“ पुणे ते पानिपत ” भाग ६ : खूब लडी मर्दानी, वह तो झांसी वाली रानी थी

Submitted by सारन्ग on 25 June, 2012 - 16:31

“ पुणे ते पानिपत ” भाग १ - http://www.maayboli.com/node/35449

“ पुणे ते पानिपत ” भाग २ - http://www.maayboli.com/node/35521

“ पुणे ते पानिपत ” भाग ३ - http://www.maayboli.com/node/35727

“ पुणे ते पानिपत ” भाग ४ - http://www.maayboli.com/node/35805

“ पुणे ते पानिपत ” भाग ५ - http://www.maayboli.com/node/35884

आणि झाशीच्या दिशेने बाईक सुसाट सोडली. झाशी अजून ११० किमी होत. झाशीच्या रस्त्याला लागलो. एक्सप्रेस हायवेसारखा रस्ता होता. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २५/७६ होता. आता मध्य प्रदेश सोडून उत्तर प्रदेश मध्ये घुसलो होतो. मनातं थोडीशी धाक-धुक होतीच. एकतर मनसेमुळे उत्तर प्रदेश मधले वातावरण महाराष्ट्रीय लोकांबाबत फारसे चांगले नसणार याची आम्हाला कल्पना होती. त्यामुळे शक्यतो उत्तर प्रदेश मध्ये मोहिमेबरोबरच राहू असे ठरवले होते आणि प्रत्यक्षात तर आम्ही दोघचं जण उ. प्रदेशमध्ये प्रवेश करत होतो. जो होगा सो देखा जायेगा म्हणत आम्ही आत घुसलो. मला अजूनही आठवत मी ५५ मि. गाडीचा accelator पूर्ण पिळून ठेवला होता. जवळपास ९० ते ११० किमी /तास या वेगाने आम्ही आलो होतो.

झाशी मध्ये घुसलो, आता वेग कमी झाला होता. झाशीचा किल्ला शहरापासून थोडा लांब आहे. वाटेतच मोहिमेतले लोक दिसत होते. आता माझी नजर सारखी गाड्यांच्या नंबर प्लेटवर होती, महाराष्ट्राचं पासिंग असलेली दुचाकी दिसली कि बरं वाटायचं. हे सगळं शब्दात नाही सांगू शकत कि, महाराष्ट्राचं पासिंग असलेली दुचाकी दिसली कि आम्हाला किती बरं वाटायचं. आयुष्यात काही क्षण असे असतात कि जे ते ज्याचे त्यानेच अनुभवायचे असतातं, त्या क्षणांचं कितीही वर्णन केलं तरी त्या परिस्थितीची, वाचणाऱ्याला जाणीव होईलच याची काय शाश्वती? त्यात आमच्याकडे बाईकचा insurance पण नव्हता आणि PUC पण नव्हतं. चौकशी केल्यावर उत्तर प्रदेश मध्ये निवडणुका असल्याने जमावबंदी लागू होती. तलवारी, भगवे झेंडे सगळं काही काढून ट्रक मध्ये ठेवले होते, मोहीम पूर्णपणे विस्कळीत झाली होती. दुष्काळात तेरावा महिना दुसरं काय? आता जो तो स्वतंत्र होता. अर्थात यावेळेस हे स्वातंत्र्य कोणालाच नको होते. निखिलशी ( मोहिमेचे सेनापती ) फोनाफोनी झाल्यावर दुपारचं मंमं ( जेवण) दतीयात असल्याच कळलं. अर्थात फिरायचं असल कि जेवण, प्रवास वगैरे गोष्टी किरकोळ वाटतात.

झांशी विषयी थोडेसे :

ब्रिटिशांकित हिंदुस्थानातील अठराव्या शतकातील बुंदेलखंडातील एक संस्थान. हे संस्थान उत्तरेस ग्वाल्हेर संस्थान व जालौन, पूर्वेस घसान नदी, पश्चिमेस दतिया, ग्वाल्हेर ही संस्थाने, दक्षिणेस ओर्छा संस्थान यांनी सीमांकित झाले होते. झांशी संस्थानातून ब्रिटिशांनी झांशी जिल्हा निर्माण केला. त्याचे क्षेत्रफळ ९,२८२ चौ. किमी. लोकसंख्या सु. पाऊण लाख (१८५४) व उत्पन्न ४•३ लाख रु. होते. उत्तर प्रदेश राज्याच्या याच नावाच्या जिल्ह्याचे आणि तालुक्याचे प्रमुख ठाणे. हे आग्र्याच्या दक्षिणेस सु. २१० किमी. असून लोहमार्ग प्रस्थानक व सडकांचे मोठे केंद्र आहे. १८५७ च्या उठावातील राणी लक्ष्मीबाईमुळे हे विशष प्रसिद्ध आहे. शहर ९ वेशींसह तटबंदीयुक्त, सुरेख, टुमदार असून त्याभोवती अनेक तळी आहेत. याचा उल्लेख कधी कधी बळवंतनगर असाही केला जातो. ओर्छाचा राजा वीरसिंगदेव याने १६१३ मध्ये येथे बळकट किल्ला बांधला.
जिल्ह्यातील अन्नधान्याची ही प्रमुख बाजारपेठ आहे. येथे पितळी भांडी, गालिचे, रेशमी वस्त्रे, चित्रकला, कांबळी, विडी, साबण, तेल, सुगंधी तंबाखू, शेती यंत्रे, फळसंरक्षण, आयुर्वेदिक औषधे इ. विविध व्यवसाय असून मोठी रेल्वे कर्मशाळा आहे.

