जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-३)
कलम नऊ मध्ये लिहिले आहे की, "कुत्रा, साप, विंचू आदि चावल्यास व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे, यासारखे इतर उपचार करणे." एखादा निबंध, कविता किंवा एखादी म्हण वाचत जावे तसेच हे कलमही वाचले तर या कलमात गैर काय आहे? असा साहजिकच कुणालाही प्रश्न पडतो. शिवाय रुग्णाला त्याच्या मनाविरुद्ध बळाचा वापर करून जर एखादा मांत्रिक रोखत असेल तर त्याच्यावर कारवाई होणे उचितच आहे, असे वाटून बस्स एवढाच तर अर्थ आहे या एका ओळीच्या कायद्याचा. मग त्यालाही जर कोणी विरोध करत असेल तर तो विरोध करणारा स्वतः:च मांत्रिक असावा, किंवा धर्मवेडा तरी असावा, तेही नसेल तर अंधश्रद्धा बाळगणारा, अनपढ, गवांर, गावंढळ, बुद्धू, बिनडोक वगैरे तरी नक्कीच असावा, असे बर्याच लोकांना वाटायला लागते, आणि नेमकी येथेच फसगत होते.
पण या कलमात "वैद्यकीय उपचार" हा एकमेवच पर्याय दिल्याने ही "सक्ती"च झाली आहे. "वैद्यकीय उपचार" म्हणजे "ज्या व्यक्तीकडे सरकारी अधिकार्याने सही करून शिक्का मारलेले वैद्यकीय सेवा करण्याचे परवानापत्र आहे त्याने केलेले उपचार." असाच अर्थ घ्यावा लागणार. या व्यतिरिक्त अन्य सर्व उपचार मंत्रतंत्र, गंडेदोरे व जादूटोणा या प्रकारातच गणले जाणार. लेखांक-१ मध्ये दिलेले सर्व "पारंपरिक उपचार" देखील दखलपात्र गुन्हाच ठरणार, कारण या कलमाला "वैद्यकीय उपचार" किंवा "मंत्रतंत्र, गंडेदोरे" हे दोनच प्रकार मान्य आहेत. मग कायद्याशी पंगा घेऊन, वेळ पडल्यास सात वर्ष शिक्षा भोगायची तयारी ठेवून दुसर्याचा जीव वाचवण्यासाठी पारंपरिक उपचार कोण आणि कशाला करेल बरे? म्हणजे आता हे सर्व पारंपरिक उपचार पद्धती थांबणार आणि कालांतराने नष्ट होणार. होत असेल तर होऊ द्या, आपल्या बापाचे काय जाते? असे म्हणून दुर्लक्षही करता आले असते पण; सरकार कायद्यान्वये ज्या वैद्यकीय उपचार पद्धतीची जनतेवर सक्ती करायला निघाले त्या वैद्यकशास्त्रात तरी साप, विंचू आदि चावल्यास "रामबाण उपचार" आहेत काय? दुर्दैवाने याचेही उत्तर नाही असेच आहे. मग सक्ती लादण्याचे कारणच काय? तुम्ही देत असलेला पर्याय जर "पर्फेक्ट" नसेल तर अन्य पर्यायांच्या निवडीचे स्वातंत्र्य का हिरावून घेत आहात?
सध्या प्रचलित उपचार पद्धती मध्ये ग्रामीण जीवनाच्या आवाक्यात असलेल्या अॅलोपॅथी, आयुर्वेद आणि होमिओपॅथी या प्रमुख तीन उपचार पद्धती आहे. त्यातही लोकप्रियतेत सिंहाच्या वाटा एकट्या अॅलोपॅथीचा आहे. वैद्यकशास्त्र अत्यंत प्रगत, अत्याधुनिक आणि बहुतांश रोगांच्या बाबतीत वैद्यकशास्त्राला पर्यायच नाही. पण काही रोग असेही आहेत की, अन्य उपचार पद्धतींच्या तुलनेने वैद्यकशास्त्र पिछाडीवर आहे. खुद्द वैद्यकशास्त्रालाही ते मान्य आहे. अनेक तज्ज्ञ डॉक्टरांनी मान्य केले आहे. उदा.
१) सर्दीपडसा आणि श्वसनाशी संबंधीत रोगांवर वैद्यकशास्त्रापेक्षा प्राणायामाने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते, असे म्हणतात.
२) स्पॉन्डिलाइटिस सारख्या विकारावर वैद्यकशास्त्रापेक्षा योगाने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते. असे म्हणतात.
३) काविळसारख्या रोगावर वैद्यकशास्त्रापेक्षा जडीबुटी आणि पारंपरिक उपचार पद्धतीने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते, असे म्हणतात.
या संदर्भात एक उदाहरण देतो, हे माहितीस्तव उदाहरण आहे, समर्थन नाही. माझ्या एका गोपाल नावाच्या मित्राला काही वर्षापूर्वी कावीळ झाला होता. त्याने सुरुवातीचे काही दिवस खाजगी डॉक्टरकडे उपचार घेतले. पण कावीळ आणखी वाढतच होता. खाजगी डॉक्टरच्या सल्ल्यावरून तो थेट नागपूर मेडिकलला दाखल झाला. १५ दिवस लोटले खर्चही खूप झाला पण आराम नव्हता. डोळे, नखे वगैरे पिवळे आले होते. आरामच होईना म्हणून त्यांनी स्वमर्जीने इस्पितळ सोडले आणि एका घरगुती सेवाभावी नि:शुल्क औषध देणार्या ग्रामीण व्यक्तीकडून औषध घेतले. आराम मिळाला.
