है स्सालाsss

Submitted by दाद on 18 September, 2013 - 19:16

है स्साला....
अभी अभी हुआ यकीं
के आग है ...

तीरांचं कसं असतय बघा, तीर तीर पे लिखा है निशान-ए-दिलका नाम!
म्हणजे काही तीर अगदी जवळून... कानाला वारा देऊन जातात... काही चक्कं वळसा घालून... पण आपलं नाव लिहिलेला तीर? तो पत्ता शोधत येतोय... तुम्ही कुठे खाचपटीत, तळघरात बसा... काही खरं नाही.. घुसायचं तेव्हा घुसतो, आणि करायची ती तबाही करतोच.

आयुष्यं समृद्धं करणारे तीर ते नव्हेत जे कानावर मोरपीसाची झुळुक देऊन पसार होतात... आयुष्यं समृद्धं करणार्‍या तीरांना दिलावर झेलायची ताकद हवी... तरच मनाच्या मातीत झालेल्या हळवेल्या, जखमेत... सख्यं रुजतं... काळजाचं खत-पाणी घालून वाढवायचं, जोपासायचं... ओळखीचा फुलोरा येतो.. आठवणींचे घोस घमघमतात.

टोकावर अंगार घेऊन फिरणार्‍या तीरांपैकी एक अत्रंग तीर म्हणजे शशांक... ज्याला त्यानं निशाण बनवलं...त्याचं काही खरं नाही.

अगदी खरं सांगायचं तर आधी, माझ्यासाठी शशांकपेक्षा माझी सखी... त्याची सहचरिण माझ्या अधिक जवळची.
शशांक भेटला तो म्हणजे सगळ्या सगळ्यात प्रचंड लुडबुड करणार्‍या अवखळ पोरासारखा. त्यानं पाय ठेवला नाही असा दगड नसेल सिडनीत... लिटरली. शशांक म्हणजे कशालाही ’हो करूयाच’ म्हणणारा, वाहून जाणारा... शशांक म्हणजे कटी पतंग... त्याचा मांजा हातात घट्टं धरून फिरकीसकट जमिनीवर पाय रोवून सखी.... शशांक म्हणजे घरातल्या दोन वासरांत.. कायम शिंग मोडून शिरण्याच्या प्रयत्नात... एक तिसरं मोठ्ठं वासरू.... सगळ्यात हट्टी आणि अवखळ.
आधी माझ्यासाठी शशांक फक्तं सखीचा नवरा होता.... हो, खोटं कशाला बोलू...

ह्या पठ्ठ्याला अनेक कार्यक्रमांमधून राबताना बघितलाच होता... झाडलोटीपासून, धमक्यां आणि अरेरावीपर्यंत सगळं... कार्यं सिद्धीला न्यायला जे काही आवश्यक आहे ते सगळं करण्यात... शशांक साठे होतेच... अनेकदा अनेकांना मिळून एकटाच पुरायचा. त्या एव्हढ्याशा जीवाच्या डरकाळ्या गगनभेदी असायच्या.

येता-जाता काहीतरी भन्नाट कोट्या करणार्‍या ह्या फकिराला, सगळं सगळं आपणहून मिठ्या मारायला यायचं... काहीही भिडायचं त्याला...
छानशा कविता, चपखल व्यक्तीचित्रण, आत्मचरित्रं, गाणं, अप्रतिम प्रवासवर्णन, सुंदर चित्रं...
अजून झालंच तर किट्टं काळ्या आभाळातली तिरपी चंद्राची कोर, लव-लव पात्याचा माळ, समुद्राची गाज... गोड मिट्टं बासुंदी, कितव्यांदाही दिलेला चहा, काहीही चमचमित...
... एखादी गिर्रं गिरकी, शिर्रं शिरशिरी, अगदी चुर्रं फोडणी सुद्धा...
रोजच्या साध्या-सुध्या आयुष्यातला प्रत्येक क्षणही त्याला भेटल्यावर "... क्या बात है" म्हणूनच पुढे जात असणार.
प्रत्येक क्षणाच्या कानात आनंदाची जादुई फुंकर घालण्याची मजबुरी घेऊन आल्यासारखा शशांक नावाचा फकीर...
फकीर अशासाठी की ह्यातलं काहीही त्याला फार वेळ धरून ठेऊ शकायचं नाही.

