"तुझे देखाsssssss तो ये जाना सनम
प्यार होता है दिवाना सनम.......... तुझे देखा तो ये जाना सनम"
तरूण काळजाला हात घालणार्या या ओळी आजही जेंव्हा जेंव्हा कानावर पडतात, भर रस्त्यात चालतानाही हात पसरले जातात..... स्टिअरिंगवरचा हात सुटून दरवाज्याला लागेपर्यंत विस्तारत जातो....... आणि एका यःकश्चित देहाचा "राज" होतो...... बस्स.
शुभ्र पांढर्या पोषाखातल्या आपल्या प्रेयसीने सारे पाश तोडून धावत आपल्याकडे यावं, आपल्या बाहूत आश्वस्त होऊन विसावावं आणि मग लोकेशन कुठलंही असो, आपल्या आजुबाजुला फक्त आणि फक्त पिवळ्या फुलांची दाटी व्हावी........ झालंच तर एखादी जर्सी गाय कोपर्यात आपल्या गळ्यातली सूचक घंटा वाजवत रवंथ करत असावी...... अहाहा...!!!!!
१९९५ च्या मोसमात कॉलेजात पाऊल टकल्या टाकल्या पाहिलेला आणि अनुभवलेला "राज" आजही कुठेतरी दडून आहे माझ्यात. कधी उघडपणे कधी लपून छपून तो समोर येतोच. पण तो आहे हे नक्की.
मी इथे लिहितोय ते "राज" या व्यक्तिरेखेबद्दल.... शहारुखबद्दल नाहीच.
शहारुख आवडायला कारणीभूत खरं तर त्याचा अभिनय नाही तर ९४ मधला "कभी हां कभी ना" आणि ९५ चा "दिलवाले" यातल्या त्याच्या व्यक्तिरेखा सर्वस्वी जबाबदार असाव्यात.... आहेत. त्या व्यक्तिरेखांच्या प्रेमात पडल्याने कदाचित मग शहारुख कधी आवडू लागला ते लक्षातच आलं नाही.
यश चोप्रा प्रॉडक्शनने मध्यमवर्गीय लोकांच्या रोमांन्सच्या कल्पना खर्या अर्थाने ७० एमेम किंबहुना त्याहूनही लार्जर स्केलवर (काही इंग्लिश शब्दांना मराठी प्रतिशब्द असूच नयेत) नेऊन पोचवल्या. मल्टीस्टारर चित्रपटात सगळे सुपरस्टार नायक - नायिका एकत्र घेऊन थेट स्वित्झरलँडच्या स्वर्गात प्रेक्षकांना नेऊन बसवलं...... आणि मग त्या पार्श्वभूमीवर समोर दिसणारा रोमांन्स आपसूक हवाहवासा वाटायला लागला. चांदनी, लम्हे, विजय यासारखे सुमधूर संगीताने नटलेले आणि स्वर्गीय नेत्रसुख मिळवून देणारे चित्रपट प्रेक्षकांनी उचलून धरले. आणि मग ही लिस्ट अगदी १९९३ सालच्या "डर" पर्यंत येऊन पोचली.
तरीही कुठेतरी काहीतरी कमी होतं आणि ते पूर्ण करायला एक नव्या दमाचा दिग्दर्शक उगवला "आदित्य चोप्रा"............
आज आपल्या चोप्रा फॅक्टरीत लो बजेट फिल्म्स बनवून नव्या दिग्दर्शकांना संधी देऊन यशस्वी आर्थिक गणितं बसवण्यात जरी आदि चोप्रा बिझी असला तरी ,माझ्या मते तरी तो एक उत्तम कथा - पटकथाकार आहे. एखादी कथा टप्याटप्याने कशी सीन बाय सीन फुलवत न्यायची याची हातोटी त्याच्याकडे नक्कीच आहे, अगदी पहिल्या चित्रपटापासून.... एक निर्माता पेक्षा तो एक दिग्दर्शक पटकथाकार म्हणून मला जास्त आवडतो.
