चंद्रमुखी - लेखक - विश्वास पाटील

Submitted by दिनेश. on 13 November, 2013 - 07:51

विश्वास पाटील हे माझे अत्यंत आवडते लेखक. त्यांच्या बाकीच्या कादंबर्‍या वाचून झाल्या होत्या तरी चंद्रमुखी मात्र वाचायची राहिली होती.
या कादंबरीची जाहीरात बरीच झाली होती पण त्या मानाने ती वाचकप्रिय झाली नाही. पाटलांची म्हणून वाचायला जाल तर तितकिशी आवडणार नाही, पण तशी वाचनीय आहे.

तमाशा कलावंत चंद्रमुखी व महाराष्ट्रातील खासदार दौलत यांची हि कथा. प्रेमकथा म्हणवत नाही, कारण
खरे प्रेम दोघांकडून आहे असे वाटत नाही. शेवटही अपेक्षेपेक्षा थोडा वेगळा आहे.

पाटलांना नेमका कुणावर फोकस ठेवायचा होता ते कळत नाही. महाराष्ट्रातील सद्य राजकारण आणि तमाशाचे विश्व, हे तर खरे त्यांच्या कार्यक्षेत्राशी निगडीत विषय. तरी दोन्ही क्षेत्रांचे चित्रण तितकेसे प्रत्ययकारी वाटत नाही.

त्यांच्या इतर कादंबर्‍यात शृंगारीक वर्णने बहुतेक नाहीतच. इथेही ते थोडे अवघडल्यासारखेच वाटतात.
एका प्रसंगात दौलत तिला लिपस्टीक लावलेले ओठ धुवून यायला सांगतो. माझ्या मते धुवून लिपस्टीक जात नाही, ती पुसावी लागते Happy

त्यांच्या इतर कादंबर्‍यातला बांधीवपणाही इथे नाही. खुपदा तपशीलात काही तफावत वाटते. ( उदा. मॅक फर्नांडीस आधी चैन्नई चा असतो मग एकदम बँगलोरचा होतो. डॉली, ( दौलतची बायको ) त्याच्या निर्व्यसनीपणाची ग्वाही देते आणि त्यानंतरच्याच पानावर त्याच्याच तिला लिहिलेल्या पत्रातल्या मजकूरात, तो केंब्रिजला असताना दारूच्या नशेत, मोनालिसा नामक इतालियन सुंदरीकडे गेल्याचा उल्लेख येतो. )

या कादंबरीच्या जाहीरातीत तमाशा कलावंताच्या तोंडच्या अलंकारीक भाषेचे अमिष दाखवले होते, पण
कादंबरीत, म्हाळसा / बाणाई यांचेच दोनचार उल्लेख आहेत. खरे तर ते कलाकार अशिक्षित असले तरी
वगांच्या निमित्ताने पुराणातील संदर्भांचे जाणकार असतात. तसे इथे जाणवत नाही.

स्वतः लेखकाच्या भाषेतही तसे काही खास नाही. एकवेळ नासलेल्या दूधाचे पनीर करता येईल पण बिघडलेल्या राजकारण्याला सुधारता येणार नाही, असा कैच्या काय अलंकार वापरलाय.

त्यांनी चंद्रमुखीच्या तोंडी ज्या पठ्ठे बापूरावांपासून गदीमांपर्यंत कविंच्या ज्या लावण्या वापरल्यात त्या
अर्थातच सुंदर आहेत पण त्यांनी स्वतः रचलेल्या लावण्या ( उदा. पार्लमेंटाची लावणी ) अगदीच सुमार आहेत.

लालनची पुनर्भेट किंवा राघवचे आणि दौलतचे नाते, असे काही फिल्मी योगायोगही आहेत.

पण एक मात्र खरं, यातली पात्रे मात्र डोळ्यासमोर उभी राहतात. त्यामूळे या कादंबरीवर एखादी मालिका~
मात्र जरूर होऊ शकेल. त्या निमित्ताने का होईना, अस्सल तमाशा प्रेक्षकांना बघायला मिळेल. कादंबरीत
वर्णन केल्याप्रमाणे कलाकार मात्र मिळायला हवेत.

कंगनाला घेऊन पाटील एक चित्रपट करताहेत असे वाचले, त्यामूळे त्यांनी मनावर घेतले तर ...

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मलाही विश्वास पाटिल आवडतात...चंद्रमुखी वाचायला घेतली होती...पण ५-६ पानं वाचली....डोक्यावरुन गेली....म्हणुन सोडुन दिली वाचायची.....पानीपत आणि संभाजी वाचली आहेत मी....फार फार वाईट वाटलं , रडु आलं.....इतक जिवंत चित्र त्यांनी उभ केलय....अजुन पुस्तके वाचायची आहेत त्यांची..

