तुम मुझे युं भुला ना पाओगे....

Submitted by दक्षिणा on 30 July, 2012 - 08:36

Rafi1.jpg

'मोहम्मद रफी' हे वादळ आहे वादळ... किंबहूना एक खूळ आहे... जे एकदा डोक्यात शिरलं तर आयुष्यभर बाहेर निघणार नाही. नाहीतर मी लहान असताना इहलोकीची यात्रा संपवलेला हा गायक माझ्या अत्यंत आवडीचा का असावा? खरतर हा प्रश्न मी स्वत:ला अनेकदा विचारला. पण नेमकं उत्तर नाही सापडलं. तसे बरेच धागेदोरे मात्र हाती लागले आणि हळू हळू उलगडलं की त्याची गायनशैली ही अत्यंत भूरळ पाडणारी आहे. वेड लावणारी आहे. धुंद करणारी आहे. स्वतःमधला 'स्व' विसरायला लावणारी आहे.

माझे बाबा तर रफी साठी अत्यंत 'दिवाणे'. बहुतेक त्यांच्यामूळेच हे खूळ झिरपत झिरपत... (झिरपतय कसलं... प्रपातासारखं कोसळतच) मी आणि माझ्या ताईपर्यंत पोहोचलं असावं. घरात कायम जुनी गाणी आणि शम्मी कपूर हेच दोन विषय. तसे इतरही विषय होतेच. छोटा गंधर्व, वसंतराव देशपांडे इ. पण शम्मी आणि त्याची गाणी ही म्हणजे माझ्या बाबांची दुखरी नस. इतकी की दु:खाच्या सर्व छटांवर शम्मीची गाणी हा रामबाण उपाय.

आता जर आठवायचा प्रयत्न केला की रफीजींचं असं मी ऐकलेलं पहिलं गाणं कोणतं? तर ते सांगणं अत्यंत कठिण आहे. सांगण शक्यही नाही. जन्म झाल्यापासून त्यांची गाणी सतत ऐकत आलेय मी. याच गाण्यांपैकी एखाद्या अंगाईमुळे अनेकदा झोपलेही असेन. बाबा नेहमी 'त्यांचा मृत्यू १९८० साली झाला तेव्हा मी रडलो होतो' असं कित्येक वेळेला सांगायचे. हा सीन हमखास त्यांच एखाद सुंदर गाणं रेडिओवर लागून संपलं की व्हायचा. मला तेव्हा वाटायचं की आपले वडील रफी गेल्यावर का रडले असतील? Uhoh तेव्हा उत्तर मिळवण्याइतकी मी मोठी नव्हते. आणि एखाद्या माणसासाठी आपण का रडतो हे आकलन होण्याइतकी बौद्धिक क्षमताही नव्हती माझ्याकडे. पण हा प्रश्न पडायचा हे मात्र नक्की.

आम्ही लहानाचे मोठे झालो ते त्यांची गाणी ऐकत आणि शम्मीची हेलकावे खाणारी मान पहात. लताची सुरेल गाणी गुणगुणत. माझे बाबा किशोर कुमार म्हटलं की थोडे नाराज वाटत... अजूनही वाटतात. पण आम्ही मोठे झाल्यावर मला किशोरजींची काही गाणी अत्यंत जवळची वाटली. ती पण बाबांनी आणलेल्या एका रेकॉर्ड मुळेच. किशोरकुमार नव्हते फारसे आवडत तर ती डिस्क आमच्या घरी का होती? हा प्रश्न आता हा लेख लिहितानाच पडला. Happy

रफीजी हे 'सिंगर ऑफ द मिलेनियम आहे' आणि त्यांची गाणी ही सर्वात जास्त ऐकली जातात हे एका सर्व्हेमध्ये सिद्ध सुद्धा झालंय. आपल्या एकूण ३५ वर्षांच्या गायनाच्या कारकिर्दीत त्यांनी ४०००च्या वर गाणी गायली. ज्यात हिंदी, मराठीसह अन्य भाषेतल्या अनेक प्रकारच्या गाण्यांचा समावेश होता. गैरफिल्मी, गझल, भजन, क्लासिकल, सेमिक्लासिकल इ. या अनेक प्रकारांमध्ये रफीजींचे अनेक मूडही समाविष्ट आहेत.

