धुमस

Submitted by बेफ़िकीर on 12 March, 2015 - 10:06

चिदेश गोयलांच्या प्रासादतूल्य हवेलीवर अडीच लाख रुपयांची नुसती रोषणाईच करण्यात आली होती. हवेलीबाहेर असलेल्या त्यांच्याच मालकीच्या मोकळ्या व भव्य मैदानाचे रुपांतर आत्ता एका अजस्त्र पार्किंग लॉटमध्ये झालेले होते आणि तिथे येणार्‍या गाड्यांचे मेक्स आणि मॉडेल्स पाहून स्टाफ तोंडात बोटे घालत होता. मैदानापासून हवेलीच्या आतील प्रवेशद्वारापर्यंत गालिचा होता आणि दुतर्फा उभ्या असलेल्या युवती विनम्रपणे अतिथींच्या हातात एक एक फुलांनी भरलेली लहान लहान परडी देत होत्या. प्रत्येक परडी ही अतीश्रीमंतीचे लक्षण होती आणि परडीबरोबर चांदीचे 'जय जिनेंद्र' असे लिहिलेले लहानसे पान प्रत्येक पाहुण्याला, मग तो लहान असो वा मोठा, भेट म्हणून दिले जात होते. अत्यंत पवित्र वातावरणात एक भारलेपण आलेले होते. आपला समाजातील वकूब, दर्जा, स्तर ह्या सर्वांना पार्क केलेल्या गाडीतच विसरून प्रत्येकजण गालिचावर पाय टाकत होता. संपत्ती, भव्यता ह्यांचे एरवी प्रत्येकाच्या डोळ्यांत सहजच दिसणारे प्रतिबिंब आज नावालाही नव्हते. आज प्रत्येकाचे डोळे खिळलेले होते हवेलीच्या प्रवेशद्वारावर! तेथील तुडुंब गर्दी आणि भली मोठी रांग पाहून समाजातील भलेमोठे उद्योगपतीही स्वतःला क्षुद्र समजू लागले होते. त्यांच्या रूपवान आणि जणू सोन्याच्याच कांतीच्या बायका नाकाच्या थोडासाच वर येईल असा घुंघट घेऊन मान खाली घालून गुलामासारख्या आणि मंत्रावल्यासारख्या रांगेतून सरकत होत्या. प्रत्येकाच्या देहबोलीत एरवी असणारी हुकुमत आज पळून गेली होती आणि तिची जागा घेतली होती एका याचकाच्या आर्त आणि विवश प्रार्थनेने! हवा सुगंधाने ओसंडलेली होती. शेकड्याने माणसे असूनही कुठेही उच्चारव नव्हता. जे हवेलीतून बाहेर पडत होते त्यांच्यापैकी काही ज्येष्ठांना पाहून रांगेतील महिला धावत जाऊन आपले मस्तक त्यांच्या पायांवर टेकवत होत्या. जसजशी रांग आत सरकत होती तसतशी तोंडाला पांढरे कापड बांधलेले आणि शुभ्रवस्त्र परिधान करणारे साधू आणि साध्वी ह्यांची संख्या वाढत जात होती. त्यांच्या आशीर्वादासाठी त्यांच्या पावलांवर आपले नाक ओठ घासण्याची जणू स्पर्धा सुरू असावी असे वाटत होते. प्रत्येक ओठातून पुटपुटल्याप्रमाणे 'जय जिनेंद्र' असा स्वर ऐकू येत होता. कुठेही घिसाडघाई नव्हती. त्या रांगेतील सर्वांच्या संपत्तीची बेरीज केली असती तर एक लहान देश वसवता आला असता. गावोगावीहून आणि परदेशातूनही अनेक लोक आलेले होते. एरवी एकमेकांच्या नरड्याचा घोट घ्यायला आसूसलेले व्यावसायिक स्पर्धक येथे गळाभेटी घेत होते. एरवी समारंभात मिठाई, अत्तरे, फुले, लावण्यवान स्त्रिया आणि अमाप उत्साहाची रेलचेल असे त्या जागी आता गांभीर्य, पावित्र्य आणि समर्पणाच्या भावनेचे मिश्रण होते. प्रवेशद्वारातून आत प्रवेश घेतल्यानंतर जगालाच काय स्वतःलाही विसरण्याची वेळ येत होती. एका मोठ्या मंचकाभोवती साधू आणि साध्वी वर्तुळ करून बसलेले होते. तीन साधू पूर्ण नग्न होते. इतक्या स्त्री पुरुषांच्या घोळक्यासमोर पूर्ण नग्नावस्थेत वावरण्यात त्या साधूंना काहीही अडचण जाणवत नव्हती. आजूबाजूला असलेल्या लोकांनाही त्या साधूंचे तसे दर्शन विचित्र वाटत नव्हते. उलट त्यांच्याकडे अत्यादराने पाहिले जात होते. एका रांगेतून सगळे मंचकाकडे जात होते आणि जवळपास सर्वांच्याच डो़ळ्यांमधून अश्रूंच्या धारा वाहू लागत होत्या. झेपावल्यासारखी शरीरे मंचकाच्या पायथ्यावर कोसळत होती. तिथून उठावेसे कोणाला वाटत नव्हते पण रांगेच्या दबावामुळे निघावेच लागत होते.

