चूल माझी सखी

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 30 May, 2013 - 01:42

कळायला लागल्यापासूनच माझ्या भातुकलीचा श्रीगणेशा व्हायचा तो चूल मांडूनच. तीन दगड त्रिकोणी मांडले की झाली चूल. भातुकली खेळताना चुलीसाठी शिंपल्या किंवा खुबड्या वापरायचे. त्या आकाराने सारख्या असल्याने भांडी व्यवस्थित बसायची. मग त्यात छोट्या काड्या लाकडे म्हणून टाकायच्या आणि त्यावर खेळण्यातली भांडी ठेवून खोटे-खोटे जेवण शिजवायचे.

लहान असल्यापासून मी आमच्या घरी चूल पाहिली आहे. पूर्वी गावी सगळ्यांच्याच घरी चुली असायच्या. आमच्या घरी गॅस होता तरीपण वेळ लागणारे पदार्थ शिजवण्यासाठी तसेच रोजचे अंघोळीचे पाणी तापविण्यासाठी आई-आजी चूल पेटवायच्या. आधी आमची मातीची चूल होती. नंतर आजीने गवंड्याकडून सळया घालून सिमेंटची चूल करून घेतली. मी थंडीत रोज उठल्या बरोबर चुलीजवळ जाऊन शेकायला बसायचे. चाळा म्हणून मधून मधून लाकडे ढकलणे, पात्या, कागद जाळणे असा खोडकरपणा चुलीबरोबर करायचे. असे करताना बरेचदा निखार्‍याचा चटका बसे किंवा पाती किंवा कागद जळत हातावर येत असे.

सकाळी आजीची देवपूजा झाली की आजी चुलीतील निखारे धुपांगणात घेऊन त्यावर धुप घालून ते देवाला दाखवायची मग ते पूर्णं घरात फिरवून घराभोवतीही फिरवायची. फार प्रसन्न वाटायचं तेव्हा. दसरा आला की ह्या चुलीला गेरू किंवा शेणाने सारवले जायचे. दसर्‍याच्या दिवशी आई-आजी चुलीची पुजा करायच्या. मी कधी आजारी वगैरे असले की आजी दृष्ट काढून चुलीत टाकायची. आजी सकाळी चहा घ्यायला चुली जवळच बसायची. पहिला कपातील ती थोडा चहा नैवेद्य म्हणून चुलीत टाकायची. मला फार गंमत वाटायची ते पाहून. काही दिवसांनी मी पण तिचे अनुकरण करू लागले. अगदी लहान होते तेव्हाचे आठवते की ह्याच चुलीची राख आई-आजी भांडी घासण्यासाठी घ्यायच्या. नंतर शायनेटची पावडर आली मग राख बंद झाली.

पूर्वी गावात ज्यांची गुरे असत ते शेणी थापून जाळण्यासाठी इंधन म्हणून विकायचे. शेणी म्हणजे शेणाच्या गोल थापून केलेल्या सुकवलेल्या जाड चकत्या. आमची वाडी असल्याने आम्हाला कधी लाकडांचा तोटा नव्हताच चुलीसाठी उलट आमच्या वाडीतूनच आमच्या आजूबाजूचे लोक चुलीसाठी लाकडे घेऊन जायचे. कुणाकडे लग्न कार्य असले की आधीच वडिलांना सांगून ठेवायचे गावकरी. माझ्या वडीलांना सगळे अण्णा म्हणतात. अण्णा अमुक महिन्यात लाकडे लागतील. मग एखादे सुकलेले झाड किंवा झाडांची डुखण (मोठ्या झाडाच्या वाढलेल्या फांद्या) लग्नघराच्या नावे होत. वडील एकही पैसा त्यांच्याकडून घेत नसत. तेव्हा तशी लाकडांना किंमतही नव्हती. माझ्या आईने प्रार्थमिक शिक्षिकेची नोकरी केली. ती दुपारी शाळेतून आली की लाकडे गोळा करण्यासाठी वाडीत जात. मी पण तिच्याबरोबर जात असे. माझ्या हातात मावतील तितक्या काड्या छोटी लाकडे मी आई बरोबर गोळा करून आणत असे.

मला आठवते आजी चुलीवर रुचकर पदार्थ बनवायची. हे पदार्थ गॅस ऐवजी चुलीवरच रुचकर लागायचे. त्यात असायचे भानवल्या. भानवल्या बनवण्यासाठी खास बिडाचा खडबडीत तवा असायचा. ह्यात आंबोळ्या, घावन पण छान व्हायचे. उकडीचे पदार्थ जसे शेंगा, करांदे, कोनफळे अशा पदार्थांना चुलीवर शिजवल्याने विशिष्ट चव येते.