पूर्ण नाव - मोहम्मद हाजी अली मोहम्मद रफी.
जन्मतारीख - २४ डिसेंबर १९२४
जन्म ठिकाण - कोटला सुलतान सिंग, जिल्हा अमृतसर, पंजाब
कारकिर्द - १९४४ ते १९८०
मृत्यू - ३१ जुलै १९८०
टोपणनाव - फिको

रफीजींचं जन्मठिकाण 'कोटला सुलतान सिंग' (अमृतसर, पंजाब) (होय, हे एका खेड्याचं नाव आहे.) हेच त्यांचं काही वर्षं वास्तव्यस्थान होतं. पुढे त्यांचे वडील संपूर्ण कुटुंबासह लाहोरला स्थलांतरीत झाले. रफीचे वडील हाजीअली मोहम्मद.. तिथे न्हाव्याचे दुकान चालवत. तेव्हा तिथे किंवा संपुर्ण गावात गात फिरणार्‍या फकिरांची गाणी मोहम्मद रफी पाठ करून गुणगुणत असे. एकूण सहा भावात, रफीचा नंबर ५वा... त्यामुळे बर्‍यापैकी अंतर. सर्वात थोरल्या भावाच्या मेहुण्याने रफीजीमध्ये असलेली ही कला हेरून, त्याच्या वडिलांना त्यांना मुंबईला पाठवण्याची विनंती केली. इतकंच नव्हे तर ते स्वतः त्यांच्याबरोबर मुंबईत आले. रफीजीचे वय तेव्हा निव्वळ २० वर्षं इतके होते.
Young Rafi.jpg

शास्त्रिय संगिताची तालिम त्यांनी उस्ताद बडे गुलाम अली खाँ, उस्ताद अब्दुल वाहिद खान, पंडित जीवनलाल मट्टो आणि फिरोज निजामी यांच्याकडे घेतली. रफीजींचा पहिला पब्लिक परफॉर्मन्स हा त्याच्या वयाच्या १३व्या वर्षी लाहोर मध्ये झाला. त्याचं असं झालं की रफीजी, त्यांचे मोठे भाऊ आणि हमीद हे तिघे एकदा श्रेष्ठ गायक के. एल. सहगल यांच्या कार्यक्रमाला गेले. तिथे काही तांत्रिक अडचणींमूळे लाईट्स गेले. सहगलजींनी लाईटस आणि ध्वनीप्रक्षेपकांशिवाय गायला नकार दिला. दरम्यान वाट पाहून कंटाळलेले प्रेक्षक चूळबूळ करू लागले. तेव्हा हमीदजींनी तिथल्या व्यवस्थापकांना विनंती करून व्यवस्था पुर्ववत होईपर्यंत रफीजींना गाण्याची परवानगी द्यावी अशी विनंती केली. नशिब कुठे साथ देईल ते सांगणे कठिण ! कारण त्याच प्रेक्षकांत ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक श्रीयुत शाम सुंदर उपस्थित होते. रफीजींना गाताना पाहून ते अतिशय प्रभावित झाले आणि त्यांनी रफीजींना त्यांच्या सिनेमात गाण्याचे आमंत्रण दिले. हिच त्यांची पहिली व्यावसायिक संधी. पाकिस्तानात तयार झालेल्या 'गुल बलोच' या सिनेमातली तर मुंबईत 'गाँव की गोरी'. या दोन्हीत एकूण चार वर्षांचं अंतर होतं.

१९४४ पासून मोहम्मद रफी व त्यांच्या भावाचे स्नेही हमीद हे मुंबईतल्या भेंडी बाजारात एका दहा बाय दहाच्या भाड्याच्या खोलीत रहात होते. 'गाँव की गोरी' हा सिनेमा त्यांना १९४५ मध्ये मिळाला. त्याच दरम्यान गायना बरोबरच त्यांनी एक दोन चित्रपटात छोट्या छोट्या भुमिकाही केल्या.. अनुक्रमे लैलामजनू व जुगनू अशी त्या चित्रपटांची नावं होती.

एकीकडे चित्रपटक्षेत्रात गायनाला सुरुवात झाली होती आणि दुसरीकडे रफीजींनी आपल्या नात्यातल्या एका मुलीशी लग्न केलं. १९४७ मध्ये फाळणीनंतर रफीजींनी भारतात राहण्याचा निर्णय घेतला. शिवाय आपलं संपूर्ण कुटुंबही इकडेच स्थलांतरीत केलं. पण त्यांच्या पत्नीने भारतात रहाण्यास नकार दिला. पहिल्या पत्नीकडून रफिजींना एक मुलगा होता. पुढे त्यांनी व हमीदजींनी दोन सख्ख्या बहिणींशी विवाह केला. रफिजींच्या पत्नीचं नाव 'बिल्किस रफी'. रफीजींची राहणी अत्यंत साधी व घरेलू होती. 'घर ते स्टुडिओ' आणि 'स्टुडियो ते घर' असा त्यांचा दिनक्रम असे. त्यांना कोणतेही व्यसन नव्हते. ते खूप धार्मिक, अतिशय प्रामाणिक व दयाळू होते. त्यांना करमणूकीसाठी कॅरम, बॅडमिंटन व पत्ते खेळायला आवडत. तसंच पतंग उडवणे हा ही त्यांचा छंद होता.

१९५२ मध्ये बनलेल्या 'बैजु बावरा' या सिनेमाशी निगडीत एक आठवण आहे. खरंतर यातली सर्व गाणी तलत मेहमूद हे गाणार होते. पण संगीतकार नौशाद यांनी एकदा त्यांना स्टुडिओत धुम्रपान करताना पाहिलं आणि ती सर्व गाणी मग रफीजींना मिळाली. १९४९ ते १९७० च्या दरम्यान रफीजींनी चित्रपटक्षेत्रात आपल्या जबरदस्त गायनाने चांगला जम बसवला व तो टिकवला देखील.

