स्वच्छ भारत अभियानः आधी स्वतःकडे पहा

Submitted by कोकणस्थ on 6 November, 2014 - 06:00

आदरणीय पंतप्रधान नरेन्द्र मोदींच्या पुढाकाराने 'स्वच्छ भारत अभियान' सुरु झाले. साक्षात पंतप्रधानांनी हातात झाडू घेउन रस्ता झाडला आणि इतरांना उदाहरण घालून दिले.

पंतप्रधान झाल्यापासून अनेक बाबतीत मोदीजींचे कुर्त्यापासून अनेक गोष्टींत अनुकरण होत आहे. मग या बाबतीत ते न झाल्यासच आश्चर्य होते. प्रत्यक्ष पंतप्रधान मोदीजींनी हातात झाडू घेतल्यामुळे आलेल्या देशात एक प्रकारची झाडलाट आली आणि त्यात इतर राजकीय नेत्यांपासून ते सरकारी व खाजगी आस्थापनांतले अधिकारी, सिनेनट, नट्या आणि नटव्या, आणि अगदी ऑफिसातले शिपाई इथपर्यंत सगळे अक्षरशः झाडून सामील झाले आणि रस्त्यांवरचा आणि परिसरातला कचरा साफ करु लागले.

इथे एक घटना आठवली. नक्की कधी ते आठवत नाही पण साधारण वर्षभरापूर्वी एका चीनी संकेतस्थळांवर भारतातल्या अनेक धार्मिक स्थळांवर कसा उकिरडा माजला आहे त्याची अनेक निवडक छायाचित्रे झळकली. चीनी संकेतस्थळ आहे म्हटल्यावर अनेकांनी देशभक्ती आणि चीनद्वेषातून 'चीन भारतावर कसे कसे हल्ले करत आहे आणि हे सुद्धा भारताचे पर्यटनातून मिळणारे उत्पन्न बुडवायचे कारस्थान कसे आहे' यावर तावातावाने त्यावर चर्चा करायला सुरवात केली. हे खरं आहे, मात्र अशी चर्चा करत असताना एक देश म्हणून गेली काही वर्षे आपल्याला सार्वजनिक स्वच्छतेचे वावडेच निर्माण झालेले आहे हे मात्र सोयिस्कररित्या विसरले गेले.

भेळ खाल्ली, टाक कागद तिथेच. चणे-दाणे खाल्ले, टाक कागद तिथेच. प्लॅस्टीकच्या कपातून चहा प्यायला, टाक तो कप खाली तिथेच. पान, गुटखा, पानमसाला खाऊन यत्र तत्र सर्वत्र घातलेले ते मंगलाचे सडे हे तर प्रत्येक कोपर्याचे व्यवच्छेदक लक्षणच झालेले आहे. चालत्या गाडीतून विविध प्रकारचा कचरा बाहेर टाकणे याचा एक सुशिक्षित नमूना नुकताच बघितला. गाडीतून शहाळ्याचे पाणी पिऊन झाल्यावर शहाळे सरळ रस्त्यावर फेकून देण्यात आले. हे असंच सुरू राहिलं तर सगळा देश जरी झाडू घेऊन उभा ठाकला तरी कमी पडेल.

तेव्हा या अभियाना अंतर्गत म्हणा किंवा स्वयंप्रेरणेने म्हणा, आपला परिसर जरूर स्वच्छ करा पण मुळात आपण वरील मार्गांनी कचरा करण्यास कारणीभूत ठरत नाही ना, याचा विचार करुन आधी अशा प्रकारच्या कचरानिर्मितीला पायबंद घाला. सुधारणा करायची असेल तर समोरच्याकडे बोट न दाखवता आणि यंत्रणांना दोष न देता स्वतःपासून सुरवात करा. तरच आपला देश स्वच्छ होऊ आणि राहू शकेल.

चला तर, आपला भारत स्वच्छ राखूया!

------------------------------------------
इतरत्र पूर्वप्रकाशित
------------------------------------------

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदर लेख कोक्या..
खरच सुरुवात स्वतः पासुन करायला पाहीजे..
आज काल माझी सौ. आणि मी कंपल्सरी एक नियम पाळातो..

प्रवासात, बाहेर गेल्यावर, चिप्सची पाकीटे, पाण्याची बाटाली कधीच वाहनातुन बाहेर फेकुन देत नाहीत. तो कचरा घरी आणतो आणि डस्टबीन मधे टाकतो.. जणे करुन मनपा कर्मचार्‍यांना विलग करणे सोपे होईल आणि आपल्या रस्त्यावर कचरा पण साठनार नाही Happy

देवेंद्र फडणवीसांच्या विजयरथाच्या मागोमाग कचरागाड्या होत्या व चक्क रस्ते साफ करत जात होते, ही चांगली सुरुवात म्हणायला पाहीजे!

रेव्यु - मिरवणूकीत फटाके, हार - तुर्यांचा खच, पाण्याचे पाऊच असं कुठही आढळलं नाही? विजयोउत्सवात एवढा कचरा तर पब्लिक करणारच ना! मी दीक्षाभूमी परिसरात राहते एकदा दसर्याला येऊन पहा! तसेच रामनवमीलाही या ! ह्यावर्षी काय बदल होतो, बघू यात.