ग्रामीण भागात अनेक लोकांना अनेक रोगांवर खात्रीने दुरुस्त होऊ शकेल अशी वनस्पती औषधे माहीत आहेत, याचा अनुभव मी बर्याचदा घेतला आहे. दु:खद बाब एवढीच की, आपले महत्त्व कायम राहावे म्हणून ही मंडळी अशी माहिती स्वतः:जवळच जपून ठेवतात. इतरांना अजिबात सांगत नाही. त्यामुळे या औषधोपचाराची चिकित्सा आणि संशोधन होत नाही. माझ्या गावावरून ८५ किलोमीटर अंतरावरील एका गावात एक सेवाभावी महिला आहे. ती कावीळ रोगावर औषध देते. ३० वर्ष झाले, कावीळ रोगाची साथ वगैरे आली की तिच्या घरासमोर रांगा लागतात. तिच्याकडील औषध घेणारे आजपर्यंत सर्वच दुरुस्त झालेत अशी चर्चा आहे. ते खरे की खोटे हे मला माहीत नाही पण हा औषधोपचार करताना कुठल्या वनस्पती वापरल्या जातात हा माझा नेहमीचाच कुतूहलाचा विषय राहिलेला आहे. हा लेखांक लिहिण्याच्या निमित्ताने या वेळेस मात्र मनावर घेतले आणि तिच्या गावात जाऊन तिची भेट घेतली. कावीळचे औषध ती कसे तयार करते, हे तिने मला सांगावे, मी त्यावर अधिक प्रयोग आणि संशोधन करून लोकांना फुकट वितरित करीन त्यामुळे लोकांचे भले होईल. तुला लोक आशीर्वाद देईल. तुला पुण्य लाभेल अशा तर्हेने खूप समजावले, पण ती राजी होत नव्हती. दोन दिवस सतत पाठपुरावा केल्याने कदाचित तिचे मन द्रवले असेल. शेवटी एकदाची ती राजी झाली.
तिने सांगितलेली औषधी तयार करण्याची पद्धत अशी.
शनिवार दिवशी सकाळी तळहाताच्या आकाराचे एरंडी या वनस्पतीची अडीच पाने घ्यावीत. त्यात १५ ग्रॅम मिरे घालावे. त्यात १/३ ग्लास पाणी टाकून ठेचावे. तयार झालेला रस उपाशी पोटी रोग्यास पिण्यास द्यावा. छोटासा गुळाचा तुकडा खाण्यास द्यावा. नंतर दूध, भात आणि गूळ खायला द्यावा. गरज भासल्यास दुसर्या शनिवारी पुन्हा एक मात्रा द्यावी.
पथ्य - आंबट आणि कच्चे तेल अजिबात खायचे नाही.
हे औषध गुणकारी आहे किंवा नाही, याविषयी मी काही सांगू शकत नाही. केवळ मी मिळविलेली माहिती शेअर करणे, हा उद्देश आहे. भविष्यात कुणालाच कावीळ होऊ नये, ही सदिच्छा, पण झालाच तर थेट डॉक्टरकडेच जावे.
३) वात, लकवा, अर्धांगवायू सारख्या रोगावर वैद्यकशास्त्रापेक्षा जडीबुटी आणि पारंपरिक उपचार पद्धतीने अधिक चांगले आणि लवकर नियंत्रण मिळवता येते, हा माझा अनुभव आहे.
दहा वर्षापूर्वी माझ्या आईला वात, लकवा झाला होता, अॅलोपॅथीचे खूप इलाज केले पण आजार दिवसेंदिवस वाढतच गेला. तालुक्याच्या इस्पितळात भरती केले. त्यांनी १०-१२ दिवसाच्या उपचारानंतर सेवाग्राम मेडिकलला रेफ़र केले. तिथे भरती केले पण प्रकृती सुधारणे ऐवजी बिकटच होत गेली. अर्धांगवायूचा झटका आला. काही दिवसानंतर तिला २० पैकी एकही बोट हालवता येत नव्हते. हात-पाय तर हालण्याचा प्रश्नच नव्हता. सर्व शर्थीचे प्रयत्न झाल्यानंतर तिथून नागपूरला रेफ़र करण्यात आले. तिथे भरती केल्यानंतर डॉक्टर म्हणाले, बघा, तुमचा आग्रह असेल तर भरती करून घेतो, आपण प्रयत्न करू पण काही उपयोग होईल असे वाटत नाही. मध्यप्रदेशातील पांढुर्णा येथून १६ किलोमीटरवर एक तिगाव आहे. तेथे एक हकीम आहे, मग त्याच्याकडे नेले. त्याने फक्त २०० रुपयात काही जडीबुटीची भुकटी आणि तेल दिले. २४ तासातच आराम दिसायला लागला. तीन महिन्यात आई तंदुरुस्त झाली, एवढी की तिला घेऊन वैष्णोदेवीला गेलो. १६ किलोमीटर डोंगर चढणे व १६ किलोमीटर डोंगर उतरणे आणि तेही वयाच्या ७० व्या वर्षी! लीलया आव्हान पेलले माझ्या आईने मृत्यूच्या दाढेतून परत आल्यावर. आजही ती स्वस्थ आहे. वैष्णोदेवीला जाण्यामागे भक्तिभावाने देवीदर्शन घेणे असा आईचा उद्देश तर आईला यानिमित्ताने शारिरीक व्यायाम देणे असा माझा उद्देश होता.
