माझे बाबा,मला उलगडलेले-डायरीच्या नोंदीतून.भाग तीन

Submitted by किंकर on 28 June, 2015 - 09:58

भाग एक - http://www.maayboli.com/node/54368

भाग दोन - http://www.maayboli.com/node/54425

डायरीतील नोंद -- असलेली
अनासक्त योग पाण्यात राहून कमलपत्र लिप्त होत नाही, भाषा समजायला सोपी,पण आच्रायला अवघड. एरवी संथ असणाऱ्या सागरावर ६०-६० फुट उंचीच्या लाटा उठाव्यात,त्या वादळग्रस्त मनस्थितीत नव्हे,तर सदाच समुद्र सपाटी पासूनची उंची मोजली जावयाची, त्या पृष्ठभागावरचा स्थिर बुद्धीचा,जीवनाची उलथापालथ घडवून आणणारा निर्णय.

अविवेकी, वादळातील स्थिर मनो वृत्तीचा नसून वादळाला हाक मारून अंगावर घेण्याचा.काही जणांना वाटणे आणि नाही तरी कोलंबसाचा बेभान साहसी पणा, पक्व मुरब्बी खलाशांच्या दृष्टीने. कदाचित मूर्खपणा,म्हणून मूल्यमापन होण्याची,सारी क्षणचित्रे नजरे समोरून सरकवत निर्णयाशी स्थिर होत,कारण हो अखेर स्वतःच घ्यावयाचा असतो.

भोवतालच्या साऱ्या पसाऱ्याची वाढ,जणू आपल्यालाच घुमारे फुटून झाली आहे हे माझे, मी,माझे, आप्त स्वजन कोणी नव्हेत व याहून हि मोठी निष्ठा असणे शक्य आहे अशी शिकवण ,श्रद्धा होती तरी तसा प्रसंग आचरून अनुभवणे म्हणजे "अपुले मरण पहिले म्या डोळा"

आणि ती निष्ठा म्हणजे... माता,पिता,बंधु जीवांचा जिव्हाळा तू एक गोपाळा माता, तो मायापाश तिच्या मृत्यूनंतरही अमरत्वाने बांधू पाहणारा.पिता वृद्ध ज्याची काठी आपण व्हावयाचे ज्याची कावड आपण वाहवयाची त्यालाच श्रावणबाळाने पाणी पुरवण्यास सांगण्यासारखे बंधू जो उर्मिलेलाही प्रसंगी डावलून रामाच्या साथीचा जाणूनबुजून निर्णय घेण्यास स्वतः सिद्ध.

सौ. कुलवंताची कन्या,नाहीं भूलणे वैभवाला,अयोध्येची राणी लाडकी गेली वनवासाला,पती करता कोणतेही आग्निदिव्य करावयाला (सिद्ध) तयार,चिमणी पाखरे .... दोन पुत्र,एक कन्या जरा लाडावलेली आत्मज.

घे कुढार, चल उगार,घाव आता घाली चल , कुऱ्हाड आपली आपल्यावरच चालवायची आहे. उडी अंधारात घ्यावयाची आहे.नाही, आतला आवाज म्हणत होता तू सुखाच्या शोधार्थ निघालेला सिद्धार्थ आहेस . आता मागे फिरू नकोस.खरच, आयुष्यात मी सुखी आहे का? का असमाधानाची अतृप्त भावना माझा पाठलाग करते आहे.

सारी पृथ्वी हिरवीगार सस्यशामाल आहे आणि माझ्या मनात समाधाना- बरोबर असमाधान तुडूंब भरून वाहत आहे.एका कोळियाने नाउमेद न होता , न खचता प्रपंच आकारावयास आणावयाचे नाना तऱ्हेने नाना यत्न केले होते.

परंतु तेच,तेच ध्येय मात्र ठेवले नव्हते.complete detachment या प्रयोगात्मक अवस्थेने भारावून तिचा जबरदस्त पगडा मनावर घेऊन हालचाल होत होती. या हालचालीत हरीवर हवाला अशी निर्भयता होती.

व्यथितता मनाला स्पर्श करीत नव्हती आणि ३१ डिसेंबरचा पगार हातात घेऊन,उद्यापासून मी कामावर येणार नसल्याचे,मालकांना सूचित केले.त्यांनी कारण विचारले ? कारण काय सांगावयाचे ? अखेर राजीनाम्याचा पर्याय पुढे आला.

