ताण.. जब तक हैं जान ! (Jab Tak Hain Jaan - Movie Review)

Submitted by रसप on 14 November, 2012 - 01:13

मी शहाणा आहे, असं समजण्यात काही वावगं नाही. समोरचा मूर्ख आहे, असंही कधी कधी समजण्यात काही गैर नाही. पण मी(च) शहाणा(च) आहे आणि समोरचे सगळे(च) मूर्ख(च) आहेत, असा समज करून घेऊन जेव्हा एखादी निर्मिती केली जाते, तेव्हा तिला 'जब तक हैं जान' असं नाव दिलं जातं आणि तिच्या केंद्रस्थानी शाहरुख खान येतो.. तो दाढीचे ओंगळवाणे खुंट वाढवून फिरणारा आर्मी मेजर असतो.. तो आणि त्याचे सहकारी सैनिक, सैनिकाची पहिली ओळख - त्याची केशरचना - सुद्धा पाळत नसतात.. ह्या टीमचं काम फक्त बॉम्ब डिफ्युज करणं असतं आणि रोज त्यांना एक तरी बॉम्ब उदरनिर्वाहाकरता मिळतच असतो.. वगैरे, वगैरे..
मग अश्या निर्मितीसाठी काम करता करता ए. आर. रहमानसुद्धा साजिद-वाजीद भासतो, गुलजारचे शब्द एक तर कळतच नाहीत अन कळले तर ते समीर-छाप वाटतात आणि हिंदी सिनेजगताला वेगवेगळ्या उंचीवर नेणारे यश चोप्रांसारखे दिग्गज दिग्दर्शक स्वत:च्या शेवटच्या चित्रपटात सपशेल जमिनीवर आपटतात.

सिनेमाची सुरुवात होते 'लेह'च्या एका मार्केटमध्ये. तिथे एक 'बॉम्ब' सापडला असतो. एक जण त्याला निकामी करण्याचा प्रयत्न करत असतो, पण ते त्याला जमणार नसतंच. कारण हिरोची एन्ट्री करवायची असते. इन कम्स मेजर 'समर आनंद' (शाहरुख), त्याने आजपर्यंत ९७ बॉम्ब्स निकामी केले असतात. तो येतो आणि भाजी निवडल्यासारखा तारा वेचून, तोडून, उपटून बॉम्ब निकामी करतो आणि समस्त शाहरुख भक्त बोंब मारतात! हा राउडी मेजर बॉम्ब प्रोटेक्शन सूट न घालता ह्या करामती करत असतो, हे विशेष. (आर्मीवाले असं कसं काय करू देतात ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.) तर बॉम्ब निकामी केल्यावर तो नेहमी कुठल्याश्या शांत जागी जाऊन बसत असतो. तसा तो एका तळ्याकाठी बसलेला असताना तिथे येते 'अकीरा' (अनुष्का शर्मा). ती सगळे कपडे काढते, थंडगार पाण्यात उडी मारते आणि बुडते. अर्थातच हिरो तिला वाचवतो आणि स्वत:चं जाकीट तिला देतो. त्या जाकीटात त्याच्या आयुष्याची कहाणी सांगणारी डायरी असते.
कट. फ्लॅशबॅक सुरू..
समर आनंद लंडनमध्ये रस्त्यावर गाणी गाऊन पैसे कमावणारा, हातगाड्या ढकलून माल पोचवणारा, हॉटेलात वेटरचे काम करणारा एक दरिद्री तरूण(??) असतो. तिथे त्याची ओळख एका गडगंज श्रीमंत बापाच्या (अनुपम खेर) एकुलत्या एक मुलीशी - मीरा थापर (कतरिना) - होते. तिचं लग्न ठरलेलं असतं. पण ती व तो प्रेमात पडतात. स्वत:वर बंधन लादून घेण्यासाठी हे दोघं हिंदू, मंदिरात न जाता चर्चमध्ये जाऊन एकमेकांपासून 'सुरक्षित अंतर ठेवा'वाली शप्पथ घेतात. (चर्चमध्ये का? असे प्रश्न विचारायचे नाहीत. कारण आपण मूर्ख आहोत.)
लेकीन इश्क़ रोके रूकता नहीं! ते जवळ येतात.. झोंबाझोंबी करतात.. आणि मग समरचा अपघात होतो. तो मृत्यूच्या जबड्यातून परत येतो. इथे मीराला समजून येतं की तिने तिची येशूसमोर घेतलेली शप्पथ तोडल्याची ही शिक्षा आहे. म्हणून ती समर जिवंत राहावा म्हणून नातं तोडते आणि त्याला लंडन सोडून जायला सांगते. (लॉल!!) २२ व्या शतकात हे समजून घेणे म्हणजे आपल्या मूर्खपणाचा कळस असतो. तरी आपण समजून घेतो कारण आपण खरोखरच मूर्ख आहोत.
बास्स... मीराच्या अंधश्रद्धेला देवाचा चॅलेंज समजून 'रोज मौत से खेलूंगा.. या तो तुम्हे मुझे मारना होगा या उसके (मीरा के) विश्वास को हराना होगा..' असली पोरकटशिरोमणी शप्पथ घेऊन समर वयाच्या २८ व्या वर्षी भारतात परततो. इथे भारतीय सैन्य दलाने त्याच्यासाठी रेड कार्पेटच अंथरलेलं असतं. त्यामुळे तो थेट सैन्यात दाखलही होतो.... मेजरही बनतो आणि 'बॉम्ब स्क्वाड'चा प्रमुखही! (कैच्याकै ! असं कसं शक्य आहे ? - असे प्रश्न विचारायचे नाहीत. का. आ. मू. आ.)
हे सगळं फ्लॅशबॅकमध्ये चालू आहे... विसरलात ना की 'अकीरा' त्याची डायरी वाचतेय ? असंच दिग्दर्शकाचंही होतं. डायरी संपेपर्यंत त्याला आठवतच नाही की हा फ्लॅशबॅक आहे. असो.