ह्या सगळ्याचे कारणच तसे होते.

नियती गोयल साध्वी झाली होती.

नियती गोयल! चिदेश गोयलांची एकुलती एक मुलगी! तिला ना भाऊ ना बहिण! चिदेश गोयलांच्या अफाट, अफाट संपत्तीची एकमेव वारसदार! वय वर्षे अठरा! तारुण्याचे तेज सर्वांगावर चमकणारे! कॉन्व्हेन्ट एज्युकेटेड नियती! दिसायला अप्रतीम! मेडिकलला प्रवेश मिळण्यात अडचण येणे शक्यच नव्हते तिला! कॉलेजच गोयलांच्या सख्ख्या भावाचे होते. गोयलांच्याच तोडीचे दुसरे महान उद्योगपती नेवीचंद मुनोत ह्यांचा मुलगा विजयेन ह्याच्याशी नियतीचे लग्न होणार हे अख्ख्या जैन समाजाला माहीत होते. मान्य तर होतेच होते कारण गोयलांच्या मुलीला मागणी घालण्याची आणखी कोणाची औकाद असणार?

नियती आणि विजयेन ह्यांची मैत्री दिवसेंदिवस खुलतच चालली होती. अ‍ॅरेंज्ड व तेही नुसतेच ठरवून ठेवलेले मॅरेज असल्यामुळे, अजून साखरपुडाही झालेला नसल्यामुळे ह्या मैत्रीत उघड मैत्रीसोबतच एका हळुवार, चोरट्या प्रेमाचाही प्रवेश झालेला होता. रात्रीबेरात्री जागरणे करून एकमेकांच्या टचमध्ये राहणे, शक्य असेल तेव्हा भेटणे, प्रेमाची एकेक पायरी चढून होत होती. मागच्याच आठवड्यात दोघे सगळ्यांना फसवून वैझॅग बीचवर हिंडून आले होते. अर्थातच 'सेम डे रिटर्न'!

विजयेनबरोबर सर्वांच्या अपरोक्ष निर्माण झालेल्या त्या अलवार नात्याचे विविध रंग नियतीच्या चेहर्‍यावर कायम विलसलेले असत. सगळ्यांमध्ये असून नसल्यासारखी नियती चेहर्‍यावर कायम एक लाजरे हसू मिरवत सुखाच्या शिखराकडे बेभान होऊन निघालेली होती. आयुष्य तिच्यासाठी जल्पना करता येणार नाही इतके सुंदर बनलेले होते. आधीच ते वय झळकण्याचे, त्यात नावाला चिंता नाही, त्यात ज्याच्याबरोबर लग्न होणार हे नक्की आहे त्याच्यावरच प्रेम बसलेले आणि जबाबदारी कसलीच नाही. विजयेन तिच्याहून चार वर्षांनी मोठा होता. मुनोतांच्याच व्यवसायात आता उपाध्यक्ष म्हणून रुजू झालेला होता.