६०चं दशक हे रफीजींसाठी खास होतं असं मानायला हरकत नाही. त्याच वर्षी (१९६०) मध्ये त्यांना 'चौदहवी का चाँद' च्या शिर्षकगीतासाठी पहिल्यांदाच फिल्मफेअर अ‍ॅवॉर्ड मिळालं. याच दशकात रफीजींनी दिग्गज संगीतकारांबरोबर काम करून अनेकानेक हिट गाणी दिली.

या काळात किशोरकुमार स्वतःच्या गाण्यापेक्षा अभिनयाकडे जास्त लक्ष द्यायचे. त्यामुळे त्यांना गायला कठिण जातील अशी 'मन मोरा बावरा' (चित्रपट - रागिनी) आणि 'अजब है दास्तां तेरी ये जिंदगी' (चित्रपट - शरारत) ही दोन गाणी त्या त्या संगितकारांनी चक्क रफीजींकडून गाऊन घेतली होती. पुढे किशोरकुमार यांना अभिनय क्षेत्रात फारसा वाव उरला नाही. त्यावेळी त्यांनी आपल्यातल्या गायकावर लक्ष केंद्रीत केलं. ६९-७० मध्ये आराधनातली 'मेरे सपनोंकी रानी ' आणि 'रूप तेरा मस्ताना ' गाजल्यावर सुपरस्टार राजेशखन्ना नेहमी किशोरकुमारजीचीच शिफारस जिथे तिथे करू लागला. त्यामुळे रफीसाठी गायनाच्या संधी कमी होत गेल्या. अगदीच कव्वाली, शास्त्रीय, गजल.. अशा प्रकारची संगिताची बैठक असलेली गाणी त्यांना मिळू लागली.

पण त्यातूनही 'हम किसीसे कम नही' मधल्या 'क्या हुवा तेरा वादा' या गाण्याने रफीजींना पुन्हा एकदा नव्याने प्रकाशझोतात आणलं. हा आनंद फार काळ टिकला नाही कारण त्याकाळी चित्रपटक्षेत्रात खूप वेगाने बदल होत होते. एक लाट आली ती संपूर्ण डायलॉगबाज सिनेमांची. शोले सारख्या सिनेमांनी तर प्रेक्षकवर्गांचं सगळं लक्ष वेगळीकडेच वेधलं. मग हे क्षेत्रं डिस्कोने व्यापलं. त्यातही मोहम्मद रफी यांनी लक्ष्मीकांत-प्यारेलाय यांच्या मदतीने 'कर्ज' साठी 'दर्द्-ए-दिल' गात नविन प्रवाहात स्वत:ला झोकून दिलं खरं, पण सिनेमातून आता 'संगीत' हद्दपार होतंय हे त्यांना पुर्णपणे कळून चुकलं होतं.

चित्रपटक्षेत्रात नेहमीच शांती नांदली असं नाही. तिथेही आपसातले मतभेद हे होतेच. त्याला कोणीही सन्माननिय अपवाद नाहीत. अगदी लताजी, आशाजी सकट. रफीसाहेब सुद्धा त्याचा बळी ठरले होते. लता मंगेशकर या स्वत:चा पगडा ज्या पद्धतीने या क्षेत्रात वापरत, ते अनेकांना खटकत असे. त्यात मोहम्मद रफी हे सुद्धा एक होतेच. अनेक छोट्या छोट्या वादांचं आणि मतभेदांचं पर्यावसान एकमेकांबरोबर न गाण्याच्या निर्णयात रूपांतरीत झालं. 'दिल ने फिर याद किया' या चित्रपटाचं शिर्षकगीत गाण्यासाठी सोनिक ओमी यांना रफी, लता आणि मुकेश यांची निवड केली होती. पण नेमकं त्याचवेळी 'लता आणि रफी हे एकमेकांबरोबर गाणार नाहीत' असं दोघांनी जाहीर करून टाकलं. त्या गाण्याचा बाज पाहून सोनिक ओमींनी प्रथम आशा भोसले यांचा विचार केला होता, पण नंतर तो वगळून मग सुमन कल्याणपूर या नव्या तरूण गायिकेला ते गाणं दिलं. त्यांनी एकवेळ लताजींना वगळल, पण रफीजी मात्र त्या गाण्यात त्यांना जास्त महत्त्वाचे वाटले.

थोड्या फार प्रमाणात लताजी आणि रफीजी यांच्यातले मतभेद हे व्यावसायिक पातळीवर कमी झाले/मिटले असं म्हणायला हरकत नाही, परंतू वैयक्तिक पातळीवर मात्र ते कधीच मिटले नाहीत.

