मंगलप्रसंगी ध्वनिप्रदूषण: एक शोचनीय बाब

Submitted by अतुल. on 14 May, 2015 - 02:34

दिम अवस्थेत समाज होता. पाण्याच्या नदीच्या आसपास छोट्या वस्त्या पाडे करून लोक राहत. दळणवळणाची/संवादाची काहीच साधने नव्हती. त्यामुळे लोक जवळजवळ एकाच ठिकाणी आयुष्य काढत (समाज म्हणजे एक मोठ्ठे "बिग बॉस" चे घरच होते जणू). स्वाभाविकपणे सोयरिकी सुद्धा आसपासच्या भागातच जमवत आणि लग्ने उरकून घेत असत. लग्न म्हणजे बंधन. एकदा ते झाले कि बस्स. त्यानंतर भिन्नलिंगी व्यक्तीबरोबर मैत्री गप्पा म्हणजे सगळीकडे "ब्रेकिंग न्यूज" व्हायची. त्यातून भांडणे तेढ युद्धाचे प्रसंग कौटुंबिक शत्रुत्व सामाजिक कटुता इत्यादी निर्माण व्हायचे. हे सगळे पुढचे कटू प्रकार टाळण्यासाठी म्हणून मुलाचे/मुलीचे लग्न झालेले आजूबाजूच्या सगळ्या वाड्यांना वस्त्यांना कळणे "आत्यंतिक आणि सर्वाधिक महत्वाचे" असायचे. पण लग्न झालेले सगळ्यांना कळणार तरी कसे? मग कुणाच्यातरी सुपीक डोक्यातून कल्पना आली असावी कि लग्न करत असताना वाजवायचे. जोरजोरात वाजवायचे. ताड ताड धाड धाड दाण दाण!! असे वाजवायचे, असे वाजवायचे कि बस्स! दूर दूर वर सर्वांना कळले पाहिजे. चर्चा झाली पाहिजे. जेणेकरून आजूबाजूच्या सर्वांना "त्याचे आणि तिचे लग्न झाल्याचा मेसेज जाणे" महत्वाचे.

पुढे शेकडो हजारो वर्षे गेली. गाड्या वाहने आली. नोकरी धंद्याच्या निमित्ताने माणसे इकडची तिकडे होऊ लागली. एकत्र कुटुंबपद्धती गेली. सामाजिक स्थित्यंतरे झाली. पण वाजवण्याची प्रथा मात्र तशीच अखंड सुरु राहिली. आणि आज काय होते? एका शहरातला मुलगा शेकडो किलोमीटर वर असलेल्या दुसऱ्या शहरातल्या मुलीशी लग्न करतो. हे लग्न दूर कुठेतरी तिसऱ्याच ठिकाणी असलेल्या कार्यालयात होते. मग? मुलगा लग्नाला निघताना मुलाच्या घरी वाजवतात. मुलगी निघताना मुलीच्या घरी वाजवतात. आणि जिथे लग्न होते त्या कार्यालयात तर अजून जोरात वाजवतात. विशेष म्हणजे तिथल्या आसपासच्या लोकांचा यांच्याशी सुतराम संबंध नसतो, पुढे येणारही नसतो. तरीही कार्यालयाच्या आसपास वाजवतात फटाके फोडतात. संपूर्णपणे तर्कहीन आणि असंवेदनशील प्रकार. आणि सर्वात कहर म्हणजे लग्न करून हे दोघे लांब कुठेतरी तिसऱ्याच शहरात/देशात सेटल होतात. जिथे यांच्या लग्नातल्या "वाजवण्याचा" आवाज दूर दूर वरून सुद्धा कुणी ऐकला असण्याची शक्यता नसते.

अरे, मग तुम्ही घरात लग्न कार्यालयात भाड्याने माणसे आणून आणून, त्यांना मूळव्याधीपासून जोर देत ट्रंपेट फुंकायला लावून लावून, त्यांच्याकडून जीवाच्या आकांताने ढोल ताशे बडवून घेऊन घेऊन वाजवायला का लावता? शुभकार्यात मन प्रसन्न होईल कानाला आनंद होईल एवढेच आणि तेवढ्यापुरतेच संगीत आजच्या काळात वाजवणे योग्य नाही का? मन सुन्न आणि कान बधीर होतील असे आवाज आपण मंगल प्रसंगी का करतो? आपल्या शुभकार्यात होणाऱ्या कर्णकर्कश्श आवाजांचा "आसपासच्या _असंबंधित_ लोकांना" नाहक त्रास होतोय हि साधी गोष्ट प्रगत समाजात राहणाऱ्या आपल्याला का कळू नये? कुणी आजारी असला, कुणाला आवाजाचा त्रास होत असला तर त्याची जरादेखील पर्वा न करण्याचा अमानुषपणा आपण आपल्या शुभकार्याच्या प्रसंगी का करतो? फटाके फोडून मोठ मोठे डॉल्बी लावून आसपासच्या लोकांना त्रास देण्याचा आसुरी आनंद आपण आपल्या शुभकार्याच्या प्रसंगी का घेतो? का? का? का?