गोयलांच्या हवेलीतील नोकरचाकर, गोयलांचे व्यवसायातील सखेसोबती, सगळे नातेवाईक आणि नियतीचे स्वतःचे वर्तुळ! सगळ्यांनाच नियतीकडे नुसते पाहूनच सुखद वाटत असे. योग्य घरात योग्य ज्योतीचा प्रकाश आला असेच सगळेजण मानत! एवढे करून नियतीच्या स्वभावात गर्व नव्हता. घरातील नोकरांनाही ती आदराने व स्नेहाने वागवत असे.

आणि त्या दिवशी सकाळी तो प्रकार घडला. एरवी साडे सात पर्यंत ताणून देणारी आणि जीजी नावाच्या आजींनी बोर्नव्हिटा घेऊन तिला उठवल्याशिवाय न उठणारी नियती पहाटे सव्वा पाचला हॉलमध्ये आली. चिदेश गोयल आणि पत्नी रानी गोयल चालण्याच्या व्यायामासाठी तयार होऊन चहा घेत बसलेले होते. त्यांना नवलच वाटले नियतीला त्यावेळी तिथे पाहून! नियतीदीदी अचानक आलेल्या पाहून नोकर चाकरांमध्ये ही धावपळ झाली. जीजी पहिल्यांना बोर्नव्हिटा घेऊन धावल्या. कोणीतरी रोजच्या शिरस्त्याप्रमाणे लाल गुलाबांचा गुच्छ तिच्यासमोर, तिला सहज दिसेल असा डायनिंग टेबलवर ठेवला. कोणीतरी तिच्या स्नानाच्या तयारीसाठी वर धावले. कोणीतरी पराठा आणि टोस्ट ही तयारी करायला घेतली. तिचा ड्रायव्हर खडबडून गाडी पुसू लागला. आदल्या रात्री त्याला कोणीच सांगितले नव्हते की नियतीदीदी पहाटेच कुठे जाणार आहेत वगैरे!

रानींनी मुलीला विचारले.

"क्या हुवा रे? नींद खुल गयी? या कही जा रही है?"

"मां......"

एरवी दिवसात पहिल्यांदा आई दिसताच 'मम्मा' म्हणून तिच्या गळ्यात पडणार्‍या नियतीच्या घशातून आलेला तो गहिरा, गंभीर स्वरातील मां हा शब्द चरकवून गेला तमाम उपस्थितांना!

"मुझे ख्वाब आया है! मैने सन्यास लेना है"

श्वासच अडकले ऐकणार्‍यांचे! तोंडात जीभच नसावी तसे सगळे मुकेपणाने नुसते तिच्याकडे बघत राहिले. नोकरचाकरांची अवस्था आणखीनच दयनीय झाली. त्यांच्यापैकी जे जैन होते त्यांना त्या गोष्टीचे गांभीर्य नीट माहीत होते. जे जैन नव्हते ते एकमेकांकडे नुसतेच बावचळून पाहात होते.

"अगली पूनमको साधूजन बुलालीजिये मां! मै इस संसारमे अब नही रह सकती"

तो एक क्षण, ते एक वाक्य आणि तो एक प्रचंड हादरा!

रानींनी दोन्ही हात स्वतःच्या तोंडावर दाबून घळघळा रडायला सुरुवात केली. जीजी त्यांना सावरायला धावल्या. गोयलांचा खूप विश्वासातला म्हातारा नोकर भैय्या सगळे विधिनिषेध टांगून गोयलांच्या पाठीवर थोपटू लागला. गोयलांच्या गालावर अश्रूंच्या सरी ओघळल्या होत्या. त्यांचे डोळे निर्जीवपणे नियतीवर रोखले गेलेले होते. बाकीचे नोकरचाकर चुटपुटत लांब लांब सरकत होते. न जाणो आपण काहीतरी भलतेच वागायचो ह्या भीतीने!

कितीतरी वेळाने रानींचा गुदमरलेला आक्रोश कमी झाला. त्यांनी शांतपणे गोयलांकडे पाहिले. गोयल जमीनीकडे बघत राहिले होते. रानी गोयलांना म्हणाल्या......