रफीजी हे त्यांच्या उदार स्वभावासाठी प्रसिद्ध होते. काही संगितकारांना रफीजींच्या गाण्याचे मानधन देणे परवडत नसे, अशा वेळी ते फक्त छोटेसे मानधन घेत. प्रसिद्ध अभिनेता राकेश रोशन यांच्या (दिग्दर्शक आणि निर्देशक म्हणून) पहिल्या चित्रपटासाठी 'आप के दिवाने' साठी रफीजींनी शिर्षकगीत गायलं. पण गाण्याचं मानधन म्हणून एक रूपयासुद्धा घेतला नाही. किशोरकुमारजींच्या सिनेमातल्या गाण्यासाठी त्यांनी निव्वळ 'एक रुपया' मानधन घेतलं असही म्ह्टलं जातं.

आता या लेखातला माझा आवडता टप्पा म्हणजे रफीजींची गाणी आणि गायकी. त्यांनी अनेक कलाकारांना आपला आवाज दिला आणि अगदी भारत भूषणसाठी गायलेल्या 'ओ दुनिया के रखवाले' पासून ते शम्मीसाठी गायलेल्या 'बदतमीज कहो, या कहो जानवर' पर्यंत म्हणा किंवा ऋषिकपूरसाठी 'दर्द्-ए-दिल'.. साठी म्हणा.. प्रत्येक नायकाची अदा, पडद्यावरील त्यांचा वावर, एकूण व्यक्तिमत्व या सर्व गोष्टी लक्षात घेऊन ते गायचे.

पण माझं वैयक्तिक मत आहे की त्यांची शम्मीकपूरवर थोडी जास्तच मेहेरनजर होती. Happy कारण शम्मीसाठी त्यांनी ज्या धाटणीत गाणी गायली आहेत, ती गाणी कुणीही पडद्यावर न पाहता फक्त ऐकून सांगेल किंवा अंदाज बांधू शकेल की ही गाणी बहुतेक शम्मीवरच चित्रित झाली असतील. 'याहू.. चाहे कोई मुझे जंगली कहे' व 'अय्यय्या सुकु सुकु (जंगली)',' लाल छडी मैदान खडी' किंवा 'बदतमीज कहो या कहो जानवर..(जानवर)',' छुपनेवाले सामने आ',' यूं तो हमने लाख हंसी देखे है..(तुमसा नही देखा)'.
असं ऐकिवात आहे की गाण्याच्या रेकॉर्डिंगच्या वेळेला शम्मी स्वतः स्टुडिओत रफीजींना भेटून सांगत असे की ह्या गाण्यावर मी असे हावभाव करणार आहे किंवा इथे थोडा अंगविक्षेप आहे. इ.

mohd-rafi-with-shammi-kapoor.jpg

फक्त शम्मीच असं नव्हे, पण त्याकाळच्या अनेक अभिनेत्यांना रफीजींचा आवाज चपखल बसला. मग ते सुनील दत्तचं 'आपके पेहलू में आकर रो दिये...' असो.. किंवा विश्वजित चं 'पुकारता चला हूं मैं' असो... जॉनी वॉकरचं 'सर जो तेरा चकराये असो... किंवा गुरूदत्तचं 'चौदहवी का चाँद हो..' असो किंवा 'उधर तुम हंसी हो' असो... प्रत्येकासाठी एक विशिष्ट गायनपद्धती. इतकच नव्हे तर 'दोस्ती' चित्रपटासाठी त्यांनी सुधीरकुमार या नवोदित कलाकारासाठी ३ ते ४ गाणी गायली. तिही त्याच्याच लकबीत. त्यापैकी 'चाहूंगा मैं तुझे... ' या गीताला फिल्मफेअर मिळाले. बाकीची सर्व गाणी उदा. 'जानेवालो जरा मूडके देखो इधर', 'मेरा तो जो भी कदम है',' कोई जब राह ना पाये' आणि 'राही मनवा दु:ख की चिंता.' ही गाणी सुद्धा प्रचंड गाजली.

या सर्व अविट गाण्यांसाठी त्यांच्या मृत्यूनंतर जवळजवळ २० वर्षांनी त्यांना 'बेस्ट सिंगर ऑफ द मिलेनियम' हे पारितोषिक देण्यात आलं.

रफीजींनी अनेक दिग्गज संगीत दिग्दर्शकांबरोबर काम केलं.
उदा. नौशाद, (एकूण १४९ गाणी पैकी ८१ सोलो होती.) एस. डी. बर्मन, शंकर जयकिशन, रवी, मदनमोहन, ओ.पी. नय्यर आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल वगैरे.

mohd-rafi-and-naushad.jpgshankar-jaikishen-with-rafi-raj.jpg

रफीजी आपल्या मृत्यूदिनापर्यंत कार्यमग्न होते. ३१ जुलै १९८० या दिवशी रफीजींनी 'आसपास' या चित्रपटासाठी 'तु कही आसपास है दोस्त' हे गाण ध्वनिमुद्रीत केलं आणि संध्याकाळी त्यांना अस्वस्थ वाटू लागलं. त्याच रात्री ८ वाजेपर्यंत ते सर्वांना सोडून अल्लाहला प्यारे झाले.