noise_1586479c.jpg

हजारो वर्षापूर्वी तत्कालीन अवस्थेत निर्माण झालेली प्रथा आजच्या बदलत्या काळात "अनिष्ठ" आणि "अनाठायी" झाली आहे हे कळायला सुद्धा अजून किती पिढ्या जाणार आहेत कोणास ठावूक.

काय करूया?

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

"लग्न न करणे. किंव्हा कोर्टामॅरेज करणे" हा नक्कीच "यावरचा उपाय" नाही Happy "मन प्रसन्न होईल कानाला आनंद होईल एवढेच आणि तेवढ्यापुरतेच संगीत" वाजवणे इतकीच अपेक्षा आहे.

जोरजोरात आवाज करण्यामागे "आपला आनंद इतरांपर्यंत पोहोचविणे" अशी सुद्धा भावना असू शकते. कार मध्ये आपल्या आवडीची गाणी बाहेर सर्वांना ऐकू जातील इतक्या मोठ्या आवाजात लावून "मिरवणारे" महाभाग आहेत. किंवा मिरवणुकीत ठेका असलेल्या गाण्यांचे कानठळ्या बसतील इतके आवाज करत जाण्याची वृत्ती पण आपल्याकडे खूप आहे. यात नाचणार्यांना आनंद नक्कीच मिळत असेल. पण हा आनंद आजूबाजूच्या इतर बऱ्याच लोकांवर लादला जात आहे याचे भान या लोकांनी का ठेऊ नये? हा लोकांच्या मन:शांतीवर केलेला बलात्कारच नव्हे का?

इतरांचा विचार करण्याची विवेकबुद्धी (Consideration for others) जवळ जवळ (भारतीय समाजात तरी) लोप पावली आहे असे अनेकदा जाणवते.

कालबाह्य,अनिष्ट प्रथा रुढी परंपरा पाळणे ही देखील अंधश्रद्धा प्रवर्गात टाकली जाते. त्या पैकी ही एक.ध्वनीप्रदूषणातून काही लोकांना नशा मिळते. अंगात माझिया भिनलाय ढोलिया. सकाळ सारखा वृत्तसमूह हा पाच पाचशे समूह ढोल वादनाच्या स्पर्धा घेतात. डीजे सारखे ध्वनिप्रदूषक यंत्रे निर्मितीलाच आळा घातला पाहिजे, गण्पतीत धार्मिकतेच्या आवरणाखाली नुसता उन्माद घालतात हे लोक.

सहमत आहे बहुतांशी.
म्हणजे माझा आक्षेप सर्वस्वी आवाज प्रदूषणावर नाही, पण त्याचा विनाकारण दुसर्‍यांना त्रास देण्याला आहे.

मागे माझाही एक फटाक्यांसंदर्भात धागा होता.
http://www.maayboli.com/node/51337

तो डीजे म्हणजे तर छळ असतो निव्वळ., कसले ते स्पीकर, छातीत धडधडते त्याच्या आसपास गेलो तर.. जर आपण स्वता नाचायच्या मूडमध्ये नसलो तर जास्तच.. पण हा, स्वत: नाचायच्या मूडमध्ये असलो तर नाही जाणवत काही त्रास वगैरे, एंजॉय करतो, अन त्या मुळे अश्या एंजॉय करणार्‍यांना इतरांच्या त्रासाबद्दल समजत नाही, आणि समजले तरी कोण कशाला इथे कोणाची पर्वा करतोय म्हणा...

इतरांचा विचार करण्याची विवेकबुद्धी (Consideration for others) जवळ जवळ (भारतीय समाजात तरी) लोप पावली आहे असे अनेकदा जाणवते.>>>>>>>> तशी विवेकबुद्धी आधी नव्हतीच असे म्हणावे लागतंय.

>> इतरांचा विचार करण्याची विवेकबुद्धी (Consideration for others) जवळ जवळ (भारतीय समाजात तरी) लोप पावली आहे असे अनेकदा जाणवते.>>>>>>>> तशी विवेकबुद्धी आधी नव्हतीच असे म्हणावे लागतंय.