येथील प्रेक्षणीय स्थळांत शहराच्या पश्चिमेच्या छोट्या डोंगरावरील किल्ला, लक्ष्मीमंदिर, दुर्गामंदिर, मुरलीमनोहर आणि राणीमहाल यांचा प्रामुख्याने समावेश होतो. (य.ना. देवधर – मराठी विश्वकोश, आंतरजालावरून साभार )

दुपारचे ०२३० वाजले होते.
झाशीच्या किल्ल्याबाहेरच अमर भेटला, बघितला का किल्ला ? मी विचारलं
होय बे, तुम्ही कुठं होते ?
माधव राष्ट्रीय उद्यान, हे सांगताना मला हसू आवरत नव्हतं.
कुठपर्यंत त्या तलावापर्यंतच गेलते ना ?
नाही रे, आत पर्यंत.
कस काय बे ?, आम्हाला तर सोडलं नाही
अमरया, तुम्हाला आत एक बोलेरो जाताना दिसली का ?
साला, त्यानंतरच बोलनं अमरच्या हाताचं आणि माझ्या पाठीच झाल.
आता, स्वागत काही अमरला सोडणार नव्हता. त्याने अमरया, शिंदे छत्रीच काय घेऊन बसलायस, आम्ही माधव राष्ट्रीय उद्यान बघून आलोय वगैरे गोष्टी सांगून रात्री छत्री न बघायला मिळाल्याचा सूड आणि सकाळच्या अमरयाच्या बोलण्याचा येथेच्छ समाचार घेतला.
अरे, जेवण दतीयामध्ये आहे, तुम्ही काय करणार आहे जेवायचं ?
बघू, वाटेतच काहीतरी खाऊ अस म्हणून अमरने माझा निरोप घेतला.

आम्ही झाशीच्या किल्ल्यात शिरलो.

झाशी किल्ल्याविषयी थोडेफार :

१६१३ साली बुन्देलाचा ( सध्याचं ओरछा ) राजा बिरसिंह देव याने बंगरा नावाच्या डोंगरावर या किल्ल्याची उभारणी केली.
या डोंगराच्या भौगोलिक स्थितीमुळे संपूर्ण झाशी नगरावर लक्ष ठेवता येत असे. अजूनही किल्ल्य्वरून झाशी शहराचे विहंगम (?) दृश्य दिसते. त्यानंतर मात्र या किल्ल्यावर अनुक्रमे बुन्दल, मुघल, मराठे आणि इंग्रजांचा अधिकार राहिला. मराठा शासक नारो शंकर ने १७२९ – ३० च्या सुमारास किल्ल्यामध्ये अनेक बदल केले. (असा उल्लेख किल्यावरील फलकावर आढळतो, आंतरजालावर मात्र १७४२ मध्ये नारो शंकर सुभेदार झाल्याचा उल्लेख आहे) त्यानंतर हा किल्ला शंकरगढ नावानी प्रसिद्ध झाला. १९८६ मध्ये केंद्र सरकारच्या अखत्यारीत येईपर्यंत गडावर अनेक बदल झाले. १८५७ च्या स्वातंत्र्य युद्धात जेव्हा राणी लक्ष्मीबाई लढता लढता मरण पावली त्यावेळेपासून किल्याला अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले. गडाचा घेरा १५ एकर आहे. किल्ल्यामध्ये एकून २२ बुरुज आहेत. नगराकडील भिंतीमध्ये खंडेराव, दतिया, उन्नाव, ओरछा, बडगाव, लक्ष्मी सागर, सैनयार, भांदेर आणि झीरना नावाची प्रवेशद्वारे आहेत. सगळी मिळून १० प्रवेशद्वारे आहेत. याशिवाय गणपतगीर, अलीघोल, सुजान खॉ आणि सागर अशा ४ खिडक्या ( लघुद्वारे ) सुद्धा आहेत. किल्ल्याच्या आतील भागात भवन-बारादरी, पंचमहाल, शंकरगढ अशी ठिकाणे आहेत त्याचबरोबर राणी जिथे नियमित पूजा-पाठ करायची ते गणेश मंदिर आणि शिव मंदिर देखील आहे. हे शिवमंदिर हा मराठा स्थापत्य कलेचा उत्तम नमुना आहे. राणी लक्ष्मीबाईच्या सहकारी गुलाम गौस खॉ, खुदाबक्ष, मोती बाई यांच्या समाध्या आहेत. कडक बिजली आणि भवानीशंकर तोफा विशेष करून दर्शनीय आहेत. राणी लक्ष्मीबाईने ज्या ठिकाणाहून तिच्या दत्तक मुलासह घोड्यावरून उडी मारली होती ते “ कुदान स्थल ” विशेष प्रेक्षणीय आहे. किल्ल्याचा शेवटचा राजा गंगाधर रावच्या मृत्युनंतर इंग्रजांनी कुटीलनीतीने हा किल्ल्या स्वतःच्या ताब्यात घेतला.५ जून १८५७ ला राणीने युद्ध करून परत किल्ल्यावरती ताबा मिळवला. २३ मार्च १८५८ ला, इंग्रज अधिकारी ह्युरोज याने काही विश्वासघातकी सरदारांना हाताशी घेऊन राणीला किल्ला सोडायला भाग पाडले. ( किल्ल्यावरील विविध ठिकाणांहून एकत्र)