तांदूळ गिरणीतून दळून आणला की त्याचा कोंडा निघे. त्या कोंड्याचे आजी पेले बनवायची. हे कडवट गोड लागायचे. हे करताना पाहायला मला गंमत वाटायची. हे एका मोठ्या टोपात पाणी ठेवून त्यावर चाळण ठेवून त्यात छोटे छोटे घरातील पेल्यात ह्या कोंड्याचे गूळ घातलेले मिश्रण आजी भरायची आणी ते पेले वाफवायची. ह्या कृतीमुळेच कदाचित ह्याचे नाव पेलेच आहे. चुलीवरची भाकरी पण मस्त खरपूस पापुद्रा आलेली आजी करायची. ह्या भाकरी बरोबर खायला त्याच चुलीच्या निखार्‍यावर आई-आजी वाकट्या, बोंबील, बांगडा भाजून द्यायची. बांगडा भाजला म्हणजे अख्ख्या गावाला वास जायचा. ह्या चुलीत भाजलेल्या बांगड्याचा वास इतर कुठल्या घरातून आला तरी मला लगेच भूक लागायची. त्या काळी मटण महिन्यातून एखादं दिवशी असायचे. ते चुलीवरच. चुलीवरच्या मटणाची चवच काही न्यारी असते.

तसेच आम्ही कधी कधी चुलीत एखादा बटाटा, रताळं, करांदा, कोनफळ, बाठ्याची कोय असे प्रकार भाजायचो. ह्यांची ती करपट मिश्रीत रुचकर चव अप्रतिम लागायची. दिवसभरासाठी चाळा म्हणून चिंचेच्या सीझन मध्ये चिंचोके भाजायचे. भाताची कापणी झाली, शेतातून भारे वाहून नेले की शेतात जायचे आणि शिल्लक राहिलेल्या कुठे कुठे पडलेल्या तांदळाच्या कणश्या (कणसे) गोळा करायच्या आणि त्या आणून चुलीत निखार्‍यावर टाकायच्या मग त्याच्या फाट फाट लाह्या होत. ह्या लाह्या खाणेही एक छंदच असायचा.

थोडी मोठी झाले म्हणजे ५ वी ६ वीत असेल तेव्हा मग घरातल्यांचे चुलीचे काम झाले की मी भातुकली आमच्या पडवीतच खर्‍या चुलीवर खेळायचे. मग ह्या चुलीवर कधी मुगाची भाजी, कधी अंड्याचे कालवण, भात, अंडे तळणे, असे प्रकार करू लागले. हे प्रकार मी बिचार्‍या घरातल्यांनाही खायला द्यायचे आणि ते माझी वाहवा करायचे.

माझी चुलत भावंडे दिवाळीच्या आणि मे महिन्याच्या सुट्टीत आमच्या घरी यायची. अशा वेळी आम्ही पार्टी करायचो. पार्टी म्हणजे आम्ही स्वतः वाडीत एखाद्या झाडाखाली चूल मांडून जेवण किंवा नाश्त्याचे पदार्थ बनवायचो. ही चूल बनवण्यासाठी आम्ही तीन विटा घ्यायचो. जास्त करून बटाट्याची भाजी, भात किंवा अंड्याचे कालवण असायचे कारण हेच करायला सोपे असायचे. पण अंड्याचे कालवण बर्‍याचदा पचपचीत व्हायचे. हे जेवण आम्ही चुलीजवळच केळीच्या पानात जेवायचो. वाट्या वगैरे नसायच्या त्यामुळे कालवण पानातून ओघळायचे. ते पचपचीत कालवण पण गरम-गरम भाताबरोबर खाताना मौज वाटायची, शिवाय आपण केल्याचा एक वेगळाच आनंद असायचा. एकदा तर कोजागीरी निमित्त बटाटे वडे पण केले होते.

मला असे वाटत होते की लग्न ठरल्यावर आपल्याला चुलीचा सहवास मिळणार नाही. कारण लग्न ठरलेल्या घरी चुलीला जागाच नव्हती. पण सासर्‍यांनी आधीच जवळ वाडी घेऊन ठेवली होती व तिथे घराचे काम चालू केले होते. लग्न झाल्यावर साधारण दीड वर्षातच आम्ही नवीन वाडीत राहायला गेलो. मला चुलीची अत्यंत आवड असल्याने व घराच्या मागील बाजूस भरपूर जागा असल्याने मी तिथे तीन विटा मांडून चूल पेटवली. बहुतेक रविवारी मी त्यावर मटण शिजवू लागले. चूल पेटविल्याने सासूबाई माझ्यावर खूश झाल्या कारण त्यांना चूल आवडते आणि नोकरी करूनही मी हा छंद जोपासते ह्याचे घरात सगळ्यांनाच कौतुक वाटते.

