ताण.. जब तक हैं जान ! (Jab Tak Hain Jaan - Movie Review)

Submitted by रसप on 14 November, 2012 - 01:13

मी शहाणा आहे, असं समजण्यात काही वावगं नाही. समोरचा मूर्ख आहे, असंही कधी कधी समजण्यात काही गैर नाही. पण मी(च) शहाणा(च) आहे आणि समोरचे सगळे(च) मूर्ख(च) आहेत, असा समज करून घेऊन जेव्हा एखादी निर्मिती केली जाते, तेव्हा तिला 'जब तक हैं जान' असं नाव दिलं जातं आणि तिच्या केंद्रस्थानी शाहरुख खान येतो.. तो दाढीचे ओंगळवाणे खुंट वाढवून फिरणारा आर्मी मेजर असतो.. तो आणि त्याचे सहकारी सैनिक, सैनिकाची पहिली ओळख - त्याची केशरचना - सुद्धा पाळत नसतात.. ह्या टीमचं काम फक्त बॉम्ब डिफ्युज करणं असतं आणि रोज त्यांना एक तरी बॉम्ब उदरनिर्वाहाकरता मिळतच असतो.. वगैरे, वगैरे..
मग अश्या निर्मितीसाठी काम करता करता ए. आर. रहमानसुद्धा साजिद-वाजीद भासतो, गुलजारचे शब्द एक तर कळतच नाहीत अन कळले तर ते समीर-छाप वाटतात आणि हिंदी सिनेजगताला वेगवेगळ्या उंचीवर नेणारे यश चोप्रांसारखे दिग्गज दिग्दर्शक स्वत:च्या शेवटच्या चित्रपटात सपशेल जमिनीवर आपटतात.

सिनेमाची सुरुवात होते 'लेह'च्या एका मार्केटमध्ये. तिथे एक 'बॉम्ब' सापडला असतो. एक जण त्याला निकामी करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते त्याला जमणार नसतंच. कारण हिरोची एन्ट्री करवायची असते. इन कम्स मेजर 'समर आनंद' (शाहरुख), त्याने आजपर्यंत ९७ बॉम्ब्स निकामी केले असतात. तो येतो आणि भाजी निवडल्यासारखा तारा वेचून, तोडून, उपटून बॉम्ब निकामी करतो आणि समस्त शाहरुख भक्त बोंब मारतात! हा राउडी मेजर बॉम्ब प्रोटेक्शन सूट न घालता ह्या करामती करत असतो, हे विशेष. (आर्मीवाले असं कसं काय करू देतात ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.) तर बॉम्ब निकामी केल्यावर तो नेहमी कुठल्याश्या शांत जागी जाऊन बसत असतो. तसा तो एका तळ्याकाठी बसलेला असताना तिथे येते 'अकीरा' (अनुष्का शर्मा). ती सगळे कपडे काढते, थंडगार पाण्यात उडी मारते आणि बुडते. अर्थातच हिरो तिला वाचवतो आणि स्वत:चं जाकीट तिला देतो. त्या जाकीटात त्याच्या आयुष्याची कहाणी सांगणारी डायरी असते.
कट. फ्लॅशबॅक सुरू..
समर आनंद लंडनमध्ये रस्त्यावर गाणी गाऊन पैसे कमावणारा, हातगाड्या ढकलून माल पोचवणारा, हॉटेलात वेटरचे काम करणारा एक दरिद्री तरूण(??) असतो. तिथे त्याची ओळख एका गडगंज श्रीमंत बापाच्या (अनुपम खेर) एकुलत्या एक मुलीशी - मीरा थापर (कतरिना) - होते. तिचं लग्न ठरलेलं असतं. पण ती व तो प्रेमात पडतात. स्वत:वर बंधन लादून घेण्यासाठी हे दोघं हिंदू, मंदिरात न जाता चर्चमध्ये जाऊन एकमेकांपासून 'सुरक्षित अंतर ठेवा'वाली शप्पथ घेतात. (चर्चमध्ये का? असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.)
लेकीन इश्क़ रोके रूकता नहीं! ते जवळ येतात.. झोंबाझोंबी करतात.. आणि मग समरचा अपघात होतो. तो मृत्यूच्या जबड्यातून परत येतो. इथे मीराला समजून येतं की तिने तिची येशूसमोर घेतलेली शप्पथ तोडल्याची ही शिक्षा आहे. म्हणून ती समर जिवंत राहावा म्हणून नातं तोडते आणि त्याला लंडन सोडून जायला सांगते. (लॉल!!) २२ व्या शतकात हे समजून घेणे म्हणजे आपल्या मूर्खपणाचा कळस असतो. तरी आपण समजून घेतो कारण आपण खरोखरच मूर्ख आहोत.
बास्स... मीराच्या अंधश्रद्धेला देवाचा चॅलेंज समजून 'रोज मौत से खेलूंगा.. या तो तुम्हे मुझे मारना होगा या उसके (मीरा के) विश्वास को हराना होगा..' असली पोरकटशिरोमणी शप्पथ घेऊन समर वयाच्या २८ व्या वर्षी भारतात परततो. इथे भारतीय सैन्य दलाने त्याच्यासाठी रेड कार्पेटच अंथरलेलं असतं. त्यामुळे तो थेट सैन्यात दाखलही होतो.... मेजरही बनतो आणि 'बॉम्ब स्क्वाड'चा प्रमुखही! (कैच्याकै ! असं कसं शक्य आहे ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. का. आ. मू. आ.)
हे सगळं फ्लॅशबॅकमध्ये चालू आहे... विसरलात ना की 'अकीरा' त्याची डायरी वाचतेय ? असंच दिग्दर्शकाचंही होतं. डायरी संपेपर्यंत त्याला आठवतच नाही की हा फ्लॅशबॅक आहे. असो.