प्राचीन काळी या संस्थानच्या आसपास परिहार, काठी राजपूत व गोंड लोकांची वस्ती होती. काही वर्षे ते चंदेल्लांच्या अंमलाखाली होते. त्यावेळेस हे बलवंत नगर म्हणून ओळखले जात असे. ११८२ साली पृथ्वीराजाने चंदेल्लांचा पराभव केला. तेराव्या शतकारंभी कुत्‌बुद्दीन (१२०२-०३) व अल्तमश (१२३४) यांनी या प्रांतावर स्वाऱ्या केल्या.नंतर हा प्रदेश खेंगर टोळीच्या ताब्यात गेला. त्यांनीच येथे किल्ला बांधला. तेराव्या शतकात रुद्रप्रताप बुंदेल्याने खेंगरांचा पराभव करून तेथे राज्य स्थापिले. त्याचा मुलगा भारतीचंद्र याने १५३१ मध्ये ओर्छा शहर वसविले. ओर्छा राजा बीरसिंगदेव याने १६१३ मध्ये झांशीची स्थापना करून झांशीचा किल्ला बांधला. राजा बीरसिंगदेव याचे मुघल सम्राट जहांगीर याच्याबरोबर चांगले संबंध होते. १६२७ मध्ये राजा बीरसिंगदेव मरण पावला आणि त्याचा मुलगा जुहार सिंग गादीवर आला. अकबर, शाहजहान व वीरसिंग यांच्यात चकमकी उडाल्या होत्या. सतराव्या शतकाच्या उत्तरार्धात चंपतराय बुंदेला याचा मुलगा छत्रसाल याने झांशीवर आपला अधिकार प्रस्थापित केला. त्याने पहिल्या बाजीरावास मुघलांविरुद्ध मदतीस बोलाविले. बाजीरावने मुघलांविरुद्ध पराभव केला. त्याबद्दल छत्रसालने बुंदेलखंडाचा तिसरा हिस्सा बाजीरावास देण्याचे कबूल केले. हा करार प्रत्यक्ष पाळला गेला नाही. महाराष्ट्रातून कोणी सरदार जाऊन सालीना सहा लक्षांची खंडणी वसूल करी. १७४२ मध्ये मल्हार कृष्ण व राणोजी शिंदे हे झांशीस गेले असता ओर्छाकरांनी त्यांचा पराभव करून मल्हार कृष्णचा खून केला. तेव्हा पुण्याहून गेलेल्या नारो शंकराने ओर्छाकरांचा पराभव करून झांशी मराठ्यांच्या ताब्यात आणली. पेशव्यांनी मल्हार कृष्णच्या वंशजांना झांशीची जहागीर दिली. १७४२ ते १७७० पर्यंत नारो शंकर, बाबुराव, कान्हेरपंत, विश्वासराव लक्ष्मण हे झांशी सुभेदार होते. नारो शंकराने झांशीचा किल्ला ताब्यात घेऊन किल्ल्याला लागून नवीन शहर वसविले. हाच झांशी संस्थानचा संस्थापक. झांशीची सुभेदारी वंशपरंपरेने १७७० मध्ये रघुनाथ हरी नेवाळकर यांच्या घराण्याकडे आली. रघुनाथरावाने २५ वर्षे कारभार केल्यानंतर आपला भाऊ शिवराव याच्या नावाने पुण्याहून वस्त्रे मागविली. इंग्रजांनी बुंदेलखंडावर चाल केली, तेव्हा शिवरावने त्यांना साह्य केले. ६ फेब्रुवारी १८०४ रोजी इंग्रज आणि शिवराव यांच्यात तह झाला. १८ वर्षे कारभार केल्यानंतर शिवरावचा नातू रामचंद्रराव हा गादीवर आला. रामचंद्रराव १८३५ मध्ये मरण पावले. १३ जून १८१७ रोजी पेशवे आणि इंग्रज यांच्यात झालेल्या तहान्वये झांशी संस्थान हे इंग्रजांच्या ताब्यात गेले. इंग्रज व रामचंद्रराव यांच्यात तह होऊन इंग्रजांनी झांशी संस्थान रामचंद्ररावाकडे वंशपरंपरेने चालविण्याचे मान्य केले. भरतपूरच्या वेढ्यात रामचंद्ररावाने इंग्रजांना साह्य केले म्हणून १८३२ मध्ये इंग्रजांनी त्याला महाराज हा किताब दिला. १८३५ मध्ये रामचंद्ररावानंतर त्याचा चुलता रघुनाथराव गादीवर बसला, पण तो १८३८ मध्ये मरण पावला. त्यानंतर त्याचा भाऊ गंगाधरराव गादीवर आला, पण वाद होऊन १८३८ ते १८४३ पर्यंत इंग्रजांनी झांशी संस्थानचा कारभार आपल्या हातात घेतला. पुढे इंग्रजांनी गंगाधररावाबरोबर तैनाती फौजेचा तह केला. तहाप्रमाणे २,२७,००० रु. वसुलाचा मुलूख इंग्रजांना मिळाला. गंगाधररावांची पहिली पत्नी मरण पावल्यावर त्याने मोरोपंत तांबे यांची मुलगी लक्ष्मीबाई (मनुबाई) हिच्याशी लग्न केले. १८५३ मध्ये गंगाधरराव व लक्ष्मीबाई यांनी नेवाळकर घराण्यातील आनंदराव यास दत्तक घेतले. नंतर त्याच साली गंगाधरराव मरण पावले. १८५४ साली लॉर्ड डलहौसीने दत्तक वारस अमान्य करून झांशी संस्थान ब्रिटिश राज्यात समाविष्ट केले. लक्ष्मीबाईने आपला दत्तक मंजूर व्हावा, म्हणून खटपट केली. ती अखेरपर्यंत आशावादी होती आणि इंग्रजांना मदत करीत होती. अखेर राणीला वार्षिक ६०,००० रू. तनखा देऊन तिला शहरातील राजवाड्यात राहण्याची परवानगी दिली. १८५७ च्या उठावात झांशी इंग्रजांच्या हाती पडू नये, म्हणून राणीने आटोकाट प्रयत्न केले. अखेरीस राणी रणांगणी मृत्यू पावली. (य.ना. देवधर – मराठी विश्वकोश, आंतरजालावरून साभार )

