झी-जिंदगी

Submitted by कविता१९७८ on 10 September, 2014 - 00:37

पुर्वी जेव्हा केबल हा प्रकार अस्तित्वात नव्हता तेव्हा दुरदर्शन वर छान मालिका दाखवल्या जायच्या . बहुतकरुन त्या कुठ्ल्या न कुठल्या हिंदी उपन्यासावर आधारीत असायच्या. जास्तीत जास्त २०-२५ भागांची एक मालिका असायची. आतिशय अर्थपुर्ण संदेश देणार्‍या मालिका असुन सुद्धा कुठेही भडकपणा नसायचा. नट्यांचा कमीतकमी मेकअप, साध्या साड्या , सुंदर अभिनय. परंतु साधारण ९०-९२ च्या दरम्यान केबल हा प्रकार आला आणि पुर्ण चित्रच पालटले, मालिकांमधे अतिशय श्रीमंती , भडकपणा दाखवला जाउ लागला, मालिकांची टी.आर.पी. वाढवण्यासाठी काही संदर्भ नसेलेले कथानक वापरले जाउ लागले, एकावर एक मालिका येउ लागल्या, नवनवीन चेहरे येउ लागले. मालिकेचे भाग वाढवण्याच्या नादात कथानकाला भलतेच वळण देणे सुरु झाले, एकाच घरातील एक सुन पहील्या नवर्‍याबरोबर घटस्फोट घेउन त्याच घरातील दुसर्‍या मुलाबरोबर संसार थाटु लागली, एकाच घरात ४-४ कुटुंबे एकत्र नांदु लागली प्रत्येक पात्र थोड्या थोडया वेळाने चांगले आणी वाईट अशी दुय्यम भुमिका साकारु लागले. प्रत्येक पात्र अपघातात मरण पावुन काही एपिसोड नंतर जीवंत होणं , नायक - नायिकांचा स्मृतीभ्रंश होणं हे सगळं करता करता काही मालिका ५०० भागापर्यंत पोहोचल्या. प्रत्येक मालिकेत नायिकेचा भडक मेकअप, मग ती कीतीही गरीब असो, विधवा असो तिला सजुन धजुन दाखवले गेले पण आता सर्वांनाच त्याचा कंटाळा येउ लागालाय, सारखं तेच कथानक , सासु - सुनांची भांडणे , वहीनी - नणंदांची भांडणे , वहीनीची कारस्थानी आई घरात येउन उच्छाद मांडणे म्हणुन ह्या मालिका पाहणेच बंद केले होते.

असेच एके दिवशी चॅनल्स चाळता चाळता झी चे जिंदगी चॅनल लावले. पाकीस्तानी मालिका असतात पण कुठेही भंपकपणा नाही , ३०-३५ भागांची मालिका असते. अतिशय साधेपणा , बोलण्यात अतिशय आदर , कपडे अतिशय साधे, अतिशय श्रीमंत घर असले तरीही बायकांचे ही कपडे अतिशय साधे , दगिने तर शक्यतो लग्नासारख्या समारंभाशिवाय घातलेले दाखवले गेले नाहीत, अर्थपुर्ण मालिका. हा आता पाकीस्तानी मालिका पाहणे न पाहणे हे प्रत्येकावर आहे पण भारतीय मालिकांप्रमाणे अगदी प्रत्येक गोष्टीची अतिशयोक्ती अशा मालिकांमधे दिसत नाही की सारखं अल्ला अल्ला केलं गेलेलं नाही त्यापेक्षा तर भारतीय मालिकेत देवालाही सोडलेलं नाही. कुठेही कृत्रीमता वाटत नाही , घरे सुद्धा आर्थिक परीस्थीतीनुसार दाखवली आहेत.

ह्या चॅनलवरील माझी आवडती मालिका म्हणजे "कीतनी गिर्‍हें बाकी है", ही मालिका स्त्रियांवरील बंधने, अत्याचार, बलिदान ह्या वर आधारीत आहे , रोज वेगळी कहाणी दाखवली जाते. ह्या मालिकेचे सुत्र संचालन कीरण खेर यांनी केले आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी फक्त जिंदगी गुलझार है काही एपिसोड्स बघितली.
मला आवडलेल्या गोष्टी
१. परफेक्ट कास्टिंग, सर्वांचा उत्तम अभिनय
२. मर्यादित एपिसोड असल्यामुळे उगाच filler scenes, filler episodes नाहीत. (आपल्याकडे प्रत्येक साखरपुडा, लग्न दोन आठवडे दाखवत बसतात तर इथे ते दोन मिनिटांत दाखवलं.)
३. अनेक कॅरेक्टर्स दाखवलीच नाहीत. कशफच्या सावत्र बहिणी, तिच्या बहिणींचे नवरे, सासूसासरे यांचे फक्त उल्लेख आले. म्हणजे उगाच नगाला नग उभे केले नाहीत. जर गरज असेल तरच ते कॅरेक्टर येईल.
४. Women empowerment चा concept आवडला. कशफ, तिची आई, बहिणी ज्या पध्दतीने शिक्षणावर भर देतात ते आवडलं.

