नाटककार वि.वा.शिरवाडकर लिखित ‘नटसम्राट’ हे नाटक मराठी रंगभूमीच्या इतिहासातील महत्त्वाचे पान. नटसम्राटच्या भाषेची जादू आणि कुठल्याही कसबी नटाला आव्हान वाटेल अशी आप्पासाहेब बेलवलकरांची व्यक्तिरेखा आजही अनेकांना आकर्षित करते.
नटसम्राटच्या संहितेचे मूळ शेक्सपिअरच्या ‘किंग लिअर’मध्ये आहे हे सर्वज्ञातच आहे. किंग लिअर ते नटसम्राट या प्रवासाबद्दल शिरवाडकरांनीच काही टिपणे केलेली आहेत. प्रत्यक्ष आयुष्यात मनावर ताण आला की, नाट्यप्रयोगात शिरणारा नट अशी व्यक्तिरेखा असलेल्या एका इंग्रजी सिनेमाबद्दल शिरवाडकरांनी ऐकले होते. नानासाहेब फाटकांनी ’किंग लिअर’चे रूपांतर करण्याची विनंती शिरवाडकरांना केली होती. परंतु रूपांतर करताना प्रमुख व्यक्तिरेखा राजा न रहाता रंगभूमीचा अनभिषिक्त सम्राट त्यांना दिसू लागला. हा सम्राट त्यांना नानासाहेब फाटकांच्याच व्यक्तिरेखेत मिळाला. कधीकाळी ऐकलेली सिनेमातील व्यक्तिरेखा, ’किंग लिअर’च्या कथेचा सांगाडा, नानासाहेब फाटकांचे व्यक्तिमत्व आणि अखेरीस जेव्हा नटसम्राट कागदावर उतरले तेव्हाचे शिरवाडकरांचे वय या सर्व गोष्टींच्या मिश्रणातून नटसम्राट प्रत्यक्षात आले.
२३ डिसेंबर १९७० रोजी संध्याकाळी, बिर्ला मातोश्री सभागृह, मुंबई येथे नटसम्राटचा पहिला प्रयोग झाला. गोवा हिंदू असोसिएशनने हे नाटक मंचावर आणले होते. संस्थेचा सुवर्णमहोत्सवातला हा प्रयोग होता. या नाटकाचे दिग्दर्शन केले होते श्री. पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी. आप्पासाहेब बेलवलकरांची भूमिका केली होती डॉ. श्रीराम लागू यांनी; तर कावेरी साकारली होती शांता जोग यांनी.
गडकर्यांच्या ’एकच प्याला’नंतर जवळजवळ ५० वर्षांनी इतके अभूतपूर्व भाषासौंदर्य घेऊन येणारे नाटक म्हणून तेव्हापासून या नाटकाला लोकांनी डोक्यावर घेतले. नटसम्राट या नाटकाला १९७० सालचा राज्य नाट्य पुरस्कार मिळाला तर या नाटकाच्या लिखाणासाठी शिरवाडकरांना १९७४ सालचा साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला.
नटसम्राटच्या पहिल्या प्रयोगात गणपतराव बेलवलकरांची भूमिका डॉ.श्रीराम लागू यांनी केली होती. नटसम्राटच्या संवादांच्या बाबतीत पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे लांबच्या लांब स्वगते. या बाबत डॉ. लागू सांगतात की लहानपणी, सकाळी देवापुढे बसून स्तोत्रे पाठ करण्याची सवय त्यांना उपयोगी पडली. साधारण २८१ प्रयोगानंतर डॉ. लागूंनी प्रकृतीच्या कारणास्तव ही भूमिका करणे थांबवले. त्यांच्यानंतर अनेकांनी ही भूमिका केली. प्रत्येकाने आपापल्या परीने या भूमिकेत रंग भरण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाला डॉ. लागूंशी केलेल्या तुलनेला तोंड द्यावे लागले.