मंजू, रेव्यु: तुमचे बरोबर आहेत तसे. पण मिरवणुका व उत्सव हे कधीतरीच असतात. पण आपण (आपण म्हणजे भारतीय सगळेच) रोजच्या आयुष्यात जो कचरा करतो त्याचा फार मोठा परिणाम होतो.

चिनी पर्यटक जीयांग झमीन हा तेराव्या शतकात भारतात आला होता,काशी मथुरा गया इत्यादी ठिकाणी त्याने भेटी दिल्या, त्यानेही भारतात अस्वच्छता असते असे लिहलेय...

लोकांच्या सवयीचे काही नमूने:

हा फोटो एका कंपनीतला. वाढदिवस साजरा केल्यावर केकचे कव्हर (शेजारीच असलेल्या) कचरापेटीत टाकावे इतके क्षुल्लक कामही लोकांच्याने होईना.

ME1.jpg

याबद्दल तर बोलायलाच नको.

Me2.jpg

अत्यंत योग्य असे लेखन प्रकटन आणि त्यातील विचारही सार्वजनिक तसेच व्यक्तिगत पातळीवर आदर्श ठरावेत असेच आहेत. अशा अभियानामुळे जरी एखाद्याला वाटले की सार्वजनिक ठिकाणी आपण कचरा करणे योग्य नाही, तरी देखील यातून काहीतरी चांगले निर्माण झाले असे म्हटले जाईल.

"...अभियाना अंतर्गत म्हणा किंवा स्वयंप्रेरणेने म्हणा, आपला परिसर जरूर स्वच्छ करा...." ~ स्वयंप्रेरणेनेच हे काम होणे अगत्याचे आहे, कोकणस्थ. उगाच कलेक्टर वा व्हाईस चॅन्सेलर वा मेयर पहाटे ५ वाजता उठून अशा अभियानाला येतात म्हणून त्या मागे त्या दिवसापुरतेच जाण्यापेक्षाही (जावे लागत असेल तर जाण्यास नक्कीच हरकत नसतेच कुणाची...) अन्य वेळीही सार्वजनिक स्वच्छतेचे महत्त्व स्वत:च्या आचरणात आणले तरी पुष्कळ.

तुसी बरोबर बोल रहे हो कोके !
धिकांचे आणि अधिकांचे म्हणणे देखील बरोबर आहे.
भारतीय उपखंडात एकंदरीत साफसफाई पेक्षाही कचरा करण्यात लोकांना जास्त आनंद होतो की काय असे वाटते.

महेश.....

"...एकंदरीत साफसफाई पेक्षाही कचरा करण्यात लोकांना जास्त आनंद होतो की काय...."

~ नेमकी ह्याच धारणेची साफ़सफ़ाई झाली पाहिजे ना प्रथम ! म्हणून तर किमान अशा काही लेखातून तसेच वाचनातून तुमच्याआमच्या मनी "चला, जाऊ दे इतरांचे....किमानपक्षी आपण स्वत:पासून तरी सुरुवात करू या..." इतकी कमाई जरी झाली तरी आपण निश्चित्तच काहीतरी मिळविले अशी आशा फ़ुलेल. मी हे जाणतो की खूप लोकमानसिकता आणि क्षमता उपलब्ध होणे गरजेचे आहे....तरीही कोणत्याही शुभकार्याला कुठून तरी केव्हातरी सुरूवात तरी होऊ दे....ती स्वत:पासूनच झाली तर खूपच चांगले ना.

को - वैयक्तिक पातळीवर मी पाळतेच व प्रत्येकाने पाळायलाही हवी. रामनवमीचा दुसरा म्हणजे दशमीला सकाळी फिरायला जाववत नाही अन दसर्याच्या मागचे पुढचे दोन दिवस! इथे चांगली गोष्ट घडली ती सांगितली की कचरा केल्यावर ती गोळा करण्याची जबाबदारीदघेतली

लेक लहान असतानाचा एक प्रसंग. कदाचीत अधी कुठे लिहिला असेन. आठवत नाही.

लेक ३-३.५ वर्षांची होती. आम्ही दोघी बाल्कनीत उभ्या होतो. ती बिस्कीट खात होती. खाऊन झाल्यावर तिने रॅपर खाली अंगणात टाकले. आम्ही चॉथ्या मजल्यावर रहातो. मी तिला घेऊन खाली गेले. तिला ते रॅपर उचलायला लावले. चार मजले चढवून आणून घरच्या डस्ट बीनमधे टाकायला लावले.

तेव्हापासून लेकीने कधीच रस्त्यात, अंगणात कचरा टाकला नाही Happy

मी नताशा....

मी तुझे अगदी मनापासून अभिनंदन करतो....मुलामुलींना शाळेत नित्यनेमाने शिक्षण मिळत असते....पण "सामाजिक जाणीवेचे महत्त्व" याबद्दलचे शिक्षण आईवडिलानीच देणे अपेक्षित आणि आवश्यक ठरते. असतात अगदी छोट्या छोट्या गोष्टी पण त्याद्वारे मिळणार्‍या शिस्तीची महती अधिक.

ग्रेट.

हं ! आम्ही रोज कचरा जाळतो ! घरासोमर उडत येणार्या रस्त्यावरच्या पोलीथीन गोळा करुनही जाळतो.!