नोकरीवर हक्क ठेवण्याची कल्पना,दुरूनही मनात प्रवेश करू शकली नाही.स्वखुशीने राजीनामा,बंधमुक्त, पाशरहित याने प्रभावित होउन घराची वाट धरली. नोकरी करीत असता त्तुझ्या डोक्यावर काही बोजा होता? आता कसे? असे विचारीतच घरी आलो.

स्वभाव तसा शांत, समजूतदार परंतु या मानस सरोवरातून,शीघ्रकोपित्वाचा मासा कसा अलगद उडी मारावा,याची कल्पना वर्षा ऋतू संपल्यावर,रंकाळा तुडूंब भरलेला असावा आणि कित्येक हंगामातही घीवाराच्या हाती न गवसलेली,छोटीशी मछली नकळत पुरेशी मोठी व्हावी आणि तिच्या संचारला तो तलावही अपुरा पडावा.

तसे पहिले तर एकदा दोनदा तीनदा संधी देऊनही,सुधारणा घडली नाही तर अंतर्यामी शांत असूनही,जगावर सात्विक संतापाचा हक्क बजावण्याचा,अधिकार सोडावयाची तयारी नाही.कारण जगाचा अनुभव हि काही वेळा It is dangerous to be too good असा आलेला.

प्रयोगाकरिता घर सोडावयाचे ठरले.परंतु ते कसे सोडावयाचे ? सुऱ्ह्दांचा निरोप घ्यावयाचा, परंतु कसा ? भरीत भर घरी पाहुणे आलेले. साऱ्यांशी व्यवहार कसे करावयाचे ?

Water tight compartments. सार, मन एकच परंतु एका भिंती पलीकडील हालचाल,दुसरीकडे कळता कामा नये. बेत अंमलात येण्यापूर्वी फुटला तर,सुभाष बाबू काबुलमार्गे जर्मनी जपानला जाणार कसे. आमच्याच कंपनी सरकारच्या सक्त नजरकैदेत,चौकी पहाऱ्यात आम्ही अडकून पडण्याची हुकमत.

दुसऱ्यावर तो तारो व मारो,अशा विश्वासाने विसंबून राहण्याचा धोका जाणून बुजून पत्करण्याचा पत्नीचा स्वभाव.ती नसतानाच दूर जाण्याचा निर्णय अमलात आणावा, आणि म्हणतो ती वेळ जवळ येवून ठेपली.

डायरीतील नोंद-मला समजलेली --

आपल्या समाज रचनेत दुर्दैवाने,माणूस गरीब कि श्रीमंत,यावर त्याची यशस्विता मोजली जाते, पण त्याच्या कुटुंबाबाबत असणाऱ्या आपुलकीच्या भावना,या काही पैशात मोजल्या जात नाहीत. आणि म्हणूनच,दोन वेळचे जेवण हि सुद्धा जिथे कसरतच होती ते घर सोडताना,माझ्या बाबांची झालेली घालमेल,या नोंदीतून ठायी ठायी दिसते.

यामुळेच मनाची घालमेल नोंदवताना त्यांनी त्यांच्या निर्णयाचे परिणाम,ज्याज्या नाते संबंधांवर होणार होते,त्या नात्याची निरीक्षणे सहजच नोंदवली आहेत.त्यामुळेच,हि नाती नोंदविताना खरोखरच त्यांच्या अभ्यासू वृत्तीची साक्ष पटते.

त्यामुळे घर सोडण्याचा निर्णय मनाशी झाला तरी,त्याचे परिणाम थेट ज्या नात्यांवर होण्याची शक्यता आहे,त्याबाबत लिहताना त्यांनी, त्यांच्या वाचनातील आठवणी व संत साहित्याचा वापर केल्याचे दिसून येते. आणि म्हणूनच ते म्हणतात -"अपुले मरण पहिले म्या डोळा" आणि ती निष्ठा म्हणजे... माता,पिता,बंधु जीवांचा जिव्हाळा, तू एक गोपाळा.

