ताण.. जब तक हैं जान ! (Jab Tak Hain Jaan - Movie Review)

Submitted by रसप on 14 November, 2012 - 01:13

मी शहाणा आहे, असं समजण्यात काही वावगं नाही. समोरचा मूर्ख आहे, असंही कधी कधी समजण्यात काही गैर नाही. पण मी(च) शहाणा(च) आहे आणि समोरचे सगळे(च) मूर्ख(च) आहेत, असा समज करून घेऊन जेव्हा एखादी निर्मिती केली जाते, तेव्हा तिला 'जब तक हैं जान' असं नाव दिलं जातं आणि तिच्या केंद्रस्थानी शाहरुख खान येतो.. तो दाढीचे ओंगळवाणे खुंट वाढवून फिरणारा आर्मी मेजर असतो.. तो आणि त्याचे सहकारी सैनिक, सैनिकाची पहिली ओळख - त्याची केशरचना - सुद्धा पाळत नसतात.. ह्या टीमचं काम फक्त बॉम्ब डिफ्युज करणं असतं आणि रोज त्यांना एक तरी बॉम्ब उदरनिर्वाहाकरता मिळतच असतो.. वगैरे, वगैरे..
मग अश्या निर्मितीसाठी काम करता करता ए. आर. रहमानसुद्धा साजिद-वाजीद भासतो, गुलजारचे शब्द एक तर कळतच नाहीत अन कळले तर ते समीर-छाप वाटतात आणि हिंदी सिनेजगताला वेगवेगळ्या उंचीवर नेणारे यश चोप्रांसारखे दिग्गज दिग्दर्शक स्वत:च्या शेवटच्या चित्रपटात सपशेल जमिनीवर आपटतात.

सिनेमाची सुरुवात होते 'लेह'च्या एका मार्केटमध्ये. तिथे एक 'बॉम्ब' सापडला असतो. एक जण त्याला निकामी करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते त्याला जमणार नसतंच. कारण हिरोची एन्ट्री करवायची असते. इन कम्स मेजर 'समर आनंद' (शाहरुख), त्याने आजपर्यंत ९७ बॉम्ब्स निकामी केले असतात. तो येतो आणि भाजी निवडल्यासारखा तारा वेचून, तोडून, उपटून बॉम्ब निकामी करतो आणि समस्त शाहरुख भक्त बोंब मारतात! हा राउडी मेजर बॉम्ब प्रोटेक्शन सूट न घालता ह्या करामती करत असतो, हे विशेष. (आर्मीवाले असं कसं काय करू देतात ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.) तर बॉम्ब निकामी केल्यावर तो नेहमी कुठल्याश्या शांत जागी जाऊन बसत असतो. तसा तो एका तळ्याकाठी बसलेला असताना तिथे येते 'अकीरा' (अनुष्का शर्मा). ती सगळे कपडे काढते, थंडगार पाण्यात उडी मारते आणि बुडते. अर्थातच हिरो तिला वाचवतो आणि स्वत:चं जाकीट तिला देतो. त्या जाकीटात त्याच्या आयुष्याची कहाणी सांगणारी डायरी असते.
कट. फ्लॅशबॅक सुरू..
समर आनंद लंडनमध्ये रस्त्यावर गाणी गाऊन पैसे कमावणारा, हातगाड्या ढकलून माल पोचवणारा, हॉटेलात वेटरचे काम करणारा एक दरिद्री तरूण(??) असतो. तिथे त्याची ओळख एका गडगंज श्रीमंत बापाच्या (अनुपम खेर) एकुलत्या एक मुलीशी - मीरा थापर (कतरिना) - होते. तिचं लग्न ठरलेलं असतं. पण ती व तो प्रेमात पडतात. स्वत:वर बंधन लादून घेण्यासाठी हे दोघं हिंदू, मंदिरात न जाता चर्चमध्ये जाऊन एकमेकांपासून 'सुरक्षित अंतर ठेवा'वाली शप्पथ घेतात. (चर्चमध्ये का? असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.)
लेकीन इश्क़ रोके रूकता नहीं! ते जवळ येतात.. झोंबाझोंबी करतात.. आणि मग समरचा अपघात होतो. तो मृत्यूच्या जबड्यातून परत येतो. इथे मीराला समजून येतं की तिने तिची येशूसमोर घेतलेली शप्पथ तोडल्याची ही शिक्षा आहे. म्हणून ती समर जिवंत राहावा म्हणून नातं तोडते आणि त्याला लंडन सोडून जायला सांगते. (लॉल!!) २२ व्या शतकात हे समजून घेणे म्हणजे आपल्या मूर्खपणाचा कळस असतो. तरी आपण समजून घेतो कारण आपण खरोखरच मूर्ख आहोत.
बास्स... मीराच्या अंधश्रद्धेला देवाचा चॅलेंज समजून 'रोज मौत से खेलूंगा.. या तो तुम्हे मुझे मारना होगा या उसके (मीरा के) विश्वास को हराना होगा..' असली पोरकटशिरोमणी शप्पथ घेऊन समर वयाच्या २८ व्या वर्षी भारतात परततो. इथे भारतीय सैन्य दलाने त्याच्यासाठी रेड कार्पेटच अंथरलेलं असतं. त्यामुळे तो थेट सैन्यात दाखलही होतो.... मेजरही बनतो आणि 'बॉम्ब स्क्वाड'चा प्रमुखही! (कैच्याकै ! असं कसं शक्य आहे ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. का. आ. मू. आ.)
हे सगळं फ्लॅशबॅकमध्ये चालू आहे... विसरलात ना की 'अकीरा' त्याची डायरी वाचतेय ? असंच दिग्दर्शकाचंही होतं. डायरी संपेपर्यंत त्याला आठवतच नाही की हा फ्लॅशबॅक आहे. असो.