काय आवडलं नाही?
एकीकडे women empowerment दाखवली. दुसरीकडे त्यावरच टीकाही केली. एकूण नेमका काय मेसेज दयायचाय याबद्दल गोंधळ वाटला. झारुनची मैत्रिण, बहिण, आई यांना उगाचच नकारात्मक दाखवलं गेलं. वेस्टर्न कपडे घालणाऱ्या मुली वाईट, बायकांनी त्या कितीही बिझी असल्या तरी घरात स्वयंपाक करणं, नवऱ्याचे कपडे व इतर वस्तू सांभाळणं हे केलं(च) पाहिजे वगैरे मेसेज होता. आपल्याकडच्या मालिकांतही असलाच रिग्रेसिव्ह मेसेज असतो. कशफच्या आईचं सारखं ’अल्लानेही ये सब किया’ म्हणणं आणि आपल्याकडे एकताच्या मालिकांतील ’मातारानी की कृपा’ वगैरे सिमिलर वाटलं.
झारुनचं कॅरेक्टरच डोक्यात गेल्यामुळे फवाद खान आवडला नाही. १८ एपिसोड बघून झिंदगी गुलझार है अर्धवट सोडून दिली.

ह्या वर्षात, टीवी, आय्पॅड, मायबोली वगैरे पासून दूर रहायचे/ कमी वापर करायचा ठरवलेय.
बरीच कामं रहातात. पण हे असे काही (सिरियल्स चांगली) की प्रश्ण पडतो, आता कलायचे तली काय?
( सानिका फेम)

कुठलीच सिरियल सुरु करायची नाही हा विचार होता... पण बघुया.

एकदा का सिरियल सुरु केली की, बघावीच लागते. Proud

बर्‍याच सिरियल्स मी तुनळीवर सलग दोन दिवस कामं सोडून बघितली आहेत. शनिवार-रविवार रात्री दोन दिवसात घरच्यांना कामं वाटून देवून. Proud

फवाद खान, माहिरा खान, सनम सईद, मातमधल्या दोघी बहिणी, सनम बलोच, कैसी ये कयामत मधली सारा, सबा, आर्फिन वगैरे तरूण मंडळी उत्तम बोलतात. त्यांचे उच्चार नाहीत आंग्लाळलेले.

गोहरमधली सारा, तिचा बडी आपामधला बॉयफ्रेंड वगैरे अनेक मंडळी खूप आंग्लाळलेलं बोलतात हे खरे आहे.

कथा ठराविक गोष्टींच्यापलिकडे जात नाहीत हे खरे आहे. बायकांच्या आयुष्याची इतिकर्तव्यता लग्न-संसार यात आहे हा बेस संपूर्णपणे जात नाही बाजूला हे ही खरे आहे पण ते समाजात असावे त्यांच्या हे एक आणि ते सगळे आपल्याकडच्या विविध चमचम सिरीयल्समधल्यासारखे अतिरंजीत, हमारी संस्कृती वाले डायलॉग मारत येत नाही त्यामुळे बघताना फ्रस्ट्रेशन येत नाही.

जिंदगीवर पावणेदहाचा स्लॉट लांबलचक आणि कंटाळवाण्या सिरीयलींचाच ठेवायचा असं काही आहे का? आधी ती काश मै तेरी बेटी सारखी सिरीयल आणि आता जी काही आहे ती पण तितकीच कंटाळवाणी आहे.

@नीधप, आपल्या मर्‍हाटी मालिका तरी काय वेगळ्या असतात? भंपक आणि कै च्या कै कथानक असते. त्यामानाने हे बरे ना, लवकर संपवतात. कर्कश्श बॅकग्राऊंड म्युझिक नाही, मानेला सारखे झटका देणारी स्त्री पात्रे नाहीत, घरातला नॉर्मल वावर ई. बरेच प्लस पॉईंट्स आहेत Happy अभिनयपण चांगलाच असतो सर्वांचा. काल ती सारा फाकराला गौहर समोर बोलते तेव्हा फाकराने फक्त डोळ्यानेच कसला मस्त अभिनय केला..

मी मराठी मालिका बघूही शकत नाही. एलदुगो नंतर पाह्यलेली नाही कुठलीही मराठी मालिका.
हिंदीचेही तेच.
हिंदी-मराठी मालिका कचरा असतात हे मी कधीच मान्य केलेय की.

ndp.jpg

@ नीधप
जेव्हा दोन व्यक्तिंच्या दिसण्यात साम्य आहे असे म्हंटले जाते तेव्हा त्या दोघांमधील काही वैशिष्ट्ये समान असतात. सर्वच वैशिष्ट्ये नव्हे. जर आपण समान वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित केले तरच त्यांच्यातील साम्य आपणांस आढळते. जर आपण इतर वैशिष्ट्यांवर लक्ष केंद्रित केले तर तसे वाटणार नाही. याबाबत दुमत असू शकते. त्यामुळेच जेव्हा अजय देवगण फुल और कांटे मध्ये प्रथम दिसला तेव्हा काहींना तो सुनील दत्त सारखा जाणवला, पण सर्वच प्रेक्षकांना तसे जाणवले नाही. ज्यांनी भर तारूण्यातला कृष्णधवल चित्रपटांमधला सुनील दत्त पाहिला असेल त्यांना त्यात आणि अजय देवगण मध्ये साम्य जाणवणार नाही. परंतु ज्यांनी मध्यम वयातला केस वाढवलेला सुनील दत्त पाहिला असेल (जसे की ३६ घंटे) त्यांना हे साम्य चटकन जाणवेल. अशाच प्रकारे बडी आपात गझनफर ची भुमिका करणारा अभिनेता व तारूण्यातला कुलभूषण खरबंदा सारखा वाटु शकतो. रॉजर फेडरर व हॅलो ब्रदर मधला अरबाझ खान सारखा दिसु शकतो पण दबंग मधला अरबाज खान फारच वेगळा असल्याने तो रॉजर फेडररसारखा अजिबात दिसत नाही. आंतरजालावर शोध घेतला असता आढळून येईल की अनेकांना अनुष्का शर्मा ही दिवंगत पाकिस्तानी गायिका नाझिया हसन सारखी भासते. काहींना दिव्या भारती व श्रीदेवी मध्ये साम्य दिसायचे. माधुरी दीक्षित अनेकांना मधुबाला सारखी वाटते. अर्थात अनेकांना हे साम्य मान्य नाही. तेव्हा असे वाटणे हे व्यक्ति सापेक्ष असू शकते.

