शालेय शिक्षण पद्धत - आजची आणि उद्याची.

Submitted by दक्षिणा on 8 February, 2013 - 04:37

खरंतर शालेय शिक्षण आणि त्यावर बोलावे हा माझा प्रांत नव्हे. पण काल रचनाशिल्प या मायबोलीकरणीशी फोनवर २ तास झालेल्या गप्पांनंतर आजकालच्या शालेय शिक्षणावर प्रकाश टाकणारा एक धागा उघडावा असं राहून राहून वाटत होतं.

थोडक्यात आजची शिक्षणपद्धती प्रचंड चुरशीची आणि स्पर्धात्मक झाली आहे. एकसुरी अभ्यास, पुढे मुलाला/मुलिला इंजिनियरिंग/मेडिकलला घालायचे. (त्याच्या खालची कोणतीही पदवी खालच्या दर्जाची मानली जावी बहुतेक) एम बी ए, परदेशी पोस्ट ग्रॅज्युएशन करता यावं म्हणून मुलांना आत्ता पासून त्या भयंकर 'रॅट रेस' मध्ये अक्षरश: ढकललं जातंय. कारण आजच्या मार्कांवर त्यांचं भविष्य अवलंबून आहे. पुढच्या सगळ्या अ‍ॅडमिशन्स अवलंबून आहेत.

पण या अशा 'बर्डनसम' शिक्षणपद्धतीत मुलांचं निरागस भावविश्व कुठे तरी लोप पावत चाललंय. परिक्षा, मार्कस आणि वाढत्या प्रेशरमुळे सरकारनेही नुकतंच परिक्षा न घेण्याचं तंत्र अवलंबलं आहे.

तुम्हाला काय वाटतं? आजची शिक्षणपद्धती कशी आहे? यातून विद्यार्थी तर जन्माला येतायत पण ती माणूस कधी बनणार? व्यवहारज्ञान म्हणून जे प्रचलित आहे ते खरंच पुस्तकी ज्ञानातून मिळतं का? माझ्या वैयक्तिक मतानुसार तरी ते फक्त अनुभवातून मिळू शकतं.

सध्या पुण्यात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या संस्था आहेत, ज्या ओपन स्कुलिंग करतात किंवा नो स्कुलिंग करतात. इयत्ता १०वी पर्यंत जे ज्ञान(??) आपण पुस्तकातून घेतो किंवा आपल्याला शिकवलं जातं तेच वेगवेगळ्या पद्धतीने मुलांपर्यंत खुद्द त्यांचे पालकच पोहोचवतात. (व्हॉलंटरी टिचिंग)

तुमचं मत काय? हे ओपन स्कुलिंग थोड्याफार प्रमाणात पुर्वीच्या गुरुकूल पद्धतीप्रमाणेच आहे फक्त थोडे सुधारीत. त्याला पुढे कितपत प्रतिसाद मिळेल? आपल्या पिढीतील किती लोक असं समजतात की आत्ताच्या लहान मुलांना अभ्यास हा अवाक्या बाहेर करावा लागतो आयुष्याच्या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी? की तुमच्या मते हे योग्यच आहे? करावेच लागेल?

किती पालक ओपन स्कुलिंग्/नो स्कुलिंगला 'फॉर' असतील?

मुलांना वाढवायला खरंच खूप पैसे लागतात का? कि आई-वडीलांचा अमूल्य वेळ लागतो? जे संस्कार (मूल्य) व्हॅल्यूज किंवा सामाजिक शहाणपणा आपल्याला उशिरा येतो, तो या ओपन स्कुलिंगच्या माध्यमातून मुलांमध्ये वेळिच येइल असं मला वाटतं. तुम्हाला काय वाटतं?

चर्चा करूया?

तळटिप : खरंतर हा विषय अतिशय व्हास्ट आहे, जे सुचेल ते, आणि सुचतील तसे मुद्दे इथे हेडींग मध्ये टाकलेत. सर्व मुद्यांवर सविस्तर चर्चा प्रतिसादांमध्ये होईलच.