डॉ. लागूंच्या नंतर ही भूमिका समर्थपणे पेलली दत्ता भट यांनी. दत्ता भटांचा खडा आवाज व भारदस्त व्यक्तिमत्व यामुळे बेलवलकरांच्या व्यक्तिरेखेला वेगळे परिमाण मिळाले. त्यांचा नटसम्राट अपरिमित गाजला. दत्ता भटांनी नटसम्राटचे ४०० प्रयोग केले. त्यांनाही नंतर प्रकृती-अस्वास्थ्यामुळे नटसम्राट करणे थांबवावे लागले. नंतर १९७७च्या दरम्यान सतीश दुभाषींनी नटसम्राटाची भूमिका पेलली. त्यांनी आधीच्या दोघांचा नटसम्राट पाहिला नव्हता. याचमुळे ठराविक साच्यापेक्षा वेगळा नटसम्राट उभा करायचा त्यांनी प्रयत्न केला. १९७९ च्या सुमारास याच संचामधे चंद्रकांत गोखले यांनी नटसम्राट साकारायला सुरुवात केली. याही नटसम्राटाला प्रेक्षक व समीक्षकांची चांगली दाद मिळाली.
या चारही नटसम्राटांच्या बरोबर कावेरी साकारणार्या एकच अभिनेत्री होत्या त्या म्हणजे शांता जोग. कणखर पण मर्यादशील अश्या त्यांनी साकारलेल्या कावेरीची छाप पुसणे आजपर्यंत कोणालाही शक्य झाले नाही.
नंतर १९८२ साली अरविंद देशपांडे यांच्या दिग्दर्शनाखाली यशवंत दत्त यांनी बेलवलकर व सुलभा देशपांडे यांनी कावेरी साकारली. स्वतः शिरवाडकरांनी ‘आत्तापर्यंतचा मला सगळ्यात भावलेला नटसम्राट’ अशी पावती या नटसम्राटाला दिली होती. या प्रयोगाचे दिग्दर्शकीय वैशिष्ट्य म्हणजे नाटकातील बाकीची पात्रे म्हणजे मुले, सुना व जावई हे सर्व आधीच्या प्रयोगांप्रमाणे खलनायकी ढंगाने न दाखवता परिस्थितीचे गुलाम म्हणून दाखवण्यात आले होते.
नंतर परत एकदा पुरुषोत्तम दारव्हेकर यांनी मधुसुदन कोल्हटकर व लता अरुण यांना घेऊन नटसम्राट दिग्दर्शित केले. या प्रयोगाचे श्रेयस इतकेच की आजपर्यंत महाराष्ट्रातल्या ज्या गावांमधे नटसम्राट पोचला नव्हता तिथपर्यंत तो पोचला. यानंतर नटसम्राटाच्या भूमिकेत राजा गोसावी व कावेरीच्या भूमिकेत उषा नाडकर्णी असाही एक प्रयोग करण्यात आला. उषा नाडकर्णींच्या कावेरीने वाहवा मिळवली पण गोसावींचा नटसम्राट मात्र लोकांना फारसा आवडला नाही.
पहिल्या नटसम्राटानंतर दत्ता भटांपासून राजा गोसावींपर्यंत अनेक अभिनेत्यांनी नटसम्राटाचे आव्हान स्वीकारून झाल्यानंतर १९८६ साली डॉ. लागूंनी पुन्हा एकदा नटसम्राट पेलले. यावेळेला दिग्दर्शक होते माधव वाटवे आणि कावेरी साकारत होत्या सुहास जोशी. या नटसम्राटालाही लोकांची मान्यता मिळाली. सुहास जोशींची थोडी वेगळ्या पद्धतीने उभी केलेली कावेरीही लोकांना आवडली.