मी माझे मत मांडले की गुरमीत चौधरी आणि फवाद खानमध्ये काही प्रमाणात साम्य आहे. ते मत इतरांनीही मान्य करावे असा माझा अजिबात आग्रह नाही. कुणाला माझे मत पटत नसेल तर त्यास विरोधी मत मांडण्याचा अधिकार देखील आहे. परंतु "आवरा" , "डोळे तपासा" असे तीव्र व्यक्तिगत प्रतिसाद देणे योग्य नाही.

नाईलाजाने मलाही असे म्हणावे लागेल की तुम्ही तुमची लेखणी आवरा. असे प्रतिसाद देणे हा तुमचा स्वभाव असेल तर तुमचा मेंदु तपासा. तुम्ही सॅडिस्ट असाल.

असो. तुम्हाला स्वतःचा मेंदु तपासायचा की नाही हा तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. त्याचा जो काही फायदा तोटा होईल तो तुम्हालाच. तेव्हा मी त्यावर काही भाष्य करणार नाही. परंतु डिवचणारे प्रतिसाद देणे टाळा (निदान मला तरी, इतरांना तुम्ही कसे प्रतिसाद देता त्याच्याशी मला काही घेणेदेणे नाही). वर मी बराच संयम राखून माझ्या परीने समजावण्याचा प्रयत्न केला आहे. दरेक वेळी हे शक्य होईलच असे नाही. पुन्हा असे प्रतिसाद मला दिल्यास नाईलाजास्तव जशास तसे या तत्वानुसार प्रत्युत्तर दिले जाईल.

दोन वाक्यांना प्रतिसादात एवढा मोठा निबंध...
पहिल्याच वाक्याने कंटाळा आणला. काय लिहिलंय मी वाचलं नाही, वाचणारही नाही. आणि यापुढे तुमचे कुठलेच प्रतिसाद, धागे वाचण्यात वेळ वाया घालवणार नाही.

@ नीधप
<< काय लिहिलंय मी वाचलं नाही, वाचणारही नाही. आणि यापुढे तुमचे कुठलेच प्रतिसाद, धागे वाचण्यात वेळ वाया घालवणार नाही. >>

अतिशय आभारी आहे.

इथे पाकिस्तानी मालिकांबद्दल वाचून 'जिंदगी गुलजार है', 'हमसफर', 'औन झारा' या मालिका आणि 'बेहद' ही टेलीफिल्म पाहिली. मी हिंदी सीरीअल्सही कमीच बघते त्यामुळे कुठलीही तुलना करण्याचा हेतू नव्हता. पण एखादी चांगली मालिका बघायला मिळावी एव्हढीच माफक अपेक्षा होती. पण पूर्णपणे निराशा झाली असं खेदपूर्व म्हणावं लागतंय. सगळ्या मालिकांमधे अतिश्रीमंत मुलगा आणि गरीब मुलगी, त्यांची भांडणं, मग प्रेमात पडणे, गैरसमज, मग शेवट गोड इत्यादी रीतसर 'मिल्स अँड बून्स' टाईप प्रकार पाकिस्तानी अवतारात बघितले. अतिशय संथ कथानक, लांबलचक (अगदी कधी रटाळ वाटातील एवढे) संवाद, सासू-सून ड्रामा वगैरेपण व्यवस्थित होता. वर काहिंनी म्हटल्याप्रमाणे एक्झॅक्टली काय मेसेज द्यायचा आहे कि एखादी गोष्ट फक्त सांगायची आहे याबाबत गोंधळ जाणवला. वेदिका२१ म्हणतात त्याप्रमाणे "वेस्टर्न कपडे घालणाऱ्या मुली वाईट, बायकांनी त्या कितीही बिझी असल्या तरी घरात स्वयंपाक करणं, नवऱ्याचे कपडे व इतर वस्तू सांभाळणं हे केलं(च) पाहिजे वगैरे मेसेज होता." त्याबरोबर बाईनं चूक अ‍ॅक्सेप्ट केली पाहिजे असंही काहिसं. काही गोष्टी (उदा. रोमान्स वगैरे) कृतींमधून दाखवता येत नसल्याने संवादातून दाखवण्याचा प्रयत्न केल्याने त्या प्रसंगांची तरलताच हरवली गेली. रोमान्स दाखवायला शारीरीक जवळीक दाखवण्याची गरज नाही. पण तरल प्रसंगांमधून दाखवता आले असते. माझ्या पाकिस्तानी शेजारीणीच्या मते लग्न वगैरे गोष्टी न दाखवण्यामागचं खरं कारण तिथलं मुल्ला मौलवी यांचं वर्चस्व हे आहे. एकदा असंच पडद्यावर (का नाटकात) लग्न दाखवलं तेव्हा या लोकांनी त्या कलाकारांना नवरा-बायको घोषित करून टाकलं! आणि वेगळं व्हायचं असेल तर 'तलाक' घ्या असं सांगितलं. त्यामुळे आता कोणी रिस्क घेत नाही Proud

