अखेरचा जय महाराष्ट्र

Submitted by गामा_पैलवान on 20 November, 2012 - 05:39

सण होता बळीपाडवा ॥ संगे दिवाळीचा गोडवा ॥ तव वार्तासंचार कडवा ॥ कानी आला अकस्मात ॥०१॥
घास अडके घशात ॥ चित्त न रमे कशात ॥ बाळासाहेबांचे मिषात ॥ भिरभिरी फिरे ॥०२॥
काटूनी लांबशी सडक ॥ गाठले 'मातोश्री' तडक ॥ जाळीतसे दाह कडक ॥ वाघक्षेम चिंतेचा ॥०३॥
भीष्म पडे शरपंजी ॥ की रामराजाची चंजी(*१) ॥ मांडली झगडाझुंजी ॥ साक्षात मृत्यूशी ॥०४॥
जीव होई इवलासा ॥ जरी ऐकुनी खुलासा ॥ दिलास लाभे दिलासा ॥ कसाबसा थोडा ॥०५॥
भाऊबीजेचा पै दिन ॥ दीन मन राहे खिन्न ॥ बेचव लागे मिष्टान्न ॥ सकल बंधुरायां ॥०६॥
दुसरे दिनी उत्साहक ॥ बातमी आणती वाहक (*२) ॥ वाटले चिंतेत नाहक ॥ पडलो असो की ॥०७॥
परि वार्ता येई भयाण ॥ साहेब करिती प्रयाण ॥ सूर्यास लागले गिराण (*३) ॥ कायमचे बा ॥०८॥
मेरूदंड जो मर्‍हाष्टी ॥ दृढ नेता दूरदृष्टी ॥ कोट्यावधी होती कष्टी ॥ चिरवियोगे ॥०९॥
लेखणी आणि कुंचली ॥ अर्पिती मूक श्रद्धांजली ॥ म्हणती सदाची वंचली ॥ दिव्यसंगती ती ॥१०॥
पुढील दिन जो उजाडे ॥ उजाड होती चित्तकवाडे ॥ तिळतिळ काळीज तोडे ॥ आर्त अंत्यदर्शनीचे ॥११॥
विशाल जनधनाचा मेवा ॥ पाहोन कुबेर करी हेवा ॥ अमुच्या जिवाभावाचा ठेवा ॥ रथारूढ जाहला ॥१२॥
अखेरची यात्रा निघे ॥ हरेक शोकाकुले बघे ॥ कोण कैसा सावरून घे ॥ एकमेकांते ॥१३॥
सूर्य विस्मयाते हबके ॥ गती अकस्मात थबके ॥ व्याघ्रवदनाची रूपके ॥ स्ववर्णनाते योजी ॥१४॥
रथ मुक्कामी पोचता ॥ सुबक पाहिली चिता ॥ शव चितारूढ होता ॥ शोक अनावर होई ॥१५॥
संपता शासकीय वंदना ॥ सोडविले तिरंगा बंधना ॥ मग रचिले काष्ठचंदना ॥ ठायी ठायी त्या ॥१६॥
ज्वलकांडे होई सिद्ध ॥ उद्धव तो चित्तविद्ध ॥ ऐसा वाघ चिताबद्ध ॥ पाहवेना साहवेना ॥१७॥
उचंबळे शोकसिंधु ॥ पसरता अग्नीबिंदु ॥ अदृष्ट होता मुखेंदु ॥ अग्नीशलाकेत ॥१८॥
सांडूनी देह निष्प्राण ॥ देवीवाहने(*४) केले प्रयाण ॥ चढे सम्यक सोपान ॥ देवीचरणीचा ॥१९॥
हळवा झालो बाळापरि ॥ तो 'बाळ' वसे मनांतरी ॥ खूण पटताचि उभारी ॥ आली जगदंबकृपे ॥२०॥
जातस्य हि ध्रुवो मृत्यु ॥ हे इहलोकीचे सत्यु ॥ आवरले शोककृत्यु ॥ ऐशा सांत्वने ॥२१॥
धैर्यधरांचा जो शैलवान(*५) ॥ मल्लांचा गामा पैलवान ॥ शब्दरूपी सचैल स्नान ॥ भावे अर्पितो तया ॥२२॥

--------------------------------------------
*१. रामराजाची चंजी : राजाराम महाराज चंजी (जिंजी) येथे अडकले होते तशी लढाई.
*२. वाहक : समाचार वाहिन्या
*३. गिराण : ग्रहण
*४. देवीवाहन : वाघ
*५. शैलवान : हिमालय
--------------------------------------------

वाचकहो, एका सामान्य शिवसैनिकाने अनुभवलेला शोकप्रसंग मनात कल्पून मांडला आहे. चुकलेमाकले असले तर कृपया उदार मनाने क्षमा करावी! अंतरीचा भाव आपल्या चरणी ठेवला आहे.