अशी सगळी कहाणी वाचणारी अकीरा डिस्कव्हरी वाहिनीत किरकोळ नोकरीला असते. तिचं एक स्वप्न असतं की एक आर्मी, युद्ध, बॉम्ब्स इ. वर डॉक्युमेंटरी बनवायची. ती त्यासाठी मान्यता मिळवते आणि थेट 'बॉम्ब स्क्वाड' सोबत कॅमेरा घेऊन दाखल ! प्रोफेशनल व्हिडिओ कॅमेरा असतानाही ती एका फुटावरून बॉम्ब निकामी करणाऱ्या समरला चित्रित वगैरे करते, तेव्हा मात्र तीसुद्धा आपल्यासारखीच मूर्ख आहे का? अशी शंका येते. आपण कितीही बिनडोक असलो तरी आपल्याला आधीच कळलेलं की आता ही बया ह्या गालावर निवडुंग आणि डोक्यावर खुरटी झुडपं घेऊन फिरणाऱ्या मेजरच्या प्रेमात डुबकी मारणार आहे, मारतेच. पण तमाशा इथे संपत नाही. अकीरा समरवरच डॉक्युमेंटरी बनवते - 'A man who can not die! ती डिस्कव्हरीवाल्यांना आवडते.. ते रडतात ! आणि ते समरला लंडनला घेऊन ये, असं तिला सांगतात. १० वर्षांपूर्वी मीराला वचन दिलेलं असतानाही, ते तोडून समर अकीरासाठी परत लंडनला येतो. पुन्हा त्याचा अपघात होतो आणि तो ही मधली १० वर्षं पूर्णपणे विसरून आयुष्यात रिवाइंड होतो. (हे शक्य आहे, का. आ. मू. आ.) मग त्याला 'नॉर्मल' करण्यासाठी त्याची डॉक्टर, अकीरा, मीरा आणि त्याचा लंडनमधला एक लाहोरी मित्र असे सगळे मिळून नाटक करतात. भरपूर मेलोड्रामा आणि शाहरुखगिरी झाल्यावर शेवटी 'जान छुट'ते आणि सिनेमा संपतो.