मृत्यूच्या दाढेतून परत आलेली माझी आई
हे लिहिण्यामागे वैद्यकशास्त्राला कमी लेखण्याचा किंवा आव्हान देण्याचा प्रयत्न नाही पण वैद्यकीय उपचाराव्यतिरिक्त अन्य तर्हेने उपचार घेणे म्हणजे अंधश्रद्धा असते, औषध देणारा म्हणजे भोंदूच असतो, असे वगैरे काही नसते. १७ वर्ग शिकणे, १८ पुस्तके वाचणे म्हणजेच ज्ञान असते, उरलेले सगळे अज्ञान असते, असेही नसते, याचेही भान असणे गरजेचे असते.
- गंगाधर मुटे
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
(.....अपूर्ण....)
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-१)
जादूटोणा विरोधी कायदा - एक अनावश्यक, अव्यवहार्य आणि उपद्रवी कायदा (लेखांक-२)
सातीअम्मा मस्त पोस्ट आहे
सातीअम्मा मस्त पोस्ट आहे तूमची. तूम्ही एक सविस्तर लेख लिहाच.
(No subject)
ज्ञानेश, साती ... उत्तम
ज्ञानेश, साती ... उत्तम पोस्टस. साती खूप कमी शब्दांत उत्तम माहिती देण्याचं कसब आहे तुझ्याकडे.
मुटेजी, पहिला आणि तिसरा लेख लिहायचाच होता तर दुसरा नसता लिहिला तरी चाललं असतं.
सामान्यतः लोक दम आणि दमा यात
सामान्यतः लोक दम आणि दमा यात क्न्फ्यूज होतात. दम किंवा शॉर्टनेस ऑफ ब्रेथ हे एक लक्षण आहे. ते कित्येक वेगवेगळ्या आजारात दिसून येते . उदा. अस्थमा,सीओपिडी, अॅनेमिया, हृदयाचे आणि फुफ्फुसाचे विविध आजार.
तर दमा किंवा अस्थमा हा श्बसननलिकेला सूज आल्याने झालेला आजार.
ही सूज काही वेळा तात्पुरत्या स्वरूपाची तर काही वेळा वारंवार असे अॅटॅक होऊन लंग अनरिकवरेबली डॅमेज होते.
जेव्हा स्टिरॉईडस किंवा तत्सम अँटीइनफ्लेमेतरी औषधे वापरली जातात तेव्हा ही तात्पुरती सूज कमी होऊन आराम मिळतो.
आता हा मासळीवाला काय करतो तर काही एक अँटीइनफ्लेमेटरी औषध माशात घालून खायला देतो. मासा बहुदा फक्त अॅट्रॅक्ट करायला असेल किंवा त्या माशातही काहि अँटीइनफ्लेमेटरी गुणधर्म असतील. (शाकाहारींना तेच औषध केळ्यात घालून गिळायला देतात)
यामुळे खरंच ज्या व्यक्तीला तात्पुरत्या स्वरुपाची सूज आहे त्यला काही काळ बरेही वाटते.
पण इतर अनेक कारणांनी असलेला दम कमी होत नाही. उलट ते आजार दुर्लक्ष केल्याने वाढतात.
(लालशाह यांना केलेल्या विपूतून संपादीत)
आभार साती.. प्लीज मनावर घेऊन
आभार साती.. प्लीज मनावर घेऊन लिहिशिल का?
गंगाधर मुटेंचे कार्य आहे यात
गंगाधर मुटेंचे कार्य आहे यात वादच नाही. ही व्यक्ती जगाला न पटेल असे का असेनात पण काहीतरी स्वतःचे चिंतन करत असते व अनुभव घेत ठाम होत राहते इतके मान्य व्हावे.
या लेखमालिकेतील विचारांबाबत मात्र असे म्हणावेसे वाटते की वैद्यकीय उपचारांप्रमाणेच इतरही काही रामबाण किंवा थोडेफार सहाय्यभूत ठरणारे असे उपचार असतात, असू शकतातच, मात्र ते देणार्यांनी त्या उपचारांना उगाचच भक्तीभाव, देवाची भीती असल्या झालरी लावलेल्या असाव्यात. या झालरींचाच विचार आजच्या जगातील सूज्ञ पिढी अधिक करत असल्याने ते एकुण उपचारच हास्यास्पद आहेत असे चित्र निर्माण होते. पण माझा अंदाज असा आहे की तीन भिन्न गोष्टी असाव्यात, जश्या:
१. संशोधनाअंती निर्माण झालेला वैद्यकीय (शास्त्रीय) उपचार
२. पारंपारीक पद्धतीने झाडपाला वा तत्सम बाबींनी केला जाणारा ( शास्त्रीयदृष्ट्या पुरेसा किंवा अजिबात सिद्ध न झालेला असा) उपचार
३. पारंपारीक उपचाराचे महत्व अबाधित राहावे व अडाण्यांना ते पटावे (किंवा त्यायोगे तुंबडी भरता यावी ) म्हणून त्या उपचारपद्धतीला दिलेली देवभक्ती, भूताची भीती, मंत्राचे दडपण, शाप वगैरेचे मुलामे!