अनंत पावसकर यांनी त्यांच्या 'आठवणीतली गाणी' या पुस्तकात रफीजींच्या अंत्ययात्रेचे वर्णन असं केलंय की रफीजींच्या चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिल्याशिवाय राहणार नाहीत. ते म्हणतात ...
"१ ऑगस्ट रोजी दुपारी १२ च्या ठोक्याला जनाजा उचलला गेला. गर्दी न्यू टॉकिजवरून बडी मस्जिदच्या दिशेने निघाली होती. 'जनाजे नमाज' पढला जात असताना अचानक पावसाचा जोर वाढला. गर्दीतला प्रत्येक जण रडत होता. जणू निसर्गही आक्रंदत होता. अश्रू पुसायची गरज नव्हती कारण पाऊसच त्या अश्रूंना संगे घेऊन त्या मार्गावर भावनातिरेकाचा गलिचा अंथरत होता. कबरीवर माती लोटताना गर्दीने जो हंबरडा फोडला होता, त्याचा प्रतिध्वनी आजही आमच्या काळजाचा थरकाप उडवतो. Sad

रफी साहेब गेले तेंव्हा झालेल्या दूरदर्शन मुलाखतीत जॉनी वॉकर म्हणाले होते, ''मालीश.... तेल मालीश, सर जो तेरा टकराए' ह्या गाण्याच्या आधी रफी साहेबांनी मुद्दाम मला त्यांच्या घरी बोलावून माझ्याशी चर्चा केली. चित्रपटातील माझ्या लकबीचा अभ्यास केला आणि नंतर त्यांनी ते गाणे गायलं." ही आठवण सांगताना जॉनी वॉकरजींच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले.

रफीजींना मिळालेले अ‍ॅवॉर्डस -
नॅशनल फिल्म अ‍ॅवॉर्ड - क्या हुवा तेरा वादा - हम किसिसे कम नही.

फिल्मफेअर -
चौदहवी का चाँद हो - चौदहवी का चाँद
तेरी प्यारी प्यारी सुरत को - ससुराल
चाहुंगा मैं तुझे - दोस्ती
बहारों फुल बरसाओ - सुरज
दिल के झरोके में - ब्रह्मचारी
क्या हुवा तेरा वादा - हम किसिसे कम नही

संगीतावर प्रेम करणार्‍या या मनस्वी कलाकारांवर त्यांच्या चाहत्यांनी सुद्धा निस्सिम प्रेम केलं. त्यांच्याच एका गाण्यात त्यांनी सांगितलय...
"तुम मुझे यूं भुला ना पाओगे
जब कभी बी सुनोगे गीत मेरे
संग संग तुम भी गुनगुनाओगे"

प्रलयाच्या शेवटच्या क्षणापर्यंत या पृथ्वीवर चंद्र असेल, सुर्य असेल तसेच 'मोहमद रफी' या गंधर्वाच्या स्वर्गीय आवाजाचे चाहते सुद्धा असतील.

या अमर कलाकाराला माझी ही छोटीशी श्रद्धांजली !!!!
********************************************
माहीती व प्रकाशचित्रं आंतरजालावरून साभार.
********************************************

Group content visibility: 
Public - accessible to all site users

आंतरजालावरील दिवसाच्या घडामोडींच्या वाचनाची सुरुवात अशा सर्वांगसुंदर लेखानेच व्हावी यापरता दुसरा आनंद कोणता असू शकेल ? वाचत असतानाच मुद्दाम रफीसाहेबांच्या आवाजातील गाणी ऐकण्याचा मोह झाला आणि जे पहिले लागले ते नेमके मदनमोहनच्या संगीत दिग्दर्शनाखाली तयार झालेले "ये दुनिया ये मेहफिल मेरे काम की नही...". या गीतातील भाव आणि म.रफी यांचा स्वभाव जरी कधीही मेळ खात नसला तरी ज्या तन्मयतेने त्यानी या गाण्याची नस पकडली होती ती ऐकताना जणू काही रांझा आपल्यासमोर उभे राहून जगरितीविषयी तक्रार करीत आहे असेच वाटते.

खूप छान आढावा घेतला आहे दक्षिणाने. प्रातिनिधिक म्हटल्या जाणार्‍या गाण्यांची निवडही अगदी नेमकी आहे. शिवाय रफीसाहेबांच्या वैयक्तिक जीवनातील काही गोष्टीही तिने या निमित्ताने सांगितल्याचे दिसते तेही सदस्यांना भावेल.