यानंतरही अनेकांनी नटसम्राटला हात घालण्याचा वेगवेगळ्या पद्धतीने प्रयत्न केला. त्यातील विशेष उल्लेखनीय प्रयोग म्हणजे लक्ष्मण देशपांडे व अनुया दळवी यांनी केलेला द्विपात्री नटसम्राटाचा प्रयोग. या प्रयोगाचे दिग्दर्शनही प्राध्यापक लक्षमण देशपांडे यांचेच होते. देशपांड्यांनी नाटक द्विपात्री करून त्याचे रुपडेच बदलून टाकले. यासाठी संशोधन करून संहितेचे पुन्हा संपादन केले. नेपथ्य, नाटकातील स्वगते व पार्श्वसंगीत यांचाही वेगळ्या पद्धतीने विचार केला. गणपतराव बेलवलकर आणि कावेरी या दोन पात्रांव्यतिरिक्त बाकी पात्रे उल्लेखापुरतीच ठेवली. अगदीच गरज पडली तेव्हा त्यांचे संवाद नुसते ऐकवले. हा प्रयोग म्हणून यशस्वी झाला असे समीक्षकांनी मांडले आहे.
मराठी भाषेतून इतर भारतीय भाषांत अनुवादित केल्या गेलेल्या महत्त्वाच्या मराठी नाटकांपैकी नटसम्राट हे एक. या नाटकाचे इंग्रजी, गुजराथी, हिंदी आणि तेलुगू भाषांतील अनुवाद आणि नाट्यप्रयोग दोन्ही भरपूर गाजले.
काही अनुवाद :
o इंग्रजी: द लास्ट सीन - अनु. - वसंत लिमये
o हिंदी: नटसम्राट - अनु. र. श. केळकर.
o तेलुगू :नाटकांतम - अनु. उदयभानू
o गुजराथी: २ अनुवाद
१. बहुत नाच्यो गोपाला - कांती मडीया
२. हमारी दुनिया तमारी दुनिया - प्रवीण सोलंकी
हिंदीमधे ३ - ४ वेगवेगळ्या दिगदर्शकांनी हे नाटक केले आहे.
तेलुगूमधे नाटकांतम - संस्था रंगधारा - जानेवारी १९९८. दिग्दर्शन: प्राध्यापक भास्कर शेवाळकर. प्रमुख भूमिका: चाटला श्रीरामलू
गुजराथीमधे
१. बहुत नाच्यो गोपाला - १९७४ दिग्दर्शन: कांती मडीया. प्रमुख भूमिका: चंद्रकांत भट
२. हमारी दुनिया तमारी दुनिया - १९९५ दिग्दर्शन व प्रमुख भूमिका: सिद्धार्थ रांदेरीया
अजूनही अनेक अभिनेते आणि दिग्दर्शक आपापल्या परीने हे धनुष्य पेलायचा प्रयत्न करताना दिसतात.
हा झाला या नाटकाचा इतिहास.
माझ्या पिढीने लहानपणी नटसम्राटचे वादळी वारे ऐकले. किंचित कळत्या वयात दूरदर्शनवर नटसम्राट बघितले. नववी-दहावीच्या काळात हे नाटक वाचले, उतारे पाठ केले आणि चोख भाषेत म्हणून दाखवून सगळ्यांकडून शाबासकी मिळवली. तेव्हापासूनच नटसम्राटच्या संदर्भाने सतत डोक्यात दोन वेगळ्या टोकाची मते येत असत. मराठी शाळेत शिकल्याने आणि वाचनाचा किडा वेळेवर डसल्याने नटसम्राटच्या लिखाणातले भाषासौंदर्य, नाटकाची बांधणी हे प्रचंड आवडत असे आणि त्याच वेळेला अप्पासाहेबांचा भाबडेपणा त्रासदायक होत असे. त्या भाबडेपणाचे, भोळेपणाचे निष्कारण उदात्तीकरण आहे असं वाटत असे. आणि कुठेतरी अप्पासाहेबांच्या दुरवस्थेला तो निष्कारण भाबडेपणाच जबाबदार आहे असे वाटत राही. पुढे पुढे ते अधोरेखित होत गेले. अखेर ठाम मतबीतच बनले!