आता मुटे काय लिहीत आहेत ते नीट लक्षात येत नाही आहे, पण शास्त्रीयदृष्ट्या संशोधनच न झालेले, अर्धवट संशोधन झालेले किंवा शास्त्राला मान्यच नसलेले असे उपचार अस्तित्वातच असू शकत नाहीत किंवा असूच नयेत असे म्हणणे अयोग्य ठरेल, इतक्या आणि इतक्याच पुरता मी मुटेंशी सहमत आहे.
उदाहरणार्थः जेव्हा आले खाऊन सर्दी, फ्ल्यू इत्यादी कमी होते हा अनुभव असायचा पण तसे का होते हे माहीत नसायचे तेव्हा आले हा पदार्थ औषध म्हणून प्रामुख्याने वापरला जाणे शक्य असणारच. पण तेच आले कोणीतरी र्हां र्हीं करून चाटवले तरच आराम पडतो असे चित्र निर्माण होणे घातक आहे.
कोणत्याही प्रयोगाला उंदिर
कोणत्याही प्रयोगाला उंदिर लागतो.
आज मी स्वतःला एक रुग्ण म्हणून आपले माबोकर डॉ. ज्ञानेश आणि डॉ. साती यांच्यासमोर पेश करत आहे. कृपया त्यांनी उपचार सुचवावा.
मला लहानपणापासून पोटाचा एक विकार आहे. त्याला "गाठ सरकणे" असे आम्ही म्हणतो. (लाहान आतडीवर मोठी किंवा मोठ्या आतडीवर लहान आतडी येणे, असा काहिसा प्रकार असावा.)
पाच-सहा किलो वजन जरी उचलले तर कधीकधी ही गाठ सरकते. पोट मात्र अजिबात दुखत नाही. फक्त भूक लागणे थांबते. नंतर जेवनही थांबते. त्रास काहीही नसतो पण घास गिळण्याची इच्छाच संपते. स्वतःवर कितीही जबरदस्ती करून जेवायचे म्हतले तरी चतकोर-अर्ध्या पोळीपेक्षा जास्त जेवणे शक्यच होत नाही.
मग शरिरात अशक्तपणा येतो. मात्र कामाची उमेद कमी होत नाही. मात्र काम करताना थकवा जाणवतो. पोटात दुखणे वगैरे अजिबातच नसते. हा विकार वर्षातून १५-२० वेळा तरी नक्कीच उद्भवतो.
त्यावर आजवर केलेले उपचार.
१) पूर्वी एक व्यक्ती पोट चोळून बोटाच्या सहाय्याने ती गाठ मूळ जागी (गुरुत्व मध्य) परत आणायचा. दोन तासात हमखास आराम.
२) अनेक डॉक्टर धुंडाळून झालेत. कामानिमित्त गेलो तर मुंबई, पुणे, दिल्ली सर्वच ठिकाणी डॉक्टरांशी संवाद आणि नंतर उपचार झालेत पण शुन्य लाभ.
मात्र मला दोन डॉक्टर डॉ.ग्यानचंदाणी व डॉ. लाहोटी असे मिळालेत की त्यांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन लाभदायी ठरले. गेली २० वर्ष त्यांनी सुचविलेले औषधच (अॅलोपॅथी) मी वापरतो आहे आणि लाभ मिळत आहे.
३) एका जडीबुटीवाल्याने एक सोपा सल्ला दिला होता. तो पण फायदेशीर ठरतो.
४) एन्झाम्सचा विपरित परिणाम होतो. ते घेत नाही.
५) लिंबुपाणी पिल्याने काहीच उपयोग होत नाही. एकदा त्रासून एका ग्लासात पाच लिंबू पिळून प्यालो, चांगला वा वाईट कसलाच परिणाम झाला नाही.
६) सोड्याचाही कसलाच परिणाम होत नाही.
माझे सध्याचे वय ५०, वजन ७० किलो, उंची ५.७
श्यूगर मे २०१२ - २५४ (रॅन्डम),
मे २०१३ - १८० (रॅन्डम),
०५ ऑगष्ट २०१३ - १६० (जेवनानंतर).
१७ ऑगष्ट २०१३ - १३० (जेवनानंतर)
या व्यतिरिक्त आणखी काही माहिती हवी असेल तर सांगा, येथेच लिहितो.
उपचार येथेच सुचवले तर कदाचित अनेकांना उपयोगाचे होईल. नाहीतर ranmewa@gmail.com वर सुचवा.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
(हे वैद्यकशास्त्राला दिलेले आव्हान नाही, असलेच तर या डॉ. व्दयांना आहे.)