कधीतरी त्याला म्हटलं... इतकं वाचतोस, छान विचार करतोस, शब्दांचं भांडारही आहे... लिहीत का नाहीस?
"... मग? तू काय करशील?" इतकं सहज मला आपटून गेलाही अजून कुणालातरी कल्हई करायला.
त्याचं बरोबरच. लिहिण्या-बिहिण्याचं किडुक-मिडुक काम हे लेखक-लेखिकांचं... त्या सगळ्या लेखक मंडळींची मोट बांधून, सिडनीकरांच्या समोर ठेवण्याचा एक कार्यक्रम केला की शशांक साठे धन्य व्हायचे. मग "काहीतरी केलं" असं वाटायचं त्याला.
काय करायचं ते असं मोठ्ठं, उदात्तं, किमान दहा दगडांवर एकाचवेळी पाय ठेऊन, काय ते. ते करून झालं की दुसर्‍या कशाची तरी मोट बांधायला हा निघाला.
आपल्या तसल्याच एका अत्रंग मित्राच्या नादी लागून लिहिलाच असता तर "झेंडूची फुले" नंतर "अफुची बोंडे" म्हणून वात्रट कवितासंग्रहं काढला असता..

मी वाजवलेल्या मैफिलींत त्याला आमोरी-सामोरी असा बघितलाच नव्हता कधी. नेहमी भारतातून येणार्‍या कलाकारांचं हवं-नको बघण्याच्या, एक झक्कास कार्यक्रम सिडनीकरांना देण्याच्या उदात्तं कार्यात गुंतलेल्या ह्या “उडात्त” माणसाला मी, समोर एका जागी बसून कार्यक्रम बघतोय, ऐकतोय असा बघितलाच नव्हता.

मध्यंतरी भारतातून आलेल्या सानिया पाटणकरांच्या कार्यक्रमाला दिसला पठ्ठ्या… समोर ऐकायला एका जागी बसलेला दिसला. कार्यक्रम घरगुती म्हणून का काय पण त्या कार्यक्रमाचा दगड कसा काय कोण जाणे, पण ह्याच्या पायाखालून निसटला होता.
श्री अन पुरिया धनाश्री गायल्या बाई. सखी तेव्हा भारतात, म्हणून हा एकटाच उंडारत होता. मैफिल सुरू झाली आणि दहाच मिनिटांत माझ्या लक्षात आलं की, मीच काय पण बाईसुद्धा निव्वळ ह्याच्याचसाठी मैफिलीत आहेत ह्याबद्दल त्याच्या चेहर्‍यावर अपरंपार खात्री दिसतेय. एखाद्या नवाबासारखा बसला होता.
हर एक हरकत, मुरकी, आलाप, तान... जणू त्याच्याचसाठी खुडल्यासारखी नेमकी दाद त्याच्याकडून येत होती... माझ्याही नकळत मी त्या दिवशी ह्या पठ्ठ्यासाठी वाजवलं... सानियाबाईंचं त्या जाणे.