अशी सगळी कहाणी वाचणारी अकीरा डिस्कव्हरी वाहिनीत किरकोळ नोकरीला असते. तिचं एक स्वप्न असतं की एक आर्मी, युद्ध, बॉम्ब्स इ. वर डॉक्युमेंटरी बनवायची. ती त्यासाठी मान्यता मिळवते आणि थेट 'बॉम्ब स्क्वाड' सोबत कॅमेरा घेऊन दाखल ! प्रोफेशनल व्हिडिओ कॅमेरा असतानाही ती एका फुटावरून बॉम्ब निकामी करणाऱ्या समरला चित्रित वगैरे करते, तेव्हा मात्र तीसुद्धा आपल्यासारखीच मूर्ख आहे का? अशी शंका येते. आपण कितीही बिनडोक असलो तरी आपल्याला आधीच कळलेलं की आता ही बया ह्या गालावर निवडुंग आणि डोक्यावर खुरटी झुडपं घेऊन फिरणाऱ्या मेजरच्या प्रेमात डुबकी मारणार आहे, मारतेच. पण तमाशा इथे संपत नाही. अकीरा समरवरच डॉक्युमेंटरी बनवते - 'A man who can not die! ती डिस्कव्हरीवाल्यांना आवडते.. ते रडतात ! आणि ते समरला लंडनला घेऊन ये, असं तिला सांगतात. १० वर्षांपूर्वी मीराला वचन दिलेलं असतानाही, ते तोडून समर अकीरासाठी परत लंडनला येतो. पुन्हा त्याचा अपघात होतो आणि तो ही मधली १० वर्षं पूर्णपणे विसरून आयुष्यात रिवाइंड होतो. (हे शक्य आहे, का. आ. मू. आ.) मग त्याला 'नॉर्मल' करण्यासाठी त्याची डॉक्टर, अकीरा, मीरा आणि त्याचा लंडनमधला एक लाहोरी मित्र असे सगळे मिळून नाटक करतात. भरपूर मेलोड्रामा आणि शाहरुखगिरी झाल्यावर शेवटी 'जान छुट'ते आणि सिनेमा संपतो.

त्याची स्मृती परत आणण्यासाठी त्याच्यावर बनवलेली डॉक्युमेंटरी त्याला दाखवावी, इतकी साधी गोष्ट कुणाच्याही डोक्यात येत नाही, पण ते आपण समजून घ्यायचं. का. आ. मू. आ.

वाईट वाटतं पण बोलायला लागतंय की, यश चोप्रांनी त्यांचं सगळ्यात फालतू काम सगळ्यात शेवटच्या सिनेमात केलं आहे.

jt382.jpg

आदित्य चोप्राची पटकथा व कथा, त्याने शाळेत लिहिली असावी.
गुलजार साहेब आणि रहमानने ह्या सिनेमातील सर्वच्या सर्व गाणी ताबडतोब 'हक्कसोड पत्रा'वर सही करून विमुक्त करावीत.
शाहरुख खान जितक्या लौकर स्वत:च्या प्रेमातून बाहेर पडेल तितकं त्याच्या भक्तांचं भलं होईल.
कतरिनाकडून अभिनयाची अपेक्षा करणे फोलच.
अनुष्का शर्मा लक्षात राहाते.
छायाचित्रण नेत्रसुखद आहे.