मुटे साहेब ! कुणी काहीही
मुटे साहेब ! कुणी काहीही म्हणोत प्रथम मी तुम्हाला तुम्ही ज्या तळमळीने व प्रामाणिकपणे या विषयाचा पाठपुरावा करत आहात त्याचे कौतुक करतो. ज्याअर्थी तुम्ही आपली ओळख प्रकट करून लिखाण करत आहात त्याअर्थी तुमच्या दृष्टिकोनातून तुमचा हेतू अतिशय प्रामाणिक व शुद्ध आहे हे नक्की. तुमचा हेतू चांगला आहे पण तुमच्या वरील धाग्यात अन्य गोष्टींचा ऊहापोह झाल्यामुळे मुख्य हेतू स्पष्ट होत नाही. तथापि तुमची घुसमट माझ्या लक्षात आलेली आहे व ती जशी मला भावली तशी मी पुढील लेखनप्रपंचाद्वारे व्यक्त करत आहे. -
खरतर कोणताही नवीन कायदा करताना सरकारने सुप्रीम कोर्टाच्या/हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करून तो कायदा त्यांच्या नजरेतून पूर्णपणे पारखून घ्यावयास हवा, त्यात वापरलेल्या शब्दांच्या परिभाषा स्पष्ट व्हायला हव्यात जेणेकरून तो कायदा परिपूर्ण व्हावा. सदर जादूटोणा कायद्याची अंमल बजावणी अत्यंत घिसडघाईने करण्यात आलेली आहे हे नक्की.
आता या धाग्याच्या संदर्भातील अनुसूचीमधील कलम क्र.9 कडे वळू.
ते कलम म्हणते, ‘‘कुत्रा, साप किंवा विंचू चावल्यास एखाद्या व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे किंवा यासारखे उपचार करणे.’’
आता ‘यासारखे उपचार’ म्हणजे कोणते उपचार? स्पष्ट होत नाही. मंत्रतंत्राची व्याख्या स्पष्ट नाही. कारण ‘मंत्र’ व ‘तंत्र’ हे शब्द संस्कृत आहे. उद्या अन्य धर्मीय लोक पीडितासाठी आम्ही मंत्र न म्हणता आमच्या भाषेतील ‘दुवा’ मागितला असे म्हणून सुटू शकतात. ‘गंडेदोरे’ यांच्या बाबतीत अशीच स्थिती आहे. कारण साप चावलेल्या माणसाला ए़़खादी मुळी चघळायला दिली तर ती गोष्ट वरील कलमात येत नाही.
दुसरी गोष्ट - वरील कलम पाहता पीडितासाठी कोणतीच हालचाल न करता स्वस्थ राहिले तर दोष येत नाही. कारण कायद्याचे शब्द आहेत की , ‘.....प्रतिबंध करून त्याऐवजी मंत्रतंत्र...’
आता कल्पना करा, गावातील शेतकर्याला शेतात साप चावलेला आहे. त्याच गावात असले उपचार करणारा एक माणूस (भोंदू बाबा म्हणू हवे तर) आहे. आत काय होणार? त्याच्याकडे या पीडित व्यक्तीला कोणच घेऊन जाणार नाही. त्याला सरळ गाडीत घालणार आणि जिल्ह्याच्या ठिकाणी घेऊन येणार. कारण सापावरील इंजक्शन प्रत्येक गावात उपलब्ध होऊ शकत नाही. दरम्यान पीडित भीतीने अर्धामेला झालेला असणार. त्यात जर हृदयरोग असेल तर नक्कीच त्याला हार्टअॅटॅक येणार.
हेच जर सरकारी उपचारासाठी दवाखान्यात जाताना प्रथम दवाखान्यात वर्दि देउन प्रथमोपचार म्हणून वाटेतील त्या तथाकथित बाबाकडची मुळी किंवा उपचार करून घेतले असते व पुढे जिल्ह्याच्या ठिकाणाला त्या रोग्याला नेले असते तर? परिणामतः त्या पीडित व्यक्तीच्या मनात आता मी मुळी खाल्लेली आहे मला काही होत नाही ही दृढभावना झाल्यामुळे त्याला कमीतकमी हार्टअॅटॅक तर नक्कीच येणार नाही. सर्वेक्षण असे सांगते की, ठरावीक सापच विषारी असतात. कित्येकदा बिनविषारी साप चावल्यानंतर मरणारे लोक हे भीतीने हार्टअॅटॅक येऊन मेलेले असतात.
साप चावल्यानंतरची गावठी उपचाराची पद्धत सरकारला जर खरच नष्ट करावयाची असेल तर माझ्या मते अनुसूचीमधील 9 क्रमांकाचे कलम पुढीलप्रमाणे असावे असे वाटते.
‘‘कुत्रा, साप किंवा विंचू चावलेल्या पिडीत व्यक्तीच्या नातेवाइकांनी पिडीत व्यक्तीच्या उपचारासंदर्भात नजीकच्या सरकारी (/ग्रामीण) स्वास्थसेवा केंद्राशी (किंवा/तसेच *) संपर्क न साधणे.’’
(* येथे - ‘‘सरकारमान्य आरोग्य रक्षकाशी संपर्क न साधणे’’ असेही जादा लिहिता येईल. जर खेडेगावातील एखादा व्यक्तीने (बाबाने) साप चावल्यानंतर कित्येक लोकांच्यावर उपचार केले असतील तर त्याची उपचार पद्धती समजून घेऊन किंवा त्याला पॉपर ट्रेनिंग देऊन आरोग्य रक्षक म्हणून नेमता येईल. त्याला सांगता येईल की ‘‘एका ठरावीक मर्यादेपर्यंतच तू उपचार करत जा. त्यानंतर आरोग्य केंद्राशी संपर्क साधत जा.’’ जसे की सध्या प्रसूतीसंदर्भात खेडगावातील कित्येक स्त्रियांना प्रशिक्षण दिलेले असून त्यांच्याकडून व्यवस्थित कार्य होत आहे.)
