सत्य कथा

Submitted by मी मी on 5 February, 2013 - 02:54

गेली ती आज....मृत्यूला घट्ट कवटाळून कायमची निघून गेली ,तिचा निर्जीव देह पाहून तिच्या मायला हुंदका आवरेना, पण शेवटी तीसुद्धा स्त्रीच तर आहे. बाहेर पडू पाहणारा हुंदका साडीच्या पदराच्या बोच्क्याखाली दाबून धरावा लागला. धावत जावून लेकीला बिलगून टाहो फोडावा म्हणनारे पाय अंगठ्याने जमीन कोरु लागले, पण डोळ्यांना मात्र बांध पाळता आला नाही ते ओसंडून वाहत होते. कित्तेक असे अन्यायी बुक्क्यांचे घाव प्रत्यक्ष पाहिले होते मायच्या डोळ्यांनी कित्तेक साहिले देखील होते. पण सगळे सगळे पडद्या आडून. पुरुषी प्रस्थापित समाजात हेच स्त्रियांचं जगणं; मी का सांगितले नाही पोरीला, 'स्त्री जातीला स्वेच्छेने मरणाचा सुद्धा अधिकार नाही पोरी' हे शिकवायचेच राहून गेले होते ....मायच्या जीवाला याचाच घोर लागला असला पाहिजे म्हणूनच तोंड गप्प असलं तरी डोळे आकांत करत होते.

ती होती तरीही जीव पीळवटत होताच ना ...क्रूर समाजाने उघड्यावर टाकलेली, असहाय, फाटक्या कपड्यातली, फेकलेली भाकर खात असलेली दोन जीवाची कमळी, झाडाच्या बुन्द्यावर ताटकळत पडलेली कमळी मायच्या नजरे समोर उभी झाली कि जीवाच पाणी पाणी होत होतं...पोटची लेकरू असूनही काय करू शकणार होती माय? ...चोरून लपून भाकरीचा तुकडा नायतं दोन फळांच्या कोय तिच्या झोळीत ओतून आग आग होणारया जीवावर दोन-चार पाण्याचे थेंब ओतू पाहत होती: कमळी डोळयांना दिसत तर होती. कावल्या जीवाला तेवढाच आधार तर होता.....आता थांबल सगळं. मरण आलं अन घेऊन गेलं तिला.. हाथ पकडून नाही फरफटत ...पण तिच्या जन्माची फरफट थांबली आता.

प्रेम केल होतं म्हणे कमळी नं..गावच्याच पाटलाच्या पोऱ्याशी. गण्या त्याच नाव.
खूप स्वप्न दाखवली होती गण्यानं "कोणाच्या बापाले घाबरत नाही, तुले घेऊन शहरात जाईन तिथ आपण आपला संसार थाटू कमळे. पाटलाच्या पोराले नाई म्हनाची हिम्मत नाय या गावांत कोणाची. तुले पाटलीन बनवून ठेवीन, सोन्यानं मढवीन" म्हणाला होता...कमळीच्या कोवळ्या मनाला सुखाच्या स्वप्नांनी भरून टाकल होत. कमळीला गण्याचा खूप आधार वाटू लागला होता. गण्याशिवाय तिला काहीही दिसेना झालं होतं . पाटलीनच्या वेशात स्वतःला आरशात बघतांना आनंदाचं भरतं येई कमळीला. गण्या आणि फक्त गण्या एवढच तीच विश्व होऊन बसलं.
कमळीची सखी संगी समजावे तिला 'कमळे दिसतं तसचं नसतं सोने. ऐक माझं एकदम वाहवून जावू नकोस, दमानं घे. जरा विचार कर. पोराइचि जात लय खराब असतेत, त्यायले पायजे ते मिळालं का मंग झालं ..प्रेम-बीम सारं तुह्या-माह्या सारख्या पोरींसाठी असते अन इज्जतबी आपलीच जाते. पोराइले फरक पडत नाइ"
पण प्रेमच ते आंधळ म्हणतात तसच....
"गण्या न्हाई त्यातला,तू उगा कायबी बोलतस" म्हणून कमळी परत आकाशी उडू लागायची.