रा-वन पाहिल्यानंतर जर आपल्याला असं वाटलं असेल की ह्याहून वाईट शाहरुखपट असणार नाही, तर आपलं चुकलंच.. कारण..........?
का. आ. मू. आ. !!

रेटिंग - *
http://www.ranjeetparadkar.com/2012/11/jab-tak-hain-jaan-movie-review.html

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

अरेरे मी नवरयाच्या मागे लागले होते की मला हा मूव्ही बघायचा आहे, त्याच्या कडून प्रॉमिस सुद्धा घेतल आहे की या विकांताला जायचे, आता विचार करतेय जाऊ का Uhoh

वरच्या पोष्टरवरची अनुष्का काठी आणि घोंगडं घेऊद्या की रं टाईप दिसते.
>> हजारदा अनुमोदन. श्री तुला कुठं ठेवू, आणि कुठं नको झालंय मला Lol

असो... हे कल्की कोण? Uhoh

हल्ली फक्त चेहर्‍यातच सौंदर्य नसते (किम्बहुना नसले तरी चालते )ही कल्पना रूढ झाली आहे ना..!पाश्चात्यांचे अंधनुकरण दुस्रे कय?

"लोकांना वाचताना मजा येईल असं परीक्षण लिहिता यावं, केवळ यासाठी चित्रपट पाहता का?" <<<
समजा लिहिलं तसं तर मयेकर तुम्हाला का दुखलं?
रसप ने लिहिलं, लोक हसले.. दोन घटका करमणूक झाली की.
अ आणि अ चित्रपटांचे धागे वाचा जाऊन जुन्या माबोवरचे.
फारएण्ड आणि श्र जे लिहायचे ते वाचून गचाळ सिनेमा पाह्यल्याच्या पापातून मुक्ती मिळायची.. हे तसेच आहे की Happy

मला शाहरुख आवडत नाही... दोन सुंदरी मधे तो अतिशय गरीब ,म्हातारा दिसतो आहे...
केबल वर लागला तरच पाहिन... थिएटर मधे तर अजिबात नाही...
बाकी सकाळ ने एक-दोन प्रेमाचे प्रसंग चांगले आहेत अस परिक्षणात लिहल आहे.... आनि मी (न पाहता) ह्याच क्रेडीट शाहरुख ला देईन... तेवढ तो नक्कीच चांगल करु शकतो Happy

यश चोप्रा चा चित्रपट आहे म्हणुन नवरा म्हणत होता जाउया म्हणुन. पण एकंदर प्रोमोज् बघुन मलाच जायची इच्छा नव्हती. बरे पैसे वाचले.
अति प्रेम, अति इमोशनल ड्रामा, अति ओवरअ‍ॅक्टींग बघवत नाही आताशा.

अर्रे, कल्की चा हा अवतार हल्ली हल्ली तिने ते नोज जॉब आणि लिप जॉब केल्या नंतरचा आहे वाटते. तिचे अगदी सुरुवातीचे मूव्हीज पाहिलेत का? 'अ गर्ल इन यलो बूट' मध्ये कमालीची नाजुक छान दिसलीये. खरोखरीची टीनएजर होती बहुदा तेव्हा. आता शांघाय मध्ये फार भयानक दिसलीये हे मात्र खरे!

अरे देवा, दक्षे तु कुठल्याही पेपराचा पेज ३ वाचतच नाहीस का गं??

कल्कीचे आईबाबा फ्रेंच आहेत, भारतात पाँडिचेरीला स्थाईक झालेले आहेत, त्यामुळे कल्की फ्रेंच वंशाची भारतीय आहे. शैतान नावाचा एक चित्रपट आलेला तिचा, ती शाळकरी मुलगी आहे त्यात आणि खरेच शाळकरी वाटते ती. पण ती वयाने तेवढी लहान नाहीय. तिशी जवळ आलीय Happy

शांघाय मध्ये भुमिकेची गरज म्हणुन तीला कुरुप केलेले असे मी कुठेतरी वाचलेले. शांघाय बघितला नाही त्यामुळे नक्की किती आणि कसे कुरुप केलेय ते माहित नाही. तिचे दात थोडे पुढे आहेत पण एकुण दिसायला गोड दिसते.