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

किती पालक ओपन स्कुलिंग्/नो स्कुलिंगला 'फॉर' असतील? माझी मुलगी आता बीटेक झाली अन्यथा मी तीला ओपन स्कुलींग्/नो स्कुलींग प्रिफर केल असत.

अतिशय जिव्हाळ्याचा विषय, Happy

लेक आत्ता सहावीमधे आहे. अभिनव इंग्रजी माध्यम.

माझ्या दृष्टीने चांगली शाळा म्हणजे जेव्हा मुले आनंदाने शाळेत जातात. शाळा बुडवायला फारशी तयार नसतात. अभिनव त्या कसोटीवर उतरते.

मी तरी शाळेवर खूष आहे. अभ्यासा बरोबरच इतरही अनेक गोष्टी शाळेत सतत चालू असतात. उदा. तिचे सध्याचे प्रोजेक्ट - आजीआजोबांचा इंटरव्यू, एका कलाकाराचा इंटरव्यू, घराचे एक महिन्याची इलेक्ट्रिसिटी बील इत्यादी.

अजूनही लिहिण्यासरखे बरेच आहे. सध्या इतकेच.

<<सध्या पुण्यात हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या संस्था आहेत, ज्या ओपन स्कुलिंग करतात >> हयांची नावे कळतील का?

दक्षिणा चांगला विषय आहे.
माझी लेक दुसरीत आहे. कॉन्व्हेन्टमधे . अजुनतरी काही स्ट्रेस, अभ्यासाचा जाच वै नाही वाटत. जसा मी माझ्या शाळेच्या वेळी केला तसाच अभ्यास. थोडा त्यामानाने अ‍ॅडव्हान्स आहे पण तिला झेपेबल आहे. आणि तशीही मी अति ताण स्वतः ही घेणे नी मुलीलाही देणार्‍यातली नाहीये. त्यामुळे खुपच अभ्यास, स्पर्धा, सगळच आलच पाहिजे असा हट्ट नाहीये आणि पुढेही नसेल. पण खरंच खुपच कॉम्पिटिशन आहे. इतरांचे अनुभव वाचायला आवडेल.

महेश ओपन स्कुलिंग म्हणजे जिथे कोणतीही पुस्तकं हाताळली जात नाहीत. विद्यार्थ्यांना उपलब्ध सामुग्रीतून शिक्षण दिलं जातं.

शिक्षण क्षेत्रात वर्ण व्यवस्था आली आहे.

सी बी एस सी - सी सी ई पॅटर्न

इंग्लिश मेडियम स्टेट बोर्ड

सेमी इंग्लिश

मराठी मेडिअयम

इंग्रजीची हार्डनेस क्रमाक्रमाने कमी कमी होते.. Sad

सत्या इथे नो स्कुलिंग्/होम स्कुलिंग्/ओपन स्कुलिंगवर चर्चा अपेक्षित आहे. तु दिलेले धागे उपयुक्त आहेत पण इथे आहेत असं मला वाटत नाही. Sad

दक्षिणा, एका महत्वाच्या विषयाला अगदी तोंडच फोडलेत. मायबोलीवर असा एखादा धागा येऊन गेला आहे की नाही माहीत नाही, अंधुक आठवत आहे आल्यासारखा!

मला जे वाटते ते खाली लिहीत आहे:

===============================

१. विद्यार्थ्याला सुजाण नागरीक बनवणे हे शाळेतील संस्कारांचे एक ध्येय असले तरीही ते शाळेचे एकमेव ध्येय नाही.

२. विद्यार्थ्याला सुजाण नागरीक बनवण्यासाठी एकटी शाळा जबाबदार नाही.