मग नाटक शिकताना 'लियर' पचवला. त्याचा भाबडेपणा हा त्याच्या काळाला आणि कर्तृत्वाला शोभून दिसतोय हे जाणवलं. तो खटकेच ना. त्याची वाताहात इत्यादी सगळीच ट्रॅजेडी एका प्रकारे रोमॅन्टिसिस्टिक वाटत राहिली. भली मोठी नाट्यमय उंची होती त्या ट्रॅजेडीला. या पार्श्वभूमीवर परत नटसम्राट आठवल्यावर ५० च्या दशकातल्या नटसम्राटाचा भाबडेपणा जाम म्हणजे जामच खटकू लागला. मग नाटक ट्रॅजिक न रहाता मेलोड्रामाच जास्त वाटू लागला.
मधे प्रसारभारतीच्या उपक्रमांतर्गत दूरदर्शनसाठी ६ भागांमधे नटसम्राट करून दिले. त्यावेळेला अभ्यास करताना पुन्हा तेच जाणवत राहिले. मुलगा-सून, मुलगी-जावई हे खलनायक न वाटता परिस्थितीची बाहुली आहेत हे जाणवू लागले. नाटक आशय-विषय-कथेच्या बाबतीत मनातून उतरत गेले. भाषा आणि नाटकाची बांधणी मात्र कायम मोहात पाडते यात वाद नाही.
- नीरजा पटवर्धन
तळटीप: वरील लेखातील सर्व संदर्भ एन सी पी ए, मुंबई येथील ग्रंथालयातील 'नटसम्राट'च्या संदर्भ संग्रहातून घेतले आहेत.
प्रकाशचित्रांचे प्रताधिकार आणि मनःपूर्वक आभार- कुसुमाग्रज प्रतिष्ठान.
छान आढावा घेतलायस. मस्त लेख.
छान आढावा घेतलायस. मस्त लेख. >>>> अनुमोदन
उत्तम, सखोल विवेचन!
उत्तम, सखोल विवेचन! मेलोड्रामाबद्दल ..... अगदी मनापासून पटणारे विचार.
या निमित्ताने नाट्यप्रयोगांबद्दल खूप चांगली माहिती मिळाली.
छान लिहिलं आहे नीरजा. मला पण
छान लिहिलं आहे नीरजा.
मला पण ते नाटक टीवीवर पाहिल्याचं आणि न आवडल्याचं आठवतं आहे. नट कोण होते ते काही आठवत नाही. पण आता विचार करताना अमां चं म्हणणं पटलं की एकेकाळी असे लोक होते.
दत्ता भट आणि शांता जोग होते
दत्ता भट आणि शांता जोग होते टिव्हीवर दाखवलं होतं त्यात.
लेख सुंदर झालाय, खूप आवडला <<
लेख सुंदर झालाय, खूप आवडला
<< त्या भाबडेपणाचे, भोळेपणाचे निष्कारण उदात्तीकरण आहे असं वाटत असे. आणि कुठेतरी अप्पासाहेबांच्या दुरवस्थेला तो निष्कारण भाबडेपणाच जबाबदार आहे असे वाटत राही
<<मग नाटक ट्रॅजिक न रहाता मेलोड्रामाच जास्त वाटू लागला. >>>..
अगदी सहमत
छान लेख, मस्त माहिती मिळाली.
छान लेख, मस्त माहिती मिळाली.
चांगला आढावा. शेवटच्या
चांगला आढावा.
शेवटच्या टिप्पणीला १००% अनुमोदन.
आता फार मेलोड्रॅमॅटिक आणि शब्दबंबाळ वाटतं ते. पण त्याचा अर्थ इतकाच की नाटक लिहितांना कुसुमाग्रजांच्या डोळ्यांसमोर जो 'टार्गेट ऑडियन्स' होता तो आपण नाही.
रसिकतेने नाटक पहाणं व
रसिकतेने नाटक पहाणं व तटस्थतेने त्याचं विश्लेषण करणं हे कठीण काम छान निभावलंय, नीधप तुम्ही.