अशी सगळी कहाणी वाचणारी अकीरा डिस्कव्हरी वाहिनीत किरकोळ नोकरीला असते. तिचं एक स्वप्न असतं की एक आर्मी, युद्ध, बॉम्ब्स इ. वर डॉक्युमेंटरी बनवायची. ती त्यासाठी मान्यता मिळवते आणि थेट 'बॉम्ब स्क्वाड' सोबत कॅमेरा घेऊन दाखल ! प्रोफेशनल व्हिडिओ कॅमेरा असतानाही ती एका फुटावरून बॉम्ब निकामी करणाऱ्या समरला चित्रित वगैरे करते, तेव्हा मात्र तीसुद्धा आपल्यासारखीच मूर्ख आहे का? अशी शंका येते. आपण कितीही बिनडोक असलो तरी आपल्याला आधीच कळलेलं की आता ही बया ह्या गालावर निवडुंग आणि डोक्यावर खुरटी झुडपं घेऊन फिरणाऱ्या मेजरच्या प्रेमात डुबकी मारणार आहे, मारतेच. पण तमाशा इथे संपत नाही. अकीरा समरवरच डॉक्युमेंटरी बनवते - 'A man who can not die! ती डिस्कव्हरीवाल्यांना आवडते.. ते रडतात ! आणि ते समरला लंडनला घेऊन ये, असं तिला सांगतात. १० वर्षांपूर्वी मीराला वचन दिलेलं असतानाही, ते तोडून समर अकीरासाठी परत लंडनला येतो. पुन्हा त्याचा अपघात होतो आणि तो ही मधली १० वर्षं पूर्णपणे विसरून आयुष्यात रिवाइंड होतो. (हे शक्य आहे, का. आ. मू. आ.) मग त्याला 'नॉर्मल' करण्यासाठी त्याची डॉक्टर, अकीरा, मीरा आणि त्याचा लंडनमधला एक लाहोरी मित्र असे सगळे मिळून नाटक करतात. भरपूर मेलोड्रामा आणि शाहरुखगिरी झाल्यावर शेवटी 'जान छुट'ते आणि सिनेमा संपतो.

त्याची स्मृती परत आणण्यासाठी त्याच्यावर बनवलेली डॉक्युमेंटरी त्याला दाखवावी, इतकी साधी गोष्ट कुणाच्याही डोक्यात येत नाही, पण ते आपण समजून घ्यायचं. का. आ. मू. आ.

वाईट वाटतं पण बोलायला लागतंय की, यश चोप्रांनी त्यांचं सगळ्यात फालतू काम सगळ्यात शेवटच्या सिनेमात केलं आहे.

jt382.jpg

आदित्य चोप्राची पटकथा व कथा, त्याने शाळेत लिहिली असावी.
गुलजार साहेब आणि रहमानने ह्या सिनेमातील सर्वच्या सर्व गाणी ताबडतोब 'हक्कसोड पत्रा'वर सही करून विमुक्त करावीत.
शाहरुख खान जितक्या लौकर स्वत:च्या प्रेमातून बाहेर पडेल तितकं त्याच्या भक्तांचं भलं होईल.
कतरिनाकडून अभिनयाची अपेक्षा करणे फोलच.
अनुष्का शर्मा लक्षात राहाते.
छायाचित्रण नेत्रसुखद आहे.

रा-वन पाहिल्यानंतर जर आपल्याला असं वाटलं असेल की ह्याहून वाईट शाहरुखपट असणार नाही, तर आपलं चुकलंच.. कारण..........?
का. आ. मू. आ. !!

रेटिंग - *
http://www.ranjeetparadkar.com/2012/11/jab-tak-hain-jaan-movie-review.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बीलिव्ह इट ऑर नॉट... लोकाग्रहास्तव मला हे परीक्षण इंग्रजीत भाषांतरीत करावे लागले आहे ! इथे इंग्रजीवालं देणं बरोबर वाटत नाही. पण हे लिहिलं कारण मा.बो.मुळेच अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला आहे!