३. शालेय अभ्यासक्रमातील यशावर पुढील आयुष्यातील व्यावसायिक गणिते व त्यातील यश हे प्रामुख्याने अवलंबून असते याचे कारण आपला देश पुरेसा सुबत्तापूर्ण नाही व आपल्या देशाची लोकसंख्या क्षमतेच्या बरीच जास्त आहे. याचा अर्थ असा, की समजा एखाद्याला मोठे होऊन ऑटो रिक्षा चालवायची आहे, तर त्याला दहावी ते बारावीपर्यंतचे शिक्षण खरे तर पुरे होऊ शकेल. मात्र देश सुबत्तापूर्ण नसल्यामुळे रिक्षा चालवून त्याला जे पैसे मिळतील त्यात तो स्वतःच्या कुटुंबासहित पुरेश्या समाधानाने गुजराण करू शकणार नाही. दुसरे म्हणजे मुळातच रिक्षांची संख्या प्रचंड असल्याने (कारण लोकसंख्याही प्रचंड आहे) त्याला रिक्षा व्यवसायातून बाहेर पडून अधिक पैसे मिळवायचे असले तर मोठ्या पगाराचे काम हवे असेल जे दहावी किंवा बारावीपर्यंतच्या शिक्षणातून मिळणार नाही. पैसा हे एक सामर्थ्य आहे ही वस्तूस्थिती असल्याने अधिक पैसे म्हणजे अधिक चांगल्या उत्पन्नाचे साधन व त्यामुळे अधिक शिक्षण हे समीकरण रूढ झालेले आहे. समजा असे गृहीत धरले की पुण्याची लोकसंख्या अचानक निम्म्यावर आणली, तर असलेल्या पाच धरणातील पाणी, असलेली वीज, असलेले रस्ते हे सर्व कदाचित पुरेसे ठरेल. पंचवीस टक्क्यांवर आणली तर हे सगळे रिसोर्सेस जरूरीहून अधिक असल्याचे जाणवेल. यातून सुबत्ता येते. अनियंत्रीत लोकसंख्यावाढ सर्व सुबत्तेला गिळंकृत करत असल्याने स्पर्धात्मक युग येणे अनिवार्य असून त्यात टिकण्यासाठी उच्च दर्जाचे शिक्षण अपरिहार्य ठरत आहे. शिक्षण न घेताही पैसे कमावता येणे यात व्यवसाय समाविष्ट होऊ शकतात. जसे, एखादे किराणा मालाचे दुकान एखादा आठवी पास मुलगाही चालवेल आणि गब्बरही होईल. पण त्याचे ते गब्बर होणे किराणा मालाच्या दुकानांची संख्या अमाप वाढेपर्यंतच असेल. त्यानंतर तो यथातथाच कमवत राहील. पण एकदा घेतलेले शिक्षण जेव्हा एकदा उच्च पदाची नोकरी देते तेव्हा त्यानंतर त्याच्यापेक्षा कमी पदाची अथवा कमी उत्पन्नाची नोकरी करायला लागण्याची वेळ सहसा येत नाही. त्यामुळे शिक्षण घेणे, त्यातील स्पर्धा, त्यामुळे येणारा ताण, सुजाण नागरीक बनण्याऐवजी गुणांना मिळणारे प्रचंड महत्व, शिक्षणाचे बाजारीकरण, नोकरीसाठीची चढाओढ, नोकरी सुरू केल्यानंतरही शिकत राहणे या सर्व बाबी अनिवार्य ठरू लागतात कारण त्या बाबी माणसाला एकदा देत असलेले स्थान व स्टेटस सहसा पुन्हा हिरावून घेत नाहीत.

४. ही वस्तूस्थिती जर मान्य असली तर सुजाण नागरीक बनवण्याची बरीचशी जबाबदारी पालक, समाज यांना उचलावी लागते व शाळेकडून गुणवत्तेची जबाबदारी उचलली जाण्याची अपेक्षा बळावते.

५. यामुळे शाळेची धोरणेही 'आपल्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता अधिकाधिक वाढवून त्या मार्फत पैसे कमावणे' या दिशेने ठरतात, ठरू लागतात.

६. हे वर्तुळ विचित्र असून यातून बाहेर पडण्यासाठीचा उपाय थेट फार पूर्वी महात्मा गांधींच्या तत्वांमध्येच सापडतो. (ही एक शोकांतिकाच).

७. छोटी छोटी मुले जेथे मोठ्यांना बिछान्यातून उठवतही नाही अश्या वेळेला, म्हणजे सकाळी सहा सहा वाजता थंडीत आंघोळ करून मोठे दप्तर घेऊन शाळेच्या गाडीची वाट बघतात तेव्हा ते पाहून वाईट वाटते. त्यातच मैदानी खेळ कमी झाल्यामुळे आणि संगणक आयुष्याला व्यापत असल्यामुळे चष्मे लागत आहेत, वाढ खुरटत आहे, हे वेगळेच! बाल्य हारवत आहे.