"सोच क्या रहे हो? शुरू हो जाओ बस्स"

रानींकडे प्रचंड गंभीरपणे काही क्षणच बघत राहणारे गोयल त्यानंतर अचानक उठले आणि घरातील सर्व नोकरचाकरांच्या देखत त्यांनी नियतीच्या पावलांवर डोके टेकवले. त्या पाठोपाठ जीजीची ओढणी स्वतःच्या डोक्यावर घेत रानींनीही डोके टेकवले. आई वडील पाया पडत असताना नियतीच्या चेहर्‍यावरची रेषाही हलली नव्हती. गोयल आणि रानी बाजूला होताच स्वतःची ओढणी मागून घेत ती स्वतःच्या डोक्यावर घेत म्हातारी जीजी ओक्साबोक्शी रडत नियतीच्या पावलांवर कोसळली. कितीतरी वेळ तिने नियतीची पावले आपल्या अश्रूंनी भिजवली. उठून तिने इतर नोकरांकडे पाहताच सर्वांना अर्थ समजला. तत्क्षणी एक रांग तयार झाली आणि नियतीदीदींच्या पावलांवर अनेक डोकी टेकली गेली.

गोयलांच्या सूचनेवरून भैय्याने धावत वर जाऊन एक कॅशची बॉक्स आणली. ती बॉक्स नियतीच्या पावलांवर टेकवत गोयलांनी त्या बॉक्समधील नोटा हवेत उधळल्या. नोकरचाकर आनंदाने बेहोष होऊन त्या नोटा उचलायला धावले. जीजी आणि भैय्या मात्र त्यांच्यात नव्हते. रानी आणि गोयलांच्या चेहर्‍यावर आता अक्षरशः अवर्णनीय आनंद होता. गोयलांनी ओरडतच घोषणा केली......

:जय जिनेंद्र"

सगळे जण पाठोपाठ ओरडले.

गोयल म्हणाले......

"जय साध्वी नियतीजी"

इतरांनी ती घोषणा रीपीट केली.

सहा दिवसांनी पौर्णिमा होती. आणि तोच सोहळा आज सुरू होता.

तीन साधू नियतीला मंचकावर उभे करून तिचे केस आपल्या हातांनी उपटत होते. केस कापायला बंदी होती. धर्माच्या वाटेवर निघायचे असेल तर ह्या वेदना सहन करायलाच हव्यात असा दंडक होता. उपटल्या जाणार्‍या प्रत्येक केसाबरोबर एक लालभडक थेंब उगवत होता. त्या पाठोपाठ नियतीच्या तोंडातून 'जय जिनेंद्र' असा उद्गारही निघत होता. साधू त्यांचे काम रुक्षपणे व त्रयस्थपणे करत होते. पूर्ण वपन व्हायला बराच वेळ लागला. त्यानंतर नियतीला बसवण्यात आले. तिच्या अंगावर एकच सफेद वस्त्र गुंडाळलेले होते. एरवी लावण्याची खाण दिसणारी नियती आता भेसूर वाटत होती. तिच्या चेहर्‍यावर कसलेही भाव नव्हते. रक्ताळलेल्या मस्तकावर कसलासा लेप लावण्यात आला होता. दीक्षा दिली जाणार होती. एका मोठ्या साधूंचे व्याख्यान होणार होते.

मंचकासमोरील रांगेत कोण नव्हते? ज्यांच्या अंगाखांद्यांवर नियती खेळली होती ते होते! ज्यांनी नियतीला आजवर सलाम ठोकला होता ते होते. ज्यांना नियतीने दहा दहा वेळा वाकून नमस्कार केला होता ते होते. तिच्या सख्ख्या मैत्रिणी होत्या. मित्र होते. नातेवाईक होते. भाऊ बहिणी होत्या. आजी होत्या, आजोबा होते. शहरातील यच्चयावत जैन धर्मीय आलेले होते. गोयलांच्या शब्दाखातर व्यवसायाशी संबंधीत व जैन नसलेलेही आलेले होते. ते हा सोहळा पाहून थक्कच होत होते. प्रत्येक जण नियती बसलेल्या मंचावर अक्षरशः कोसळत होता. जणू प्रत्यक्ष देवदर्शन झाल्याप्रमाणे! आणि शेवटी तो क्षण आला! तो क्षण नियतीच्या विजयेनला घेऊन आला!