आमच्या ग्रूपमध्ये नेहमीच चित्रपटांची आपल्या "त्या" वयाला अनुसरून का होईना पण समिक्षा चालायची. पोस्टर्स बघून बघायचा की नाही ते ठरवलं जायचं...... किंवा मग ओळखीतून मिळणार्या आतल्या गोटातील बातम्यांतून ते आम्ही ठरवायचो. कधीकधी त्याकाळातही प्रिमिअर बघायला जायची संधी मिळायची.
१९९४ च्या "हम आपके है कौन" ने फॅमिली फंक्शनचे एवढे गोड डोस पाजले होते की त्याचा इफेक्ट १९९५ मध्येही तसाच होता. त्यात ग्रूपमध्ये आम्ही चार मित्र आणि सात मैत्रीणी. अश्या सोहळ्यांना एकत्रच फिरायचो. त्यामुळे मग कधी कधी अमकीची अमकी आणि तमकीचा तमका असं करत लवाजमा वाढतच जायचा. सलमान खान आणि माधुरीचा इतका उदो उदो चालायचा की त्यामुळेच मला दोघांबद्दलही तेंव्हापासूनच कंटाळा आला असावा.
आणि या सगळ्या पर्श्वभूमीवर अखेर "दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे" रिलीज झाला. त्याचं मेकिंग बघितलं होतं त्यामुळे हमखास हिट होणार ह्याबद्दल खात्री होतीच........ पोस्टर्सही भन्नाट होती. काय दृष्ट लागण्यासारखी जोडी होती "शहारुख- काजोल"ची.
चित्रपट सुरू होताच दिसणारी लँबॉर्गिनी...... नापास होणारा उमदा नायक...... त्याचं बक्षीस म्हणून त्याने "एक छोटीसी युरोप ट्रीप मागणं" आणि त्या बाप बेट्यातला संवाद....... मला आजही आठवतं, स्वप्नील पटकन म्हणाला होता...... "आयला हा अनुपम खेर तुझ्या बाबांसारखा आहे रे". आमच्या बाप बेट्यांच्या नात्याचं नेहमीच माझ्या मित्रांना अप्रूप होतं.... झालं, चित्रपट सुरू नाही झाला तर अनुपम खेर माझा बाप.. म्हणजे आपसूकच मी शहारूख....... पुढचा संपूर्ण चित्रपट मी पार भूमिकेत घुसूनच पाहिला होता. (आणि अजूनही त्यातून बाहेर पडलेलो नाही )
शहारुख काजोलचं समांतर चालणारी आयुष्यं अचानक एका रेल्वे स्थानकावर एकमेकांना छेदतात........ गाडी सुटते......... आणि अरे आता काजोलची ट्रीप चुकणार असं वाटत असतानाच, तुमच्या मनातला "राज" स्क्रीनवर थेट दरवाज्यातून हात बाहेर काढून काजोलला खूण करतो काय....... अलगद हात हातात घेतो काय... आणि प्रेमकथेला सुरुवात होते काय...... !!!
क्षणाक्षणाला पुढे सरकत जाणार्या चित्रपटामुळे आदित्य चोप्रावरचा विश्वास अधिक दृढ होत गेला.... दिग्दर्शक म्हणून तो प्रचंड आवडून गेला..... आणि काश...... हे सगळं आपल्या बाबतीत घडेल..... अरे युरोप नाही तर निदान मुंबई पुणे ट्रीप तरी असू दे नशीबात........ !
त्यानंतर आजपर्यंत केलेल्या प्रत्येक ट्रेनच्या प्रवासात डब्यात शिरताना गाडी सुटेपर्यंत दरवाज्यात रेंगाळणं आणि गाडी सुटता सुटता एखादी काजोल येतेय का म्हणून इकडेतिकडे कटाक्ष टाकणं माझ्यातल्या राजने सोडलेलं नाही..... कितीवेळा नेत्रावती एक्सप्रेस लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटताना "राज" होऊन दरवाज्यात उभा राहिलोय..... कधीही न फिरकलेल्या काजोलसाठी.