एक विशेष तुला सांगतो दक्षिणा.....मला अगदी थेट महम्मद रफी यांचे ज्येष्ठ चिरंजीव श्री.शाहिद रफी यांच्याकडून 'रफी मॅन्शन' इथल्या त्यांच्या घरी येण्याचे आग्रहाचे निमंत्रण मिळाले आहे. हे कसे घडले ते इथे लिहित बसलो तर धागा भरकटण्याची शक्यता आहे, त्यामुळे इतकेच सांगतो की. श्रीमती बिल्किस रफी आणि त्यांच्या दोन्ही मुलांना आपण आंतरजालावर 'महंमद रफी' यांच्या आठवणी ज्या रितीने जपल्या आहेत त्याबद्दल त्यानी मनःपूर्वक तुम्हा सर्वांना धन्यवाद तर दिले आहेतच, शिवाय शहिद स्वतः म्हणतात, "पाटीलसर, आप जैसे ही लोग सही मायनेमें हमारे वालिद का नाम इस दुनियामे जिंदा रख रहे हो, वर्ना हम तो ये फिल्मी दुनिय कबके भूल चुके है |"

शाहिद यानी वडिलांच्या प्रांतात येण्याचे टाळून (त्याचे कारण प्रत्यक्ष भेटीत सांगेन असा त्यानी मला विश्वास दिला आहे) गल्फ इथे कापड उद्योगात आपले करीअर घडविले आहे. पण आई, पत्नी, मुले आजही मुंबईत आहेत.

तुझ्या लेखाच्या वाचनाने ह्या सार्‍या आठवणी परत एकदा मनी दाटल्या आहेत. या निमित्ताने तुझ्यासाठी आणि इथल्या रफीप्रेमीसाठी शाहिद यानी दिलेले काही फोटो इथे दिले तर सर्वांना आवडतील अशी आशा आहे.

रफी मॅन्शन. आज इथे शाहिद रफी यांचे कुटुंब राहते.

Rafi1" title="Rafi1">

रफींचा नातू. त्याच्यासमोर दिसते ते रफीसाहेबांचे लाडके टेबल.

Rafi2" title="Rafi2">

{साईझमध्ये काहीतरी गडबड झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे पुढील फोटो आता इथे देत नाही.}

अशोक पाटील

रफी... खरच स्वर्गीय आवाज लाभलेले व्यक्तीमत्व.. थेट हृदयापर्यत भिडणारा आवाज. अविट गाणी गायलीत त्यांनी.. दक्षे खुप छान केलस त्यांना अशी छान श्रध्दांजली वाहुन Happy

मस्त आहे लेख दक्षु Happy
मामा लिहितात तसा अभ्यासपुर्ण वाटतोय.
स्वर्गीय आवाजाला विनम्र श्रद्धांजली

शरारत मधल्या किशोरला असलेल्या रफीच्या प्लेबॅक बद्दल एक किस्सा मध्ये वाचला होता. किशोर कुमार लहरी होता. त्यावेळी गायन करीअरच्या बाबतीत सिरिअसही नव्हता हे वर आलेलेच आहे.शरारतच्या वेळी तो रेकॉर्डिंगला वेळच देत नव्हता. निर्मात्याने त्याला अनेक वेळा विनवले पण तो येतच नव्हता. कदाचित तो बिझी असेल किंवा त्याची लहरही असेल. शेवटी निर्मात्याने त्याला धमकी दिली की तू गाणे रेकॉर्ड केले नाहीस तर मी रफीच्या आवाजात गाणे रेकॉर्ड करून त्याच्या प्लेबॅकवर तुझे शूटिंग करील्.त्यालाही किशोरने परवानगी दिली. अशी त्याची गोष्ट आहे म्हणतात. पण वर कोणीतरी म्हटल्याप्रमाणे त्यात किशोरचा डबल रोल असेल तर कदाचित दोन वेगळी व्यक्तीमत्वे दाखवण्यासाठी रफी वापरला असेल.
रफींची गैरफिल्मी गाणी बहुतेक मधुकर राजस्थानींची असून शाम सागर यानी संगीत दिले आहे. त्यातले 'पांव पडू तोरे शाम ब्रिज मे लौट चलो, ' हेफारच सुरेख आहे सुदैवाने रफींची ही पूर्वी विविध भारतीवरच दुपारी दोन ते अडीच या वेळेत ऐकू येनारी गाणी आता कोण्या महात्म्याने यु ट्युब्वरही उपलब्ध केली आहेत . त्याचे शतशःआभार
नमुन्यादाखल येथे शोधा....
http://www.youtube.com/watch?v=ahBcp9168Us&feature=results_video&playnex...

व्वा! दक्स! सुंदर लेख.
कालच कुठल्या तरी चॅनलवर रफींचा मुलगा त्यांच्याविषयी सांगत होता. अधून मधून ऐकलं. पण अधून मधून गाणी दाखवत होते ती मात्र बरीच ऐकली.
खूपच नॉस्टेल्जिक व्हायला झालं.