साधारण एकाच कालखंडातल्या डॉ. लागूंच्याच " कांचेचा चंद्र " व " नटसम्राट" यातील भुमिका पाहिल्यावर पहिल्या नाटकांत त्यांच्या अभिनयाचा खरा कस लागला होता असं त्यावेळीं माझं ठाम मत झालं होतं. [ "कांचेचा चंद्र" यांत बहिणीच्या प्रतिभेचं स्वार्थासाठी 'एक्स्प्लॉयटेशन' करणार्या भावाचं काम त्यानी केलं होतं ]. " नटसम्राट"मधील शिरवाडकरांच्या भाषेला आवाजाची फेंक असलेला नट बव्हंशी पुरेसा होता पण त्यांत अभिनयातल्या बारकाव्यातून भूमिका जिवंत करण्याचं आव्हान नव्हतं, असं त्यावेळीं व आताही मला वाटतं.
<< त्या भाबडेपणाचे, भोळेपणाचे निष्कारण उदात्तीकरण आहे असं वाटत असे.>> नीधप, ज्या काळातली बेलवलकर यांची व्यक्तीरेखा शिरवाडकरानी उभी केली आहे, त्या काळात नाट्यक्षेत्रातला अग्रेसर नट असणं ही आज सिनेमातला सुपर हीरो असण्याइतकीच सामाजिक प्रतिष्ठा व "झिंग" आणणारी बाब असावी; त्यामुळेच, प्रतिभावान व हुषार असूनही बेलवलकर आत्मकेंद्रीत व बेफिकीर होणं व तसं ऐन उमेदीच्या दिवसांत रहाणं, सहाजिकच असावं. उत्तरायुष्यात अचानक तें अशक्य झाल्याने त्यांच्या शोकांतिकेला सुरवात झाली असावी. भाबडेपणापेक्षाही हा व्यक्तीविशेष कदाचित शिरवाडकरानाही अभिप्रेत असावा, असं मला त्यावेळींही नाटक पाहिल्यावर जाणवलं होतं.
कानेटकर?
कानेटकर?
<< कानेटकर? > > अनवधानाने
<< कानेटकर? > > अनवधानाने झालेल्या चूकीबद्दल त्रिवार माझे कान धरून "क्षमस्व", अगदीं मनापासून व नम्रतेने. चूक दुरुस्त केलीय .
माफी कसली त्यात..
माफी कसली त्यात..
सुंदर माहिती.. धन्यवाद.
सुंदर माहिती.. धन्यवाद.
नटसम्राटच्या लिखाणातले
नटसम्राटच्या लिखाणातले भाषासौंदर्य, नाटकाची बांधणी हे प्रचंड आवडत असे आणि त्याच वेळेला अप्पासाहेबांचा भाबडेपणा त्रासदायक होत असे. त्या भाबडेपणाचे, भोळेपणाचे निष्कारण उदात्तीकरण आहे असं वाटत असे. आणि कुठेतरी अप्पासाहेबांच्या दुरवस्थेला तो निष्कारण भाबडेपणाच जबाबदार आहे असे वाटत राही >> एकदम एकदम !!! किंग लीअर नंतर ते अधिकच खटकते.
दत्ता भट आणि शांता जोग होते टिव्हीवर दाखवलं होतं त्यात>> भट आठवतात अजूनही. बाकीचे संच पण बघायला मिळाले तर काय बहार होईल.
मी माझ्या तीशीत हे नाटक
मी माझ्या तीशीत हे नाटक नाशिकलाच पाहिले होते.म्हणजे १९८२ साली.त्या वेळेस माझे आजोबा ,जे मुंम्बईस उच्च्पदस्थ पोलिस ऑफिसर होते निवृत्त होवून बेळगावला स्थायिक झाले होते.वय साधारण ७२ असावे त्यांचे तेंव्हा.आजीस अर्धांगवायू झाला होता व ती अंथरुणात खिळून असायची. एकमेकांबद्दल त्यांना अतोनात आदर व प्रेम होते.एकदा लग्नात त्यांना नेले असतांना त्यांनी आजीला जरा गाडीत हिंडवून आणा रे असे आर्जव केलेले व वर्ज्य असलेली दोघांनी मिळून गपचुप भजी खाताना मी पाहिलेले आहे.तेंव्हा माझ्या डोळ्यात पाणी तरारले होते.ते क्षण अनुभवतांना नटसम्राटमधील अप्पांची आठवण आली होती --अन मला तरी त्या व्यक्तीचित्रात मेलोड्रामा वाटला नव्हता.