धन्यवाद मंडळी!!

पिक्चर ला १ स्टार, त्याच पिक्चरच्या परिक्षणाला ५ स्टार.
रसप, तुम्हाला शाहरुखचे आणी यश चोप्रांचे आभार मानायला पाहिजेत असा पिक्चर काढल्याबद्दल! Wink

रसप,

तसंही दिग्दर्शकाने गृहीत धरलेलं हिंदी सिनेमाच्या प्रेक्षकांचं सरासरी मानसिक वय १२ वर्षे आहे. त्यावरही हा सिनेमा कडी करतो. ही एखादी परीकथा म्हणून शोभून दिसेल. वय वर्षे ८ साठी ठीकाय. Lol

मला वाटतं की परिनिरीक्षण मंडळाचं (सेन्सॉर बोर्ड) मानसिक वयाचंही प्रमाणपत्र सक्तीचं करायला हवं! चित्रचकतीवर (डीव्हीडी) युरोप, अमेरिकेत छापतात तसा १२ किंवा ८ असा आकडा गोलात छापलेला दिसायला हवा. सोबत वैधानिक सूचना की "मानसिक वय यापेक्षा जास्त ठेऊन पाहिलात तर पैसे परत मिळणार नाहीत"! Biggrin

आ.न.,
-गा.पै.

अम्रिकेत तिकिटबारीवर पण तूफान चाललाय>> हो बहुतेक..
हे परिक्षण वाचुनही चित्रपटगृहात हा सिनेमा पहावा लागला. चित्रपटगृहात चित्र वेगळे होते. पब्लिक तुफान हसत होते, अधुन मधुन टाळ्या वाजवल्या आणि एकंदर त्यांना चित्रपट आवडलेला दिसत होता. बहुतेक मंडळी पंजाबी वाटत होती.

आत्ता माझ्याच एका मित्राच्या फेबु अकाउंट वर ही पोस्ट दिसली - त्याला कोणीतरी पाठवलेली. तेथे ही लिन्क देऊन आलो आहे.

Kiran, खरं आहे, शेवट आधीच कळला तर Talaash पाहण्यात काही point नाही.
मी पाहिला म्हणून सांगतीये.

असे ही पाहण्यात काहीच अर्थ नाही ........त्यापेक्षा कौतुक विशाल आणि कचा यांच्या कथा वाचा ....त्या कित्येक पटीने चांगल्या आहेत.. Lol

चला आज शुक्रवार होता....... उद्या सकाळीच रसपचा "तलाश"चा रिव्ह्यू येईल ताजाताजा... >>

धन्यवाद भ्रमरा!!
पोस्टला आहे ! Wink

मजा! रसप, हे परीक्षण असेच्या असे शारुकला द्यावेसे वाटते! फिल्मी अत्याचार कमी होतील अशा अपेक्षेने Happy आम्हाला ह्या ताणातून मुक्त केल्याबद्दल धन्यवाद!

काल सोनीवर लागला होता. पाहण्याचा निष्फळ प्रयत्न केला. अंतापर्यंत काही बघवला नाही. त्यामुळे सिनेमाचा शेवट सांगा मला कुणितरी.. Uhoh

सिनेमाचा शेवट असा आहे की........... तिच्या मायला कुणीही मरत नाही!! साले सगळे जिवंत राहातात.. !!

काल हा विनोदी सिनेमा बघायचा होता पण better half ला IPL बघण्यात जास्त रस होता. अर्थात काही बिघडले नाही म्हणा Proud

एकच दु:ख शेवटी match ही हरलो Sad

सिनेमाचा शेवट असा आहे की........... तिच्या मायला कुणीही मरत नाही!! साले सगळे जिवंत राहातात.. !!>>>>>>>> Lol

काल टीव्हीवर पाहिला. अचाट, अतर्क्य, कै च्या कै सिनेमा ...
कतरिना सिनेमाभर निव्वळ दगड चेहरा घेऊन वावरते. डिस्गस्टिंग!! पापण्यांची फडफड आणि लांबडा चेहरा म्हणजे अभिनय असा तिचा गैरसमज झाला असावा. अनुष्का त्या मानानं फ्रेश वाटते.
पण ओव्हरऑल सिनेमा भयंकर !!!

लग्न करायचा सीन होता म्हणे सिनेमात, पण मंगलाष्टकं म्हणता म्हणताच यशजींना डास चावला.......!!
त्यामुळे, ते दाखवलंच नाहीये!!

माझा अंदाज असा आहे की, अनुष्का त्याला लग्नाला होकार देते. (आणि इच्छा अशी की, नंतर टांग देते !! Wink )

Pages