खरं आहे. मी बरोबर कि चुकीचा विचार करतोय याबद्दल मते असू शकतील, पण मला तीव्रतेने असे सारखे सारखे वाटते कि ह्या गोष्टी म्हणजेच खरे "शिक्षण" आणि शालेय जीवनात _याच_ गोष्टी खरेतर शिकवायला हव्यात. जगायचे कसे शिकवणारे ते खरे शिक्षण. बाकीचे (नोकरी मिळवून देणारे) विषय गौण आहेत.

अजिबात सहमत नाही.

हो, इतरांना त्रास होत असेल… म्हणून बंदी वैगरे हे कारण नाही…।

कितीतरी ठिकाणी (चाळीत वैगरे) त्या परिसरात दरवर्षी १० लग्न होत असतील (गृहीत आकडा)
त्यातील ३ ते ४ जंगी बाकी साधे पणानेच होतात (अनुभवावरून)

आणि त्याचा कुणाला त्रास होत नाही. तशी तक्रार हि कोणी करत नाही…. (पण काही लोक उगाचच त्रास करून घेतात)

पण
मज्जिद मध्ये दररोज पहाटे कोकलणाऱ्या भोंग्याचा त्रास क्वचितच लोकांना होतो ( शोकांतिका)
त्या विरुध्द आवाज काढणारे कधीच दिसणार नाहीत. (का ? ते माहित नाही)

पंधरा दिवसांपुर्वी शेजारी डिजे लागलेला माझ्या घरातून शंभरेक फुटांवरून साउंड रेकॅार्डिंग मोबाइलात करतंना ८० डेसबल दाखवत होते.

माझा आवडता (?) विषय. परिसरातील देवळे, मशीदी, तरूण मंडळे, सांस्कृतिक मंडळे ही सर्व संस्कृतीचा मक्ता घेतल्याप्रमाणे येणारा प्रत्येक सण वा मंगल प्रसंग 'जोरो शोरोंसे' साजरा करतात. देवीचा ऊरूस असेल तर एका गल्लीत एक डॉल्बी याप्रमाणे चार गल्ल्यांमधून चार डॉल्बी व शिवाय मुख्य रस्त्यावर दोन डॉल्बी. मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर अंगविक्षेप करत नाचणारी बिनउद्योगी तरूणाई. रात्री दहा - दहा वाजेपर्यंत माईकवर कोकलून दिली जाणारी भाषणे किंवा लाऊडस्पीकरवर लावलेले शिवरायांच्या वीरश्रीबद्दल किंवा शंभूराजांबद्दल कर्कश्श आवाजातले पोवाडे, मग लावण्या, सिनेमातली थिरकाऊ गाणी आणि त्यांसोबत देवीभक्तांचे मद्यधुंदीतले नाचणे, धुमाकूळ, छेडाछेडी, धक्काबुक्की, भांडणे, हाणामाऱ्या आणि मग वर्षानुवर्षे जोपासली जाणारी तेढ!
हे असे प्रत्येक मोठ्या सणाला कमीजास्त प्रमाणात!

चालू देत. पोलिसांकडे तक्रार करून मर्यादित उपयोग होतो. राजकीय वरदहस्त व अभय लाभलेली मंडळी सुधारत नाहीत. उलट आपल्या जातीचा, क्षत्रियत्वाचा दुराभिमान बाळगून आणखी माज करण्यात वाकबगार होतात हे खरे!

एखादे जरी लग्न असे धूमधडाक्यात साजरे झाले तरी जो त्रास होतो तो सहन करणाराच जाणे. ७/८ टाळ्की नाचण्यात दंग, बापुडवाणे नवरा नवरी - ताटकळलेले, जीव तोडून वाद्ये बडवणारे हे आमच्या इथे नेहमीचे द्रुश्य आहे. आवाजाच्या कंपनांमुळे खिडकीच्या काचाही हादरतात. थोडा वेळ सहन करू शकतो. पण एका मर्यादेपलिकडे नाही. त्यामुळे १०.३० वाजून गेले की पोलिसांना कळवण्याशिवाय उपाय नसतो. पोलिस बर्याच वेळा ऐकतात हे सुदैवच.

@अरुंधती कुलकर्णी: अगदी संपूर्ण सहमत. कर्णकर्कश आवाजाने होणाऱ्या प्रदूषणाबद्दल लग्नाचे उदाहरण देऊन मी पोटतिडकीने लिहिले आहे. आवाजाचे प्रदूषण आपल्या परीने आपण करायला नको अशी माझी भूमिका आहे. "मग तो का आवाज करतो? त्याला का नाही काही कोणी बोलत?" अशा सुरातल्या अर्ग्युमेंट्सना माझ्याकडे काही उत्तर नाही.

