळा गणेश श्रींची ओढ.असाच काही वर्षांपूर्वी भटकत असता अपूर्ण राहिलेली,कामना पूर्ण करण्याचा मनोदय व लांब दूर जाताना आशीर्वादाची शिदोरी असावी अशा भावनेने दर्शन.

भजन -'कोण असशी तू' भजनानंतर खिरोद्याच्या शास्त्रींकडून आत्मानंदात (श्रोते नसताही) झालेले प्रवचन.मधुकर राव चौधरींच्या गावचा तरुण वय २४ लग्न नाही.अध्यात्म मार्गी कठोपनिषद भाषांतर करण्यात गुंतला असा इतिहास.
बंगालच्या समस्येवर बोलणे.तुम्ही आत्मघातकी आहात,चालू नक्षलवाद्या बंगल्यांना उद्देशून इंदिराजी दोषी.हे विचार रात्री कल्याणमार्गे नागपूर मेलने रवाना. प्रवासात एका मुसलमानाशी आवाज चढवून भाषण,तसेच त्याच्या आजारी मुलाबद्दल सहानभूती.सिंधी व मुसलमान असे डब्यात दोन तट सिंधी स्त्री आपल्या पूर्वीच्या(फाळणी) दुःखांना न विसरलेली

.मुसलमानास उद्देशून सो जाना तो सो जा बारा बरस को रामायणातील कुंभकर्ण उल्लेखावरून हसू.वेळ आल्यावर पाहू दुसऱ्या एका स्त्रीस उद्देशून मी प्रथम माताजीको जगह दि थी असा मुसलमानाच्या तोंडून शब्द्द प्रयोग ऐकल्यावर बरे वाटले.

दुसरे व्यक्ती चित्र रेल्वेमधील जाडजूड मवाली वजा फणसासारखे राकट व्यक्तिमत्व .जीवनाचे तत्व ज्ञान जर जगावयाचे तर ज्या गोष्टी आवश्यक त्या केल्या पाहिजेत. तथापि विचारी वाटला.भगवान को मानते,या आप नही या प्रश्नाचे उत्तर त्याने दिले नाही.परंतु साधू संतांच्या विचारप्रणालीचा अभ्यास.

सूरदास पहिले आत्मा फिर परमात्मा,असे म्हणतो व हे गोपाळ ही कंठी माळ,तुझी तू सांभाळ असे उपवासी पोटी भडकल्यावर म्हणतो,असे त्याच्या बोलण्यात आले.चोर परीस्थीतीने चोरी करतो असे तो म्हणाल्यावर समजा तुमचे हे म्हणणे मान्य करून एखाद्याने तुमचे डबोले पळविल्यास,उदार मनाने त्याला क्षमा कराल काय? हे ऐकल्यावर तो वैयक्तिक मालकी हक्कांबद्दल बोलू लागला तात्पर्य आचार आणि विचार विचार आणि आचार सुसंगत नाहीत.

रविवार ता. २४-१-७१ गाडी पुढे पुढे धावत होती आणि अकोल्याला उतरवयाचा निर्णय घेतला. "मै तो अभी नंगा हुवा है मेरे पास कूछ भी नही है!"असे T.C. ला म्हणण्याचा प्रसंग आला नाही.

पायाला चप्पल लागलेली, केसांचे जंगल वाढलेलं अशा अवतारात चौकशी.आज रविवार सुट्टी पत्ता माहित नाही ११ ला खंडेलवाल टावर पाशी ते ४ ला घर दाढी कटिंग उरकले जाऊन. कृषी विद्यापीठात कोणी मला चपरासी समजले असावे
वाचमन कडून पत्ता घेवून सदगुरु कृपा गजानन प्रसन्न अशा बंगल्यापाशी थकून बसलो असता अचानक दादांची गाठ. स्नान पोहे रात्रो भोजन. झाशीच्या राणीची मुलांना कथा राजेंद्र why so dull ? सायकोलॉजी विचारात घेवून शिक्षण दिल जात नाही हे काय? त्याला येत नाही असे न म्हणता प्रयत्न करणे आवश्यक आहे काय? वाचन.

....................... x ...........................