एका परिपूर्ण युरोप ट्रीपचा अनुभव देऊन चित्रपट त्यांच्या ताटातुटीकडे येऊन पोचतो........ "मै फिरसे ये ट्रेन छोडना नही चाहती" "और मै चाहता हूं की ये ट्रेन बार-बार छुटे" हा सीन, आणि काजोलने "तुम मेरी शादी मै आओगे ना" असं विचारल्यावर सूचकपणे "नही, मै नही आउंगा" ...... खूप वाईट वाटलं होतं....... इतका समरसून सहसा मी सिनेमा पाहात नाही........ पण "राज" कुठेतरी काळजात घुसलाच होता.
संपूर्ण मध्यंतरापर्यंत त्याने केलेलं हेल्दी फ्लर्टिंग (तेंव्हा ह्या संज्ञाही अजिबात कळत नव्हत्या म्हणा), प्रंसंगागणिक त्यांच्यात फुलत जाणारं नातं..... कधी फ्लर्ट, कधी जबाबदार, कधी भावूक अश्या सर्व छटा दाखवणारा "राज" आणि त्याला तोडीस तोड बॅलन्स्ड काजोल. व्हॉट अ ट्रीट यार.....!!!!!
दिलवाले येईपर्यंत फक्त आणि फक्त "शोले" हाच सिनेमाच्या सर्व बाबतीत परिपूर्ण उतरलेला चित्रपट आहे हे माझे पक्कं मत होतं.... त्यातल्या प्रत्येक व्यक्तिरेखेच्या आकंठ प्रेमात होतो मी.......
पण एक रोमँटिक कथानकात जे जे हवं ते सर्व पूर्णपणे भरलेलं असं कथानक आणि त्याला तोडीस तोड सर्व बाबी असा चित्रपट म्हणजे "दिलवाले"च...... जसे शोलेच्या कित्येक प्रसंगांच्या हुबेहूब कॉपीज किंवा त्यातली कॅरॅक्टर्स, त्यांचे डायलॉग्ज्स नंतरच्या कित्येक चित्रपटांवर प्रभाव दाखवून होते तसेच दिलवाले नंतर आलेल्या कित्येक रोमँटिक चित्रपटांवर दिलवालेचा निर्विवाद प्रभाव होता........ शाहीद कपूर, जुगल हंसराज, जिमी शेरगील आणि तमाम यंग ब्रिगेड तर आजही शहारुखचा पर्यायाने त्या "राजचा" कित्ता गिरवण्यातून बाहेरच आलेले नाहीत.... डिट्टो कॉपी. (अर्थात रणबीर कपूर सारखे "सुखद" अपवाद आहेत याला).
काजोलने आईला ऐकवलेली कविता, युरो ट्रिपच्या दरम्यान राजचा "पता नही ये बादल कब हटेंगे" स्टाईल अवतार, अमरीश पुरीची जरब, फरिदा जलालने साकारलेली आई, लहान बहीण चुटकी, अमरीश आणि राजने सकाळी कबुतरांना दाणे घालतानाचा "आओ, आओ... भुर्र्र्र्र्र्र्र्र्र" तो प्रसंग....... खरं तर सगळेच प्रसंग अगदी "परफेक्ट" म्हणावे असे जुळून आलेले..... आजही तसेच लक्षात आहेत. अशी भट्टी जमलेली असते म्हणूनच मग ती सगळी कॅरॅक्टर्स, ते संवाद पुन्हा पुन्हा इतर चित्रपटांतून डोकावत राहतात.
शेवटाकडे चित्रपट येताना थोडासा भडक होत जातो खरा, ती मारामारी, रक्तबंबाळ "राज", अचानक सुटणारी ट्रेन, त्यातही वडिलांच्या परवानगीसाठी थांबलेली नायिका जरी भडक असलं तरी नवीन होतं आणि नुकतीच मिसरुडं फुटू लागलेल्या वयात तर ते फारच "थ्रिलिंग" वगैरे वाटलं होतं.......
तसंच या चित्रपटात शहारुखने तब्बल ३४ लॉकेट्स घातली होती गळ्यात. प्रत्येक ड्रेसवर वेगळं लॉकेट. त्यवेळी मोजल्याचं पुसटसं आठवतय......
या चित्रपटाचं संगीत म्हणजे तर कहर होता...... मधात बुडवून बुडवून काढलेली गाणी होती जतिन ललितची. मला वाटतं आनंद बक्षी गीतकार होते, नक्की आठवत नाही.