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

_/\_

योग Happy
गामा पैलवान, चांगला प्रयत्न.
थोडं वृत्तात बसवलं तर छान काव्य तयार होईल.
उदा.
धैर्यधरांचा जो शैलवान(*५) ॥ मल्लांचा गामा पैलवान ॥ शब्दरूपी सचैल स्नान ॥ भावे अर्पितो तया ॥२२॥
हे
धैर्यधरां शैलवान, मल्लां गामा पैलवान, शब्दांनी सचैल स्नान , भावे अर्पितो तयासी

असे केल्यास काव्य वाचनिय, श्रवणीयही होईल.
अर्थात तुमच्या भावना काव्यसंस्करणापेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत ही जाणीव आहेच.

@साती,
जैसें पुस्पामाजीं पुस्प मोगरी | परिमळामाजीं कस्तुरी | तैसी भासांमाजीं साजिरी| मर्‍हाटी पैं ||
अशा अनेक आद्यमराठी ओंव्यांमध्ये जरी माजीं(मध्ये) या प्रत्ययाने सप्तमी विभक्ती योजली असली आणि आपण 'आं' या सप्तमीच्या प्रत्ययाद्वारे तशीच व्याकरणशुद्ध योजना सुचवीत असलां, तरी सध्याच्या मराठीत चतुर्थीच प्रचलित आहे. उदा.महाराष्ट्राचा ढाण्या वाघ, अंधेरीचा राजा, फळांचा राजा इ. तसेही ओंवी या छंदाला अक्षर,गण,वृत्ताचे फारसे बंधन नसते.
शब्दरूपी च्या ऐवजी शब्दांनी म्हटल्याने अलंकार बदलतो,अर्थाचा रोखही किंचित बदलतो.

सर्व प्रतिसादकांचे मन:पूर्वक आभार!

------------------------------------------------------------------------------------------
हीरा,
>> दासबोधातलाच एखादा समास वाचतो आहोत की काय असा भास झाला.

अशी तुलना खरंतर ज्ञानोबा माउलींची कृपा आणि बाळासाहेबांची दानत यामुळेच होऊ शकते!
------------------------------------------------------------------------------------------
साती,
>> धैर्यधरां शैलवान, मल्लां गामा पैलवान, शब्दांनी सचैल स्नान , भावे अर्पितो तयासी

आपली सूचना अगदी समर्पक आहे. तसा प्रयत्नही केला होता. पण ओवी नि:श्वास टाकल्याविना गुणगुणता येईना. म्हणून वृत्तभंग करावा लागला. मला वाटतं की ओवी हा प्रकार वृत्तात बसवला नाही तरी चालू शकतो. मात्र सहजपणे तोंडी बसावी अशी रचना असावी. हे माझं वैयक्तिक मत.
------------------------------------------------------------------------------------------
फारएण्ड, अगो, आबासाहेब., टुनटुन,
थोडे बदल करून सामनाला पाठवली आहे. बघूया छापतात का ते. आपल्या सूचनेबद्दल आभार!
------------------------------------------------------------------------------------------
मुक्तेश्वर कुळकर्णी,
>> फक्त सचौल स्नान अर्पितो ऐवजी घालीतो तया योग्य वाटेल.

चाकण, खेड, आळंदी भागात सत्पुरुषांना आंघोळ घालण्याची सेवा मानली जाते. (भारतात इतरत्रही असू शकेल.) त्यामुळे स्नान हे अर्पण केलेलं चालू शकेलसं दिसतं. तसंच शब्दरूपी स्नान असल्याने घालण्याऐवजी अर्पिणे योग्य वाटतं.

आपल्या शंकेबद्दल धन्यवाद!
------------------------------------------------------------------------------------------

आ.न.,
-गा.पै.

गा.पै . तुमचे काव्यलेखन कधी पाहिल्याचे स्मरत नाही पण आता जणू एक दिव्य साक्षात्कार झाला आहे असे वाट्ते आहे
प्रस्तुत रचना अद्वितीय आहे
माऊलीन्ची कृपा ह्या कवितेत ठाई-ठाई जाणवली कविता लिहीत रहा ही विनन्ती

धन्यवाद

Pages