कमळीच्या प्रेमाचा तिच्या विश्वासाचा गण्या आता फायदा घेऊ लागला होता. कमळी ला एकट्यात गाठून चमचमत्या टिकल्या,माळ, बांगड्या वस्तू देऊन तिला उपकाराखाली दाबू पहात होता. गळ्याची आन देऊन देऊन प्रेमाची लक्तरं फाडत होता. पाच रुपयाची भजी खाऊ घालून तिच्या जीवाचा भाजीपाला करत होता. कमळी तरीही खुश होती. प्रेमात आकंठ चूर होती. तनानं - मनानं समर्पित होऊन संसाराची स्वप्नं पाहत होती. कमळीच्या सौंदर्याची तारीफ करायचा तेव्हा तर कमळीला आकाश ठेंगण पडे. असेच आनंदी दिवस जात होते. दिवस सरता सरता कमळीला दिवस गेले, दिवसाचे महिने झाले अन गावभर बातमी पसरली.....
हा हा म्हणता अवडंबर उठले, गावकर्यांनी परिवाराला वाळीत टाकले, कमळीच्या तोंडावर थु थु करू लागले, परिवाराशी गावानं बोलणं सोडलं, लोक टोमणे देऊ लागले, कमळीच्या भाऊ- बहिणींना गावात फिरणे कठीण झाले.....परिवाराने कमळी ला डांबून ठेवले, तिला मारहाण झाली. कमळीचा बा तर हाय खाऊ लागला होता ....पण एवढ्याने गावकर्यांना समाधान नव्हते..

गण्या आता गावात दिसत नव्हता. कामाच्या आडून शहरी पळत होता............आताशा गण्या हुषारीन वागू लागला होता....लोकांच्या नजरेत सभ्य दिसू लागला होता....

गावकर्यांनी संतापून पंच बसवले. चारचौघात कमळी वर आरोप लावले. नको नको ते लांच्छन लावले पंधरा वर्षाच्या पोरीला पापीण ठरवले. गावातल्या स्त्रियांना कमळी ची भीती वाटू लागली कमळी मध्ये त्यांना त्यांच्या नवरयांना हिरावून घेणारी राक्षसीण दिसू लागली. पुरुषांनी तिच्यावर सार्वजनिक चर्चा केल्यात, मस्करी करत वासनेने बरबटलेल्या सुप्त मनाच्या मज्जा या निमित्त्याने घेऊ लागले...
कमळी चा परिवार हत्बल होता, नाईलाजाने खाली मान घालून उभा होता. माय चे डोळे भरू भरू वाहत होते न बा चे डोळे सुकून आत धसलेले. याच डोळ्यान बा विनवणी करत होता. लेकीवर दया करा सांगू पाहत होता. शब्दात बोलायची मात्र न हिम्मत होती ना आता ताकद उरली होती. पंच तरी न्याय करेल हि अपेक्षा अजूनही जागृत होती......पण पुरुषी प्रस्थापित खाक्याच तो. पंचांनी दोन जीवाच्या कमळीला फरफटत आणायला सांगितले, गण्या ला निर्दोष ठरवत कमळीला आरोपी ठरवले गेले . पंचांनी गण्याला निर्दोष करार दिला..पण, गण्याचे नाव घेतले म्हणून कमळी वर अत्याचार केले गेले...माणुसकीला पण लाज वाटेल अशी तिला शिक्षा सुनावण्यात आली.
शिक्षा ..काय?
तर सार्या गावानेच नाहीतर कुटुंबाने सुद्धा कमळी ला वाळीत टाकावे असा वटहुकुम सोडला. या सटविशी जो बोलन त्याचा गावनिकाला होईन म्हणून पंचांनी नोटीस काढले. कमळीनं भरल्या डोळ्याने अपेक्षा घेऊन गण्याकडे पहिले तिला स्वप्नांच्या दुनियेत नेउन तिच्या शरीराचे उत्साहाने भोग घेणारा, आता शांत बसला होता...कमळीच्या स्वप्नांचे चुराडे झाले, क्षणात संसार सुखाची इच्छा धूळ धूळ झाली. ज्याच्यावर विश्वास ठेवून आयुष्य पणाला लावलं होतं त्यानच आयुष्याच्या चिंध्या चिंध्या केल्या होत्या.... कमळीच्या अश्रुने कुणाचाही जीव पाघळला नाही. बाकी परिवारावर अन्याय नको म्हणून बापानं सुद्धा लेकीला घातल्या कपड्यावर बाहेर काढली......दोन जीवाची कमळी एकटी पडली, अंगावरच्या एकमेव कपड्यानं गावात भटकू लागली, दयेची भिक मागू लागली, देवाची आन देऊन दया याचना करू लागली....चार भिंतीचा आसरा तर सोडा तिला भाकरीचा तुकडा देखील कुणी देईनासे झाले, पिंपळाच्या झाडाच्या बुन्द्याजवळ कमळी उपाश्या पोटी तडफडत होती, जीवाच्या आकांताने रडत होती.....प्रेमाच्या आणा भाका घेणारया त्या 'पुरुषाला' सुद्धा तिच्या स्थितीची दया आली नाही. बाप म्हणवणारा पुरुष सुद्धा मुग गिळून गप्प होता. पुरुषी पंचांनी तिच्या जीवाचे हाल हाल करून पुरुषी खाकेबाज मोठेपणा दाखवला होताच पण...पण एक स्त्री म्हणून कुण्याही स्त्री च मन चडफडलं नाही. तिला समजू शकलं नव्हतं. फाटक्या कपड्याने थंडीत उघड्यावर कमळी, चौदा दिवसाची उपाशी, अन्यायाने बरबटलेली, समाजाच्या उलट्या नीती नियमाची बळी पडली आणि तशीच तडफडत फाटक्या मनाने तुकड्या तुकड्यात अखेर तिनं आज जीव सोडला.