बापाशी मित्रासारखा वागणारा, नायिकेवर जीवापाड प्रेम करणारा, प्रसंगी अवखळ, प्रसंगी उपद्व्यापी पण त्याचबरोबर मोठ्यांचा मान राखून वागणारा पडद्यावरचा "राज" एक्दम फूल्टू आवडला होता आणि त्याने कधी परकायाप्रवेश केला माझ्यात ते कळलंच नाही...... एकदा राज जो माझ्यात शिरला तो शिरलाच......
आणि माग माझ्यातला राज खर्या अर्थाने उफाळून यायला १९९७ चा "परदेस" उजाडला.......
"दो दिल मिल रहे है मगर चूप्के चूपके, सबको हो रही है खबर चुपके चुपके"
माझ्या "सॅनोरिटा"ला होकार दिल्याच्याच दिवशी वर्गात मी हेच गाणं म्हटलं होतं ऑफ पिरियडला...... मी, माझा मित्र, माझी सॅनोरिटा आणि तिची जीवलग मैत्रीण या वर्गातल्या चारच जणांना त्या क्षणी त्या गाण्याचा "खराखुरा" अर्थ कळत होता.........
दिलवालेनंतर तब्बल दोन वर्षांनी मला माझी काजोल मिळाली होती, तेही कुठलीही ट्रेन मिस न करता.
तिला त्याचवेळी सांगितलं होतं मी "अब मै हूं ना... अब कोई गडबड नही होगी" आणि...........
गडबडी होतच राहिल्या आणि होतच राहिल्या
अशावेळी मी फक्त एवढेच म्हणतो,
"बडे बडे देशों मे ऐसी छोटी छोटी बातें होती रेहती है"
भुंगा..लेख खूप सुरेख झालाय..
भुंगा..लेख खूप सुरेख झालाय.. वरून प्रतिसादांचा बोनस तर केवळ लाजवाब!!!!
शाहरुख 'रोमांतिस' फिल्लममधून मला आवडायचा.. ओ..ओह भूतकाळ वापरला ऑलरेडी!!
मला फक्त स्वदेस आणि चक दे
मला फक्त स्वदेस आणि चक दे मधला शाहरुख आवडला.
इतर सिनेमात त्याची विचित्र आणि फेक एक्स्प्रेशन्स डोक्यात जातात. अमरिश पुरी शाहरुखला त्या कबुतरांना ऑ, ऑ करताना बघून उगाच नाही वैतागत. ते पात्र आहेच तसलं :p
भुंग्या, तू छान लिहिलं आहेस.
अवांतर साती, >> आपटाच ते को
अवांतर
साती,
>> आपटाच ते को रे वरचं!
रोह्यापर्यंत मध्य रेल्वे आहे. त्यामुळे ते को.रे.ने जाणार्या गाड्यांचे स्थानक असले तरी म.रे.चे स्थानक आहे! चला, दिदुलेजाच्या निमित्ताने माझ्या ज्ञानसागरातील मुक्ताफळे उधळता आली! हिंदी सिनेमाचं असंच असतं. कुठे कशाचा उपयोग होईल ते सांगता येत नाही!
आ.न.,
-गा.पै.
अमरिश पुरी शाहरुखला त्या
अमरिश पुरी शाहरुखला त्या कबुतरांना ऑ, ऑ करताना बघून उगाच नाही वैतागत. ते पात्र आहेच तसलं
>>>>>>>>>>
अवांतर - त्या पात्राने ते पात्र तसे रंगवले नसते तर आज तो या स्पर्धेसाठीही पात्र झाला नसता.
अरे हो .... हे आपटा लक्षात
अरे हो .... हे आपटा लक्षात आलं होतं तेंव्हाच......
शिवाय मी शहारुखच्या गळ्यातल्या तब्बल ३४ लॉकेट्सचा उल्लेखच केला नाही लेखात...... आम्ही तेंव्हा मोजली होती. प्रत्येक ड्रेसवर एक वेगळं लॉकेट होतं गळ्यात........
मस्त
मस्त
गामा, बॉ...रं!