'जिंदगी गुलजार है' मधे सनमचं कॅरेक्टर कॉम्लेक्स आहे असं संवादांतून जाणवलं. पण अभिनयात तो कॉम्प्लेक्सपणा न वाटता ते कॅरेक्टर गोंधळलेलं वाटतं. झारून आयुष्याबाबत बेफिकीर, कुठल्याच बाबतीत सिरीअस नसलेलं वगैरे संवादातून सांगतात. पण मला ते कॅरेक्टर सुशिक्षित, वेल मॅनर्ड, वेल बिहेव्ड मुलाचं वाटलं! तसंच एव्हढं शिकलेली, स्वतंत्र विचारांची, कणखर असलेली, विचारात स्पष्ट्ता वगैरे असणारी कशफ एका चहामुळे झारूनशी लग्न करायचं ठरवते? तसंच दोन मुली आहेत समजल्यावर त्याला फोन करून मला परत यायचं आहे वगैरे सांगते? जुळ्या 'मुली' आहेत कळल्यावर हमसाहमशी रडते हे पटत नाही.

"औन झारा" मधली हिरॉईन गोड, निरागस आहे. मला हि मालिका थोडीशी 'ससुराल गेंदा फूल' सारखी वाटली. 'बेहद' अतिउच्च समाजातली वाटली. वेस्टर्न influence व्यवस्थित जाणवतो. त्यामुळे या मालिका खर्‍या पाकिस्तानी समाजाचं प्रतिनीधीत्व करत नाहित असं माझ्या शेजारणीचं मत आहे जे मला खरं वाटतंय. याबाबतीत अगदी हिंदी मालिकांची बरोबरी करतात.

आवडलेल्या गोष्टी म्हणजे सुरेख उर्दू भाषा, अस्सल उच्चार, सौम्य-मृदू बोलणे. त्याव्यतिरीक्त मला तरी या मालिकांमधे अजून तरी विशेष काही वाटलं नाही. शेजारणीकडून कुठल्या चांगल्या मालिकांबद्दल कळलं तर इथे लिहीनच.

अनुमोदन अंजली!
माझ्या लिस्टमध्ये बेहद, ओन झारा, हमसफर आहेत पण झिंदगी गुलझार है ने इतकं पकवलं की तीच अर्धी सोडली आणि बाकी काही बघणं झालं नाही. आता पुन्हा नेटफ्लिक्स व प्राईमला शरण गेले आहे. हाऊस ऑफ कार्ड्स, होमलँड, डाऊनटन, २४- असलंच बघत बसते.

म्हणून फक्त काहीच सिरियली बघायला बर्‍या आहेत बाकी अजूनही काळ १९३० चा आहे असे वाटते त्यांच्या बर्‍याच सिरियलीमधून.

गौहर तर इतकी बोर.... लग्न म्हणजे तुझी जबाबदारी, तुच सांभाळून घे. सासूच मन जिंक... एकले की किळस वाटतो.
नवीन नवीन प्रेमात/लग्नात जसे बरे वाटते तसे आहे खरे तर ह्या सिरियलींचे. नाहितर नवरे सगळीकडून सारखेच असा प्रकार्.(इथे सिरियलीला उपमा म्हणून नवरा) Proud

बहुतेक सिरियली तर mother embelished son आधारीत आहेत. मुलगे फक्त आईचं एकणार...

त्या खूपच जुनाट आणि बोर आहेत.

मी दिलेल्या लिस्ट मध्ये जेवढ्या बघितल्या तेवढ्याच बघितल्या नंतर खूपच बोर झाले.

(सध्या टीवी तसाही बघणं सोडलं आहे पण इथले वाचून बघायचा प्रयत्न केला की उदासी वाटते. कॉमेडी खूपच कमी आहे. स्त्री वरील अत्याचार हे विषय नकोसे आहेत आतासे)

अंजली, वेदिका, sometimes liking something depends on what your bar is! And also your prior impressions based on the reviews you hear. मी जेव्हा पाकिस्तानी मालिका बघायला सुरुवात केली तेव्हा माझी पाटी कोरी होती. काहीच अपेक्षा नव्हत्या कारण काही माहितीच नव्हतं. त्यामुळे १३/२६ भागात संपणाऱ्या मालिका हा देखील सुखद धक्का होता.

अंजली, जिं. गु. है मध्ये तुम्हाला ज्या गोष्टी खटकल्या त्या मला ही खटकल्या. पण कदाचित हे वास्तव आहे! आपण असा विचार करत नसू पण अनेक जण करतात. I know that does not make it right, but still we have to understand that what they show is reality. रोमान्स दाखवणं वै. बाबतीत आपल्याकडच्या हिंदी मालिकांनी दुसरं टोक गाठल्याने हा अति- सटल रोमान्स आवडला! मला आवडलेली गोष्ट म्हणजे लौकिकार्थाने नवरा-बायको म्हणून नांदत असताना देखील प्रेमात पडायला आणि जोडीदारावर विश्वास बसायला वेळ लागतो हे अतिशय खरं चित्र दाखवलं आहे. याउलट आपल्याकडे दोघांनी P1-P2 करत आळीपाळीने बेडवर झोपणं वै. फालतूपणा दाखवतात! शिवाय मालिका खूप छान वळणावर येऊन संपते. दोघेही थोडे थोडे बदलतात.