हळू हळू आम्ही पाठी पडवी बांधली. एक दिवस मी मिस्टरांबरोबर जाऊन एका कुंभारवाड्यातून मातीची चूल, तवी (कालवण करण्यासाठीचे मातीचे भांडे) खापरी (भाकरी करण्याचा मातीचा तवा) घेऊन आले व पडवीत ठेवले. संध्याकाळी कामावरून आले की मी चूल पेटवायचे. रोज नाही पण काही सणांच्या व्रतांच्या दिवशी आम्ही धुपांगणात धुप जाळून घरभर फिरवतो. त्यामुळे तोच जुना प्रसन्नपणा मला अनुभवायला मिळतो.

संध्याकाळी चूल लावली की माझा पुतण्या शेकण्यासाठी माझ्या बाजूला बसून अभ्यास करायचा. चुलीच्या निखार्‍यावर तोही वाकट्या बोंबील भाजू लागला. साधारण वर्षानंतर मातीची चूल पाण्याने खराब झाली तेव्हा वाईट वाटले. मग मी परत विटाच मांडल्या. आम्ही वरचेवर रविवारी मटण/चिकन चुलीवरील तवीत शिजवून झाडाखाली पारावर एकत्र जेवायला बसतो. त्यामुळे मला पूर्वीचे जास्त काही हरवल्यासारखे वाटत नाही. कधी कधी मी भातही ह्या तवीत शिजवते. मातीच्या भांड्यातील पदार्थांना वेगळीच रुची असते. धुराचा व दाहकतेचा थोडा त्रास होतो पण त्यापेक्षा मला त्यातून आनंद जास्त मिळतो.

माझ्या मोठ्या मुलीला श्रावणीलाही समजायला लागल्यापासून चूल आवडते. अजूनही चुलीवरचे जेवण म्हटले की तिला आनंद होतो. माझ्या बरोबर ती पण येते चुलीजवळ. आता दुसरी मुलगी
राधा हिला शेक, धुरी ह्याच चुलीच्या निखार्‍यांपासून दिली जाते. माझ्या मुली माझा वारसा चालवतील की नाही हे माहीत नाही आणि माझी बिलकुल सक्तीही नाही. पण चूल म्हणून एक इंधनाचे साधन असते किंवा असायचे, मातीची भांडी असतात किंवा असायची आम्ही ती वापरली आहेत ह्याचे ज्ञान, अनुभव त्यांना आहे तसेच त्या हे अनुभव पुढे त्यांच्या पुढच्या पिढी बरोबर शेअर करु शकतील.

हा लेख शनिवार, २७/०४/२०१३ ला लोकसत्ता - वास्तुरंग पुरवणी (पुणे आवृत्तॉ) मध्ये तसेच ०१/०६/२०१३ ला इतरत्र प्रकाशीत झाला. http://epaper.loksatta.com/120968/indian-express/01-06-2013#page/26/2

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वा जागूताई मस्त वर्णन, आमचे गावपण कोकणात आहे पण आम्ही राहतो शहरात. गावाला गेलो कि चुलीवरचा स्वयंपाक enjoy करतो. आता गावालाही gas आहे, पण त्यावर फक्त पोळ्या आणि दुपारचा चहा केला जातो, बाकी सर्व चुलीवरच.

किती सुंदर लेखन आहे. जागू, तुला सलाम!!
माझ्या लहानपणी आंघोळीचे पाणी चुलीवरच तापवले जाई. स्वयंपाक कधी कधी होत असे पण सकाळी उठून त्या चुलीपुढे शेकत बसण्यात फार फार सुख होतं.
तुझ्या लेखाने त्या भाजलेल्या आंब्याच्या कोयी, बटाटे, चुलीवरची टम्म फुगलेली भाकरी या सगळ्यांची आठवण आली. Happy

नेहमी प्रमाणे अगदी जिव्हाळ्याचा विषय अतिशय सुबकतेने मांडलास जागू.

जागू खूप प्रामाणिक आहेत तुझे विचार. कायम तुझ्या उत्साहाचं आणि हौशीचं कौतुक वाटतं. चुलीवरचं जेवण,
फणसाच्या भाजलेल्या बिया सारं आठवलं तझा लेख वाचून Happy

जागू, अगो किती सुरेख लिहिलयस तुझं तुझ्या सखीचं गुज Happy
गावच्या चुलीवरल्या जेवण्याची आठवण झाली... एकदम नॉस्टॅल्जिक.