त्याची स्मृती परत आणण्यासाठी त्याच्यावर बनवलेली डॉक्युमेंटरी त्याला दाखवावी, इतकी साधी गोष्ट कुणाच्याही डोक्यात येत नाही, पण ते आपण समजून घ्यायचं. का. आ. मू. आ.

वाईट वाटतं पण बोलायला लागतंय की, यश चोप्रांनी त्यांचं सगळ्यात फालतू काम सगळ्यात शेवटच्या सिनेमात केलं आहे.

jt382.jpg

आदित्य चोप्राची पटकथा व कथा, त्याने शाळेत लिहिली असावी.
गुलजार साहेब आणि रहमानने ह्या सिनेमातील सर्वच्या सर्व गाणी ताबडतोब 'हक्कसोड पत्रा'वर सही करून विमुक्त करावीत.
शाहरुख खान जितक्या लौकर स्वत:च्या प्रेमातून बाहेर पडेल तितकं त्याच्या भक्तांचं भलं होईल.
कतरिनाकडून अभिनयाची अपेक्षा करणे फोलच.
अनुष्का शर्मा लक्षात राहाते.
छायाचित्रण नेत्रसुखद आहे.

रा-वन पाहिल्यानंतर जर आपल्याला असं वाटलं असेल की ह्याहून वाईट शाहरुखपट असणार नाही, तर आपलं चुकलंच.. कारण..........?
का. आ. मू. आ. !!

रेटिंग - *
http://www.ranjeetparadkar.com/2012/11/jab-tak-hain-jaan-movie-review.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

रिया तुला जे हवय ते तु करतेयस ना?
आम्ही पण आम्हाला हवं तेच करतोय... हट जा रास्ते से अब... Proud
तसा शाहरूख मलाही आवडतो, पण मग उगिच त्यानं पादलं तरी सुवासिक म्हणावं इतकी मी त्याची फ्यॅन नाहीये. Proud

जेव्हा हे हिरो लोक भुमिका स्विकारतात तेव्हा स्क्रिप्ट वाचतात, ठिक आहे तेव्हा एक स्विकारला असेल सिनेमा. पण दृश्य समजावून सांगताना हा ५० वर्षाचा घोडा सांगू शकत नाही की हे प्रचंड अवास्तव वाटेल? का पब्लिकला आवडतं म्हणून काहीही गळी उतरवण्याचा प्रयत्न करायचा? Uhoh

तसा शाहरूख मलाही आवडतो, पण मग उगिच त्यानं पादलं तरी सुवासिक म्हणावं इतकी मी त्याची फ्यॅन नाहीये. >>>दक्षिणा Rofl

दक्षे यक Rofl
घाणेरडी कुठली Rofl

माझं म्हणणं आहे, सिनेमाला शिव्या घाला, रायटर्ल शिव्या घाला, डायरेक्टरला शिव्या घाला...
बिचार्‍या हिरो हिरोईन्सना कशाला नावं ठेवता कथेबद्दल?
त्यांना अ‍ॅक्टींग येत नसेल तर शिव्या घाला... ठिकेय...
पण तो शाहरुख आहे म्हणून उगाच शिव्या घालायच्या?
ये कहा का न्याय है?????? Proud

मला अमुक एकच हिरवीण हवी म्हणून अडून बसणारे हे स्टार लोक, सिनेमा कसा बनतो आहे, हे पाहात नाहीत, म्हणून त्यांना शिव्या. सिनेमाच्या कास्टिंग मध्ये लुडबुड करावीशी वाटते, स्क्रीनप्लेमध्ये डोकं लावावंसं नाही वाटत? आपल्याला इतक्या वर्षांचा अनुभव आहे. शेकडो देश फिरलो आहे... हजारो सिनेमे पाहिले असतील. काहीच त्यातून बोध घ्यावासा वाटत नाही? २८ व्या वर्षी आर्मीत जायचंय? अरे काय इंदिरा गांधी ओपन युनिवर्शिटी आहे का ? उचलला पाय आणि लावला ##ला आणि बनला मेजर ! सिनेमाच्या तिकिटासोबत प्रेक्षकांना एकेक खुळखुळा, लॉलीपॉप, वगैरे का देत नाहीत ?