आता आरोग्यकेंद्रात वर्दी दिल्यानंतर तातडीने उपचार उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सरकारची येते. अशा वेळी स्वास्थसेवाकेंद्राने तत्काळ अँब्युलन्स पाठवावी. अत्यंत गंभीर परिस्थिती असेल तर वेळ वाचवण्याच्या दृष्टीने त्याला गावातून गाडी करून निघावयास सांगून वाटेत गाठून त्यावर उपचार करावेत.
जो कृषिवल उन्हातान्हात शेतात राबराबून आमच्या मुलाबाळांच्या पोटासाठी अन्न उपलब्ध करत असतो त्याच्यावरील अशा आपत्तींच्या निवारणासाठी सुसज्ज यंत्रणा उपलब्ध करणे सरकारची (पर्यायाने आपली) जबाबदारी आहे.
अगदी आपण काहीच जरी करू शकत नसलो तर मुटेंसारखा गावाकडचा पण इंटरनेटद्वारे तथाकथित प्रगत जगाशी जुड्लेल्या व्यक्तीला नाउमेद न करता त्याच्याकडून खेडेगावातील सद्यःपरिस्थिती तर नक्कीच ज्ञात करून घेऊ शकतो.
धन्यवाद.
१. मी ८वीत असतानाची गोष्ट. मी
१. मी ८वीत असतानाची गोष्ट.
मी सुट्टित गावी गेलो असताना मला विन्चु चावला होता. तेव्हा कोणत्यातरी वनस्पतीचा पाला लावल्याबरोबर लगेच फरक पडला होता मला.
२.आमच्या इथे रोहामधल्या एका गावात काविळीवर रामबाण गावठि औषध दिले जाते आणि रुग्णालासुद्धा हमखास फरक पडतोच पडतो. मी स्वत: तिथल्या उपचारन्नी बरे झालेले रुग्ण पाहिलेत.
ज्यान्नी पाश्चात्य देशांचा जयजयकार करायचा विडा उचलला आहे, त्यांन्ना काय म्हणावे...
श्री गंगाधर मुटे यांचं शेतकरी
श्री गंगाधर मुटे यांचं शेतकरी संघटनेतलं कार्य मला आवडतं. त्यांचे काही लेख आवडले होते. पण या लेखमालिकेबद्दल शंका असल्याने आधी त्यांचं मत जाणून घ्यावंसं वाटलं. बाकि विपूत बोलूयात, अर्थात मुटेजींची इच्छा असल्यास.
मात्र मला दोन डॉक्टर
मात्र मला दोन डॉक्टर डॉ.ग्यानचंदाणी व डॉ. लाहोटी असे मिळालेत की त्यांनी दिलेले प्रिस्क्रिप्शन लाभदायी ठरले. गेली २० वर्ष त्यांनी सुचविलेले औषधच (अॅलोपॅथी) मी वापरतो आहे आणि लाभ मिळत आहे.
मग?
आता काय उपचार हवेत आणखी?
साती, तूम्हा लोकांच्या अथक
साती,
तूम्हा लोकांच्या अथक परिश्रमानंतरही असे गैरसमज समाजात आहेत याचा अर्थ तूम्ही लोक पुरेसे लेखन करत नाही आणि योग्य माहिती लोकांपर्यंत पोहोचत नाही, असाच आहे.
अशा प्रत्येक लेखाला तूम्हा लोकांकडून योग ती माहीती देणारा स्वतंत्र लेख, हाच "उतारा" आहे.
आणि टायपायला वेळ मिळत नसेल, तर ऑडीओ/ व्हीडीओ करुन टाका. थोडं हे अधिक बरं होईल, म्हणजे निरक्षरांनापण कामात येइल.
टी सीरीज ने काढलेल्या साती
टी सीरीज ने काढलेल्या साती अम्मांच्या प्रवचनांच्या कॅसेट्स लोक भक्तीभावाने ऐकत आहेत असे चित्र तरळले...
<<<< मग? आता काय उपचार हवेत
<<<< मग?
आता काय उपचार हवेत आणखी? >>>>
@ डॉ साती,
ती दोन्ही औषधे आता बाजारात उपलब्ध नाहीयेत. बहुधा एकतर कंपनी बंद झाली असावी किंवा त्या प्रॉडक्टचे उत्पादन थांबवले असावे.
आता तुम्ही द्याल ते औषध घ्यावे म्हणतो.
(तुम्ही दिलेले उत्तर प्रश्नाला बगल देणारे आहे. पेशंटला अशा टाईपचे उत्तर देणारा डॉक्टर मी आजवर पाहिला नव्हता.)
प्रथम म्हात्रे, कायद्यातले
प्रथम म्हात्रे,
कायद्यातले मसुदे नीट वाचाल तर लक्षात येईल की झाडपाल्याच्या औषधाला बंदी नाही तर मंत्रं तंत्र ,गंडे दोरे याला कायद्याने बंदी आहे.
मुटेजी,मी नेट कंसल्टेशन करत
मुटेजी,मी नेट कंसल्टेशन करत नाही आणि माझा पत्ता माबो अॅडमिनशिवाय कुणाला देत नाही.