इंग्रजी ड्रामे आणि पाकिस्तानी ड्रामे यांची तुलना करण्यात काही अर्थ नाही. कारण त्या दोन्हीचा प्रेक्षकवर्ग पूर्णपणे भिन्न आहे. Our (asian) dramas are always family dramas and very rarely about something else! Again it's because of the target audience. So if you are not into watching family dramas you may not like them.

जर अजून थोडं explore करायचं असेल तर मेहरीन जब्बारच्या कहानियाँचे काही भाग पहा! The stories still revolve around human relationships but they are not typical family dramas (सांस बहु टाईप) and the protagonists are off beat characters. And these are less than an hour long. Suggestions: Farar, Putli ghar, Ab tum jaa sakatay ho, Abba, Ammi aur Ali, Ghooghat, Pehchan, Shanakht.
आणि जर मेहरीन जब्बार चं काम आवडलं तर और झिंदगी बदलती है ही मालिका देखील चांगली आहे. It is 13 episodes long. All of these are available on YouTube.
(Note to self: I should start collecting PR fees from Mehreen Jabbar now!)

>>बाबतीत आपल्याकडच्या हिंदी मालिकांनी दुसरं टोक गाठल्याने हा अति- सटल रोमान्स आवडला! मला आवडलेली गोष्ट म्हणजे लौकिकार्थाने नवरा-बायको म्हणून नांदत असताना देखील प्रेमात पडायला आणि जोडीदारावर विश्वास बसायला वेळ लागतो हे अतिशय खरं चित्र दाखवलं आहे>><<
नुसत्या सांडलेल्या चहावर त्याची काळजी पाहू ती विश्वास ठेवून लग्न करते मग नंतर सगळी लपवालपवी कशाला? की माझी प्रश्ण हे माझे आहेत म्हणताना दाखवलय, ते ही लग्नाच्या बर्‍याच नंतर...

सुरुवातीच्या लग्नात ठिक आहे जरा मोकळीक यायला वेळ लागतो पण काही काही प्रसंग बोर आहेत.
इतक्या इतक्या तावातावाने भांडते नवरा मैत्रीणी बरोबर चहा प्यायला जातो व हिला सांगत नाही.

मला आवडायचे कारण उगाच झगझगीतपण न्हव्ता कपडे मध्ये वगैरे पण लूपहोल्स आहेतच. पण बर्‍याचशा अंधार्‍याच वाटतात.

मी जिं.गु.है च्या लेखिकेचा एक कार्यक्रम पाहिला ज्यात तिने तिची भूमिका मांडली होती. तिला ह्या मालिकेत असे protagonists दाखवायचे होते जे परफेक्ट नाहीयेत. जे चुका करतात, ज्यांना स्वतःचे inferiority/superiority complexes आहेत. मला वाटतं की हे असंच दाखवायचं असेल तर बरोबर दाखवलं आहे.
फक्त चहाच्या कपावरून हो म्हणते असं नाहीये. तिच्यावर प्रेशर असतं. आणि नाही म्हणायला तिला काही कारण देता येत नसतं! म्हणून ती त्याच्यावर विश्वास ठेवते!
लग्नानंतरही कशफ तिच्या आणि झारूनच्या आर्थिक स्थितीतला फरक विसरू शकत नाही आणि म्हणून त्याच्याकडे आपल्या आईच्या घरासाठी लागणारे पैसे ही गोष्ट डिस्कस करू शकत नाही. शिवाय त्या आधी तिने एकदा झारूनच्या आईचं पैशावरून बोलणं ऐकलेलं असतं ना.
मला लूपहोल्स नाही जाणवले उलट खऱ्या आयुष्यात माणसं अशीच complicated आणि उलटसुलट वागत असतात आणि ते तसंच दाखवल्यासारखं वाटलं.

जिज्ञासा, मी वर लिहील्याप्रमाणे हिंदी मालिका कमी बघते (शेवटची बघितलेली - ती ही अधून मधून - म्हणजे एक हसीना थी). 'इंग्रजी ड्रामा' बद्दल तर मी काहीही लिहीलं नव्हतं. त्यामुळे तुलना करण्याचा प्रश्नच नव्हता. एखादी चांगली मालिका बघायला मिळावी एवढीच माफक अपेक्षा होती. त्यात इथेही फारच कौतुक वाचलं होतं. या मालिका बघता स्वतंत्र कलाकृती म्हणूनच बघितल्या. मालिका बघताना त्या त्या वेळी जाणवलेल्या या त्रुटी आहेत. कथानकाच्या ओघात त्या जाणवल्या तर नंतर विचार करताना फारच प्रकर्षानं लक्षात येतात. मला कुतूहल होतं म्हणा किंवा अपेक्षा होती म्हणा पण पाकिस्तानी समाजाचं, तिथल्या प्रश्नांचं, विचारांच थोडंफार तरी चित्रण असेल असं वाटलं होतं जी पूर्ण होऊ शकली नाही. तो झारून बायकोशी भांडण झाल्यावर तिच्या-त्याच्या 'पर्सनॅलिटीत' फरक आहे हे एक्स-गर्लफ्रेंडला -जिच्याशी साखरपुडा करून त्यानंच मोडलेला असतो- सांगतो?? रिअली? तिच्या याच पर्सनॅलिटीवर भाळून तो तिच्याशी लग्न करतो ना?