झांशीचे सुभेदार खालीलप्रमाणे :

राजा बिरसिंह देव – १६१३ – किल्ल्याचा निर्माणकर्ता
महाराजा छत्रसाल – १७२९-१७४२ च्या सुमारास किल्ला यांच्याकडेच होता.
नारो शंकर – १७४२-१७५७ – नारो शंकराला पेशव्यांनी परत बोलावले.
माधव गोविंद काकीर्डे , बाबुलाल कान्हई – १७५७-१७६६
विश्वासराव लक्ष्मण – १७६६-१७६९
रघुनाथ राव दुसरे नेवाळकर – १७६९-१७९५ : रघुनाथ राव दुसरे नेवाळकर हे अतिशय उत्तम असे व्यवस्थापक होते, त्यांनी झाशी संस्थानाचा महसूल वाढवण्यास मदत केली. यांनीच महालक्ष्मी मंदिर आणि रघुनाथ मंदिर बांधले.
शिवराव नेवाळकर – १७९५ – १८१३
रामचंद्रराव नेवाळकर – १८१३ – १८३५
रघुनाथ राव तिसरे नेवाळकर – १८३५ – १८३८ : १८३८ मध्ये यांचा मृत्यू झाला.
गंगाधरराव नेवाळकर – १८३८-१८४३ : १८४२ ला यांचे लग्न मनीकर्णिका हिच्या बरोबर झाले. मन्निकर्णिका चे नाव बदलून लक्ष्मीबाई ठेवण्यात आले.
राणी लक्ष्मी बाई : १८४२- १८५८ ( जन्म : १९ नोव्हेंबर १८३५ ते १७ जून १८५८.)
राणीचा जन्म काशी मध्ये झाला होता. वडील - मोरोपंत तांबे , आई : भागीरथी तांबे
नाव : मनीकर्णिका, टोपण नाव : मनु
राणी ४ वर्षाची असताना तिची आई वारली. तिचे वडील बिठूर मध्ये पेशवा न्यायलयात काम करत असतं. पेशव्यांनीच नंतर तिचा सांभाळ केला. तिने लग्नानंतर मुलाला (दामोदर राव) जन्म ( १८५१ ) दिला पण तो जन्मानंतर ४ महिन्यातच मरणं पावला.
नंतर तिने गंगाधरराव नेवाळकर यांच्या चुलत्याचा मुलगा आनंद राव याला दत्तक घेतले. नंतर त्याचे नाव दामोदर राव ठेवण्यात आले. अस म्हणतात कि राजा त्याच्या मुलाच्या मृत्युनंतर परत सावरला नाही आणि २१ नोव्हेंबर १८५३ मध्ये त्याचा मृत्यू झाला.
१८५८ -१८६१ : इंग्रज
१८६१ मध्ये इंग्रजांनी किल्ला आणि शहर जियाजीराव सिंदिया यांच्या हाती दिले.
१८८६ मध्ये इंग्रजांनी झांशी परत घेतले.