८. पण मुद्दा क्रमांक सातमध्ये मांडलेल्या परिस्थितीला आपण स्वतःच जबाबदार आहोत. आपण अल्पसंतुष्ट राहू शकत नाही आहोत. घरातील अनेक महागड्या वस्तू, आपले राहणीमान, बँक बॅलन्स, ट्रॅव्हल या सर्व बाबी आपल्याला हव्या आहेत. मुलांनाही त्या हव्या आहेत हे आपल्याला आवडत आहे. आपल्या आधीची पिढी (साधनेच नसल्यामुळे का होईना, पण) गरीबीतही व्यवस्थित नांदत होती त्या पातळीला आपण नाही जाऊ शकत हे कबूल करायला हवे आहे. एकेकाळी मोबाईलशिवाय सर्व काही जमत होते आणि पंधरा पैशाचे पोस्टकार्ड आयुष्यात काव्यही आणत होते. पण आज आपण 'वेग, राहणीमान व आराम' या त्रयीला साध्य मानतो. अनेक साधने साध्य ठरलेली आहेत. कोणीतरी मध्यंतरी मायबोलीवर एक विचित्र लेख लिहिला होता की आजची प्रगती ही खरे तर प्रगती नसून अधोगती आहे, स्त्रियांचे पूर्वीचेच स्थान योग्य होते वगैरे! अर्थातच तो लेख त्याची मौत मेलाच. कोणालाच पटण्यासारखा नव्हता तो लेख. पण त्यात एक मुद्दा मात्र महत्वाचा होता, असे मला वाटते. आज आपल्या जनतेला राहणीमानाचे वेड लागण्यामागे परकीय देशांनी केलेल्या सुखसुविधांच्या आकर्षणाचा भडिमार व आपली मोहीत झालेली वृत्ती कारणीभूत आहे. दहा हजार कमी मिळाले तरी चालतील पण कुटुंबाच्याबरोबर राहीन असा विचार आता फारसे कोणी करत नाही.

हव्यास, मनःशांती ऐवजी श्रीमंतीला दिली गेलेली पसंती आणि गरीबीमुळे इगो दुखावला जाण्याची चुकीची मानसिकता हे सर्व घटक (वाढती लोकसंख्या या घटकाशिवाय) या अश्या शालेय शिक्षण पद्धतीला जबाबदार आहेत आणि ही शिक्षणपद्धती बदलणे म्हणजे मुळात लोकांच्या विचारांतच आमुलाग्र बदल घडवून आणण्यासारखे असून ते आता जवळपास अशक्यप्राय आहे असे वाटत आहे.

भाषण समाप्त!

-'बेफिकीर'!

"तोत्तोचान" नावाच्या पुस्तकात ज्याबद्दल लिहिले आहे तशी शाळा ना ?
पुण्यात असलेली अक्षरनंदन ही शाळा म्हणजे तुम्ही म्हणता तसे ओपन स्कुलिन्ग असावे.

नो स्कूलवालेही खाजगी पुस्तके वापरत असतीलच ना.... तसे असतील तर तेही सी सी ए वालेच असतील

नो स्कूलवाले म्हणजे एक्झ्याक्टली काय प्रकार आहे?

इयत्ता दहावीला गेल्यावर मग ही मुलं काय करणार? कोणती पुस्तके वाचून कोणते पेपर लिहिणार?

>>दहा हजार कमी मिळाले तरी चालतील पण कुटुंबाच्याबरोबर राहीन असा विचार आता फारसे कोणी करत नाही.
यासाठी परदेशातुन परत आलेला Happy बाहुला

होम स्कुलिंग हा पर्याय मला एक limited scope पर्यंत ठीक वाटतो पण त्यामधे मुलं समवयस्कांना मुकतात असे वाटते. मग त्यासाठी इतर कुठलेतरी क्लास, ग्राऊंड ह्या गोष्टी लावाव्या लागतात.