खरे आहे विषयांतर पण इथे सलमानचे चाहते आहेत म्हणुन लिहिते. गेल्या आठवड्यात रजत शर्माच्या आपकी अदालत मध्ये सलमान आलेला. मस्त उत्तरे दिली. शाहरुख पासुन ऐश्वर्यापर्यंत सगळ्यांबद्दल बोलला. शाहरुख आणि त्याच्या दुश्मनीबद्दलही दिलखुलासपणे बोलला. काही लोक इतरांबद्दल बोलताना मुद्दाम शालजोडीतले ठेऊन देतात तसे अजिबात केले नाही. मस्त मजा आली त्याला पाहायला.

शैतान नावाचा एक चित्रपट आलेला तिचा, ती शाळकरी मुलगी आहे त्यात आणि खरेच शाळकरी वाटते ती.>>>>>>>>>>>>>>>>> Uhoh की देव - डी. त्यामधे ती शाळकरी मुलगी दाखवली आहे ना.....

देव - डी. त्यामधे ती शाळकरी मुलगी दाखवली आहे ना.....
>>>
नाय वो! त्यात ती भलतीच दाखवली आहे Wink

शैतानच बरोबर असावे. 'अ गर्ल इन यलो बूट' मध्ये ही शाळकरी मुलगीच असते सुरुवातीला. मग ती इंडीयात येऊन काहीतरी 'वेगळे'च करत असते.

सस्मित आणी इतर अनुमोदक धन्यवाद. खरे तर शाहरुख विषयी इतकी नाराजी आधी नव्हती, जी आता निर्माण झालीय. कष्टाने असेल पण मिळालेले यश आणी प्रचंड पैसा याची हवा त्याच्या डोक्यात आणी नसानसात जी भिनलीय, ती आता जाहीरपणे दिसते. स्वतला श्रेष्ठ आणी इतराना तो कायम तुच्छ समजतो हे अनेकवेळा दिसलेय. त्यात तो क्रिकेटचा किस्सा पण आहेच.

सुरुवातीला तर ऋतिक रोशनची सुद्धा त्याने बरीच हेटाळणी करण्याचा प्रयत्न केला होता. ( आठवा पेप्सीची जाहीरात). आणी सन ऑफ सरदार ज्या चित्रपट गृहात लागलाय, तिथेच मुद्दाम आपला जतहैजा लावण्याची दादागिरी.

सलमान आणी अमिरची जी सामाजीक बांधिलकी आहे, तशी शाहरुखची किती आहे हे कृपया शाहरुख पंख्यांनी इथे सांगावे ( माझा थोडा तरी गैरसमज दूर होईल, कारण एखादे वेळेस आपण दुसरी चांगली बाजू पण बघितलेली नसते. ). सिनेमात जर आपण प्रेमळ, न्यायी, धाडसी हिरोचे काम करतोय, तर मग प्रत्यक्ष आयुष्यात असे उर्मट आणी उद्धट आहोत हे पण शाहरुख ने मान्य करावे.

सलमानच्या काय चुका आहेत ते पण मला माहीत आहे आणी अमिरचे पण दुसरे लग्न जरा खटकलेच. पण तरीही हे दोघे त्यामानाने प्रचंड लोकप्रिय आहेत. सलमान ही काही कमी तापट नाहीये. पण शाहरुखला जर त्याच्यासमोर ठेवले तर लोक ( चित्रपट सोडुन) सलमानचेच पारडे जड ठेवतील.

आज आपण मराठी चित्रपट बघीतले तर श्वास ने जी नवी संजीवनी मराठी चित्रपट सृष्टीला दिली आणी जे नवीन उत्तम विषय हाताळले गेले ( उदा. देऊळ ) तसे हिंदीमध्ये फार कमी व्हायला लागलेय. तेच तेच अतिरेकी हल्ले, प्रेमप्रकरणे वगैरे. एखादाच बर्फीसारखा वेगळा विषय हाताळला जातो.

शाहरुख त्या राज आणी डरच्या भुमिकेतुन बाहेरच येत नाहीये. आपण अमिताभनंतर दुसरे किंवा आपण च बादशहा हा गोड गैरसमज त्याचा ज्यावेळी दूर होईल, तेव्हाच तो अमिताभ ( पा आणी इतर) अनुपम खेर (सारांश) नसिरुद्दीन शहा ( आक्रोश, स्पर्श ) कमल हसन ( पुष्पक आणी इतर बरेच ) अशा भूमिका करु शकेल.

