डिसेंबर

Posted
9 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
9 वर्ष ago

डिसेंबर .. म्हणजे वर्षाचा शेवट! निरोप!! गुड-बाय!!! असं म्हणताना खूप वाईट वाटतं पण नाही त्याचबरोबर डिसेंबर म्हणजे लखलखता-झगमगता नाताळ, नवीन वर्षाचे धुमधडाक्याने होणारे आगमन, नाच गाणी आणि पार्ट्या, थोडे जुने.. थोडे नवीन संकल्प, नवीन स्वप्न रंगवायला.. पाहिलेल्या स्वप्नांना खरे रुप द्यायला मिळालेले आणखी एक करकरीत वर्ष!

मायबोलिवरील समस्त सभासदांना आणि ह्या चराचर सृष्टीतील प्रत्येक जिवाला २०१५ च्या अनेक अनेक शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला गोड जावो!

कसा असतो डिसेंबरचा निसर्ग?! निरभ्र आकाशाचे.. निरभ्र हसू, कुडकुडणारे अंग..हुडहुडणारे दात, अंगावर येणारी शिरशिरी..ओठावर चरचरणार्‍या फुल्या, कुठे थंडीची लाट... तर कुठे भुरभुर कोसळत राहणारा बर्फ, कुणाला प्रिय असतो बुवा हिवाळ्यातील पहाटेचा वाफाळता चहा... तर कुणाला प्रिय असते बाई दुलईतील ती झोप!!!! बाहेर फक्त दिवसाचे पाच वाजलेले असतात आणि काळोख घरात शिरलेला असतो. पहाटे जागे येते तर पहावं दुरदुरवर काहीच दिसत नाही.. दुपारपर्यंत धुकं ओसरतच नाही! असं हे धुकं फक्त पाहून मन भरत नाही.. ते आपल्या कॅमेरात उतरवल्या शिवाय चैन पडतं नाही!

धुक्याची गोधडी पांघरुन निसर्ग अजून झोपलेलाच असतो. झाडांच्या कळ्या अजून मिटलेल्याच असतात. दिवसा ढवळ्या वाहनांचे आणि रस्त्यावरचे दिवे लागलेले असतात. अंघोळ नकोशी वाटते. शेकोटीभोवती कोंडाळा करुन गावकरी बसलेले असतात. देशसेवा करणारे सैनिक मात्र येवढ्या थंडीतही परेड करायला सज्ज असतात. एखादे गाव, एखादे शेत अजून शांत झोप घेत असते. डोक्यावर गवताचे भारे घेऊन बायका शेतावर निघालेल्या असतात. नखशिखांत कपडे चढवून कुणी बाहेर पडायच्या तयारीत असतं:

ग्लोबलायझेशनच्या ह्या युगात आपले भारतीय कुठे कुठे जाऊन पोचलेत! युरप-अमेरिका ह्या सारख्या देशात टोकाचा हिवाळा असतो. कुठे आपल्याकडील हवीहवीशी गुलाबी थंडी आणि कुठे तिथला चार-पाच महिन्यांचा गोठलेला हिवाळा. बाकी इतर झाडे जरी आपला विरक्त काळ कंठत असली तरी ख्रिसमस-ट्री मात्र आपल्या तारुण्यात असते. संपूर्ण बर्फानी झाकलेले ख्रिसमस-ट्री असो की लाल-गुलाबी दिव्यांनी मढवलेले ख्रिसमस-ट्री असो दोन्ही शोभूनच दिसतात. एखादा दिवस बर्फ पडून निरभ्र निघाला तर बाहेर जरी कडाक्याची थंडी असली तरी कोवळ्या स्वच्छ हसर्‍या उन्हात सोनसळलेली ती सृष्टी बघायची मौज असते.

परदेशात राहून खूप काही 'मिस' होते! अहो आजकाल काय नाही मिळत असे जरी म्हंटले तरी प्रत्येकाची मागणी वेगळी असते. ती दरवेळी आयात-निर्यात करता येत नाही. आपल्याकडील वाटाण्याच्या शेंगाचे ढीग, एकावर एक रचलेली गाजरे, हातगाडीवरील हरभर्‍याचे गाठे, जांभळ्या उसाचे करवे, गव्हाच्या ओंब्या, रसरशीत पेरू, निबर बोरं! हे सगळं असून बनवलेल्या अनेक पाककृती. हे सारं काही मिस होतं! इतकंच नाही तर वेगवेगळ्या रंगातली शेवंटीची फुले, मधुमालतीचे बुलाबी रुपडे, बुचाच्या फुलांचा सडा, गावठी गुलाबाचा गंध!!!

गडचिरोली जिल्ह्यात खोल जंगलात आदिवासींसाठी काम करताना डॉ. प्रकाश आमटे व विलास मनोहर यांनी विरंगुळा म्हणून वन्य प्राणी बाळगले-वाढवले. सृष्टीतील रूप, रस, रंगगंधांच्या लावण्य विभ्रमांचे प्रत्ययकारी चित्ररूप दुर्गाबाईंनी 'ऋतुचक्र'मध्ये रेखाटले आहे. मारुती चितमपल्ली ह्यांचा उभा जन्म गेलाय तो खर्‍याखुर्‍या जंगलात. त्यांना माणसांपेक्षा पशुपक्ष्यांचा सहवास अधिक मिळालाय. माणसांच्या भाषेपेक्षाही अरण्यातली हिरवी अक्षरं त्यांना अधिक चांगली कळत असणार. या जिवंत, रसरशीत हिरव्या अक्षरांची काळ्या शाईतली प्रतिबिंबं म्हणजे चितमपल्लींचं लेखन. रुढार्थाने लेखिका नसून निसर्गावर प्रेम करणार्‍या शरदिनी डहाणूकर ह्यांचे लेखन काही और! चित्रपटांमधे काम करणारे मिलिंद गुणाजी ह्यांची भटकंती.. वाचाल तेवढे कमी आहे!!!

..पुन्हा एकदा नवीन वर्षाच्या शुभेच्छा!

विषय: 
प्रकार: 

<< चित्रपटांमधे काम करणारे मिलिंद गुणभजी ह्यांची भटकंती.. वाचाल तेवढे कमी आहे!!! >>

ते गुणभजी नाही गुणाजी आहेत.

नाही चाचणी नाही घेतली कोलाजची. निगप्रेमींसाठी लिहिला होता. वाटल मग इथे डकवा. तर डकवला.

नाही चाचणी नाही घेतली कोलाजची. निगप्रेमींसाठी लिहिला होता. वाटल मग इथे डकवा. तर डकवला.
<<
<<
हे 'निगप्रेमीं' म्हणजे नक्की कोण?