विजयेन मंचकापाशी आला तेव्हा त्या दोघांचे लग्न ठरलेले आहे हे माहीत असणार्‍या किमान शंभर नजरा तिकडे वळल्या. अत्यंत तटस्थ चेहर्‍याने विजयेनने मंचकावर डोके टेकवले. नियतीच्या पापण्या क्षणभरच थोड्याच्या हलल्या. विजयेन पुढे निघाला. विषय संपला! जय जिनेंद्रचा महाघोष झाला. आसवांना स्मितहास्यांनी आणि देवदर्शनाच्या अद्भुत अनुभुतीच्या भावनेने गाडून टाकण्यात आले. अनेकांच्या आसवांना!

नंतर व्याख्यान झाले. व्याख्यानानंतर देणग्यांचा ओघ सुरू झाला. हवेलीबाहेरील मैदानात भव्य मंदिर उभारले जाणार होते. काही हजारांपासून ते काही दशलक्षापर्यंतच्या देणग्यांचे चेक बरसले. कित्येकांनी देणगी म्हणून पत्रे किंवा कार्ड्स ठेवली. म्हणजे ते त्यांच्यातर्फे काही ना काही वस्तू किंवा इतर गोष्टी देणार होते.

हवेलीबाहेरील एका तंबूत सर्व साधू व साध्वींची निवासाची व्यवस्था होती. उद्यापासून नियती एक महिनाभर ह्या सर्व साधूजनांबरोबर आजूबाजूच्या कित्येक गावांमध्ये चालत जाणार होती. खडतर आयुष्याची सवय करून घेणार होती.

महासोहळा आटोपला. साधूसाध्वींसह नियती समोरील तंबूत गेली. तेथेच ती निद्रिस्त झाली.

दुसर्‍या दिवशी पहाटे पाच वाजता ती निघणार म्हणजे साडे तीन वाजल्यापासून स्नानासाठीचे गरम पाणी, दूध वगैरेची व्यवस्था करावी लागणार होती. गोयलांना तर झोपच लागली नव्हती. रानीही जाग्याच होत्या. शेवटी हिय्या करून दोघे पहाटे अडीच वाजता तंबूबाहेर गेले. दस्तुरखुद्द मालक मालकीणच आल्यामुळे सुरक्षा रक्षकाने सलाम झोडला व आत वर्दी दिली. दहा मिनिटांनी नियती एकटीच बाहेर आली.

एका झाडाखाली ती बसली. तिच्यासमोर दीनवाणेपणाने तिचे आई वडील बसले.

गोयलांनी हात जोडले. रानींनीही हात जोडले. अश्रूंच्या सरी ओघळत असताना गोयल म्हणाले......

"नियू बेटा, अपने पापाको माफ करो! अगर मै तुमसे ये नही करवाता तो हमारा समाज हमे जीनेही नहीं देता! मैने सबके पैसे लूटे थे! लोग मुझे धंदेसे बाहर करनेपे तुले थे! तुमने साध्वी बनके अपने पापाको बचा लिया बेटा! मै तुम्हारा हमेशा गुनहगार रहुंगा"

चिदेश गोयलांचे...... फक्त आत्ताचेच अश्रू खरे होते!!!!!!

====================================

-'बेफिकीर'!

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कथा नीट कळली नाही.

डीटेल्स मधली माहितीची थोडी संगत लागत नाहीये
माझ्या मते गोयल अगरवाल गोत्रात मोडतात आणि त्यांचा जैन रुढींशी संबंध नाही. त्यामुळे ते जय जिनेंद्र म्हणण्याचा व मानण्याचा संबंध कळला नाही. मुनोत मात्रं जैन मध्येच मोडतात त्यामुळे त्यांनी 'जय जिनेंद्र' म्हंटले तर ते बरोबर आहे.

गैरसमज नसावा पण अगरवाल आणि फसवणूक हे सरधोपट समीकरण मात्र व्यापारी वर्तुळात बर्‍यापैकी रूढ आहे.

हिंदीतली वाक्यं मारवाडीमध्ये करायची असतील तर मदत करू शकेन.

>>>हिंदीतली वाक्यं मारवाडीमध्ये करायची असतील तर मदत करू शकेन.<<<

अवश्य, मला आवडेल. Happy

पण मारवाडी सगळेच जैन नसतात ना? Happy (की नसतातच बहुधा? )

माझ्या अतिशय व्यवस्थित ओळखीतले (कंपनीत काम करत असतानाच्या व्यावसायिक ओळखीतले) एक गोयल नावाचे नागपूरचे गृहस्थ जैन आहेत.