किल्ला सुस्थितीत आहे, पण अनेक ठिकाणी बाग-बगीचे निर्माण करण्यात आले आहेत. त्यामुळे किल्ल्याचा फील जातोय. इतर ठिकाणांप्रमाणेच प्रेमियुगुलांचा नको इतका वावर किल्ल्यात चालू असतो. काही भाग बंद केले आहेत. गाडी थेट प्रवेशद्वारापर्यंत जात असल्याने इतिहासप्रेमीन बरोबरच खाद्यप्रेमी, निवांत प्रेमी, बोंबल फकीर, कॉलेजात (न) जाणारे युवक वगैरे लोकांचा बराच राबता असतो.

शाळेत असताना “फेकला तटाहुनी घोडा ” हि कविता होती, बहुतेक सहावीला असावी त्या कवितेची “कुदान स्थल ” बघत असताना प्रकर्षाने आठवण झाली.

राष्ट्राच्या कल्याणार्थ कल्याणिनी करी कल्लोळ
ती प्रिय भारत भाग्यार्थ भागिरथि झाली लोल
आर्यांचे बहुनि हाल हालवी मही दिग्गोल
मर्दानी झांशीवाली
परवशता पायाखाली
चिरडून निघे जयशाली
स्वातंत्र्याचा मनि ओढा फेकला तटाहुनी घोडा
अजूनही काही ओळी लक्षात होत्या तर .....अर्थात हे सर्व श्रेय बाबांना.

किल्ल्याची भक्कम तटबंदी :
61DSCN2711.JPG61DSCN2787.JPG61DSCN2712.JPGकिल्ल्याचे सध्याचे प्रवेशद्वार:
61DSCN2713.JPGनकाशा :
61DSCN2715.JPG61DSCN2719.JPG61DSCN2721.JPG61DSCN2723.JPG61DSCN2724.JPGराणी लक्ष्मीबाईच्या सहकारी गुलाम गौस खॉ, खुदाबक्ष, मोती बाई यांच्या समाध्या :

61DSCN2727.JPG61DSCN2731.JPG61DSCN2732.JPGअजूनही सुस्थितीत असणारे बुरुज :
61DSCN2749.JPG“कुदान स्थल ” :
61DSCN2750.JPG61DSCN2751.JPG61DSCN2752.JPG61DSCN2755.JPG61DSCN2756.JPGफोटोत कडक बिजली दिसत आहे :
61DSCN2762.JPGकडक बिजली जवळून :
61DSCN2764.JPG61DSCN2773.JPGराणीचं आमोद उद्यान हे नंतर इंग्रजांनी शस्त्रागारामध्ये परिवर्तीत केलं होतं :
61DSCN2777.JPGफाशी गृह- जे गंगाधर राव सत्तेवर असेपर्यंत वापरले जात असे:
61DSCN2779.JPGग्वाल्हेर रस्त्याला मिळणारा गुप्त मार्ग:
61DSCN2780.JPGशिव मंदिर :
मराठा आणि बुंदेल स्थापत्य शैलींच्या मिश्रणाचा हा एक उत्तम नमुना आहे. हे मंदिर मराठा शासक नारू शंकर यांच्या कारकीर्दीत बांधले गेले. मुख्य शिवलिंग ग्रेनाईट या दगडाचे बनवलेले आहे.

61DSCN2782.JPG61DSCN2791.JPG

लहान असताना झांसी कि राणी नावाची एक मालिका लागत असे त्यातलं “खूब लडी मर्दानी, वह तो झांसी वाली रानी थी” गाणं पूर्ण किल्ला बघतं असेपर्यंत आणि नंतरही कितीतरी वेळ गुणगुणत राहिलो. त्या मालिकेची मी लहानपणी अतिशय आतुरतेने वाट पाहत असे.
सरतेशेवटी लहानपणासून कितीतरी वेळा बाबांच्या तोडून ऐकलेल्या झांशीच्या राणीचा किल्ला बघायचा योग आला होता.

ठीक १५३० ला किल्ला सोडला. आता भूकही बरीच लागली होती पण जवळच असणारं पुरातत्व संग्रहालय बघायला जायचं असल्याने आणि ते १७०० वाजताच बंद होत असल्याने आम्ही फक्त वाटेत थोडासा फलाहार ( अहो, ते गाड्यावर नाही मिळत का पपई, केळी, पेरू अशी फळं एका डिशमध्ये कापून ठेवलेली असतात, हा तेचं ) केलाआणि पुरातत्व संग्रहालयाच्या दिशेने निघालो.