कमळी गेली...तगमग संपली, सुटली बिच्चारी ...मृत्यूला तिची दया आली असावी एकट्या पडलेल्या कमळीला मृत्यूने कवेत घेतले होते.

गन्या अजूनही गावात फिरतो आणखी एखादी कमळी तावडीत सापडतेय का म्हणून डोळ्याने हुंगतो आहे. चमचमत्या टिकल्या, माळा गोळा करतो आहे...

आणखी एखादी कमळी बळी पडेल, पुरुषी खाकेबाज आणखी एखादया कमळीवर अन्याय करेल, आणि अविचाराने ग्रासलेला समाज तिला असेच उघड्यावर मरणासन्न टाकून देतील... कदाचित कधीतरी गावकर्यांना त्यांची चूक उमजेल,..एखाद्या गण्याला कमळीची दया येईल, कायदे जिवंत होतील, पोलिसांना जाग येईल...पण या चिंध्या झालेल्या कमळी चा तडफडता जीव मात्र परत येणार नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हि कथा सत्य घटनेवर आधारित आहे. अगदी अलीकडली चारएक महिन्यान आधी इथल्याच एका गावी पारधी पाड्यावर घडलेली. फक्त कथा म्हणून लिहितांना नावे बदललेली आहे.

कमळीची दया आली. थोडा रागही आला. गणुचा राग आला. गाव व पंचायतीची कीव आली.
लिखाण आवडले.

असो, सत्यघटनेचा संदर्भ मिळेल का?

सत्यघटनेचा संदर्भ मिळेल का?>>>>>>>>>>नोव्हेंबर च्या पहिल्या आठवड्यात घडलेली हि घटना विदर्भाच्या गणेशपूर भागात पारधी लोकांच्या बेड्यावर घडलेली...खरी नावं रुश्मिता आणि अमृत कुमार अशी आहेत.......तत्कालीन कोणत्याही वृत्तपत्रात तुम्हाला हि बातमी वाचता येईल.

मयी, खुप वाईट घटना आहे. पण छान लिहिलेय. कालच 'मासानी' नावाचा जवळपास हीच कथा असलेला नवीन तमिळ चित्रपट बघितला. (फरक इतकाच, की त्यात तो नायकही तिच्यावर प्रेम करत असतो म्हणून त्यालाही मारलेलं दाखवलं आहे आणि त्या स्त्रिचा मुलगा आपल्या आईसाठी देऊळ बांधतो असा सुखद शेवट आहे.) आणि आज हा लेख... काय योगायोग आहे! अशा घटना अजूनही आपल्या देशाच्या कानाकोपर्‍यात घडत आहेत. केवढे दूर्दैव! Sad

सानी ..durdaivach. hi ghatana ghadali tevha kittek diwas maz man udas hot. hach vichar karun aapan nemke kontya dishene jat aahot ..

सुन्न होत डोक जेव्हा अस काहि वाचण्यात येत..
देश नावाला स्वतंत्र झालाय्...माणुस / स्त्री अजुनही पारतंत्र्यात आहे..

बापरे ...सर्र्र्र्र्र्र्र्र्र्र काटा आला........ सत्य असेच असेल तर बाकिचे लोक काय करत आहेत ? जागे व्हायला च हवे एवाना सगळ्याना .......

डीडी.. प्राप्ती :- मनापासुन धन्यवाद Happy

शोनु-कुकु... सुहास्य .. नाहीच विश्वास बसत पण सत्य आहे आणि खुप वाईट आहे

Thnx Happy

Pages