२५-१-७१ ... -१-७१ सो ... सकाळी गच्चीवर .............. घेत असता पंडितची गाठ पडल्यावर त्यास प्रथम मला येथे ३ दिवसापेक्षा जास्त राहता येणार नाही अशी कल्पना दिली.त्याचे म्हणणे मी अचानक न कळविता जावू नये.

त्यानंतर त्याने महाबळेश्वर सातारा वाई पाली मढ अशा ठिकाणी शोध घेतल्याचे सांगितले.कांतानेही गाडी देऊन सहकार्य दिले. चुलत भाऊ मात्र लाबं राहिल्याचे दिसले. जोडलेले प्रेम अधिक प्रभावी ठरले काय? चुलत घरी सल्ला Go to police सौ. अजून पुण्याला आहे. तिची Reaction विचारण्याचे धैर्य झाले नाही.

She will be continued to live मुलांबद्दल तुला परम वाटत नाही का ? या प्रश्नास कर्तव्य म्हणून उत्तर दिले. श्रीरामाचे देऊळ पाहिले. कृषी विद्यापीठ अकोला देवळाचे त्यातील वचनांमुळे आकर्षण.
.................................... x ................................

२६ जाने. ध्वजवंदन कलेक्टर कचेरीत जाण्या अगोदर स्वातंत्र्य रक्षणाकरिता भगवंताचे अधिष्ठान असले पाहिजे.अशा भूमिकेतून देवदर्शन त्यात झेंडा वंदन वेळ हुकली. आम्ही खऱ्या अर्थाने स्वतंत्र असले पाहिजे श्रीराम देवळातील वचने उदरुत वहीवर केली.

संध्याकाळी कन्याशाळेजवळच्या बागेत. नाथ पै.निगर्वी कोकणात मोटरेबल रस्ता नसतां सायकल वर हिंडले प्रामाणिक आम्ही पार्लमेंट मध्ये जरी बोलत असलो तरी खरे कार्य तुमचेच आहे ग्रामीण कार्यकर्त्यांना उत्तेजन दिल्याचा प्रसंग.

त्यानंतर मला आलेले अनुभव घराबाहेर पडल्या पासूनचे सांगून वही वाचावयास दिली काही खाणाखुणा सांगितल्या. फक्त एकच गोष्ट माझ्या मनात येते ती म्हणजे मुले पुरेशी मोठी झालेली नाहीत,परंतु ही गोष्ट मात्र नक्की कि मी असमाधानाने, चिडून ,रुसून, रागावून, निराश होऊन घर सोडत नसून,तू मला मुलां बाबतच्या कर्तव्याचा विचार कळकळीने करावयाची,जी आठवण देतो आहे त्याची जाणीव ठेवूनच घर सोडले आहे
................................. x .................................

२७ जाने तुझे नक्की ठरले का? याला होय उत्तर देऊन आज जाण्याची आठवण दिली. दादा काय म्हणाले दादांनाही कल्पना दिली आहे. दादांच्या स्वाभाविक शब्द्दाला तुम्हाला आमचा स्वभाव ओळखता आला नाही ...... ४५ वर्षांच्या विचारानंतर झालेली ही स्वाभाविकच परिणीती होय असे सांगितले

दुपारी सर्व गाड्या निघून गेल्यानंतर स्टेशनवर गेल्याने आजचे जाणे उद्यावर लांबले. 'मढे' या भावजयीच्या शब्द्दावरून काही समजावयाला गेलो असता एकेरीवर येवून तुझ्या खड्कुची मिंधी नाही मला फक्त माझा नवरा काय ते सांगू शकतो. तुला लाज नाही म्हणून माझ्या घरी भिक मागवयाला आलास. बायकोला ठेवलीयाय तिथ आणि इथ गिळायला आलाय स्टेशनवर वाटले तर ट्रंका उचलाव्यात etc..

-----------x----------------

आज सकाळी १० च्या सुमारास अकोला सोडले. for Nagpur राम कृष्ण श्रमाबरोबरच रेशीम बाग मनात घोळत होती. संध्याकाळच्या प्रार्थनेच्या वेळी राम कृष्णाश्रम ,नागपूरला हजर झालो.