ह्या कथेतील 'केस कापायच्या ऐवजी उपटणे, स्वप्न पडणे, एखादी घरातील व्यक्ती सन्यास घेणार समजल्यावर जल्लोष होणे' ह्या बाबी सत्य आहेत. बाकी सगळे काल्पनिक!

चांगलं लिहीलं आहे.

पण पूर्वीचा स्पार्क म्हणून राहीला नाही. पूर्वी कसं वाचतांना कानशिलं गरम व्हायची..

बहुतेक जैन मारवाडीच बोलतात पण काही हिंदी सुद्धा.
राजस्थानच्या मारवाड बेल्टमधून आलेले आणि जैन नसलेले लोक पण मारवाडी बोलतात ह्या मारवाडीचा फ्लेवरही वेगळा असतो. मराठी जशी पुण्याची आणि विदर्भाची वेगळी असते तशी.

मारवाडी=जैन (फार तर माहेश्वरी) असेच समीकरण बहुधा असते. गोयल मात्र माझ्या मते अगरवाल असतात आणि ते मारवाडी किंवा हिंदी बोलतात. अगरवालांमध्येही जैन असू शकतातच नाही असे नाही, त्याचप्रमाणे खंडेलवाल, ओसवाल ईमध्ये. साध्या व्याख्येत जे भगवान महावीरांना मानतात ते जैन आणि बाकी माहेश्वरी, खंडेलवाल वगैरे वैष्णव मध्ये मोडतील बहुधा. गुजराथींमध्येही जैनिझम फॉलो करणारे असतातच.
ते सतीश गुगळे अचूक सांगू शकतील कदाचित.

एखाद्या अगरवालाने अनेक वेळा धंद्यात दिवाळं काढलं असेल तर त्याच्या घरी आपली मुलगी देण्यास ईतर अगरलवाल लोकांमध्ये चढाओढ असते कारण त्याने जेवढ्या वेळा दिवाळं काढलं तेवढा ईतरांचा पैसा त्याने दाबला, असे. अर्थात हेही मारवाडी व्यापारी लोकांच्या वर्तुळातले मजेशीर समज/गैरसमज. तथ्य नसेलही त्यात काही.

"क्या हुवा रे? नींद खुल गयी? या कही जा रही है?" >> कै हुयो? थारी नींद हुई गी की? कठे जावनो है थने?

"मुझे ख्वाब आया है! मैने सन्यास लेना है" >> म्हणे रातका सपनो आयो हुतो, म्हणे दीक्षा लेवनी है.

"अगली पूनमको साधूजन बुलालीजिये मां! मै इस संसारमे अब नही रह सकती" >> अगला पुर्णिमाने मारासाब ने बुलाईजो मां, म्हणे घरगृहस्थी में नही रेवनों है.

"सोच क्या रहे हो? शुरू हो जाओ बस्स" >> थे कई बिचार कर रिया है, तयारी ने लागनो पडिला अबे.

"नियू बेटा, अपने पापाको माफ करो! अगर मै तुमसे ये नही करवाता तो हमारा समाज हमे जीनेही नहीं देता! मैने सबके पैसे लूटे थे! लोग मुझे धंदेसे बाह र करनेपे तुले थे! तुमने साध्वी बनके अपने पापाको बचा लिया बेटा! मै तुम्हारा हमेशा गुनहगार रहुंगा" >> नियू बेटी , थारा बापने क्षमा करजो. तू दीक्षा नही लेवती तो आपलो समाज आपला सगळा परिवारने जीने नही देवतो. म्हे सगळाने फसायो व्यानो पैसो लुट्यो. सगळा लोग म्हारो धंदो बंद करवानकी बाट देख रिह्या है. तू साध्वी बनने थारा बाप ने जीवनदान दियो है! म्है आजपासून थारो गुन्हेगार हुई गयो.

हायझेनबर्ग,

http://www.lemonhunt.com/company/ishaan-cryogenics-pvt-ltd-583707.html

हे नागपूरचे गोयल जैन आहेत. तेव्हा गोयल जैन नसतात हे म्हणणे कृपया सोडून द्यावेत.