फार छान लेख...
रफीसाहेबांचा आवाज म्हणजे साक्षात दैवी आवाज. अचूक गायकी आणि उत्कृष्ट गळा यांचा समसमासंयोग म्हणजे मोहमद रफी... मी त्यांची एक नम्बर पंखी आहे..
लता आणि रफी यांचे रॉयल्टीवरून बिनसले. सलील चौधरींच्या ' तसवीर तेरी दिल मे' ह्या गाण्याच्या वेळेस पण काहीतरी मतभेद झाले आणि लताने रफी बरोबर गाणे सोडून दिले. त्यानंतर 'ज्वेल थीफ' साठी 'दिल पुकारे आरे आरे' गाणे गायला एसडी बर्मन ने दोघांना 'पुकारले' तेव्हा पुन्हा एकत्र आले.
अर्थात मधल्या विसंवादाच्या काळात अनेक संगीतकारांनी द्वंद्वगीतांमधे लताला वगळले पण रफी ला राखले इतका गायकांमधे रफी महत्वाचा होता. साधरण ६२-६६ काळातली द्वंद्वगीते बघितली तर हे जाणवते..

दक्षु, खुप छान लिहिलंयस ! Happy

रफी......... माझा अतिशय आवडता गायक ! त्यांनी गायलेलं प्रत्येक गाणं डोळे मिटुन निवांतपणे ऐकणं हा माझ्यासाठी प्रत्येकवेळी एक स्वर्गीय अनुभव असतो. त्यांच्या असंख्य गाण्यांपैकी 'बाबुलकी दुआए लेती जा.... जा तुझको सुखी संसार मिले' ह्या गाण्यातला त्यांचा व्याकुळ, कांपरा आवाज ऐकुन आजही माझ्या काळजात कालवाकालव होते. डोळ्यांच्या पापण्या ओलावतात.........

त्या महान कलाकाराला आदरपुर्वक श्रद्धांजली !

रफी काय किंवा किशोरकुमार काय दोन्ही आम्हासाठी एकच - स्वर्गीय आवाज.>>>>>+१००

खुप सुंदर आणि योग्य वेळी आलेले ललित!

धन्यवाद दक्षिणा....!!!

छान लिहिलयस, दुखरी नस बरोब्बर पकडलीयेस... आवडला लेख. विषय जिव्हाळ्याचा आहे.

राहून राहून वाटलं की अजुन खूप काही लिहायला हवं होतंस, जरी प्रतिसादांतून अपेक्षित होतं तरी.
@ अशोकमामा, वरच्या माहितीसाठी आणि फोटोजसाठी धन्यवाद.

'अगं पोरी संभाल दर्याला तुफान आयलंय भारी' हे त्यांचं मराठी गाणं अत्यंत आवडतं. श्रीकांत ठाकरे-वंदना विटणकर-रफी या त्रिकुटाने काही वेगळी गाणी मराठीला दिली. त्यापैकी 'हे मना आज कोणी बघ तुला साद घाली' हे माझं सर्वात आवडतं.

दिलिपकुमार-रफी, देव-रफी, जॉय-रफी, जॉनी वॉकर/मेहमूद्-रफी... अशी अनेक अफाट कॉम्बिनेशन्स वाचता वाचता आठवत गेली. दिलिप-रफी जोडीची 'कोई सागर दिल को बहलाता नही', 'मधुबन में राधिका नाचे रे', 'मुहोब्बत की राहों में चलना संभल के' ही सगळ्यात जास्त आवडती, देवचं माझं सगळ्यात सगळ्यात फेवरीट म्हणजे 'ऐसे तो ना देखो'! मग मागोमाग 'अभी ना जाओ', 'दिल का भंवर', 'तु कहां ये बता इस नशीली रात में', 'अपनी तो हर आह इक तुफान है', 'कही बेखयाल होकर युंही छू लिया किसीने' आणि 'ये आँखें उफयुम्मा' Happy जॉय मुखर्जीचं स्पेशली 'हो मुझे देखकर आपका मुस्कुराना'! (मी हे गाणं जेव्हा जेव्हा बघते तेव्हा त्यात अगदी रमून जाते आणि एरवीही ऐकताना आपसूकच छानसं हसू येतं) आणि 'मैं प्यार का राही हूं', शम्मीची माझ्यासाठी 'आई गं' या कॅटेगरीतली गाणी म्हणजे 'खुली पलक में झुठा गुस्सा बंद पलक में प्यार', 'नजर बचाके चले गए वो', 'तुमने मुझे देखा', 'एहसान तेरा होगा मुझ पर', 'है दुनिया उसी की जमाना उसी का' आणि 'ए गुलबदन'... त्याचं 'मैं गाऊं तुम सो जाओ, सुख्-सपनों में खो जाओ' पण विशेष आवडतं.

आधी बाबांना आवडायचं म्हणून आणि नंतर स्वत्:ला समजायला लागल्यावर असंच कायमचं चिकटून राहिलेलं गाणं म्हणजे 'याद ना जाए बीते दिनों की'...