असो.

मेहरीन जब्बारबद्दल बघते. तुम्ही Wadjda बघितली आहे का? नसल्यास अवश्य बघा. highly recommended.

अंजली, Wadjda मस्त वाटतोय! नक्की बघेन मी शोधून! ते इंग्रजी मालिकांबद्दल लिहिलेलं तुम्हाला उद्देशून नव्हतं!
डाऊनटन, हाऊस ऑफ कार्ड्स वै. शी तुलना करता येणार नाही असं म्हणायचं होतं मला. Meaning dramas like Dowtnon are very well made in all respects and have entirely different audience.

मला कुतूहल होतं म्हणा किंवा अपेक्षा होती म्हणा पण पाकिस्तानी समाजाचं, तिथल्या प्रश्नांचं, विचारांच थोडंफार तरी चित्रण असेल असं वाटलं होतं जी पूर्ण होऊ शकली नाही. >> थोडीशी कल्पना येते पण कोणत्या देशातल्या मालिका बघून त्या देशातल्या समाजाची कल्पना येते? मात्र ह्या मालिका पाहून एक जाणवलं की तिथेही आपल्यासारखीच माणसं राहतात! त्यामुळे पाकिस्तानविषयीची अढी थोडी कमी झाली.

कोणत्या देशातल्या मालिका बघून त्या देशातल्या समाजाची कल्पना येते? >>> भारतातल्या मालिका बघून नक्कीच येत नाही Wink पण इथलं पाकिस्तानी मालिकांचं कौतुक वाचून माझा तसा गैरसमज झाला खरा.

मला 'जि.गु.है' आवडली.
पण 'तो झारून बायकोशी भांडण झाल्यावर तिच्या-त्याच्या 'पर्सनॅलिटीत' फरक आहे हे एक्स-गर्लफ्रेंडला -जिच्याशी साखरपुडा करून त्यानंच मोडलेला असतो- सांगतो?? रिअली?..
हा मुद्दा मात्र पटला.. पहिल्यांदा पाहिली तेव्हाच हे खटकलं होतं.

@ अंजली,

<< "वेस्टर्न कपडे घालणाऱ्या मुली वाईट, बायकांनी त्या कितीही बिझी असल्या तरी घरात स्वयंपाक करणं, नवऱ्याचे कपडे व इतर वस्तू सांभाळणं हे केलं(च) पाहिजे वगैरे मेसेज होता." त्याबरोबर बाईनं चूक अ‍ॅक्सेप्ट केली पाहिजे असंही काहिसं. >>

तुम्ही 'बडी आपा' मालिका पाहावी असे सुचवितो. यात सहनशील पुरुष, वेस्टर्न कपडे न घालताही वाईट वागणारी बाई, तिला अजिबात न दुखविता तिच्या आयुष्यातून समजुतदारपणे बाहेर पडणारा तिचा नवरा या सार्‍या गोष्टी दाखविल्या आहेत. झी-जिंदगी वरील इतर मालिकांपेक्षा ही मालिका बरीच वेगळी आहे. शिवाय लांबलचक नाही. तीन आठवड्यात संपली सुद्धा.

माझं मत : जिंदगी गुलजार है (व अन्य बर्‍याचशा पाक मालिका) पाकिस्तानमधल्या समाजाचं चित्रण करताहेत. आपण आपल्या भोवतालाच्या, आपल्या मूल्यांच्या तराजूत त्या व्यक्तिरेखा आणि कथा/घटना तोलल्या तर त्या न पटण्याची व न आवडण्याची शक्यताच अधिक.

सनम मध्यमवर्गातली किंवा निम्नमध्यमवर्गातली तरुणी. चांगल्या हुद्द्याची सरकारी नोकरी. त्यामुळे इकॉनॉमिकली अपवर्डली मोबाईल. तरीही तिच्यावर सामाजिक दडपणे आहेतच. मुळात तिला लग्नच करायचं नसतं. पण मग आईवर येणारं दडपण पाहून ती लग्नाला तयार होते. तिचा पहिला चॉइस ओसामा, ज्याने तिला आधीच प्रपोझ केलेलं असतं- तर त्याचं आता दुसरीकडे लग्ब ठरलेलं. तिला कोणाशीतरी लग्न करायचं असतं, आणि ते कोणाशी व का करायचं याचं एक कारण तिलाच हवं असतं, जे चहाच्या उलटलेल्या कपाने मिळतं.

झारून हा मालिकेचा नायक असला तरी पक्का chauvinist आहे. कुठे ना कुठे या वागण्यातली चूक लक्षात येत असली वा कधी नसली तरी त्याच्या वागण्यात ते येणं कठीण आहे. त्याला बायको म्हणून अल्लामियांची गायही नको आणि एक संपूर्ण मुक्त स्त्रीही नको.

