सा. अधःपतन

Submitted by खटासि खट on 22 March, 2013 - 22:59

चंद्रकांत, तू माझ्याशी लग्न करशील ?
नाही गं मधू.. आपला फक्त हनीमून होऊ शकतो.

असले जोक्स एकमेकांना सांगणे ही हाईट असलेल्या काळातल्या झंपूतात्यांच्या हातात ती आमंत्रणपत्रिका पडताच ते तीनताड उडाले. हल्ली उडण्यात नवलाई अशी राहीलीच नव्हती. परवा रणछोडदास वाण्याच्या अमेरिकेतल्या मुलीने लग्न न करताच तसंच कुणाबरोबर रहायला सुरूवात केल्याची बातमी कानी पडली तेव्हां पण ते असेच उडालेले. रणछोडदास मात्र अरे बाबा तेला लीव्ह इन रिलेशनशिप म्हणतेत, इटस लीगल असं कसंनुसं हसत सांगत होता. याच सज्जन गृहस्थानं याच पोरीचा देशी मित्र खालच्या जातीचा होता म्हणून त्याला गायब केल्याचं बोललं जात होतं.

प्रतापसिंह भोसलेंच्या मुलाने एका मित्राशीच लग्न केलं तेव्हांही झंपूतात्या असेच उडाले होते. पण सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे ते तसे राहतात असे प्रतापसिंह म्हणाले तेव्हां तात्या बुचकळ्यात पडले होते. मर्दानगी सिद्ध करण्यासाठी चार चार लग्न केलेला आणि तरीही अंगवस्त्र बाळगणा-या या तेजं:पुंज नरपुंगवाच्या कुलदीपकाने हे काय केले असे सहानुभूतीदर्शक विचार मनात येत असतानाच तात्यांनी तिथून काढता पाय घेतला.

इतके धक्के बसल्यानंतरही या आमंत्रणपत्रिकेने तात्या उडालेच होते. पत्रिकेतला मजकूरच तसा होता

मधूचंद्राच्या सोहळ्याचे आमंत्रण !!

अरे काय म्हणावं याला ! आता हे ही याची देही, याचि डोळा पहायला लागतंय कि काय !
रामा शिवा गोविंदा !

हे धरणीमाते, तू पुन्हा पोट फाडून मला उदरात का घेत नाहीस ?
नाही नाही. आता शांत बसून चालणारच नव्हतं. कुणाच्याही म्हणण्याची पत्रास न ठेवता हा सोहळा हाणून पाडायलाच हवा.
पण हा सोहळा असतो तरी काय याबद्दल तात्यांना अजिबातच कल्पना नव्हती. त्यामुळं तो हाणून कसा पाडावा हे समजत नव्हतं. आधी हा सोहळा काय आहे हे पहावं, कितपत अधं:पतन झालेय समाजाचे हे पहावे आणि मगच पुढील रणनीती आखावी असं तात्यांनी ठरवलं. त्यातून पूर्वी कधी काळी आपल्या गौरवशाली परंपरेत असे सोहळे चालत असतील तर विरोध करून गोत्यात यायची शक्यता जास्त होती.

कालपरवाच्या बबड्या आणि बबडीचं लग्न झालं होतं. लग्नाचं आमंत्रण काकूंना होतं. तात्यांना घरीच कसलं तरी महत्वाचं काम असल्याने आमंत्रण असतं तरी ते गेलेच नसते. अलिकडे अशा ब-याच सोहळ्यांना ते जात नसत. घरचे सगळे गेले तरी एकटेच घरी थांबत असत. पण हे आमंत्रण मात्रं त्यांना एकट्यालाच होतं.

ठरल्या दिवशी, नव्हे रात्री तात्या मंडपात नव्हे रंगमहालात पोहोचले. अजूनही त्यांना हे सर्व प्रतिकात्मक असेल अशी आशा वाटत होती. पूजाअर्चा होऊन नंतर नवपरिणित दांपत्य आपल्या खोलीकडे कूच करत असेल असा विधी असावा असे मनोमन त्यांना वाटत होते. पण इथे ना भटजी, ना पूजेचे साहीत्य. ना इतर व-हाडी ना कुछ. बरं वर रंगमहालापर्यंत कुणी अडवलेही नाही किंवा टोकलेही नाही. समोर सजवलेला मंचक पाहून तात्यांचं अंग शहारलं.. आणि त्यातच लाल वस्त्रांतल्या नववधूचं हातात दूधाचं ग्लास घेऊन आगमन झालं. थोड्याच वेळात शेरवानी घातलेल्या वराचंही विवक्षित स्थळी आगमन झालं. ते दोन तरूण जीव एकमेकांच्या जवळ येऊन बसले आणि..

तात्यांचं अंग थरथरू लागलं. त्यांना हे सर्व सहन होईना. आता ते बसल्याजागी जोरजोरात हलू लागले, झुलू लागले. आडवे होऊन लोळू लागले. त्यांच्या कानी फक्त इतकेच शब्द पडत होते

" अहो उठा, काय झालं तुम्हाला ?"

बायकोचा आवाज ऐकून दचकून झंपूतात्या उठून बसले. काकू आत गेल्या. तात्यांची आण्हिकं उरकून संगणकासमोर ते बसणार तितक्यात काकू कडाडल्या " मुलं मोठी झाली, आता बास कि ते ! झोपताना किमान त्या घाणेरड्या साईटस बंद तरी करायच्या ना म्हणते मी.. उगाच झोपेत चावळत सुटायचं !"

तात्यांमधला संस्कृतीरक्षक तोंडाचा आ वासून फक्त ऐकत होता.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आँ

खटोबा,

अगदी समर्पक लेख. शेवटलं वाक्य एकदम झकास. तुम्ही ज्याला संस्कृतिरक्षक म्हणता त्याला आम्ही कम्युनिस्ट म्हणतो! Lol

आ.न.,
-गा.पै.