एखाद्या मुलाला किंवा मुलीला खेळ, एखादी कला ह्याची खास आवड असेल आणि त्यात विशेष प्राविण्य मिळवायचे असेल तर मला हा पर्याय चांगल वाटतो. माझ्या माहीतीप्रमाणे योगीनी गांधीने होम स्कुलिंग केले होते.

आज आपल्या जनतेला राहणीमानाचे वेड लागण्यामागे परकीय देशांनी केलेल्या सुखसुविधांच्या आकर्षणाचा भडिमार व आपली मोहीत झालेली वृत्ती कारणीभूत आहे. दहा हजार कमी मिळाले तरी चालतील पण कुटुंबाच्याबरोबर राहीन असा विचार आता फारसे कोणी करत नाही.

हायला, यालाही इंग्रजच जबाबदार का?

पूर्वीच्या काळी बायकापोरं पुण्यात सोडून लोक पानिपत लढायला जात नव्हते की काय?

अशी एक शाळा जयसिंगपुर मधे मेजर प्रकाश पाटील यांनीही चालु केली आहे.. आधी लोकांचा खुप प्रतिसाद होता पण मध्यंतरी असे कळाले की बाकीच्या शाळा या विद्यार्थांना पुढील वर्गांना प्रवेश देत नव्हत्या..
आता चालु आहेच पण प्रतिसाद कसा आहे माहित नाही

मी मागे नो स्कूलवाल्या पालकांच्या मुलाखती वाचल्या होत्या.त्यात पालक घरी राहून मुलांना शिकवतात. शिवाय असे पालक गट करून विषय वाटून घेतात. ही मुले दहावीची परिक्षा बाहेरुन देतात.पण नंतर मग कॉलेज चे काय?
किती गोष्टी घरात शिकवू शकतो आपण ?

त्यात पालक घरी राहून मुलांना शिकवतात. शिवाय असे पालक गट करून विषय वाटून घेतात.>>>>> पण शिकवतात काय?? शाळेचाच अभ्यासक्रम? की इतर काही? आणि जर इतर काही तर ते पुढच्या शिक्षणासाठी ग्राह्य धरतात का?

माशा पुढे रेग्युलर कॉलेजला प्रवेश घेता येतो दहावीच्या मार्कांवर. दहाविची परिक्षा मात्र बाहेरून द्यावी लागते.

<<मी मागे नो स्कूलवाल्या पालकांच्या मुलाखती वाचल्या होत्या.त्यात पालक घरी राहून मुलांना शिकवतात. शिवाय असे पालक गट करून विषय वाटून घेतात. ही मुले दहावीची परिक्षा बाहेरुन देतात>> कशासाठी हा अट्टाहास? शाळेची "अभ्यासक्रम" ही एकच गोष्ट सोडली तर बाकीची बरोबरी घरी कशी करता येईल? शाळेत कितीतरी गोष्टी सहज शिकतात मुलं ( काही नको असलेल्या पण शिकतात Happy )
असा निर्णय घेताना, एक पालक म्हणून केवढी मोठी जबाबदारी डोक्यावर घेतो आपण? शाळा जे जे देते, ते सगळे मी माझ्या मुला/मुलीला देऊ शकेन का?
उद्या पुढे जाउन समजा, मुलाला आयुष्यात अपयश आले, तर केवढा मोठा गिल्ट राहील मनात! (शाळेत जाणारी कोणीच अपयशी होत नाहीत असे नव्हे, पण तिथे आपण 'वेगळे 'काहीतरी केलेले नसते)
हेमावैम.

http://articles.timesofindia.indiatimes.com/2010-01-15/bangalore/2811343... हे पहा.
त्या पालकांचे म्हणणे होते की आपल्या हुषार मुलांना शिकवण्याएवढे सक्षम शिक्षक शाळेकडे नाहीत.सरधोपट मार्गाने शिकवणा-या(पाट्या टाकणा-या),,कॅलिबर नसलेल्या शिक्षकांच्या हातात मुले सोपवण्यापेक्षा आपण स्वतःच का नको शिकवायला .