गामा,
बॉ...रं!
बापरे भुंगा, ३४ लॉकेटं जरा
बापरे भुंगा, ३४ लॉकेटं जरा जास्तंच होतात नाही! दोन दृष्यांदरम्यान सलगता पाहणारी लोकं असतात असं मी ऐकलंय! त्यांच्या नजरेतून सुटली असावीत.
आ.न.,
-गा.पै.
गा.मा. एकाच गाण्यातही
गा.मा. एकाच गाण्यातही त्याच्या गळ्यात वेगवेगळी लॉकेट्स होती....... तुम्ही चेक करू शकता.
आणि अशी कितीतरी गाणी आहेत त्यात. बघा नक्की.
कंटिन्युटीचा प्रश्नच नाही..... मी स्पष्ट लिहिलेय की एक एका पोषाखावर वेगवेगळं लॉकेट असं ...... तपासून पहाच.
१०० वी पोस्ट
१०० वी पोस्ट
बापरे भुंगा, ३४ लॉकेटं जरा
बापरे भुंगा, ३४ लॉकेटं जरा जास्तंच होतात नाही! दोन दृष्यांदरम्यान सलगता पाहणारी लोकं असतात असं मी ऐकलंय! त्यांच्या नजरेतून सुटली असावीत.
>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>
गामापैलवान,
तुमच्यासाठी काही खास कोलाज....... प्रत्येक ड्रेसवर शहारुखच्या गळ्यात वेगवेगळी लॉकेट्स आहेत... "कंटिन्युटी"ची कुठेही न वाजवता
ही सेपरेट काही चित्रे. यातही लॉकेट्स्वर नजर ठेवून पहा.
भुंगा, शेवटल्या चित्रातलं
भुंगा, शेवटल्या चित्रातलं लॉकेट भारीये! जणू पेन-ड्राईव्हच की! मागे म्हंटलं होतं ना, की हिंदी पिक्चरमध्ये कुठे कशाचा उपयोग होईल ते सांगता येत नाही!
आ.न.,
-गा.पै.
लेख आवडला. तीन वेळा थेटरात
लेख आवडला. तीन वेळा थेटरात पाहिलेला हा एकमेव हिंदी चित्रपट (आणि दुसरा जंगल बुक बालपणी).
राजची लॉकेटे आणि वेगवगळ्या गळ्याचे शर्ट/ टीशर्ट याची पुष्कळ चर्चा केली होती कॉलेजात. शिवाय ती पावसातल्या गाण्यातली टोपी. आपापल्या राजांना (!) असली एकेक लॉकेटे / टोप्या भेट देण्याची भरपूर पद्धत होती.
मराठा मंदिरला हा सिनेमा अजुन
मराठा मंदिरला हा सिनेमा अजुन लागला आहे असं ऐकुन आहे. काय कारण असु शकेल? मराठा मंदिरला नविन सिनेमे मिळत नाहित? एव्हढे वाईट दिवस आले?
छान लिहिलय!
छान लिहिलय!
खूप आवडत्या सिनेमांपैकी हा ही
खूप आवडत्या सिनेमांपैकी हा ही अजून एक!
रोमँटिक शाहरुख जबरदस्त आवडला होता.
गाणी अजूनही ऐकायला आवडतात.
लग्नघरात शाहरुखने आयत्या वेळी एंट्री केल्यानंतर छुटकी बरोबरचे संवाद, "दीदी, मुझे ये छत वाला अच्छा लगता है. तुम शादी इसीसे करना.", "कही पे निगाहे, कही पे निशाना", "साले बुढ्ढे की याददाश्त बडी अच्छी है", "लाजो, मै पहुंच गया", "अरे सिम्मी, तु तो बडी अच्छी शायरी करने लग पडी!" इ.इ. संवाद बॅग्राऊंड च्या म्युझिक सकट पाठ आहेत अगदी.
ते लॉकेट च मी कधी नोटीस
ते लॉकेट च मी कधी नोटीस नव्हतं केलं.
दिलवाले ... सीरीज मधल्या सिनेमांची काल्पनिक नावे वाचून हहपुवा झाली.
Pages