बाकी, यू हॅव्ह एन्रिच्ड मी इन द सेन्स यू हॅव्ह ट्रान्स्लेटेड सम ऑफ द पार्ट्स ऑफ ,माय स्टोरी.

पण तुमचे दोन्ही प्रतिसाद पूर्णपणे नीट वाचलेले नाही आहेत. मात्र, तुमच्या व्हॅल्यू अ‍ॅडिशनसाठी धन्यवाद Happy

बेफ़िकीरजी थोडी मदत हवी आहे. लेखन धागा संबंधी प्लीज मदत करु शकता का? किंवा कोणाला विचारु शकते माहितीसाठी सुचवाल का? नवीनच आहे त्यामुळे जास्त काही समजत नाहीए ग्रुपवरच..

बेफिकीर,

कथा चांगली आहे यात वादच नाही. चिदेश गोयल केवळ कन्येचेच अपराधी नाहीत. ते जैनधर्माचेही अपराधी आहेत. दीक्षाग्रहणास त्यांनी वेठीस धरलंय. ही बाजू कथेत दिसली नाही.

कथा वाचल्यावर सर्वसामान्य वाचकाच्या मनात दीक्षेबद्दल संशय उत्पन्न होऊ शकतो. त्यामुळे अशी कथा रंगवावी का असा प्रश्न उपस्थित होतो. अर्थात धर्माचा गैरफायदा उठवणारे सर्वत्र आणि सर्वकालीन आहेत. त्यामुळे लेखकाचं रचनास्वातंत्र्य अबाधित. Happy

आ.न.,
-गा.पै.

कथा म्हणून चांगली आहे.. पण डीटेल्समधे काही चुका आहेत.. त्याबद्दल चर्चा सुरू आहेच म्हणून लिहितोय..

जैन धर्मात साधू पेक्षा मुनी हा शब्द जास्त वापरला जातो.
दिक्षा घेणं इतकं सोपं नसतं की ठरवलं आणि साध्वी/मुनी बनलं. त्यासाठी बराच काळ संघाबरोबर ( रा स्व संघ नव्हे.. तर मुनींचा संघ Wink ) रहावं लागतं. केस उपटतात त्याला केशलोचन समारंभ म्हणतात. ३ नग्न साधूंचा उल्लेख आहे.. हे घडणं महामुष्कील आहे. दिगंबर आणि श्वेतांबर मुनी/साध्वी एकत्र एका व्यासपीठावर तेही धार्मिक कार्यासाठी येणं अशक्य नाही पण खूप रेअर आहे.

खाली प्रतिसादात काही गैरसमज दिसतायत..
बहुतेक जैन मारवाडीच बोलतात पण काही हिंदी सुद्धा >> जैन लोकं मराठी बोलतात, कन्नड बोलतात, हिंदी बोलतात, तमिळ सुध्दा बोलतात. प्रत्येक जैन मारवाडी बोलत असेलच असं नाही. बेसिकली फक्त मारवाडी आणि गुजराती लोकंच जैन असू शकतात हा मोठा गैरसमज आहे Happy

माहेश्वरी, खंडेलवाल >> जैनांच्यात सुध्दा या जाती आहेत.

मारवाडी=जैन (फार तर माहेश्वरी) असेच समीकरण बहुधा असते >> अजून एक गैरसमज Happy

"धुमसतात अजूनी तिथल्या चितांचे निखारे" .. धुमसणे म्हणजे धग असणे? पण या कथेच्या दृष्टीने त्याचा अर्थ लागत नाहीये नीट ..

विजयेन जेव्हा तिला भेटायला येतो तेव्हा तिच्या नजरेतून "धुमस" दिसत असेल ..

कथा चान्गली आहे, पण मलाही श्वेताम्बर आणी दिगम्बर साधु एकत्र दिसणे खटकले. माझ्या परीचयात श्वेताम्बर जास्त आहेत. मात्र सर्वच मारवाडी जैन नसतात.

मित्रहो,

कथेतील तपशीलातील गफलती कृपया मनमोकळेपणाने नोंदवाव्यात! त्यातून मी अधिक अचूक लिहिण्यास प्रवृत्त होईन. Happy

दिलखुलास प्रतिसाददात्यांचे आभार!

Pages