हे सगळं असोशीनं जगून आमच्याबरोबर वाटून घेण्याच्या तुझ्या ह्या सहज शैलीला मनापासून नमस्कार.

जागु खुप सुंदर लिहिलयसं.
चुलीवर भाजलेली भाकरी खाऊन कित्येक वर्ष झालीत.

उत्तम जमलाय लेख!

मी फार फार कमी वेळा चुलीवर शिजवलेलं खाल्लय पण अजुनही तो धुरकट वास लक्षात आहे आणि हवाहवासा वाटतो!

जागू, मस्त लेख. तुझ्यासारखाच क्युट आणि सहजसाधा. Happy

आम्ही हल्लीच चूल वापरायला सुरूवात केली आहे.. आमच्या घरमालकांनी चुलीची जागा करून ठेवली होती, पण ती नीट लावायचा आणि वापरायला मुहूर्तच मिळत नव्हता. पोंगलच्या दिवशी चूल करून पोंगल शिजवायचा बेत होता, पण तो राहिलाच. शेवटी होळीच्या आधी नवर्‍याने ती चूल मांडून साफ करून त्यावर पुरण शिजवलं होतं. इथे कोळसा, लाकूडफाटा आरामात मिळतो. नाहीच मिळाला तर झावळ्या आहेतच घरच्या. Happy

नंतर एकदा कणसं भाजण्यासाठी, वांगी-कांदा भाजण्यासाठी वगैरे चुलीचा उपयोग करतोय. सध्या अंघोळीला गरम पाणीच वापरत नसल्याने पाणी तापवायचा त्रास वाचलाय.

जिप्स्या मग आता गटग तुझ्याचकडे तुझ्या चुलीवर. आता तर काय हक्काची चूल पेटवणारीही येणार आहे. Lol

रुनी, बस्के, अन्जु, धनश्री, सुमंगल, पिआरार, हिरकणी, गौरी, दाद, श्री, वत्सला, पराग, झकासराव धन्यवाद. तुमच्या सगळ्यांच्या आठवणी वाचून खुप समाधान मिळत आहे.

प्राजक्ता अग आत्ताच्या धावपळीच्या युगात रोज चूल वापरण शक्य नाही पण हल्ली जिथे लाकुडफाटा उपलब्ध आहे तिथेही लग्न किंवा मोठ्या समारंभांसाठी मजूर बायका मागवून सिलेंडरच्या शेगड्या पेटवून जेवणे केली जातात तेव्हा थोड विचित्र वाटत. सहज उपलब्ध असलेले इंधन आपण वापरत नाही ह्याबद्दल हळहळ वाटते.

नंदीनी चूलीवरच्या भाजक्या वांग्याच्या भरीताला तर काय अप्रतिम खरपूस वास येतो Happy लगे रहो.

जागू सुंदर लेख. तुझं लिहिणं इतकं अकृत्रिम आणि मातीशी, निसर्गाशी जोडलेलं असतं की ते आवडल्यावाचून रहातच नाही. खूप जिव्हाळ्याने जगतेस आणि लिहितेस.

चुलीतल्या निखार्‍यांवर भाजलेले बटाटे, कांदे, कंद, काजू बिया, आंब्याच्या कोयी, कणसं हे सगळं अहाहा... चुलीवर केलेला चहाही खूप आवडतो. मी अजून एकदाही स्वतः चुलीवर काहीच केलेलं नाही. वेळ आली नाही किंवा कधी उत्सुकताही वाटल्याचं आठवत नाही मुद्दाम. पण आता हा लेख वाचल्यावर चुलीवर स्वतः काहीतरी बनवण्याचा अनुभव नक्की घेणार.

आमच्या घरी तर आम्ही चुलीला कंटाळून कधी एकदाचा गॅस येतो असे झाले होते. कारण अभ्यास करताना तो जो धुर डोळ्यात जायचा तो त्रासदायक वाटायचा खास करुन लाकडं ओली असली की. वयाच्या २४ व्या वर्षी आमच्य घरी गॅस आला. आई चुलीजवळ स्वैपाक करुन घामाने अगदी ओलीचिंब व्हायची. तिच्या कपाळावरचे कुंकु ओघळून मानीपर्यंत ओघळ यायचे. फक्त हिवाळ्यात चुल हवीहवीशी वाटायची. चुलीमुळे आमचे घर काळेकुट्ट व्यायचे. कधी नीट रंग बसायचा नाही. चुलीची लाकडे संपली की ती जाऊन आणायचा खूपच कंटाळा यायचा. हातामधे नखामधे लाकडडाची शिळक जाऊन बसायची.