अतिशय उत्तम लेख .
. लेख आवडला.सुंदर माहिती
. लेख आवडला.सुंदर माहिती मिळाली
चांगला आढावा घेतलाय. बर्याच
चांगला आढावा घेतलाय. बर्याच गोष्टी माहीत नव्हत्या
उत्तम आलेख!
उत्तम आलेख!
छान लेख. इतिहास आवडला.
छान लेख. इतिहास आवडला.
नीरजा, छान लिहीलेस. भाबडेपणा
नीरजा, छान लिहीलेस. भाबडेपणा खटकतो हे मान्य. पण या नाटकावरुन माझी आजी नेहमी म्हणायची, 'माणसाने जेवायचे ताट द्यावे, बसायचा पाट देऊ नाही!' त्या काळातल्या एकूणच भाबड्या पिढीसाठी हे नाटक एक अंजन बनून राहिले असावे.
छान लेख. मी लहान असताना
छान लेख. मी लहान असताना "नटसम्राट" पाहिलय त्यामुळे उत्सुकता होती आणखिन माहिती जाणून घ्यायची. मी पाहिलं तेव्हा कोणी काम केलं होतं, आता आठवत नाही नेमकं. ८५ च्या दरम्यान पाहिलं होत मी नाटक आणि श्रीराम लागू नक्कीच नव्हते येवढं आठवतय.
आपण अत्यंत सुंदर व नीटनेटका
आपण अत्यंत सुंदर व नीटनेटका लेख लिहिला आहे. वाचून अतिशय आनंद झाला. काही नवी माहितीही मिळाली. लागू, भट, व दुभाषी यांना नटसम्राट म्हणून पहाण्याचा योग आला होता. इतरांबद्दल फक्त कल्पना केली होती. राजा गोसावींनी ही भूमिका वठविल्याचे तर ठाऊकच नव्हते. आपल्या या सुरेख लेखामुळे ते समजले.
मस्त, छान लेख! कै. दत्ता
मस्त, छान लेख! कै. दत्ता भटांवर चित्रित झालेल्या नाटकाची ध्वनीचित्रफित कुठे पहायला मिळू शकेल?
नीरजा छान लिहिलंस. बरीच नवीन
नीरजा
छान लिहिलंस. बरीच नवीन माहिती कळली.
लेख आवडला. मस्त आढावा
लेख आवडला. मस्त आढावा धन्यवाद.
आवडला लेख, ब-याच गोष्टी माहित
आवडला लेख, ब-याच गोष्टी माहित नसलेल्या.
नाटकाच्या प्रयोगांचा इतिहास
नाटकाच्या प्रयोगांचा इतिहास (जो अजूनही घडतो आहे) समोर उभा केलात.
कळणे न-कळणे यांच्या सीमारेषेवरच्या वयात हे नाटक पाहिलेले. हा लेख वाचून आता मुद्दाम वाचावेसे वाटतेय.
अप्पासाहेबांचा भाबडेपणा अकारण नाही वाटत. ते एक सामान्य संसारी गृहस्थ नव्हते तर कलावंत/नट होते. शिरवाडकरांच्याच शब्दांत : 'लाचखोरी आणि लाचारी यांच्या परिसरात वावरणार्या कोणा व्यवहारदक्ष वास्तवापासून दूर राहिलेल्या नटाचे वार्धक्य हे नाटकाचे मूलभूत सूत्र आहे.'
खूप वाचनीय लेख ग नीरजा
खूप वाचनीय लेख ग नीरजा
छान लिहिलं आहेस...
छान लिहिलं आहेस...
सुंदर लेख, मस्त माहिती
सुंदर लेख, मस्त माहिती मिळाली. धन्यवाद.
छान लेख .. नटसम्राटाबद्दल आणि
छान लेख .. नटसम्राटाबद्दल आणि त्याच्या प्रयोगांबद्दल एव्हढी माहिती नव्हती मला ..
Pages