पद्धत treatment प्रार्थनेनंतर कुणी प्रसादाचे राहिलय का? अगर इथे का बसला अशा प्रश्नातून संधी घेऊन ओळख करून द्यावयाचा विचार होता.परंतु बराच वेळ गेल्यानंतर स्वतःच एका स्वामींना मनोगत सांगितल्यावर त्यांनी Bengal is disturbed असे सांगून परावृत्त करण्याचा प्रयत्न .

परंतु शेवटी as you are adomnant you may go म्हणाले मी ते काय को ऑपरेशन देवू शकतात विचारल्यावर नियमांकडे बोट दाखवून No shelter for night . he is nor free to take such decision ......असे त्यांचे ऐकून स्टेशन कडे .via झाडाच्या तळातला गणपती पाहून Third class waiting रूम मध्ये मुक्काम.

डायरीतील नोंद-मला समजलेली -

या भागातील डायरीची नोंद प्रवास एका नव्या टप्यावर पोहचल्याची माहिती देतो. महाबळेश्वरापासून पायी झालेला माणगाव ... पाली महड ..खोपोली मार्गे कल्याण असा प्रवासाचा पहिला टप्पा संपल्यानंतर त्यांच्या मनात देवाच्या शोधाच्या प्रेरणेतून भारत भ्रमणाची कल्पना साकारली आहे.

फक्त निरुदेश भटकणे असते तर त्यांनी, कसलाही संग्रह न करण्याचा केलेला निश्चय, मग प्रथम रु. ५० गोळा होणे जरुरीचे असे ठरवले आणि कसलाच साठ करयचा नाही,समाज काळजी घेईल असे म्हणत,स्वतः जवळ असलेले ५०पैसे हि त्यांनी,देवासामोरील दानपेटीत टाकले

.त्यावेळी मनातला निश्चय पूर्ण होईल,तसेच हा समाजच माझी काळजी घेईल,हि त्यांची अंतरीची श्रद्धा मला वंदनीय वाटते.

हा प्रवास सुरु असताना वाटेत अकोला येथे ते त्यांच्या भावाचे घरी जातात. प्रत्यक्षात पत्ता माहित नाही ऐकलेल्या परिसरात अंदाजाने चौकशी सुरु , आणि अचानक वडिलांना आजोबाची भेट होणे हे सहजतेने नोंदवलेले योग देखील मला अचंबित करतात.

घर सोडून प्रवास करताना ते अकोला येथे भावाचे घरी आले तरी मुळ संकल्पापासून दूर जायचे नाही हे नक्की असल्याने दुसऱ्याच दिवशी त्यांनी भावास मला येथे तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस राहता येणार नाही. असे सांगितले.

त्यावर माझे काका यांनी वडिलांना खूपच समजावण्याचा प्रयत्न केला, त्यांनी न कळवता घर सोडण्यातून निर्माण झालेल्या अडचणी,त्यांच्या शोधासाठी तेंव्हा केलेली धडपड त्यांना सांगितली.पण त्यांनी त्याकडे तटस्थतेने पाहिल्याचे दिसते.

माझ्या काकुस माझे वडील, काम धंदा न करता आता भावाचे घरीच ठाण मांडणार, अशी वाटलेली अनाठायी भीती व त्यातून झालेला संघर्ष हे प्रत्येकाचे विचार आणि संसार चालवताना जगाकडे पाहण्याचा दृष्टीकोन, कसे भिन्न असतात याचीच साक्ष देतात.

पुढे अकोल्यानंतर नागपुरात रामकृष्ण मठात अपेक्षित सहकार्य न मिळून देखील कसलेही किल्मिष मनात न ठेवता त्यांनी स्टेशनवर रात्र काढली. एकूणच अडचणींकडे त्यांनी खूपच निग्रहपूर्वक व त्रयस्थ वृत्तीने पाहिल्याचे पदोपदी दिसत आहे.
(क्रमशः)

Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचतो आहे. प्रसंगाप्रसंगातून एखाद्याला समजावून घेणे तसे अवघड आहे. तुम्ही जे डायरीचे स्पष्टीकरण देत आहात त्यातून थोडे फार उमगत आहे.
कृपया पुढील भाग लिहावेत ही विनंती.

वाचतेय! दैनंदिनीच्या माध्यमातून वडीलांना समजून घेण्याच्या तुमच्या प्रयत्नांचे कौतुक वाटते.