संग्रहालयात पोहचल्यावर माझी वेशभूषा पाहून तिथल्या रखवालदाराने अगदी काळजीने विचारपूस केली आणि इतक्या लांबून आलोय म्हणाल्यावर, चक्क तिकीट न काढू देताच आम्हाला आत प्रवेश दिला, त्यांच्या आदरातिथ्याने भारावून जातं आम्ही आत प्रवेश केला. वेळ १६११.

याच ठिकाणी पूर्वी राणीमहाल होता असे म्हणतात. पूर्वीच्या काळातल्या किल्ल्यांची चित्रे, पूर्वीच्या काळातली हत्यारे, अनेक देवी-देवतांच्या उत्खननात सापडलेल्या मूर्ती असे बरेच काही आत पाहण्यासारखे आहे. पुरातत्व आणि देवी-देवतांच्या उत्खननात सापडलेल्या मूर्ती असे विषय आले कि मला माबोकर वरदा आणि चक्रम बरोबर गिर्यारोहण करणारे आपटे काका या दोघांची प्रकर्षाने आठवण येते, आमच्यासारख्या वाटसरूंना काय कळणार हो त्यातलं. जास्तीत जास्त सोंड दिसली कि गणपती बाप्पा, नाग दिसला कि बम बम भोले, गरुड दिसला कि विष्णू आणि पोट फाडणारा दिसला कि नरसिंह इतकच आमचं अगाध ज्ञान.

१६४५ वाजले होते, संग्रहालय बंद करणारे सगळ्यांना बाहेर काढायच्या तयारीत होते. साऱ्या पटापट फोटो काढ, बाकीच मुक्कामाच्या ठिकाणी जाऊन बघत बसू, स्वागत वदला. मी देखील प्रामाणिकपणे त्याच्या आज्ञेच पालन करत पटापट जेवढे शक्य होईल तेवढे फोटो काढले आणि नेहमीप्रमाणे आमचा इतिहास कायम ठेवत आम्ही सगळ्यात शेवटी पुरातत्व संग्रहालय सोडले.
61DSCN2815.JPG61DSCN2816.JPG61DSCN2823.JPG61DSCN2843.JPG61DSCN2862.JPGबुद्ध
प्राप्ती स्थान : महोबा
११ वे शतक
61DSCN2872.JPGपंच अश्व रथावर आरूढ सूर्यदेव:
प्राप्ती स्थान : महोबा
११ वे शतक
61DSCN2878.JPG61DSCN2897.JPG61DSCN2901.JPG

आजचा मुक्काम गुरुद्वारा दाता बंदी छोड, ग्वाल्हेर या ठिकाणी होता. परत एकदा फोना-फोनी झाल्यावर मोहीम ग्वाल्हेरच्या आसपास असल्याचं कळालं. आम्ही परत एकदा सुसाट वेगात मोहिमेला गाठवयास निघालो. अजून आम्हाला तब्बल १०२ किमी अंतर गाठायचं होत. आता पुरातत्व संग्रहालय पाहून झाल्यामुळे पोटातल्या ओरडणाऱ्या कावळ्यांकडे लक्ष गेल, सकाळपासून आपण वाटेतला फलाहार सोडला तर काहीच खाल्लं नाहीये हे लक्षात आलं. मग आम्ही आमचा मोर्चा शेजारच्याच पाणीपुरीवाल्याकडे वळवला, त्याकडे जेवढे असतील नसतील तेवढे सगळे प्रकार खाऊन घेतले. आता जास्त वेळ नव्हता, पटापट खायचे सोपस्कार आटोपले.

उत्तर प्रदेश मध्ये आपल्यापेक्षा बरीच स्वताई आहे याची परत एकदा प्रचिती आली. आता जास्त रात्र व्हयला नको, एकतर आम्ही दोघेचं माग राहिलो होतो. रोहन- संग्राम ला फोन केला तर स्वारी चक्क ओर्छाला महाल बघण्यासाठी गेली होती, बाकीच्यांना फोन केले तर सगळेजण वेगवेळ्या ठिकाणी होते. आमची पण ओर्छाला महाल बघायला जायची इच्छा होती, पण वेळेच्या अभावामुळे सगळं चौपट झालं. परत एकदा आम्ही आज नही, तो कभी और हि सही म्हणत साधारण १८०० च्या सुमारास झांशी सोडले.

वाटेत दातिया लागलं, इथेच वीरसिंहदेवाचा राजवाडा आहे हे माहित असूनही परत एकदा वेळेच्या अभावामुळे ते देखील पाहणं शक्य झाल नाही. आयुष्यात वेळेला एवढ महत्व का आहे हे आम्हाला आता चांगलचं कळायला लागलं होतं.