"....ही चोरीला गेली तर मी जबाबदार नाही... आत्ताच सांगून ठेवतो", माझ्या एका सुंदरशा पर्सकडे बघून आजारपणात कीमोसाठी लॉनमॉवर फिरवलेल्या आपल्या डोक्यावरून हात फिरवीत शशांकनं माझ्या गाडीत बसता बसता सांगितलं.
"... अरे घरी गेल्यावर एखादी प्लॅस्टिकची पिशवी दे, ही रिकामी करते... तुझ्या प्रिय बायकोच्या वस्तू ह्यात ठेवूया... संध्याकाळी आली की दे..." यडचापपणे बोलतच रहाणार्‍याकडे बघण्याची एक विशिष्टं नजर असते त्या नजरेने माझ्याकडे बघत त्याने मला हातानेच थांबवलं. पर्सं मस्तपैकी मांडीवर घेऊन लाडिकपणे त्यावरून हात फिरवीत म्हणाला, "... ए... ही पर्स मी माझ्यासाठी म्हणतोय... बायकोसाठी नाही. तिचं-तुझं काय ते तुम्ही बघून घ्या".
मी गाडीसकट पडत होते.
माझी गचांडी धरलेल्या ह्या पठ्ठ्यानं मग नको नको म्हणताना बर्‍याच गोष्टी माझ्याच नकळत माझ्या गळी उतरवल्या असणार. बाकीचं जाऊदे... निव्वळ शशांकच्या राज्यात चालत नाही म्हणून त्याच्या समोर तरी मुकेशला वाईट म्हणायचं थांबवलं मी... मुकेशचीच बिचार्‍याची हरकत नसती एकवेळ... पण शशांक? शशांकच्या राज्यातून हद्दपारीची कल्पनाच करवली नाही, मला.
आता? आता तर त्याला मी मनात म्हटलेलंही कळेल हे समजून त्याच्या अपरोक्षही मुकेशला छानच म्हणावं लागतय.

शशांकनं आपलं बोट धरलं हे आपल्याला कळेपर्यंत आपण त्याच्या कवेत असतो... हा माझ्यासारखाच बहुतेकांचा अनुभव असणार.

माझी शौर्याची व्याख्या जरा वेगळी झालीये...अन ती सुद्धा शशांकनं घडवून दिलेली.
आमच्या गेल्या वर्षीच्या नोव्हेम्बरच्या काव्य-गोष्टींच्या मैफिलीत साहेब आले होते. आजाराशी चाललेल्या युद्धाचे घाव-डाव अभिमानाने उरी-शिरी वागवीत पठ्ठ्या खुर्चीत येऊन बसला तेव्हा... सुजलेले पाय, चेहरा बघून आधी मी धसकले. पण त्याचा तो बेदरकार, दिलखुलास चेहरा बघून वाटलं...
’यंव रे यंव... इस कॅन्सरकी ऐशी की तैशी... बाप्पू... हाणणारेस तू ह्या आजाराला... आगदी भर चौकात धुणारेस... है शाब्बास... उडवच तू धुव्वा’.
लिहून आणलेलं काहीच न वाचता त्यानं आपलं मनोगत उकललं... त्याची स्वत:ची आजाराशी झुंज... घरचे अन मित्रं-मंडळींनी धावधावून करणं.... भरभरून बोलला...
आम्ही आपले उदयभानू, बाजीप्रभू ह्यांपैकी कुणालातरी बघत असल्यासारखे थक्कित होऊन बसलो होतो. पण इतक्यावर पुरवलं तर त्याला शशांक साठे कसं म्हणता येईल?
"... तुम्हाला काही प्रश्नं आहेत?... विचारा ना.. तू? शलाका?"

निशाणाला कळतं का कधी... तीर अवधान घेत असल्याचं?...
माझी अवस्था वेगळी नाही. मीही आगाऊपणानं विचारलंच, "... ह्या आजारानं शरीरावर खूप काही वाजवलं, शशांक... ह्या प्रवासात तुझ्या मनाची, व्यक्तिमत्वाची इमारत... त्यातले बदल? आहेत असे बदल? तुला जाणवतात?"

तीर-ए-अंदाज घेण्यासाठी मन रितं करण्य़ापुरताच शशांकनं घेतलेला एक पूर्णं श्वास अन पूर्णं निश्वास... क्षणभरासाठीच... पण आमच्यातल्या प्रत्येकानं तो टिपला.
शूर तो, जो स्वत: स्वत:शी करीत असलेली प्रतारणा चार-चौघांत बोलून दाखवू शकतो.... त्यानंतर शशांक माझ्यासाठी सर्वात शूर माणूस ठरला.
"... मी दाखवतोय ना... मी किती शूर आहे आणि कसा ह्या आजाराबरोबर झुंजतोय... हम जितेंगे... खोटं आहे हे सगळं... आतून मी भयंकर घाबरलोय... मरणाची कुणाला भिती वाटत नाही?...."