तुम्ही दिलेल्या आजाराचे वर्णन बघता आजार सायकोसोमॅटीक वाटतोय तरी त्याबद्दल पुढिल चर्चा तुम्ही माबोसंपर्कातून सविस्तर मेल पाठवून केल्यास मी तुम्हाला जवळचा योग्य डॉक्टर सुचवू शकेन.
नागपूरमध्ये माझा जवळचा मित्रं गॅस्ट्रोएंटेरॉलॉजिस्ट आहे त्याचा नंबर पाहिजे असल्यास देईन.
हे बरं केलंस सातीअम्मा.
हे बरं केलंस सातीअम्मा. नाहीतर प्रवचन सीडीज् बरोबर लवगुरू टाईप काॅलम पण तयार होईल की काय असं वाटेल आम्हा लोकांना.
@ मुटे साहेब- नुसती लक्षणे
@ मुटे साहेब-
नुसती लक्षणे वाचून, तपासणी न करता उपचार सुचवणे अशास्त्रीय आहे.
त्याला "गाठ सरकणे" असे आम्ही म्हणतो. (लाहान आतडीवर मोठी किंवा मोठ्या आतडीवर लहान आतडी येणे, असा काहिसा प्रकार असावा.)
सामान्य जनतेकडून काही संज्ञा अनेक आजारांसाठी / लक्षणांसाठी वापरल्या जातात. उदा. गाठ सरकणे, आतड्याला सूज येणे, नस चढणे वगैरे. त्याने निश्चित काही अनुमान करता येत नाही. तुम्ही जे म्हटले आहे- लहान आतडीवर मोठी आतडी चढणे वगैरे, त्याला वैद्यकीय परिभाषेत 'इंटुससेप्शन' म्हणतात. (दुवा- http://en.wikipedia.org/wiki/Intussusception_%28medical_disorder%29)
हा बर्यापैकी गंभीर आजार आहे, आणि तुमची लक्षणे पाहता तुम्हाला 'इंटुससेप्शन' झालेले नाही, हे नक्की.
मग तुमचा त्रास नक्की कसला आहे? अनेक अंदाज करता येतील. अॅसिडीटी, आयबीएस (आयुर्वेदानुसार- ग्रहणी), किंवा अगदी मानसिक आजारापर्यंत काहीही असू शकते. तपासण्या केल्याशिवाय निदान होणार नाही. निदान केल्याशिवाय उपचार सुचवता येणार नाहीत ! त्यामुळे तुमचे 'आव्हान' स्वीकारू शकत नाही, क्षमस्व.
पण इथे मुद्दा मला किंवा डॉ. साती यांना कितपत कळते हा नसून, तुमचा या कायद्याला असलेला विरोध बिनबुडाचा आहे किंवा नाही, हा आहे. तुमच्या पहिल्या आणि या लेखावर आलेले प्रतिसाद वाचून तुम्हाला आपली मते पुन्हा एकदा तपासावीशी वाटत आहेत का, हे सांगावे.
आणि हो- तुम्ही आजवर केलेले सगळे उपचार- पोट चोळण्यापासून लिंबू पिळण्यापर्यंत- या कायद्याच्या कक्षेत येत नाहीत, किंवा कायदा लागू झाला म्हणून तुम्हाला हे करण्यापासून कोणी परावृत्त करू शकणार नाही, हे वेगळे सांगायला नकोच.
@ डॉ साती, योग्य डॉक्टर
@ डॉ साती,
योग्य डॉक्टर सुचवण्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज नाहीये. त्यासाठी मी सक्षम आहे.
उपचार तुम्ही सुचवावा, असे मी म्हटले आहे.
तुम्हीच इतरांशी सल्लामसलत करून उपचार सुचवा.
इथेही जर जाहीरपणे चर्चा झाली तर वैद्यकशास्त्राला ते मारक आहे काय?
ज्या आत्मविश्वासाने तुम्ही आधीच्या पोस्ट लिहिल्या तो आत्मविश्वास वरील पोस्टमधे जाणवत नाहीये.
@ डॉ ज्ञानेश, अॅसिडीटी,
@ डॉ ज्ञानेश,
अॅसिडीटी, आयबीएस (आयुर्वेदानुसार- ग्रहणी), किंवा अगदी मानसिक आजारापर्यंत काहीही असू शकते.>>> यातला कोणताच प्रकार नाहीये. हे डॉक्टरांनी तपासणीअंती सांगीतले आहे.
पुढे बोला.
यातले काय आहे किंवा नाही, हे
यातले काय आहे किंवा नाही, हे तुम्ही नाही ठरवू शकत मुटे ! डॉक्टर ठरवतील.
बाकी मूळ विषय बाजूला ठेऊन फाटे फोडायचे ठरवलेच आहे, तर मला सांगा-
"राजा भिकारी, माझी टोपी घेतली- डुम डुम डुमाक डुम डुम" ही गोष्ट तुम्ही ऐकली आहे का?
वैद्यकीय गोष्टींची चर्चा करत
वैद्यकीय गोष्टींची चर्चा करत असाल तर ती निखळपणे करावी अशी विनंती. भांडणाचा सूर येवू नये अशी अपेक्षा.