मजल-दरमजल करत ग्वाल्हेर गाठलं. आता आम्ही परत उत्तर प्रदेश सोडून मध्य प्रदेश मध्ये प्रवेश केला होता. रात्री पण शक्य होईल तितक गाड्यांच्या नंबर प्लेट बघत होतो. जस-जस ग्वाल्हेर जवळ यायला लागलं तस-तस ३-४ मोहिमेतल्या गाड्या दिसल्या. शेवटी कशीबशी मोहीम रात्री ९ च्या सुमारास ग्वाल्हेरमध्ये सापडली. आमच्या जीवात जीव आला. गुरुद्वारा दाता बंदी छोड कुठे आहे ? असे विचारत विचारतच आम्ही पुढे निघालो होतो. शेवटी एकदाचा गुरुद्वारा दाता बंदी छोड सापडला आणि दुसरी आनंददायक बाब अशी कि हा चक्क ग्वाल्हेर किल्ल्यावरच होता. आज तब्बल २२०.३ किमी चा प्रवास झाला होता. अंग न अंग ठणकत होतो. जेवण करून कधी एकदा झोपतो अस झालं होतो. गेल्या गेल्या हात-पाय तोंड धुतलं. आज काही सामान ट्रक मधून बाहेर काढायच्या भानगडीत कोणी पडले नाही. मोहिमेच जेवण पण बरचं उशिरा झाल असल्याने सगळेच लवकर झोपले. आज चक्क मला कॉलेजची आठवण आली. लागलीच सागरला फोन लावला.

काही काळजी करू नकोस ५ हि दिवसांची उपस्थिती लावलेली आहे. हे सागरच्या तोंडून ऐकल्यावर माझ्या जीवात जीव आला. तो बिचारा, सर त्याचा आज US visa interview आहे, आज company मध्ये letter आणायला गेलं, sack तर इथेच आहे, बहुतेक चहा प्यायला खाली गेलाय अशी वेगवेगळी कारणे सांगून वेळ मारून नेत होता. तसा आमचा Course co-ordinator असल्या सबबी चालवून घेत नाही पण सागर त्याला त्याच्या कामात मदत करीत असल्याने तो सागरला काहीच बोलू शकत नव्हता. बाकी सगळ्यांना मात्र जो कोणी अनुपस्थित आहे त्याला मला येऊन भेटायला सांगा असे सांगत तो इतरांची तोंडे बंद करतं असे. नंतर माड्या, अंगद, मिहीर, मुदित आणि काका यांना अनुक्रमे फोन झाले. अंगद एकटा कॉलेजला रोज जात होता. बाकीची कारटी अनुक्रमे अलिबाग, बेंगलोर, पुणे आणि नागपूर या ठिकाणी मुक्कामास होती. अंगद तिकडे एकटा खिंड लढवत होता. मग त्यांचा येथेच्छ समाचार घेतल्यावर मी झोपावयास गेलो. सगळेजण कोलेजला न जाता पण साऱ्या, तू काही काळजी करू नकोस, निवांत ये वगैरे सांगून मला दिलासा देत होते, पण त्यांच काय जातंय अस म्हणायला, इथे मी गॅसवर होतो. आज प्रचंड थकल्यामुळे डोळा कधी लागला ते कळलेच नाही.

आजचा प्रवास : २२०.३ किमी
उद्याचा प्रवास: ग्वाल्हेर – धौलपुर – आग्रा

Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान लिहिता तुम्ही. मी लहान असताना झाशीला गेले होते. त्या आठवणी आल्या....

दामोदर राव जे राणीचे दत्तक पुत्र होते, ते १८५७ च्या उठावा नंतर खुप हाल आपेश्टा काढत परत झाशीत आले. पण शेवट पर्यंत ब्रीटीश सरकारने त्यांना पेंशन दिली नाही. आजही राणीचे वंशज "झाशीवाले" हे आडनाव लावतात. आजही ती पीढी आहे. ( संदर्भः "मंतरलेला इतिहास" लेखक : हर्शद सरपोतदार)

त्यात आमच्याकडे बाईकचा insurance पण नव्हता आणि PUC पण नव्हतं. >>>

कशी रे तुम्ही मुलं.... इकडे आई वडिलांना घोर ह्याच साठी होतो..... पुढच्या वेळेला हे सगळं नीट असल्या शिवाय कुठे जायचं नाही......( प्रेमळ दटावणी म्हणुनच घ्याल ही अपेक्षा)

एकतर मनसेमुळे उत्तर प्रदेश मधले वातावरण महाराष्ट्रीय लोकांबाबत फारसे चांगले नसणार याची आम्हाला कल्पना होती.>>> असे जर तुम्हाला वाटत असेल तर ते चुकीचे आहे. मी स्वतः नोएडा मधे एप्रिल २०१२ पर्यंत रहात होतो. अगदी राज ठाकरेच्या आंदोलनाच्या वेळी. मला कधीही वाईट अनुभव आला नाही. तुम्हाला तसा काही अनुभव आला का? मनसे ही महाराष्ट्राला लागलेली किड आहे. ती लवकर बरी होवो.