पुढे तो बरच काही बोलला असणार... मी ऐकलच नाही.... डोक्यात झण्णं झालं... डोळ्यात पाणी अन मानेवर काटे आले माझ्या... कारण? कारण एकच... त्या क्षणी शशांक साठे नावाचा तीर माझ्या आरपार गेला. त्याच्याच अत्रंग भाषेत सांगायचं तर... लागी कलेजवा कट्य़ार!

जिगरवाल्या निशाणांना जिगरवाले तीर भेटले की होणारी जंगही नामी... पण अगदी काळालाही नकळेल अशी ... ह्या हृदयीचं त्या केल्यासारखं. ना तीर हुंकारत ना निशाण विव्हळत. जखम खोलही नसते, यारो... अगदी नखवलेलीसुद्धा... पण दर्दं? तो मात्रं गर्दं गहिरा.
जखमा तसं जगही करीत असतंच की. काही बुजाव्यात म्हणून धडपडायचं... अन काही? हलक्या दुखाव्यात म्हणून ताज्या ठेवायच्या.

निशाणांच्या हातात असतं तर, कुठल्या तीराला बळी पडायचं ते?...
म्हणतिल कुणीही... कोण जाणुन-बुजुन घेईल पायावर कुर्‍हाड मारुन? कुणी सांगितलय जीव लावायचा, मग तोडून घ्यायचा, मग जखम, वर वर धरलेली खपली, आत आपलंच आपल्याला ठसठसणारं, पिळवटणारं मन...
पण तसं नाहीये, गडेहो...
शशांकसारखे तीर ज्यांना भिडले नाहीत... ते अज्ञानातले सुखी बिचारे...
बाकी तुमच्या-आमच्यासारखे वेगळ्याच दु:खानं सुखी...
हळवेल्या जखमांच्या, हल्लक मातीत, सख्याच्या रोपाला आलेले अंगारांचे घोस... तेजानं घमघमणारे... ओळखीचे वाटतात... अन पापण्यांवर ओल्या मोत्यांच्या झालरी झुलतात... पण...
पण ओठातून मात्रं निघून जातं...
है स्साला...

समाप्त

Group content visibility: 
Public - accessible to all site users

अवल>>+ १००

दाद तुझे नाव बघुन काही तरी सुंदर वाचायला मिळणार याची खात्री असते. तुझे सगळे लिखाण एकत्र कर ना.

खरंच स्पीचलेस...

चालत नाही म्हणून त्याच्या समोर तरी मुकेशला वाईट म्हणायचं थांबवलं मी... >> असं होतं बरेचदा. हे असे बारकावे दादस्पेशल.

खरंच स्पीचलेस... <<

काळजाला हात घालणारं लिखाणं...

"... मी दाखवतोय ना... मी किती शूर आहे आणि कसा ह्या आजाराबरोबर झुंजतोय... हम जितेंगे... खोटं आहे हे सगळं... आतून मी भयंकर घाबरलोय... मरणाची कुणाला भिती वाटत नाही?...."

पुढे तो बरच काही बोलला असणार... मी ऐकलच नाही.... डोक्यात झण्णं झालं... डोळ्यात पाणी अन मानेवर काटे आले माझ्या... कारण? कारण एकच... त्या क्षणी शशांक साठे नावाचा तीर माझ्या आरपार गेला<<< हे वाचुन क्षणभर माझ्याही डोक्यात झण्ण झालं... Sad

शेवट असा आहे कि सुंदर म्हणता येत नाही Sad
अंतर्मुख केलं शशांक साठेंनी. लिखाणाला दाद द्यावी कि तुमच्या या मित्राला ? लिखाणाला यासाठी कि या सत्यचित्रणात देखील लेखणीने आवश्यक तितका तटस्थपणा पाळला आहे. नाहीतर हेलावून सोडणारं लिखाण करणं दादला अशक्य नव्हतं..
(आता पुन्हा एकदा वाचतांना सुरुवातीच्या ओळी अगदी समर्पक वाटल्या ..)
प्रतिसाद देताना कमीअधिक झालं असल्यास क्षमा असावी.