तसा शाहरूख मलाही आवडतो,>>>> दक्षे तेरेसे ये उम्मीद नही थी Proud
पण मग उगिच त्यानं पादलं तरी सुवासिक म्हणावं इतकी मी त्याची फ्यॅन नाहीये. >>>>>>>>>>> Lol

रसप Rofl
हो आणि लंडनमध्ये पण तो काही फार खास काम करत नसतो ना? कोणत्या क्वालिफिकेशनवर बॉम्ब निकामी करण्याची नोकरी मिळवतो? Uhoh
का ते काम कोणीच करत नाही म्हणून याला देतात बहुतेक. Lol
ती अनुष्का शर्मा तर वाया बाई आहे.

रसप Rofl

का ते काम कोणीच करत नाही म्हणून याला देतात बहुतेक.>>>>>>>>> अगं झाला तर झाला निकामी नैतर पिच्चर खतम असं असेल Happy

सस्मित मी क आ न के पाहून भयाण रडले होते त्याचा.
तसा शाहरूख वाईट नाही, रोमँटिक सिन्स फक्त त्यानेच करावेत. हा बाबा खरोखरी त्या हिरॉईनच्या प्रेमात आहे का काय अशी शंका यावी इतका बुडतो त्या रोमान्स मध्ये. आणि त्याचे एक्स्प्रेशन्स जबरदस्त आहेत.

क आ न के >>>>>> कभी अलविदा ना कहना ???? ते आ आणि के वर मी किती विचार करत होते.
बादवे हाच तो मुवी जिथपासुन सारुख डोक्यात गेला माझ्या. Proud

कभी खुशी कभी गम, कल हो ना हो पर्यंत बराच होता.

दक्षिणा Lol

मला अलविदा ना कहना सिनेमा अजिबात आवडला नसला तरी त्याम्धे शाहरूखने केलेला रोल आवडला होता. त्याही आधी पहेली, असोका असे त्याचे वैतागवाडी पिक्चर आलेच होते. पण तरीही तो एकंदरीत सुसह्य होता. शाहरूख डोक्यात जायला लागला ते माय नेम इज खानपासून. (खरंतर त्या सिनेमासाठी त्याने केलेल्या त्या यु एस एअरपोर्टवरच्या पब्लिसिटी स्टंटपासून.)

दक्षे.. Lol Lol

नंदिनी.. आणी मी त्या दिवशी त्याच्या नाकावर टिच्चून ५ मिंटात ह्यूस्टन एअरपोर्ट मधून बाहेर पडले होते.

त्याचाच बदला म्हणून मला ' जाँ जाईस्तो जबतक है जाँ ' पाहावा लागला असेल.. Uhoh

Lol
अनुष्का प्रत्येक चित्रपटात मै इक्कीस साल की हुं, पच्चीस साल की हुं असं का सांगते ? (चित्र काढल्यावर, कसलं आहे ते ओळखावं म्हणून खाली पाटी लिहीलेली असते तसं वाटतं ते !)

दक्षे Rofl

बाय द वे, इतक्या महिन्यांनीही ह्या चित्रपटाच्या रसग्रहणाच्या बीबी मध्ये प्रतिसाद मिळवण्याइतकी जान आहे. Wink

मी मुळचाच अज्याबातच रोमॅन्टिक नसल्याने असले चित्रपट बघत नाही.
त्याऐवजी दणादण मारामारी करणारा अरनॉल्ड बघतो मी.

Pages