सर्व भाग वाचले...
काटा येतो अंगावर .. असल काही थरारक वाचल कि..
रोज २०० किमी बाईक चालवणे म्हणजे खायचं काम नाही.. तेही अनोळख्या प्रदेशात.
सारंग hats off to u !!!

किती नजाकतीने लिहितो आहेस...
तुझे अनुभव , त्या त्या ठिकाणांच भौगोलिक , ऐतिहासिक महत्व
मध्ये मध्ये विनोदांची खुसखुशीत पेरणी .. त्याला जोड अप्रतिम फोटोंची... वा मजा येतेय ..
अस वाटतंय मी काहीच मिस केल नाही .. या निमित्ताने मलाही जाऊन यायचा आनंद मिळतोय .

चायला जेंव्हा कालेजय होतो, तेंव्हा भरपूर वेळ असायचा .. पण स्वताची बाईक नव्हती..
आता बाईक आहे .. तर नोकरीच्या व्यापामुळे वेळ नाही..
असो चालायचंच
दुधाची तहान ताकावर ... Happy

अजून एक प्रश्न सारख ८० -९० च्या स्पीड वर गाडी चालवून गिअर box वर प्रेशर येत असेल ना.. गाडी maintain करायला काय काय करायचास ?

पाकीपुंगा, झकासराव, मीरा, मंदार, प्रसन्न - सर्वाना मनापासून धन्यवाद
मीरा : आपल्याला जायला मिळणारच नाही असे धरून चाललं कि जायला मिळत अशी माझी एक अंधश्रद्धा आहे, त्यामुळे बाईकचा insurance आणि PUC काढायला कंटाळा केला आणि नंतर काही वेळ मिळेना म्हणण्यापेक्षा मुहूर्त लागेना. नक्कीच पुढच्या वेळेला जाताना सगळी काळजी घेऊ.
मंदार : आम्हाला उत्तर प्रदेश मध्ये वाईट असा काही अनुभव आला नाही उलट पुढे दुचाकीचा अपघात झाला असताना तिथल्या लोकांनी आम्हाला मदतच केली.
फक्त लखनऊ मध्ये पत्ता विचारला असता, लोक नंबर प्लेट बघितली कि पत्ता सांगायचं टाळायचे. अर्थात सर्वच जन नाही पण ८०% म्हणा.
प्रसन्न : सारख ८० -९० च्या स्पीड वर गाडी चालवून गिअर box वर प्रेशर येत असेल ना >>>> अस होत का रे ? तस
असेल तर खरचं रे मला त्याबद्दल काहीचं माहिती नव्हतं , अज्ञानात पण सुख असतं म्हणतात न ते असे. Happy
गाडी maintain करायला विशेष अस काही केलं नाही, फक्त पंजाब मध्ये एकदा सर्विसिंग केल तेवढंच

सारन्ग - माफ कर थोड्या उशीराने वाचतोय , जबरदस्त लेखन चालु आहे , हाही भाग आवडला Happy
पुढ्चा भागही लवकर येऊ दे.
पु.ले.शु. Happy

रोज २०० किमी बाईक चालवणे म्हणजे खायचं काम नाही.. तेही अनोळख्या प्रदेशात.
सारंग hats off to u !!!>>>>>> +१०००००००
भारीच लिहितोस रे अगदी - ते बाईक चालवण्याचे कष्ट सोडता तुझ्याबरोबरच आहोत असे वाटत रहाते इतकं प्रत्ययकारी वर्णन केलंस अगदी .........

ग्वाल्हेरला मी नुकतीच जाऊन आलेय. तिथे एक सास बहु मंदिर आहे (सहस्त्रबाहूचा अपभ्रंश), तिथे नक्की जा आणि त्याचे फोटो नक्की टाका.

सारन्ग..खूपच छान वर्णन करतोस, आम्हीही तुझ्याच बरोबर फिरतोय असं वाटत राहतं सारल्खं..
सुर्रेख फोटो.. केव्हढा भक्कम किल्ला,बुरुज..
कुदान स्थलाचा फोटो पाहूनच शहारा आला.. ते प्रत्यक्ष पाहिल्यावर कसं वाटलं असेल..
रच्याकने.. लहानपणी 'दतिया' नाव कानावर पडलं तरी चारीबाजूंनी डाकू घोड्यांवर बसून भरधाव वेगाने जाताना डोळ्यासमोर येत Happy

नितीन, अमिता , शशांक, शापित गंधर्व,वर्षू नील आणि चिमुरी प्रतिसादाबद्दल मनापसून धन्यवाद
अमिता >>>>>>>>सास-बहु मंदिरात जायला मात्र नाही जमलं.:(
वर्षू नील >>>>>>>>>>लहानपणी 'दतिया' नाव कानावर पडलं तरी चारीबाजूंनी डाकू घोड्यांवर बसून भरधाव वेगाने जाताना डोळ्यासमोर येत Happy