<<<< बाकी मूळ विषय बाजूला
<<<< बाकी मूळ विषय बाजूला ठेऊन फाटे फोडायचे ठरवलेच आहे, तर मला सांगा-
"राजा भिकारी, माझी टोपी घेतली- डुम डुम डुमाक डुम डुम" ही गोष्ट तुम्ही ऐकली आहे का? >>>>
ऐकली नाही पण ऐकायची तयारी आहे. त्याने पोटविकार नष्ट होतात काय?
मुटेजी,मी नेट कंसल्टेशन करत
मुटेजी,मी नेट कंसल्टेशन करत नाही
नुसती लक्षणे वाचून, तपासणी न करता उपचार सुचवणे अशास्त्रीय आहे.
तपासण्या केल्याशिवाय निदान होणार नाही. निदान केल्याशिवाय उपचार सुचवता येणार नाहीत ! त्यामुळे तुमचे 'आव्हान' स्वीकारू शकत नाही, क्षमस्व.
हेसुद्धा वाचले असेलच. सिलेक्टिव्ह रीडिंग करू नका मुटे.
इथे चाललेल्या चर्चेचा या
इथे चाललेल्या चर्चेचा या कायद्याशी काहीही संबंध नाही आहे. आधुनिक वैद्यकशास्त्राबद्दल चर्चा दुसरीकडे करता येईल की. काविळ, पॅरालिसिस किंवा इतर कोणत्याही आजारावरच्या उपचारांचा आणि जादुटोणा विरोधी कायद्याचा काय संबंध आहे हे अजिबात कळाले नाही.
माझ्या अल्पमतीप्रमाणे "कुत्रा, साप, विंचू आदि चावल्यास व्यक्तीला वैद्यकीय उपचार घेण्यापासून रोखून किंवा प्रतिबंध करून, त्याऐवजी मंत्रतंत्र, गंडेदोरे, यासारखे इतर उपचार करणे." याचा अर्थ जर कोणी वैद्यकिय उपचारांना विरोध करत असेल आणि फक्त आणि फक्त मंत्रतंत्र /गंडेदोरे (प्लिज नोट यात जडीबुटीचा उल्लेखही केलेला नाही आहे) करुन रुग्णाचा जीव धोक्यात घालत असेल तर त्यावर कारवाई करणे असा होतो.
अल्पना, जागे झोपलेल्याला करता
अल्पना, जागे झोपलेल्याला करता येते.
@ डॉ ज्ञानेश, <<< मी नेट
@ डॉ ज्ञानेश,
<<< मी नेट कंसल्टेशन करत नाही नुसती लक्षणे वाचून, तपासणी न करता उपचार सुचवणे अशास्त्रीय आहे.>>>
मग माझ्या आईच्या रोगाचे त्यांनी केलेले निदान/ भाष्य करायला नको होते.
साती, इब्लिस, ज्ञानेश, कैलास
साती, इब्लिस, ज्ञानेश, कैलास आणि इतर डॉक्टर मंडळीना माझी विनंती आहे की प्लिज योग्य वैद्यकिय उपचार न मिळाल्यामूळे जीव गमवावा लागलेल्या (कुत्रा/साप्/विंचु चावलेल्या) रुग्णांबद्दल, वैद्यकिय उपचारांमध्ये अडथळा आणून भोंदू बाबांमूळे जीव धोक्यात घातलेल्या रुग्णांबद्दल तुम्ही लिहा.
माझा वैद्यकिय क्षेत्राशी काहीही संबंध नसूनही फक्त लहानपणी एका सरकारी ग्रामिण वैद्यकिय महाविद्यालय - रुग्णालयाच्या कॅम्पसमध्ये राहिल्याने अश्या अनेक केसेस असतात हे मला माहित आहे. हे किती धोकादायक असतं हे लोकांना कळू द्या प्लिज.
मग माझ्या आईच्या रोगाचे त्यांनी केलेले निदान/ भाष्य करायला नको होते. >>> मला नाही वाटत त्यांनी निदान केलं होतं. त्यांनी फक्त एक वैद्यकिय फॅक्ट सांगितलं. तुमच्या आईची केस त्यापैकी एक असू शकते किंवा नसू शकते. मुळात या कायद्याशी तुमच्या आईच्या केस॑चा काहीही संबंध नाही आहे. हा कायदा अल्टरनेटिव मेडिसिनला विरोध करत नाहीये.
मुटेजी, वरिलपैकी माझ्या
मुटेजी,
वरिलपैकी माझ्या कुठल्या प्रतिसादात 'तुमच्या आईच्या रोगाविषयी 'असं काही लिहिलं असेल तर दाखवून द्या.
त्यांनी निदान केले नाही.
त्यांनी निदान केले नाही. उपचारही सुचवले नाहीत. फक्त एक शक्यता सांगीतली.
तुमच्या आजाराबद्दल मीसुद्धा शक्यताच सांगतो आहे. या शक्यतांच्या बाहेरही अनेक आजार असू शकतात, याची आम्हाला कल्पना आहे. त्यामुळेच आम्ही कुणाच्याही आजाराबद्दल कुठलेही 'ठोस' विधान करत नाही आहोत.
आता मूळ विषयाकडे वळूया का?
तुमच्या पहिल्या आणि या लेखावर आलेले प्रतिसाद वाचून तुम्हाला आपली मते पुन्हा एकदा तपासावीशी वाटत आहेत का, हे सांगावे.
हे अनुत्तरित राहिले आहे.
Pages