पुढे जावून त्यांची आई, जी त्यांच्या लहानपणीच गेली होती,तिच्या आठवणीने हळवे होत,ते म्हणतात,"तिचा मायपाश अमरत्वाने बांधु पाहणारा आहे." त्यांच्या नोंदीत असणारे,छोटे छोटे संदर्भ इतके अर्थपूर्ण आणि अंतर्मुख करणारे आहेत कि, खरोखर त्यावरून घर सोडून संसाराकडे पाठ फिरवून चालू लागणे म्हणजे,जगाच्या दृष्टीने तो जरी पळपुटेपणा वाटत असला असला तरी, तो निर्णय इतका अविवेकी नक्कीच नव्हता.

आणि त्यामुळेच,त्यांना वडिलांना आधार देण्याचे काळात दूर जाणे,लक्ष्मणा सारख्या भावाची आठवण येणे,पत्नी व मुले यांच्या अस्तित्वानेच व्याकूळ होणे,याच बरोबर आता मागे फिरणे नाही, हा मनाचा निग्रह देखील त्यांनी तितक्याच ठामपणे नोंदवलेला दिसतो.

मनाची हि अवस्था स्पष्ट करताना,त्यांनी स्वतःची तुलना नकळत सिद्धार्थ आणि सुभाष बाबू या व्यक्तीमत्वांशी केली आहे. मला पूर्ण जाणीव आहे कि सिद्धार्थ आणि सुभाष बाबू हे किती थोर आहेत,त्यांचे कार्य किती मोठे आहे,पण म्हणून माझ्या बाबांच्या मनातत्याची आठवण येण्याने, मनाच्या घालमेलीची उंची समजते.

सरकारी नोकरी असून ती न टिकणे, नवे शहर,नवी नोकरी,यातून मार्ग शोधत संसाराची घडी बसवणे,हे सुरु असताना,पुन्हा एकदा नवी नोकरी सोडून देण्याचा,निर्णय घेताना देखील त्यांनी स्वतःचा,निर्णय ठाम ठेवला होता असे दिसून येते.
आणि सर्वात मोठा अडसर म्हणजे,सर्वात नाजूक असे पती पत्नीचे नाते. त्याची जाणीव असल्याने प्रत्यक्ष घराबाहेर पडताना,त्यांनी माझी आई घरी नसण्याची वेळ निवडली. एकूणच हा सर्व भाग वाचताना वर वर,शांतपणाने घर सोडून चाललेले,माझे बाबा,किती म्हणून अस्वस्थ होते याची साक्ष ठायी ठायी दिसून येते. (क्रमशः)

भाग चार.- http://www.maayboli.com/node/54489

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सॉरी तुमच्या वडीलांची भाषा अजीबत समजली नाही. खूपच कोड्यात वाटली.
मग नंतर तुमची टीप्पणी वाचली तेव्हा कळली.

मला फक्त आईचे काय झाले असेल ह्याने वाईट वाटले.

कारण काय असतं ना, नात्यात जर एकाचा निर्णय जो काही झाला असेल तर त्या निर्णय घेणार्याला वेळ मिळाला असतो, वा त्याने वेळ काढला असतो. त्यावर त्याच्या परीने समजूत काढली असते आणि मूळात तो त्याचा स्वःताचा निर्णय असतो. त्यामुळे त्यात धक्का , त्रास पचवायला त्याची तयारी झालेली/केलेली असते.

पण कुठलीच तयारी नसताना, कलपना नसतना , जोडीदाराने त्याचा निर्णय थोपवला जर दुसर्‍या जोडीदारावर तर तो धक्का कठिण असु शकतो असे आढळलेय्/पाहिलेय.

असो. पण काय होत असेल व का करत असावीत असे निर्णय अशी समजूतदार वाटणारी माणसं हे देखील एक कुतुहलच आहे.

फार अस्वस्थ मनस्थितीमधे लिहिलेले दिसतेय. आता त्याचा अर्थ लावणे कठीण आहे. तरीपण ही मालिका संपल्यावर परत एकदा सलग वाचावे लागेल.

वर्षू नील , स्वाती२, दिनेश.-अगदी खरे आहे , त्यावेळी बाबा आणि त्यानंतर आई हे कोणत्या मनस्थितीतून गेले असतील ? कल्पनेने पण मन थरारते हेच खरे .
देवकी,-झंपी,- आई ने कसे निभावून नेले ती तीच जाणून असणार . कारण आम्ही तिन्ही भावंडे लहान होतो.

.

.