आपण वेदना समजून घेतलीत. धन्यवाद.

पावले तुम्ही कन्फ्यूज्ड आत्मा दिसताहात.

तुम्ही बोल्ड करकरून लिहिलंत त्याच्या नेमकी विरुद्ध अर्थाची पोस्ट अकुंची आहे. त्याला तुम्ही परत सहमत कसे?

इतरांचा विचार करण्याची विवेकबुद्धी (Consideration for others) जवळ जवळ (भारतीय समाजात तरी) लोप पावली आहे असे अनेकदा जाणवते.
असे एका उदाहरणावरून एकदम निष्कर्ष काढणे बरोबर नाही. अतिउत्साहाने जो गोंगाट करतात त्याचा त्रास नक्कीच होतो. पण हा विषय सोडला तर अशी अनेक उदाहरणे आहेत की वृद्ध, अपंग लोकांना ओळख नसतानाहि सहज मदत करणारेहि लोक आहेत विशेषतः भारतात.
शिवाय भारतीय म्हणजे काही मोठे वेगळे लोक नाहीत. जगात कमी अधिक प्रमाणात निरनिराळ्या प्रकारे इतरांना त्रास होईल अशी वर्तणूक करणारे लोक सर्व जगात आहेत.

ध्वनि प्रदूषण हे एकट्या मंगल कार्यातच होते असं नाही. एरव्ही सुद्धा उगिचच हॉर्न वाजवत जाणारे लोक कमी नाहीत. पुर्वी परंपरा किंवा इतरांना आपल्या घरात लग्न आहे हे कळावं म्हणून वाजंत्री किंवा सनई वाजवत असतील तरी आता तो प्रेस्टिज इश्श्यू बनला आहे. आणि सनई वाजंत्रीची जागा आता डॉल्बी आणि डिजे ने घेतली आहे. आणि हे नसेल तर तुमच्या लग्नाला काही अर्थ नाही. पंजाब्यांच्यात म्हणे डिजे आणि दारू दोन्ही मस्ट असते. तीच परंपरा येऊ घातली असेल असं वाटतंय. पैशाला तर काय किंमतच राहिली नाहिये आता.

परवा आणखिन एक बातमी वाचली पेपरात. कुण्या एका मुलिचे लग्न तिच्या बहिणीने ऑनलाईन अटेंड केलं म्हणे. आता ते ही फॅड निघेल, म्हणजे अजून एक खर्च.

वधू/वरांना हेलिकॉप्टरमधून लग्नमंडपात आणायचं प्रस्थही आजूबाजूच्या भागात वाढतंय. एका वेळेसाठी पंच्याऐंशी हजार खर्च, ध्वनिप्रदूषण, इंधन अपव्यय वगैरे वगैरे...
'होऊदे खर्च, कार्य आहे घरचं'च्या तालावर 'होऊदे प्रदूषण... ' असा अॅटिट्यूड.

फटाक्यांचे प्रदूषणही लग्नादी समारंभ, वराती, मिरवणुका, सण, जयंती पुण्यतिथी, निवडणुका व क्रिकेट मॅचेसचे वेळी जोरदार चालू असते.

एका शहरातला मुलगा शेकडो किलोमीटर वर असलेल्या दुसऱ्या शहरातल्या मुलीशी लग्न करतो. हे लग्न दूर कुठेतरी तिसऱ्याच ठिकाणी असलेल्या कार्यालयात होते. मग? मुलगा लग्नाला निघताना मुलाच्या घरी वाजवतात. मुलगी निघताना मुलीच्या घरी वाजवतात. आणि जिथे लग्न होते त्या कार्यालयात तर अजून जोरात वाजवतात. विशेष म्हणजे तिथल्या आसपासच्या लोकांचा यांच्याशी सुतराम संबंध नसतो, पुढे येणारही नसतो. तरीही कार्यालयाच्या आसपास वाजवतात फटाके फोडतात. संपूर्णपणे तर्कहीन आणि असंवेदनशील प्रकार. आणि सर्वात कहर म्हणजे लग्न करून हे दोघे लांब कुठेतरी तिसऱ्याच शहरात/देशात सेटल होतात. जिथे यांच्या लग्नातल्या "वाजवण्याचा" आवाज दूर दूर वरून सुद्धा कुणी ऐकला असण्याची शक्यता नसते.>>>>

Rofl

जिथे यांच्या लग्नातल्या "वाजवण्याचा" आवाज दूर दूर वरून सुद्धा कुणी ऐकला असण्याची शक्यता नसते.>>>>

<<

असं कसं?

नंतर दोघांत वाजतं तेव्हा शेजारीपाजारी ऐकतात की!