अगदीच फसलेली वाटली ही कादंबरी. पूर्ण वाचलीच नाही. सुरुवात केली आणि बाजूला ठेवून दिली. मूड नसताना लिहिल्यासारखी वाटली.
मला तर त्यांचं 'नॉट गॉन विथ द विंड'देखील कंटाळवाणं झालं. त्यातही ब-याचशा वाक्यरचना, शब्दप्रयोग त्यांच्या शैलीला अनुसरून नाहीत. त्याने रसभंग होतोच, शिवाय जमवलेल्या सा-या माहितीची भरताड केल्यासारखं वाटलं. ते चित्रपटच क्लासिक्स होते म्हणून नेटाने पूर्ण केलं कसंतरी.

मी पानीपत, झाडाझडती वाचली आहेत. दोन्ही अतिशय करूण पुस्तके आहेत. वाचाविशी वाटतातही, पण त्यातल्या कारुण्यामुळे, संपल्यावर सुटल्यासारखे झाले. हे आता वाचून बघेन.

आधी त्यांनी हि इंग्रजीमधे लिहिली होती, आणि वडीलांच्या आग्रहामूळे घाईघाईत मराठीत भाषांतरीत केली, असा उल्लेख आहे.

खडकसिंग, त्या कादंबरीवरूनच नाटक आले होते. तेही छान जमले होते. नाटकाची सिडी उपलब्ध आहे.

चंद्रमुखी ही अत्यंत फसलेली कृत्रिम आणि मेलोड्रामॅटिक कादम्बरी आहे. पाटलांनी पाटीच टाकलेली आहे . अगदीच अतर्क्य आणि खोट्या बटबटीत प्रसंगांन्नी भरलेली कादम्बरी.

पाटलांची स्वतःची आवडती ' पांगिरा ' हीच त्यांची सर्वोत्कृष्ट कादम्बरी आहे. झाडाझडती दुसरी आणि इतर खालीच...

मलाही विश्वास पाटील यांचे लेखन आवडते. 'झाडाझडती' हि मला सर्वात आवडली पण 'चंद्रमुखी' बहुतेक नाही आवडणार.

वरच्या सर्व पोस्टना अनुमोदन !!मी स्वत: ही कादम्बरी ४-५ पानापलिकडे वाचू शकले नाही, खुप खुप प्रयत्न करुन पण Sad Sad

रॉबीनहूड +++++++++++++++++१

इकडे बरेच सुटलेले धागे वेचायला आलेली .. चंद्रमुखी बरेचदा समोर आलं (पुस्तक) अक्षरधारा मधे गेली तेव्हा पण का कोण जाणे हरएक वेळी घ्यायच राहून गेल .. इथल वाचल्यावर वाटतयं कि बरच झालं .. Happy

विश्वास पाटलांची आहे म्हणुन फार अपेक्षेनी वाचायला घेतली होती पण अजिबातच नाही आवडली. कशीतरी पुर्ण केली. शेवटी तर वाचलीच जात नव्हती.
तसचं सेम झाडाझडतीबद्दल....

इथे बहुतेकांना कादंबरी आवडली नाही असे दिसतेय.. यावर चित्रपट येतोय ..अमृता खानिलकर आणि छकुला आदिनाथ कोठारे यांचा.. प्रसाद ओक दिग्दर्शक ..कसा असेल? .. गाणी तर छान झालियेत.. अजय अतुल .. श्रेया घोषाल च title song .. बाकी २ ..एक आर्या आंबेकरची मस्त बैठकी तील लावणी . ऐकली का कोणी गाणी

मी ऐकली व पाहिली दोन्ही गाणी. बाई ग आणी चंद्रा. छान दिसते अमृता. बाई ग मध्ये मध्येच तो हिरो हिरवीण राधा किसन बनतात व उत्तर भारतीय ड्रेस घालून येतात ते फा र विनोदी . सर्व मूड चा विचका होतो. ती नुवारीतच छान दिसते. दागिने व हस्त मुद्रा छान आहेत. तो बाप्या कोण आहे.

अ. खा ची निवड चुकलीय असं वाटतंय. संगीत छान आहे. निव्वळ संगीताच्या जोरावर पण चालेल अशी आशा करूयात.

बाई ग ऐकलं..पाहिलं...
भन्साळी ने गाईड केलेलं दिसतय प्रसाद ओक आणि अजय - अतुल दोघाना असं वाटलं....
राधा कृष्ण फनी... जमुना के तीर बाजे मॄदंग करे कॄष्ण रास राधा के संग सुरु होतं का काय एकदम असं वाटलं...