दोन संकृतींमधला फरक ठळकपणे दाखवणारा एक प्रसंग म्हणजे लग्नानंतर झारून कशफला हातखर्चाला पैसे देतो? का? तर तू आता माझी जबाबदारी आहेस........हाच प्रसंग आजच्या (गेल्या काही दशकांतल्या) मराठी कथेच्या नायिकेसाठी प्रचंड अपमानजनक ठरला असता. पण कशफला प्रथमच आपली जबाबदारी घेणारं, आपल्यालाही कोणी सांभाळणारं आहे हे जाणवून रडू फुटतं. हीच कशफ आईसाठी घर घ्यायचं म्हणून कर्ज काढते यात मला विरोधाभास न वाटता तिचा प्रवासच जाणवतो.

कशफ आणि झारून या दोघांनाही आपण लग्न करून आणि हे लग्न करून चूक तर केली नाही ना हा प्रश्न सतत सतावत असतो. तसंच एका मुलीचं , तेही बापाशिवाय वाढलेल्या मुलीचं आयुष्य जगलेल्या कशफला आपल्या मुलींच्या वाट्याला तेच प्राक्तन येण्याची भीती वाटते. {हेही मराठी कथांच्या (मालिकांच्या नव्हे) नायिकेच्या अगदी विपरीत आहे} किंवा कशफच्या टाकल्या गेलेल्या तरीही स्वतःच्या पायावर खंबीरपणे उभ्या राहिलेल्या आईने कशफला सतत सासरी जुळवून घ्यायला सांगणे हेही असेच. या आईचा एक विजय या कथेत दाखवलाय, तो म्हणजे दुसर्‍या बायकोपासून झालेला मुलगा वाया जातोय असे दिसताच तिचा नवरा तिला पहिल्या यशस्वीबालसंगोपक बायकोच्या पदरात टाकू पाहतो. यात त्याचं बायकोला टेकन फॉर ग्रँटेड घेणं आणि तिला पहिल्यांदाच आपला स्वाभिमान दाखवून द्यायची संधी मिळणं...हेही स्थित्यंतरातल्या समाजाचं चित्र.

या दृष्टीने या दोन्ही , तसंच मालिकेतल्या पुष्कळशा व्यक्तिरेखा स्थित्यंतरातल्या समाजाचं चित्रण करतात असं वाटलं. मालिका पाहून बरेच महिने झालेत, त्यामुळे नक्की आठवत नाही, पण कशफची धाकटी बहीण , अधिक आणि कृतिशील बंडखोर दाखवलीय. यात वेगळं काही नाही. पण मोठ्या बहिणीला आईची ससेहोलपट जाणवून तिने सोशिक होणं आणि नंतरच्या बहिणींना दुहेरी छत्र मिळाल्याने त्यांच्यात तो सोशिकपणा न उतरणं हे तसं कॉमन आणि पटणारं आहे.
नायक - नायिकांनी मनातली अढी कायम ठेवून , तडजोडी करत, for the so called greater good त्यातले आनंदाचे क्षण मोलाचे मानत संसार करणे हे वास्तवच या मालिकेत दिसलं.

झारूनने अस्माराला भेटण्यातून पुन्हा त्याचेच डबल स्टँडर्ड्स दाखवण्याचा हेतू असावा किंवा अस्मारा ही त्याची जुनी मैत्रीणही असल्याने त्याला कशफबद्दल तिच्याशी शेअर करण्यात काही वावगे नसावे.
बरं, त्याचे डबल स्टँडर्ड्स त्याच्या तोंडावर सांगायला अस्मारापेक्षा जास्त योग्य व्यक्ती कोण असणार?

मला मालिकेतले संवाद खूपच आवडले. आता पाहून बरेच महिने झालेत त्यामुळे लक्षात नाहीत. पण एक आठवतो तो म्हणजे झारूनने कॉलेजमध्ये असताना मी तुला चुडैल म्हणायचो असे सांगणे.

तसेच काही प्रसंग पण फार सुरेख रंगवलेले आहेत. झारूनने प्रोफेसरकडे जाऊन कशफला मागणी घातल्यावर त्याला जेव्हा तिचा फोन येतो, तेव्हाचं त्याचं टेन्शन. तसंच शेवटच्या भागात मला घेऊन जा म्हटल्यावर ऐन रात्रीच येऊन हजर होणे व मधल्या काळात जणू काहीच झाले नाही असे सुस्तावलेले, सुखावलेले, लाडावलेले झोपाळणे...यातला फवाद खानचा अभिनय. झारून कशफच्या माहेरी राहायला आल्यावर त्याला कसला कसला त्रास होईल म्हणून चिंताग्रस्त होणारी, आणि तो सहज अ‍ॅडजस्ट करतो हे पाहून त्याच्या प्रेमात पडणारी कशफ...

रोमान्स मिसिंग वाटला असेल तर पुन्हा एकदा चष्मा पुसून फवादचा अभिनय पाहायला हवा.

मालिकांनी संदेश बिंदेश द्यावा अशी अपेक्षा मी ठेवत नाही. पण स्त्रीमुक्ती/बंधनांबद्दल चुकीचे वा योग्य संदेश देण्यापेक्षा आहे ते वास्तव समोर ठेवून पुसटशी का होईना प्रश्नचिन्ह (पाकिस्तानी) प्रेक्षकांच्या मनात उभी झाली असतीलच.

वर बडी आपाचा उल्लेख आलाय. तर जिच्यावर मालिकेचं शीर्षक बेतलंय अशी प्रचंड अतर्विरोधांनी भरलेली आणि अखेरीस एकाकी उरलेली, स्वतःपेक्षा स्वतःच्या इमेजला जपणारी अशी व्यक्तिरेखा अन्यत्र पाहिल्याचे आठवत नाही. पुन्हा एकदा या मालिकेतल्या सगळ्या व्यक्तिरेखा भारी.
बडी आपाच्या गोंधळलेल्या मुलीसकट.