सलमानच्या काय चुका आहेत ते पण मला माहीत आहे आणी अमिरचे पण दुसरे लग्न जरा खटकलेच. पण तरीही हे दोघे त्यामानाने प्रचंड लोकप्रिय आहेत. सलमान ही काही कमी तापट नाहीये. पण शाहरुखला जर त्याच्यासमोर ठेवले तर लोक ( चित्रपट सोडुन) सलमानचेच पारडे जड ठेवतील. >> हे मात्र अती होतय .
सलमान माणूस म्हणून शाहरूख पेक्षा चांगला Happy
शाहरूखने गाडीखाली माणस चिरडली नाहीत की अभयारण्यात जाऊन शिकार केली नाही .
आणी सलमानची प्रेम प्रकरणे वगैरे बद्द्ल तर न बोललेच बर , पण चित्रपट जगतात राहूनही आणी इतके यशस्वी असूनही शाहरूख सारखे इतर प्रकरणे न करणारे कमीच असतील ना ?

टुनटुन अगदीच सहमत.
फक्त सलमान आवडतो म्हनुन नक्कीच नाही. मला तर शाळेत असतांना शाहरुख खुप्पच आवडलेला. डीडीएल्जे पासुन. पण आता त्यच्या डोक्यात हवा गेलीये. इतरांना तुच्छ लेखणे, अपमानास्पद वागणे आहेच प्लस ते बादशा का किंग खान काय तरी आहेच स्वता:वर प्रेम करायला.
त्यापेक्षा सलमान त्याच्या खर्‍या आयुष्यात कसा आहे माहीत नाही तरी इतर जे सोशल प्रोग्राम्स, शोज् असतात त्यात मनापासुन वागतो, बोलतो आणि एक चांगला माणुस वाटत आलाय नेहमी. Happy

केदार, सलमान खानला वाईट म्हणून मग शाहरूखला चांगले म्हणण्याचा अट्टहास का? सलमान खानने बीइंग ह्युमन ही एन जीओ चालू केली आहे. त्याआधीपासून तो सीपीएएच्या माध्यमातून कॅन्सरग्रस्त रूग्णांसाठी काम करत होताच.

बाकी व्यक्तीगत आयुष्याचं काय असेल ते राहू दे. बॉक्स ऑफिस काय म्हणतोय? गेली कित्येक वर्षे सलमान खान हा अतिभरोशाचा स्टार ओळखला जातो. सिंगल स्क्रीनचा खर्‍या अर्थाने बादशाह आहे तो. निर्माते त्याला साईन करून निवांत अस्तात. त्याचे मागचे रीलीज झालेले सिनेमांचे कलेक्शन बघा. एकेकाळी हीच स्थिती शाहरूखची पण होती. सध्या मात्र शाहरूखचा सिनेमा कमी आणि प्रॉडक्ट प्लेसमेंट जास्त अशी अवस्था दिसतेय.

सलमान उत्तम अभिनेता आहे असा बिल्कुल दावा नाही. त्याच्यापेक्षा शाहरूख चांगला अभिनेता. पण शाहरूख खान गेल्या अनेक व॑र्षात जितके हिट्स देतोय तितकेच फ्लॉप्सदेखील. स्वतःच्या फ्लॉप सिनेमाला "परदेशात हिट" असे म्हणत गोंजारत फिरतोय. सिंगल स्क्रीनचा ऑडियन्स केव्हाच त्याच्या हातातून गेलाय. (हा ऑडियन्स जास्त महत्त्वाचा. पिक्चर आवडला तर तीन चार वेळेला जाऊन बघतात.)

अत्ताच आलेला एस.एम.एस

Dear SRK,

Tera woh bakwaas Romance karna....
Tera woh itna buddha hokar bhi kat ko kiss karna...
Woh tera boring acting karna...
Woh teri slow story ko badhana...
Woh tera 3 ghante mera time waste karna....
Nahi maaf karunga mai...
Jab Tak Hai Jaan....
Jab Tak Hai Jaan...
Jab Tak Hai Jaan...

सलमानने ज्या चूका केल्या आहेत, त्याबद्दल त्याला शिक्षा व्हायला पाहिजेच असे माझे ठाम मत आहे. ( राजकुमारच्या मुलाने पण हे उद्योग केले होते, त्याचे काय झाले कळले नाही.)

आपल्या देशातली व्यक्तीपूजा जरा कमी झाली तर देशालाही उत्तम शासक आणी पक्ष लाभेल असे माझे वै मत आहे.:फिदी:

अवांतरः राजकारणी भाषणाबद्दल सॉरी.:फिदी:

मी रॉमेन्टिक फिल्ल्मपेक्षा ढिश्शुम ढिश्शुम फिल्म बघण्याचेच चान्स असल्याने हा शिनेमा बघणारच नव्हतो.
येत्या तीन चार म्हैन्यात टिव्हीवर येइल तेव्हा बायको बघत असेल तर बघावा लागेल इतकच.

Pages