मोबाईलवरून शक्यतो असा प्रतिसाद देत नाही. पण नंतर लक्षात राहत नाही.

चंद्रमुखी चित्रपटातल्या गाण्यांवरून उलटसुलट मतं बाहेरही ऐकू येतात. यातल्या गाण्यांवर रिअ‍ॅलिटी शोजचा प्रभाव आहे हे खरं आहे. रिअ‍ॅलिटी शोजनी लावणीमधे इंप्रोव्हायझेशनच्या नावाखाली बरेच काय काय बदल केले आहेत. असे बदल खूप काळापासून चालू आहेत. खूप खूप वर्षांपूर्वी म्हणजे टीव्ही कृष्णधवल होता आणि विठाबाई मांग / सुलोचणा चव्हाण सक्रीय असतानाच्या काळात दोघींपैकी कुणाची तरी मुलाखत आलेली होती. त्यात अशी खंत व्यक्त झाली होती कि तमाशावर सिनेमाचे आक्रमण झाले आहे. अस्सल लावणी लोप पावत चालली आहे. लोकांनाही अस्सल पाहण्यापेक्षा चित्रपटातली लावणी, गाणी ऐकायला आवडतात. फडाला शाहीर मिळत नाहीत. जो तो चित्रपटासाठी लिहीण्यासाठी धडपडतो. असे प्रमुख मुद्दे होते.

लावणी जिवंत रहावी यासाठी तिच्या जतनासाठी राज्य सरकारने एक सांस्कृतिक केंद्र उभारावे ही मागणी त्यात केली होती.
त्या वेळी तमाशा पाहणे म्हणजे हीन अभिरूची समजली जायची. मराठी चित्रपट आणि तमाशा या समीकरणालाही नाके मुरडली जायची. पण आज खरंच अस्सल लावणी कुठली हे सांगणे अशक्य आहे. तमाशा तरी दादू इंदूरीकर, राम नगरकर, निळू फुले, काळू बाळू या मंडळींमुळे बराच काळ जिवंत होता. त्याचेही रूपांतर लोकनाट्यात झाले. त्यातला अस्सल चावट बाज गेला. कला जशी आहे तशीच जतन व्हायला हवी. तिला सभ्यतेच्या चौकटीत ठाकून ठोकून बसवू नये. हे काम मान्यवरांनी केल्याने काय बोलणार ?

आज तमाशा आणि लावणी भ्रष्ट स्वरूपात शिल्लक आहे. खंत ही आहे की विठाबाई मांग या नावाने जे सांस्कृतिक केंद्र आहे तिथेच लावणीचे विडंबन सादर होते.
वळती गाव इथल्या एका लोककलावंताच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती. त्यांचा स्वतःचा फड होता. अनेक वग त्यांनी स्वतः लिहीले होते. लावण्याही लिहील्यात. कागद सुद्धा पिवळे पडलेत. पण झेरॉक्स काढायलाही कुणाकडे देत नाहीत.

त्यांना राज्य पुरस्कारही प्राप्त आहेत. चित्रपटातली लावणी म्हटल्यावर ते भडकले. आमच्या काळात एखादी स्टेप चुकली की पोरींवर ओरडायचो आम्ही असे ते सांगत होते. आता लावणी शिकवणारे पण नाहीत आनि जिथे लावणी नृत्य शिकवतात तिथेच चित्रपटातल्या लावण्या शिकवत असतील तर अस्सल कुठून दाखवायचं ? हा त्यांचा सवाल आहे.

चंद्रमुखी कादंबरी मी बऱ्याच वर्षांपूर्वी वाचली आहे, त्यामुळे खात्री नाही, पण मला असं वाटतंय त्यातही त्यांनी हा मुद्दा मांडला आहे. 'अस्सल' (चित्रपटातल्या नाही, तमाशा कलावंतांनी लिहिलेल्या) लावण्यांऐवजी चित्रपटातल्या लावण्यांचं प्रमाण फडावर वाढलं आहे, असा. प्रेक्षकांनाही तेच हवं असतं.
तसाच आता रिॲलिटी शोजचा प्रभाव (नृत्यावर) वाढला असेल.

लावणी बघायला नेहमीच आवडते, पण फडाची.
या चित्रपटातली गाणी ऐकायला छान आहेत, पण नृत्य लावणी वाटत नाही. तद्दन फालतू.

ही लावणी बघा: https://youtu.be/Q1LU-D8V4Jo