नंतर आमच्या घरी भुशाची शेगडी आली. पण ती शेगडी स्वैपाक झाली की जास्त चांगली पेटायची. शेजारी जर जेवन बनवून झाले नसेल तर तिच्याकडे ती धगधगती शेगडी नेऊन द्यायचो आम्ही.

भांडी घासायला गोवर्‍याची राख वापरायचो. आई तर कित्येक दिवस तिच राख दात घासायला वापरायची.

चुलीच्या आठवणी खूप आहेत. पण चुल पुन्हा घरात यावी आणि रोज पेटावी असे मला तरी वाटत नाही.

मस्त लेखन Happy
मी आमच्या घराच्या पाठिमागे चुल विटांची बनवली होती.पण जास्त वापर नसल्यामूळे सासर्यांनी काढुन टाकली.
मातिची चूल कुंभारवाड्यात मीळते हे मला माहीतच नव्हते. नक्की कुठे आणि किति रुपयांपर्यन्त असेल?

नंतर आमच्या घरी भुशाची शेगडी आली. पण ती शेगडी स्वैपाक झाली की जास्त चांगली पेटायची. शेजारी जर जेवन बनवून झाले नसेल तर तिच्याकडे ती धगधगती शेगडी नेऊन द्यायचो आम्ही.
बी Lol
अशा कटू आठवणीही असतातच.

नुतन धन्स.

अविगा कुंभारवाडा म्हणजे आपल्याइथला नाही, तिथे एकही कुंभार नाही Lol अग मुळेखंड मध्ये एक कुंभारवाडा आहे तिथे मिळतील किंवा चिरनेरला कधी गणपती दर्शनाला गेलीस तर तिथेही मिळतील. साधारण ३००-४०० च्या आसपास असते.

जागू सुंदर लेख. तुझं लिहिणं इतकं अकृत्रिम आणि मातीशी, निसर्गाशी जोडलेलं असतं की ते आवडल्यावाचून रहातच नाही. खूप जिव्हाळ्याने जगतेस आणि लिहितेस.>> +१
तुझी सावली जरी माझ्यावर पडून माझा एकूण उरक बिरक वाढला तरी डोक्यावरून पाणी म्हणेन मी! कसं काय जमवतेस बाई हे इतकं सगळं... नोकरी सांभाळून! __/\__

मला देखिल चुलिवरचा स्वयपाक केलेला खुप आवडतो. पन गावी घर हे मुम्बई सारखेच बान्धल्यामुळे घरात चुल नाही. आम्ही दरवरषी मढीला जातो . तिथे नैवेद्यचा मलिदा हा चुलीवरच बनवावा लगतो. त्यावेळी तीन दगडाची चुल मांडतो. मी व माझी जाव दोघी मीळून ५ ते ७ चपात्या करतो. त्यासाठी साधारण १ ते २ तास लागतात.
पण तो प्रसाद खुपच अप्रतीम लागतो. कधी कधी आम्ही चपात्या केल्यानंतर त्याच तव्यात मेथीची भाजी देखील करतो.

जागुताई मस्त मस्त लिहिलैस नेहमी प्रमाणे

कोणी मला सान्गु शकत का भानवल्या आणि कोनफळ म्हणजे काय ते Sad Sad

चुलीवरील जेवन म्हणजे स्वादिष्ट्च आणि मटण तर लाजवाब.......!
आमच्या कडे हि चुलिवर तांब्याच्या हंड्यात पाणी तापवत असत. तो हंडा काळा पडू नये म्हणून त्याला राखाडी ओली करून त्याचा लेप बाहेरून लावत असत. आणि आम्ही चुली जवळ शेकण्यासाठी बसत. त्या वेळी मातीच्या लेपावर काजळी जमा होत असे त्यावर आम्ही आमची नावे कोरत असू

प्रज्ञा, सगुना, दिपिका, अबोल, जयदीप, प्रिन्सेस, मिनी, चनस, भारती धन्यवाद.

भानवल्या म्हणजे गहू व तांदळाचे पिठ एकत्र करून गूळ घालून केलेल्या गोड आंबोळ्या. मी मागे इथे रेसिपी टाकली आहे. कोनफळ हा कंद आहे. आतून जांभळ्या रंगाचा असतो.

भाऊ कार्टून मस्तच Lol

Pages