लिखाणाला यासाठी कि या सत्यचित्रणात देखील लेखणीने आवश्यक तितका तटस्थपणा पाळला आहे. नाहीतर हेलावून सोडणारं लिखाण करणं दादला अशक्य नव्हतं..> अगदी अगदी.

मनापासून लिहिलेलं...काळजापर्यंत पोहोचलेलं...

व्वा ! मस्तच लिहिलंय.
"या सत्यचित्रणात देखील लेखणीने आवश्यक तितका तटस्थपणा पाळला आहे." >>> सहमत.
"... मी दाखवतोय ना... मी किती शूर आहे आणि कसा ह्या आजाराबरोबर झुंजतोय... हम जितेंगे... खोटं आहे हे सगळं... आतून मी भयंकर घाबरलोय... मरणाची कुणाला भिती वाटत नाही?...." >>> अगदी अगदी.
(आपण घाबरतो हे स्पष्टपणे कबूल करायला देखील हिम्मत लागते.)

जिगरवाल्या निशाणांना जिगरवाले तीर भेटले की होणारी जंगही नामी... पण अगदी काळालाही नकळेल अशी ... ह्या हृदयीचं त्या केल्यासारखं. ना तीर हुंकारत ना निशाण विव्हळत. जखम खोलही नसते, यारो... अगदी नखवलेलीसुद्धा... पण दर्दं? तो मात्रं गर्दं गहिरा.
जखमा तसं जगही करीत असतंच की. काही बुजाव्यात म्हणून धडपडायचं... अन काही? हलक्या दुखाव्यात म्हणून ताज्या ठेवायच्या. >>>>>> त्या क्षणी शशांक साठे नावाचा तीर माझ्या आरपार गेला. त्याच्याच अत्रंग भाषेत सांगायचं तर... लागी कलेजवा कट्य़ार!

बाकी काही शब्दंच सुचत नाहीत आज...... किती वेळा वाचला हा लेख आणि मनाची प्रतिक्रिया तर शून्यच ...

अशा गोष्टी तू कशा काय शब्दात उतरवतेस गं ??

पुढे तो बरच काही बोलला असणार... मी ऐकलच नाही.... डोक्यात झण्णं झालं... डोळ्यात पाणी अन मानेवर काटे आले माझ्या... कारण? कारण एकच... त्या क्षणी शशांक साठे नावाचा तीर माझ्या आरपार गेला<<< हे वाचुन क्षणभर माझ्याही डोक्यात झण्ण झालं... +१

दाद.....................!!!!!!!!!!!!!!!!!!
-------------------/\---------------------------
काय लिहू?

सगळ्यांचे मनापासून आभार. शशांकसारखे तीर तुम्हा-आम्हा सगळ्यांनाच लाभोत. आयुष्यं उजळून टाकणारे हे तारे... अवचित निखळून पडतात... पण त्यांनी उजेडवल्या काळीजांची झुंबरं... लखलखत रहातात.

मला हल्ली तुझ वाचताना नेहमी एक भिती वाटते...काहीतरी मनात दिवसभर घोळत रहाणार्...जीवाला डाचणार्..मेंदुला हलवणार..

नेहमी असच होत

सुरेख व्यक्ती चित्रण..
मोत्यांच्या झालरी वाटतेस सगळ्यान्ना Sad

काय काय कोट करू?
अनुभुती म्हणजे काय असतं ते कळतं तुझं लिखाण वाचुन... नेहमीच!
अजुनही अंगावर आलेला काटा तसाच आहे

<<<<<जखमा तसं जगही करीत असतंच की. काही बुजाव्यात म्हणून धडपडायचं... अन काही? हलक्या दुखाव्यात म्हणून ताज्या ठेवायच्या.>>>>

आज आता दुसर काहीही हातात घेववणार नाहीय वाचायला Happy

धन्यस तू !

>>पण आपलं नाव लिहिलेला तीर? तो पत्ता शोधत येतोय... तुम्ही कुठे खाचपटीत, तळघरात बसा... काही खरं नाही.. घुसायचं तेव्हा घुसतो, आणि करायची ती तबाही करतोच. >>
बस्स. नि:शब्द.

जबरी...

Pages