मयेकर +१०००

सतत काहीतरी थरारक किंवा विनोदी घडत रहाणे किंवा काहीतरी चमकदार बोललं जाणे याची आपल्याला अमेरिकन मालिका पाहून इतकी सवय लागलीये की एखादा सीन ज्याच्यामधे केवळ चर्चा आहे ज्यातून त्या व्यक्तिरेखांचे अंतरंग उलगडायला फक्त मदत होते (जि गु है मधला डिनर सीन) असे काही आपल्याला रटाळ, संथ वगैरे वाटते.

देसी मालिकांबद्दल मी बोलतच नाही कारण त्यांचे मेन्शन व्हायचीही फारशी लायकी नाही.

मयेकर, नी, +१११
हो ह्या (मला आवडलेल्या) मालिकांमधला संथपणा पण छान वाटतो मला! सतत काहीतरी घडत नसतं! खूप कमी पार्श्वसंगीत आणि आवश्यक तिथे पूर्ण शांतता!

सतत काहीतरी थरारक किंवा विनोदी घडत रहाणे किंवा काहीतरी चमकदार बोललं जाणे याची आपल्याला अमेरिकन मालिका पाहून इतकी सवय लागलीये की एखादा सीन ज्याच्यामधे केवळ चर्चा आहे ज्यातून त्या व्यक्तिरेखांचे अंतरंग उलगडायला फक्त मदत होते (जि गु है मधला डिनर सीन) असे काही आपल्याला रटाळ, संथ वगैरे वाटते. >>>> Uhoh
नी, मी अमेरीकन मालिकांच्या तुलनेत ही मालिका पाहिली नाही. इथे पाकिस्तानी मालिकांचं इतकं कौतुक वाचून काहीतरी छान पहायला मिळेल या अपेक्षेनं पाहिली. सुरवातीचे काहि एपिसोड पाहिल्यावर कंटाळा यायला लागला. तरीही नेटानं संपवली. बघतानाच अनेक गोष्टी खटकल्या. नंतर विचार करताना तर फारच जाणवल्या.
एखादा सीन ज्याच्यामधे केवळ चर्चा आहे ज्यातून त्या व्यक्तिरेखांचे अंतरंग उलगडायला फक्त मदत होते>> एखादाच सीन असेल तर छानच, पण...

मयेकर, परिक्षण छान लिहीलं आहेत. मालिकांमधून संदेश वगैरेची अपेक्षा मी ठेवत नाही. या मालिकांमधून केलं जाणारं 'वास्तवाचं' चित्रण हे सर्वसामान्या पाकिस्तानी घरांमधलं वास्तव नाही हे माझ्या पाकिस्तानी शेजारणीचं मत आहे, जे मला काही प्रमाणात खरं वाटतंय.
रोमान्स मिसिंग वाटला असेल तर पुन्हा एकदा चष्मा पुसून फवादचा अभिनय पाहायला हवा.>>> मला चष्मा नाही ;). रोमान्स मिसींग वाटला नाही तर लांबलचक संवादामुळे त्यामधली तरलता हरवली असं माझं मत. असो. पसंद अपनी अपनी, नज़रिया अपना अपना :). त्या फवादच्या लागोपाठ तीन चार मालिका पाहिल्यामुळे अभिनयातही तोच तोचपणा वाटायला लागला.
तुम्ही वर उल्लेख केलेला Wadjda पाहिला आहे का? नसेल तर नक्की पहा. तुम्हाला नक्की आवडेल. त्यावर परिक्षणही लिहा.

तू अमेरिकन मालिकांच्या तुलनेत बघते आहेस असं मी कुठे म्हणलंय का?
मी अमेरिकन मालिकांशी तुलना करत होते. त्या बघून बघून एक ठराविक अपेक्षा सेट झालेली असते. या मालिका बघायला थोडा गिअर चेंज करावा लागतो असे माझे मत.

आता तुला नाही आवडल्या या मालिका तर नाही आवडल्या.

कथा, विषय यामधे तोचतोचपणा आहे हे मान्य करूनही मला त्यांचे व्यक्तिरेखांचे चित्रण ज्याप्रकारे येते ते आवडते. दुष्ट म्हणजे दुष्ट मग तिला बाकी कानेकोपरे कंगोरे नाहीत, लॉजिक नाही वगैरे प्रकार अजिबात नाहीये.

कथा, विषय यामधे तोचतोचपणा आहे हे मान्य करूनही मला त्यांचे व्यक्तिरेखांचे चित्रण ज्याप्रकारे येते ते आवडते.>> ओके.
मला त्यांची अस्सल उर्दू, सौम्य-मृदू बोलणं आवडलं. ख़ आणि घ़-ग़ च्या मधला घशातून केला जाणारा उच्चार सही वाटतो ऐकायला.

अंजली, अस्सल उर्दू, ख़ आणि घ़-ग़ च्या मधला घशातून केला जाणारा उच्चार >>+१ अगदी!
अस्सल उर्दू साठी धूप किनारे, तनहाईयां अशा जुन्या (१९८५-८७) मालिका बघ! लाजवाब संवाद आहेत त्यात!

Pages