त्या पालकांचे म्हणणे होते की आपल्या हुषार मुलांना शिकवण्याएवढे सक्षम शिक्षक शाळेकडे नाहीत.सरधोपट मार्गाने शिकवणा-या(पाट्या टाकणा-या),,कॅलिबर नसलेल्या शिक्षकांच्या हातात मुले सोपवण्यापेक्षा आपण स्वतःच का नको शिकवायला >>>
बेसीक शिक्षण शाळेत घेऊ द्यावे. उरलेले १०-१२ तास मुले आपल्याजवळच असतात. तेव्हा आपण हवे ते हव्या त्या पद्धतीने शिकवू शकतो. पण शाळाच नाकरणे पटत नाही.

बेसीक शिक्षण शाळेत घेऊ द्यावे. उरलेले १०-१२ तास मुले आपल्याजवळच असतात. तेव्हा आपण हवे ते हव्या त्या पद्धतीने शिकवू शकतो. पण शाळाच नाकरणे पटत नाही.>>>>>>>>>> +१

अशी एक शाळा जयसिंगपुर मधे मेजर प्रकाश पाटील यांनीही चालु केली आहे.. आधी लोकांचा खुप प्रतिसाद होता पण मध्यंतरी असे कळाले की बाकीच्या शाळा या विद्यार्थांना पुढील वर्गांना प्रवेश देत नव्हत्या..

माझ्याही डोक्यात हीच शंका आहे. अशामुलाना पुढे अ‍ॅडमिशन कोण देणार?

नीलची शाळा हे पुस्तक वाचावे. नील नावाच्या माणसाने एक Open School काढली होती.

भन्नाट अनुभव आहेत. खूप वेगळे विचार मांडले आहेत त्याने.

दक्षिणा ...

चांगला विषय. खुप आपलासा पण तरीही प्रत्येकाची वेगळी विचार बैठक असलेला....

माझा आणि नवर्‍याचा विचार....

आम्हाला अशी शाळा हवी होती जी मुलांवर जास्त बर्डन घालत नाही. ठाण्यात फारसे पर्याय उपलब्ध नव्हते... त्यातल्या त्यात बरी म्हणुन एक शाळा ( ए.के. जोशी) निवडली. आणि सुखद धक्का बसला... तिकडे २री पर्यंत प्ले वे मेथड आहे. आणि शक्यतो पालकांनी जास्त भोचक पणा करु नये हे सभ्य शब्दात मिटींग ला सांगत असतात... माझी मुलगी त्या शाळेत मना पासून रुळली आहे..आता सहावीत आहे... एकही दिवस बुट्टी मारायला तयार नसते. खुप कार्येक्रमात भाग घेते. खुप ठीकाणी शाळे तर्फे तिला पाठवतात... अनेक एक्झीबिशन्स आणि प्रॉजेक्ट मधे भाग घ्यायला मिळतो. बर्‍याचदा सकाळच्या बातम्या माईकवर वाचायला तिला मिळतात.. आणि हे सगळं रोटेशन ने असतं... त्यांच्या शाळेचे चायनाच्या एका इंस्टीट्युट बरोबर टाय अप आहे.. त्या नुसार मुलांना आठवीत चीन आणि होंगकाँग ला एशीयन सायन्स एक्झीबीशन ला भाग घ्यायला दर वर्षी शाळे तर्फे पाठवतात... शाळेत त्या इव्हेंट्ची खुप चर्चा असते.

आम्ही मुलीला अभ्यासा साठी कधीच सक्ती करत नाही. उलट तिने खुप काय काय ठीकाणी आपणहुन हात घातले तर प्रोत्साहनच देतो. तीने ४थीला स्कोलरशीप परिक्षेला बसायचं नक्की केलं होत... नवर्‍याचा विरोध होता... पण तिला वाटलं म्हणुन ती बसली आणि स्कॉलर्शीप मिळाली सुध्धा... त्या नंतर तिने डिक्लेर केलेलं आहे की ती कुठल्याच स्पर्धा परिक्षेला आता बसणार नाही... ठीक आहे

पुढे जाउन तिला 'शेफ" किंवा अभिनेत्री बनायचे आहे.. ( सध्या तरी) आणि त्याला ही आमची आडकाठी नाही... सध्या लक्ष फक्त पोहोणे...पोहोणे.. आणि पोहोणे... त्याचच वेड सध्या आहे. तिच्या इच्छे नुसार तिला एका अ‍ॅक्टिंग ग्रुप मधे घातले आहे आणि त्यांच्या तर्फे होणार्‍या सगळ्या नाटकात ती भाग घेते.