मेहमूद्-रफीची गाणी तर अफलातून कॅटेगरीत मोडतात. 'अजहू ना आए बालमा' हे हॉट फेवरीट! मग 'गोरी चलो ना हंस की चाल' आणि शेवटी 'हम काले है तो क्या हुआ दिलवाले है'. हे मला मुळीच आवडत नही, पण रफींकडे दुर्लक्षच करता येत नही अशी अडचण होते!

जॉनी-रफींची 'ऑल लाईन किलीयर', 'मै बंबई का बाबू' आणि 'जंगल में मोर नाचा' पुन्हा अशीच पूर्ण वेगळी. 'सर जो तेरा चकराए' सगळ्यांना माहिती असतंच. घरच्यांनाही धन्यवाद द्यायला पाहिजेत कारण ही सगळी गाणी त्यांच्यामुळे ऐकली गेली आणि आवड निर्माण होऊन ती आपोआपच जोपासलीही गेली.

इतर मग 'हुस्नवाले तेरा जवाब नही, कोई तुझसा नही हजारों में', 'एक हसीं शाम को दिल मेरा खो गया', 'आपके हसीन रुख पे आज नया नूर है'... अशी कित्येक! अगणित!

मस्त वाटलं. थँक्स! बाहेर खराखुरा आणि मनात रफींच्या गाण्यांचा, धो धो पाऊस Happy

वा! छान!
दक्षिणा,मस्तच लिहिलं आहेस!
माझं बालपण तलत,रफी,मन्नाडे,मुकेश,सुधीर फडके,लता,आशा,सुमन आणि अशा अनेक गायक गायिकांमुळे संगीतमय झालं होतं...पुरुषांमध्ये रफी हा अष्टपैलू गायक आणि बायकांमध्ये आशा! गाणं कोणत्याही प्रकारचं असो...विनोदी,करूण,आनंदी,खेळकर,थिल्लर,रागदारी वगैरे ...आणि त्यावर अभिनय करणारा नट कुणीही असो...गाणं त्या नटानेच गायलेलं आहे असं वाटण्यासारखा गाण्यातला अभिनय हेच खरं रफीच्या गाण्यातलं मर्म आहे.
असा रफी पुन्हा होणे नाही.

खुप दिवसांनी
खुप आवडलेला
खुप सुंदर लेख...

अप्रतीम लेख दक्स... लेख संपुच नये असं वाटत होतं मग पुन्हा पुन्हा वाचला.. Happy

सुंदर लेख.. दक्षिणा

रफी काय किंवा किशोरकुमार काय दोन्ही आम्हासाठी एकच - स्वर्गीय आवाज.
खरंच स्वतःला नशिबवान समजतो जे यांची गाणी ऐकायला, अनुभवायला मिळाली. एक इच्छा मात्र राहिली या दोन दैवतांना प्रत्यक्ष पाहण्याची. >> +१

खुप दिवसांनी
खुप आवडलेला
खुप सुंदर लेख... >>>>>> धुंद रवी + १००००००००००००००००००००००००००००००००००००००००००

द्क्षे - खरोखर सुंदर लेख Happy

कदाचित किशोर कुमार यांच्या अफाट लोकप्रियतेमुळे रफीसाहेब थोडे विस्मृतीत गेले आहेत असे जनरली पहायला मिळते. पण स्वतः रफीसाहेबांच्या पंख्यांची संख्या अगणीत असावी. Happy

हायला! मी रफींच्या गाण्यात्/आवाजात वाहवत गेल्ये. दक्षे, छान लेख गं. छान छान गाण्यांची बरसात होत्येय, थांकु!

रफीसाहेबांना चित्रपटसृष्टीने जसे वारंवार गौरविले तद्वतच भारत सरकारनेदेखील त्यांच्या कारकिर्दीची योग्य ती दखल घेऊन 'पद्म' पुरस्काराशिवाय खास टपाल तिकिटानेही गौरविले होते. तिकिटाविषयी बर्‍याच लोकांना माहीत नाही असे मला वेळोवेळी अशापद्धतीच्या चर्चेत आढ़ळले होते. इथल्या रफीप्रेमी सदस्यांसाठी हे ते तिकिट :

Rafi30001.jpg

आवडते गायक म्हणून आपण दहाजणांबरोबर फिरतो, पण फिरुन फिरुन पुन्हा रफिंसोबतच राहतो!
रफिंची असंख्य आवडती गाणी आहेत माझी. त्यापैकी 'ना झटको जुल्फ से पानी' थोडं जास्तंच!

काही गाण्यात एखाद्या ओळीतील काही शब्द किंचितशा नशील्या आवाजात गाणे ही एक खासियत रफीनी जपली असावी असं मला जाणवतं.>>>
अगदी अगदी.
उल्हासा काका, तुम्ही लिहिलेली गाणी तर आहेतच अजून एक गाणं आठवलं.
"तु कहा ये बता इस नशीली रात मे, माने ना मेरा दिल दिवाना"... ह्या गाण्यात पण नशीली शब्द रफीने असा काही म्हटलाय की बास रे बास! Happy

Pages