आम्ही दोघेही तिला खुप वेळ देतो.. मी रोज ६ नंतर तिच्याच बरोबर असते आणि प्रत्येक उद्योगात बाबा सामिल असतो. सध्या अभ्यासाचं धोरण हे की तिने विचारलं तरच मदत करायची. नाहीतर नाही. आर्थात तिच्या एकंदर अभ्यासावर माझं लक्ष असतं.... ह्या वेळी प्रॉजेक्ट्लाही मी तिला लांबुनच मदत केली... तिच तिचं इंटरनेट वर शोधत होती....

ह्या सगळ्यात एक विचार आहे की मुलं जेवढी आपल्या तर्‍हेने ग्रो होत आहेत तिकडे होउ द्यावीत... मी लहान असताना माझ्या आई वडिलांनी माझ्या उद्योगां मधे फारशी ढवळा ढवळ केली नाही. तोच अ‍ॅटिट्युड मी ठेव्ला आहे...

माझ्या नवर्‍याची फक्त एकच इच्छा आहे की तिने कराटे किंवा सेल्फ डिफेन्स पैकी कोणताही स्पोर्ट शिकावा व अभ्यासा पेक्षा इतर अ‍ॅक्टिव्हीटिज मधे लक्ष घालावे... त्या प्रमाणे सध्या तरी तिचं पुर्ण लक्ष पोहोणे, अभिनय आणि कराटे मधे आहे...

पुढे जाउन ती कोण होइल? माहित नाही... तिने फार अभ्यास अभ्यास करु नये व एखादी क्रीयेटिव्ह लाइन घ्यावी, जी तिच्या स्वभावाला सुट करेल अशीच आमची इच्छा आहे. तुम्ही आपल्या मुलांकडे कोणता चष्मा घालुन पहाता ह्यावर सगळं अवलंबुन असतं... आम्ही दोघेही खुप शिकलो... त्या वेळी पर्यायच नव्हता... पण एक माझ्या वरही कोणतीच सक्ती झाली नाही.. माझं प्रोफेशन मला मना पासुन आवडतं... तसच तिचं व्हावं ही इच्छा...

आजुबाजुला बघते आहे... भरपुर क्लासेस, त्यांच्या प्रचंड फिया... कुत्र्याच्या छत्री सारखी कुठेही उगवलेली कॉलेजं.... १० वी ,१२वी,, सी.ई.टी... अलाणे नी फलाणे... बापरे खुप गुदमरुन जायला होतं... माझ्या कलीग च्या मुलाची झालेली परवड... बापरे नको वाटतं.....

मुद्दाम वेगळे विचार लिहिण्या साठी मी हे लिहिलं का? ... उत्तर नाही.. हेच आहे.. कारण एकंदर शिक्षण आणि प्रत्यक्ष काम ह्याचा काहीही संबंध नाही... आमच्या सारख्या शिकलेल्या लोकांचे सल्ले , कचराच्या टोपलीत टाकायचे असतात आणि प्रत्यक्षात कामं "वेगळ्याच" समिकरणाने होतात, हे जाणवुन देणारे अनेक मालक अत्ता पर्यंत भेटले आहेत... त्या मुळे शिक्षणा मुळे सक्सेस मिळतो, पैसा मिळतो ह्या वर विश्वास नाही.. तुमचं काम तुम्ही कीती अत्मियतेने करता ह्यावरच तो सक्सेस अवलंबुन आहे.

आपल्या पाल्याकडे म्हातारपणाची काठी म्ह्णुन बघण्याचे दिवस कधीच संपले... त्यांच्यावर किती बर्डन टाकायचं हे प्रत्येकानेच ठरवायचं....

Pages